Home Blog Page 10

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”

महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

पुणे, दि. २ मे २०२६ :
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना, शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

या भेटीदरम्यान कुटुंबीयांचे दुःख पाहून डॉ. गोऱ्हे भावूक झाल्या. “आईच्या हंबरड्याने मन हेलावलं. या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असे त्यांनी सांगितले. कुटुंब प्रचंड मानसिक धक्क्यात असल्याने कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ न करता शांततेत संवाद साधल्याचेही त्यांनी नमूद केले.

कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून, यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बालहक्क आयोगाने या प्रकरणात अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे सांगताना, योग्य सही व पोलीस स्टेशनच्या गुन्हा क्रमांकासह प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष तपास समिती स्थापन केल्याचे पत्र प्राप्त झाले असून त्याची प्रतही घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला असून, सरकार संपूर्णपणे कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश दिला आहे. “न्याय मिळवून देणे, तसेच कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

सोशल मीडियावर पीडित मुलीचे फोटो किंवा ओळख उघड करणारे संदेश प्रसारित होणे हे गंभीर व बेकायदेशीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “पॉक्सो कायद्यानुसार पीडितेची ओळख उघड करणे गुन्हा आहे. नागरिकांनी असे संदेश तात्काळ डिलीट करावेत,” असे आवाहन त्यांनी केले. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत स्पष्ट निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेचा जात-धर्माच्या आधारावर गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “न्याय हा धर्म किंवा जात पाहून होत नाही. सर्व समाज एकत्र येऊन पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे, हेच खरे चित्र आहे,” असे त्यांनी नमूद केले.

काही घटक पीडित कुटुंबाला आंदोलनात सहभागी होण्यास प्रवृत्त करत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “दुःखात असलेल्या कुटुंबाला आंदोलनासाठी भाग पाडणे हे अमानुष आहे. आंदोलन करायचे असल्यास इतरांनी करावे, पण कुटुंबाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांमधून व सोशल मीडियातून काही चुकीची माहिती पसरवली जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. पीडित मुलीच्या वडिलांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप चुकीचा असल्याचे कुटुंबीयांनी स्वतः सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोपरडी प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, त्या प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली असून पुढील प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे. “कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा मिळवणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले.

राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी फास्टट्रॅक न्यायालयांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अपेक्षित १३८ न्यायालयांपैकी केवळ सुमारे ४० कार्यरत असल्याचे सांगून उर्वरित न्यायालये तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सराईत गुन्हेगारांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याबाबतही न्याय विभागाशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

नसरापूर प्रकरणात न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, तसेच येणाऱ्या अधिवेशनातही हा मुद्दा ठामपणे मांडण्यात येणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवटी स्पष्ट केले.

यावेळी, शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, पुणे महिला आघाडी संपर्क प्रमुख पूजा रावेतकर, शिवसेना अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले, आनंद गोयल, निलेश गिरमे, हिरामण धनकवडे, निलेश घारे, कांताताई पांढरे, गायत्री भागवत, मीनल धनवटे, तेजश्री डिमले, स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे, राखी शिंगवी, मीना बनसोडे, मीरा तुपेरे, मंगल सोनटक्के उपस्थित होते.

विनेश फोगाट म्हणाली- बृजभूषणच्या शोषणाची मी देखील बळी,आम्ही स्पर्धा लढू, जर कोणासोबत काही चुकीचे घडले तर त्याची जबाबदारी भारत सरकारची

ऑलिम्पियन विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत विनेश म्हणाली की, गोंडा येथे ‘सीनियर ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धा’ होत आहे.आज काही अडचणींमुळे मला हे सांगायचे आहे की, बृजभूषण शरण यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या त्या 6 पीडितांमध्ये मी देखील आहे. माझी साक्षही न्यायालयात सुरू आहे. त्याच्या घरी (गोंडा) जाऊन स्पर्धा लढणे माझ्यासाठी कठीण होईल.मला वाटत नाही की मी माझे 100 टक्के देऊ शकेन. एका मुलीसाठी हे खूप कठीण असेल.

विनेश म्हणाली-

विनेशने काय म्हटले आहे ते वाचा…

गेल्या दीड वर्षापासून ‘मॅट’पासून दूर

सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत विनेश म्हणाली: “सर्वांना नमस्कार. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, गेल्या दीड वर्षापासून मी कुस्तीच्या ‘मॅट’पासून (आखाड्यापासून) दूर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मी कुस्तीसाठी तयारी करत आहे. मी अत्यंत कठोर परिश्रम आणि पूर्ण निष्ठेने सराव करत आहे. ज्याप्रमाणे मी भूतकाळात देशासाठी पदके जिंकली आहेत—ईश्वराच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने—त्याचप्रमाणे मला पुन्हा एकदा कुस्तीच्या मॅटवर परतायचे आहे, देशासाठी अनेक पदके जिंकायची आहेत आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा (तिरंग्याचा) मान राखायचा आहे, अशी मला आशा आहे.”

