राहुल भारताचे अन ब्रिटनचेही नागरिक त्यामुळे त्यांची खासदारकीच बेकायदेशीर
लखनऊ: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. रायबरेलीतील पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. हे प्रकरण राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाशी संबंधित आहे.भाजप नेते विग्नेश शिशिर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी शिशिर यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी या प्रकरणाशी संबंधित टॉप सीक्रेट फाईल न्यायालयाला देण्याची परवानगी दिली. त्यामुळेच न्यायालयानं हा निकाल दिल्याचं भाजप नेते शिशिर म्हणाले.
राहुल गांधींवर नेमके आरोप काय?
राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप आहे. म्हणजेच ते एकीकडे भारताचे नागरिक आहेत. सोबतच ते ब्रिटनचेही नागरिक आहेत. भारतीय कायद्यानुसार एका व्यक्तीकडे केवळ एकाच देशाचं नागरिकत्व असायला हवं. एखाद्या व्यक्तीकडे दुहेरी नागरिकत्व असल्यास तो भारतात निवडणूक लढवू शकत नाही आणि खासदारही होऊ शकत नाही.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी रायबरेलीमधून विजयी होऊन खासदार झाले. यानंतर विग्नेश शिशिर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्यास त्यांची खासदारकीच बेकायदेशीर ठरते, असा दावा त्यांनी याचिकेतून केला.
न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठानं याचिकेवर सुनावणी घेतली. या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. राहुल गांधी यांच्या विरोधात रायबरेली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारनं केली होती. ही मागणी न्यायालयानं मान्य केली आहे.

