Home Blog Page 8

जिल्ह्यात ६६ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ५: भारताच्या १६ व्या जनगणनेला १ सुरुवात झाली असून अखेर जिल्ह्यातील ६६ हजार १९३ इतक्या नागरिकांनी स्व-गणना केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करुन १५ मे २०२६ अखेर कालावधीत स्व-गणना पूर्ण करावी. स्व-गणना ही ऐच्छिक आहे. माहिती गोळा करण्यासाठी आणि नोंदविण्यासाठी प्रगणक १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान प्रत्येक घराला भेट देणार आहे. यावेळी प्रगणकांद्वारे गृहगणना करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्याशी निगडित अचूक माहिती त्यांना द्यावी.
आपल्या परिसरातील नागरिकांनाही अद्ययावत माहितीसह स्व-गणना करण्यास प्रोत्साहित करावे, जिल्ह्यातील सर्व आपली जबाबदारी मानून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावे -शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

पुणे, दि. ५: सफाई कर्मचाऱ्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरिता केंद्र व राज्यशासन मिळून काम करीत आहेत; त्यामुळे पुणे जिल्ह्यातही सफाई कर्मचाऱ्यांच्या पुर्नवसनाकरिता मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावे , या मॉडेलची अंमलबजावणी राज्यात करण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारण करण्याकरिता केलेल्या उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. डागोर म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकरिता घरकुल, आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी विषयांशी निगडित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावाणी करावी. लाड – पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने भरावयांच्या पदांबाबतची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. नगर विकास विभागाचे २२ ऑक्टोबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना लागू करण्यात आली असल्याने या आदेशाच्या दिनांकानंतर सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्षे किंवा त्याहून अधिक झाली आहे असे सफाई कामगार आणि २२ ऑक्टोबर २००८ नंतर सेवेत असलेले जे सफाई कामगार मृत्यू झाले आहेत अशा मृत सफाई कामगारांच्या पात्र वारसांना घरे उपलब्ध करुन देण्यात यावी.

केंद्र व राज्यशासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्याकरिता शिबीरांचे आयोजन करावे. शिबीरे आयोजित करतांना सफाई कामगार क्षेत्रात कार्यरत अधिकृत संघटनांसोबत सोबत घ्‍यावे. विविध लोककल्याणकारी योजनांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवांचा लाभ कॅशलेस सुविधांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. सफाई कर्मचाऱ्यांशी निगडित प्रलंबित मार्गी लावून तसा अहवाल आयोगाकडे सादर करावा, अशा सूचना श्री. डागोर यांनी दिल्या.

श्री. डुडी म्हणाले, सफाई कर्मचारी आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात काम करण्यात येईल. यापूर्वीच्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल लवकरात लवकर आयोगाकडे सादर करावा, असेही श्री. डुडी म्हणाले.

पालखी सोहळ्यासाठी सर्वंकष नियोजन करा:महापौर मंजुषा दीपक नागपुरे

पुणे : आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पालखी मार्गावरील संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे, स्वागत मंडळाकडून स्पीकर व पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करणे, तसेच ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत, आगमन व प्रस्थान मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी.

मुख्य ठिकाणी जलपान, वैद्यकीय तपासणी व आवश्यक सेवा केंद्रे उभारण्यात यावीत. तसेच, माणूसबळ, शाळा व प्रशासकीय यंत्रणा यांचा योग्य समन्वय साधून कार्यवाही करण्यात यावी. भाविकांच्या सोयीसाठी PMPML बससेवा योग्य ठिकाणी उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

बोपोडी परिसरात पालखी जाताना तीव्र चढ-उतार असल्याने तेथे ‘हाइट बॅरिअर’ उभारण्याची सूचना करण्यात आली असून, संबंधित काम PWD मार्फत तातडीने पूर्ण करावे. उत्सव काळात प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे नियोजन काटेकोरपणे अंमलात आणण्यात यावे.

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी आगमनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता, होळकर पुल परिसरातील ५ तासांचा कालावधी कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, पालखी सोहळा प्रमुख मार्गांवर सर्व सोयीसुविधा पूर्ण केल्यानंतर त्याचे संपूर्ण नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा. आवश्यक असल्यास ‘रेनकोट’ व इतर साहित्याचीही उपलब्धता सुनिश्चित करावी.

बोपोडी व खडकी परिसरात पालखी विश्रांती वेळ सुमारे १५ मिनिटे निश्चित करण्यात येणार असून, भाविकांना दर्शन घेण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात येणार आहे.

प्रशासनाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय ठेवून पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समाविष्ट 23 गावांच्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’साठी इरादा जाहीर करा :नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

येरवडा ते कात्रज या भुयारी मार्गासाठी फिजीबिलिटी चेकिंग झाली असून सध्या या मार्गाची अलाइनमेंट सुरू आहे. या भुयारी प्रकल्पासाठी एसपीव्ही निर्माण करावी. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, ही सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असून त्यानुसार आदेश दिले आहेत

पुणे, 5 मे : महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा संरचनात्मक आराखडा (‘स्ट्रक्चरल प्लॅन’) करण्यासाठी तातडीने इरादा जाहीर करावा अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाची (पीएमआरडीए) 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल मुंबईत पार पडली.

समाविष्ट 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्यापूर्वी संरचनात्मक आराखडा तयार करावा आणि येरवडा ते कात्रज भुयारी मार्गासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था (एसपीव्ही स्पेशल पर्पज व्हेईकल) निर्माण करावी अशा सूचना राज्यमंत्री मिसाळ यांनी या बैठकीत केल्या होत्या. त्याला मान्यता देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला आदेश दिले होते.

मिसाळ म्हणाल्या, ” पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांच्या संदर्भात 11 फेब्रुवारी 2020 पीएमआरडीए हे नियोजन प्राधिकरण रद्द करून पुणे महानगरपालिकेला ते अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या गावांचा विकास आराखडा करण्याचे काम पुणे महापालिकेतर्फे होणार होते. नुकताच पुणे महापालिकेने या गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी इरादा जाहीर केला. मात्र काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार 23 गावांचा स्ट्रक्चरल प्लॅन करावा लागणार आहे. त्यासाठी नव्याने इरादा जाहीर करून अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया महापालिकेने पूर्ण करावी अशा सुचना दिल्या आहेत.”

