Home Blog Page 13

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपयुक्त असणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच होणार असून, याबाबत कोणीही शंका बागळू नये. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या माध्यमातून लहान मुलांना आणि युवकांना वाचनाची गोडी लावण्यासाठी त्यांना उत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडण्याची आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.

पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेचे उत्साहात उद्घाटन झाले. ही जत्रा ४ मेपर्यंत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य सुरू आहे. यावेळी पाटील बोलत होते. उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत (दूरदृष्य प्रणालीद्वारे), महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार हेमंत रासने, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे, बालसाहित्यिक राजीव तांबे, अरूण गीते, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या उपस्थितीत मराठी शब्दकोषाचे प्रकाशन; तसेच मराठी शब्दकोष ॲपचा शुभारंभ करण्यात आला.

पाटील म्हणाले की, तरुण, लहान मुले वाचत नाही असे सरसकट म्हणणे, आता उचित ठरणार नाही. गेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला १५ लाख नागरिकांनी भेट दिली. यातील ५ लाखांपेक्षा अधिक उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि लहान मुले होते. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांची आहे त्यासाठी त्यांना दर्जेदार बालसाहित्य उपलब्ध करून द्यावे लागेल लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यातून वाचन चळवळ पुढे जावे, यासाठीच पुणे बाल पुस्तक जत्रेचा अभिनव प्रयोग राज्यात गेल्या दोन वर्षापासून होत आहे. या जत्रेत सर्व पुणेकरांनी कुटुंबासह सहभागी होऊन, मराठी भाषा आणि साहित्य-संस्कृती वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

नागपुरे म्हणाल्या की, नवीन पिढी वाचनाशी जोडली जावी, हे थोर महापुरुषांनी सांगितलेले स्वप्न पुणे बाल पुस्तक जत्रेतून काम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडली आहे. पुणे बाल पुस्तक जत्रा ही विकसित भारत संकल्पाची पायरी आहे. मुळणीनचांगल्या पुस्तकांना आपला मित्र करा. शिक्षक आणि पालकांनी मुलांना अधिकाधिक नाविण्यपूर्ण पुस्तके देण्यासाठी प्रयत्न करावे.या जत्रेत महानगरपालिका उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे, याचा आनंद आहे.

तांबे म्हणाले की, पुणे बाल पुस्तक जत्रा ही लहान मुलांसाठी केलेली आजची पेरणी आहे. या माध्यमातून पुढील दहा वर्षांसाठी नवे वाचक घडणार आहेत, ही फार मोठी बाब आहे. सोमण म्हणाले की, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे बाल पुस्तक जत्रेत सहभागी झाली आहे. येत्या काळात मुलांसाठी आम्ही बाल विभाग सुरू करीत आहोत. त्याचे मार्गदर्शक राजीव तांबे राहणार आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली. वाडेकर आणि निकम यांनी मुलांनी वाचनाकडे वळायला हवे, असे सांगत जत्रेला शुभेच्छा दिल्या. पांडे यांनी प्रास्ताविक करीत, पुणे बाल पुस्तक जत्रेची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केली. महाजन यांनी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे. या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असल्यास, आपल्याला पुस्तकांची, कलेची आणि साहित्य संस्कृतीची जोड द्यावी लागणार आहे. पुढील चार दिवस जत्रा सुरू राहणार असून, त्यात लहान मुलांसाठी १०० पुस्तकांची दालने आहेत. खेळण्यासाठी जुने पारंपरिक खेळ आहेत. दिवसभर विविध कार्यशाळा आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना घेऊन जत्रेला भेट द्यावी.—-राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
…….
मुलांना वाचनाकडे वळवण्याचे विधायक काम:
मुलांना पुस्तकांकडे वळवण्याचे विधायक काम आवश्यक असून, ते काम पुणे पुस्तक बाल जत्रेच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल आयोजकांचे आभार मानायला हवे.पुस्तकांची चळवळ राज्यभर पसरवण्यासाठी अशा जत्रा विभागीय स्तरावर व्हायला हव्यात. वाचनाची आवड लागण्याचे काम बालवयात व्हायला हवे. त्यामुळे मराठी साहित्य रुजण्यासाठी खूप मदत होते आणि मराठीची चळवळ अधिक सक्षम होण्यासाठी हातभार लागतो. मराठीच्या वैश्विक प्रचार – प्रसारासाठी मराठी भाषा विभाग सक्षम आहे. राज्य सरकारने लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मराठी भाषा वैश्विक केंद्र पुढील दोन महिन्यात निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होण्याची दाट शक्यता असून, तशा पद्धतीने चर्चा सुरू आहेत या संमेलनालाही पुणेकर मोठा प्रतिसाद देतील, यात शंका नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात अडथळा ठरत असलेल्या जलवाहिनीच्या स्थलांतरासाठी तांत्रिक बदल करण्यात आले असून, त्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव महापालिकेकडून स्थायी समितीसमोर मांडण्यात होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

