रात्री 11 वाजता फोन आला, 50 कोटींची डील उघड..कोणी साईबाबांची, तर कोणी आई-मुलाची शपथ घेतली..ओमराजे निंबाळकरांवर खटल्याच्या निकालासाठी दबाव….
नवी दिल्ली/मुंबई- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तब्बल सहा खासदारांनी दिल्लीत तळ ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, त्यासाठी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“अमित शहांच्या आमिषांना अनेक जण बळी पडतायत”
देशातील विरोधी पक्षांतील नेत्यांच्या कथित पक्षांतराच्या घडामोडींवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांवर सातत्याने हल्ले करत भारतीय लोकशाहीचे नुकसान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी म्हटले की, केंद्रीय गृहमंत्री सातत्याने विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या मते, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत झालेल्या परिसीमन विधेयकांवरील घडामोडींनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीची भरपाई करण्यासाठी ते हे सर्व करत आहेत.
जयराम रमेश यांनी आरोप केला की, अवघ्या दोन वर्षांपूर्वी भाजपविरोधी भूमिका घेऊन निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी आता भाजपच्या दिशेने वळत आहेत. यामागे मोठ्या प्रमाणात आमिषे आणि प्रलोभने दिली जात असल्याची चर्चा असल्याचा दावा त्यांनी केला.
“ज्यांना भाजपविरोधी भूमिकेमुळे जनतेने निवडून दिले, तेच आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना दिली जाणारी आमिषे धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे,” असे रमेश यांनी म्हटले.
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना जयराम रमेश यांनी त्यांच्या राजकीय रणनीतीची तुलना थेट म्युच्युअल फंड उद्योगाशी केली. ते म्हणाले, “हा अत्यंत संकुचित आणि कुटिल राजकीय अभियान आहे. या मोहिमेसाठी सर्व प्रकारची संसाधने वापरली जात आहेत. म्युच्युअल फंड उद्योग जसा प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या योजना आणि उत्पादने देतो, त्याचप्रमाणे राजकीय गरजांनुसार वेगवेगळी आमिषे दिली जात आहेत.”
काँग्रेस नेत्यांनी भाजपवर लोकशाही संस्थांचा गैरवापर केल्याचाही आरोप केला. “या संपूर्ण प्रक्रियेत नैतिकतेचा पूर्णपणे ऱ्हास झाला आहे. या राजकारणाला कोणतीही मर्यादा राहिलेली नाही,” असे ते म्हणाले.
तथापि, या सर्व प्रयत्नांनंतरही विरोधकांना संपविण्याच्या अंतिम उद्देशात भाजप यशस्वी होणार नाही, असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला.
या घडामोडींना अधिक वजन मिळाले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे. मंगळवारी रात्री उशिरा शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानंतर या सर्व हालचालींना वेग आला असून, आज सकाळी शिंदे आणि संबंधित खासदारांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत स्वतंत्र गट स्थापन करायचा की थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा, यावर अंतिम निर्णय होऊ शकतो.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरीच्या चर्चांवर थेट कडक शब्दांत प्रहार केला. जर पुन्हा कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, असा जाहीर इशारा यावेळी नेत्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी काल रात्रीच्या घडामोडींचा खुलासा केला. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास मला एका विश्वासू सूत्राने माहिती दिली की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याची मोठी डील झाली आहे. प्रत्येकी ५० कोटी रुपयांना खासदारांना विकत घेतले जात असून, काल रात्रीच १५ कोटींचा ॲडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मी ती लगेच सोशल मीडियावर जाहीर केली,” असे राऊत म्हणाले.
खासदार फुटण्याच्या चर्चांवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी १४ जून रोजी मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा किस्सा सांगितला. राऊत म्हणाले, आमची १४ तारखेला बैठक झाली, त्याला सर्व खासदार उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने ५ वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने आई भवानीची शपथ घेतली, तर तिसऱ्याने स्वतःच्या मुलाची आणि आईची शपथ घेतली. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता बेईमानी करत असतील, तर ही डरपोकगिरी आहे आणि जनता हा तमाशा खपवून घेणार नाही.
संजय राऊत म्हणाले की, निवडून आलेल्या खासदारांना विकत घेण्याचा जे काम सुरू आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकसभा अध्यक्षांनी संविधानाचे पालन करत निर्णय घेतला पाहिजे. जो त्यांनी यापूर्वी घेतला नाही. खासदारांवर दबाव कशा प्रकारे येतात हे मी तुम्हाला सांगतो, 20 वर्षांपूर्वी त्यांच्या वडीलांची हत्या झाली. गेली 20 वर्षे तो खटला सुरू आहे, काल त्यांचा निकाल होता, मुंबई हायकोर्टात पण ओमराजे निंबाळकरांवर दबाव टाकण्यात आला की तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटात सामील व्हा.
संजय राऊत म्हणाले की, खून प्रकरणचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर तुम्ही या लेटरवर सही करा आणि आमच्यासोबत या. जर देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्था या पद्धतीने चालत असेल तर तर काय संविधान आणि काय न्यायव्यवस्था त्यामुळेच या प्रकरणाचा निकाल दोन दिवस पुढे ढकलला गेला.