मिसाळ पुढे म्हणाल्या, ” विकास आराखडा तयार करण्यासाठी पाच ते सहा वर्षाचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत समाविष्ट गावांमध्ये अतिक्रमणे वाढायची भीती आहे. या गावांचा नियोजनबद्ध आणि वेगवान विकासाला चालना मिळण्यासाठी स्ट्रक्चरल प्लॅन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गावातील रस्ते रुंद होण्यासाठी मदत होईल. 23 गावांमध्ये शासनाच्या मालकीच्या जमिनी आहेत. त्या महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि स्ट्रक्चरल प्लॅनमध्ये या जागांवर पायाभूत सुविधांची आरक्षणे टाकावीत. शासकीय जागा असल्याने भूसंपादनासाठी किंवा टीडीआर साठी निधीची गरज भासणार नाही. त्यामुळे विकासाला गती मिळू शकेल

.

गावरान चिकन रस्सा ते बटेर थाळी, लसणाची चटणी ते बासुंदी-मांडे

महालक्ष्मी सरसच्या फूड कोर्टमध्ये खवय्यांसाठी मेजवानी; २५० रुपयांपासून थाळी उपलब्ध

मुंबई –

उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अनेक महिला आर्थिक दृष्ट्या सशक्त झाल्या आहेत. महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये महिला उद्योजकांनी हस्तकला आणि उत्पादनांसोबतच महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीची समृद्ध मेजवानी खवय्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

येथे तयार होणारे सर्व पदार्थ ताजे आणि पारंपरिक पद्धतीने हाताने बनवलेले आहेत. प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या जिल्ह्याची खासियत, चव आणि संस्कृती अनुभवायला मिळत असून, खवय्यांसाठी ही एक वेगळीच पर्वणी ठरत आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ, बीड, जालना अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या गावची अस्सल गावरान चव येथे आणली आहे.

नॉनव्हेज प्रेमींसाठी आकर्षण
कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, भंडाऱ्याचा खर्डा मटण, सावजी कलेजी, सावजी मुंडी-पाया, बुलढाण्याचे वराडी चिकन, बीडचे सावजी मटण, मराठवाडा स्पेशल चिकन कंटकी, मच्छी फ्राय यांसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरत आहेत. यवतमाळ स्पेशल खेकडा थाळी आणि बटेर थाळी हेही खवय्यांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. कोकणातून आलेल्या स्टॉल्सवर सुरमई, पापलेट यांसारख्या माशांच्या थाळ्यांनाही मोठी मागणी आहे.

विविधतेने नटलेले व्हेज पदार्थ
अहिल्यानगरचे वांग्याचे भरीत, कोथिंबीर भाकरी, नंदुरबारची झुणका-भाकर, अकोल्याची मुगाची उसळ, चंद्रपूरची पुरणपोळी, धुळे स्पेशल शेवभाजी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. विदर्भ स्पेशल थाळीत खवा पोळी, रोडगे, बासुंदी, मांडे, पातोडी भाजी, वारंगा खिचडी असे पारंपरिक पदार्थ मिळत आहेत. पुणे स्पेशल शेवग्याची भाजी, मांडे आणि पातोडी हेही खास आकर्षण ठरत आहेत.

याशिवाय कोल्हापुरी मिसळ, थालीपीठ, खपली गव्हाची खीर, भिगवण स्पेशल मच्छी थाळी यांनाही ग्राहकांची पसंती मिळाली आहे. गोड पदार्थांमध्ये उकडीचे मोदक, खव्याची पोळी तर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे आईस्क्रीमही उपलब्ध आहे.

बजेटमध्ये मेजवानी
येथे मिळणाऱ्या थाळींची सुरुवात केवळ २५० रुपयांपासून होत असून, प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणारी ही खाद्य मेजवानी ठरत आहे. पारंपरिक पद्धती, घरगुती चव आणि महिलांच्या हस्तकौशल्यामुळे या पदार्थांना वेगळीच ओळख मिळाली आहे.

महालक्ष्मी सरस २०२६ हा उपक्रम केवळ विक्री-प्रदर्शनापुरता मर्यादित नसून, महिलांच्या उद्योजकतेला चालना देत त्यांच्या कलेला, परंपरेला आणि चवीला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून ‘महालक्ष्मी सरस’चे कौतुक

‘उमेद’च्या उत्पादनांची चव आता थेट मंत्र्यांच्या किचनमध्ये!

मुंबई: ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ प्रदर्शन नसून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचे एक मोठे व्यासपीठ आहे, असे गौरवोद्गार काढत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी सुरू असलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली आणि ‘उमेद’ अभियानाच्या महिला उद्योजकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला.

पंतप्रधानांचा ‘लखपती दीदी’ संकल्प पूर्ण करणार
भेटीदरम्यान बोलताना ना. आठवले म्हणाले की, “पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी देशात १ कोटी ‘लखपती दीदी’ घडवण्याचा जो संकल्प केला आहे, त्याला बळकटी देण्याचे काम हे अभियान करत आहे. या संकल्पपूर्तीसाठी आपण सर्वशक्तीनिशी कार्य करणार आहोत अशी ग्वाही दिली. ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

नामदार जयकुमार गोरे यांच्या कार्याची स्तुती
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन आणि ग्रामीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यात ग्रामविकास विभागाचा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

थेट मंत्र्यांच्या किचनमध्ये पोहचणार ग्रामीण चव
प्रदर्शनातील शुद्ध, गावरान आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले मसाले, धान्य व इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर ना. आठवले भारावून गेले. या प्रदर्शनातील उत्पादनांची चव आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या किचनमध्ये पोहोचणार असून, त्यांनी स्वत: काही उत्पादनांची खरेदी करत महिलांना प्रोत्साहन दिले.

महालक्ष्मी सरस मधून १ कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट!

महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल सुरू करणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुंबई, – प्रत्येक जिल्ह्यातील महिलेला हक्काच व्यासपीठ देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आता नव्या रूपात तयार झालं असून, कोणत्याही जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाची स्पर्धा करण्यासाठी ते सज्ज आहे. या प्रदर्शनात केवळ सजावटीसाठी कंटेनर लावलेले नाहीत तर ते कंटेनर ऑफ इंडिया आहेत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात आत्तापर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार झाल्या आहेत, येणाऱ्या काळात १ कोटी लखपती दीदी तयार करण्याचं उद्दिष्ट आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०२६ सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी उमेद निलेश सागर (IAS), मुख्य परिचालन अधिकारी निखिल ओस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर, आपल्या देशातील नारीशक्तीच्या शक्तीचा उपयोग देशाच्या विकासाच्या वाटचालीमध्ये करावा लागेल. ज्या क्षणी ही नारीशक्ती मानव संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल त्या क्षणी भारत विकसित होईल. म्हणूनच मोदीजींनी नारीशक्ती सक्षमीकरणाच्या अनेक योजना या ठिकाणी सुरू केल्या. मला आनंद आहे गेला दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये उमेद, मवीमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची चळवळ उभी राहिली. आणि लाखो महिला या चळवळीशी जोडल्या गेल्या. अनेक कुटुंब लाभार्थी झाली. अनेक महिलांनी स्वतःच्या बळावर बचत गटासोबत आपलं कुटुंब ही सक्षम करण्याचं काम केलं. जे मोदीजींना अपेक्षित होतं ते आमच्या महिलांनी करून दाखवलं असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महिलांना मिळणार रोपवाटिकेचे प्रशिक्षण
आतापर्यंत ५० लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत. लवकरच पुढच्या काही वर्षात ही संख्या एक कोटीच्या आकडा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरायला हवे त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. महाराष्ट्रामध्ये ३०० कोटी झाडे लावण्याची एक मोहीम हातामध्ये घेतली. उमेदच्या माध्यमातून एक योजना तयार करून, त्या योजनेमध्ये बचत गटांना नर्सरी तयार करण्याकरता आपण निधी उपलब्ध करून देऊ, नर्सरी तयार करण्याचे काम महिला करतील आणि त्यासोबत दरवर्षी झाड लावणं आणि त्या झाडांची निगा ठेवून याकरताही जे काही आवश्यक त्याचा खर्च आहे तो खर्चही आपण उपलब्ध करून देऊ. त्यामुळे या महिलांना काम आणि उत्पन्न दोन्ही मिळेल त्यासाठी आराखडा तयार करण्याचा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

महिला बचत गटांसाठी उमेदचे मॉल
ग्रामीण भागातील महिलांना हक्काची कायस्वरूपी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी २० जिल्ह्यांमध्ये उमेदचे मॉल उभारण्याचे काम आपण सुरू केले असून उरलेल्या १६ जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच मॉल पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये प्रत्येक तालुक्यात उभारले जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

“महिलांना 50 हजार कोटींचे कर्ज वितरित, एक रुपयाही न थकवता महिलांनी कर्ज फेडले” – मंत्री जयकुमार गोरे
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर उपस्थित महिलांना संबोधित करताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महालक्ष्मी सरस २०२६ मुळे आमच्या हक्काच्या महिलांना आज रोजगार मिळत आहे. महाराष्ट्रातील इतिहासात पहिल्यांदा इतक्या भव्य स्वरूपात असले महालक्ष्मी सरस प्रदर्शन होत आहे. लाडक्या बहिणींना बळ देण्याचे काम आणि त्यांना स्वतःचा पायावर उभे राहतील या उद्देष्टाने पुढे जात आहोत. देशात ५० टक्के महिला आहेत. आज महिला सगळ्या क्षेत्रात पुढे जात आहेत. उमेदच्या माध्यमातून ६४ लाख कुटुंब यामध्ये सहभागी झाली आहेत. ३४ हजार महिला बचत गट आहेत. ५० हजार कोटी रुपये कर्ज बचत गटाला दिले गेले. आणि हे सर्व कर्ज महिलांनी एक रुपया देखील न थकवता परत केल्याचे म्हणत मंत्री गोरे यांनी महिलांचे कौतुक केले.

एक कोटी लखपती दीदींसाठी दिवस-रात्र प्रयत्न करणार –
मंत्री गोरे पुढे म्हणाले की, मोदींनी लखपती दीदी संकल्प सुरू केली. त्यानंतर आता ३ कोटी महिलांना लखपती करण्याचा संकल्प घेतला आहे. १ कोटी महिला लखपती झाले पाहिजे ही जबाबदारी आमच्या विभागावर दिली आहे. यासाठी आम्ही दिवस रात्र करू पण आपले स्वप्न पूर्ण करून दाखवू. महालक्ष्मी मिनी सरस होतो तेव्हा १००/१५० स्टॉल होते. मात्र, आता १३ जिल्ह्यात फूड मॉल उभारणार आहोत. आमच्या महिला बाजारपेठा सोबत स्पर्धा घेण्यासाठी तयार आहेत. आम्ही महिलांच्या पाठीशी असेच उभे राहू.”असे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे.

शक्ती कायद्याची तत्काळ अमलबजावणी करा — रमेश बागवे

नसरापूर :आरोपीस फाशीचीच शिक्षा हवी— रमेश बागवे
पुणे, दि. ४ मे २०२६ :
मौजे नसरापूर (ता. भोर) येथील चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणी आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच शक्ती कायद्याची अमलबजावणी तत्काळ करावी अशी ठाम मागणी मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी मंत्री रमेश बागवे यांनी आज केली आहे .पुणे शहर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात महिलांवर व अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नसरापूर येथील ही घटना अत्यंत अमानवीय व संतापजनक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

याचबरोबर खेड-खालुंब्रे परिसरातील तीन वर्षांच्या बालकावर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणाचाही उल्लेख करत, अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले. गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई होत नसल्याने कायद्याची भीती उरलेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

संघटनेने दोन्ही प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पीडित कुटुंबांना तात्काळ न्याय मिळवून देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक व कार्याध्यक्ष अविनाश बागवे, मुख्य समन्वयक विठ्ठल थोरात ,अरुण गायकवाड, मधुकर चांदणे, श्याम पाटोळे, सागर मोरे, रवि पाटोळे, सुनील बावकर, ॲड पुष्पा लोंढे, नारायण पाटोळे, हुसेन शेख, मारुती कसबे, राहुल चिंदम ,महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. राजश्री अडसूळ तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे प्रमुख पदाधिकारी,युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कमल हसन, रजनीकांतला जे जमलं नाही ते ‘थलपती’ने द्रविडांच्या राज्यात करून दाखवलं…

