Home Blog Page 73

पोलिसांनीच बुजविला नाला: कारवाई कोण, कुणावर करणार? पण पूर तर येणार …

विरोधी पक्ष नेते निलेश निकम यांचे आयुक्तांना साकडे

पुणे- चतु:श्रृंगी टेकडीवरून पाषाण रोडच्या दिशेने येणारा आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या जागेतून बाणेर रोडच्या मुख्य नाल्याला मिळणारा नैसर्गिक प्रवाह हा नाला बुजवून रोखण्यात आल्याने पावसाळ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा एकदा अस्त्यावस्त पसरून ,नागरी वस्त्यांना धोका निर्माण करू शकणार आहे. मुख्य बाब म्हणजे ज्यांनी नदी नाल्याचे रक्षण करायचे त्यांनीच हा नाला बुजविल्याने तो बुजविण्यासाठी राबलेल्या शासकीय रक्षकावरच फौजदारी कारवाई करावी असे पत्र महापालिकेतील विरोधीपक्ष नेते निलेश निकम यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहे.

या पत्रात निलेश निकम यांनी असे म्हटले आहे कि,’

या संदर्भात धक्कादायक वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे:
१. प्रशासनाची दुटप्पी भूमिका:
सप्टेंबर २०२५ मध्ये जेव्हा टेकडीवरील पाणी अभिमानश्री सोसायटी, निलगिरी लेन आणि इंदिरा वसाहत येथील घरांत शिरले होते, तेव्हा महानगरपालिकेच्या ड्रेनेज व बांधकाम विभागाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर २५ सप्टेंबर २०२५ रोजी हा नाला पूर्णपणे साफ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला होता. याचा अर्थ हा नाला अस्तित्वात असल्याचे आणि तो शहराच्या निचरा व्यवस्थेसाठी (Strom Water System) महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने मान्य केले होते.
२. सद्यस्थितीतील अतिक्रमण: सद्यस्थितीत त्याच ठिकाणी, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत नैसर्गिक नाला पूर्णपणे बुजवून त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे. विकास आराखड्यात (DP) स्पष्टपणे दर्शवलेला नाला अशा प्रकारे बुजवणे हा केवळ नियमांचा भंग नसून पर्यावरणाशी केलेला खेळ आहे.
३. आगामी पावसाळ्याचा धोका: गेल्या वर्षी नाला साफ केल्यामुळे दिलासा मिळाला होता, मात्र आता तो पुन्हा बुजवला गेल्याने आगामी पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे वसाहतींमध्ये पाणी शिरून जीवित व आर्थिक हानी होण्याची दाट शक्यता आहे.या संभाव्य दुर्घटनेला आता सर्वस्वी प्रशासन आणि हे अतिक्रमण करणारे घटक जबाबदार राहतील.
नाला बुजवून आणि त्यावर अतिक्रमण करून सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे.
सप्टेंबर २०२५ मध्ये ज्या स्थितीत नाला साफ करून प्रवाह मोकळा केला होता, त्याच स्थितीत नाला पूर्ववत (Restore) करण्यात यावा.विकास आराखड्यातील (DP) नाल्याचे अस्तित्व मिटवणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास, आम्ही बाधित नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडू आणि या बेकायदेशीर कृत्याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी

 शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या  खास विनोदी अंदाजासाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने हे दोघे सरपंच आणि उपसरपंचांच्या भूमिकेत आमने-सामने येणार आहेत. आगामी‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात या दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या दोघांच्या संवादांमधील चुरस, एकमेकांवरची टोलेबाजी आणि गावातील राजकारणातून निर्माण होणारे प्रसंग कथेला वेगळीच रंगत देणार आहेत. येत्या १७ एप्रिलला ‘सालबर्डी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेविषयी बोलताना शशांक शेंडे म्हणाले, ‘सालबर्डी’ची कथा रहस्यमय आहे. स्थानिक पातळीवरचे  राजकारण आणि एकमेकांसोबत असलेल्या नातेसंबंधांची झलक यामध्ये पहाता येईल.  ही  भूमिका करताना ओंकार सोबत झालेले ट्युनिंग आणि आम्ही साकारलेली भूमिका पडद्द्यावर पहाणं रंजक असणार आहे. ओंकार भोजने म्हणाला, ‘उपसरपंच मुकिंदा थोरात ही भूमिका खूप रंगतदार आहे. शशांक सरांसारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांना ही जुगलबंदी नक्कीच आवडेल.’

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.

