Home Blog Page 83

नामांकीत व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे अपहरण,पोलिसांनी सिनेस्टाईल युवकाला वाचवलं


पुणे- येथील एका नामांकीत व्यापाऱ्याच्या मुलाचं काही आरोपींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणाला गाडीत घेऊन निघाले होते. पण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. नाकाबंदी लावली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी जंग जंग पछाडलं. अखेर पोलिसांना या कारवाईत मोठं यश आलं आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तरुणाची सुखरुप सुटका केली. अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करणं हे पोलिसांसाठी सोपं नव्हतं. पण पोलिसांनी अतिशय संयमी पद्धतीने परिस्थिती हाताळत आरोपींना सळो की पळो करुन सोडलं. त्यामुळे तरुणाला गाडीत सोडून आरोपींना पलायन करावं लागलं. पोलिसांनी पीडित तरुणाला सुखरुप शोधून काढलं आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात मंगळवारी (3 मार्च) दुपारी घडलेल्या अपहरणाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. स्थानिक नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. मात्र, मात्र जेजुरी पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांतच युवकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी कापूरहोळ येथून एका कारमधून संबंधित युवकाला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. युवकाच्या वडिलांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मदतीसाठी संपर्क साधला.
माहिती मिळताच जेजुरी पोलीस आणि निरा पोलिसांनी जेऊर आणि नीरा परिसरात तात्काळ नाकाबंदी केली. संशयित वाहनाचा शोध सुरू असतानाच जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता, रस्ता अरुंद असल्याने ती कार ऊसाच्या शेतात जाऊन अडकली.

या गोंधळाचा फायदा घेत अपहरणकर्ते घटनास्थळावरून पसार झाले. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारमधील युवकाची सुरक्षित सुटका केली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि तात्काळ नाकाबंदी केल्यामुळे मुलाची सुरक्षित सुटका शक्य झाली. आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस करत आहे.

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी 5,083 कोटी रुपयांचे करार 

नवी दिल्ली, 3 मार्च 2026

संरक्षण मंत्रालयाने 03 मार्च 2026 रोजी भारतीय तटरक्षक दलासाठी सहा प्रगत हलक्या वजनाची हेलिकॉप्टर (एएलएच) एमके III  (सागरी उपयोग) आणि भारतीय नौदलासाठी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या व्हर्टिकल लाँच – Shtil श्तिल क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी एकूण 5,083 कोटी रुपयांचे करार केले. नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे संरक्षण सचिव  राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले.

एएलएच एमके III (एमआर )

ऑपरेशनल रोल इक्विपमेंट, अभियांत्रिकी साहाय्य पॅकेज आणि कामगिरी आधारित लॉजिस्टिक्स साहाय्यासह, हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरसाठी  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, बेंगळुरू सोबत खरेदी  (इंडियन–इंडिजिनसली डिझाइन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड-स्वदेशी आरेखित, विकसित आणि निर्मित) श्रेणीअंतर्गत 2,901 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. ही दुहेरी इंजिन असलेली हेलिकॉप्टर सध्या वापरात असलेल्या हवाई प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. ती किनाऱ्यावरील हवाई तळांवरून तसेच समुद्रातील जहाजांवरून विविध प्रकारच्या सागरी सुरक्षा मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहेत.  या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय तटरक्षक दलाची कृत्रिम बेटे, अपतटीय प्रतिष्ठापने यांचे  संरक्षण, तसेच मच्छीमार आणि सागरी पर्यावरणाच्या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.

या प्रकल्पांतर्गत 200 हून अधिक सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांकडून उपकरणांचा पुरवठा संकल्पित असून, सुमारे 65  लाख मानव तास रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.  हा करार ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांप्रती सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देतो, तसेच देशाच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेला आणखी बळकटी प्रदान करतो.

व्हर्टिकल लाँच – श्तिल क्षेपणास्त्रे 

रशियाच्या  जेएससी रोसोबोरोन एक्सपोर्टसोबत  2,182 कोटी रुपयांच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या व्हर्टिकल लाँच  -श्तिल क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी करार करण्यात आला आहे.  आघाडीच्या युद्धनौकांची विविध प्रकारच्या हवाई धोक्यांविरुद्धची हवाई संरक्षण क्षमता लक्षणीयरीत्या वाढवणे, हा याखरेदीमागचा हेतू आहे. ही प्रणाली भारतीय नौदलाच्या विविध प्लॅटफॉर्मवरील स्तरित हवाई संरक्षण संरचनेला अधिक बळकटी देईल. ती जलद प्रतिसाद क्षमता, सर्व हवामानात कार्य करण्याची क्षमता पुरवेल, तसेच आव्हानात्मक सागरी वातावरणात टिकून राहण्याची क्षमताही उंचावेल. हा करार भारत आणि रशिया  यांच्यातील परस्पर विश्वास आणि धोरणात्मक समन्वयावर आधारित दीर्घकालीन व काळाच्या कसोटीवर उतरलेल्या संरक्षण भागीदारीला अधोरेखित करतो.

भारतीय नौदलासाठी 04 X 500 T (टन) क्षमतेच्या स्वयंचलित इंधन वाहतूक नौकांच्या बांधणीचा करार, मेसर्स शॉफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे (एम एस एम ई शिपयार्ड) यांच्यासोबत 02 मार्च 2026 रोजी करण्यात आला आहे.

या नौका, भारत सरकारच्या “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” उपक्रमांचे अभिमानास्पद प्रतिनिधित्व करणाऱ्या असून, त्यांची बांधणी ‘इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग’ या भारतीय जहाज नोंदणी संस्थेच्या (आय आर एस) वर्गीकरण नियमांनुसार केली जाईल.

बंदर आणि नांगरलेल्या ठिकाणी असलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांना इंधन पुरवठा करणे, हे या जहाजांचे मुख्य काम असेल. या करारामुळे भारतीय नौदलाने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील शिपयार्ड्सच्या अर्थात जहाजबांधणी कारखान्यांच्या विकासाला प्रोत्साहन देण्याचे आपले धोरण सुरू ठेवले आहे. यामुळे ‘मॅरिटाइम इंडिया व्हिजन 2030’ ला अनुसरून देशांतर्गत जहाजबांधणी व्यवस्थेत मोलाचे योगदान मिळणार आहे.

