Home Blog Page 11

ड्रोनमुळे बदलणार शेतीचे स्वरूप : अत्याधुनिक शेतीला सुरुवात

माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन

सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशनतर्फे ‘महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन’ : ‘महा ड्रोन यात्रे’चा शुभारंभ

१०० तरुणांना कृषी ड्रोनचे वितरण

पुणे: “भारतीय शेतीला वाढत्या अन्न उत्पादनाची तीव्र गरज आहे. कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. अचूक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि शाश्वतता सुधारण्यासाठी ड्रोन हे एक क्रांतिकारक साधन म्हणून उदयास येत आहे. ड्रोनमुळे अचूक शेती, पीक निरीक्षण आणि कीटकनाशक फवारणी करणे शक्य होते,” असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.

राज्यातील शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्सतर्फे ‘महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन’ अंतर्गत १०० कृषी ड्रोन वितरण उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी, म्हणजे १ मे रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणातील सभागृहात करण्यात आला. यावेळी राज्यव्यापी ‘महा ड्रोन यात्रे’चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या प्रसंगी शेखर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी माजी ब्रिगेडियर विरेश श्रीवास्तव, माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी आणि महेश झगडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्सचे सहसंस्थापक संचालक गणेश थोरात आणि मिहीर केदार तसेच ऋषिकेश सोनावणे उपस्थित होते.

या मिशन अंतर्गत १०० गरजू व होतकरू तरुणांना १०० कृषी ड्रोन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

शेखर गायकवाड म्हणाले, “भारतीय कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानातील तांत्रिक प्रगती, नियामक चौकट, पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचा दृष्टिकोन आणि आर्थिक उपलब्धता यांचे मूल्यांकन आवश्यक आहे. ड्रोनचा अवलंब केल्याने कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढते, परंतु जास्त खर्च, प्रशिक्षणाचा अभाव आणि नियामक अडथळे यांसारखी आव्हाने त्याच्या व्यापक अंमलबजावणीत अडसर ठरतात.”
“इस्रायल देशाप्रमाणे भारतात ‘प्रिसिजन फार्मिंग’ पद्धत आणल्यास अद्वितीय बदल घडेल. यामुळे शेतकरी केवळ २० मिनिटांत शेतातील काम करून आर्थिक खर्च कमी करू शकतो,”

महेश झगडे म्हणाले, “ड्रोनमुळे नक्कीच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहे. परंतु बाजारपेठेचा विचार करता इनोव्हेशन, सरकारी योजना, आर अँड डी, मार्केटिंग, सबसिडी यांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात करावा.”

गणेश थोरात म्हणाले, “महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांतीची सुरुवात ही राज्याच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवी क्रांती घडवणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन गेल्या ६ वर्षांपासून ८० ते १०० किलोपर्यंत विविध क्षमतेचे ड्रोन विकसित करत आहे. कृषी, सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रात आम्ही यशस्वी कार्य करीत आहोत. डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था म्हणून आम्ही ड्रोन पायलट प्रशिक्षणही देतो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.”

मिहीर केदार म्हणाले, “‘महा ड्रोन यात्रे’मध्ये विशेष सुसज्ज वाहने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करून प्रत्येक गावात ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर करतील. यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती मिळेल आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्याचप्रमाणे शेती अधिक कार्यक्षम व सुरक्षित बनेल.”

ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीतील मनुष्यबळाचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच वेळेची बचत, अचूक फवारणी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. भविष्यात कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे मत उमेशचंद्र सारंगी आणि ब्रिगेडियर विरेश श्रीवास्तव यांनी मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा जकाते यांनी केले, तर ऋषिकेश सोनावणे यांनी आभार मानले.

महिला API ला २८ लाखाच्या लाच प्रकरणी पकडले

पुणे :पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई लोहमार्ग येथे बढतीवर बदली झाल्याने त्यांना पुणे शहर पोलीस दलातून शुक्रवारी कार्यमुक्त करण्यात आले. नव्या पदावर रुजू होण्यापूर्वी महिला सहायक पोलीस निरीक्षकानी खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉरनॉट जवळ २८ लाख घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. या घटनेनंतर या महिला पोलीस अधिकार्‍याची पोलीस आयुक्तालयातील रुमचा सर्च घेतला जात आहे.

