पंढरपूर.दि.१४: शिवसेना नेत्या व विधानपरिषद मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी, पंढरपूरातील समाजाच्या वतीने डॉ. गोऱ्हे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दर्शनानंतर मंदिर परिसरातील विविध सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करताना डॉ. गोऱ्हे यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मंदिर परिसरातील अपुरी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच वॉटरप्रूफिंगची कामे करण्यात आली असली तरी काही ठिकाणी अद्याप पाणी गळती होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या बाबीकडे पुरातत्त्व विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
मंदिर परिसरासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक विद्युत आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त करताना त्यांनी भविष्यातील वाढती भाविक संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन केले. तसेच महिला भाविकांच्या सोयीसाठी हिरकणी कक्षामध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला दिल्या.
दरम्यान, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाने डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन प्रस्तावित मंदिर कॉरिडॉरबाबत निवेदन सादर केले. कॉरिडॉर उभारताना परिसरातील नागरिकांची घरे, जमिनी आणि त्यांच्या उपजीविकेचा विचार करण्यात यावा तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी शिष्टमंडळाला आश्वासित करताना सांगितले की, विकासकामे करताना स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने, यामध्ये नागरिकांची नेमकी किती घरे, दुकाने व जमीन संपादित होणार आहे त्याचे सविस्तरपणे विभाजन करून आढावा सादर करावा. कॉरिडॉर प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
डॉ. गोऱ्हे यांच्या भेटीदरम्यान मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांच्या सोयी आणि कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामुळे मंदिर विकास आणि भाविक सुविधांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

