कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या आक्रमक आंदोलनाची शिक्षा
मुंबई-सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याच्या प्रकरणात भाजप नेते तथा पालकमंत्री नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका केली आहे. यामुळे राणे यांना मोठा दिलासा दिला आहे. पण याच प्रकरणाशी संबंधित एका खटल्यात कोर्टाने त्यांना 1 महिन्याचा कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे त्यांची अडचण झाली आहे.
नीतेश राणे यांनी काँग्रेसमध्ये असताना मुंबई – गोवा महामार्गावरील चिखल व खड्ड्यांविरोधात आंदोलन केले होते. तेव्हा त्यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. शेडेकर यांच्या फिर्यादीनुसार यासंबंधी नीतेश राणे यांच्यासह जवळपास 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी त्यांच्यासह कणकवलीचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर आदींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर नीतेश राणे यांच्यासह सर्वांची निर्दोष सुटका झाली.
प्रस्तुत प्रकरणात नीतेश राणे यांच्यावर भादंवि कलम 353, 332, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यातील कलम 353, 332 व 506 कलमांतर्गत नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका झाली, पण यातील 504 कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी नीतेश यांना 1 महिन्याचा कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी या शिक्षेला स्थगिती देण्याचा अर्ज दाखल केला आहे. याविषयी कोर्टात लवकरच रिव्हिजन दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना मुंबई – गोवा महामार्गावरील चिखळ व खड्ड्यांचा जाब विचारला होता. त्यावेळी त्यांनी गडनदी पुलावर शेडेकर यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. सर्वसामान्य जनता या मार्गावर दररोज चिखलाचा मारा सहन करते. आज तुम्ही तो अनुभवा, असे नीतेश राणे त्यावेळी म्हणाले होते.
दरम्यान, नीतेश राणे यांचे वडील तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केला होती. तसेच नीतेश यांचे कानही टोचले होते. मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांविषयी सर्वसामान्य नागरिकांत मोठा रोष आहे. या प्रकरणी संताप येऊन आंदोलन करणे योग्य आहे. ते आपण समजू शकतो, पण अशा पद्धतीची हिंसा अयोग्य आहे. त्याला मी अजिबात पाठिंबा देत नाही. मी नीतेश यांना त्यांच्या समर्थकांनी केलेल्या कृत्याविषयी माफी मागावी असे सांगणार नाही. कारण तो माझा मुलगा आहे. पण चूक नसताना मी माफी मागू शकतो, तर मग मुलालाही माफी मागावीच लागेल, असे नारायण राणे म्हणाले होते.

