महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (यूबीटी) नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंड केले आहे. सूत्रांनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी ९:३० वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीनीकरणाची विनंती केली आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत राजकीय वर्तुळात अद्यापही संभ्रम कायम आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी साथ सोडल्याची आणि त्यांनी सह्यांचे पत्र दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या बंडखोरीमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाल्याच्या बातम्याही झळकल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात या सहा खासदारांचा कोणताही एकत्र फोटो किंवा त्यांनी स्वाक्षरी केलेले पत्र अद्याप समोर आलेले नाही, ज्यामुळे या दाव्यांबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
याच मुद्द्यावर बोट ठेवत, सहापैकी दोन खासदारांनी पत्रावर सह्या केल्याच नसून ते अद्यापही आपल्यासोबत असल्याचा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सहा खासदारांच्या सह्याच नसल्याचा दावा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला आहे. दरम्यान, या राजकीय घडामोडींवर आणि संबंधित खासदारांबाबत सध्या कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया देऊ नये, असे सक्त आदेश ठाकरे गटाने आपल्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
सूत्रांनुसार, पत्र पाठवणाऱ्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. संजय दिना पाटील यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावत म्हटले आहे की, “मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा खासदार आहे आणि पक्षातच राहीन.” दरम्यान, शिवसेनेचे (यूबीटी) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बंडखोर खासदारांना शिवीगाळ केली. राऊत शिवीगाळ करताना म्हणाले, “हे बेईमान लोक आहेत. बेईमानी त्यांच्या रक्तात आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना भावासारखे वागवले आणि हे XX#U लोक, मी बोललेलं कट करू नका,” असेही म्हणाले. ते नंतर माध्यमांना म्हणाले. “असे शब्द मराठीत सर्रास बोलले जातात.”
गेल्या चार वर्षांतील शिवसेनेतील ही दुसरी फूट आहे. यापूर्वी, जून २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदार शिवसेनेतून बाहेर पडले होते. या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे गटाला पक्षाचे मूळ शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्षांनी या गटाला प्राथमिक मान्यता दिल्यानंतर उद्धवसेना नेतृत्वात खळबळ उडाली आहे. या घडामोडींची माहिती मिळताच खासदार संजय राऊत यांनी तातडीने संसद भवनात धाव घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची 20 मिनिटे भेट घेतली आहे. या बैठकीत त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत व अनिल देसाईही सोबत होते.
ठाकरे गटाने यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना पत्र देत कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र मान्यता देण्यापूर्वी पक्षाची बाजू ऐकून घेण्याची मागणी केली होती. संसदीय पक्षनेते अरविंद सावंत यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या पत्रात, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच संसदेतील अधिकृत पक्ष मानला जावा आणि कोणत्याही फुटीर गटाला विशेष दर्जा किंवा मान्यता देऊ नये,” अशी विनंती करण्यात आली होती. आता सहा खासदारांच्या गटाला मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत स्वतः लोकसभा अध्यक्षांकडे उद्धवसेनेची भूमिका मांडणार असल्याचे समजते.
कोणते खासदार शिंदे गटात गेले?
- संजय जाधव
- संजय देशमुख
- नागेश पाटील आष्टीकर
- ओमराजे निंबाळकर
- भाऊसाहेब वाकचौरे
- संजय दिना पाटील

