पुणे, 16 जून 2026
केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री माननीय अश्विनी वैष्णव हे उद्या (बुधवार दिनांक 17 जून 2026) दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वे स्थानक येथून ‘पुणे – साईनगर शिर्डी दैनंदिन एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.
पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान थेट रेल्वेची मागणी प्रवाशांकडून दीर्घकाळापासून करण्यात येत होती. त्यामुळे भक्त आणि पर्यटकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होईल.
“पूर्वेकडील ऑक्सफर्ड” म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल केंद्र आहे. नामांकित संस्था, संशोधन केंद्रे आणि हिंजवडी आयटी पार्क व चाकण ऑटो क्लस्टरसारख्या औद्योगिक क्षेत्रांमुळे पुणे हे देशभरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेससारखी ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, तसेच लोणावळा आणि महाबळेश्वर यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणांची जवळची उपलब्धता यामुळे या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तर, अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यात वसलेले शिर्डी हे श्रीसाईबाबांचे मूळस्थान असल्याने भारतातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. देशभरातून वर्षभर या पवित्र स्थळाला भेट देणाऱ्या लाखो भक्तांसाठी साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक महत्त्वाची सेवा पुरवते. पुण्यापासून मिळणाऱ्या या नवीन थेट रेल्वे सुविधेमुळे भाविकांना मोठी सोय होईल आणि या भागातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचे फायदे –
• ही पुणे ते शिर्डी दरम्यानची पहिली थेट रेल्वे सेवा असेल.
• साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी – विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि गट-पर्यटनासाठी – हा एक सुरक्षित, परवडणारा आणि आरामदायी पर्याय ठरेल; तसेच यामुळे वृद्ध भक्तांचा प्रवासाचा त्रास कमी होईल.
• या सेवेमुळे अहिल्यानगर आणि शिर्डी येथील रहिवाशांना पुण्यातील शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. त्याचबरोबर, हॉटेल, टॅक्सी आणि विक्रेत्यांकडे येणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे
शिर्डी परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
• मार्गावरील प्रमुख थांबे खालीलप्रमाणे
दौंड कॉर्ड केबिन -पुणे -दौंड मार्ग आणि उत्तरेकडे जाणाऱ्या दौंड – मनमाड मार्ग यांच्या दरम्यान स्थानिक प्रवाशांसाठी अखंड आणि जलद वाहतूक सुनिश्चित करते.
श्रीगोंदा – स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना परवडणारी व जलद दळणवळण सुविधा उपलब्ध करून देते.
अहिल्यानगर – हे एक मोठे प्रशासकीय, लष्करी आणि व्यावसायिक केंद्र असून, येथे दररोज हजारो प्रवासी, नोकरदार वर्ग आणि लष्करी कर्मचारी ये-जा करतात.
राहुरी – हे एक नामांकित शैक्षणिक आणि कृषी केंद्र असून, येथे राज्यातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ, ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ’ स्थित आहे. येथील थांब्यामुळे विद्यापीठात ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि शास्त्रज्ञांना मोठा फायदा होईल. तसेच, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रवासाचीही सोय होईल.
बेलापूर – येथे या भागातील काही अग्रगण्य साखर कारखाने आहेत आणि हे प्रसिद्ध ‘शनि शिंगणापूर’ मंदिराकडे जाण्यासाठीचे एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. या सेवांच्या सुरू होण्यामुळे या भागातील दळणवळण सुधारण्यास, पर्यटन व व्यापारास चालना मिळण्यास आणि प्रवाशांची सोय होण्यास मदत होईल.

