जांभुळवाडी तलाव हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश
पुणे : पुणे शहरातील तलावांचे संवर्धन, पर्यावरणीय संरक्षण आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जांभूळवाडी, पाषाण आणि कात्रज या तलावांसाठी “लेक सिटी” प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा तातडीने तयार करावा, तसेच जांभुळवाडी तलावाचे जलसंधारण विभागाकडून पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज प्रशासनाला दिले.
पुणे शहरातील पाषाण, कात्रज आणि जांभुळवाडी या महत्त्वाच्या तलावांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेताना अनेक गंभीर बाबी समोर आल्या. तलावांमध्ये वाढते प्रदूषण, सांडपाण्याचा विसर्ग, जलपर्णीचा प्रादुर्भाव, मृत मासे आढळण्याच्या घटना तसेच अपुऱ्या देखभालीमुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
“लेक सिटी” प्रकल्पासाठी मास्टर प्लॅनची मागणी
पुणे शहरासाठी प्रस्तावित “लेक सिटी” प्रकल्पाचा अधिकृत मास्टर प्लॅन तयार करण्यात यावा. शहरातील प्रत्येक तलावासाठी स्वतंत्र कृती आराखडा (Action Plan) तयार करून त्यामध्ये जलसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण, जैवविविधता संरक्षण, पर्यटन विकास आणि नागरिक सुविधांचा समावेश करावा, असे निर्देश देण्यात आले.
तसेच प्रकल्पासाठी आवश्यक निधी, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलच्या अटी, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) अहवाल आणि जैवविविधता संवर्धनासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद याबाबतचा सविस्तर अहवाल स्थायी समितीसमोर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
जांभुळवाडी तलाव हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करा
जांभुळवाडी तलावाचे व्यवस्थापन जलसंधारण विभागाकडून पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय आणि शासनस्तरीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
या संदर्भात स्थायी समिती अध्यक्षांनी यापूर्वी दिलेल्या पत्रावर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्यास त्याची सद्यस्थिती आणि अपेक्षित कालमर्यादा स्पष्ट करावी. जांभुळवाडी तलावाच्या संवर्धनासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.
कात्रज आणि पाषाण तलावांबाबत गंभीर चिंता
कात्रज तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याच्या घटनांबाबत जलनमुने आणि प्रयोगशाळा अहवाल तातडीने सादर करावेत. तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण, विद्यमान एसटीपीची क्षमता आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई याची माहितीही मागविण्यात आली.
पाषाण तलावातील जलपर्णी, सांडपाणी आणि कचऱ्यामुळे वाढणाऱ्या प्रदूषणाबाबत प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी. जलपर्णी हटविण्याची वारंवारता, गाळ काढण्याची कामे, सांडपाणी रोखण्यासाठी खर्च झालेला निधी आणि मासे मृत्यू प्रकरणी पर्यावरण विभागाचा अंतिम अहवाल स्थायी समितीसमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