वैशाली तोटेवार (API Vaishali Totewar) असे या महिला अधिकार्‍याचे नाव आहे. त्यांची पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती होती. त्यांच्याकडे ८ ते ९ तक्रार अर्ज तपासासाठी देण्यात आले होते. त्यांचा तपास सुरु असतानाच त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढतीवर मुंबई लोहगाव पोलीस येथे बदली करण्यात आली होती. त्यांना पुणे पोलीस दलातून कालच कार्यमुक्त करण्यात आले. परंतु, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची या अगोदरच कारवाई सुरु झाली होती. त्यांनी एका तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये २८ लाखांची लाच मागितली होती. त्यात एका खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉरनॉट येथे बोलवले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २८ लाख रुपये घेण्यासाठी आलेल्या खासगी व्यक्तीला पकडले. पाठोपाठ वैशाली तोटेवार यांना ताब्यात घेतले. पाठापोठ दुसर्‍या दोन पथकांनी पोलीस आयुक्तालयातील त्यांच्या कार्यालयातील रुमची तर आणखी एका पथकाने त्यांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली असून ही कारवाई अद्याप सुरु आहे.

अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, मुलगी 15 आठवड्याची गर्भवती

पुणे- एका अल्पवयीन मुलाने जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी १५ आठवड्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत या मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ मध्ये तसेच २१ मार्च २०२६ रोजी घडला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन नोव्हेंबर २०२५ मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने या मुलीवर वारंवार बळजबरी करत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिला त्रास होऊ लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती १५ आठवड्याची गर्भवती असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करीत आहेत.

६३ वीज कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव

महावितरणमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

पुणे, दि. २ मे, २०२६- महावितरणच्या रास्तापेठ येथील परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परिमंडलातील ६३ वीज कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट यंत्रचालक व उत्कृष्ट तंत्रज्ञ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता शैलेश जैन, सतीश खाकसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्य अभियंता काकडे म्हणाले, ‘वीज कर्मचाऱ्यांचा ग्राहकांशी थेट संबंध येतो. त्यांच्या कामावरच महावितरणची प्रतिमा अवलंबून असते. सर्वांनी ग्राहकाभिमुख होऊन ग्राहक तक्रारींचा वेळेत निपटारा करावा व कंपनीचा महसूल वाढवावा.’

वर्षभरात सरस कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महावितरण दरवर्षी पुरस्काराने गौरव करते. त्यासाठी मुख्यालयाने लावलेल्या निकषांधारे कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. यावर्षी ६३ कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला. यामध्ये १२ यंत्रचालक तर ५१ तंत्रज्ञांचा समावेश आहे. पुरस्कारार्थींपैकी हरिष बोळे, मनोज केदार, कल्पना घोडके व विकास नवले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन महेश कारंडे यांनी केले.

पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांची नावे खालील प्रमाणे –

यंत्रचालक: (विभागातून एक)

राहूल आहेर (मंचर विभाग), संतोष साकोरे (राजगुरुनगर विभाग), शितल पाटील (मुळशी विभाग), कृष्णा रामलर (रास्तापेठ), नंदु अहिरे (नगररोड), महेश ढाके (पर्वती), तुषार नलवडे (पद्मावती), तानाजी चंद (बंडगार्डन), सुधीर नागरे (भोसरी), सचिन सातपुते (कोथरूड), सुमेध नागवंशी (पिंपरी), ज्ञानेश्वर कळमकर (शिवाजीनगर) यांना उत्कृष्ट यंत्रचालक म्हणून गौरविण्यात आले.

तांत्रिक कर्मचारी : (उपविभागातून एक)

