Home Blog Page 14

पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा – महापौर नागपुरे यांचे निर्देश

पुणे: पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी यांनी आज तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीने अंमलबजावणी करत ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे कडक निर्देश दिले.

या पाहणीदरम्यान तलावातील पाण्याची गुणवत्ता, वाढता दूषितपणा तसेच सीओडी (Chemical Oxygen Demand) व बीओडी (Biochemical Oxygen Demand) यांच्या पातळीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तलावात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात उभारण्यात आलेल्या एसटीपी (Sewage Treatment Plant) प्रकल्पांची कार्यक्षमता तपासून, प्रक्रिया केलेले पाणी निर्धारित निकषांनुसारच तलावात सोडले जाईल यासाठी काटेकोर देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच पुणे महानगरपालिकाच्या हद्दीपर्यंतचे नाले, पाणीप्रवाह व संबंधित यंत्रणांची सखोल पाहणी करण्यात आली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, अडथळे तसेच अनधिकृत सांडपाणी सोडण्याच्या प्रकारांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तलावात थेट जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी स्वतंत्र नाले उपयोजना (Drainage Diversion) प्रभावीपणे राबविण्याचे आदेशही देण्यात आले.

पाषाण तलावाचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी कोणत्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले….

  • एसटीपी प्रकल्प नियमित व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवून त्यांच्या कार्यक्षमतेत सातत्याने सुधारणा करणे
  • नाल्यांमधील सांडपाणी कोणत्याही परिस्थितीत थेट तलावात जाणार नाही, याची खात्री करणे
  • तलाव परिसरात विशेष स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविणे
  • पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून पारदर्शक अहवाल प्रणाली कार्यान्वित करणे
  • स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून व्यापक जनजागृती मोहीम राबविणे

या पाहणी दरम्यान नगरसेविका रोहिणी चिमटे व नगरसेविका मयुरी कोकाटे उपस्थित होत्या. तसेच प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (पर्यावरण) सौ. किशोरी शिंदे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सहभाग घेतला.

महापौर नागपुरे यांनी स्पष्ट केले की, पाषाण तलावाचे संवर्धन व प्रदूषणमुक्ती ही शहराच्या पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असून, सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून अल्पावधीत ठोस व दृश्यमान परिणाम साध्य करावेत.

बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसचे हडपसर रेल्वे स्थानकावर महापौर मंजुषा नागपुरेंनी केले स्वागत..

पुणे: भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस या नव्या रेल्वे सेवेचे उद्घाटन केले.या ऐतिहासिक प्रसंगी, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी हडपसर रेल्वे स्थानकावर ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री ०० वाजून २५ मिनिटांनी आलेल्या गाडीचे स्वागत केले.
मध्य रेल्वे, पुणे विभागाच्या वतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक एच. कुमार वर्मा (IRSS) यांनी हा स्वागत समारंभ आयोजित केला होता.
या कार्यक्रमास नगरसेवक सुनील पांडे , नगरसेवक रविंद्र साळेगावकर,मारुती तुपे उपस्थित होते..

अमृत भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये:
अमृत भारत एक्सप्रेस ही गाडी प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये एर्गोनॉमिकली डिझाईन केलेले बर्थ, स्वयंचलित दरवाजे, उन्नत स्वच्छता सुविधा, आणि कवच या अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे.
या उद्घाटन सोहळ्यात दोन नव्या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले:
१. बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस
२. अयोध्या कॅन्ट – मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्सप्रेस
महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी सांगितले की, “हडपसर रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे आगमन हे पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. भारतीय रेल्वेच्या या आधुनिक सेवेमुळे पुणे आणि बनारस या दोन सांस्कृतिक शहरांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.”

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार!

  • पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा स्पष्ट इशारा
  • आयटी पार्कमधील नालेसफाईसाठी ३१ मेची ‘डेडलाईन’
  • नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे पीएमआरडीएसह एमआयडीसी व ग्रामपंचायतींना निर्देश

पुणे: पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात पाणी साचल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस आता थेट संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. नियोजनाअभावी पाणी साचल्यास किंवा कोणतीही आपत्ती ओढवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत’ जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशारा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात बुधवारी (२९ एप्रिल) आयोजित पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ३१ मे २०२६ पूर्वी सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. हिंजवडी आणि माण आयटी पार्क परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ बैठका नकोत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी, असे स्पष्ट करत महानगर आयुक्तांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), एमआयडीसी, पीएमआरडीए, संबंधित ग्रामपंचायती आणि पाटबंधारे विभाग यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. विशेषतः प्रमुख नाले आणि आयटी पार्कमधील अंतर्गत रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी एकमेकांवर जबाबदारी न ढकलण्याबाबत त्यांनी बजावले.

पावसाळापूर्व कामांचा आढावा घेताना महानगर आयुक्तांनी महत्त्वाचे निर्देश दिले. त्यात हिंजवडी-माण परिसरातील मुख्य नाले तातडीने मोकळे करून त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करावे, नाल्यांच्या प्रवाहात अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे ३१ मेपूर्वी हटवावीत, तसेच नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहातून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी पीएमआरडीएसह एमआयडीसी व संबंधित ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस शाखेने सुचवलेल्या उपाययोजना राबवण्याचे बैठकीत ठरले. यावेळी हिंजवडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी आयटी पार्क परिसरातील ‘ब्लॅक स्पॉट्स’ आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची माहिती सादर केली.

“पावसाळापूर्व कामांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. जर तांत्रिक त्रुटींमुळे किंवा नियोजनाअभावी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली, तर संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई निश्चित केली जाईल.”— डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

या बैठकीला पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहआयुक्त पूनम मेहता, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) राहुल सोनवणे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. दुबल यांच्यासह जिल्हा परिषद, वन विभाग आणि एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी तसेच हिंजवडी व माण येथील ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे,बच्चू कडू निश्चित,झिशान सिद्दीकींचा अर्ज दाखल

मुंबई -विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उमेदवारी निश्चित झाल्याने निवडणुकीतील समीकरणे अधिक स्पष्ट होत आहेत.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून बच्चू कडू, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे, ​मात्र, काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकींचे पुनर्वसन:विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेचा पेच अखेर सुटला आहे. पक्षाचे तरुण नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आला आहे. काल रात्री उशिरापर्यंत चाललेली कोअर कमिटीची बैठक आणि त्यानंतर झालेली वरिष्ठ नेत्यांची चर्चा यानंतर झिशान सिद्दिकींच्या नावावर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली आहे.झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, मात्र त्यानंतरही ते पक्षात सक्रिय राहिले. पक्षातील तरुण आणि अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे बाबा सिद्दिकी हे पहिले बडे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सिद्दिकी कुटुंबाची राजकीय वारसदारी झिशान सिद्दिकी समर्थपणे सांभाळत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी झिशान यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या याच निष्ठेचा विचार करून पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्दिकी म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी वहिनी साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांचे आभार मानतो. त्यांनी मला एक संधी दिली. अजितदादांचा जो वादा होता, तो त्यांनी पूर्ण केला. माझ्यासारख्या युवा नेतृत्त्वाला त्यांनी विधान परिषदेत पाठवले. देशातील युवा वर्गाला राष्ट्रवादी पक्षाशी जोडण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल. अल्पसंख्याकांसाठी आवाज उठवेल. वहिनी साहेबांच्या नेतृत्त्वा महिला सक्षमीकरणासाठी काम करू. आपले दु:ख बाजुला ठेवून आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे, असे वहिनीसाहेबांनी मला सांगितले आहे.
काल रात्री ‘देवगिरी’ निवासस्थानी नेत्यांमध्ये फोनवरून आणि प्रत्यक्ष प्रदीर्घ चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. महायुतीमधील मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर झिशान सिद्दिकींचे नाव शर्यतीत आघाडीवर आले. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची इतर नावांसाठी आग्रही भूमिका होती, मात्र सिद्दिकी यांच्या नावावर अखेर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 23 एप्रिल 2026 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज 30 एप्रिल 2026 ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 2 मे 2026 रोजी अर्जांची छानणी करण्यात येणार असून, 4 मे 2026 हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे राऊतांचे आवाहन”
पुणे, दि. 29 – शिवसेना ही केवळ सत्तेवर अवलंबून नसून तिची खरी ताकद संघटनात आहे, त्यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची क्षमता राखतो, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पुण्यातील बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात काम मजबूत करण्याचे आवाहन केले तसेच लवकरच शिवसेना पुणे शहरात पक्षीय स्तरावर बदल करण्याचे भाकीत देखील केले.महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष सोडून गेलेल्या बहुतांश नगरसेवकांचा पराभव झाल्याचा उल्लेख करत, “मिसिंग लिंक” शोधून जनतेशी पुन्हा नाळ जोडण्यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात निवडणुका नसल्याने संघटन विस्तारासाठी ही संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.सचिन अहिर यांनी पुण्यातील निवडणुकीत पॅनेल पद्धतीचा फटका आपल्याला बसल्याचे मान्य करत, कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले. तर वसंत मोरे यांनी मतांची घट असूनही मिळालेला पाठिंबा सकारात्मक असल्याचे सांगितले.
शहरप्रमुख संजय मोरे यांनी पक्ष वाढीसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील आहोत आणि नव्या जोमाने कामाला लागू असे सांगितले.दरम्यान, पश्चिम बंगाल संदर्भात बोलताना राऊत यांनी भाजपवर टीका करत तृणमूल काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचा उल्लेख केला आणि तेथे भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल, असा दावा केला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन अहिर, माजी आमदार महादेव बाबर, राज्य संघटक वसंत मोरे , शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आणि युवासेना पदाधिकारी तसेच प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी ‘पीएमआरडीए’ ‘ॲक्शन मोड’मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून ‘ग्राउंड झिरो’वर पाहणी!

