मुंबई- मुंबईत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू निलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरून कॉंग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आता गांधींची गांधीगिरी नाही, तर गोडसेंची गोळी’ चालणार असे वादग्रस्त विधान निलेशचंद्र यांनी केले आहे.
कॉंग्रेसने निलेशचंद्र यांचा व्हिडिओ ट्विट करत जोरदार टीका केली आहे. कॉंग्रेसने म्हटले, हे निलेशचंद्र स्वतःला ‘जैन धर्मगुरू’ म्हणवून घेतात, पण प्रत्यक्षात मात्र समाजात विष कालवणारी आणि हिंसेचे समर्थन करणारी चिथावणीखोर भाषणं ठोकतात. आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अनादर करण्याची यांची लायकी काय? आणि ज्याने या अहिंसेच्या साधकावर गोळी झाडली, त्या देशातील पहिल्या आतंकवाद्याचं हे जाहीर कौतुक करतात? कसली विकृती आहे ही, अशी टीका केली आहे.तसेच यांना कोणत्या तोंडाने ‘जैन धर्मगुरू’ म्हणायचं? असा सवालही कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. हे तर केवळ सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर समाजासमाजात दंगली घडवून आणणारी आणि भांडणं लावणारी ही भाडोत्री जनावरं आहेत. यांच्या डोक्यात ना भगवान महावीरांचा ‘अहिंसा परमो धर्मः’ हा पवित्र विचार आहे, ना यांच्या जगण्यात किंवा आचारात सत्याचा लवलेश आहे!
पांढरे वस्त्र काढून उघडे करायला वेळ लागणार नाही
धर्मगुरूच्या वस्त्राआड लपलेला हा केवळ एक राजकीय दलाल आहे, ज्याचा धर्माशी आणि मानवतेशी काडीचाही संबंध नाही. या गावगुंडाने आपली भाषा सांभाळावी नाहीतर याचे पांढरे वस्त्र काढून यांना उघडे करायला वेळ लागणार नाही, असा इशाराही कॉंग्रेसने दिला आहे.

