Home Blog Page 9

कात्रज-येरवडा ट्वीन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पीएमआरडीए व पुणे महापालिकेला संयुक्तपणे कार्यवाही करण्याचे आदेश

मुंबई, दि. ४ :  कात्रज-येरवडा ट्वीन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करावी. त्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा. तसेच पीएमआरडीए व पुणे महापालिकेने संयुक्तपणे कार्यवाही करावी. तसेच पुणे महापालिकेमध्ये गेलेल्या २३ गावांचा विकास आराखडा तयार करावा. तत्पूर्वी तेथे प्रथम संरचनात्मक आराखडा तयार करावा, असे आदेश इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेपुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाने संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. तसेच येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच पीएमआरडीएच्या २०२६–२०२७ च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे आदी उपस्थित होते. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

पीएमआरडीएच्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास प्राधिकरण सभेची मान्यता

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) १४ व्या वार्षिक सभेत २०२६–२०२७ चा ₹४,६२८.८५ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला व त्यास मंजुरी देण्यात आली. नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने सेवा देता यावी यासाठी जमीन विल्हेवाटीच्या दैनंदिन कामकाजाचे अधिकार थेट महानगर आयुक्तांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आला.

या अर्थसंकल्पात ₹२,९१८.८१ कोटी इतका सर्वाधिक निधी अभियांत्रिकी विभाग (१ व २) साठी पायाभूत सुविधा आणि विकासकामांसाठी  मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पुणे महानगर क्षेत्रातील रिंग रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, कात्रज–येरवडा ट्विन टनेल, लोणावळा स्कायवॉक या कामांना गती मिळणार आहे. तसेच जमीन व मालमत्ता विभागासाठी ₹९७०.७६ कोटींचा भांडवली खर्च नियोजित करण्यात आला आहे. यंदाचा अर्थसंकल्प ₹३.५५ कोटींच्या शिलकीचा आहे.

‘पीएमआरडीए’चे २०२५–२६ चे सुधारित व २०२६–२७ चे मूळ अंदाजपत्रक या सभेत मांडण्यात आले. २०२६–२७ साठी प्राधिकरणाची एकूण महसुली व भांडवली जमा ₹४,६२८.८५ कोटी अपेक्षित आहे. याच्या तुलनेत एकूण खर्च ₹४,६२५.३० कोटी असून, अर्थसंकल्प ₹३.५५ कोटी शिलकीचा आहे. प्राधिकरणाच्या अग्निशमन निधीसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली असून, २०२६–२७ मध्ये या निधीत ₹१००.०५ कोटी जमा होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ₹७१.०४ कोटी खर्च अपेक्षित असून ₹२९.०१ कोटी शिल्लक राहतील. प्राधिकरणाला सर्वाधिक महसूल जमीन व मालमत्ता विभागाकडून ₹१,६४७.६५ कोटी आणि विकास परवानगी विभागाकडून ₹८०५.४५ कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) ११ जून २०२१ रोजी पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झाले होते. त्यानंतर मोकळे भूखंड, व्यापारी इमारती आणि निवासी मालमत्तांचे दायित्व पीएमआरडीएकडे आले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना विहित मुदतीत सेवा देणे आवश्यक असल्याने जमीन व मालमत्ता विभागाच्या प्रक्रियेत सुलभता आणणे गरजेचे होते. यापूर्वी नागरी सेवा प्रदान करण्याचे अंतिम अधिकार ‘विकास प्राधिकरण’ स्तरावर होते. मात्र, ‘जमीन विल्हेवाट विनियम, २०२३’ मधील नियम क्र. २७ अन्वये अनेक अधिकार थेट महानगर आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामुळे भूखंड व गृहयोजनांचे वाटप, मालमत्तांचे हस्तांतरण, सबलीज मंजुरी, वारस नोंद, ना हरकत दाखला (एनओसी) देणे, मोकळ्या जागा तात्पुरत्या भाडेतत्त्वावर देणे, भाडेपट्ट्यानंतर ताबा देणे, फेरमोजणी करणे आदी कामे जलद गतीने होणार आहेत. तसेच ११/०६/२०२१ पासून आतापर्यंत वापरलेल्या अधिकारांना पूर्वलक्षी मान्यता देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

अर्थसंकल्पाचा तपशील:

‘पीएमआरडीए’च्या २०२६–२०२७ च्या अर्थसंकल्पात एकूण अपेक्षित जमा ₹४,६२८.८५ कोटी असून, एकूण खर्च ₹४,६२५.३० कोटी आहे. त्यामुळे ₹३.५५ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.