What Kamal Haasan and Rajinikanth could not do, ‘Thalapathy’ did in the Dravidian kingdom…

तामिळी जनतेने सुपरस्टार थलपती विजय यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून तामिळनाडू विधानसभेत तब्बल १०७ जागा बहाल केल्या आहे.तामिळनाडूच्या सर्वच विधानसभा जागांवर विजयने आपल्या तमिळगा वेट्री कळघम पक्षाचे उमेदवार उभे करून प्रस्थापित पक्षांना हादरे देण्याची रणनीती आखली आहे. त्यांची हीच रणनीती यशस्वी होताना दिसून येत आहे.सिनेमान्द्वारे स्वप्नाची दुनिया साकारून तत्कालीन काळात मनोरंज करणाऱ्या फिल्मी सिताऱ्यांनी राजकारणात उतरण्याची द्रविडी परंपरा यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विजयच्या पक्षात भावनिक कथा देखील दिसून आली . तिकीट मिळाल्यावर रडलेला ड्रायव्हरचा मुलगा जिंकला लपथी विजय आता तामिळनाडूमध्ये एक लोकप्रिय व्यक्तिमत्व बनले आहेत. त्यांच्या राजकीय पक्षाने, तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके), विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. विजय यांनी केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर ईव्हीएम मशीनवरही एक ब्लॉकबस्टर यश संपादन केले आहे.

तमिळनाडूत अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही पक्षांना धक्का देत पदार्पणातच सर्वाधिक जागा जिंकल्या. तामिळनाडुत अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या थलपती विजयच्या पक्षाने मोठं यश मिळवलंय.तामिळनाडूत मोठा पक्ष ठरला असला तरी टीव्हीके बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. तामिळनाडुत २३४ जागा असून सत्तास्थापनेसाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार टीव्हीकेला सर्वाधिक १०७ जागांवर निर्णायक आघाडी आहे. तर डीएमके ६० आणि एआयडीएमकेला ४७ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस ५, पीएमके ४, आययुएए, सीपीआय, सीपीआयएम आणि व्हिसीके या पक्षांना प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला केवळ एकच जागा जिंकता आलीय. राज्यात त्रिशंकू सत्तेची स्थिती निर्माण झालीय. टीव्हीके पक्षाला आता इतर कोणत्या तरी पक्षाशी हातमिळवणी करावी लागेल.

एकूण मालमत्ताथलपती विजयची एकूण संपत्ती अंदाजे ६०३ कोटी ते ६२४ कोटी च्या दरम्यान आहे. यामध्ये त्याच्या २१३ कोटींच्या बँक ठेवींचा समावेश आहे. चेन्नईतील आलिशान बंगले आणि कोडाईकनाल इथल्या जमिनींची किंमत ही १९८.६२ कोटी ते २२० कोटींच्या घरात आहे

विजय थलपती म्हणजेच जोसेफ विजय चंद्रशेखर या तमिळनाडूमधल्या सुपरस्टारने दोन वर्षांपूर्वी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करून फिल्मी सिताऱ्यांनी राजकारणात उतरण्याची द्रविडी परंपरा एक पाऊल पुढे नेली. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता या राजकारणात कमालीच्या यशस्वी झालेल्या अभिनेत्यांची फळी जशी तमिळ राजकारणात आहे, तशीच अपयशी झालेल्या अभिनेत्यांचीही मालिका तिथं आहे. सुपरस्टार कमल हसन हे त्यामधलं अलिकडचं नाव. विजय थलपती यांचा समावेश पहिल्या यादीत होणार की दुसऱ्या यादीत याची यंदाच्या निवडणुकाीमध्ये जोरदार चर्चा होती. परंतू थलपती म्हणजेच कमांडर हे आपलं नाव राजकारणात सार्थ करण्याची संधी आणि जबाबदारी विजय थलपतीने अतिशय समर्थपणे पेलली असल्याचे दिसून येत आहे.

थलपती, Thalapathy या शब्दाचा अर्थ काय? असा प्रश्न आता चाहत्यांना पडलाय. तमिळ भाषेत Thalapathy या शब्दाचा अर्थ ‘सेनापती’ किंवा ‘नेता’ (Commander/Leader) असा होतो. सुरुवातीला विजयला ‘इलया थलपती’ (Ilayathalapathy) म्हणजेच ‘युवा सेनापती’ म्हटलं जायचं. जशी जशी त्याची क्रेझ वाढली, जसा त्याचा प्रभाव वाढला आणि तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला, तसं चाहत्यांनी त्याला प्रेमानं केवळ ‘थलपती’ म्हणायला सुरुवात केली. त्याचं नाव पडलं ते थलपती विजय.
थलपती विजय याने सिनेसृष्टीतून राजकारणात पाऊल टाकण्याचे ठरवले. थलपतीच्या घोषणेला तामिळी जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. गेल्या काही महिन्यांपासून थलपतीने तामिळी जनतेच्या प्रश्नांवर जोरदार उठवला होता. त्याचमुळे युवकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्येही त्याची अफाट लोकप्रियता होती. निवडणूक प्रचारातही त्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला पक्ष घराघरात पोहोचवला. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पाहिला असता सिनेमासृष्टीच्या भोवती तेथील राजकारण फिरते. त्याचे प्रमुख उदाहरण म्हणजे जयललिता… त्यांच्यानंतर सिनेसृष्टीतून येऊन जनतेच्या पसंतीने विजय महत्त्वाच्या खुर्चीवर बसू शकतो, असे आत्ताच्या कलांनुसार दिसते.