सदर पुलाच्या कामादरम्यान रेल्वे रुळाखालील जुन्या १००० मिमी व्यासाच्या जलवाहिनीमुळे अडथळा निर्माण होत आहे. या जलवाहिनीमधून येरवडा, कल्याणीनगर, गांधी नगर, जेल रोड आदी भागांना पाणीपुरवठा केला जात असल्याने पर्यायी व्यवस्था उभारणे आवश्यक ठरले. त्यानुसार ‘जॅक अँड पुश’ पद्धतीने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

मात्र, प्रत्यक्ष कामादरम्यान कठीण खडकाचा सामना करावा लागल्याने कामाची गती मंदावली. त्यामुळे ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीचा अवलंब करण्यात आला. पुढील टप्प्यात काम करत असताना १९०५ च्या सुमारास बांधण्यात आलेल्या जुन्या आरसीसी डक्टचा अडथळा निर्माण झाला. रेल्वे प्रशासनाने हा डक्ट तोडण्यास परवानगी नाकारल्याने काम पूर्णपणे ठप्प झाले होते.

या पार्श्वभूमीवर आता विद्यमान आरसीसी डक्टमधूनच नवीन ८०० मिमी व्यासाची एम.एस. जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी डक्टमधील जुनी ६०० मिमी जलवाहिनी काढून टाकण्यात येणार आहे. या बदलास रेल्वे विभागानेही तत्त्वतः अनुकूलता दर्शविली असून लवकरच लेखी परवानगी मिळणार आहे.

मूळ निविदेमध्ये या अतिरिक्त कामांचा समावेश नसल्याने तेच काम सध्या सुरू असलेल्या ठेकेदार मे. आर.बी. कृष्णानी यांच्याकडूनच ०.१ टक्के कमी दराने करून घेण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी सुमारे २ कोटी ७ लाख रुपयांपर्यंत (जीएसटीसह) खर्च अपेक्षित आहे.

हा खर्च ‘साधू वासवानी पूल ते बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा’ या अर्थशीर्षकातून करण्यात येणार आहे. पुलाच्या कामात होणारा विलंब टाळण्यासाठी तसेच रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून बीआरसी (बिन रिफ्यूज कलेक्टर) प्रकारची १५ वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
सुमारे ८ कोटी २१ लाख रुपयांच्या या खरेदीसाठी स्थायी समितीने आज मान्यता दिली. असे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेच्या मोटार वाहन विभागामार्फत या वाहनांची खरेदी केली जाणार असून, यासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये मे. पगारिया ऑटो प्रा. लि. यांची निविदा सर्वात कमी दराची ठरली आहे. संबंधित संस्थेने मूळ निविदा रकमेपेक्षा १.५० टक्क्यांनी कमी दर सादर केला आहे.

त्यानुसार प्रति वाहन सुमारे ४६.४२ लाख रुपये (जीएसटी वगळून) खर्च अपेक्षित असून, १८ टक्के जीएसटीसह एका वाहनाची किंमत सुमारे ५४.७८ लाख रुपये ठरते. अशा १५ वाहनांसाठी एकूण खर्च ८ कोटी २१ लाख ७८ हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.

या खरेदीसाठी अंदाजित मूळ रक्कम सुमारे ७.०७ कोटी रुपये होती. निविदा प्रक्रिया डिसेंबर २०२५ मध्ये राबविण्यात आली होती. त्यानंतर पुनर्निविदाही काढण्यात आली होती. अंतिम टप्प्यात दोन निविदादार पात्र ठरले असून, त्यापैकी पगारिया ऑटो प्रा. लि. यांची निविदा कमी दराची असल्याने त्यांची शिफारस करण्यात आली आहे.

