फुटलेल्या खासदारांना आतापर्यंत 25 कोटी, राजस्थानला शिफ्ट केल्याचाही आरोप
15 कोटी ॲडव्हान्स आणि काल पुन्हा 10 कोटी…हिंमत असेल तर राजीनामे देऊन पुन्हा निवडून या!
भाजप नेते गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. होय, आम्ही गद्दारांना शिव्या घातल्या, कारण त्यांनी गद्दारी केली आहे. पण तुम्हाला त्यांच्याविषयी एवढे प्रेम का ऊतू चालले आहे? असा सवाल करत राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर पलटवार केला. तसेच पक्ष सोडून गेलेल्या 6 खासदारांवर कोट्यवधी रुपयांच्या देवाणघेवाणीचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप त्यांनी केला.संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर पैशांचा पाऊस पाडण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “पक्ष सोडून गेलेल्या त्या 6 खासदारांना आधी 15 कोटी रुपये ॲडव्हान्स दिले होते. काल पुन्हा त्यांना प्रत्येकी 10 कोटी रुपये देण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत एका एका खासदाराला २५ कोटी रुपये मिळाले आहेत. काल रात्रीच त्यांना दिल्लीच्या ‘लीला’ हॉटेलमधून थेट राजस्थानला शिफ्ट करण्यात आले आहे, असेही राऊतांनी सांगितले.
ऑपरेशन टायगरवर बोलताना राऊत यांनी थेट चेतावणी दिली. “शिवसेना जर ऑपरेशन टायगर करत असेल, तर आम्ही आता त्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करत आहोत. ‘तुडवा’ हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आम्हाला आदेश होता. गद्दारांना आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांना कसे तुडवायचे हे शिवसैनिकांना चांगले ठाऊक आहे. माझ्याकडे फक्त अर्धा तास द्या…” असे म्हणत संजय राऊत यांनी महायुतीला थेट आव्हान दिले आहे.
दानवेंच्या अंतर्गत वादाच्या विधानाचा समाचार घेताना राऊत कडाडले, हे सर्वजण मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर निवडून आले आहेत. यांच्यात हिंमत असेल तर आधी खासदारकीचे राजीनामे द्यावेत आणि पुन्हा जनतेतून निवडून येऊन दाखवावे, मग आम्ही मानू की तुम्ही गद्दार नाही. गद्दारांना पोलिसांची फौज कशासाठी दिली आहे? आम्हाला खाकी वर्दीची मस्ती दाखवू नका.