बब्रुवान गायकवाड (नारायणगाव), अनिल ठाकरे (मंचर), शेषराव आघाव (घोडेगाव), प्रविण पावरा (आळेफाटा), देविदास गव्हाळे (जुन्नर), सागर जोरी (वडगाव मावळ), पृथ्वीराज गुंडरे (लोणावळा), संदिप सरवदे (तळेगाव), दादू भोईर (राजगुरुनगर), अनंत देवकुळे (चाकण), मिलिंद भदर्गे (चाकण MIDC), मंगेश सुतार (पिंपरी), महेश जवळगे (हडपसर), पुरुषोत्तम खाडे (उरुळी कांचन), अमरनाथ कांबळे (मुळशी), किशोर हरिहर (पुणे चाचणी विभाग), मंगेश घोडे (रास्तापेठ), पंकज उमाळे (सेंटमेरी), सुर्यसेन कांबळे (कसबापेठ), विठ्ठल सोनटक्के (नगररोड), धर्मराज घुगे (विश्रांतवाडी), दिपक पवार (वडगावशेरी), नामदेव ताते (विश्रांतवाडी), प्रमोद इंगळे (वडगाव), हरिष बोळे (पेशवेपार्क), एकनाथ विघ्ने (नांदेडसिटी), शंकर मापारी (स्वारगेट), दिनेश पवार (धनकवडी), अफजल मुजावर (फायरब्रिगेड), मनोज बडंबे (मार्केटयार्ड), चंद्राकांत वायबसे (कात्रज), सचिन ठाकुर (हडपसर औद्योगिक), विकास नवले (हडपसर), राहुल सुरवसे (वाडिया), सुर्यमाला बनसोडे (आयबीएम), नितिन खाटपे (चाचणी विभाग), राजाराम रावते (भोसरी -१), मनोज केदार (भोसरी -२), भाग्यवान वनघरे (आकुर्डी), विजयकुमार मुदगुन (प्राधिकरण), चंदर चौधरी (डेक्कन जिमखाना), नवनाथ देवकर (कोथरूड), ज्योती कोल्हे (वारजे), जयदीप शिंदे (चिंचवड), केदा महाले (खराळवाडी), सौरभ लांजेवार (सांगवी), दत्तात्रय ढवाण (हिंजवडी), कल्पना घोडके (औंध), शिवराज दुसेवार (गणेशखिंड), सीताबाई बुरुड (शिवाजीनगर), बालाजी सुर्यवंशी (गणेशखिंड चाचणी) यांना उत्कृष्ट तंत्रज्ञ म्हणून गौरविण्यात आले.

राज्यात लहान मुलेही सुरक्षित नाहीत,गुन्हेगार मोकाट: जनाची नाही तर मनाची बाळगून प्रायश्चित करा – फडणवीसांना काँग्रेसचे आवाहन

मुंबई, दि. २ मे २०२६..

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारा आहे, हे गृहविभागाचे अपयश असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत, त्याचाच हा प्रकार असून आतातरी देवेंद्र फडणवीस यांनी जनाची नाही तर मनाची बाळगून प्रायश्चित म्हणून तरी गृह मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री राज्याला द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, गृहविभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणातील निघृणता, स्वारगेट एसटी स्टँडवरील बलात्कार, केंद्रीय मत्र्यांच्या घरातील मुलींना छेडछाड, बदलापूरातील शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार, अशोक खरात प्रकरण, महिला व मुलींचे बेपत्ता होणारे प्रकार…ड्रग्जच्या खुलेआम काळ्याधंद्याने उडता महाराष्ट्र झाला आहे, तरुण पिढीला व्यसनाच्या खाईत ढकलले जात असताना गृहमंत्री म्हणून काहीतरी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे पण फक्त घोषणा होतात कारवाई मात्र काहीच होत नाही. राज्यातील महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोजवारा याला थेट गृहमंत्रीच जबाबदार आहेत, असा हल्लाबोल करत भाजपा महायुती सरकारचा भ्रष्टाचार सुस्साट असून जनता व प्रशासन यांच्यात मिसिंगलिंक आहे, कायदा व सुव्यवस्थेमध्ये मिसिंग लिंक आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

देशभर जनगणना सुरु झाली असली तरी जातनिहाय जनगणना मात्र होत नाही. जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा पंतप्रधांनी केली होती पण ती आता करत नाहीत कारण हा व्यक्ती फक्त फेकूच नाही तर अत्यंत खोटारडा आहे. मुंह में राम और बगल में नथुराम, असे त्यांचे काम आहे. मोदी यांचा आचार, विचार व व्यवहार हे अगदी उलटे आहे. नथुराम गोडसे महात्मा गांधींच्या पाया पडला व नंतर त्यांचा खून केला, मोदी संसदेच्या पाया पडले व त्यांनी संविधान व लोकशाहीचा गळा घोटला. १०० स्मार्ट सिटी, दरवर्षी दोन कोटीरोजगार, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न, रुपयाची घसरण थोपवणे यातील काहीच त्यांनी केलेले नाही. आता जनगणनेसाठी आधार कार्ड मागत आहेत, ते लिंक करणार आहेत, आधारशी सर्व लिंक केलेले आहे, पण मतदार यादीशी ते लिंक करत नाहीत, असेही सपकाळ म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे ही उपस्थित होते.