  • महसुली जमा ₹४,४२८.३५ कोटी असून, त्यात जमीन व मालमत्ता विभागाकडून ₹१,६४७.६५ कोटी व विकास परवानगी विभागाकडून ₹८०५.४५ कोटी अपेक्षित आहेत. लेखा व वित्त विभागाकडून ₹३६०.०३ कोटी आणि इतर स्रोतांतून ₹१,६१५.२२ कोटी जमा अपेक्षित आहे.
  • भांडवली जमा ₹२००.५० कोटी असून, लोणावळा स्कायवॉक प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ₹१०० कोटी व केंद्र शासनाकडून ₹१०० कोटी अपेक्षित आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून ₹५० लाख मिळण्याचा अंदाज आहे.
  • खर्चाच्या बाजूस, भांडवली खर्चाला प्राधान्य देण्यात आले असून तो ₹३,८९४.६७ कोटी आहे. अभियांत्रिकी विभागासाठी ₹२,९१८.८१ कोटी, जमीन व मालमत्ता विभागासाठी ₹९७०.७६ कोटी आणि इतर विभागांसाठी ₹५.१० कोटींची तरतूद आहे.
  • महसुली खर्च ₹७३०.६३ कोटी असून, त्यात आस्थापना खर्च ₹४२.१६ कोटी, कंत्राटी मानधन ₹२५.८७ कोटी, प्रशासकीय खर्च ₹२२.९५ कोटी, इतर विभागांचा खर्च ₹४३९.६५ कोटी आणि इतर संस्थांना निधी वर्ग ₹२०० कोटी आहे.
  • अग्निशमन दलासाठी ₹१००.०५ कोटी जमा अपेक्षित असून, त्यापैकी ₹६२ कोटी भांडवली व ₹९.०४ कोटी महसुली खर्चासाठी नियोजित आहेत. शिल्लक ₹२९.०१ कोटी राहतील.

नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,  पीएमआरडीएचे महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, संचालक (विकास परवानगी) अविनाश पाटील, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, तसेच दोन्ही महापालिकाच्या स्थायी समिती अध्यक्ष आदि उपस्थित होते.

पुणे-सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणासह,शिरूर -अहिल्यानगर चारपदरी :राष्ट्रीय महामार्ग मार्गिकांचा आढावा

नवी दिल्ली, 4 मे 2026

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील प्रस्तावित अतिवेगवान आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गिका आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग मार्गिकांचा आढावा घेतला.

नवी दिल्ली येथे झालेल्या या आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी अनेक प्रमुख महामार्ग विकास प्रकल्पांवर चर्चा केली. यामध्ये नागपूर-भंडारा विभागाचे सहा पदरीकरण, तळोदा-बुऱ्हाणपूर विभागाचे चौपदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियाल मार्गिका, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम ) मार्गिका, ग्वाल्हेर-नागपूर मार्गिका, नागपूर-हैदराबाद मार्गिका, भंडारा-रायपूर विभागाचे सहा पदरीकरण, लखनादौन-दुर्ग-रायपूर मार्गिका, नागपूर-अमरावती विभागाचे सहा पदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-44 वरील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमा-नागपूर बायपास-बोरखेडी टप्पा आणि पुणे-सातारा विभागाच्या सहा पदरीकरणाचा समावेश आहे.

या आढावा बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील एकूण 527 किमी लांबीच्या नऊ राज्य बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये खालील मार्गिकांचा समावेश आहे:

शिरूर-अहिल्यानगर (4-पदरी)
अहिल्यानगर-वडाळा (4-पदरी)
वडाळा-छत्रपती संभाजीनगर (4-पदरी)
छत्रपती संभाजीनगर-जालना (4-पदरी)
जालना-वाटूर (4-पदरी)
नांदेड-नरसी-देगलूर (4-पदरी आणि 2-पदरी)
जाम-वरोरा (4-पदरी)
वरोरा-चंद्रपूर-बामणी (4-पदरी)
मलकापूर-चिखली (2-पदरी)

रस्तेमार्गांद्वारे संपर्कव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी जलद करण्यावर या आढावा बैठकीत भर देण्यात आला.

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी मध्ये मिळालेले यश हा तेथील कार्यकर्त्यांचा विजय -धीरज घाटे

पुणे :- पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी मध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले या प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहर कार्यालयामध्ये भारत मातेचे पूजन करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, पश्चिम बंगाल मध्ये गेले अनेक वर्ष संघर्ष करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे पश्चिम बंगालच्या जनतेला परिवर्तन हवे होते आणि त्याचाच परिपाक म्हणून हा विजय होय. आसाम आणि पुद्दुचेरी मध्ये देखील पक्षाला चांगले यश मिळालेले आहे .
नसरापूरच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणताही विजय जल्लोष करायचा नाही हे ठरवले. त्यामुळे पक्ष कार्यालयातच भारत मातेचे पूजन व शामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा विजय साध्या पद्धतीने साजरा करत आहोत असे श्री. धीरज घाटे यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध झाल मुरी देखील आनंद घेतला या वेळी सरचिटणीस नगरसेवक रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी राजेंद्र काकडे, देवेंद्र वडके श्याम सातपुते, जयंत भावे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