‘सालबर्डी’ चित्रपटात शशांक शेंडे, ओंकार भोजने यांच्यासोबत पूजा सावंत, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

भारतीय घरातील स्मार्ट आणि ‘ऑल-इन-वन’ स्वयंपाकाच्या एका नव्या युगाची सुरुवात

पुणे- फिलिप्स होम अप्लायन्सेसने फिलिप्स वनशेफ सादर करण्याची घोषणा आज केली. स्वयंपाकासाठी हे एक नावीन्यपूर्ण, सर्वसमावेशक स्मार्ट उपकरण असून, रोजचा स्वयंपाक सोपा करण्यासोबतच भारतीय घरांसाठी पाककलेचे नवनवीन पर्याय करून पाहण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे.

रणवीर ब्रार यांनी मुंबईतआयोजित केलेल्या ‘शेफ्स टेस्टिंग टेबल’ या कार्यक्रमात याचे उद्घाटन झाले. पदार्थांची चव पाहून, इंटरॅक्टिव्ह फूड स्टेशन्सच्या माध्यमातून भारतातील विविध खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेण्यासाठी पाहुण्यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, ब्रार यांनी वर्सुनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. गुलबहार तौरानी यांच्यासोबत भारतीय पदार्थांच्या चवीशी कुठेही तडजोड न करता  स्वयंपाकघरातील आधुनिक तंत्रज्ञान क्लिष्ट पाककृती कशा सहज- करू शकते, हे दाखवून दिले.

हे लॉन्च म्हणजे आधुनिक भारतीय स्वयंपाकघराची पुनर्कल्पना करण्याच्या दिशेने फिलिप्सने टाकलेले नवीन पाऊल आहे. ‘वनशेफ’मध्ये 33 स्मार्ट कुकिंग फंक्शन्स एकाच उपकरणात कार्यरत आहेत. प्रगत ‘अँबीहीट™’ तंत्रज्ञान वापरण्यात आलेले हे उपकरण, योग्य तापमान आणि एकसमान उष्णतेचा वापर करून विविध पदार्थ तसेच स्वयंपाकाच्या टप्प्यांनुसार स्वतःला जुळवून घेते. यामुळे रोजच्या साध्या जेवणापासून ते सणासुदीच्या खास पदार्थांपर्यंत, विविध प्रकारच्या पाककृतींमध्ये एकसारखी चव आणि उत्तम स्वाद मिळतो.

लाँचप्रसंगी गुलबहार तौरानी म्हणालेभारतीय घरांमध्ये प्रत्यक्षात स्वयंपाक कसा केला जातो हे समजून घेणे आणि त्यांच्या रोजच्या सवयीच्या गोष्टींमध्ये सहज सामावले जाणारे उपकरण डिझाइन करणेयावर आमचे नेहमीच लक्ष राहिले आहे. भारतीय स्वयंपाक अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अनेकदा वेळखाऊ असतो. म्हणूनच चवीशी तडजोड न करता प्रक्रिया सुलभ करणारे उपाय अधिकाधिक महत्त्वाचे ठरतात. वनशेफच्या माध्यमातूनआम्ही स्वयंपाकाची अनेक तंत्रे एकाच इंटेलिजेंट प्लॅटफॉर्मवर आणू इच्छितोजो रोजच्या स्वयंपाकाला अधिक सहज आणि चविष्ट बनवतो. व्यावहारिक आणि उद्देशपूर्ण अशा दोन्ही नावीन्यपूर्णतेद्वारे आधुनिक भारतीय स्वयंपाकघराची पुनर्कल्पना करण्याच्या आमच्या व्यापक वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.”

भारतीय पाककला अत्यंत वैविध्यपूर्ण आणि बहुआयामी आहेआणि चवीशी कोणतीही तडजोड न करतापाककला अधिक सुलभ बनवण्यात हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हेच संतुलन साधण्याच्या उद्देशाने वन शेफची रचना करण्यात आली आहे. यामुळे गृहिणी अधिक सहजतेने आणि आत्मविश्वासाने विविध प्रकारच्या पाककृती करण्याचा प्रयत्न करू शकतील,” असे शेफ रणवीर ब्रार म्हणाले.

वनशेफच्या माध्यमातून, फिलिप्सने एअर फ्रायिंग, स्टर फ्रायिंग, स्टीमिंग आणि बॉइलिंग यांसारखी स्वयंपाकाची अनेक तंत्रे एकाच कॉम्पॅक्ट उपकरणात एकत्र आणत ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दृष्टिकोनामुळे स्वयंपाकघरातील कामाची प्रक्रिया सोपी होते आणि गृहिणी अनेक उपकरणे न हाताळता विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकतात. भारतीय घरांचा विचार करून डिझाइन केलेले, वनशेफचे सहज वापरता येणारे कंट्रोल्स आणि गाइडेड कुकिंग प्रोग्राम्स ग्राहकांना शेफ-प्रेरित पाककृती सहजपणे तयार करण्यास मदत करतात.

