पुणे, ता. १४
छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य हे धर्मनिरपेक्ष व समाज परिवर्तन घडविणारे होते. त्यांनी स्री सक्षमीकरणाची क्रांती केली. महिलांना कायद्याचे पाठबळ दिले. वंचितांना आरक्षण दिले. संविधानातील समतेकडे जाणारे ते पाऊल होते, असे मत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेले ३२ वे गांधी दर्शन शिबिर रविवारी गांधी भवन, कोथरूड येथे झाले. यावेळी ‘राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधान’ या विषयावर लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते.
‘सामाजिक विषमतेच्या तळाशी’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार समीर गायकवाड यांचे व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या थॉटस् ऑफ पाकिस्तान या पुस्तकाविषयी पत्रकार मुक्ता कदम यांचे विवेचन आणि ‘मी सत्यशोधक ज्योतीराव फुले बोलतोय’ हा कुमार आहेर यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग या शिबीरात झाला.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, महात्मा फुलेंची प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी काम केले. महाराज हे आदर्श प्रशासक होते. शाहू महाराजांचा कालखंड महिला शिक्षणासाठी चांगला होता. सामाजिक न्याय देणारे संविधान शाहूंनी स्वराज्यात निर्माण केले. समतेचा, सुधारणेचा पथसिध्द मार्ग दिला. महाराजांनी आदेश काढून मागास व सवर्ण यांच्या साठी एकत्र शाळा सुरू केल्या. अस्पृश्यांना वकिली शिक्षण दिले. सर्व सार्वजनिक जागा सर्वांसाठी खुल्या केल्या. कृतीने मनुस्मृतीचे कायदे झिडकारले.