कुटुंबातील ज्येष्ठांना वृद्धाश्रमात धाडणे हे कोणत्याही सुसंस्कृत शहराला शोभणारे नाही – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना मदतीचा हात

पुणे-क्रिएटिव्ह फाउंडेशन सातत्याने समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देत असून “महाराष्ट्र दिनाच्या” शुभदिनी तीन वृद्धाश्रमांना उपयुक्त साहित्य भेट देत असल्याचे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. निराधारांना वृद्धाश्रमाचा मोठा आधार आहे मात्र आता सुस्थितीतील कुटुंबात ज्येष्ठांची अडचण वाटते व त्यांना वृद्धाश्रमात धाडले जाते हे कोणत्याही सुसंस्कृत शहराला शोभणारे नाही असे मत ही संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने श्री स्वामीकृपा आशीर्वाद वृद्ध निवास,नवरत्न  वृद्धाश्रम व स्वामीआंगण वृद्धाश्रमांना विविध उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, नवरत्न ओल्ड एज होमच्या अनिताताई राकडे,श्री स्वामीकृपा आशीर्वाद वृद्ध निवास चे विकास देडगे व आदित्य देडगे, स्वामीआंगण वृद्धाश्रम च्या आनंदी जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

वृद्धाश्रमातील ज्येष्ठाना तसेच दिव्यांगांना आधार कार्ड मिळणे सुलभ व्हावे व त्यायोगे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या. केंद्र व राज्य सरकारच्या ज्येष्ठांसाठी अनेक कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ केवळ निराधार ज्येष्ठानीच नव्हे तर सर्वच ज्येष्ठांनी घ्यावा असेही त्या म्हणाल्या.

यावेळी शासकीय योजनांचा लाभ घेताना आधार कार्ड ची गरज भासते मात्र ते सहज मिळत नसल्याने अडचणी येत आहेत अशी तक्रार केली असता “त्यावर त्वरित उपाययोजना करून अश्या गरजुंना आधार कार्ड सुलभतेने उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेन असे ना. माधुरी मिसाळ म्हणाल्या.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे वॉटर बेड, एअर बेड, व्हीलचेयर, हिटिंग व कुलिंग पॅड, डायपर, हॅन्ड ग्लोवज व इतर उपयुक्त वस्तू भेट देताना आम्हांस समाजाप्रतीच्या दायित्वाची आपली जबाबदारी पूर्ण करत असल्याचे समाधान लाभते असे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनिता राकडे व आनंदी जोशी म्हणाल्या की ” संदीप खर्डेकरांसारखे भाऊ आमच्या पाठीशी उभे राहतात आणि वेळोवेळी मदत करतात त्यामुळे आम्हाला वृद्धांचा सांभाळ करणे सोप्पं होतं, तसेच माधुरीताईसारख्या संवेदनशील राजकारणी पाठीशी असल्यामुळे हे सेवाकार्य आम्ही अखंड सुरू ठेऊ असेही अनिताताई राकडे व आनंदीताई जोशी म्हणाल्या.यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने ना. माधुरीताई मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.

3 वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या


पुणे-पुण्यातील चाकण औद्योगिक पट्ट्यातील दक्षिण महाळुंगे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तीन वर्षांच्या बालकावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने प्रथम बालकावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर गळा चिरून त्याची हत्या केली. बालकाच्या शरीरावर जखमा आणि गळा चिरल्याचे दिसून आले, ज्यामुळे ही हत्या क्रूरपणे झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हे बालक घरातून बेपत्ता झाल्यापासून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दक्षिण महाळुंगे येथील एका निर्जन स्थळी बालकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच महाळुंगे आणि चाकण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही पाहणी केली.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ 4 च्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “या गंभीर घटनेची पोलिस प्रशासनाकडून सखोल चौकशी केली जात आहे. तपासासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून, तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची तपासणी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस अधिकृत माहिती देतील.