ही खरेदी सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकातील ‘नवीन समाविष्ट गावांसाठी कचरा वाहतूक वाहने खरेदी’ या अर्थशीर्षकातून करण्यात येणार आहे. या कामासाठी काही निधी उपलब्ध असला तरी उर्वरित सुमारे ८४ लाख रुपयांची तरतूद वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शहराच्या वाढत्या हद्दीमुळे कचरा संकलन व वाहतुकीसाठी अतिरिक्त वाहनांची गरज भासत असून, या प्रस्तावामुळे व्यवस्थापनात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आता खानावळीसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत 1050 रुपयांची वाढ :स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा; खानावळ अनुदान डीबीटी २१५० वरून ३२०० रुपये करण्याचा निर्णय

पुणे : घोले रोड येथील पुणे महापालिका संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खानावळीसाठीच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. सध्या दिली जाणारी २ हजार १५० रुपयांची मासिक रक्कम अपुरी पडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार लक्षात घेऊन ती ३२०० रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या या वसतिगृहात सध्या सुमारे ४०० विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. २०१७ पासून विद्यार्थ्यांना जेवणासाठी २ हजार १५० रुपये डीबीटी दिले जात आहेत. मात्र, वाढती महागाई आणि भोजनाचा वाढलेला खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते. विद्यार्थ्यांनी दरमहा ४ हजार १५० रुपयांची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २६ डिसेंबर २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार भोजन भत्त्याची मर्यादा लक्षात घेऊन महापालिकेने डीबीटी रक्कम ३ हजार २०० रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

सदर खर्चासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात समाज विकास विभागाच्या विविध अर्थशीर्षकांअंतर्गत एकूण १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या प्रवेशित १५७ विद्यार्थ्यांसाठी दरमहा सुमारे ५.०२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून वार्षिक खर्च सुमारे ४०.१९ लाख रुपये होणार आहे.

डीबीटी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीमार्फत मुख्य सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून मंजुरी मिळाल्यानंतर सुधारित रक्कम अंमलात येणार आहे.

हडपसरमध्ये लहान मुलांसाठी क्रीडा नर्सरी प्रकल्प- ११.६१ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता

पुणे : हडपसर येथील मगरपट्टा रस्त्यालगत आरक्षित क्रीडांगणाच्या जागेवर क्रीडा नर्सरी प्रकल्प उभारण्यासाठी पुणे महापालिकेकडून सुमारे ११.६१ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली. या प्रकल्पासाठी आगामी अंदाजपत्रकांमध्ये टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

पुणे पेठ हडपसर येथील स. नं. १३६/६ व १३७/४ या जागेवर क्रीडांगण आरक्षित असून, सुमारे १० हजार ४४१ चौ.मी. क्षेत्रफळावर हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. क्रीडा विभागाच्या मागणीनुसार महापालिकेच्या पॅनलवरील आर्किटेक्टकडून नकाशा तयार करण्यात आला असून त्यानुसार स्थापत्य व विद्युत विषयक कामे हाती घेतली जाणार आहेत.

या क्रीडा नर्सरी प्रकल्पाचा मुख्य उद्देश ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे, मैदानाशी नाते जोडणे आणि विविध क्रीडा प्रकारांची ओळख करून देणे हा आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये मॉडिफाईड फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, २०० मीटर धावपट्टी, टेबल टेनिस, रोलर स्केटिंग, बॅडमिंटन, लॉन टेनिस, ओपन जिम आदी सुविधांचा समावेश असणार आहे. महापालिका उपायुक्त किशोरी शिंदे यांनी क्रीडा नर्सरी ची संकल्पना मांडली होती.