बंगालमध्ये परिवर्तन नव्हे तर महापरिवर्तन- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई-आज पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. तसेच बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिले की बंगालचा खरा पक्ष कोणता आहे, असे म्हणत ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मे जेव्हा बंगालमध्ये गेलो होतो तिथल्या एका पत्रकाराने मला विचारले की ममता बॅनर्जी म्हणतात भाजप आणि त्याचे नेते हे बंगालच्या बाहेरचे आहेत. बाहेरचे लोक येऊन इथे मत मागतात. यावर तुमचे मत काय? मी त्यांना सांगितले, आमच्या भाजपची निर्मिती ज्यांनी केली ते शामाप्रसाद मुखर्जीच बंगालचे आहेत. त्यामुळे खरा बंगालचा जर कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि आज बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिले की बंगालचा खरा पक्ष कोणता आहे. बंगालच्या लोकांनी ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन नसुते परिवर्तन केले नाही, तर महापरिवर्तन केले आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंगाल असेल, आसाम असेल पुडूचेरी असेल हा विजय भारतातल्या जनतेचा मोदीजींवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे. जनतेला एकच गोष्ट माहीत आहे आणि ती गोष्ट म्हणजे ‘मोदी है तो मुमकिन है!’. आणि म्हणून बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचे काम 30 वर्ष कॉंग्रेस, 36 वर्ष कम्यूनिस्ट आणि या दोघांपेक्षा खतरनाक 15 वर्ष ममता दीदीचे शासन, जो बंगाल देशाची आर्थिक राजधानी होता, या बंगालची अवस्था या सगळ्यांनी मिळून अशी केली की देशात येणारा जो एफडीआय आहे त्यातला अर्धा सुद्धा तिकडे जात नाही. बंगालमधून अनेक मोठे उद्योग निघून गेले. तिथे जंगलराज निर्माण झाले होते. त्यात माननीय मोदी यांनी बंगालचे जे व्हीजन मांडले आणि बंगालच्या जनतेत आशेचा किरण निर्माण केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंगालच्या जनतेला विकासकाम बघून विश्वास बसला आणि जर कोणी परिवर्तन घडवून आणू शकते तर ते फक्त मोदी आहेत. तो विश्वास जनतेने आज मतपेटीत दाखवला आहे. बंगालचा विजय केवळ एका राज्याचा विजय नाही. हा विजय भारतात होणारी घुसखोरी, भारतात होणारे हल्ले या सगळ्या गोष्टींपासून वाचवणारा हा विजय आहे. ज्या प्रकारे ममता दीदींच्या नेतृत्वातील सरकार बांगलादेशमधून घुसखोरी आणायचे, त्यांचे कागदपत्र तयार करून विविध राज्यांमध्ये पाठवायचे.

या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे बलिदान दिले. आमच्या कार्यकर्त्यांचे डोळे फोडले, जाळून टाकले, कितीही अत्याचार केला तरी भाजपचा कार्यकर्ता थांबणार नाही हे दाखवणारा हा विजय आहे. आसाममध्ये जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हापासून तिथली आतंकवादी गतिविधी थांबली. एकट्या भाजपला आसाममध्ये बहुमत मिळाले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’, ‘बाबूजी धीरे चलना’ आणि ‘आईये मेहेरबान’उलगडले सुवर्णकाळातील गाण्यांचे जादुई विश्व

‘अ‍ॅन इव्हिनिंग विथ अ‍ॅकॉर्डियन’मध्ये अ‍ॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांचे सादरीकरण

पुणे : ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’, ‘बाबूजी धीरे चलना’ आणि ‘आईये मेहेरबान’ यांसारख्या अ‍ॅकॉर्डियनच्या सुरांनी सजलेल्या अजरामर गीतांनी ‘अ‍ॅन इव्हिनिंग विथ अ‍ॅकॉर्डियन’ या कार्यक्रमात रसिकांना मंत्रमुग्ध केले. अ‍ॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांनी आपल्या वादनातून या  गाण्यांतील खास सुरावटी पुन्हा जिवंत करत प्रेक्षकांना हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात नेले.

‘अ‍ॅन इव्हिनिंग विथ अ‍ॅकॉर्डियन’ या कार्यक्रमात अ‍ॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांनी प्रेक्षकांना अविस्मरणीय संगीतसफरीवर नेले. कोथरूड येथील एमईएस बालशिक्षण ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कर्नल प्रसाद मिजार, अमित आपटे, देसाई बंधू आंबेवाले चे नरेंद्र देसाई उपस्थित होते. यावर्षी ज्येष्ठ अभिनेते राज कपूर (२०२४), ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी (२०२५) आणि ओ. पी. नय्यर (२०२६) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा कार्यक्रम त्यांना समर्पित करण्यात आला. 