या घटनेमुळे महाळुंगे परिसरात तणाव निर्माण झाला असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. संशयित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

नसरापूर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड होईल याचे पुरेपूर प्रयत्न करू – CM फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घटना घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटत आहे. सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे ते म्हणालेत.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 65 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. भिमराव कांबळे असे आरोपीचे नाव आहे. त्याने मृत चिमुकलीला वासरू दाखवण्याचा बहाणा करत गुरांच्या गोठ्याकडे नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नसरापूर येथे नागरिकांनी पुणे – सातारा महामार्गावर रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला.
पत्रकारांनी आज याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. तीन साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केला व खूनही केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेमुळे समाजात रोष निर्माण झाला आहे. सर्वांनाच मुलगी व तिच्या कुटुंबीयांबद्दल हळहळ वाटत आहे. मी आश्वस्त करू इच्छितो की, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल.
या प्रकरणी विशेष फास्टट्रॅक कोर्ट स्थापन करण्यासाठी सरकारतर्फे हायकोर्टाला विनंती केली जाईल. तसेच स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही कोर्टापुढे करणार आहोत.


मुख्यमंत्र्यांनी यावेळी या प्रकरणाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही चांगलेच फटकारले. हे अत्यंत असंवेदनशील आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणे याहून अधिक वाईट काहीच असू शकत नाही. काही गोष्टीत तरी संवेदना पाळली पाहिजे. त्यांनी काही केले तरी हरकत नाही. पण राज्य सरकार जे करायला पाहिजे, ते नक्की करेन, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी देशभरातील मोबाईल्सवर आपत्कालीन अलर्ट देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचीही घोषणा केली. आज अनेक मोबाईलवर अलर्टचे मेसेज आले. यासंदर्भात यापूर्वीच असा प्रयोग करण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली होती. आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की, संपूर्ण शुद्ध, भारतीय मेक अशा पद्धतीने ही अलर्ट सिस्टिम तयार झाली आहे. युद्ध, आपत्ती व आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेत आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे. त्याचे टेस्टिंग आज करण्यात आले. हे टेस्टिंग यशस्वी झाले आहे.

आपण सर्वांनी पाहिले की, आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर एक अलर्ट आला. मेसेज आला. सगळ्या भाषांमध्ये आला. त्यामुळे मला असे वाटते की, भारताने डिजास्टर प्रिपेडनेसमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जी तयारी असायला हवी त्यात अतिशय उत्तम प्रकारची कामगिरी केली आहे, असे फडणवीस म्हणाले.

सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे पाच वेळा ‘दया याचना’ अर्ज केल्याचे फिर्यादी सात्यकी यांना मान्य

