पुणे:पटवर्धन बागेतील टँकर पॉईंट येथील बंद मीटर चा घोळ आणि मोफत टँकर चा झोल क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी चव्हाट्यावर मांडत महापालिका आयुक्तांना या घोटाळ्याचा छडा लावून त्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे.
ते म्हणाले, आज एरंडवण्यातील पटवर्धन बागेतील टँकर पॉईंट येथे पाहणी केली असता तेथील मीटर 16 डिसेंबर 2025 पासून बंद असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणाहून पुणे मनपा नागरिकांना “मोफत पाणी” टँकर च्या माध्यमातून पुरविते व यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे ( ज्या सोसायटीत किंवा वस्तीत पाणी पुरवठा कमी झाला असेल तेथे मागणीनुसार टँकर ने पाणी पुरवठा केला जातो ) अशी माहिती संदीप खर्डेकर यांनी दिली.पटवर्धन बागेतील टँकर पॉईंट वरून प्रभाग क्रं. 10,11,29,30,31,32,33 एवढ्या मोठ्या परिसरात पाणी पुरवठा केला जातो,मात्र येथील मीटर बंद असल्यामुळे नेमके किती टँकर भरले गेले किंवा किती पाणी वितरित केले गेले याचा नेमका हिशोब कसा लागणार असा प्रश्न क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी उपस्थित केला आहे.
अश्या मोफत टँकर चा मोठा झोल असल्याचे काही वर्षांपूर्वी सजग नागरिकांनी लक्षात आणून दिले, कारण एक दिवस याठिकाणी गुप्तपणे रेकॉर्डिंग केली असता रजिस्टर मध्ये 18 टँकर ची नोंद आणि प्रत्यक्षात 50 टँकर भरले गेल्याचे निदर्शनास आले होते.तेव्हा सर्व टँकर पॉईंट वर मीटर बसविण्यात आले.
मात्र आता जर मीटर बंद असेल तर मनपा पाण्याचा हिशोब कसा ठेवते याचा खुलासा करावा अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.
तसेच आणखी एक त्रुटी लक्षात आली ती म्हणजे रजिस्टर वर अथवा चलनावर कोठेही संबंधित सोसायटी अथवा वस्तीतील पदाधिकारी किंवा नागरिकांची पोच पावती वर सही नाही, यामुळे देखील ह्या मोफत यंत्रणे बद्दल शंका उपस्थित होतात.
तरी शहरातील सर्व टँकर पॉईंट ची त्वरित पाहणी करून मीटर सुरू असल्याची खात्री करावी आणि डिलिव्हरी नंतर मोफत पाणी मिळाल्याच्या चलनावर संबंधितांची सही घ्यावी अशी मागणी देखील संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
याच बरोबर गैरप्रकार टाळण्यासाठी कोणत्या कारणाने व कोणा माननीयांच्या निर्देशावरून अथवा थेट नागरिकांच्या मागणीवरून मोफत टँकर पाठविण्यात आला याची नोंद असणे देखील गरजेचे वाटते.
तसेच जर मनपा स्वतःच्या टँकर पॉईंट वरील मीटर महिनोंमहिने नादुरुस्त अवस्थेत ठेवत असेल तर भावी काळात पुण्यनगरीला 24×7 पाणीपुरवठा सुरू झाल्यावर लक्षावधी पाणी मीटर ची निगा कशी राखली जाणार व त्यायोगे अचूक किती पाणी वापर झालाय हे कसं कळणार अशीही शंका संदीप खर्डेकर यांनी उपस्थित केली आहे.त्यामुळे आत्तापासूनच 24×7 पाणीपुरवठा चे मीटर तपासणी व दुरुस्ती बाबत ची यंत्रणा कार्यान्वित करावी अशी ही मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