हजारो-लाखोंची गर्दी खेचण्यासाठी दक्षिण भारतात ‘सुपरस्टार विजय’ हे दोन शब्दच पुरेसे आहेत. इतकी प्रचंड लोकप्रियता आहे अभिनेता विजयची. त्याचे चाहते त्याला ‘थलपती’ म्हणतात. तामिळनाडूतील करूरमध्ये ‘तामिळगा वेत्री कळघम’ या विजय यांच्या पक्षाच्या प्रचार रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. विजय या रॅलीत उपस्थितांशी संवाद साधत होता. या घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर विजय यांनी सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केलं. त्याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

विजयचे आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखेच राहिले आहे. अगदी जन्मही एकप्रकारे चित्रपटसृष्टीतच, लहानपणापासून अभिनयाची सुरुवात, संघर्षानंतर मिळवलेले स्टारडम, वडिलांशी मतभेद आणि आता राजकारणात प्रवेश.

विजयचं पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. त्याचा जन्म 22 जून 1974 रोजी चेन्नई येथे झाला. त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते आणि आई शोभा गायिका होत्या. चित्रपटाच्या वातावरणात वाढलेल्या विजय यांनी अगदी लहानपणापासून अभिनयास सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘वेत्री’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी दिली. लहान वयातच विजय यांनी आपला भविष्यकाळ चित्रपटसृष्टीतच असेल हे ठरवले होते. कॉलेजमध्ये त्यांनी व्हिज्युअल मीडिया विषयात शिक्षण घेतलं. पण अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. नंतर त्यांच्या आई शोभा यांनी एक पटकथा लिहिली आणि वडिलांनी त्यावर ‘नालैय्या थिरपू’ (1992) हा चित्रपट बनवला. याच चित्रपटातून विजय यांनी नायक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही, मात्र, त्यातून विजयच्या करिअरची पायाभरणी झाली.
विजयच्या सुरुवातीचे बहुतांश सिनेमे अ‍ॅक्शन आणि रोमँटिक गाण्यांनी भरलेले असायचे. पण कालांतराने त्याने असे काही सिनेमे केले, ज्यातून त्याची प्रतिमा बदलत गेली. कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांतून त्याने वेगळी छाप पाडली आणि साध्या हिरोपासून हळूहळू तो चाहत्यांसाठी ‘थलपती’ (सेनापती) बनला. ‘गिल्ली’सारख्या सुपरहिट चित्रपटाने विजयला ‘मास हिरो’ची ओळख मिळवून दिली. ‘कथी’ चित्रपटाने त्याच्या अभिनयाला सामाजिक आणि राजकीय विषयाशी जोडले, तर ‘थेरी’, ‘मर्सल’ आणि ‘बिगिल’ने बॉक्स ऑफिसवर कमाईत विक्रम केले. अभिनयासोबतच विजय उत्तम डान्सर म्हणूनही ओळखला जातो.

राजकारणात कसा ?

फेब्रुवारी 2024 मध्ये विजयने औपचारिकरित्या राजकारणात प्रवेश केला आणि ‘तामिळगा वेत्री कळघम’ या नव्या पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेवेळी विजयनं स्पष्ट केलं होतं की, 2024 च्या लोकसभा निवडणूक ते लढवणार नाहीत किंवा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत. त्यांचा भर 2026 च्या विधानसभा निवडणुकीवर असेल. राजकारणात प्रवेश करतानाच विजयने चित्रपटसृष्टी सोडत असल्याचीही घोषणा केली.

‘तामिळगा वेत्री कळघम’ म्हणजेच टीव्हीकेची पहिली सभा 27 ऑक्टोबर 2024 रोजी तमिळनाडूच्या विलुपुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथे झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेतून विजय यांनी लोकांमध्ये दुफळी माजवणारं राजकारण करणाऱ्या पक्षांवर टीका केली होती. असा भेद निर्माण करणाऱ्या पक्षांच्या विचारसरणीला आपला विरोध असल्याचंही विजयनं त्यावेळी सांगितलं होतं. “द्रविड मॉडेलच्या नावाखाली फसवणूक” आणि “एका कुटुंबाने राज्य लुटल्या”चा आरोपही विजयनं त्यावेळी केला होता.
राजकारणात येण्यापूर्वी विजयच्या कुटुंबातही वाद निर्माण झाला. त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इयक्कम नावाने आधीच पक्ष स्थापन केला होता. यावरून विजय आणि त्याच्या वडिलांमध्ये मतभेद झाले होते. विजयने आई-वडिलांसह 11 जणांविरुद्ध खटला दाखल केला होता आणि आपल्या नावाचा वापर कोणत्याही राजकीय कारणासाठी किंवा लोकांना एकत्र करण्यासाठी करू नये, अशी मागणी केली होती.

विजयच्या पक्षाची विचारधारा काय?

पहिल्या सभेत विजय यांनी टीव्हीकेच्या विचारधारेबाबत सविस्तर भूमिका मांडली होती.त्यात म्हटलं होतं की,

“आम्ही द्रविड राष्ट्रवाद आणि तमिळ राष्ट्रवाद यांना वेगळे करणार नाही. हे दोन्ही या मातीतल्या दोन डोळ्यांसारखे आहेत. आपण स्वतःला कोणत्याही एका ओळखीपुरते मर्यादित ठेवू नये.”

विजयने स्पष्ट केलं होतं की, त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर आधारित असेल. तसंच, विजय पुढे म्हणाला होता की, ‘टीव्हीके पेरियार यांनी दाखवलेल्या मार्गावर चालेल, ज्यात महिला सबलीकरण आणि सामाजिक न्यायाचा समावेश आहे. मात्र, पेरियार यांचे नास्तिकतेचे विचार मात्र स्वीकारणार नाहीत.’

वैयक्तिक आयुष्य

विजयच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे त्याचा विवाह. लंडनमध्ये वाढलेली संगीता विजयची चाहती बनली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर हे नातं पुढे सरकत लग्नापर्यंत पोहोचलं. 25 ऑगस्ट 1999 रोजी दोघांच्याही कुटुंबांच्या सहमतीने विजयने संगीताशी विवाह केला. लग्नानंतर संगीता विजयची कॉस्च्युम डिझायनर बनली आणि असं म्हटलं जातं की, आजही संगीताने निवडून दिलेले कपडेच विजय परिधान करतो.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून साउथ सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन आणि विजय यांच्यातील अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. विजयची पत्नी संगीता हिनेच आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचं सांगत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. संगीताने चेंगुलपट्टू फॅमिली कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत विजयचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या अर्जात कोणत्याही अभिनेत्रीचे नाव थेट लिहिलेले नसले, तरी सोशल मीडियावरील युजर्सनी आपला मोर्चा त्रिशा कृष्णनकडे वळवला आहे. विजय आणि त्रिशाने अनेक हिट सिनेमांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. आता याच केमिस्ट्रीचा धागा पकडून नेटीझन्स असा दावा करत आहेत की, विजयचे त्रिशासोबत अफेअर सुरू आहे आणि त्यामुळेच त्याचे घर मोडण्याच्या मार्गावर आहे.