पुणे : पुणेकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या आणि आयटी हबला शहराशी जोडणाऱ्या माण-हिंजवडी-शिवाजीनगर या ‘मेट्रो मार्ग-३’ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने ‘पीएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी विविध ठिकाणांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतला.

‘पीएमआरडीए’द्वारे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाच्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ (PITCMRL) सोबत हा प्रकल्प राबविला जात आहे. मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात कामाची गुणवत्ता आणि प्रगतीवर विशेष भर देण्यात आला. पाहणीदरम्यान विद्यापीठ चौकातील पाषाण रॅम्पजवळ महापालिकेच्या जलवाहिनीतून मोठी पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. या गळतीमुळे मेट्रोच्या कामात अडथळा येत असल्याने अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही गळती तातडीने थांबविण्याच्या सूचना दिल्या.
तसेच, ‘पीएआर २१’ येथील पाहणीदरम्यान मेट्रोच्या जिन्यासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी करण्याचे आदेशही देण्यात आले. यामुळे या भागातील जिन्याचे प्रलंबित काम मार्गी लागणार आहे. बाणेर येथील ‘पीएआर १५’ ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो जिन्याच्या कामाचीही यावेळी पाहणी करण्यात आली. केवळ वेगच नव्हे, तर कामाची गुणवत्ताही आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी, असे निर्देश के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता उमेश मल्लावत, कनिष्ठ अभियंता सुमीत यादव, गजानन पाटील यांच्यासह पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते उपस्थित होते.

“प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्याला आमचे प्राधान्य आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर दिलासा मिळावा, यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासन प्रयत्नशील आहे.”
— के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त महानगर आयुक्त, पीएमआरडीए.

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी ‘फुलचंद पानात’ नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मादक बंट्याच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 3 लाख 38 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस नाईक सचिन जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. शिवाजीनगर येथील दीनदयाळ हॉस्पिटलजवळील एका निर्जन रस्त्यावर एक संशयास्पद टेम्पो उभा असल्याची माहिती होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पथकाने टेम्पोची तपासणी केली असता, त्याच्या मागील दरवाजाच्या आतमध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर मादक गोळ्यांची पाकिटे असलेली पोती आढळून आली. पोलिसांनी तात्काळ हा टेम्पो आणि त्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी विष्णू रामरतन गुप्ता (वय 34, रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, जप्त केलेल्या या मादक गोळ्यांचा वापर पुण्यातील ‘फुलचंद पानात’ नशा करण्यासाठी केला जात होता. पोलीस या प्रकरणातील पुढील तपास करत असून, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सपोनि संतोष पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, दीपक रोमाडे आणि श्रीकांत मखरे यांचा या पथकात समावेश होता.