स्पर्धेची घोषणा अवघ्या एका महिन्यापूर्वीच

विनेशने पुढे सांगितले: “या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्या सर्वांशी काही विचार सामायिक करायचे आहेत. साधारण एक महिन्यापूर्वी, कुस्ती महासंघाने (Wrestling Federation) एका स्पर्धेची घोषणा केली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी निवडलेले ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेशातील ‘गोंडा’—हेच ते ठिकाण जिथे बृजभूषण वास्तव्यास आहेत. तिथे त्यांचे स्वतःचे एक खाजगी महाविद्यालय आहे. तिथे सहभागी होणाऱ्या प्रत्येक कष्टाळू खेळाडूला त्याचा योग्य तो न्याय मिळेल, ही कल्पनाच अत्यंत अशक्यप्राय—किंबहुना जवळपास असंभव—वाटते.”

सरकारने सर्व काही बृजभूषण यांच्या हाती सोपवले आहे

विनेशने म्हटले: “कोणत्या सामन्यासाठी कोणता पंच (referee) नेमला जाईल? एखादा पंच किती गुण देईल? ‘सामना अध्यक्ष’ (Match Chairman) कुठे बसतील? कोणाला विजयी घोषित करायचे आणि कोणाला पराभूत—या सर्व बाबींचे नियंत्रण बृजभूषण आणि त्यांचे साथीदार यांच्याच हाती असेल. सरकार—आणि विशेषतः आपले क्रीडा मंत्रालय—या संपूर्ण परिस्थितीकडे केवळ एक ‘निष्क्रीय प्रेक्षक’ म्हणून पाहत आहे. खेळाडूंना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीये. असे वाटते की, बृजभूषण यांना ‘मोकळीक’ (free hand) देण्यात आली आहे; मग त्यांचे महिला कुस्तीपटूंकडे पाहण्याचे वर्तन असो किंवा व्यापक कुस्ती विश्वातील त्यांच्या कृती असोत—त्यांना हवे ते करण्याची मुभा देण्यात आली आहे—आणि त्यामागे ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असे एक अलिखित आश्वासन दडलेले आहे. मला अजिबात वाटत नाही की, प्रत्येक कष्टाळू खेळाडूचे वजन (weight) निष्पक्षपणे तपासले जाईल; तसेच त्यांच्या कष्टाचे खरे फळ किंवा निकाल कुस्तीच्या मॅटवर प्रामाणिकपणे प्रतिबिंबित होतील, असेही मला वाटत नाही.”

खटला न्यायालयात प्रलंबित

विनेशने नमूद केले: “तीन वर्षांपूर्वी, आम्ही लैंगिक छळाविरुद्ध आमचा आवाज उठवला होता. त्या आरोपांशी संबंधित खटला अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे.” या प्रकरणी सहा महिला खेळाडूंनी तक्रारी दाखल केल्या होत्या आणि आपली साक्ष नोंदवली होती; त्या खटल्यातील साक्षींची नोंद सध्या सुरू आहे. कोणत्याही पीडितेची ओळख सार्वजनिक केली जाऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत; कारण तसे करणे हे त्यांच्या प्रतिष्ठेशी आणि सन्मानाशी संबंधित आहे. विनेशने पुढे सांगितले की, आज काही अपरिहार्य परिस्थितींमुळे तिला सर्वांशी काहीतरी सामायिक करायचे आहे. तिने नमूद केले की, या टप्प्यावर बोलण्याचा तिचा कोणताही इरादा नव्हता; कारण हा खटला न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि संपूर्ण सत्य कालांतराने देशासमोर येईलच. तथापि, तिला हे उघड करायचे होते की, ज्या सहा पीडितांनी तक्रारी दाखल केल्या होत्या, त्यापैकी ती स्वतः एक आहे.

आधी जाणून घ्या काय आहे प्रकरण…

बृजभूषण यांच्यावर लावले होते लैंगिक छळाचे आरोप

18 जानेवारी 2023 रोजी पैलवान विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर धरणे देऊन बृजभूषण यांच्यावर महिला पैलवानांसोबत लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेश फोगाट यांनी रडत सांगितले होते की- बृजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षक नॅशनल कॅम्पमध्ये महिला पैलवानांचा लैंगिक छळ करतात. विनेश यांनी हे देखील सांगितले होते की बृजभूषण खेळाडूंच्या हॉटेलमध्ये थांबत होते, जे नियमांच्या विरोधात आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभव झाल्यानंतर WFI च्या अध्यक्षांनी मला खोटे नाणे म्हटले होते.

बृजभूषण यांचे स्पष्टीकरण- आरोप खरे ठरल्यास फाशी घेईन

या आरोपांवर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते- कोणत्याही प्रकारचा छळ झालेला नाही. जर झाला असेल, तर मी फाशी घेईन. त्यांनी धरणे आंदोलनाला प्रायोजित असल्याचे सांगत यामागे हरियाणा काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र हुड्डा यांचा हात असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, आता हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरही खेळण्यास पात्र राहिलेले नाहीत.