घटस्फोटाच्या अर्जात संगीताने केवळ अफेअरचाच नाही, तर मानसिक छळाचाही उल्लेख केला आहे. 2021 पासून विजयचे वागणे पूर्णपणे बदलले असून तो तिच्याशी अत्यंत तुच्छतेने वागत असल्याचे तिने म्हटले आहे. विजयने तिला भावनिकदृष्ट्या एकटे पाडले असून एकाच घरात राहूनही तो तिच्याशी परक्यासारखा वागत असल्याचा दावा संगीताने केला आहे. विजयच्या या वागण्यामुळे तिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून अखेर तिने हा कठोर निर्णय घेतल्याचे समजते.

नसरापूरमधील नराधमाला फासावर चढवण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही.

लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार, विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत सरकार गंभीर

नसरापूरमधील ग्रामस्थानी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई :- भोर नसरापूर येथील चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षाच योग्य असून, त्याला लवकरात फासावर चढवण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. नसरापूर ग्रामपंचायत सदस्य आणि इतर ग्रामस्थानी आज आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार या घटनेला जबाबदार असलेला आरोपी भीमराव कांबळेला फासावर चढवण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना दिले.

यावेळी ग्रामस्थानी सदर आरोपीने यापूर्वीही दोन वेळा असेच गुन्हे केले असून यावेळी तिसऱ्यांदा त्याने असे केले असल्याचे सांगितले. त्यामुळे अशा नराधमाला आता सोडल्यास पुन्हा तो कुणाचा तरी घास घेईल अशी भीती गावात निर्माण झाली असल्याचे सांगितले. दोनदा शिक्षा होऊनही अल्पावधीत सुटका झाल्याने त्याची हिम्मत वाढल्याने त्याने पुन्हा असे कृत्य केले. त्यामुळे या आरोपीवर कायमची कारवाई करावी अशी विनंती त्यांनी शिंदे यांना केली.

याबाबत ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून त्यांच्याशी बोलल्यानंतर या घटनेबाबत माझी आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून तेही या घटनेबाबत अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. याबाबत आम्ही दोघांनीही पोलीस अधीक्षकांना न्यायवैद्यक पुरावे, इतर सर्व पुरावे अतिशय काटेकोरपणे गोळा करण्यास सांगितले आहे. तसेच लवकरात लवकर त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.
तसेच त्याच्यावर सर्व गंभीर कलमे दाखल करून तो कोणत्याही परिस्थितीत वयाचे अथवा मानसिक आजाराचे कारण काढून सुटणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच या घटनेसाठी पुण्यातील निष्णात वकिलांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाणार असून अशा प्रकारचे खटले हाताळण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे स्पष्ट केले. तसेच मी आणि मुख्यमंत्री मिळून आम्ही पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचेकडून दर दिवशी या घटनेची माहिती घेत असून कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नसल्याचं शिंदे यांनी या ग्रामस्थाना सांगितले. यासोबतच पीडितेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीना विनंती करून या घटनेची दैनंदिन सुनावणी घेण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याबाबतही सरकार प्रयत्नशील असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

या घटनेनंतर मी स्वतः पीडितेच्या वडिलांशी फोनवरून बोललो असून त्यांचे सांत्वन केले आहे. या घटनेतील नराधमाला फासावर चढवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. अशा प्रवृत्तींना ठेचून काढणे आणि समाजात योग्य तो संदेश पोहचवणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी असून ती आम्ही नक्की पूर्ण करू असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच याबाबत योग्य ती कारवाई करणार असून आरोपीला शासन केले जाईल असे सांगून त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.

‘यशस्वी’ संस्थेच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘यशोगाथा’ विशेषांकाचे  प्रकाशन संपन्न

पुणे : दिनांक  ०४ मे  २०२६ : एखादी संस्था मोठी होत असताना आधीच्या पिढीने ज्या विचाराने ती संस्था सुरू केली तो विचार नवीन पिढी तितक्याच ताकदीने, नव्या जोमाने पुढे नेत असेल तर अशा विचारांचा वारसा जपणाऱ्या संस्थांचे कार्य निश्चितच भव्य दिव्य होते,असे मत प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात देशपातळीवर काम करणाऱ्या यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.यशस्वी संस्थेने सुरू केलेल्या शिका आणि कमवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांमधील बेरोजगार युवक युवतींना रोजगारक्षम करण्याचं महत्त्वाचं काम होत आहे म्हणूनच अशा संस्थेचा ब्रँड अँबेसिडर म्हणजेच सदिच्छा दूत  होण्याची जबाबदारी मी स्वीकारली असेही प्रवीण तरडे यावेळी म्हणाले.

तर यावेळी  आपले मनोगत व्यक्त करताना  यशस्वी  संस्थेचे अध्यक्ष  विश्वेश कुलकर्णी  यांनी सांगितले  की, यशस्वी  संस्थेने सुरु केलेल्या  शिका आणि कमवा योजनेच्या माध्यमातून  सुरु केलेल्या  नव्या समांतर शिक्षण प्रणालीला जेव्हा सर्व स्तरातून विशेषतः  राष्ट्रीय  स्तरावरून मान्यता  मिळेल, तेव्हा ही  योजना देशव्यापी होऊन  देशातील  हजारो लाखो  युवक युवतींना  स्वावलंबी  शिक्षणाद्वारे  रोजगारक्षम  होण्याचा मार्ग  सुकर होईल.