या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. पान टपरीवर होणाऱ्या अशा बेकायदेशीर कृत्यांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

0

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

मुंबई/पुणे , २९ एप्रिल (खंडूराज गायकवाड) : राज्य सरकारने राज्यभरात ६० खासगी स्टॅम्प ड्युटी व दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. घर, जमीन खरेदी-विक्रीसंबंधी दस्तऐवजांची नोंदणी आता महसूल विभागाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत केली जाणार आहे. मात्र, या सेवेसाठी नागरिकांना सुमारे ५,२०० रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे.
अधिक सुविधा व सुधारित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने हा निर्णय घेतला आहे. पासपोर्ट नोंदणी कार्यालयांच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून, राज्यातील सध्याच्या ५१७ सरकारी नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयांच्या व्यवस्थेत टप्प्याटप्प्याने बदल करण्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहेत.
महसूल विभागाने व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिस कंपनी VFS Global Services या खासगी कंपनीला राज्यभर ही कार्यालये उभारणे व चालविण्याची जबाबदारी दिली आहे. या कार्यालयांमध्ये अधिक सुविधा, आधुनिक सोयी व सुटसुटीत व्यवस्था उपलब्ध होणार असून, प्रति नोंदणी सुमारे ५,२१८ रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
पहिल्या टप्प्यात ३० केंद्रे सुरू करण्यात येणार असून, ती मुंबई , ठाणे , पुणे , नागपूर आणि नाशिक या शहरांत उघडण्यात येतील.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही उपनिबंधक कार्यालयांची अवस्था अत्यंत खराब आहे. बसण्यासाठी जागा, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी तसेच योग्य प्रतीक्षागृह यांचा अभाव आहे. अनेक कार्यालये वातानुकूलितही नाहीत. मोठ्या शहरांतील घरखरेदीदार व कॉर्पोरेट क्षेत्रातील नागरिकांना सुसज्ज, सुविधायुक्त कार्यालयांची अपेक्षा असते. ही गरज लक्षात घेऊन खासगी कार्यालयांचा निर्णय घेण्यात आला आहे.”
या नव्या केंद्रांमध्ये वातानुकूलित प्रतीक्षागृह, कॅफेटेरिया, वाय-फाय, पार्किंग, दूरदर्शन सुविधा, स्वच्छ शौचालये आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने सर्वात कमी दराची निविदा सादर केल्यामुळे संबंधित कंपनीला मंजुरी दिली आहे. या खासगी कार्यालयांमध्ये सरकारी नियंत्रण कायम ठेवण्यासाठी उपनिबंधक व महसूल विभागातील कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
राज्यात सध्या ५१७ सरकारी नोंदणी कार्यालये कार्यरत आहेत. त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी आल्यानंतर सरकारने १०० कार्यालयांच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर केले होते. मुंबईतील काही कार्यालयांचे नूतनीकरण बिल्डर्स व दानशूर संस्थांच्या मदतीने करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्याच्या यशावर दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३० खासगी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय अवलंबून असेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निविदेच्या अटींनुसार कार्यालयांचा आकार, सुविधा, कर्मचारी संख्या व किमान मनुष्यबळ याबाबत स्पष्ट निकष ठरविण्यात आले आहेत. तसेच, ठराविक संख्येपेक्षा जास्त दस्तनोंदणी झाल्यास नफ्यातील वाटाही खासगी संस्थेला देण्याची अटही समाविष्ट करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट; भक्तांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई/पुणे (दि. २९): संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची वाढती संख्या आणि उपलब्ध सुविधा लक्षात घेता मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा विचार सुरू पालखी सोहळा प्रमुखांकडून सुरू असल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, भवानी पेठेतील मुक्कामाची परंपरा कायम ठेवण्याची विनंती केली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा लाखो वारकरी आणि भक्तांच्या श्रद्धेचा उत्सव आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची ही परंपरा पुणेकरांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे ही परंपरा अखंड सुरू राहावी, अशी मागणी आमदार रासने यांनी केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनीही आपले मत मांडले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन व संबंधितांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच भवानी पेठेतील मुक्कामाबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो.

