पुणे- हवामान खात्याने अगोदरच या वर्षाच्या पर्जन्यमानाची शक्यात जाहीर केली होती तरी महापालिकेला जाग आली नाही, आणि आत्ता पाउस महिनाभर उशीर झाला तरी आलेला नाही म्हटल्यावर आता नियोजनाला लागलेत,अजूनही पावसाळापूर्व सफाईची कामे सुरूच आहेत.महापालिकेचे हे नियोजन म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्या सारखे आहे.अशा बेभरवशी,बेपर्वा नियोजनामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी पाळले आहे.अशी टीका महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम यांनी केली. महापालिकेच्या सभागृहात त्यांनी आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पाणीकपातीच्या नियोजनावर ताशेरे ओढणारे आंदोलन केल्यावर माय मराठी शी संवाद साधला.
ते म्हणाले, पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य हे धोरण सर्वत्र आहे. शेतीची आवर्तने,उद्योगांना होणारा पाणीपुरवठा,रोखली जाणारी गळती नियोजन याबाबत वर्षभराचा कसलाही आराखडा या महापालिकेने हवामान खात्याने इशारा दिल्यावरही केला नाही, बैल गेला आणि झोपा केला असा त्यांचा कारभार याचा फटका पुणेकरांना बसणार आहे. सत्ताधारी भाजपच्या नियोजनशून्य आणि जनविरोधी कारभारामुळे पुणेकरांवर आता पाणी कपातीचे गंभीर संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, उन्हाळा आणि पावसाळ्याच्या उंबरठ्यावर असताना नागरिकांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
याच निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिका सभागृहात हंडा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला तसेच पुणेकरांना तात्काळ नियमित, पुरेसा आणि अखंडित पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी तडजोड करणारा हा कारभार आता खपवून घेतला जाणार नाही. पुणेकरांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर आणि सभागृहात सातत्याने आवाज उठवत राहील.
पुणेकरांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात प्रशासन व सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शहराचा वाढता विस्तार, नव्याने समाविष्ट झालेली गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कोणतेही प्रभावी नियोजन करण्यात आले नाही. त्याचा परिणाम आज नागरिकांना पाणीटंचाईच्या स्वरूपात भोगावा लागत आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