भवन रचना विभागाकडून तयार करण्यात आलेल्या अंदाजित पूर्वगणनपत्रकानुसार या प्रकल्पासाठी एकूण ११.६१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून सन २०२६-२७ मध्ये ४ कोटी, २०२७-२८ मध्ये ४ कोटी आणि २०२८-२९ मध्ये ३.६१ कोटी रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातून क्रीडा नर्सरी सुविधांसाठी १ कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्पाचा एकूण खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ७२ (ब) नुसार पुढील वर्षांच्या अंदाजपत्रकांमध्ये आवश्यक निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

या प्रस्तावाला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची मान्यता मिळाली असून, स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे. शहरात लहान वयोगटातील मुलांमध्ये क्रीडा संस्कृती विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

विविधांगी रंगावलीतून पुण्यात अवतरली खंडेरायाची जेजुरी

‘जय मल्हार’ भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारले खंडोबा चरित्र ; श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन
पुणे : मणी मल्लाचा वध करण्यासाठी शिवाने घेतलेला खंडोबाचा अवतार… तळी भरणे…जागरण गोंधळ…खंडोबा आणि देवी म्हाळसाचा विवाह सोहळा… मल्हारी मार्तंडाचे तेजस्वरूप…अशा भगवान महादेवाच्या मार्तंड भैरव श्री खंडोबा देवाच्या अवताराचे चरित्र विविधांगी रांगोळ्या मधून साकारत जेजुरीच जणू पुण्यात अवतरली आहे.

श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवावर आधारित ‘जय मल्हार’ या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे  करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतातील द्वादश मार्तंड खंडोबा लिंग तसेच जेजुरी खंडोबा मंदिर येथील खंडोबा देवाच्या मानाच्या पगडीचे दर्शन देखील यानिमित्ताने पुणेकरांना मिळत आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीचे अध्यक्ष ऍड. विश्वास पानसे व विश्वस्त मंडळ, ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, अभिनेते देवदत्त नागे, कल्पेश गोसावी, सुप्रसिद्ध रंगावलीकार जगदीश चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक प्रा. अक्षय शहापूरकर, प्रतीक अथणे, अजित पवार, दिनेश मंची उपस्थित होते. प्रदर्शनादरम्यान बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात खंडेरायाच्या पालखीचे देखील आयोजन करण्यात आले होते.

प्रदर्शनात ‘श्री खंडोबा चरित्र’ ३० वेगवेगळ्या रांगोळ्यांमधून साकारण्यात आले आहे. प्रा. अक्षय शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. प्रत्येक रांगोळी साकारण्यासाठी साधारण ४० ते ४८ तासांचा कालावधी लागला असून, एकूण सुमारे ५०० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. हे प्रदर्शन ३ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

प्रा.अक्षय शहापूरकर म्हणाले, विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण रांगोळ्यांचा समावेश प्रदर्शनात आहे. यात थ्रीडी रांगोळी, पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी, पाण्याच्या मधोमध साकारलेली रांगोळी, हलती रांगोळी, टू-इन-वन रांगोळी आणि प्रतिबिंब रांगोळी यांचा समावेश असून, पाहणाऱ्यांसाठी हा एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

पुणे, दि. ३० : महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या कामकाजाला विशेष गती प्राप्त झाली आहे.

राज्यातील ६५० हून अधिक गोशाळांना भेटी देऊन तसेच १००० पेक्षा अधिक गोपालक, शेतकरी व संबंधित संस्थांशी संवाद साधत विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सन २०२५-२६ या वर्षासाठी देशी गाईंच्या संगोपनासाठी प्रती गाय प्रतिदिन ५० रुपये अनुदान योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे.

‘सेव्ह द काऊ’ उपक्रमांतर्गत ५,५०० हून अधिक गाईंचे संरक्षण करण्यात आले आहे. तसेच सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोमयापासून तयार करण्यात येणारे दिवे, मूर्ती, साबण यांसारख्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करण्यात येत आहे.

याशिवाय, गोमय उत्पादने, ई-गोकट्टा उपक्रम, अधिकृत संकेतस्थळ यांसारख्या माध्यमांतून गोसंरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत असून आयोगाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान करण्यात आले आहे. राज्यातील गोवंश संरक्षणासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.

महाराष्ट्रदिनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश व रोहित वेमुला विचार अभियान

प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’

पुणे: महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने समाजातील बदलत्या वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक आव्हानांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘लोकशाही संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश व रोहित वेमुला यांच्या नावाने पाच विचार अभियानाचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. युवकांना समाजपरिवर्तनाच्या केंद्रस्थानी ठेवत विचार, संवाद आणि कृती यांची नवी दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

येत्या शुक्रवारी (ता. १ मे) सायंकाळी ५ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी, विधिज्ञ अॅड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे व हमीद दाभोलकर यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभणार असून, विविध समकालीन विषयांवर त्यांचे मार्गदर्शन युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिली.