कार्यक्रमाची सुरुवात ‘वो चांद खिला’ आणि ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यांनी होताच वातावरण सुरेल झाले. त्यानंतर ‘बन के पंछी गाये प्यार का तराना’, ‘दिल की नजर से’, ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’, ‘जहां मैं जाती हूं’ आणि ‘हर दिल जो प्यार करेगा’ या गीतांनी प्रेक्षकांना जुन्या आठवणींच्या विश्वात नेले. ‘आहाहा रिमझिम के ये प्यारे प्यारे’ आणि ‘दिल से दिल की डोर बांधू’ यांसारख्या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमात ‘मधुमती’ चित्रपटातील शीर्षक गीत आणि ‘जुल्मी संग आंख लड़ी’ या गाण्यांचे ध्वनीमुद्रण सादर करण्यात आले. त्यानंतर ‘आजा रे परदेसी’ आणि ‘इतना न मुझसे तू प्यार बढ़ा’ या गीतांनी रसिकांना भारावून टाकले. ‘प्रेमपत्र’ चित्रपटातील ‘सावन की रातों में’ या गीताच्या ध्वनीमुद्रणातून संवाद आणि निसर्गध्वनींचा सुंदर वापर दाखवण्यात आला. विशेष सादरीकरणातून अ‍ॅकॉर्डियन वादनातील वेगळा प्रयोग श्रोत्यांना अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी यांच्या प्रसिद्ध कवितांपैकी एक असलेल्या “एक गुच्छ चाबी…” या कवितेचा मराठी अनुवाद केतकी वैद्य यांनी  सादर केला. संगीतकार सलील चौधरी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीचे दर्शन घडवणारा एक आगळावेगळा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमात मधुमती चित्रपटाचे शीर्षक संगीत सादर करून सलीलदांच्या शीर्षक संगीत रचनेतील अफाट प्रतिभा उलगडण्यात आली. या प्रारंभीच्या संगीतामधून संपूर्ण चित्रपटाची कथा थोडक्यात आणि प्रभावीपणे कशी व्यक्त होते, हे प्रेक्षकांना अनुभवता आले.

याशिवाय मेमदीदी मधील “बचपन ओ बचपन” आणि मधुमती मधील “जुल्मी संग आँख लड़ी” या गाण्यांच्या ऑडिओ क्लिप्स सादर करण्यात आल्या. या माध्यमातून सलीलदांच्या खास शैलीतील कॉन्ट्रा मेलडीची अनोखी मांडणी अधोरेखित करण्यात आली.

कार्यक्रमात सादर झालेल्या लाईव्ह डेमोने विशेष लक्ष वेधले. यात अमित आपटे यांनी “ए दिल कहाँ तेरी मंजिल” या गाण्याची मुख्य धून सादर केली, तर त्यांच्या पत्नी केतकी वैद्य यांनी आपल्या आवाजातून पार्श्वसंगीत साकारत कॉन्ट्रा मेलडीची प्रभावी अनुभूती प्रेक्षकांना दिली.

 समारोपाच्या सत्रात ‘बाबूजी धीरे चलना’, ‘आईये मेहेरबान’, ‘पिया पिया पिया जिया पुकारे’ आणि ‘चैन से हमको कभी’ या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करत कार्यक्रमाची सांगता झाली. अमित वैद्य यांना पद्माकर गुजर (ढोलक) आणि विनोद सोनवणे (ऑक्टोपॅड) यांनी सुरेख साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमात अ‍ॅकॉर्डियनच्या सुरांनी रसिकांना एका वेगळ्याच संगीतमय विश्वाची अनुभूती दिली. सुहास किर्लोस्कर  यांनी निवेदन  केले. कार्यक्रमाच्या शेवटी केतकी वैद्य यांनी आभार मानले.

रविवार ठरला पुस्तक खरेदी अन् खेळांचा वार

पुणे बाल पुस्तक जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : उन्हाळी सुटीचा रविवार पुणेकर मुले आणि पालकांसाठी पुस्तक खरेदीचा ठरला. पुणे बाल पुस्तक जत्रेत पालक-मुलांनी भरभरून पुस्तक खरेदी करून सुट्टी वाचनमय करण्याची तयारी केली आहे. तसेच रविवारी झालेल्या कार्यक्रमांतून कथा कवितांसह विमानांचे विज्ञान समजून घेण्याची संधी मुलांनी पुरेपूर अनुभवली.

पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, समर्थ युवा फाउंडेशन आणि संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा मंच परिसरात पुणे बाल पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत पारंपरिक भारतीय खेळ, खाऊगल्ली, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध झाली आहे. ३० एप्रिलपासून सुरू झालेल्या या पुस्तक जत्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी सकाळच्या सत्रात बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांचा ‘कथा कवितांच्या राज्यात’ हा कार्यक्रम झाला. आव्हाड यांनी मुले आणि पालकांशी संवाद साधत कथा-कवितांच्या राज्याची मनोरंजक सफर घडवून आणली. दुपारच्या सत्रात हवेत उडणाऱ्या विमानांमागील विज्ञान समजून घेण्याची संधी मुले आणि पालकांना ‘सलाम भारतीय वायुसेनेला’ या कार्यक्रमातून मिळाली. ज्येष्ठ एअरो मॉडेलर सदानंद काळे यांनी या कार्यक्रमात अत्यंत रंजक पद्धतीने विमानांचे विज्ञान उलगडले. तसेच मिग २१, राफेल, जॅग्वार अशा लढाऊ विमानांची माहिती सांगितली. विमान तयार करण्याची प्रात्यक्षिकेही दाखवली. या कार्यक्रमाला पालक, मुलांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तरांनी या सत्राची रंगत वाढवली. ड्रोन इंडस्ट्री वाढत असताना या क्षेत्रातील करिअरसंधींबाबत माहिती दिली. यावेळी मुले पारंपरिक जुने खेळ खेळण्यात हरवून गेली होती.

कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच पुस्तकांची दालनेही पालक-मुलांनी गजबजलेली होती. गोष्टींची पुस्तके, बालकादंबरी, विज्ञानावरील पुस्तके, शास्त्रज्ञांच्या गोष्टी अशी विविध प्रकारची पुस्तकांची भरभरून खरेदी करण्यात आली. ‘पुणे बाल पुस्तक जत्रा हा उन्हाळी सुटीतील महत्त्वाचा उपक्रम झाला आहे. या जत्रेमुळे मुले, पालक पुन्हा पुस्तकांकडे वळत आहेत. पुस्तकांतील नवे प्रयोग बालवाचकांपर्यंत पोहोचत आहेत. जत्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रकाशक म्हणून उत्साह दुणावला आहे,’ अशी भावना प्रकाशकांनी व्यक्त केली.

आज जत्रेचा समारोप

बालपुस्तक जत्रेचा सोमवारी (४ मे ) सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे. त्या पूर्वी सकाळी १०.३० वाजता ‘स्क्रीन टाइम कसा आणि कुठे?’ या सत्रात डॉ. श्रुती पानसे, स्मिता पाटील वळसंगकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालयाच्या मोहिनी भुसे आणि सहकारी संबळ गोंधळ आणि अन्य गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. समारोप कार्यक्रमानंतर ‘बाल गीत रामायण’ कार्यक्रम होणार आहे.


बालपुस्तक जत्रेला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जत्रेत मोठ्या प्रमाणात झालेली पुस्तक खरेदी आनंददायी आहे. या पुस्तकांमुळे उन्हाळी सुटी भरपूर वाचनाची होईल हा विश्वास वाटतो.

  • राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे दि. ६ ते ८ मे पर्यंत पुण्यात आयोजन

कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या स्पर्धेसाठी ४१ संघ सहभागी होणार

पुणे, दि. ४ मे २०२६: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या क्रीडास्पर्धेचे आयोजन बुधवार (दि. ६) ते शुक्रवारपर्यंत (दि. ८) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १० राज्यांतील विविध विद्युत कंपन्यांचे पुरुष व महिला गटातील तब्बल ४१ संघ सहभागी होत आहेत.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे ४१ संघ आणि सुमारे ५३८ महिला व पुरुष खेळाडू सहभागी होत आहेत. कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलमध्ये पुरुष संघात लढत होईल तर कबड्डी व खो-खोमध्ये महिला संघांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील अजिंक्यपदासाठी कबड्डीमध्ये पुरुष व महिला गटातील १८ संघ तर खो-खोसाठी ९ संघ सहभागी होत आहेत. तसेच कुस्ती व बास्केटबॉलमध्ये अजिंक्यपदासाठी पुरुष गटामध्ये प्रत्येकी ७ संघांमध्ये लढत होणार आहे.

विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. ६) सकाळी ९.३० वाजता राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या मुख्य उपस्थितीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राज्याच्या क्रीडा आयुक्त सौ. शीतल तेली-उगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच महावितरण, महानिर्मीती, महापारेषण कंपनीच्या संचालक मंडळासह अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. जिग्नेश राय, सरचिटणीस श्री. नरेश कुमार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ५ वाजता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार (महापारेषण) व श्री. राधाकृष्णन बी. (महानिर्मिती) यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होईल.

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पुणे प्रादेशिक संचालक श्री. सुनील काकडे तसेच उपाध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप (महापारेषण) व अधीक्षक अभियंता श्री. अशोक घाडगे (महानिर्मिती) आणि मुख्य समन्वयक म्हणून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके (महावितरण) व श्री. पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती) आणि विविध समितीचे प्रमुख व सदस्य कार्यरत आहेत.

विवेक वाडेकर पुणे आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त

पुणे–विवेक वाडेकर (आयआरएस १९९१ ची तुकडी) यांनी पुणे येथील आयकर विभागाचे ‘प्रधान मुख्य आयुक्त’ म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी वाडेकर हे पुणे येथे ‘मुख्य आयकर आयुक्त’ म्हणून काम पाहत होते. वाडेकर यांनी तीन दशकांहून अधिक सेवाकाळात करप्रणाली, आर्थिक अंमलबजावणी, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक बाबी हाताळताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. याशिवाय, आर्थिक गुन्हे आणि बेकायदेशीर पैशांचे व्यवहार संदर्भातील दिल्ली येथील ‘सक्तवसुली संचालनालय’ मध्ये विशेष संचालक आणि ‘आर्थिक गुप्तचर’ विभागात अतिरिक्त संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.

तसेच , त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयात आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयात उपसचिव, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात संचालक, आयकर विभागाच्या ‘दक्षता संचालनालय’ मध्ये अतिरिक्त सहसंचालक, तर दिल्ली येथील मुख्य आयकर आयुक्त आणि प्रधान आयकर आयुक्त म्हणूनही सेवा बजावली आहे. विवेक वाडेकर यांच्या विविध पदांवरील नियुक्त्यांमुळे त्यांची कारकीर्द एका सामान्य महसूल अधिकाऱ्यांच्या पारंपरिक कामाच्या कक्षेपलीकडे विस्तारली आहे.

