दीप्ती चवधरी यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा!
पुणे:
पुणेकरांच्या गळ्यातील ताईत असलेला आणि महाराष्ट्राच्या भाषिक व सांस्कृतिक अस्मितेचा केंद्रबिंदू असलेला ‘आकाशवाणी पुणे’ केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद पाडण्याचा कुटिल डाव केंद्र सरकारने आखला आहे. केंद्र सरकारच्या या मराठीविरोधी आणि पुणेकरांचा अपमान करणाऱ्या धोरणाचा पुणे शहर काँग्रेस तीव्र शब्दांत निषेध करत असून, जर तात्काळ येथे भारतीय माहिती आणि प्रसारण सेवा (IIS) अधिकाऱ्याचे पद निर्माण करून अधिकारी नियुक्त केला नाही, तर पुणे काँग्रेस भाजप सरकारविरुद्ध तीव्र जनआंदोलन छेडेल व केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुणे भेटीत तीव्र आंदोलन केले जाईल, असा थेट इशारा पुणे शहर काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी आज दिला आहे.
३० जून २०२६ च्या आधी आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागासाठी सक्षम भारतीय माहिती आणि प्रसारण सेवा (IIS) अधिकाऱ्याचे पद निर्माण करून कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी, पुणे प्रादेशिक वृत्त विभागाला भविष्यात कधीही धोका निर्माण होणार नाही, अशा स्वरूपाची ठोस लेखी हमी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने द्यावी आणि वृत्त विभागाचे कामकाज पुणे केंद्रावरूनच चालेल, ते मुंबई किंवा अन्य कुठेही स्थलांतरित केले जाणार नाही याची काळजी घ्यावी. या मागण्या कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत.
“आकाशवाणी पुणे हा केवळ एक सरकारी विभाग नाही, तर ती पुणेकरांची आणि महाराष्ट्राची ओळख आहे. आमची मराठी भाषा आणि आमच्या हक्काच्या बातम्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास पुणे काँग्रेस शांत बसणार नाही. केंद्र सरकारने पुणेकरांच्या संयमाचा अंत पाहू नये. ३० जूनपूर्वी जर आयआयएस दर्जाचे पद निर्माण करून अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही, तर पुणे काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला.”
गेल्या पाच दशकांपासून आकाशवाणी पुणे केंद्राचे सकाळचे बातमीपत्र हे महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये ऐकले जाते. केवळ माहिती नव्हे, तर शुद्ध, अभिजात मराठी भाषेचा वारसा या वृत्त विभागाने जपला आहे. परंतु, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला महाराष्ट्राचा हा गौरवशाली वारसा आणि मराठी भाषा संपवायची आहे का? असा संतप्त सवाल दीप्ती चवधरी यांनी उपस्थित केला आहे. २०१६, २०१८ आणि २०२३ मध्येही या विभागातील आयआयएसची दोन पदे हलवून हा वृत्त विभाग बंद करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा पुणेकरांच्या आणि काँग्रेसच्या तीव्र विरोधामुळे केंद्राला माघार घ्यावी लागली होती. मात्र पदे परत आणण्यात आली नाहीत. तेव्हापासून इतर विभागातील पदावरील अधिकाऱ्यामार्फत काम चालवायचे आणि रोष मावळल्यावर पुन्हा तोच डाव खेळायचा असे सुरू आहे.
सध्या या विभागात एकमेव कायमस्वरूपी म्हणून कार्यरत असलेले वृत्तनिवेदक श्री. मनोज क्षीरसागर हे येत्या ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सहायक संचालक अन्य खात्यातील पदावर आहेत. त्यामुळे क्षीरसागर यांच्या निवृत्तीनंतर केंद्र सरकार हा वृत्त विभाग कायमचा कुलूपबंद करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि पुणेकर भाजपचे लोकप्रतिनिधी या गंभीर विषयावर डोळे झाकून गप्प का बसले आहेत? पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना पुणेकरांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे काहीच सोयरसुतक उरलेले नाही का?
पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीतील हक्काची शासकीय वृत्तसेवा बंद करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून, पुण्याच्या पत्रकारितेचा आणि सांस्कृतिक इतिहासाचा खून करण्याचा भाजप सरकारचा पद्धतशीर कट आहे. असे दीप्ती चवधरी शेवटी म्हणाल्या.