नवले पुलावरील आंदोलनात पोलिसांचा बळाचा वापर:आयुक्तांचा मात्र लाठीमाराचा इन्कार, चिमुकलीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नये:नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचे राजकारण्यांना आवाहन; नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
पुणे-नसरापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नसरापूरला धाव घेत आहेत. मात्र, “जोपर्यंत माझ्या चिमुकलीला न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या घरी येऊ नये,” असे कळकळीचे आवाहन पीडितेच्या वडिलांनी केले आहे. देहू येथे लेकीच्या आस्थी विसर्जनासाठी गेले असताना त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे.

१ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, पीडितेचे वडील सध्या विधींसाठी घराबाहेर असताना त्यांच्या घरी नेत्यांची गर्दी होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावर संताप आणि दुःख व्यक्त करत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नेमके काय म्हणाले पीडितेचे वडील?

“नमस्कार! मी पीडित मुलीचा वडील. आता मी आस्थी विसर्जनासाठी देहू इथे आलो असताना, माझ्या घरच्यांकडून मला फोन आला की, तिथे बरेच राजकारणी लोकं सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने आमच्या घरी भेटायला येऊ नये. एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कुणी लोकं आहेत, त्यांना आम्हाला भेटायचं असेल तेव्हा भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नराधमाने माझ्या सांत्वनासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे”, असे पीडितेचे वडील म्हणाले आहेत.

नराधमाच्या शिक्षेसाठी नवले पुलावर आंदोलन

दरम्यान, ६५ वर्षांच्या नराधमाने या चार वर्षांच्या बालिकेला ज्या क्रूरतेने संपवले आणि तिचा मृतदेह गोठ्यातील शेणात लपवून ठेवला, त्यावरून जिल्हाभरात जनक्षोभ उसळला आहे. आरोपीला तातडीने फाशी द्यावी किंवा त्याला आमच्या हवाली करावे, या मागणीसाठी नसरापूर ग्रामस्थ आणि पीडितेच्या नातलगांनी शनिवारी नवले पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ४ तास पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत, आंदोलकांना नवले पुलावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.

मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “आम्ही पीडितेच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन त्यांची समजूत काढली. काही लोक त्यांना बाहेर पडू देत नव्हते, त्यांना केवळ बाजूला करण्यात आले. आई-वडील स्वखुशीने गाडीत बसले. पोलिसांनी कोणतेही ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ केलेले नाही. पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांना समजावून तेथून बाहेर काढल्यावर पीडित चिमुकलीच्या पार्थिवावर शनिवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नसरापूर प्रकरण:आरोपीचा न्यायालयात निर्लज्जपणा, बचावासाठी किरकोळ भांडणातून गोवल्याचा बनाव; 7 मे पर्यंत पोलिस कोठडी

पुणे-भोर तालुक्यातील नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘भांडणातून गोवल्याचा’ धक्कादायक बनाव रचला, मात्र पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला पोलिस कोठडीत पाठवले आहे.

भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) असे कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खून), ६४ (बलात्कार), ७४ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), १३७ (२), १४० (१), १४० (३) (अपहरण) यांसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत चिमुकलीच्या आईने पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी (एक मे) दुपारी तीन ते रात्री आठ दरम्यान राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नसरापूर गावाजवळ घडली.पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून कडेकोट बंदोबस्तात विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केले.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला “काही तक्रार आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत म्हटले की, “किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे.” आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मात्र, तपासातील निष्पन्न तथ्ये आणि चिमुकलीचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून त्याचा हा बनाव न्यायालयात टिकू शकला नाही.

तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीच्या जास्तीत जास्त पोलिस कोठडीची मागणी करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याची वैद्यकीय आणि रासायनिक विश्लेषण तपासणी करणे आवश्यक आहे. आरोपीची शारीरिक क्षमता तपासणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केले आहे का किंवा पीडितेवर याआधीही अत्याचार झाले होते का, याचा शोध घ्यायचा आहे. ज्या शस्त्राने चिमुकलीची निर्घृण हत्या केली, ते शस्त्र अद्याप जप्त करायचे आहे. या गुन्ह्यात आरोपीला इतर कोणी मदत केली आहे का किंवा यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या काळात पोलिस आरोपीकडून हत्येचा घटनाक्रम आणि पुराव्यांची साखळी जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

लोकांचा रोष स्वाभाविक, पण काही जणांकडून घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न – CM