संकुचित राजकारणासाठी सावरकरांचा माफीवीर म्हणून उल्लेख:अविनाश धर्माधिकारी 

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या सहकार्याने ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धा

कमलेश रामचंद्र मराठे ठरले महाविजेते
पुणे : स्वतःच्या संकुचित स्वार्थाच्या राजकारणा पोटी ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कष्टांचे आणि त्यागाचे काही घेणेदेणे नाही, तेच लोक खुनशीपणाने सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” म्हणून करतात. जे त्यांना माफीवीर म्हणतात, त्यांना सावरकरांच्या त्यागाचा सन्मान करावासा वाटत नाही. माफीची तथाकथित पत्रे ही एक स्ट्रॅटेजी आहे. जर सावरकरांचा विरोध करायचा असेल, तर तो शालीनतेने करावा; त्यांच्या त्यागाचा सन्मान करावा, असे मत माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या सहकार्याने ‘मी सावरकर’ या अभिनव वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा फर्ग्युसन महाविद्यालय च्या अँफिथिएटरमध्ये संपन्न झाला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, संयोजन समिती अध्यक्ष धनंजय बर्वे, सी.ए. रणजीत नातू, प्रवीण गोखले, अमेय कुंटे, शैलेश काळकर, रवींद्र ढवळीकर, वर्षा ओक उपस्थित होते.

नाट्यवाचन स्पर्धेत दीपक दत्ता, प्रिया राजपूरकर-करे; वक्तृत्व स्पर्धेच्या वरिष्ठ गटात मेधा लोवलेकर; व्यावसायिक गटात संतोष कानडे; दुसरा आणि तिसरा गटात अनुक्रमे प्राजक्ता शेलवले, मोनिका; युवा गटात वैष्णवी परकाळे; ज्येष्ठ गटात कमलेश रामचंद्र मराठे; पहिला गटात आरुष घेरडे; संगीतमय गटात ऋचा महामुनी हे विजेते ठरले. कमलेश मराठे यांनी महाविजेतेपद पटकावले.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा स्पर्श ज्यांना होतो, त्यांचे जीवन उजळून निघायला सुरुवात होते. त्यांना माफीवीर म्हणणे म्हणजे निखालस खुनशीपणा आहे. यात जराही तथ्य नाही. भारताची थोरवी कशी वाढवायची हे आपल्या सगळ्यांसमोरचे महत्त्वाचे काम आहे. आपले कर्तृत्व भारतमातेसाठी अर्पण कसे करायचे हे ज्याला कळले, त्याला भारतमाता आणि सावरकर कळले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंजुषा नागपुरे म्हणाल्या, ‘मी सावरकर’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जागरण सोहळा आहे. सावरकर हे एक नाव नसून विचार आहे. ते केवळ कवी किंवा वक्ते नाहीत, तर क्रांतिकारक आणि शब्दाला कृतीची जोड देणारे महापुरुष आहेत. सावरकरांनी सांगितलेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन अंगीकारणे हीच त्यांना श्रद्धांजली आहे. आपल्या कृतीत सावरकरांची राष्ट्रनिष्ठा कायम राहू द्या, असेही त्यांनी सांगितले.

अशोक पलांडे म्हणाले, ‘मी सावरकर’ ही स्पर्धा नसून सावरकरांचे विचार पोहोचविण्याचे माध्यम आहे. समाजात वेगवेगळ्या विचारधारा निर्माण होत आहेत. सावरकरांचे विचार आत्मसात करावेत, हीच त्यांना श्रद्धांजली आहे. राष्ट्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रवीण गोखले यांनी सूत्रसंचालन केले. रणजीत नातू यांनी प्रास्ताविक केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विरोधक आजही का घाबरतात? : शरद पोंक्षे

पुणे : साहित्यिक, नाटककार, समाजसुधारक, क्रांतिकारक, तत्त्वचिंतक अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विविध रूपे आहेत. सावरकर यांना जाऊन ६० वर्षे होऊन गेली तरी आजही विरोधक त्यांना का घाबरतात असा थेट सवाल सावरकर यांचे अभ्यासक, व्याख्याते आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला. सावरकर यांनी शब्द कधी फिरवला नाही, हिंदुत्व कधी सोडले नाही. असा महामानव ६० वर्षांपूर्वी जगातून निघून गेला; पण त्यांचे विचार आजही सर्वांना मार्गदर्शन करत आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, हिंदुस्थान या संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून जय मातृभूमी युवा मंच यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताह समाप्तीनिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘युवकांचे स्फूर्तीदाते : स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर आज (दि. १) चिंचवड येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जय मातृभूमी युवा मंचचे अध्यक्ष अनंत कोऱ्हाळे, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे सचिव कृष्णा वैद्य उपस्थित होते. शितल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले. सागर बर्वे यांनी आभार मानले.

धर्मासाठी कसे जगायचे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, धर्मासाठी कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले. महापुरुषांच्या गोष्टी जेथे सांगितल्या जातात तेथे सावरकर जन्माला येतात, असे सांगून शरद पोंक्षे म्हणाले, सावरकर गेल्यानंतर त्यांचा पक्ष, कार्यकर्ते कोणीही मागे राहिले नाही. त्यामुळे सावरकर यांच्याविषयी कोणी काहीही बोलतो. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारसरणी ज्या पायावर उभी आहे तीच देशाला घातक आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

सावरकर यांचे कार्य सांगताना पोंक्षे म्हणाले, सामान्य घरातील लोकांना झगडत मोठे व्हावे लागते. २३ ते ५४ हे वय समाजात रुजण्याचे असते. पण नेमके त्याच वयात सावरकर लोकांपर्यंत पोहचू शकले नाहीत. याकाळात ते शिक्षा भोगत होते. त्यावेळी काँग्रेस देशात फोफावली होती. ज्यांना राजकारणात उतरायचे त्यांना काँग्रेस शिवाय पर्याय नव्हता. काँग्रेसची विचारसरणी मान्य नसतानाही अनेकांना त्या पक्षात राहावे लागत होते. सावरकर वयाच्या ५४ व्या वर्षी बंधमुक्त झाले तेव्हा सर्व समाज त्यांच्याकडे आशेने बघत होता.

ते पुढे म्हणाले, ब्रिटिशांनी ज्या सुधारणा केल्या त्या समाजासाठी नाही तर स्वत:च्या सुखासाठी केल्या. असंतोषातून भारतीयांनी संघटना, पक्ष स्थापन करू नये म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्याच माणसाला पेरून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. इतिहासाचा अभ्यास केला तर हे उघड सत्य लक्षात येते. कारण ब्रिटिशांविरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी असंतोषाची ठिणगी चेतविली. त्यातून जन्म झाला बाळ गंगाधर टिळक नामक वणव्याचा. चापेकर बंधूंनी रँडला मारले; त्यानंतर क्रांतिकारकांची संख्या वाढू लागली त्यातून असंतोष वाढू लागल्यानंतर ब्रिटिशांनीच काँग्रेसची स्थापना केली.