शिवराज मोरे म्हणाले, “अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक विचारांविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अभियान’, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि समतेचा विचार समाजात अधिक दृढ करण्यासाठी ‘गोविंद पानसरे अभियान’, विचारस्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि अभिव्यक्तीचा अधिकार अधिक बळकट करण्यासाठी ‘एम. एम. कलबुर्गी अभियान’, सत्याधारित पत्रकारिता, मीडिया साक्षरता आणि फेक न्यूजविरोधातील जनजागृतीसाठी ‘गौरी लंकेश अभियान’ व विद्यार्थी सन्मान, शिक्षणातील समानता आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश देण्यासाठी ‘रोहित वेमुला अभियान’ हाती घेण्यात आले असून, या पाचही अभियानाचा संयुक्त उद्घाटन सोहळा यावेळी होणार आहे.”

ही अभियाने केवळ उद्घोषणांपुरती मर्यादित न राहता राज्यभरातील शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग, शहरी वस्त्या आणि युवक संघटनांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. चर्चासत्रे, संवाद मालिका, प्रशिक्षण कार्यशाळा, सामाजिक जनजागृती मोहिमा आणि युवक नेतृत्व विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. युवकांनी विवेक, विज्ञान, समता आणि संविधानिक मूल्यांच्या आधारावर नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीत सक्रिय भूमिका घ्यावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. राज्यात वैचारिक प्रगल्भता, सामाजिक सलोखा आणि युवकांमध्ये संविधाननिष्ठ नेतृत्व निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक प्रभावी पाऊल ठरेल.”

“आजच्या डिजिटल आणि वेगवान युगात अंधश्रद्धा, समाजातील वाढते ध्रुवीकरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्माण होणारे प्रश्न, शिक्षणातील विषमता आणि फेक न्यूजच्या माध्यमातून होणारी दिशाभूल ही गंभीर आव्हाने समाजासमोर उभी आहेत. या पार्श्वभूमीवर युवकांनी केवळ प्रेक्षक न राहता विचारांचे वाहक, परिवर्तनाचे नेतृत्व आणि समाजजागृतीचे माध्यम बनावे, या व्यापक उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना आकाराला आली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

समाज माध्यमे दूर सारून स्वतःला ओळखा-अभिनेते संजय मिश्रा

0

एमआयटी डब्ल्यूपीयूत दादासाहेब फाळके स्टुडिओचे उद्घाटन

राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवाची घोषणा

पुणे, ३० एप्रिलः ” आपण स्वतःला विसरुन जग शोधत आहोत. अशा वेळेस समाज माध्यमे दूर सारुन स्वतःला ओळखा. गर्दीचा भाग होऊ नका. स्वतंत्र विचार करायला शिका.” असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट विद्यालयात अत्याधुनिक स्टुडिओचे उद्घाटन, राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ आणि कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळा कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विवेकानंद सभागृहात पार पडला. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