या कार्यक्रमात ‘घरगुती स्वयंपाक आणि स्वयंपाकघरातील नवनिर्मितीचे भविष्य’ या विषयावर एका चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रणवीर ब्रार, गुलबहार तौराणी, दिग्दर्शिका फराह खान आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ राजीव मखनी यांचा सहभाग होता. ‘स्मार्ट उपकरणां’मुळे आधुनिक कुटुंबांना दैनंदिन स्वयंपाकाचा अनुभव किती वेगळा आणि आनंददायी वाटतो, यावर प्रकाश टाकला.

किंमत आणि उपलब्धता

फिलिप्स वनशेफ हे 19 मार्चपासून क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारखी प्रमुख किरकोळ विक्री दुकाने आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल.

मॉडेलसर्वोत्तम किंमत (रुपयांमध्ये)उपलब्धता
वनशेफRs.  19,995/-19 मार्चपासून

महिला शेतकरी अधिकार कायद्याच्या अभ्यासासाठी कृतीगट तयार करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शेतीपूरक व्यवसायांसाठी महिलांना विशेष अनुदान देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

विधान भवनात जागतिक महिला दिनानिमित्त “महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण” कार्यक्रम

मुंबई, दि.११ मार्च २०२६ : महिला शेतकरी हक्क कायद्याबाबत ११ मे २०१२ रोजी राज्यसभेत खासगी विधेयक सादर करण्यात आले, या महिला शेतकरी अधिकार विधेयकावर अभ्यास करण्यासाठी कृतीगट स्थापन करण्याची गरज असल्याचे विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ आणि जागतिक महिला दिनानिमित्त विधानभवनात ‘महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, डॉ. सौम्या स्वामिनाथन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या प्रमुख मोनिका राजळे, आमदार ज्योती गायकवाड, मंजुळा गावित आणि डॉ. नित्या राव यांनी यावेळी आपले विचार मांडले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिला शेतकऱ्यांच्या नावावर जमीन व मालमत्ता नोंदणीला प्रोत्साहन देणे तसेच महिला शेतकरी हक्कांसाठी कायदेशीर संरक्षणाची गरज डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. याखेरीज महिला शेतकरी कोष निर्माण करण्यात यावा. आपत्तीच्या काळात संकटग्रस्त महिला शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी महिलांच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढत असल्याने शेतीची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर महिलांवर येत आहे. अनेक कुटुंबांमध्ये महिला कुटुंबप्रमुख म्हणून शेती सांभाळत आहेत. मात्र प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांचे नाव सातबाऱ्यावर नसल्याने त्यांना शासकीय योजना, कर्ज आणि इतर सुविधांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत प्रमाणपत्र देण्याचा विषय आपण अनेक वर्षांपासून मांडत आहोत, परंतु त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

महिलांना संपत्ती आणि शेतीवरील हक्क मिळण्यासाठी विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. तसेच महिलांच्या नावाने जमीन व मालमत्ता नोंदणीला प्रोत्साहन देणे आणि शेतकरी महिलांच्या श्रमाचे मूल्य मान्य करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. शेती, पशुपालन आणि वनशेतीसारख्या क्षेत्रांमध्ये महिलांचे मोठे योगदान असून त्यांना तंत्रज्ञान, कर्जसुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास त्यांचे सक्षमीकरण अधिक प्रभावी होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, कृषी योजनांमध्ये किमान ३० टक्के लाभ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. नमो ड्रोन योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून कुक्कुटपालन आणि इतर शेतीपूरक व्यवसायांसाठी महिलांना विशेष अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात बोलताना डॉ. नित्या राव यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ग्रामीण भागात सुमारे ८० टक्के महिला शेतीशी संबंधित काम करत असल्या तरी केवळ सुमारे १५ टक्के महिलांच्या नावावरच सातबारा आहे. त्यामुळे अनेक महिलांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळत नाही. महिलांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळणे आणि कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच राष्ट्रीय किसान नीती २००७ नुसार शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिल्यास त्यांना पाणी, कर्ज आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळू शकतो. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र श्रेणी निश्चित करून कृषी विकास कोष तयार करणेही आवश्यक असल्याचे डॉ. नित्या राव यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिला शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महिला शेतकऱ्यांसाठी ‘वूमन फार्मर आयडी’ देण्याबाबत विचार होण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला.

एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. ११ मार्च २०२६.

केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईत होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. घरगुती गॅस सिलेंडर ६० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ केली आहे. दरवाढीसोबतच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवला आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॅाटेल बंद होत आहेत. ही दरवाढ अन्यायकारक असून तात्काळ मागे घ्यावी तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे गॅस व इंधन पुरवठ्याचे कोणतेही नियोजन नाही, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत, हॉटेल व्यवसाय, खाणावळी बंद करण्याची वेळ आली आहे. गॅसचा तुटवडा नाही हा सरकारचा दावा चुकीचा असून सर्वसामान्य जनता व हॉटेल व्यावसायीक यांना गॅस उपलब्ध होत नाही. आधीच महागाई त्यात गॅसचा तुटवडा यामुळे राज्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, सेल, विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात उद्या १२ मार्च रोजी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

गॅस तुटवड्याचे संकट,भाजपने सोडले पुणेकरांना वाऱ्यावर-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : शहरामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल्स बंद पडत आहेत, हजारोंचा रोजगार धोक्यात आला आहे, अशा स्थितीत सत्ताधारी भाजपने पुणेकरांना दिलासा देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

महापालिकेतील पदाधिकारी आणि कमिट्यांच्या निवडणुका लढविण्यात भाजपचे नेते मश्गूल झाले आहेत. पुण्याचे मंत्री उदासीन आहेत. वास्तविक त्यांनी पुण्यात बैठका घेऊन गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत वस्तुस्थिती तातडीने सांगायला हवी होती. पुणेकरांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत, त्या दूर करण्याऐवजी पुण्यातील सर्व मंत्री प्रश्नापासून दूर पळ काढत आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शिक्षणा साठी विद्यार्थी पुण्यात वास्तव्यास आहेत . गॅस सिलेंडरच्या टंचाईने छोटी हॉटेल्स , स्नॅक्स सेंटर , खानावळी बंद पडण्याची भिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने गावाकडे परतावे लागेल. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी भाजपची आहे. ही जबाबदारीसुद्धा भाजपचे लहान मोठ नेते टाळत आहेत . हे चित्र संतापजनक आहे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे .

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडावी आणि या हॉटेल व्यवसायाला एकदम दणका बसू नये, अशा पद्धतीचे नियोजन व्हावे, अशा मागणीचे निवेदन मोहन जोशी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना आज (बुधवारी) दिले.

देशभरात व्यावसायिक गॅस थांबवला; घरगुती गॅसला प्राधान्य, काळजी करू नका – मुरलीधर मोहोळ

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात माध्यमांसमोर गॅस सिलेंडर वितरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ म्हणाले, देशभरात व्यावसायिक क्षेत्राचा गॅस थांबवला आहे. व घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात आलं आहे. काळजी करण्याचे कारण नाही. घरगुती गॅस कमी पडणार नाही. केंद्राने तशी काळजी घेतली आहे, त्याला काही कालावधी जावा लागणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका भारतियांना बसत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडर गॅस (दि. ५ मार्च) गुरुवारपासून कंपन्यांनी वितरणास व बुकिंगसाठी बंदी घातली आहे. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय हॉटेल व्यवसायातील कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असून पुणे-मुंबईतील हॉटेल व्यवसायांना लवकरच टाळे लावण्याची वेळ येईल, अशी भीती हॉटेल-रेस्टॉरंट अॅण्ड हॉटेलिंग असोशिएशन यांनी केली आहे. कोरोनामध्येही एवढी वाईट अवस्था नव्हती झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी देखील रांगा दिसून आल्या आहेत. पुर्वी घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. तो आता ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. एका ग्राहकाला एकच सिलिंडर मिळणार आहे. यामुळे घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावाधाव सुरू असून बुकिंग करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गॅस वितरक कंपन्यांकडून ग्राहकांची गैरसोय होत आहे. तर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असलं तरी देखील प्रत्यक्षात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना वितरण कार्यालयांमध्ये जावे लागत आहे.
या
दरम्यान घरगुती गॅसच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या असतानाच आता घरगुती सिलिंडरसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा गॅसची बुकिंग करताना तांत्रिक अडचणी येत आहे, तर बुकिंग केल्यानंतर सिलिंडर मिळण्यास ४ ते ७ दिवसांचा विलंब होत आहे. तसेच घरगुती गॅस बुकिंगसाठी रांगा लागत आहेत. यामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना ३१ मे अखेर मुलभूत ओळखपत्रे उपलब्ध करुन द्यावेत-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ११: जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना त्यांचे मुलभूत अधिकार व शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याकरिता विविध ओळखपत्रे, प्रमाणपत्रे मोहिमस्तरावर ३१ मे २०२६ अखेर उपलब्ध करुन द्यावे, याकरिता सर्व संबंधित विभाग, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मिळून शिबीराचे आयोजन करावे, शिबीरामध्ये अधिकाधिक नागरिक उपस्थित राहतील, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ देण्याबाबत गठीत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, शासकीय तसेच अशासकीय सदस्य, तहसीलदार श्वेता पवार, पिंपरी-चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख, इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे सहायक संचालक तथा समितीचे सचिव प्रदीप संकपाळ तर तहसीलदार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, समाजातील शेवट्या घटकातील नागरिक विविध योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, त्यांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना आधार कार्ड, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेयर, अधिवास दाखला, जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अन्य आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याकरिता विशेष शिबीरे आयोजित करावीत. या शिबीराच्या ठिकाणी संबंधित विभागाचे सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, तसेच याठिकाणी प्रमाणपत्राचे सर्वप्रकारचे नमुने उपलब्ध करुन द्यावे. शासन निर्णय, परिपत्रकांतील तरतूदीनुसार सर्व नागरिकांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध करुन द्यावीत.