स्वातंत्र्य याविषयी बोलताना पोंक्षे म्हणाले, हिंदू आणि मुस्लिम कधीही एकत्र येऊ शकत नाही, हे ओळखून इंग्रजांनी राजकारण केले. त्याच विचारसरणीवर स्थापन झालेल्या काँग्रेसचा विस्तार वाढत होता पण वयाच्या ५४ व्या वर्षी बंधमुक्त झाल्यावर सावरकरांनी हिंदू महासभेचे नेतृत्व केले. काँग्रेस तळागाळात रुजलेला असताना त्या प्रवाहाच्या विरोधात ते उभे राहिले. काँग्रेसच्या विरोधात प्रखरपणे उभे राहिलेले ते प्रथम व्यक्ती होते. भविष्यातले सगळे धोके पत्करून काँग्रेसची विचारधारा ते जिवाच्या आकांताने सांगत होते. पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर पुढे अनेक वर्षे काँग्रेसने आपल्यावर राज्य केले.

वयाच्या ८३ व्या वर्षी शरीराने, मनाने थकल्यावर आता माझा देशाला उपयोग नाही हे ओळखून सावरकर यांनी आत्मार्पण करण्याचे ठरवले. उपोषण करून त्यांनी देहत्याग केला. राष्ट्राला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आधीच त्यांच्या साहित्यात लिहून ठेवली होती. त्यांच्या गुरुजींनी त्यांना त्यांच्या नावाचा अर्थ सांगितला होता, ज्या करांनी राष्ट्राला सावरायचे ते म्हणजे सावरकर. या अर्थाला त्यांनी आजन्म जपले. शब्द कधी फिरवला नाही, हिंदुत्व कधी सोडले नाही. असा महामानव ६० वर्षांपूर्वी जगातून निघून गेला; पण त्यांचे विचार आजही सर्वांना मार्गदर्शन करत आहेत.

विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

व्यावहारिक मार्ग अंतिम, लवकरच कामाला सुरुवात-सोळा प्रकल्पांचा घेतला आढावा

पुणे  –
‘लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात होते. सहा विविध मार्गांवर चर्चा होऊन त्यातील व्यावहारिक मार्ग अंतिम करण्यात आला आहे. त्यामुळे आता विमानतळ थेट मेट्रो मार्गाने जोडला जाईल, अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

तसेच खडकवासला ते हिंजवडी या मेट्रो मार्गासाठी विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. 

शहर आणि परिसरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांसंदर्भात मोहोळ यांनी सोमवारी प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. विकासप्रकल्प कालबद्ध वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण करावेत, अशा सूचनाही केल्या. या बैठकीत पुणे शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या  १६ विकासप्रकल्प आणि कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याबाबत मोहोळ यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे.‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरील २३ पैकी १३ स्टेशनचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या येरवडा कारागृह ते विमानतळ आणि कल्याणीनगर ते विमानतळ या रस्त्यांच्या विस्तारीकरण व सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात होईल. त्यासाठी आवश्यकतेनुसार भूसंपादनही सुरू केले जाईल. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरणासाठी विमानतळाभोवती पर्यायी रस्ता तयार करण्यासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे मोहोळ यांनी नमूद  केले.

राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पच्या कामाचाही आढावा घेत काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना मोहोळ यांनी दिल्या. तसेच समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतिम टप्यात उर्वरित साठवणूक टाक्यांचे व जलवाहिन्यांचे तसेच मीटर बसवण्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

गेल्या काही दिवसांत शहरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात तसेच शहरातील पदपथ अतिक्रमण मुक्त केले जावेत, याबाबतही मोहोळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. 

मोहोळ हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आणि वसतिगृह इमारतीच्या सद्यस्थितीचा आढावा घेत हे कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मोहोळ यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीला महापौर मंजूषा नागपुरे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर, लोहगाव विमानतळाचे संचालक  संतोष ढोके, हवाई दलाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

स्मारकांच्या कामांचाही आढावा  

एनडीए (चांदणी) चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्मारक, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, कोथरूड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलामंदिर, गदिमा स्मारक, लहुजी वस्ताद साळवे स्मारक आदी कामांचा आढावा घेत ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही मोहोळ यांनी प्रशासनाला दिल्या.


“​पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या खंबीर पाठिंब्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुण्याच्या सर्वांगीण विकासासााठी विविध पातळ्यांवर विकासकामे व प्रकल्प वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पांना गती देत ते लवकर पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे.”

​- मुरलीधर मोहोळ
खासदार, केंद्रीय राज्यमंत्री

भाजपनं पहिल्या यादीत 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली,राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक,महाराष्ट्रातून कोणाला संधी?

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. 10 राज्यांमधील 37 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारी दाखल करण्यास 5 मार्चपर्यंत मुदत आहे. भाजपनं त्यापूर्वी 9 राज्यांमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांचं नाव बिहार मधून जाहीर करण्यात आलं आहे.

भाजपनं कोणाला उमेदवारी दिली?
बिहार : नितीन नवीन, शिवेश कुमार
आसाम : तेराश गोवाला, जोगेन मोहन
छत्तीसगड :लक्ष्मी वर्मा
हरियाणा : संजय भाटिया
ओडिशा : मनमोहन सामल, सुजीत कुमार
पश्चिम बंगाल : राहुल सिन्हा

भाजपनं पहिल्या यादीत 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहगे. यात बिहार, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यातील उमेदवारांची नावं आहेत. बिहारमधून राज्यसभेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून 6 राज्यातील राज्यसभेच्या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. बिहार, आसाम, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा, पश्चिम बंगालमधील एकूण 9 जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून 6, बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, आसामधून 3, तेलंगाणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेवर कोणाला पाठवलं जाणार यासंदर्भात विविध नावं चर्चेत आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, धैर्यशील पाटील, भागवत कराड हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे, डॉ. संगीता फुसाटे यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते.

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मागील आठवड्यात नवी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र भाजपकडून उमेदवारी कोणाला देण्यात यावी यासंदर्भातील नावं सुचवण्यात आली होती. महाराष्ट्रातून एकूण 7 जागा निवडून दिल्या जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप 3 जागा सहजपणे जिंकू शकतं. तर, चौथ्या जागेसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांची मदत लागेल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक जागा निवडून येऊ शकते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका जागी उमेदवार दिला जाईल. महाविकास आघाडीचा केवळ एक उमेदवार विजयी होईल. महाराष्ट्र विधानसभा संख्याबळानुसार राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी 37 मतं आवश्यक आहेत.