नसरापूर पीडितेच्या वडिलांशी दोनदा संवाद साधला-लोकशाहीत भर चौकात फाशी देता येत नाही
मुंबई-नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी राज्य सरकार कायद्यातील कोणतीही पळवाट (लूपहोल) न ठेवता हा खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, जलदगतीने न्याय देण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने पीडितेच्या कुटुंबाला लेखी पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही लोक शनिवारी रात्री झालेल्या आंदोलनाचा फायदा घेऊन याला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखून धरल्याने सुमारे चार तास वाहतूक ठप्प होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले आणि रस्ता मोकळा केला. मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी काल स्वत: पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा बोललो. मी त्यांना समजावून सांगितले की, आपल्याला नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्याकरता वेळेत चार्टशीट दाखल होते आणि केस चालणे यासाठी आम्ही हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींना फास्टट्रॅकवर नेत आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांना असे वाटते की, अशा नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे. पण तसे लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कुणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कुठलाही लूपहोल न ठेवता, या नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा कशी होईल, अशाप्रकारचा संपूर्ण प्रयत्न राज्यशासनाच्या वतीने केला जाईल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. तशा संदर्भातील एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिले आहे.”
शनिवारी रात्री नवले पुलावर झालेल्या आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलनामागील राजकारणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “घटना गंभीर आहे. रोष देखील साहाजिक आहे. नागरिकांचा रोष असणे काही चुकीचे नाहीये. पण काही लोक परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की, त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली. सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक पीडितेच्या कुटुंबाला तिथून जाऊ देत नव्हते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. ते लोक कोण आहेत? हे लक्षात आलेले आहे. पण ठीक आहे. आता त्याबद्दल आपल्याला फार काही करायचे नाहीये. मात्र, मुलीच्या वडिलांनी त्यावेळी जी काही भूमिका घेतली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही या कुटुंबांच्या मागे ताकदीने उभे राहू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आम्ही आरोपीवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही माहिती घेत आहोत. मात्र, या गुन्ह्यातून तो बाहेर येऊच शकत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या घटनेवरून सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या विरोधकांचाही देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. विरोधकांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. मात्र, टीका करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या कार्यकाळात काय झाले, ते जरा स्वतःत डोकावून पाहावे. ज्यांचा इतिहास ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा (बदल्यांसाठी पैसे खाण्याचा) आहे, त्या लोकांनी जर आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिकवण्याचा प्रयत्न केला, तर ते अत्यंत हास्यास्पद आहे.”

मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या आरोपींना ठोकल्या बेडया

पुणे-मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या १८ आणि १९ वर्षे वयाच्या दोघांना पोलिसांनी पकडले आहे .त्यांच्याकडून ४३ मोबाईल फोन जप्त केले असून वयोवृध्द इसम तसेच महिला या निर्जन स्थळी असताना पाळत ठेऊन ते बेसावध असताना त्यांचे हातातुन मोबाईल फोन हिसकावुन घेऊन पळुन जात .

यासंदर्भात पोलिसांनी सांगितलेकी ,’
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सह्याद्री हॉस्पिटल समोर गल्लीमध्ये एक इसम रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करुन मोबाईल फोन पहात असताना दोन अज्ञात इसमांनी मागुन येऊन त्यांचे हातातील मोबाईल फोन हिसकावुन चोरी करुन पळून गेले या बाबत दि.२९/०४/२०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं. २१३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
या अनुषंगाने पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, चिलुमूला रजनिकांत, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग र श्री. सुनिल जैतापुरकर, यांनी देखील सुचना केल्या. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार साईनाथ म्हस्के यांना गुन्हा दाखल झालेनंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी हे चोरी केलेले मोबाईल फोन विक्री करीता येणार असल्या बाबतची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, पोलीस अंमलदार राहुल ठोंबरे, किरण गंभीरे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन बातमीदाराने आरोपीने परीधान केलेल्या वेशभुषा वर्णनावरुन संशयित इसमांवर पाळत ठेऊन संशयित इसम यांना पोलीस आल्याची चाहुन लागताच पळून जाण्याचे तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १. राजकुमार सोनु पाटील, वय-१९, रा-राजगुरु चौक, गणपती मंदिरा मागे ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे २. गौरव वाळु खुडे, वय-१८, रा-सी विल्डींग आठवा माळा, अपर व्हिआयटी, बिबवेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे पांढ-या रंगाच्या पिशवी मध्ये असलेल्या एकुन १९ मोबाईल फोन बाबत विचारले असता त्यांनी पुणे शहर व परीसरातुन अनेक मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. मोबाईल चोरी करण्यासाठी वयोवृध्द इसम तसेच महिला या निर्जन स्थळी असताना पाळत ठेऊन ते बेसावध असताना त्यांचे हातातुन मोबाईल फोन हिसकावुन घेऊन पळुन जात होते. तसेच पुणे स्टेशन, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवाशांच्या खिशातुन मोबाईल फोन चोरी केल्याचे चौकशी दरम्यान सांगितले आहे. या आरोपींकडुन ४३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असुन एकुण २,६५,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पो. उपनिरी. किशोर बेरड हे करत आहेत.
हि कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, चिलुमूला रजनिकांत, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग सुनिल जैतापुरकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन अंजुम बागवान, पोनि (गुन्हे), विजय ठाकर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, मुकुंद कोकणे, संदिप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, बालाजी सोगे, गणेश पालवे, अनिल मन्हाळकर, राहुल ठोंबरे, किरण गंभीरे यांनी केली आहे.

