आरोग्य सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला गती
पुणे : आरोग्य सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वतीने केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबीपीएमजेएवाय) आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’ला (दि. 17 एप्रिल) पुणे येथील कॉनरॅड हॉटेलमध्ये प्रारंभ होत आहे. या शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ते मार्गदर्शन करणार आहेत. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दि. 17 व 18 एप्रिलदरम्यान होणाऱ्या या शिबिरात देशातील विविध राज्यांतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ व धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार बर्नवाल हे उद्घाटनपर भाषण करतील.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मार्गदर्शक सूचनांचा संग्रह प्रकाशित करण्यात येणार असून, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची डिजिटल अकॅडमी सुरू करण्यात येणार आहे. तसेच विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून, एनएचसीएक्स स्ट्रॅटेजी पेपरचेही प्रकाशन होणार आहे.
शिबिराच्या पहिल्या दिवशी एबीपीएमजेएवाय व एबीडीएम अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. की-परफॉर्मन्स इंडिकेटर्स (केपीआय), क्लेम्स डेटावर आधारित विश्लेषण, तसेच डिजिटल हेल्थ सुविधांची सादरीकरणे यामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रासह झारखंड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांकडून त्यांच्या डिजिटल हेल्थ मिशनच्या अनुभवांवर सादरीकरण करण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशी आयटी अपडेट्स, एनएचसीएक्स सक्षम एचएमआयएस प्रणालीचे प्रात्यक्षिक, हेल्थ डेटा अॅनालिटिक्स युनिटचे निष्कर्ष सादर केले जाणार आहेत. यासोबतच एम्सद्वारे विकसित क्लिनिकल डिसिजन सपोर्ट सिस्टीमच्या अंमलबजावणीवर विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच पीएमजेएवाय आयटी प्लॅटफॉर्मवरील विविध योजनांचे एकत्रीकरण, पीएम-राहत उपक्रम आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एबीडीएमची अंमलबजावणी यावरही सविस्तर चर्चा होणार आहे. शिबिराच्या समारोप सत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्ये व रुग्णालयांना एबीडीएम व पीएमजेएवाय पुरस्कार व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
आभा कार्ड निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर
दरम्यान, आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात अग्रणी ठरत आहे. राज्यातील ६.९९ कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान भारत आरोग्य खाते तयार केले असून, डिजिटल आरोग्य नोंदींचे सुरक्षित व्यवस्थापन शक्य झाले आहे. ‘स्कॅन अँड शेअर’सारख्या सेवांमुळे रुग्णांचा अनुभव सुधारला असून, शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ७६ लाखांहून अधिक डिजिटल ओपीडी टोकन्स तयार करण्यात आले आहेत.
राज्यात एबीडीएम अंतर्गत ३४ हजारांहून अधिक आरोग्य सुविधा आणि ९३ हजारांहून अधिक आरोग्य सेवा व्यावसायिक नोंदणीकृत असून, हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या अंमलबजावणीमुळे रिअल-टाइम डेटा संकलन व रुग्ण सेवा अधिक सक्षम झाली आहे. खासगी आरोग्य क्षेत्राचा सहभाग वाढवून सार्वजनिक व खासगी आरोग्य सेवांमध्ये आंतरकार्यक्षमता वाढविण्यावर राज्य शासन भर देत आहे.
या चिंतन शिबिराच्या माध्यमातून देशातील आरोग्य सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