इराणवर हल्ला करण्यास आमची मदत मिळणार नाही:स्पेनने USची 15 विमानं पिटाळून लावली

माद्रिद:स्पेन आपल्या सैन्य तळांचा वापर इराणवर हल्ले करण्यासाठी होऊ देणार नाही. आम्ही अमेरिकेला परवानगी देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्पेनचे परराष्ट्र मंत्री जोसे मॅन्युएल अल्बारेस यांनी घेतली आहे. आम्ही अमेरिकेसोबत सैन्य तळ उभारले आहेत. दोन देश मिळून सैन्य तळ चालवतात. पण सैन्य तळ स्पेनच्या सार्वभौमत्वाखाली येतात. स्पेननं याआधीच इराणवरील हल्ल्यांचा निषेध केलेला आहे, याची आठवण करुन देत अल्बारेस यांनी करुन दिली. स्पेननं अमेरिकेला सैन्य तळ वापरु न देण्याची भूमिका घेत ताठ कणा दाखवल्याची चर्चा जगभरात सुरु आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध भडकलेलं आहे. त्याची झळ मध्य पूर्वेतील सगळ्या देशांना सहन करावी लागत आहे. इराणनं आखाती देशांमधील अमेरिकेच्या अनेक सैनिकी तळांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे आखाती देश सावध झाले आहेत. एकीकडे इराणनं अमेरिकेच्या तळांवर हल्ल्यांचा धडाका सुरुच ठेवलेला असताना स्पेननं डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला दणका दिला आहे.

आमच्या सैन्य तळांचा वापर इराणवर हल्ला करण्यासाठी करु देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्पेननं घेतली आहे. स्पेनच्या मोरॉन आणि रोटामध्ये अमेरिकेसोबत स्पेनचे संयुक्त सैन्य तळ आहेत. स्पेननं कठोर भूमिका घेत थेट अमेरिकेला इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेला १५ लढाऊ विमानं स्पेनच्या तळांवरुन जर्मनी आणि फ्रान्सला न्यावी लागली. त्यामुळे ऐन युद्धात अमेरिकेला नामुष्की सहन करावी लागली.स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. युरोपमध्ये येणाऱ्या स्पेननं अमेरिका आणि इस्रायल यांच्या कारवाईचा निषेध करत वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्पेनचे अमेरिकेसोबतचे संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – ना. चंद्रकांतदादा पाटील.

रोलबॉल स्टेडियम आच्छादित करण्याच्या कामाचे भूमिपूजन व खेळाडूंचा सत्कार संपन्न.

पुणे- पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले, आईस स्केटिंग संस्थेचे अध्यक्ष व इंडियन ऑलम्पिक असोसिएशन चे सदस्य अमिताभ शर्मा यांनी केलेल्या मागणीवर ते बोलत होते. तुम्ही फक्त जागा द्या उभारणीचा खर्च आम्ही करू असेही श्री. शर्मा म्हणाले तोच धागा पकडून चंद्रकांतदादांनी हे वचन दिले. रोलबॉल ह्या खेळाने आता जागतिक पातळीवर मान्यता मिळविली असून पुण्यात जन्माला आलेल्या ह्या खेळासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेर बालेवाडी भागात हे छोटेखानी स्टेडियम राखीव आहे असे मा. चंद्रकांतदादांनी नमूद केले.मात्र ते आच्छादित नसल्याने पावसाळ्यात वापर होत नाही तर उन्हाळ्यात त्याचा वापर करताना खेळाडूंची दमछाक होत असे हे लक्षात आल्यावर मी प्रयत्नपूर्वक यांस आच्छादित करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचे आज भूमिपूजन करताना आनंद होत असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
रोलबॉल च्या बालेवाडी येथील स्टेडियम ला आच्छादित करण्याच्या कामाचे भूमिपूजन ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले.यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर,इंडियन ऑलम्पिक असो. व आईस स्केटिंग चे अमिताभ शर्मा, रोलबॉल चे जनक राजू दाभाडे सर, महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा रोलबॉल चे अध्यक्ष गजानन थरकुडे
नगरसेविका रोहिणी चिमटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मयुरी कोकाटे,स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी बोरसे साहेब,भाजपा चे मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, शिवम बालवडकर, राहुल कोकाटे व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू उपस्थित होते.
यावेळी दुबई विश्वचषक स्पर्धा ,तसेच
६ व्या खेलो इंडिया विंटर गेम लेह इथे आईस स्केटींग स्पीड प्रकारच्या स्पर्धा येथील विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.दिनांक २० ते २६ जानेवारी दरम्यान लेह इथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राची अन्वयी देशपांडे (पुणे) हिने 1000 मीटरमध्ये रौप्य व 500 मीटरमध्ये कांस्य पदक, झलीन फर्नंडिस (मुंबई) हिने 500 मीटर मध्ये रौप्य व 1000 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावले.
रॉर्ट ट्रैक प्रकारात
ईशांत दारवेकर (पुणे) याने 1000 मीटरमध्ये सुवर्ण व 500 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले.
2000 मीटर मिक्स्ड रिले मध्ये
अन्वयी देशपांडे, शलीन फर्नांडिस, सोहन तारकर व ईशांत दारवेकर यांच्या संघाने सुवर्ण पदक मिळवले. प्रशिक्षक म्हणून श्री. निलेश शिंदे, (अहिल्यानगर) व सौ. जान्हवी चोरडिया (पुणे) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संघास श्री. सुहास पाटील उपसंचालक श्री. चंद्रशेखर साखरे, सहाय्यक संचालक आणि सौ. अध्विनी थरीमखे क्रीडा अधिकारी यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले तर श्री.उदय जोशी उपसंचालक आणि श्री.अरुण पाटील क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयीन कामाबाबत सहकार्य मिळाले.
तसेच दुबई इथे झालेल्या ७ व्या जागतिक रोल बॉल स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला या दोन्ही संघानी विजय मिळवत विश्वचषक पटकावले. या मध्ये आपल्या पुण्यातील पुरुष संघातील खेळाडू कृष्णा यादगिरी, हर्शल घुगे, प्रतिक साठे, रोहन दाभाडे आणि दादा भोरे संघ व्यवस्थापक, महिला संघातील खेळाडू सुहानी सिंग, श्रुती भगत आणि प्रशिक्षक प्राची फराटे तसेच भरतीय संघाचे फ़िजिओ म्हणून डॉ. सायली पोतनीस, डॉ. अखिल डोंगरे आणि पंच संकेत आवळे, प्रभाकर वडवंराव,
स्पर्धा अधिकारी मिलिंद क्षीरसागर, चेतन भांडवलकर, महेश उभे, संदीप खर्डेकर, अमोल काजळे पाटील यांना मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे यांनी रोलबॉल च्या प्रगतीची माहिती दिली, खेळाचे जनक राजू दाभाडे सर यांनी प्रास्ताविक केले तर महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.

तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे‘बाई पण भारी देवा’ कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. ३ मार्च : ” स्त्री ही शक्ती असून सशक्त विचार, नैसर्गिकरित्या कणखर आणि संकटांशी लढणारी असते . कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून सामाजिक क्षेत्रात काम करते. शारीरिक वेदना, भावनिक आव्हाने सहन करुन स्वतः बरोबर कुटुंबाला आणि समाजाला आधार देत असते.” असे मत अभिनेत्री शर्वरी जैमिनिस यांनी व्यक्त केले.

तनुश्री स्नेहमेळावा परिवाराद्वारे तनुश्री संस्कार साधना या नावाने ‘बाई पण भारी देवा’ या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

यावेळी कलाकार किशोर महाबोले, कलाकार अश्विनी कासार, मधुरा रेसीपीच्या मधुरा बाचल, केसरी टूर्सच्या झेलम चौबळ, डॉ. सुनंदा रानडे, डॉ.अस्मिता वेले, वीणा गोखले ह्या सन्मानीत पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
तसेच डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. तन्वी खाबिया (गुगळे) डॉ. अनिल गुगळे व खाबिया उपस्थित होते.

या प्रसंगी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले.

शर्वरी जैमिनिस म्हणाल्या,” सशक्त जीवन शैली बनविण्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. स्त्रीयांनी आनंदी होण्यासाठी कारणे शोधण्याची गरज नाही. तीने छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिकावे. तीने स्वतःच्या अंतर्मनातला आवाज ऐकावा आणि स्वतःवर प्रेम करावे.”

डॉ. सुप्रिया गुगळे म्हणाल्या,” हे विश्वची माझे घर हा अनुभव आज येतो. बाईपण भारी देवा हे वाक्य नाही ही जाणीव असून हे सामर्थ्य आहे. ते प्रत्येक स्त्री कडे आहे. ती हसण कधी विसरत नाही, ती थकते पण थांबत नाही. प्रेम, सहनशक्ती, सामर्थ्याची ती प्रचिती आहे.”

प्रा.डॉ.अस्मिता वेले यांनी ‘स्त्री आरोग्य आणि आयुर्वेद’ या विषयावर विचार मांडतांना म्हणाल्या, ” महिलांना या संदर्भात जागृत करणे काळाची गरज आहे. आपली दिनचर्या नियमित व व्यवस्थित ठेवल्यास त्या आजारी पडणार नाही. परंतू आजच्या काळात त्या तनाव आणि डिप्रेशन मध्ये जातांना दिसतात. मोनोकॉजमध्ये आल्यावर त्यांच्या शरीरातील बदलत्या हार्मोन्समुळे हे घडत असत. त्यासाठी सतत सजग राहावे. मुलींनी आहार व व्यायामबद्दल जागृत असावे.”

किशोर महाबोले म्हणाले,” या भूतलावर निर्सगाने मादी व माती या दोघांना बीज निर्मितीचा खरा आनंद दिला आहे. तसेच जीवन जगण्याचा खरा आनंद घ्यावयाचा असेल तर निस्वार्थ आणि उदात्त हेतू ने अनोळखी व्यक्तीला मदत करा. बाई पण भारी देवा हे एका अर्थाने सन्मान जनक गोष्ट आहे.”

अश्विनी कासार म्हणाल्या,” प्रत्येक महिलेने स्वतःच्या हॉबीला करियर म्हणून निवडल्यास अभिव्यक्ती जपण्याचे सामर्थ्य निर्माण होते. तीने आत्ममग्न बरोबरच आत्मभान ठेऊन जीवन जगावे. जेणे करुन आनंद शोधण्याची गरजच भासणार नाही.”

पुरस्कार स्वीकारल्या नंतर मधुरा बाचळ म्हणाल्या, “ज्या महिलांना जीजाऊ कळली त्यांना देश आणि राज्य कळते. संस्कार हे रुजवावे लागतात. शारीरिक तंदुरूस्तीसाठी मुलांना मैदानी खेळासाठी प्रेरित करावे. आई ज्या पद्धतीने गर्भ संस्कार व कर्म संस्कार देते, तसेच अन्न संस्कार ही खूप महत्वाचे आहे. ”

झेलम चौबळ म्हणाल्या, “आपण जे करियर निवडतो त्यात आनंद शोधता आला पाहिजे. जीवनात येणार्‍या सर्व परिस्थितीचा कठोर सामना केल्यास त्यातून मिळालेला आनंद हा द्विगुणित होतो.”

यानंतर विणा गोखले यांनी देणे समााजचे या भावनेतून सर्वानी समाजासाठी सकारात्मक कार्य करण्यासाठी पाऊल उचलण्याचे सांगितले.

प्रास्ताविकेत डॉ. तन्वी खाबिया (गुगळे) यांनी सांगितले की, घरात शिवबा होण्यासाठी स्त्रीला अगोदन जीजाई होणे गरजेचे आहे. संस्थेने सुरु केलेला २९ वर्षाचा हा प्रवास आज वटवृक्षात बदलेला आहे.

सूत्रसंचालन वसुंधरा काशिकर यांनी केले. मनोज मुनोत यांनी आभार मानले.


आदी महिला शक्ती रॅप वॉक वर

स्त्री ही आदी शक्ती असून तिच्यातील दडलेली शक्ती, आत्मविश्वास, स्वाभिमान, संस्कार आणि सकारात्मक विचारांच्या बळावर तीने स्वतःला सक्षम केल आहे. तिच्याच हातून सुंदर, सुदृढ आणि संस्कारित उद्याचे भविष्य घडते. या उदात्त हेतूने येथे रॅप वॉक करण्यात आले. या मध्ये राजमाता जीजाबाई, सावीत्रीबाई फुले, डॉ. आनंदी जोशी, झाशीची राणी, शकुंतला परांजपे, सुधा मुर्ती, सिंधूताई सपकाळ, द्रौपदी र्मुमू, स्व. लता मंगेशकर, किरण बेदी, इंद्रा नुरी, स्व, मधूबाला, सुनिता विल्यम, माधुरी दिक्षीत आणि हाउस वाईफ म्हणजेच होम मेकर्सच्या व्यक्तिरेखात महिलांनी आपली शक्ती दाखवून दिली.