याबाबत बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले :
“संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. भवानी पेठेतील मुक्कामाची परंपरा ही पुणेकरांच्या भावनांशी घट्ट जोडलेली आहे. पालखी सोहळ्याच्या नियोजनात कोणत्याही भाविकांना अडचण येऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. सर्व संबंधितांशी समन्वय साधून परंपरा अबाधित ठेवत सोहळा अधिक सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

तीन अमेरिकन नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई

0

पुणे -पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. “ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे,” असे सांगत पत्रके वाटणाऱ्या या तिघांनाही येत्या १० मे २०२६ पर्यंत भारत सोडून जाण्याचे अधिकृत आदेश देण्यात आले आहेत. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ५३, ६५ आणि ६६ वर्षे वयोगटातील हे तीन अमेरिकन नागरिक १९ ते २१ एप्रिल दरम्यान पर्यटक व्हिसावर भारतात आले होते. २६ एप्रिलपासून ते पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. २७ एप्रिल रोजी सकाळी हे तिघे पुण्याच्या शुक्रवार पेठ भागात फिरत असताना, त्यांनी एका खाजगी कॅब ड्रायव्हरला थांबवून त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्याला बायबल आणि ख्रिश्चन धर्माशी संबंधित इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील पत्रके देऊन धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केला.

यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. संबंधित कॅब चालकाने या प्रकाराची माहिती परिसरात रॅलीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. पोलिसांनी तातडीने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धार्मिक पत्रके आढळून आली. पुणे शहर पोलिसांच्या परदेशी नोंदणी कार्यालयाने (FRO) केलेल्या चौकशीत हे तिघेही पर्यटक व्हिसावर आले असताना धार्मिक प्रचार करत असल्याचे निष्पन्न झाले, जे भारतीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहे.

परदेशी नोंदणी कार्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, “व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या तिघांना ‘लीव्ह इंडिया नोटीस’ देण्यात आली आहे. त्यांना १० मे २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.” तपासात असेही समोर आले की, यापूर्वीही हे नागरिक कधी टुरिस्ट तर कधी बिझनेस व्हिसावर भारतात आले होते, मात्र त्यांचा मुख्य उद्देश धर्मप्रसार हाच असल्याचे दिसून आले आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी जुलै २०२५ मध्येही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका ४१ वर्षीय अमेरिकन नागरिकाला अटक केली होती. तो २०१६ पासून सातत्याने भारतात येत होता आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करत होता.

६० लाखाचा विमल गुटखा खेड शिवापुर टोल नाक्यावर पकडला

पुणे- पुणे पोलिसांनी माग काढून खेड शिवापुर टोल नाक्यावर आलेला एक ट्रक पकडून त्यातील ६० लाखाचा विमल गुटखा पकडला

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक २८/०४/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे आंबेगाव परिसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावरील सराईत आरोपीचा मोठ्या प्रमाणात भरलेला प्रतिबंधीत गुटख्याचा ट्रक नं. एम.एच.११ डी.डी.-६५२७ कात्रज घाटमार्गे पुणे येथे येणार आहे.
सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठांचे परवानगीने दिनांक २८/०४/२०२६ रोजी रात्रौ ००.३० वा. पासून कात्रज घाट येथे सापळा रचला परंतु बराच वेळ होवून गेला तरी सदरचा ट्रक कात्रज घाटातून न आल्याने त्याबाबत अधिक माहीती घेतली असता सदरचा गुटख्याने भरलेला ट्रक हा खेड शिवापुर टोल नाका येथे थांबल्याची खात्री झाली. सदरबाबत वरिष्ठांना माहीती देवून त्यांच्या परवागीने राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथील पोलीस मदत घेवून खेड शिवापुर टोल नाका येथे उभा असलेल्या ट्रक क्र. एम.एच.११ डी.डी.-६५२७ वरील चालक श्रीशैल तम्माराय हाळके, वय ३२ वर्ष रा. मु.पो उमदी, ता. जत, जि. सांगली यास ताब्यात घेतले.
सदर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल गुटखा मिळून आला असून सदरचा गुटखा हा पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावरील दोन आरोपीतांनी पुणे शहरात विक्रीसाठी मागवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