भाजपने आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचेही इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा आरोप

भाजप सरकार आम आदमी पार्टीला एवढे का घाबरते? इंस्टाग्राम अकाउंट बंद करणे ही तर आमच्या मूलभूत हक्कांवर गदा!
सोशल मीडिया वरून मोदींना विरोध चालू राहील, जनतेच्या हक्कासाठी लढत राहू: आम आदमी पार्टी

पुणे-मध्यंतरी आम आदमी पार्टीने गुजरात मधील फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट भाजप सरकारने बंद केल्याचा आरोप केला होता.आता महाराष्ट्रातील आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचेही इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महिला आरक्षण दुरुस्ती बिल विषयी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची निंदानालस्ती करणारी काही विधाने आणि आम आदमी पार्टी सोडणारे खासदार राघू चड्डा यांच्यावरती आपचे प्रवक्ते मुकुंद यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या पोस्ट अनेक ठिकाणी शेअर केल्या गेल्या होत्या. त्यामधूनच केंद्र सरकारने 25 एप्रिल रोजी तातडीने इंस्टाग्राम अकाउंट भारतामध्ये बंद केल्याचे समोर आले आहे. याबाबत मेटा प्लॅटफॉर्म ने हे अकाउंट भारत सरकारच्या नोटीस मुळे बंद केल्याची माहिती या अकाउंट वर दिसते. याबाबत माहिती तंत्रज्ञान कलम 79 ( 3) ब चा वापर करून सरकारने हे अकाउंट भारतात बंद केले आहे.

यावर आम आदमी पार्टी व मुकुंद किर्दत यांनी जोरदार टीका केली असून जनतेचे प्रश्नांना मांडल्यामुळे आणि सरकारविरोधी भूमिका घेतल्यामुळे ही दडपशाही केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच या इंस्टाग्रामवर संविधानाच्या चौकटीमध्येच हक्क बजावत पोस्ट केल्या गेल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये भाजप सरकार चे नियंत्रण आहेत परंतु आता सोशल मीडियावर सुद्धा आम आदमी पार्टीचा विचार प्रसार होऊ नये यासाठी या सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसते आहे. परंतु या दडपशाही विरोधात जाऊन आम आदमी पार्टी गुजरात, महाराष्ट्र व देशभर ही लढाई चालूच ठेवेल असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत मुकुंद किर्दत यांनी सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधून सरकारला नोटीस पाठवली आहे. सरकारने या कलमाचा वापर करण्याआधी आप चे मुकुंद किर्दत यांना नोटीस पाठवून प्रसिद्ध केलेल्या मजकुरा विषयी खुलासा मागवायला हवा होता. सरकारने ही बेकायदेशीर बंदी न हटवल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल असे अँड असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

संवादभूषण” प्रकाशित

0

पुणे –

निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ लिखित “संवादभूषण” पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, कार्यकारिणी सदस्य राजेश खाडे,माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांच्या हस्ते नुकतेच झाले.पत्रकार संघाच्या लोणावळा येथील अद्ययावत नूतनीकरण करण्यात आलेल्या विश्रामधामात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनप्रसाद मोकाशी यांनी केले.यावेळी जेष्ठ पत्रकार,कलाकार उपस्थित होते. भुजबळ यांचे हे अकरावे पुस्तक आहे.

“हे आहेत संवादभूषण”

संवादभूषण पुस्तकात
वृत्तपत्र छायाचित्रकार अनिल शाह , प्रा डॉ बाबासाहेब काझी,निवृत्त दूरदर्शन संचालक अशोक डुंबरे,निवृत्त दूरदर्शन निर्माते राम खाकाळ ,निवेदिका शिबानी जोशी निवृत्त दूरदर्शन कॅमेरामन नरसिंग पोतकंठी,निवृत्त माहिती लेखापालविलास सरोदे ,भारतीय माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी- कवी नितीन केळकर, जेष्ठ पत्रकारकुमार कदम,भारतीय माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी मधुसूदन आडे ,
मुख्यमंत्र्यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी वीणा गावडे, नवी मुंबईतील मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी,
जेष्ठ पत्रकार राजेंद्र घरत ,लोकमत चे वरिष्ठ पत्रकारनारायण जाधव, नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी- लेखक, कवी
महेंद्र कोंडे, लोक कलाकारांचे हित चिंतक- मंत्रालय पत्रकार खंडूराज गायकवाड, माध्यमकर्मी डॉ बबन जोगदंड , इंग्रजी वृत्तपत्र लेखक सी के सुब्रमण्यम, आध्यात्मिक मार्गदर्शकसंध्याताई अमृते, मिशन आयएएसचे संचालक ,प्रेरक वक्ते- लेखक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे , टीव्ही पत्रकार
मनोज भोयर, संपादिका वैशाली आहेर, लेखिका- प्रकाशिका लता गुठे,प्रा डॉ सतीश शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते मदन लाठी , छायाचित्रकार
विजय होकर्णे, पत्रकार किरण बोळे, कवी प्रा अशोक बागवे, संपादक मारुती विश्वासराव ,कवी अशोक नायगावकर , शिवशाहीर
प्रा साईप्रसाद कुंभकर्ण , गायक – संगीतकार मधुकर घोडविंदे, अष्टपैलू कांचन कंदले आणि वाचन चळवळीतील कार्यकर्ती
मरियम मिर्झा आदींच्या प्रेरणादायी जीवन कथा या आहेत .