जातीयवादाच्या भस्मासुराच्या होळीत ट्रम्प च्या चित्राचीही पुण्यात होळी

पुणे : वंदे मातरम् संघटना संयुक्त युवा फिनिक्स सोसायटीच्या विद्यमाने “सण करू साजरे – माध्यम जरा वेगळे” या संकल्पनेतून “जातीयवादाच्या भस्मासुराची होळी” तसेच Epstein Files प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लैंगिक शोषण, सत्तेचा गैरवापर आणि मानव तस्करीसारख्या अमानवी प्रवृत्तींच्या निषेधार्थ प्रतीकात्मक जेफ्री एप्सटिन, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क, बिल क्लिंटन यांचे पोस्टर दहन करून होळी साजरी करण्यात आली.

ही होळी गरवारे शाळेतील मुलींच्या हस्ते पेटवण्यात आली. जिजामाता, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्यभूमीत स्त्रीशक्तीच्या सकारात्मक विचारांनी अन्याय, भेदभाव व शोषणाविरोधात ठाम संदेश देण्यात आला.
या उपक्रमाद्वारे समाजात जात-पात विसरून समानता, महिला सन्मान, बालसुरक्षा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रदेश अध्यक्ष सचिन जामगे, शहराध्यक्ष अमोल जगताप, आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष विशाल शिंदे, आकाश जामगे, राज घाटे, अतिश जाधव, तेजस्विनी शिंदे, निकिता कांबळे, फातिमा शेख व मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम दि. २ मार्च, झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक, पुणे येथे घेण्यात आला.

युद्धास कारण अन शिया सुन्नी संघर्ष


इराणमध्ये अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या मुसलमानांनी तेथील ऐतिहासिक जामकरण मशिदीवर लाल रंगाचा झेंडा फडकावला आहे. हा लाल झेंडा म्हणजे सूडाची नांदी असल्याचे मानले जात आहे. कारण या झेंड्यावर इमान हुसेन यांचा बदला असे शब्द लिहिलेले होते. पण हे इमान हुसेन कोण आहेत? त्यांच्या या बदल्याचा काय संदर्भ आहे? मशिदीवर लावलेल्या लाल झेंड्याचा नेमका अर्थ काय? हे सगळे समजून घ्यावे लागेल. कारण यातच शिया-सुन्नी संघर्षाचा इतिहास दडलेला आहे.

इमाम हुसेन म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा नातू. इमाम हुसेन 680 च्या करबलाच्या युद्धात मारले गेले. करबलाचे हे युद्ध वांशिक संघर्ष होता. त्या युद्धानंतर मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी अशी फूट पडली. काही रिपोर्टमध्ये तसा दावा करण्यात आला आहे. सुन्नी परंपरेत खलिफा राज्य चालवतो, तर शिया परंपरेत इमामची निवड करणे ग्राह्य धरले जाते. इमाम म्हणजे पैगंबरांचे थेट वंशज. करबलाची लढाई मोहम्मद पैगंबराचे नातू इमाम हुसैन आणि खलिफा उमय्यद वंशाचे यजीद यांच्या समर्थकांमध्ये झाली होती. पैगंबराच्या मृत्यूनंतर उमय्या वंशातल्या लोकांनी धर्माची आणि सत्तेची सगळी सूत्रे आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. हुसैन यांनी इस्लामच्या सिद्धांताचा आधार देत यजीदचे नेतृत्व स्वीकारायला नकार दिला आणि त्यानंतर करबलाचे युद्ध पेटले. इस्लामिक कॅलेंडरनुसार मोहरमच्या महिन्यात दहाव्या दिवशी इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांचा मृत्यू झाला. तेव्हापासून शिया-सुन्नी हा संघर्ष सुरु असून तो आजतागायत सुरु आहे. या दिवसाचे शिया मुस्लिमांसाठी भावनिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे मोहरमच्या काळात शिया मुस्लिम आजही ताजिया काढून लाल झेंडे फडकावत मातम करतात अर्थात दुःख व्यक्त करतात. इराणमध्ये शिया मुसलमान जामकरण या मध्ये मशिदीवर तेव्हाच लाल झेंडा फडकावतात, जेव्हा युद्धाची घोषणा होते किंवा त्यांच्या नेत्याचा मृत्यू होतो. सध्याच्या युद्धात इराणचे प्रमुख आयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला असून इराण युद्धात आहे. हाच लाल झेंडा प्रामुख्याने इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी, शत्रूंना इशारा देण्यासाठी किंवा युद्धाच्या वेळी फडकवला जातो. शिया परंपरेतला हा झेंडा बदला घेण्याचे संकेत मानला जातो. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर शिया मुसलमानांनी लाल झेंडे अनेक ठिकाणी फडकावले आहे. या झेंड्याच्या माध्यमातून इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेला (Iran Israel War) तर इशारा दिला आहेच आपण सोबत सुन्नी मुस्लिम राष्ट्रे सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, कुवेत, कतार यांसह किमान १० राष्ट्रांच्या विरोधात युद्धाचे बिगुलही वाजवले आहे. त्यामुळे शिया-सुन्नी मुसलमानांच्या संघर्षाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे संकेत मिळत आहेत.

शिया मुसलमानांची एकूण लोकसंख्या

विविध आंतरराष्ट्रीय अभ्यास व अंदाजानुसार, जगभरात शिया मुसलमानांची संख्या सुमारे 20 ते 26 कोटीं दरम्यान आहे. ही संख्या जागतिक मुस्लिम लोकसंख्येच्या अंदाजे 10 ते 13 टक्के इतकी आहे. म्हणजेच, जगातील प्रत्येक 100 मुसलमानांपैकी सुमारे 10 ते 13 जण शिया आहेत, तर उर्वरित बहुसंख्य मुसलमान सुन्नी पंथाचे आहेत. शिया समुदाय अनेक देशांत विखुरलेला असला, तरी काही देशांमध्ये त्यांची लोकसंख्या विशेषतः मोठ्या प्रमाणात आहे.

शिया मुसलमानांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश

शिया लोकसंख्येच्या बाबतीत इराण जगात अव्वल आहे. येथे शिया लोकसंख्या 8 ते 8.5 कोटी असून, देशाच्या एकूण लोकसंख्येतील वाटा 90 ते 95% आहे.

भारत

इराणनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची शिया लोकसंख्या भारतात असल्याचे मानले जाते. भारतात शिया लोकसंख्या 3 ते 5 कोटी आहे. भारतातील मुस्लिम लोकसंख्येतील यांचा वाटा 10 ते 15% आहे. भारतात शिया समुदाय प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीर, हैदराबाद आणि इतर काही भागांत आढळतो. लखनऊ हे शहर दीर्घकाळापासून शिया संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.येथे शिया लोकसंख्या 2.5 ते 4.5 कोटी आहे. एकूण मुस्लिम लोकसंख्येतील वाटा 10 ते 20% आहे.