नागरिकांना विविध योजनांचा लाभ देतांना ओळखपत्रे व प्रमाणपत्राची आवश्यकता लागते. ही बाब विचारात घेता ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्यास कागदपत्राअभावी एकही नागरिक वंचित राहणार नाही तसेच या बैठकीत समिती सदस्यांनी केलेल्या सूचनाही विचारात घेवून त्यानुसार कार्यवाही करावी, असेही श्री. डुडी म्हणाले.

यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीच्या अनुषंगाने सूचना करुन जिल्ह्यात शिबीराचे आयोजन, नागरिकांना ओळख व प्रमाणपत्रे मिळण्याच्या कामी सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला:विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत माहिती

मुंबई-युद्धाच्या झळा अवघ्या जगाला बसत आहे. महाराष्ट्रात तर गॅस तुटवड्याची परिस्थिती दिवसागणिक हाताबाहेर जात आहे. त्यातच राज्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारी एक गाडीच चोरीला गेल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या पटलावर या घटनेचा उलगडा केल्यानंतर ही घटना समोर आली. मंत्रालयातील कॅन्टिनही बंद पडल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारकडे स्थिती स्पष्ट करण्यासाठी निवेदन करण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारकडून या प्रकरणी आज एखादे निवेदन येण्याची शक्यता आहे.

विजय वडेट्टीवार सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच म्हणाले, काल रात्री सभागृह एक ते दीड वाजेपर्यंत चालले. काल आमदारांना कॅन्टिन बंद होती. त्यांना तिथे त्यांना काहीही जेवणास मिळाले नाही. आज मंत्रालयात अशी स्थिती आहे की, कॅन्टिनसुद्धा बंद झाली. महाराष्ट्रातील हॉटेल्सही बंद झालेत. महिलांमध्ये या गॅस तुटवड्यामुळे अस्वस्थता आहे. सरकारने दरवाढ केली. पण मुंबई, नागपुरातील 30 टक्के हॉटेल्स बंद झालेत. पुढच्या 2 दिवसांत पुन्हा सगळे हॉटेल्स बंद होतील. हॉटेल्स बंद होऊ द्या. पण घरगुती गॅसच्या पुरवठ्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, या गॅस तुटवड्यामुळे उद्या घरची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसा करावा अशी चिंता निर्माण झाली आहे. सध्या ओटीपी दिल्यानंतर 15 दिवसांनंतर गॅस सिलिंडर मिळत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्रावर होणार परिणाम यावर सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. यातून पुढे काय परिणाम होणार आहे हे सर्वांना माहिती आहे. हे युद्ध वाढले तर त्याचे परिणाम उद्या दिसतील. पण सध्या परिस्थिती गंभीर आहे. कोल्हापूर व विदर्भातील काही शहरांसह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. गॅसच मिळत नाही.
एचपी कंपनीची गाडीच चोरीला

वडेट्टीवार म्हणाले, काल एचपीसीच्या गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला गेली. 18 लाख रुपये किंमतीची सिलिंडर होती. मुंबईतही पुरवठा बंद आहे. एवढी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आले पाहिजे. महाराष्ट्राला जनतेला सांगितले पाहिजे की, आता काय परिस्थिती आहे? या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत? आता आपल्याकडे उपलब्ध किती आहे? तुटवडा कसा निर्माण होणार आहे? काही बचत करायची असेल तर कशी करावी? यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला स्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. गॅस, पेट्रोलियम हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय असला तरी राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याची जबाबदारी महाराष्ट्र शासन घेत असते आणि घेईल. त्यामुळे दिलेल्या माहितीची नोंद घेऊन शासनाने उचित उपाययोजना करावी, असे ते म्हणाले. त्यावर वडेट्टीवार यांनी पुन्हा सरकारच्या निवेदनाची मागणी केली. पण अध्यक्षांनी प्रथम सरकारला उपाययोजना ठरवू द्या, त्यानंतर ते निवेदन करतील, असे स्पष्ट केले.