पुणे- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधातील बदनामीच्या खटल्याची सुनावणी पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयात विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या समोर चालू आहे. या प्रकरणात फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा उलट तपास राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार हे घेत आहेत.उलट तपासा दरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मान्य केले की, विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होते, मात्र नंतर ते निर्दोष सुटले. तसेच सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे पाच वेळा ‘दया याचना’ अर्ज केल्याचेही त्यांनी मान्य केले.
उलट तपासामध्ये सावरकरांच्या विचारसरणी विषयी विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. द्विराष्ट्रवाद, ‘गाय ही देवता नसून उपयुक्त पशू आहे’ असे गायी विषयी सावरकरांनी केलेले भाष्य, तसेच “गांधी ही श्रद्धा तर सावरकर ही अंधश्रद्धा”, “कोण हा सावरकर”, “स्वातंत्र्यवीर सावरकर की स्वातंत्र्यविरोधी सावरकर” अशा विविध टीका ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केल्याचे निदर्शनास आणण्यात आले.
त्याच प्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी सावरकर इंग्रजांसाठी सैन्य भरती करत असल्याची टीका केल्याचा संदर्भही देण्यात आला. तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी “सावरकरांनी इंग्रजांची चाकरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहे” अशा आशयाची टीका केल्याचे माहिती नसल्याचे फिर्यादींनी सांगितले.
तसेच माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सावरकरांनी तत्कालीन परिस्थितीत सरदार पटेल यांच्या विरोधात चिथावणीखोर भूमिका घेतल्याचा उल्लेख केल्याचे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणावरही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे फिर्यादींनी न्यायालयात मान्य केले.
उलट तपासा दरम्यान सावरकर कुटुंबीयांनी स्वतः कधीही सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केलेली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र इतर काही विशिष्ट विचारधारेवर चालणार्‍या संघटनांनी अशी मागणी केली असेल, तर त्याबाबत ठोस माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, अशफाक उल्लाखान, उधमसिंग, बटुकेश्वर दत्त आणि इतर क्रांतिकारक यांचेही मोठे योगदान असल्याचे फिर्यादींनी मान्य केले.
तसेच संसदेमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले असून तो राष्ट्रीय गौरव मानला जातो, असेही त्यांनी सांगितले. मात्र भगतसिंग, उधमसिंग, बटुकेश्वर दत्त किंवा अशफाक उल्ला खान यांना तशा प्रकारचा गौरव का मिळाला नाही, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले.
अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये कठोर शिक्षा, फाशी किंवा अमानुष छळ सहन करणारे सर्व क्रांतीकारक भारतरत्नास पात्र आहेत का, या प्रश्नावर “सर्व क्रांतीकारकांचा योग्य सन्मान झाला पाहिजे” असे उत्तर फिर्यादींनी दिले.
तसेच “स्वातंत्र्यलढ्यात फाशी जाणे आणि शिक्षेमध्ये सवलत मिळवणे यामध्ये नैतिक फरक आहे का?” असा प्रश्न ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी विचारला असता, “कोणाला फाशी द्यायची आणि कोणाला सवलत द्यायची हा निर्णय ब्रिटिश सरकारचा होता. त्यामुळे नैतिक फरकाबाबत मी काही भाष्य करू शकत नाही,” असे उत्तर फिर्यादींनी दिले.
या खटल्यात ॲड. ज्ञानेश्वरी भानुदास जाधव, ॲड.अजिंक्य भालगरे व ॲड. सुयोग गायकवाड हे मदत करित आहेत.
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे उलट तपास अपूर्ण राहिला असून पुढील सुनावणी दिनांक २५ मे २०२६ रोजी होणार आहे.

देशभरात कोट्यवधी मोबाईलवर एकाच वेळी आला अलर्ट मेसेज:सायरनचा आवाज ऐकू आला, आपत्कालीन विभागाने चाचणी केली

नवी दिल्ली-देशभरात शनिवारी सकाळी 11:45 वाजता अनेक मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला. स्क्रीनवर हिंदी-इंग्रजीमध्ये एक संदेश होता. सायरन बंद झाल्यावर मोबाईलवर संदेश वाचूनही दाखवण्यात आला. यामुळे अनेक लोक अस्वस्थ झाले, तर अनेकजण गोंधळले. मात्र, सरकारने घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले.

हा संदेश राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण, म्हणजेच NDMA ने पाठवला होता, जो आपत्कालीन मोबाईल अलर्ट चाचणीचा भाग आहे. NDMA ने आपत्कालीन परिस्थितीत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी 2 मे रोजी या सेल ब्रॉडकास्ट अलर्ट प्रणालीची चाचणी केली.
NDMA ने मोबाईल SMS ला सेल ब्रॉडकास्ट (CB) तंत्रज्ञानाशी जोडले आहे. यामुळे निवडलेल्या परिसरात सक्रिय असलेल्या सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी अलर्ट मिळेल. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रिअल टाइम माहिती पोहोचवता येईल.

देशभरात आपत्कालीन संदेशाची एकाच वेळी चाचणी

शनिवारी देशातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये आणि दिल्ली-NCR मध्ये सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी चाचणी संदेश पाठवण्यात आला. हा संदेश हिंदी आणि इंग्रजीसोबत सर्व प्रादेशिक भाषांमध्येही पाठवण्यात आला. या संदेशात लोकांना सांगण्यात आले की ही केवळ चाचणी आहे आणि यावर कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही.

सरकारने आधीच सांगितले होते – संदेशामुळे घाबरू नका
सरकारने दोन दिवसांपूर्वीच मेसेज पाठवून लोकांना आवाहन केले होते की, टेस्टिंगचा मेसेज मिळाल्यास घाबरू नका. शनिवारचा मेसेज केवळ आपत्कालीन परिस्थितीत इशारा देणाऱ्या प्रणालीची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आला होता.