वाद्य वादनातून लता मंगेशकर-आशा भोसले यांना ‘स्वरांजली’

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे दि. ६ ते दि. ८ मे कालावधीत आयोजन

पुणे : गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांना विविध वाद्यांवर गीते सादर करून स्वरांजली वाहिली जाणार आहे. १५ पेक्षा जास्त वाद्यांद्वारे २५ कलाकार वादनातून स्वरांजली अर्पण करणार आहेत. मराठी-हिंदी चित्रपट गीतांबरोबरच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत, गझल ऐकावयास मिळणार आहे. सुगम संगीत क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल रमाकांत परांजपे, शामकांत परांजपे, आणि विवेक परांजपे यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

बुधवार, दि. ६ ते शुक्रवार, दि. ८ मे २०२६ या कालावधीत गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळात ‘स्वरांजली’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे उद्‌घाटन दि. ६ रोजी सायंकाळी ६ वाजता इन्कम टॅक्सच्या अतिरिक्त आयुक्त मुग्धा सरदेशपांडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्य वादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम असून सर्वांसाठी खुला आहे.

गांधर्व महाविद्यालयाचा ९४वा वर्धापन दिन, आद्य गांधर्व महाविद्यालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव तसेच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या आज्ञेनुसार १९३२ मध्ये गांधर्व महाविद्यालय, पुणेची स्थापना आणि गांधर्व महाविद्यालय, स्वत:च्या वास्तूत सुरू होऊन झालेली २० वर्षे याचे निमित्त साधून वर्धापनदिन संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

‘स्वरांजली’ कार्यक्रमाची सुरुवात दि. ६ रोजी डॉ. प्रमोद गायकवाड यांच्या सनई वादनाने होणार आहे. त्यानंतर संजय भावे (सॅक्सोफोन), संजय गोगटे (ऑर्गन), सौरभ वर्तक (बासरी), सचिन जांभेकर (संवादिनी), अनिल गोडे (एकॉर्डियन), शंतनू गोखले (संतूर), अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन), साक्षी शेवलीकर (मोहनवीणा), अनिल पेंडसे (मेंडोलिन), दि. ७ रोजी मिलिंद तुळणकर (जलतरंग), स्वप्ना दातार (व्हायोलिन), शामकांत सुतार (माउथ ऑर्गन), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), विजय तुळसकर (सिंथेसायझर/संवादिनी), अमर ओक (बासरी), कल्याणी देशपांडे (सतार), दिप्ती कुलकर्णी (पियानिका), पंडित प्रमोद मराठे (संवादिनी) यांचे सादरीकरण होणार आहे. सचिन जांभेकर यांना या वेळी पंडित तुळशीदास बोरकर स्मृती संगतकार पुरस्कार मुग्धा सरदेशपांडे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

दि. ८ रोजी रमाकांत परांजपे (व्हायोलिन), शामकांत परांजपे (विविध वाद्ये) आणि विवेक परांजपे (सिंथेसायझर) यांचे सादरीकरण आणि संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्याशी संगीतकार पराग माटेगावकर संवाद साधणार आहेत. गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे यावेळी रमाकांत परांजपे, शामकांत परांजपे, आणि विवेक परांजपे यांना पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण रामकृष्ण मठाचे मठाधीपती स्वामी श्रीकांतानंद यांच्या हस्ते होणार आहे.

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

मुंबई, दि. ०३ मे २०२६: राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण १५३४ कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

विजेचा वापर कोणत्या वेळेत झाला त्याच्या आधारे वीजदरात सवलत दिली जाते त्याला टीओडी सवलत म्हणतात. राज्यात जुलै २०२५ पासून १० किलोवॅटपेक्षा जास्त भार असलेल्या औद्योगिक व वाणिज्यिक वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी सवलत देण्यात आली. या ग्राहकांना एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांसाठी १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांसाठी २५ टक्के इतकी मोठी सवलत देण्यात येत आहे. 

सर्व घरगुती ग्राहकांनाही प्रथमच टीओडी सवलतीचा लाभ देण्यास सुरुवात झाली असून चालू आर्थिक वर्षात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी प्रती युनिट ८५ पैसे सवलत देण्यात येते. स्मार्ट मीटरमध्ये कोणत्या वेळी किती वीजवापर झाला हे मोजण्याची सुविधा असल्याने स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांना या सुविधेचा लाभ होत आहे.

औद्योगिक ग्राहकांमध्ये उच्च दाब औद्योगिक ग्राहक, उच्चदाब हंगामी औद्योगिक ग्राहक, लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि यंत्रमाग असा एकत्रित विचार केला तर ४३,९११ औद्योगिक ग्राहकांना एकूण १,७७४ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. राज्यातील उच्चदाब व लघुदाब अशा ११,०१७ वाणिज्यिक ग्राहकांना एकूण २३९ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.

घरगुती ग्राहकांना टीओडीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यापासून त्यांना १,०९६ दशलक्ष युनिट इतक्या विजेसाठी ८९ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. या कालावधीतील लाभधारक घरगुती ग्राहकांची संख्या ६९,३५,३८८ इतकी होती. 

राज्यात घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. त्यासोबत टीओडी लाभ मिळणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांची संख्याही वाढत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजदरातील सवलतीचा लाभ सार्वजनिक पाणीपुरवठा आणि अन्य सार्वजनिक सेवांसाठीही झाला आहे. या घटकांसाठी संबंधित १२,९८९ ग्राहकांना २०२ कोटी रुपयांचा टीओडी लाभ झाला आहे.