वाडेकर यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले. इतिहासातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, त्यांनी पुणे विद्यापीठातून जर्मन भाषेचा पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

वाराणसीत चंद्रकांतदादा पाटलांकडून ‘विजयाचा जल्लोष’;

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीतील कामगिरीचे केले स्वागत

वाराणसी:पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज वाराणसीमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी वाराणसीत या विजयाचा जल्लोष साजरा केला.निवडणूक निकालांचे कल स्पष्ट झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांसह एकत्र येत आनंद व्यक्त केला.

आसाममध्ये भाजपने सत्ता राखली असून पुडुचेरीतही भाजप आघाडीने मुसंडी मारली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या जागांमध्ये झालेली मोठी वाढ ही कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले की, “आसाम आणि पुडुचेरीमधील जनतेने विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपने घेतलेली मोठी झेप ऐतिहासिक आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे.

“वाराणसीच्या पवित्र भूमीत पार पडलेल्या या जल्लोषात स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला.

सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल; त्याच्या सेवेसाठीच ‘टेक-वारी’! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ४ : तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे  आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे तर मानवी संवेदना, मानसिक आरोग्य, आत्मपरीक्षण “आर्ट ऑफ हँडलिंग क्रिटिसिझम” विषयही प्रशासनासाठी महत्त्वाचा आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ‘टेक वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविला जात असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी  व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, केंद्र सरकारच्या क्षमता बांधणी आयोगाच्या अध्यक्ष राधा चौहान, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थित होते. कार्यक्रमास विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी ‘टेक वारी’ हा उपक्रम आहे.  ‘टेक वारी’ ही संकल्पना वारीच्या सातत्यपूर्ण परंपरेप्रमाणेच प्रेरणादायी आहे. जसे वारकरी कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरची वारी चुकवत नाहीत, तसेच आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने शिकणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञान दररोज बदलत असून, ते आपण जर स्वीकारले नाही तर व्यक्ती  काळाच्या ओघात मागे पडू शकतात. अक्षरज्ञानापासून इंटरनेटपर्यंत साक्षरतेची व्याख्या विकसित झाली असून आता ती एआयपर्यंत पोहोचली आहे. ‘ज्याला एआय समजते आणि वापरता येते, तोच खऱ्या अर्थाने आज साक्षर आहे’ असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एआयमुळे नोकरीच्या स्वरूपात मोठे बदल होणार असून, पुढील एक हजार दिवसात ८० ते ९० टक्के कामकाजाचे स्वरूप बदलू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.तंत्रज्ञानाला घाबरण्याऐवजी ते स्वीकारण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी संगणक क्रांतीचे उदाहरण दिले. संगणकामुळे कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले.’आयगॉट’प्लॅटफॉर्मद्वारे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी अभिमान व्यक्त केला. विशेषतः एआय आणि आधुनिक तंत्रज्ञान विषयांबाबत अधिकाऱ्यांनी दाखवलेली उत्सुकता ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध विभागांनी एआय आणि ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही क्षमता योग्य प्रकारे वापरली, तर महाराष्ट्र इतर राज्यांना मार्गदर्शन करू शकणारी कन्सल्टिंग क्षमता विकसित करू शकतो. एआय एजंट “वासुदेव” अत्यंत कार्यक्षम  पद्धतीने काम करतात, त्यामुळे भविष्यात त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपल्यालाही स्वतःची कौशल्ये सातत्याने अद्ययावत ठेवावी लागतील.

टेक-वारी २.० महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह‘ आत्मविकासातून डिजिटल युगासाठी सक्षम होण्याची सुवर्णसंधी -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतत शिकत राहणे आवश्यक आहे. “’टेक-वारी २.०”मधून केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे, तर आत्मविकास, कार्यक्षमता आणि आधुनिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.वारकऱ्यांची पंढरपूरकडे जाणारी वारी जशी शिस्त, श्रद्धा आणि एकात्मतेचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे “टेक वारी” ही प्रशासनाची तंत्रज्ञानाकडे वाटचाल दर्शवणारी चळवळ आहे. भविष्यात नागरिक-केंद्रित आणि सक्षम शासन घडवण्यासाठी ही वारी महत्त्वाची ठरणार आहे.