SACHET प्रणाली देशातच विकसित केली आहे

आपत्कालीन परिस्थितीत लोकांना रिअल टाइम अलर्ट देण्यासाठी सरकारी संस्था सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (C-DOT) ने ‘SACHET’ ही एकात्मिक अलर्ट प्रणाली विकसित केली आहे. सचेत नावाचे हे सिस्टम कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (CAP) वर आधारित आहे. हे देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय करण्यात आले आहे.

65 वर्षांच्या नराधमाने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून केली निर्घृण हत्या,गावकऱ्यांचा संताप, पुणे बंगलोर महामार्ग रोखला

आरोपी विरोधात 15 दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार,अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिलीय.संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलेय.


पुणे :भोर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आजीकडे सुट्टीसाठी आलेल्या एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, संतप्त ग्रामस्थांनी चिमुकलीचा मृतदेह थेट पोलिस ठाण्याबाहेर ठेवून ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली आपल्या आजीच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी आली होती. दुपारी घरासमोर खेळत असताना गावातील एका 65 वर्षीय नराधमाने तिला आमिष दाखवून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केल्यानंतर, आपले कृत्य उघड होऊ नये या भीतीने आरोपीने दगडाने ठेचून तिची हत्या केली. अत्यंत निर्दयीपणे त्याने चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला.
दुपारपासून मुलगी बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. अखेर गोठ्यात तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी चिमुकलीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. या पुराव्यावरून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकरी आक्रमक झाले. संतापलेल्या ग्रामस्थांनी नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी चिमुकलीचा मृतदेह भोर पोलिस स्टेशनच्या बाहेर आणून ठेवला. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

साताऱ्यात चिमुकल्यांच्या हृदयाला मिळणार नवी उभारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न


सातारा:
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १ मे महाराष्ट्र दिनी सातारा येथे लहान मुलांच्या आरोग्य सेवेचा मोठा यज्ञ पार पडला. सातारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत २-डी इको तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरा’ला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ठाणे येथील नामांकित ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध आरोग्य उपक्रम राबवले जात असून, साताऱ्यातील हे शिबिर त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे.
या शिबिरात साताऱ्यातील आणि ग्रामीण भागातील शेकडो मुलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून २-डी इको तपासणी करण्यात आली. ज्या बालकांना हृदयाला छिद्र असणे किंवा अन्य गंभीर हृदयविकार असल्याचे निष्पन्न होईल, त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

“हृदयाला छिद्र असण्यासारख्या शस्त्रक्रिया अत्यंत महागड्या असतात. सामान्य कुटुंबांना हा खर्च पेलवणारा नसतो. अशा वेळी कोणतंही बाळ उपचारांशिवाय राहू नये, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. तपासणीत शस्त्रक्रियेची गरज भासणाऱ्या प्रत्येक रुग्णाची संपूर्ण जबाबदारी शिंदे साहेब घेतील.”
— मंगेश चिवटे (प्रमुख, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष)

‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा शुक्रवारी (१ मे) सकाळी ७:०० वाजता पार पडला.

याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासह डॉ. अनुश्री चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. दक्षता विभागाचे पोलीस निरीक्षक पवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नितीन भोंगळे यांच्या पथकाने आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘पीएमआरडीए’मधील महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात आकर्षक रांगोळी रेखाटली होती. या सोहळ्याला प्रशासकीय विभागाच्या सहआयुक्त रुपाली आवले-डंबे, जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी, अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील, अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी, जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त राजेश माशेरे, तहसीलदार आशा होळकर, अधीक्षक भूमी अभिलेख आशा जाधव आणि अग्निशमन अधिकारी विजय महाजन यांच्यासह ‘पीएमआरडीए’च्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यगीताने या सोहळ्याची सांगता झाली.

