उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, संजय राऊतांवरही पलटवार
मुंबई- राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला मजबूत सरकार मिळाले असून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच संजय राऊत यांनी खासदारांना 15 कोटींचा ॲडव्हान्स दिल्याचा केलेला दावा अत्यंत चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचे त्यांनी म्हटले.
बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर थेट निशाणा साधताना म्हटले की,”उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा. त्यांचे आमदार आणि खासदार त्यांना सोडून का चालले आहेत? आपले लोक कुठे जात आहेत आणि का जात आहेत, याचे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपल्याच लोकांना सांभाळता येत नसल्याने विरोधक भाजपवर नाहक आरोप करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