मागील वर्षीच्या “टेक वारी” उपक्रमाने तंत्रज्ञानाबाबत जागरूकतेचा भक्कम पाया घातला असून, हा उपक्रम केवळ तंत्रज्ञानाची ओळख नसून, मानव संसाधन विकासाची व्यापक चळवळ आहे.महाराष्ट्राने “साधना सप्ताह” उपक्रमात देशात प्रथम क्रमांक मिळवल्याचा उल्लेख करत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच, मिशन कर्मयोगी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांमध्ये असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक सोपा झाला असून, एआयमुळे सेवा वितरण आणि तक्रार निवारण प्रक्रियेत मोठे बदल घडत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, टेक वारी उपक्रमात ‘लेफ्ट ब्रेन’ आणि ‘राईट ब्रेन’ या दोन्हींच्या विकासावर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञान, एआय, भाषा आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या विषयांद्वारे विश्लेषणात्मक क्षमतेचा विकास केला जात असून, संगीत, योग, नृत्य आणि संस्कृतीसारख्या उपक्रमांमधून सर्जनशीलता आणि मानसिक स्वास्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राचीन काळातील ‘पुष्पक विमान’ ही संकल्पना आजच्या एआय-सक्षम आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचीच उदाहरण आहे. सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “टेक वारी २.०”च्या माध्यमातून या सर्व विषयांवर सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव व्ही.राधा प्रास्ताविकात म्हणाल्या की, ‘टेक-वारी २.०’ या प्रशिक्षण उपक्रमात ६ हजार कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. तसेच या कार्यक्रमांचे राज्यभरातील नऊ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सत्राचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमात मंत्रालयात डिजिटल गव्हर्नन्स, डीपीडीपी कायदा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, क्वांटम कॉम्प्युटिंग, जनरेटिव्ह एआयचा प्रत्यक्ष अनुभव, सायबर सुरक्षा, प्रशासनातील नीतिमत्ता तसेच केंद्र सरकारच्या प्लॅटफॉर्म्स या विषयांवर तज्ज्ञांची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या पाच दिवसांत ‘तालरंग’, ‘नादरंग’, ‘योगरंग’, ‘कलारंग’ आणि ‘संस्कृतीरंग’ असे पाच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.

एआय एजंट वासुदेव हा नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात वापरण्यात आला.एआय एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला व त्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती प्रेक्षकांना दिली.  टेक वारीच्या स्मरणिकेचे ही स्वरूपात प्रकाशन करण्यात आले.

फ्रंट लाईन कर्मचारी  यांचा गौरव यावेळी मंत्रालयातील फ्रंट लाईन कर्मचारी  पल्लवी सतीश सावंत,नितीन गुरसाळे, मारुती मदने, रेश्मा जाधव, राहुल वाघमारे, अशोक जाधव, प्रतीक गायकरवाड, संजय कळमरकर यांचा सत्कार करण्यात आला. ‘तालरंग’च्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

बारामतीकरांनो… आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा – सुनेत्रा अजित पवार

हा विजय म्हणजे दादांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे…

बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास कधीही कमी पडू देणार नाही;आपल्या सर्वांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभी राहीन;सुनेत्रा अजित पवार यांनी दिला शब्द…

मुंबई दि. ४ मे – बारामतीकरांनो आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा असून विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करत आभार मानले आहेत.

आदरणीय अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती.त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या उपस्थितीची उणीव आज प्रकर्षाने जाणवते; हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून, आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची त्यांची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची पूर्ण जाणीव असल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे.

यावेळी सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

तुमच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय शक्य झाला आहे. तसेच या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पाठिंबा दिलेले इतर सर्व मित्र पक्ष, विविध संस्था, संघटना यांचेही सुनेत्रा अजित पवार यांनी आभार मानले.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा निर्धार कायम राहील.तरुणाई, शेतकरी, महिला, उद्योजक आणि समाजातील सर्वच घटकांना केंद्रस्थानी ठेवून बारामतीच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया असे आवाहन सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी केले.

निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया. बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही असा विश्वास व्यक्त करतानाच आपल्या सर्वांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभी राहीन, अशी खात्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, बारामतीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहिन असा शब्दही सुनेत्रा अजित पवार यांनी दिला.

बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय- राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विजय

पवारां च्या विरोधकांना पहा किती किती मिळाली मते…

पुणे -बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या होत्या. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजयी झाल्या आहेत.

दुसरीकडे, राहुरी मतदारसंघातही एकतर्फी लढत पाहायला मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. अक्षय कर्डिले यांनी १ लाख ३९ हजार २१२ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी एकूण २ लाख १८ हजार ९६९ मते मिळवत विजय झाल्या.

या निवडणुकीत प्रा. आर. वाय. घुटुकडे (नवीन राष्ट्रीय समाज पार्टी) यांना ९३५ मते, तर सतीश कृष्णा कदम (हिंदुस्थान जनता पार्टी) यांना १७० मते मिळाली.
अपक्ष उमेदवारांमध्ये डॉ. अभिजित वामनराव बिचुकले (३३३), ॲड. अविनाश वामनराव गायकवाड (९२), करुणा धनंजय मुंडे (३०१), गजानन शांताबाई उत्तम गवळी पाटील (४७), चंद्रकांत रंभाजी मोटे (४२), चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे (४०३), दत्तात्रय रावसो बेदरे (४३), बाळासो मारुती धापटे (५७), रोहित राजू भोसले (७०), मिथुन सोपानराव आटोळे (१२३), मंगलदास तुकाराम निकाळजे (१३७), योगेश मोहन योमो (५०), डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे (२९८), विराज महादेव शिंदे (५३३), शिवाजी जयसिंग कोकरे (१४६), सतीश नाना सोनवणे (४८), सागर शरद भिसे (४५), साजन भगवान अडसूळ (८५), सिताराम विठ्ठल रणदिवे (४५) आणि सोनाली सूर्यकांत राणे (१३२) यांनी मते मिळवली. ‘नोटा’ला ७७४ मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते सुनेत्रा पवार यांच्या प्रतिनिधी किरण गुजर यांना फॉर्म २२ नुसार विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