राज्यातील सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय उर्जेची उपलब्धता वाढली आहे. ही वीज स्वस्त मिळत असल्याने महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार दिवसाच्या वीजवापरासाठी सवलत लागू केली आहे. वीज ग्राहकांनी अधिक विजेची गरज असणारी उपकरणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत प्राधान्याने वापरून टीओडी सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल

0

आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येणार
–राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांची माहिती

मुंबई,दि.२: नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुदैवी आणि संतापजनक आहे.या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली आहे.

बालिकेच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयोगाकडून स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना देखील दिल्या जात आहेत.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही आयोगाचे अध्यक्ष यांनी केले आहे. बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
०००

पीएमपीएमएल कामगार पेन्शन प्रकरणी संघटनेला न्यायालयीन लढ्यात यश; निकाल कामगार हितैषी:गोपाळदादा तिवारी

कामगार हिताचे कायदे काँग्रेस काळात; मोदी सरकारने २९ कायद्यात बदल – डॉ. कैलास कदम

पुणे :
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने पीएमपीएमएल कामगार संघटना (इंटक) यांचा कामगार मेळावा काँग्रेस भवन येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, राजगोपालचारी यांच्या नेतृत्वाखाली इंटकची स्थापना झाली आणि त्यानंतर देशात कामगार हिताचे अनेक कायदे अस्तित्वात आले. मात्र सध्याच्या मोदी सरकारने भांडवलदारांच्या दबावाखाली २९ कामगार कायद्यांमध्ये बदल केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते तथा पीएमपीएमएल कामगार संघटनेचे सल्लागार गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले की, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या संयुक्त वाहतूक व्यवस्थेसाठी पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली. मात्र कंपनी व्यवस्थापनाने निवृत्त कामगारांना पेन्शन देण्यास नकार दिल्याने संघटनेला औद्योगिक न्यायालय तसेच उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. दोन्ही न्यायालयांनी कामगारांच्या निवृत्ती वेतनाच्या मागणीस मान्यता देत कामगार हिताचे संरक्षण करणारा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पीएमपीएमएल व्यवस्थापनाला निवृत्त कामगारांना तत्काळ पेन्शन देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तिवारी यांनी केली. कामगार हितासाठी आवश्यक असल्यास पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शासनाकडे पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मराठी भाषांतर वाचून दाखविण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, संभाजी राजे भोसले, ए. एन. अनपूर, मामा सरोदे, अशोक चव्हाण आदींनी भाषणे केली.
मेळाव्यात पीएमपीएमएलमधील अधिकारी पंकज देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत तीव्र टीका करण्यात आली. या प्रकरणामुळे संस्थेच्या आर्थिक स्थितीवर व कामगारांवर विपरीत परिणाम झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तसेच सेवाज्येष्ठता डावलून होणाऱ्या बढती प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करण्यात आली. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय अंशदायी योजना पूर्ववत सुरू करावी, तसेच आरोग्य योजनेत शहरातील प्रमुख रुग्णालयांचा समावेश करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सरचिटणीस नुरुद्दीन ईनामदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन ए. एन. अनपूर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

0

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

पुणे, दि २: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जनगणना २०२७’ मध्ये सक्रीय सहभाग नोंदवून आपली स्व-गणना पूर्ण केली आहे.
‘जनगणना २०२७’ ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालय तसेच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते, यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा, याकरीता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे

श्रीमती पवार म्हणाल्या, जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र राज्यात १ मे पासून सुरुवात झाली असून ‘स्व-गणना’ प्रक्रिया १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता केंद्र शासनाने https://se.census.gov.in/ संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी या संकेतस्थळाचा वापर करुन आपल्या सोयीनुसार अद्ययावत माहिती भरावी.

स्व-गणनेच्या टप्प्यानंतर
१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक गृहभेटी देणार असून जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार असून यावेळी प्रगणकास संपूर्ण सहकार्य करावे. आपण दिलेली माहिती अत्यंत गोपनीय असण्यासोबत ती कायद्याने सुरक्षित असणार आहे. या माहितीचा वापर राज्याच्या विकास आणि नियोजनासाठी केला जाणार आहे, त्यामुळे या राष्ट्रीय मोहिमेत राज्यातील नागरिकांनी एकजुटीने सहभागी होऊन स्व-गणना करावी, असे आवाहनही श्रीमती पवार यांनी केले.

यावेळी उपायुक्त तथा शहर जन गणना अधिकारी विजय लांडगे, सहायक आयुक्त तथा चार्ज अधिकारी बाळासाहेब ढवळे आदी उपस्थित होते.

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV अनिवार्य करण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांचे प्रयत्न

मुंबई, दि. २ मे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुरात घडलेली एका चिमुकलीवरील लैंगिक अत्याचारानंतर हत्या झाल्याची घटना संतापजनक असून, या घटनेवर शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच दोष सिद्धीचे प्रमाण (कन्विक्शन रेट) वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.”