याप्रसंगी यशोगाथा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक डॉ.अभिषेक कुलकर्णी, यशस्वी संस्थेच्या संचालिका  शोभा  कुलकर्णी,  एसकेएफ कंपनीचे  माजी कामगार संघटना प्रमुख  भास्करन, भारत  फोर्ज  कंपनीचे  माजी वरिष्ठ  मनुष्यबळ व्यवस्थापक  डॉ. संतोष  भावे, यशस्वी संस्थेचे वित्त  विभाग प्रमुख देविदास माळी, आयआयएमएसचे संचालक  डॉ. शिवाजी मुंढे, यशस्वी  संस्थेचे  मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, ऑपरेशन   विभाग प्रमुख  कृष्णा  सावंत, संचालक अजय रांजणे, संचालिका स्मिता  धुमाळ,  यांच्यासह यशस्वी संस्थेतील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे जिल्ह्यातील विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  यशस्वी संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे  प्रमुख  प्रशांत  कुलकर्णी  यांनी  केले. तर आभार प्रदर्शन  यशस्वी  संस्थेचे  मनुष्यबळ व्यवस्थापक  श्रीकांत  मिरजकर  यांनी केले.

आरेमधील 65 एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई, दि. 4 मे
आरे वसाहती मधील विविध प्राधिकरणाकडे असलेल्या 65 एकर जागेवर येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याचे नियोजन करा, तसेच आरे जंगलाची घनता वाढविण्यासाठीच्या उपाययोजनां बाबत ही कृती आराखडा तयार करा असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्या प्रमाणे
राज्य शासनाकडून ३०० कोटी वृक्षलागवड मोहिम हाती घेण्यात येणार आहे. मुंबईचे वाढते तापमान लक्षात घेता,
या योजनेत मुंबई उपनगराचा सहभाग वाढवण्यासाठी आज
आरे वसाहतीचा मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी पाहणी दौरा केला. या वसाहती मध्ये जी शासकीय प्राधिकरणे व कार्यालये आहेत, त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे कामकाज समजून घेतले, त्यांना जिल्हा नियोजनातून काही मदत करता येईल का?
तसेच त्यांच्याकडे असलेल्या जागांपैकी मोकळी जागा आहे का? असल्यास किती वृक्ष लागवड करता येईल? याबाबत प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन हा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी, मुंबई महापालिका, एमएमआरडीए अशा संबंधित अधिकाऱ्यांना नोंदी करायला सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेवर वृक्ष किती लागू शकतात, कोणते लावणे अपेक्षित आहे तसेच काही ठिकाणी मियावाकी जंगल वाढवता येईल का? आरे मधील जंगलाची घनता वाढविण्यासाठी काय करता येईल ? याचे संपूर्ण नियोजन व कृती आराखडा सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्यात गोरेगाव पशुवैद्यकीय रुग्णालय, महानंद डेरीचे मुख्यालय, आरे वसाहतीमधील
राज्य राखीव पोलीस बल,गट क्र 8 आणि फोर्स 1 कार्यालय,कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्यालयात,पशुसंवर्धन गुणनियंत्रण प्रयोगशाळा, केंद्रीय कुक्कुटपालन व विकास संघटन, माँडर्न बेकरी कँम्पससह परिसराची त्यांनी आज पाहणी केली. प्रथमदर्शनी पाहणीमध्ये या कार्यांकडे असलेल्या जागांपैकी सुमारे 65 एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध होईल असा अशी माहिती समोर आली आहे. अजूनही सविस्तर अभ्यास करुन जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.
तसेच मेट्रो भवनसाठी जी जागा प्रस्तावित करण्यात आली होती ती रिक्त असून त्या जागेवर वृक्षारोपण करता येईल का? तसेच आरे मेट्रो कारशेड मध्ये जी जागा रिक्त आहे त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे त्याची घनता वाढविण्यासाठी काय करावे याबाबत ही कृती आराखडा तयार. करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

आयुष्मान कार्ड अनिवार्य ; ई-केवायसी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी नोंदणीचे आवाहन

मुंबई दि.४ : ‘एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य’ योजनेचे कामकाज २४ फेब्रुवारी २०२६ पासून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या टीएमएस २.० या प्रगत संगणक प्रणालीवर आहे. ही प्रणाली रुग्णाच्या बायोमॅट्रीक उपस्थितीची नोंद घेणे, कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित गैरप्रकार रोखणारी यंत्रणा, तसेच संपूर्ण ऑनलाईन पारदर्शक आधुनिक संगणकीय प्रणाली आहे. तसेच ही प्रणाली लागू झाल्यापासून उपचारांच्या संख्येत १३५६ वरुन २३९९ पर्यंत वाढही झालेली आहे.

टीएमएस २.० प्रणालीद्वारे रुग्ण नोंदणी करताना लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण होऊन आयुष्मान कार्ड तयार झालेले असणे बंधनकारक आहे. यासाठी रूग्ण व्यक्तीचे आयुष्मान कार्ड अगोदरच तयार करुन घेतलेले असल्यास अंगीकृत रुग्णालयात रूग्ण दाखल झाल्यावर त्यांची रुग्ण नोंदणी होऊन उपचार सुरु होण्यात कोणतीही अडचण येत नाही. तथापि, आयुष्मान कार्ड  तयार नसल्यास, रुग्ण उपचारासाठी अंगीकृत रुग्णालयात आल्यास सर्व प्रथम त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी रुग्णाचे अद्ययावत रेशन कार्ड, आधार क्रमांक, रेशन कार्ड नसल्यास तहसिलदार यांचे कुटुंब प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असतात. रेशनकार्ड आणि आधारवरील मजकुरात तफावत असणे किंवा रेशनकार्ड आधार संलग्न केलेले नसणे अशा कारणांनीही ई केवायसी मंजुरी प्रक्रियेस थोडा विलंब लागू शकतो. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होवून कार्ड मंजूर झाल्यावर त्या आधारे टीएमएस २.० प्रणालीवर रुग्ण नोंदणी प्रक्रीया सुरु करता येते.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन आयुष्मान कार्ड मंजूर होण्यापर्यंतचा बहुमूल्य वेळ वाचविता यावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुष्मान कार्ड तयार केल्यानंतर टीएमएस २.० प्रणालीवर रुग्ण नोंदणी करण्यास कोणतीही अडचण येत नाही. आयुष्मान कार्ड तयार करण्याची कार्यपद्धती अत्यंत सोपी असून लाभार्थी आयुष्मान अॅपद्वारे किंवा  https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावरून स्वतःचे कार्ड स्वतः तयार करू शकतात किंवा कोणत्याही आशा सेविका, रेशन दुकानदार आणि आपले सरकार सेवा केंद्र येथूनही आपले कार्ड तयार करून घेऊ शकतात.