समस्त ब्राह्मण संघातर्फे सामूहिक उपनयन सोहळा

पुणे : समस्त ब्राह्मण संघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओंकारेश्वर मंदिर येथे आज सामूहिक उपनयन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात एकूण ३० बटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या वर्षी ३ मुलींचाही समावेश करण्यात आला.

हिंदू धर्मपरंपरेनुसार उपनयन हा १६ संस्कारांपैकी अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेला पुढे नेत, सर्व जाती व घटकांतील मुला-मुलींना एकत्र आणण्याचा प्रयत्न या सामूहिक सोहळ्यातून करण्यात आला. या माध्यमातून शिक्षण, संस्कार आणि ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा संकल्प सहभागी विद्यार्थ्यांनी यावेळी केला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सर्वसमावेशक व प्रगत विचारांना अनुसरून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

सचिन टापरे, विजय पाठक, तेजस पाठक, रीमा कुलकर्णी, स्वाती पाठक, प्रज्ञा कापरे, अभय देशपांडे, हेमंत ढवळे, सुनील शिरगावकर आणि विराज जोशी यांचे या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात विशेष योगदान लाभले.

म्हाळुंगे बालहत्या प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत घेतला आढावा

0

पिंपरी चिंचवड दि.३: म्हाळुंगे येथे तीन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पोलीस उपायुक्त कार्यालय, झोन-४, नियोजन नगर, तळेगाव दाभाडे येथे भेट देऊन पोलिस अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेतला.

या प्रसंगी पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाल आदी अधिकारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, म्हाळुंगे येथील घटना अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यात आली. आरोपीविरोधात लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. चाकण परिसरातही मुलीच्या अत्याचाराची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा समाजकंटकांवर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

पीडितांना तात्काळ समुपदेशनाची मागणी

पीडितांना तात्काळ समुपदेशन मिळणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. “पोलिसांना हे काम करावे लागते, पण ही जबाबदारी मुख्यतः महिला आणि बाल कल्याण विभागाची आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींनीही नवीन कायद्यांची माहिती घेऊन जागृती उपक्रम राबवावेत, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

कायद्याची अंमलबजावणी, पोलिस बळकटीकरणावर भर

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सातत्याने कायदा व सुव्यवस्था विषय विधिमंडळात मांडला जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर सातत्याने नजर ठेवणे, पोलिस दलातील कर्मचारी संख्या वाढवणे आणि आवश्यक साधनसामग्री पुरवणे गरजेचे आहे.

शक्ती कायद्याच्या अनेक तरतुदी बीएनएस कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सात वर्षांच्या आत शिक्षा होण्यास अडचण येत असल्याने नोटीस देण्याच्या तरतुदीत बदल करून आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. परप्रांतीय कामगारांची नोंदणी व निगरानी ठेवणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोशल मीडियावरील बेजबाबदारपणा

समाज माध्यमांवर वाढता बेजबाबदारपणा, अश्लीलता आणि व्यंग्य शोषण याकडेही डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. “समाज माध्यमांचा वापर योग्य प्रकारे व्हावा,” असे आवाहन त्यांनी केले. दोषसिद्धीचे प्रमाण वाढत असले तरी ते ९० टक्क्यांपर्यंत नेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांनी डॉ. गोऱ्हे यांना प्रकरणाच्या तपासाबाबत सविस्तरपणे माहिती सादर केली.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

पुणेअजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावर अखेर केंद्रीय नागरी विमानवाहू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी अध्यक्षपदासाठी मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या विरोधात उभे राहण्याचे संकेत दिले होते. मात्र, ऐनवेळी दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि अजित पवार यांची अध्यक्षपदी, तर मुरलीधर मोहोळ यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. आता अजित पवारांच्या पश्चात मोहोळ यांनी या संघटनेची संपूर्ण धुरा आपल्या हाती घेतली आहे.

अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नावही या पदासाठी चर्चेत होते. त्यांनी नुकतेच खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून संघटनेत प्रवेश केल्याने त्यांच्या निवडीच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून मोहोळ यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

दरम्यान, अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे एका भीषण विमान अपघातात वयाच्या 66 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून निवडणूक प्रचारासाठी बारामतीला जात असताना झालेल्या या अपघातात त्यांच्यासह पाच जणांना प्राण गमवावे लागले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता आणि 29 जानेवारी रोजी बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या या अनपेक्षित जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एका झंझावाती आणि प्रभावी युगाचा अंत झाला आहे.