जयपूर –
जयपूरमध्ये दोन तरुणांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन तरुणांना पकडले आणि त्यांना मारहाण केली.निदर्शनांनंतर, ‘सीजेपी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके ‘शहीद स्मारक’मधून बाहेर पडत असताना समर्थकांनी त्यांना वेढले आणि त्यांच्या वाहनापर्यंत पोहोचवले. यावेळी समर्थकांनी “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय” अशा घोषणा दिल्या.
नीट (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणे, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित विविध मुद्द्यांवर आयोजित निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी अभिजीत सोमवारी तिथे पोहोचले होते. अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो निदर्शक ‘शहीद स्मारक’ येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
निदर्शनादरम्यान घोषणाबाजीवरून काही तरुणांमध्ये वाद झाला आणि पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. आंदोलनाच्या ठिकाणी अनेक आंदोलकांचे मोबाईल फोनही चोरीला गेले; त्यानंतर, उपस्थितांनी आपले मोबाईल फोन आणि वैयक्तिक वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन मंचावरून करण्यात आले.
तरुण सहभागींनी तिरंगा आणि “माझ्या देशावर माझे प्रेम आहे; भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही” तसेच “पेपरफुटी थांबवा” अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेतले होते. काही महिलाही आपल्या लहान मुलांसह या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. निदर्शने सुरू होण्यापूर्वी, कार्यकर्त्यांनी ‘शहीद स्मारका’च्या प्रवेशद्वारावर झुरळाचे चित्र काढले आणि त्यावर “धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या” अशी घोषणा लिहिली.
हा केवळ एका संघटनेचा नाही, तर विद्यार्थी आणि पालकांसाठीचा लढा आहे
CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी स्पष्ट केले की, ही लढाई कोणत्याही एका संस्थेपुरती मर्यादित नसून, ती देशातील विद्यार्थी, युवा आणि पालकांची लढाई आहे. हा शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठीचा संघर्ष आहे. वाढती बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ, भरती परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना आणि तरुणांवर होणारा अन्याय यांविरोधातील हा एक लढा आहे.
ही घटना अत्यंत दुर्दैवी- विश्वंभर चौधरी
यावर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे जर असे झाले असेल तर खरोखर अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे. दरम्यान, विश्वंभर चौधरी हे अभिजीत दिपके यांच्या पुण्यातील आंदोलनाच्यावेळी सोबत होते. अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या या पक्षाच्या सुरुवातीपासून चौधरी यांनी दिपके यांच्या या आंदोलनाला तसेच त्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.
प्रशासनाने सुरक्षा पुरवायला हवी- सुषमा अंधारे
या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला असे वाटते की आंदोलन कोणाचेही असो, सत्ताधाऱ्यांचे असो किंवा विरोधकांचे असो. मात्र ज्या पद्धतीने या हिंसक कारवाया घडतात याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे आणि तो मिळालाही पाहिजे. जर काही देशविघातक कृत्य होत असेल तर त्याला सरकार आळा घालेल न. पण ज्या अर्थी पोलिस प्रशासनाने तसेच सरकारने आंदोलनाची परवानगी दिली आहे, तर तिथे सुरक्षेचा प्रश्न पाळलाच गेला पाहिजे.