इराक

इराकमध्ये शिया मुसलमान बहुसंख्य आहेत. मुस्लिम लोकसंख्येतील शिया वाटा 65 ते 70% असून, एकूण संख्या 2 ते 2.5 कोटी आहे.

अझरबैजान

शिया लोकसंख्या 65 ते 75% असून, इराणनंतरचा हे एक प्रमुख शिया बहुसंख्य देश आहे.

बहरीन

येथे शिया लोकसंख्या 65 ते 75% आहे. मात्र, येथे सत्ताधारी व्यवस्था सुन्नी राजघराण्याच्या हाती आहे.

लेबनॉन

येथे शियांची लोकसंख्या 45 ते 55% असून, लेबनॉनमध्ये शिया समुदाय राजकीयदृष्ट्याही प्रभावी मानला जातो.

येमेन

येथे शिया लोकसंख्या 35 ते 45% आहे. येथील बहुतांश शिया जैदी पंथाचे आहेत.

अफगाणिस्तान

येथे शिया लोकसंख्या 10 ते 15% आहे.

तुर्की

येथे शिया लोकसंख्या 1 ते 2 कोटी असून, येथे मोठ्या प्रमाणात अलेवी समुदाय आढळतो.

इतर देश

जॉर्जिया: 15 ते 25%

बल्गेरिया: 10 ते 15%

स्वीडन: मुस्लिम लोकसंख्येपैकी 20 ते 40% शिया

शिया बहुसंख्य देश किती?

जगात केवळ चार देश असे आहेत जिथे शिया मुसलमान बहुसंख्य आहेत:

इराण

इराक

अझरबैजान

बहरीन

या देशांमध्ये शिया लोकसंख्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. इतर देशांमध्ये शिया समुदाय अल्पसंख्य स्वरूपात राहतो.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या पुण्यातील १२३ नागरिकांबाबत माहिती प्राप्त

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 2: मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.

जिल्ह्यातील १ ते २ मार्च या कालावधीत दुबई येथे अडकलेल्या एकूण १२३ नागरिकांबाबत माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित सर्व नागरिकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आलेला असून ते सर्व सुरक्षित आहेत.

संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : repoffice@mea.gov.in/ cons.ramallah@mea.gov.in कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२, ई-मेल : cons.doha@mea.gov.in सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in इस्रायल (तेल अवीव) येथे फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९, संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१, ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in /ca.abudhabi@mea.gov.in कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६, ई-मेल : community.kuwait@mea.gov.in बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१, मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०, ई-मेल : cw.muscat@mea.gov.in/ cons.muscat@mea.gov.in जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९, वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/ तसेच ई-मेल : cons.baghdad@mea.gov.in/ cons1.baghdad@mea.gov.in/ pol.baghdad@mea.gov.in, https://x.com/i/status/2027746402575782262 नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२३३७१/२६१३३५२२/२६१३३५२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचा शुभारंभ संपन्न

पुणे- दिनांक २ मार्च २०२६ रोजी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते व माअतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर यांचे प्रमुख उपस्थितीत शरदचंदजी पवार अकॅडमी ऑफ ई लर्निंग, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, पुणे ४११०४१ येथे कर्करोग प्रतिबंधासाठी विशेष लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले .
पुणे महानगरपालिका व जीविका फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ९ ते १३ वयोगटातील मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लसीची १ मात्रा मोफत देण्याबाबत करारनामा झाला असून, सदर लस सामाजिक दायित्व योजना यांचे माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अध्यक्षीय भाषणात महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले कि,”आजचा हा क्षण केवळ औपचारिक कार्यक्रम नाही, तर एक ऐतिहासिक पाउल आहे. महानगरपालिका स्तरावर अशा प्रकारचा उपक्रम सुरु करणारी पुणे महानगरपालिका हि देशातील पहिली महानगरपालिका ठरत आहे. याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.या राष्ट्रीय मिशनला पूरक आणि अधिक बळकटी देण्यासाठी पुणे महानगरपालिका, जीविका फौंडेशन आणि CSR भागीदार यांच्या सहकार्याने आम्ही एक पाउल पुढे टाकत आहोत. मोफत HPV लसीकरणाद्वारे ९ ते १३ वयोगटातील सर्व मुलींना सर्व समावेशक संरक्षण मिळेल आणि पुणे शहरात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध एक मजबूत संरक्षण कवच उभे राहील हे अभियान आपल्या शहरातील मुलींच्या आरोग्याचे आणि त्यांच्या उज्वल भविष्याचे संरक्षण करण्याच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाउल आहे”.
यावेळी परशुराम वाडेकर, सोपान चव्हाण, स्मिता वस्ते, अल्पना वर्षे,पल्लवी जावळे, ज्योती गोसावी, सचिन मोरे आणि श्रीकांत जगताप, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रायोगिक तत्वावर उद्घाटन करण्यात आले.सदर प्रसंगी पुणे महानगरपालिकेस मोफत लस उपलब्ध करून देणारे समाजिक दायित्व योजना भागीदार Bajaj Finserv, Bridgenext, Compucomp, Caratlane, Icertis, Indostar, Lohia Jain Group, Pattern Tech, Shreejee Structural Steel, ZS Associates, Rotary Club Poona, Downtown, Rotary Club Pune Central यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांचा महापौर यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिग्नेश पटेल, संचालक जीविका फौंडेशन यांनी प्रेक्षकामध्ये उपस्थित असणाऱ्या १५० मुलामुलींना व त्यांच्या पालकांना आजवर जीविका फौंडेशनच्या माध्यमातून सुमारे ५०,००० विद्यार्थिनींचे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) प्रतिबंधक लस देण्यात आल्याचे सांगितले. यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर यांनी सदर लस अत्युच्च दर्जाची असून योग्य तापमानात सनियंत्रित केली असल्याने प्रभावी असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थिनींनी इंजेक्शनची भीती न बाळगता लस घ्यावी तसेच एखाद्या विद्यार्थिनीस थोडा ताप येणे, इंजेक्शनच्या जागी सूज येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्याकरीता AEFI KIT उपलब्ध असल्याचे सांगितले.
महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहरातील सर्व शाळांमध्ये ९ ते १३ वर्षे वयोगटातील मुलींना लसीच्या उपलब्धतेनुसार मोफत लस देण्यात येणार असल्याचे सांगितले व त्याकरीता अधिकाधिक सामाजिक दायित्व योजना अनुदानाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच सदर वयोगटातील शाळा बाह्य मुलींना या लसीची तितकीच आवश्यकता असल्याचे व त्यासाठी विशेष प्रयत्र करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यानंतर महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते फीत कापून लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी ७५ विद्यार्थिनींना CERVIVAC लसीचा एक डोस देण्यात आला. प्रातिनिधिक स्वरुपात ५ मुलींना लसीकरणाचे प्रमाणपत्र माननियांच्या हस्ते देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. लसीकरण अॅम्ब्युलंस वाहनास माननियांच्या व विद्यार्थिनींच्या हस्ते झेंडा दाखवून अभियानास सुरुवात झाल्याचे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनात पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे, आरोग्य विभागाकडील अधिकारी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शिक्षण मंडळ उपायुक्त श्रीमती वसुंधरा बारवे, श्रीमती सुनंदा वाखारे व शिक्षण विभागाकडील अन्य अधिक्कारी कर्मचारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.यानंतर सर्व विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दि.२८ फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत १४ वर्षापर्यंतच्या मुलींना HPV लसीकरणाचा समावेश करून एक दूर दृष्टीपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हा एक क्रांतिकारक टप्पा आहे.भारतामध्ये महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. ICMR अंतर्गत राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार २०२२ साली सुमारे ७९,००० नवीन रुग्ण आणि ३४,००० पेक्षा जास्त मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाले आहेत. या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे Human Papillomavirus (HPV) संसर्ग होय.HPV Papillomaviridae कुटुंबातील विषाणू असून त्याचे २०० पेक्षा अधिक प्रकार आहेत. यापैकी HPV-16 आणि HPV-18 हे प्रकार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी सर्वाधिक जबाबदार आहेत. भारतामध्ये सुमारे ८३% रुग्णांमध्ये हे दोन प्रकार आढळतात. त्यामुळे HPV लसीकरण अत्यंत प्रभावी ठरते.