महिलांच्या सुरक्षेसाठी गाव पातळीवर महिला दक्षता समित्या आणि महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यावर त्यांनी भर दिला. “गावागावांत लोकसहभागातून सुरक्षा यंत्रणा उभी राहिली पाहिजे. प्रत्येक गावात ‘बिट मार्शल’ असावा, जेणेकरून संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांपर्यंत पोहोचेल,” असे त्यांनी नमूद केले.

तसेच, वारंवार गुन्हे करणाऱ्या ‘हॅबिच्युअल ऑफेंडर्स’वर लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रमाचा उल्लेख करत डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांच्या सुरक्षेसाठी उपसभापती कार्यालयातून आम्ही ‘सेफ्टी ऑडिट’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील एसटी बस, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, तसेच रेल्वे स्थानके आणि प्रवासी थांबे येथे सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात यावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.”

“या घटनेनंतर नागरिकांनी व्यक्त केलेला संताप स्वाभाविक आहे. मात्र आंदोलन करताना कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने भूमिका मांडावी. पीडित कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे आहोत,” असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

या प्रकरणात आरोपीला कठोर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकारकडे गांभीर्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री सिद्धिविनायक सारसबाग मंदिराच्या २४२ व्या वर्धापनदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

पुणे : सवाई माधवराव यांचा जन्म १८ एप्रिल १७७४ रोजी झाला. सवाई माधवराव यांच्या  जन्मापूर्वीच ‘माधवराव’  हे नाव निश्चित करण्यात आले होते. थोरले माधवराव यांच्या निधनानंतर  त्यांच्या पिंडीला कावळा शिवला नाही. तेव्हा असे सांगितले गेले की मला  मुलगा होईल तेव्हा त्याचे नाव माधवराव ठेवीन. तेव्हा  पिंडाला कावळा शिवला. अशा नोंदी आहेत आणि त्यामुळे नारायणरावाच्या मुलाचे नाव परत माधवराव ठेवले गेले आणि ते सवाई माधवराव म्हणून ओळखले गेले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची मुंज पर्वती टेकडी येथे पार पडली आणि त्यांचे लग्नही याच ठिकाणी झाले. जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशीच त्यांना पेशवेपद मिळाले ही इतिहासातील दुर्मिळ घटना आहे.  सवाई माधवरावांचे नशीब एका बाजूने अत्यंत मोठे वाटते, जणू कोणालाही न लाभलेला अधिकारयोग त्यांच्या भाग्यात होता; पण त्याच वेळी काही प्रसंग अत्यंत दुर्दैवीही ठरले. अशी माहिती इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिली. 

श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री सिद्धिविनायक सारसबाग मंदिराच्या २४२ व्या वर्धापनदिनानिमित्त इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांचे श्रीमंत सवाई माधवराव पेशवे या विषयावर व्याख्यान झाले. सारसबाग गणपती मंदिराच्या प्रांगणात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत यावेळी उपस्थित होते.

मंदार लवाटे म्हणाले, सवाई माधवरावांच्या जन्मासाठी केलेले नवस पूर्ण करण्यासाठी नाना फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. या नवसफेडीसाठी त्या काळात सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांचा खर्च झाला होता. शनिवारवाड्यात आगमनावेळी सवाई माधवरावांवर सोन्याची फुले उधळण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

ते पुढे म्हणाले, नाना फडणवीसांना कल्पना होती की सवाई माधवरावांना सुद्धा मारण्याचे प्रयत्न केले जाणार, आणि ते त्यांच्या लहानपणापासूनच सुरू होते. पुरुषोत्तम दाजी हे त्यांच्या पायरीवर झोपायचे. एकदा एक बाईने केसांच्या बुचड्यात सुरी लपवली होती. मात्र तिला पकडण्यात आले. पटवर्धनांना या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना होती. पुढेही असे अनेक प्रयत्न होत राहिले, याचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. नाना फडणवीसांनी सवाई माधवरावांच्या भोवती त्रिस्तरीय (तीन घडींची) सुरक्षा व्यवस्था केली होती. त्या आतल्या कड्यात बळवंतराव नागनाथ नावाचा माणूस होता. हे सगळे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. इ.स. १७९४ मध्ये सवाई माधवरावांचा मृत्यू झाला. अनेकांना अशी आशा होती की ते आपल्या पूर्वजांसारखे महान शासक होतील.

इ.स. १७८२ साली सारसबाग मंदिर बांधणीला सुरुवात झाली. प्रारंभी गणपतीची मूर्ती कुरुंदा दगडाची होती, असा समज प्रचलित होता; मात्र नव्या नोंदींनुसार पहिली मूर्ती संगमरवरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढे कालांतराने मूर्ती बदलण्यात आल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे. त्या काळात सारसबाग परिसर हा गावाबाहेरचा भाग असतानाही गणपतीची अत्यंत निगुतीने व भक्तिभावाने पूजा केली जात होती. पेशवे घराण्याचे आराध्य दैवत गणपती असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व होते.

रमेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. पुष्कर पेशवा यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ लडकत यांनी आभार मानले.