या बाबत राजगड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे गु.र.नं. १६६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर (अति कार्यभार गुन्हे) विवेक मासाळ, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे ३ शंकर खटके यांचे मार्गदर्शनखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो.निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, विठ्ठल साळुंखे, संजय राजे, अमोल सरडे, निलेश जाधव, विशाल भिलारे, मंगेश गुंड व अक्षय शिर्के तसेच महिला पोलीस अंमलदार आशा भिंगारे तसेच राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीणकडील पथकाने केली आहे.

5,000रु. पर्यंतच्या यूपीआय व्यवहारांसाठी फिंगरप्रिंट किंवा चेहरा ओळखीद्वारे पेमेंट प्रमाणीकरणाची सुविधा सुरू

मुंबई: आयसीआयसीआय बँक ने iMobile या बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे यूपीआय व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची अंमलबजावणी जाहीर केली आहे. या सुविधेमुळे  5,000 रु. पर्यंतचे व्यवहार चेहरा ओळख किंवा फिंगरप्रिंट प्रमाणीकरणाद्वारे अधिकृत करू शकत असल्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारतो. या नवीन सुविधेमुळे या मर्यादेपर्यंतच्या व्यवहारांसाठी यूपीआय PIN मॅन्युअली टाकण्याची गरज राहत नाही.

बायोमेट्रिक्स सादर होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ‘शोल्डर-सर्फिंग’चा धोका कमी होतो आणि जलद पेमेंट्स आणि सुरक्षितता असे दुहेरी फायदे मिळतात. ग्राहक पिअर टू पिअर  पैसे हस्तांतरण, दुकानातील पेमेंटसाठी QR स्कॅन करणे किंवा ऑनलाइन पेमेंट्स अशा यूपीआय व्यवहारांना त्यांच्या बायोमेट्रिक्सद्वारे अधिकृत करू शकतात. 5,000 रु. पेक्षा जास्तीच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना पेमेंट अधिकृत करण्यासाठी त्यांचा सध्या वापरत असलेला  यूपीआय PIN आवश्यक असेल.

आयसीआयसीआय बँकेचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे नेहमीच आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहिले आहे आणि आमच्या ग्राहकांना प्रगत डिजिटल उपायसुविधा पुरविण्यावर आमचा विश्वास आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण सादर करणे हे सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे आणि अधिक सुरक्षित व अखंड पेमेंट अनुभव सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. iMobile वर डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक पडताळणीचा उपयोग करून सुलभ वापर सुनिश्चित करत आम्ही व्यवहारांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीप्रमाणे PIN-आधारित आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण यापैकी निवड करण्याची लवचिकताही उपलब्ध आहे.”

ही सुविधा Android – v30 आणि IOS – v28.2 या iMobile अॅपच्या अत्याधुनिक व्हर्जन्सवर उपलब्ध आहे. Android वापरकर्ते फिंगरप्रिंटद्वारे व्यवहार अधिकृत करू शकतात तर IOS वापरकर्ते फेस रेकग्निशन म्हणजेच चेहरा ओळखीद्वारे हे करू शकतात.

iMobile वापरकर्ते काही सोप्या कृतीद्वारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेटर सहज सक्रिय करू शकतात:

·         iMobile अॅपमध्ये लॉग इन करा

·         UPI पेमेंट्सवर क्लिक करा आणि UPI सेटिंग्स निवडा

·         बायोमेट्रिक सक्षम करण्यासाठी खाते क्रमांक निवडा

·         ‘Use biometric for payments’ निवडा आणि ‘proceed’ वर क्लिक करा

·         पडताळणीसाठी आपला UPI PIN टाईप करा

·         डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक डेटा प्रमाणीकरण करा

सह्याद्री हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरीत जागतिक विक्रम:5 वर्षांत 750 हून अधिक ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे- सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया) क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गेल्या पाच वर्षांत हॉस्पिटलने ७५० हून अधिक मायक्रोव्हॅस्कुलर डिकंप्रेशन (एमव्हीडी) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या विक्रमी कामगिरीमुळे शेकडो रुग्णांना तीव्र वेदनांपासून मुक्ती मिळाली असून, पुणे न्यूरोसर्जरीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे.या ऐतिहासिक यशाची माहिती ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पंचवाघ आणि त्यांच्या पथकाने गेल्या २२ वर्षांत एकूण २७०० हून अधिक एमव्हीडी शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.