युद्धादरम्यान ट्रम्प ब्रिटनवर नाराज:इराणवर हल्ला करण्यासाठी ब्रिटिश लष्करी तळ देण्यास PM स्टार्मर यांनी केला २ दिवसांचा विलंब

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे दीर्घकालीन मित्र ब्रिटनवर नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी हिंद महासागरात असलेले त्यांचे लष्करी तळ डिएगो गार्सिया, अमेरिकेला सोपवण्यास तब्बल २ दिवस विलंब केला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेला या तळावरून इराणवर हल्ला करायचा होता.तथापि, ब्रिटनने ४८ तासांनंतर परवानगी दिली आणि म्हटले की, अमेरिकेला येथून फक्त इराणी क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करण्याची परवानगी असेल. याबद्दल ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधानांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सोमवारी, इराणने चार मध्यपूर्वेतील देशांमधील सहा अमेरिकन तळांवर हल्ला केला. कुवेतमध्ये अनेक अमेरिकन लढाऊ विमाने कोसळली. ही विमाने वर्तुळात फिरली आणि नंतर जमिनीवर कोसळली. तथापि, कोणतीही जीवितहानी झाली नाही.दुसरीकडे, इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी सोमवारी सांगितले की, इराण अमेरिकेशी कोणतीही चर्चा करणार नाही. इराणने अमेरिकेशी चर्चा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताला उत्तर म्हणून हे विधान आले आहे.


इराणवरील हल्ला हा प्रादेशिक स्थिरतेसाठी एक गंभीर संकेत आहे-चीन
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाबद्दल चीनने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांचा परिणाम आता शेजारील देशांवर होत आहे, ज्यामुळे प्रादेशिक स्थिरतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, आखाती देशांच्या सार्वभौमत्वाचा, सुरक्षिततेचा आणि प्रादेशिक अखंडतेचा पूर्ण आदर केला पाहिजे. कोणत्याही देशाच्या सीमा आणि सुरक्षेशी तडजोड केली जाऊ नये आणि सर्व पक्षांनी संयम बाळगावा.

इराण चीनकडून CM-302 सुपरसॉनिक अँटी-शिप क्षेपणास्त्रे खरेदी करण्याच्या जवळ आहे अशा बातम्याही माओ निंग यांनी फेटाळून लावल्या. त्यांनी हे अहवाल खोटे आणि दिशाभूल करणारे म्हटले, चीन हा एक जबाबदार देश आहे आणि तो त्याच्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे पालन करतो असे म्हटले.चीननेही आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, २ मार्चपर्यंत ३,००० हून अधिक चिनी नागरिकांना इराणमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. इराणच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी नागरिकांना बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी सीमा चौक्यांवर विशेष पथके तैनात केली आहेत.दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात व्यापक अस्थिरता निर्माण होऊ शकते, त्यामुळे परिस्थिती आणखी वाढू नये म्हणून तणाव कमी करण्यासाठी काम करण्याचे आवाहन चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे.

युध्दग्रस्त देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी पुण्यात सुखरूप आणण्यासाठी महापालिका उभारणार २४ बाय ७ कक्ष

पुणे- इराण-इस्रायल युद्धस्थिती बाबत पुणे महापालिकेने गांभीर्याने काम करून युध्द होणाऱ्या देशांमध्ये अडकलेल्या पुणेकरांना माघारी पुण्यात सुखरूप आणण्यासाठी २४ तास कार्यरत असणारा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे काम तातडीने सुरु केले आहे.

इराण-इस्रायल युद्धस्थितीमध्ये अडकलेले पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ‘विशेष मदत कक्ष’ व ‘डेटा बँक’ कार्यान्वित करण्याबाबत महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांस आदेश देण्यात आलेले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये सध्या उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे शहरातील अनेक नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आणि व्यावसायिक तिथे अडकल्याची दाट शक्यता आहे. युद्धभूमीवर अडकलेल्या या पुणेकरांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांमध्ये अत्यंत चिंतेचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीचा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करता, पुणे महानगरपालिकेच्या वतीने तातडीने खालील उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
१. २४x७ हेल्पलाईन कक्ष: पुणे महानगरपालिकेत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून २४ तास कार्यरत
असणारा हेल्पलाईन क्रमांक तातडीने जाहीर करावा.
२. पर्यटक आणि नागरिकांची डेटा बँक युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पुणेकर पर्यटकांची आणि
रहिवाशांची अधिकृत यादी तयार करण्यात यावी.

३. नातेवाईकांकडून खालील माहिती संकलित करावी:
* अडकलेल्या व्यक्तीचे/पर्यटकाचे पूर्ण नाव.
* परदेशातील सध्याचा पत्ता/हॉटेलचा पत्ता.
* पासपोर्ट क्रमांक (Passport Number).
* तिथे उपलब्ध असलेला स्थानिक संपर्क क्रमांक.

समन्वय व कार्यवाही ही ‘डेटा बँक’ पुढील कार्यवाहीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सदर माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) तातडीने कळवावी, जेणेकरून तिथे अडकलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी वेगवान हालचाली करता येतील.