भारतात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली-१३ वर्षे कोमात असलेल्या युवकाचे माता पिता , कुटुंब उपचार , देखभाल करता करता आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचले आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी या 31 वर्षीय व्यक्तीला इच्छामृत्यूची परवानगी दिली . गाझियाबादचे रहिवासी हरीश राणा 13 वर्षांपासून कोमात आहेत. हरीश लाइफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने एम्सला (AIIMS) हरीश राणा यांना उपशामक काळजीमध्ये (पेलिएटिव्ह केअर) दाखल करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून जीवनरक्षक उपचार टप्प्याटप्प्याने काढता येतील.न्यायालयाने म्हटले की, ही प्रक्रिया अशा प्रकारे केली पाहिजे की रुग्णाची प्रतिष्ठा कायम राहील.
दिल्लीत जन्मलेले हरीश राणा चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेत होते. २०१३ मध्ये ते वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले. यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला लकवा मारला आणि ते कोमात गेले. ते काही बोलू शकत नाहीत किंवा काहीही अनुभवू शकत नाहीत.

डॉक्टरांनी सांगितले आहे की मुलाच्या मेंदूच्या नसा पूर्णपणे सुकल्या आहेत. त्याच्या उपचारासाठी त्यांना दिल्लीतील द्वारका येथील आपले घर विकावे लागले. आता ते गाझियाबादमधील दोन खोल्यांच्या एका फ्लॅटमध्ये राहतात. अशोक राणा ताज केटरिंगमध्ये नोकरी करत होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर आता त्यांना दरमहा ३६०० रुपये पेन्शन मिळते.

शनिवार आणि रविवारी ते गाझियाबादमधील एका क्रिकेट मैदानावर सँडविच आणि बर्गर विकतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारे घराचा खर्च आणि मुलाचा उपचार होऊ शकेल. ते म्हणतात की आता त्यांच्याकडे मुलाच्या उपचारासाठी पैसे नाहीत, त्यामुळे ते कोर्टाकडून इच्छामृत्यूची मागणी करत आहेत.

हरीशची आई निर्मला राणा यांचेही हेच म्हणणे आहे की, त्यांनी त्याच्या बरे होण्याची आशा गमावली आहे. त्यांच्यानंतर मुलाला पाहणारे कोणी नाही. हरीशचा एका महिन्याचा वैद्यकीय खर्च कमीतकमी 25-30 हजार रुपये आहे. निर्मला म्हणतात की, त्यांच्या मुलासोबत जे घडत आहे, ते देवाने कोणासोबतही करू नये.

डॉक्टरांनी हरीशला क्वाड्रिप्लेजिया या आजाराने ग्रस्त असल्याचे घोषित केले. यात रुग्ण पूर्णपणे फीडिंग ट्यूब म्हणजे खाण्यापिण्याच्या नळीवर आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर अवलंबून असतो. यात बरे होण्याची कोणतीही शक्यता नसते.

आई-वडील हरीशची इच्छामृत्यूची मागणी करत आहेत, कारण सुमारे 13 वर्षांपासून अंथरुणावर पडून असल्यामुळे हरीशच्या शरीरावर बेडसोर्स म्हणजे खोल जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती सतत खालावत चालली आहे.

ही स्थिती हरीशसाठी खूप वेदनादायक आहे. कुटुंबासाठी त्याला असे पाहणे मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण झाले आहे. व्हेंटिलेटर, औषधे, नर्सिंग आणि देखभालीवर अनेक वर्षांपासून इतका खर्च झाला आहे की, कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचले आहे.
2005 मध्ये कॉमन कॉज नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने (NGO) निष्क्रिय इच्छामरणाच्या अधिकाराची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर 9 मार्च 2018 रोजी CJI दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली.

भारताने बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवले

भारताने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून क्रॉस-बॉर्डर पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेल पाठवणे सुरू केले आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPC) चे अध्यक्ष मोहम्मद रेजानुर रहमान यांनी सांगितले की, मंगळवारपर्यंत सुमारे 5,000 टन डिझेलचा पहिला साठा बांगलादेशात पोहोचला आहे.बांगलादेश सध्या इंधनाच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहे. याचे मुख्य कारण अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यात आलेला व्यत्यय आहे. बांगलादेश आपल्या गरजेच्या सुमारे 95% इंधन मध्य पूर्वेतून आयात करतो.

‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’ सारख्या मार्गांवर तणावामुळे पुरवठा थांबला आहे. यामुळे बांगलादेशातील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक शहरांमध्ये सरकारला तेलाची रेशनिंग करावी लागली आहे, जिथे बाईकसाठी 10 लिटर आणि कारसाठी 40 लिटरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.हे डिझेल ‘भारत-बांगलादेश फ्रेंडशिप पाइपलाइन’द्वारे पाठवले जात आहे. याचे उद्घाटन मार्च 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी केले होते. नुमालीगढ रिफायनरीपासून सुरू होऊन ही पाइपलाइन उत्तर बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील पार्बतीपूर डेपोपर्यंत जाते.

बीपीसीच्या अधिकाऱ्यांनुसार, सोमवारी दुपारी 3:20 वाजता पंपिंग सुरू झाली. दर तासाला सुमारे 113 टन तेल पाठवले जात आहे, जे पूर्णपणे पोहोचायला सुमारे 44 तास लागतील.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वार्षिक करारानुसार, भारत दरवर्षी पाइपलाइनद्वारे 1.80 लाख टन डिझेलचा पुरवठा करेल. बीपीसीचे अध्यक्ष रेजानुर रहमान यांनी सांगितले, “5,000 टनची ही खेप याच कराराचा भाग आहे.

पुढील सहा महिन्यांत आम्हाला 90,000 टन डिझेल मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आपल्या देशात इंधनाची उपलब्धता स्थिर होईल.” पाइपलाइनद्वारे पुरवठा झाल्यामुळे रेल्वे टँकरच्या तुलनेत वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर भारत आणि बांगलादेशचे ऊर्जा संबंध बिघडले होते. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने भारतासोबतच्या अनेक करारांचा आढावा घेतला होता.अदानीच्या झारखंडमधील ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवठ्यावरूनही वाद झाला होता. तथापि, आता ढाका येथील राजकीय बदलांनंतर भारताने डिझेल पाठवणे हे या गोष्टीचे संकेत आहे की दोन्ही देशांमधील ऊर्जा संबंध पुन्हा रुळावर येत आहेत.शेख हसीना बाहेर पडल्यानंतर अंतरिम सरकारने भारतासोबत झालेल्या वीज आणि वायू करारांना ‘अटींनुसार प्रतिकूल’ म्हटले होते. थकबाकी न भरल्यामुळे अदानी पॉवरने पुरवठा अर्धा केला होता, जो मार्च 2025 मध्ये देयके सुरू झाल्यानंतर पूर्ववत करण्यात आला.

व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे दावे दिशाभूल करणारे, शासनाकडून महत्त्वाचे आवाहन

आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. राज्यात घरगुती एलपीजी (LPG), व्यावसायिक गॅस आणि सीएनजीचा (CNG) तुटवडा निर्माण झाला असून, सिलेंडरसाठी ग्राहकांना आता अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत, मात्र राज्य सरकारने या अफवांचे खंडन करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. केंद्र सरकारने सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना ‘घरगुती एलपीजी’ पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यासंदर्भातील प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.
या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि दरात अचानक १५० ते २०० रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल मालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक ठिकाणी गॅस साठा संपत आल्याने हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल असोसिएशनने सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

एरवी बुकिंगनंतर २४ तासांत मिळणारा सिलेंडर आता ३ ते ५ दिवसांनंतर मिळत असल्याची माहिती आहे. पुरवठ्यातील तुटवड्यामुळे गॅस वितरकांवरही मोठा ताण आला असून, ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. “पुरवठा साखळीवर ताण असला तरी सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुण्याला क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीकर नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न: महापौर मंजुषा दीपक नागपुरे

  • पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

पुणे: खेळात आवश्यक असणारी प्रतिभा केवळ शहरांमध्येच असते असे नाही तर गावात, आदिवासी पाड्यातही असते. त्या दृष्टीनेच त्यांनाही वाव देण्यासाठी क्रीडाधोरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. महापौर चषक या स्पर्धेतही शहरातील प्रत्येक वस्तीतील प्रतिभावान खेळाडूला संधी मिळाली पाहिजे. महापौर चषक क्रीडा स्पर्धा हा केवळ दरवर्षी घ्यायचा उपक्रम नाही तर क्रीडानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला जागतिक पातळीकर नेण्यासाठीचे पाऊल आहे, असे मत पुण्याच्या लोकप्रिय महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका आयोजित पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंजूषा नागपुरे बोलत होत्या. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर आणि क्रिकेटर केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर आणि शांताराम जाधव, उपमहापौर परशुराम वाडेकर, शहर सुधारणा समिती अध्यक्ष स्मिता वस्ते,क्रीडा समिती अध्यक्ष नारायण गलांडे, नाव समिती अध्यक्ष पल्लवी जावळे, स्थानिक नगरसेवक धीरज घाटे, महेश आवळे, लताताई गौडा, राष्ट्रवादीचे पक्ष नेते सोपानकाका चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवक आणि पालिका आयुक्त नवलकिशोर राम व क्रीडा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशासाठी नवे शैक्षणिक धोरण स्वीकारले. त्यातही खेळांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याची भूमिका ठेवलेली आहे. याच्यातून क्रीडा क्षेत्राला आणखी वेग येणार आहे. पुण्यातील खेळाडूंनी जगभरात आपले नाव उंचावावे, अशी अपेक्षाही महापौर नागपुरे यांनी व्यक्त केली.नागपुरे म्हणाल्या,पुण्यात बॅडमिंटनसारख्या खेळाचा शोध लागला. गोपाळराव फडके यांच्यासारख्यांनी दूर परदेशात स्वखर्चाने जात खो खो सारखा खेत पोचवला, शिवरामपंत दामलेंसारख्यांनी महाराष्ट्रीय मंडळ स्थापन करून तरुणांमध्ये शारीरिक सामर्थ्य, आरोग्य आणि राष्ट्राभिमान रुजवण्याचे उ‌द्दिष्ट ठेवले. बुवा साळवींनी सातासमुद्रापार कबड्डी नेण्यात मोठे योगदान दिले. मामासाहेब मोहळांनी कुस्तीला वैभव प्राप्त करून देत, महाराष्ट्र केसरीसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू केली. या प्रत्येकाच्या प्रयत्नात तरुणांच्यातील उर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरली जावी, हा उद्देश होता.त्यांनी घालून दिलेली परंपरा आपण महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून आणखी सशक्त करूया, असेही नागपुरे म्हणाल्या.कार्यक्रमात केदार जाधव व मुरलीकांत पेटकर यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित खेळाडूंचा महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, एएमआर समूहाचे अध्यक्ष ए. महेश कुमार रेड्डी आणि ओबी हॉस्पिटॅलिटीजचे शेफ-ओनर हेमंत ओबेरॉय यांना सन्माननीय डी.लिट (विद्यानीधी) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी ही घोषणा केली. येत्या शनिवारी, १४ मार्च रोजी विद्यापीठाच्या ४४ व्या पदवीप्रदान सोहळ्यात त्यांना ही पदवी प्रदान केली जाईल.

डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून गोव्याचा कायापालट केला आहे. त्यांनी ‘स्वयंपूर्ण गोंय’ या मोहिमेद्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले.

‘स्वयंपूर्ण मित्र’ योजनेतून त्यांनी सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला. तसेच, ‘म्हजे घर’ योजनेमुळे गोवेकरांना स्वतःचा निवारा मिळाला आहे.

गोव्याचा निसर्ग जपून त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला औद्योगिक विकास इतर राज्यांसाठी आदर्श ठरला आहे.एएमआर समूहाचे अध्यक्ष ए. महेश रेड्डी यांची निवड त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी करण्यात आली आहे. त्यांनी गरजूंना मदतीचा हात देत दातृत्वाचा आदर्श निर्माण केला.

औद्योगिक क्षेत्राद्वारे राष्ट्रनिर्मितीचे काम आणि करुणा तसेच आध्यात्मिक मूल्यांवर आधारित दातृत्वाचा कृतीशील दृष्टिकोन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. कोविड संकटात त्यांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीला लक्षणीय योगदान दिले, ज्यामुळे रुग्णांच्या उपचारांना मदत झाली.

त्यांच्या पुढाकाराने तेलंगणातील ताडीचेर्ला आणि आसपासच्या गावांमध्ये आरोग्य आणि शिक्षणाचे अनेक कल्याणकारी उपक्रम राबवले जात आहेत.

ओबी हॉस्पिटॅलिटीजचे शेफ-ओनर हेमंत ओबेरॉय यांना भारतीय पाककलेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिल्याबद्दल सन्माननीय डी.लिट पदवीने गौरवण्यात येणार आहे. ते देशातील सर्वात लोकप्रिय शेफपैकी एक म्हणून ओळखले जातात.

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

पुणे, दि. १० : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी अधिकृत संकेतस्थळावर वाहनांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी अर्जदाराकडे अनुज्ञप्ती, बॅज, वाहन परवाना, रेशनकार्ड, आधारकार्ड व पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. पात्र चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी आल्यास चालकांना मदत करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मार्गदर्शनासाठी ०२०-२६०५८०८० हा विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी पुणे जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक-मालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.