एमव्हीडी शस्त्रक्रिया ट्रायजेमिनल न्यूराल्जिया (चेहऱ्याच्या तीव्र वेदना), ग्लोसोफॅरिजियल न्यूराल्जिया आणि हेमिफेशियल स्पॅझम (चेहऱ्याचे स्नायू थरथरणे) यांसारख्या मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजारांवर प्रभावी मानली जाते. सह्याद्री हॉस्पिटलमधील या शस्त्रक्रियांचे वार्षिक प्रमाण आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. येथे प्रत्येक रुग्णाच्या शारीरिक स्थितीनुसार वैयक्तिक उपचार पद्धती आखली जाते.

पत्रकार परिषदेत डॉ. पंचवाघ यांनी सांगितले की, अनेक रुग्ण औषधांवर अवलंबून वर्षानुवर्षे वेदना सहन करतात. औषधांनी उपचार न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय असतो, परंतु माहितीच्या अभावामुळे योग्य उपचारात विलंब होतो. अचूक निदान, तज्ज्ञांचा सल्ला आणि वेळेवर घेतलेला निर्णय हेच उपचारांच्या यशाचे गमक आहे.

डॉक्टरांनी काही विशेष प्रकरणांची माहिती दिली, ज्यात अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. एका रुग्णाच्या मानेच्या वरच्या भागातील संवेदनशील मज्जातंतूजवळची गाठ यशस्वीपणे काढण्यात आली. दुसऱ्या एका प्रकरणात, मेंदूतील मोठी गाठ काढताना मेंदूच्या महत्त्वाच्या कार्यांना कोणताही धक्का न लावता शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यांतच हा रुग्ण दैनंदिन जीवनात परतला आणि त्याने तेलचित्रे काढण्यासही सुरुवात केली.

दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ हॅकर्स ने चालविला, गाणीही वाजली, मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली

नवी दिल्ली-

दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडिओ सुरू झाला. त्यावेळी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस खरिया यांचे खंडपीठ सुनावणी करत होते. ही घटना दुपारी १२:५६ वाजताची आहे.घटनेच्या वेळी खंडपीठ कोणत्या प्रकरणाची सुनावणी करत होते, हे स्पष्ट झाले नाही. पॉर्न व्हिडिओ सुरू होताच, तात्काळ सुनावणी थांबवण्यात आली. काही मिनिटांनंतर सुनावणी पुन्हा सुरू झाली, पुन्हा पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. या प्रकरणाची तक्रार दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटकडे करण्यात आली आहे.

व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अनेक लोक जोडले गेले होते. त्यापैकी एक क्षितिजीत सिंग होते. सुरुवातीच्या चौकशीत क्षितिजीतने दावा केला की त्याचे खाते अमेरिकेतून हॅक करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तो अश्लील व्हिडिओ कसा चालला याची त्यांना कोणतीही माहिती नाही.
बुधवारी सुनावणीदरम्यान व्हिडिओ सुरू झाल्यानंतर ‘तुमची प्रणाली हॅक झाली आहे’ असा संदेशही स्क्रीनवर दिसला. दोनदा पॉर्न व्हिडिओ चालला आणि तिसऱ्यांदा म्युझिक व्हिडिओ चालला. न्यायालयात 100 हून अधिक जनहित याचिकांवर (PIL) सुनावणी सुरू होती. हे प्रकरण त्याच वेळी समोर आले.

या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी सांगितले की, प्रशासकीय स्तरावर रजिस्ट्रार जनरल यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाची कार्यवाही रेकॉर्ड करणे नियमांच्या विरुद्ध आहे. जर कोणी रेकॉर्डिंग केली असेल तर कारवाई केली जाईल.अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी मुख्य न्यायाधीशांना सांगितले-