आयुष्मान कार्ड, ई-केवायसी न झालेले रुग्ण उपचारासाठी अंगीकृत रुग्णालयात आल्यास त्यांना देण्यात यावयाचे उपचार योजनेत समाविष्ट असल्याची खात्री करुन त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेऊन उपचाराची सुरुवात करण्याचे निर्देश आहेत. पुढील तीन दिवसापर्यंत ई-केवायसीसह रुग्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याची मुभा रूग्णालयांना  देण्यात आली आहे. या कालावधीत रुग्णास उपचार नाकारले जाऊ नयेत किंवा पैशांची मागणी करण्यात येऊ नये अशा सक्त सूचना सर्व अंगीकृत रुग्णालयांना देण्यात आलेल्या आहेत. अशा तक्रारी आल्यास संबंधित आरोग्यमित्र, योजनेचे जिल्हा समन्वयक आणि प्रादेशिक व्यवस्थापक यांनी रुग्णास तात्काळ मदत करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याबरोबरच निःशुल्क उपचार त्वरित सुरू करून घेण्यासाठी सहाय्य करावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक

रुग्णालयात नियुक्त आरोग्यमित्र आणि योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक व जिल्हा समन्वयक यांचे दूरध्वनी क्रमांक रुग्णालयातील योजनेच्या कक्षात प्रदर्शित करण्यात आले असून त्यांना संपर्क साधून मदत घेता येईल. तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या support@jeevandayee.gov.in या ईमेलवर किंवा टोल फ्री क्रमांक १५५३८८/१८००२३३२२००, १४५५५/१८००१११५६५ यावर संपर्क साधता येईल.”

टीएमएस २.० प्रणालीमुळे राज्यातील आरोग्य योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होत  आहे. असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

‘गंगामातेने मला बोलावलं होतं आणि आता सगळीकडे कमळच!’ पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

“गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ”
दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. मी बंगाल, तमिलनाडूच्या आणि केरळच्या जनतेचा आदरपूर्वक नमन करतो आणि धन्यवाद मानतो. आज भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. सगळ्या कार्यकर्त्यांनी कमाल केलीय, कमळ फुलवलंय. वर्षानुवर्षांची साधना विजयात बदलते तेव्हा होणारा हा आनंद आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या निकालांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

” भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं नवा इतिहास घडवला आहे. नितीन नवीन यांच्या नियुक्तीनंतरची ही पहिली निवडणूक होती. आज लोकतंत्रच नाहीतर भारताचं संविधान देखील जिंकलं आहे. नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. पोटनिवडणुकांमध्येही जनतेनं एनडीएला कौल दिला आहे. एनडीएच्या सहकारी सुनेत्रा पवारांना जनतेनं कौल दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये ९३ टक्के ऐतिहासिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे. लोकशाही हा आमच्या नसानसात घुमणारा आवाज आहे.आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. हा केवळ भाजपचा विजय नाही, तर भारताच्या लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय आहे,” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी बंगाल, तमिळनाडू आणि केरळमधील पक्षविस्तार आणि विजयानंतर मोदींनी जनतेचे आभार मानत कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे तोंडभरून कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, “आसाम,पुदुच्चेरी आणि केरळमध्येही मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आहे. भारताच्या लोकशाहीची प्रतिष्ठा जनतेनं कायम राखली. १४ नोव्हेंबरला मागच्या वर्षीच बिहारच्या निकालावेळी बंगालच्या विजयाचे संकेत दिले होते. मी तेव्हाच सांगितलं होतं की, गंगामातेनं मला बोलावलं आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगालमध्येही एनडीए सरकार स्थापन झालं आहे. गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ फुललं आहे. गंगामातेसोबतच ब्रह्मपुत्र आणि कामख्या देवीचेही आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. आसाममध्येही भाजपला अभूतपूर्व यश मिळालं आहे. पुदुच्चेरी जनतेसमोर ठेवलेल्या व्हिजनवर विश्वास ठेवला.”

व्यंगरेषांतून उमटणार विचाररेखा ; पुण्यात रंगणार आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन ; ४२ देशांतील २९१ व्यंगचित्रकारांचा सहभाग

पुणे, (ता.०४): जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२६’ यंदा ७, ८ आणि ९ मे रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात रंगणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणारा हा महोत्सव सर्वांसाठी विनाशुल्क खुला असून, व्यंगचित्रप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

यंदाच्या महोत्सवात जगभरातील ४२ देशांतील सुमारे १५० कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच भारतातील ६२ आणि महाराष्ट्रातील ७७ अशा एकूण २९१ व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन येथे पाहायला मिळणार आहे. विविध सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय विषयांवर आधारित व्यंगचित्रांची अनोखी मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे, पुणे महापालिका विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, नगरसेवक पुणे महापालिका , सदस्य स्थायी समिती संदीप बेलदरे,शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे,आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, सामाजिक कार्यकर्ते शेठ नानजीभाई ठक्कर ठाणावाला, उद्योजक आकाश गायकवाड आणि ॲड. दिलीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता बालगंधर्व कलादालन होणार आहे.तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात व्यंगचित्र प्रात्यक्षिके, कार्यशाळा, मुलाखती, सन्मान सोहळा आणि संवादपर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरण, जागतिक युद्ध, जागतिक राजकारण, शिक्षण, आरोग्य, दुष्काळ, अतिवृष्टी आणि समाजस्वास्थ्य यांसारख्या समकालीन विषयांवर जगभरातील नामवंत व्यंगचित्रकारांची प्रभावी कलाकृती रसिकांसमोर मांडल्या जाणार आहेत.
महोत्सवाचे आयोजक धनराज गरड, मुख्य समन्वयक किशोर शितोळे आणि कार्टुनिस्टस् कम्बाईनचे अध्यक्ष गौरव सर्जेराव यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कलोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.