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आठ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-अपर जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत

पुणे, दि. १: भारताच्या १६ व्या जनगणनेला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठ हजाराहून अधिक नागरिकांनी स्व-गणना केली आहे. जनगणना कायदा १९४८ च्या तरतुदींनुसार राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. प्रभावी धोरण निर्मितीला पूरक ठरणारा आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारा विश्वसनीय माहितीचा संग्रह (डेटा) निर्माण करण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे, जिल्ह्यातील सर्व आपली जबाबदारी मानून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी केले आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करुन १५ मे २०२६ अखेर कालावधीत स्व-गणना पूर्ण करावी. स्व-गणना ही ऐच्छिक आहे. माहिती गोळा करण्यासाठी आणि नोंदविण्यासाठी प्रगणक १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान प्रत्येक घराला भेट देणार आहे. यावेळी प्रगणकांद्वारे गृहगणना करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्याशी निगडित अचूक माहिती त्यांना द्यावी. आपल्या परिसरातील नागरिकांनाही अद्ययावत माहितीसह स्व-गणना करण्यास प्रोत्साहित करावे.

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना २०२७ व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पध्दत सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून व्यक्तींना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाइन पूर्ण भरता येईल, आणि सादर करता येईल.

कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे १५-२० मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो. यशस्वीरित्या माहिती सादर केल्यावर एक स्व-गणना आयडी (एसईआयडी) तयार केला जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर-मेलवर पाठवला जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

घरांची यादीकरणाचे काम पार पाडण्यासाठी, जिल्ह्यात प्रगणक आणि पर्यवेक्षकांसह सुमारे १३ हजार क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना (१० टक्के राखीव कर्मचाऱ्यासह) प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कामासाठी, भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांच्या कार्यालयाने आखून दिलेली संरचित पाच-स्तरीय प्रशिक्षण प्रणाली लागू करण्यात आली आहे. मजबूत डेटा सुरक्षा उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यामध्ये मोबाईल उपकरणे, डेटा ट्रान्समिशन आणि बहु-घटक प्रमाणीकरणाद्वारे सर्व्हर-पातळीवर संरक्षणासह त्रिस्तरीय सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे. पासवर्ड आणि ओटीपी-आधारित प्रमाणीकरणाचा वापर करून केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांपुरताच प्रवेश मर्यादित असून सर्व डेटा एनक्रिप्टेड स्वरूपात संग्रहित केला जाणार आहे, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.

डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी – दीपक शिकारपूर.

महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या नावांसह नकाशा प्रकाशित करताना अत्यानंद – सौ. मंजुश्री खर्डेकर.

पुणे-डॉ. सुरेश गरसोळे यांचे भूगोल विषयातील कार्य अद्वितीय असून त्यांनी पुढील 1 मे 2027 पर्यंत नकाशांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी व परदेशा प्रमाणे बोलणारे नकाशे प्रकाशित करावेत असे मत प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. एरंडवण्यातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात महाराष्ट्राचा नवीन नकाशा प्रकाशित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ह्या नकाशाचे निर्माते ज्येष्ठ भूगोल तज्ञ् डॉ. सुरेश गरसोळे, वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष सौ. मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, मुक्ता गरसोळे कुलकर्णी, एड.अमृत गरसोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.


आज महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनी राज्याचा नवीन नकाशा प्रकाशित होत आहे आणि तो देखील आपल्या अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या नावांनी याचा अत्यानंद होत आहे अश्या भावना वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केल्या.विद्यार्थ्यांमध्येचं नव्हे तर सर्वांनाच भूगोलाची गोडी लागावी यासाठी डॉ. गरसोळे अथक परिश्रम घेत असून त्यांच्या कार्याची शासन स्तरावर दखल घेतली जावी असे मत संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.
अनेक दशक नवनवीन प्रकारचे नकाशे साकरण्याची संधी मिळाली मात्र आज नवीन जिल्ह्यासह राज्याचा नकाशा तयार करत असताना श्री राम मंदिर, राज्यातील विविध किल्ले असलेला नकाशा देखील साकारला असल्याचे डॉ. गरसोळे म्हणाले. विद्यार्थ्यांना नकाशा वाचणे सुलभ व्हावे यासाठी माझे सतत प्रयोग सुरू असतात असेही डॉ. गरसोळे म्हणाले.
यावेळी डॉ. मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांनी
“बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥”
हे महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. तसेच त्यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र भूगोल समिती ही समाजसेवेच्या भावनेने सातत्याने कार्य करते असे सांगितले.श्री. अनिल खाडिलकर यांनी शंखनाद केला तर ऍड.अमृत गरसोळे यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी उपस्थितांना नवीन नकाशाचे वाटप करण्यात आले.