या प्रसंगी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता संतोष जुवेकर, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट विद्यालयाचे मेंटॉर अभिजित पानसे आणि सिनेमॅटोग्राफर प्रशांत महोपात्रा सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल विश्वनाथ कराड हे अध्यक्षस्थानी होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस व अरुण प्रकाश उपस्थित होते.
यावेळी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन भाषणात सांगितले की, ” दादासाहेब फाळके स्कूलचे विद्यार्थी निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव रोशन करतील याची मला खात्री आहे. आज मुंबई येथे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात देश विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच प्रमाणे या विद्यापीठात ही चित्रपटाचे ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी संख्या असेल.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, समाज शिक्षणाचे काम चित्रपट प्रभावीपणे करु शकतात. त्यामुळे शिक्षण संस्थाआणि अभिनेते सोबत सामाज शिक्षणाचे काम केले पाहिजे. व्यावसायिक तत्व निश्चितच पाळले जाते, पण शिक्षण व्यवसाय होऊ शकत नाही. जे आम्ही कायम जपले आहे. लोकशाही मूल्यांचे शिक्षण आम्ही देतो. मानसिकदृष्ट्या कायम आपण पाश्चात्य देशांना श्रेष्ठ मानले आणि स्वतःला दुय्यम लेखले आहे. वास्तव तसे नाही. माणूस म्हणून पुढे येऊन ठोस कामे केली पाहिजेत.
नागराज मंजुळे म्हणाले, कुठलाही चित्रपट करायचा असेल तर साधन अत्यंत आवश्यक आहे. त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे डोक्यात विचार हवं आणि त्यात स्पष्टता हवी. ज्या फिल्म फेस्टिवलची घोषणा करण्यात आली आहे ते अत्यंत महत्वाचे आहे.
या नंतर अभिनेता संतोष जुवेकर यांनी शुभेच्छा दिल्यात.
एमआयटी डब्ल्यूपीयूतील स्टुडिओ आशियातील सर्वेत्कृष्ट आहे असे डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्तावनेत सांगितले. अभिजित पानसे यांनी स्वागत पर भाषण केले.
सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले. अरुण प्रकाश यांनी आभार मानले.

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचेजाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. ३० : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.

या संदर्भात 13 जुलै 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या 150 अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत महाराष्ट्राला योग्य वाटा देण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रात देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर आणि राज्याची राजधानी मुंबई येथे राज्यस्तरीय प्रयोगशाळा तसेच राज्यातील विविध विभागांतील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.

केंद्र शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा मंजूर केली. याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेसाठी केंद्र शासनाकडून एकूण 29 कोटी 21 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या. कोविड-19 महामारीच्या काळात या प्रयोगशाळांनी आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे मोठी भूमिका बजावली.

याशिवाय, या प्रयोगशाळांमुळे विविध विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य झाले आहे. आतापर्यंत कोविड-19 (37,21,154), डेंग्यू (88,327), चिकनगुनिया (39,817), झीका (3,923), स्क्रब टायफस (7,091), इन्फ्लुएंझा (27,536), एचबीव्ही (1,53,180), रोटाव्हायरस (651) अशा एकूण 40,41,689 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळाली असून भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी राज्य अधिक सक्षम झाले आहे.
0000

काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा- हर्षवर्धन सपकाळांची घोषणा.. विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पहा

मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष आणि नाराजीनाट्य अखेर संपुष्टात आले आहे. काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असून, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. आज पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही अधिकृत घोषणा केली.

सकाळपर्यंत काँग्रेस स्वतंत्र उमेदवार देणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, दुपारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर संवाद झाला. बैठकीतील या चर्चेनंतर आपण विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे काँग्रेसने सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “आताच्या निवडणुकीत काँग्रेस आणि इतर पक्षांची भूमिका होती की, महाविकास आघाडीचा चेहर म्हणून उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे. आमची अशी धारणा असताना मी विधान परिषदेवर जाणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अंबादास दानवेंना उमदेवारी देत असताना एक प्रक्रिया होणे आवश्यक होते, असे आमचे मत आहे. आमच्यात कोणते भांडण किंवा वाद नव्हता. ठाकरे गटाने घेतलेला निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून काँग्रेस पक्ष त्याचे समर्थन करतो.”हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “आमच्या तिन्ही पक्षांमधील घडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी काय आहे, कशी आहे? अशा प्रकारच्या होणाऱ्या चर्चा निरर्थक आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका किंवा राजकीय भूमिका तिन्ही पक्ष एकत्रितरित्या रणनिती ठरवतील. त्यामुळे यापुढे आम्ही सोबत राहू. पुढील येणाऱ्या विधान परिषद आणि राज्य सभेच्या ज्या जागा असतील, त्यातही आमची आघाडी राहील. आमची ठाकरे गटासोबत दीर्घ चर्चा झाली.”

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “पुढील २०२८ आणि २०२९ विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्राध्यान्याने प्रतिनिधित्व करेल. अशी आमची तिन्ही मित्र पक्षांची चर्चा झाली. या निवडणुकीत काँग्रसचा पाठिंबा अंबादास दानवे यांना उमेदवार म्हणून राहील.”

उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर होते. त्यानंतर आज महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसची मनधरणी करण्यात ठाकरे गटाला यश आले. त्यामुळे आता काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे दानवे यांचा विजय सुकर मानला जात आहे.

विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी

भाजप

  1. सुनील कर्जतकर
  2. माधवी नाईक
  3. संजय भेंडे
  4. विवेक कोल्हे
  5. प्रमोद जठार
  6. प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक)

शिवसेना (शिंदे गट):

  1. नीलम गोऱ्हे
  2. बच्चू कडू

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट):

  1. झिशान सिद्दीकी

मविआ: शिवसेना उद्धव ठाकरे गट:

  1. अंबादास दानवे

‘शहाजीराजे’ सिनेमाची घोषणा

गोंधळ’नंतर संतोष डावखर यांची नवी ऐतिहासिक कलाकृती!

महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एक दमदार घोषणा करण्यात आली आहे. संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ चित्रपट झेप घेत असतानाच आता ते प्रेक्षकांसाठी आणखी एक भव्य ऐतिहासिक पर्व घेऊन येत आहेत. डावखर फिल्म्स प्रस्तुत आणि संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘शहाजीराजे’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये शहाजीराजांचा भव्य, गंभीर आणि राजेशाही अंदाज पाहायला मिळत असून, त्यातून चित्रपटाच्या दिमाखदार मांडणीची झलक दिसते. पोस्टरमध्ये चेहऱ्यामागे वाहणारा वारा त्या काळातील रणभूमीची तीव्रता आणि संघर्षाची जाणीव अधिक ठळकपणे करून देतो. शहाजीराजे भोसले यांची यशोगाथा सांगणारा हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट असून पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण झाली आहे.

संस्कृती आणि इतिहासाशी घट्ट नातं जपणाऱ्या विषयांवर काम करण्यासाठी ओळखले जाणारे संतोष डावखर यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकारत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कर्तृत्व, शौर्य आणि विचारांचा ठसा प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे.

‘गोंधळ’नंतर संतोष डावखर पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या आणि आशयघन विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, ‘शहाजीराजे’ हा चित्रपट २०२७ साली प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट तब्बल ६ भाषांमध्ये सादर केला जाणार असून, मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या भव्य चित्रपटात शहाजीराजेंची भूमिका नेमकी कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या कलाकाराची वर्णी लागणार असल्याचेही बोलले जात आहे. ‘गोंधळ’प्रमाणेच थरार आणि भव्यतेचा अनुभव ‘शहाजीराजे’मध्ये पाहायला मिळेल का, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना लागून राहिली आहे. इतिहासाची भव्यता आणि संस्कृतीचा गौरव मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, ’’महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने ‘शहाजीराजे’ची घोषणा करणं आमच्यासाठी खूप खास आहे. आपल्या इतिहासातल्या अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी शहाजीराजे हे अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, जो आम्ही अभिमानाने प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत. नेहमीप्रमाणेच आम्ही आपल्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी जोडलेली कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत.’’

एमआयटी-एडीटी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन क्रीडा हंगामाचा दिमाखदार समारोप

१८ क्रीडा प्रकार, १९०८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; स्कुल ऑफ कम्प्युटिंग अव्वल, वेदांत हिरुळकर व सई मोहिते उत्कृष्ट खेळाडू

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ दरम्यान आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत क्रीडा संस्कृतीला चालना दिली. अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या जोरावर विद्यापीठाच्या सर्व घटक संस्थांमध्ये एकूण १८ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धांमध्ये तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बुद्धिबळ, क्रिकेट, क्रॉस कंट्री, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, रोईंग, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलीबॉल, वॉटर पोलो आणि योगा या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धांना १५ विविध संस्थांमधील १९०८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेत विजेते आणि उपविजेते खेळाडूंना एकूण ८१ सुवर्ण व ८१ रौप्य पदकांचे वितरण करण्यात आले. एकूण कामगिरीच्या आधारे एमआयटी स्कूल ऑफ कम्प्युटिंग (एसओसी) यांनी २१ सुवर्ण व १४ रौप्य पदकांसह प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांनी १९ सुवर्ण व २१ रौप्य पदकांसह द्वितीय स्थान मिळवले, तर एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी) यांनी १७ सुवर्ण व ९ रौप्य पदकांसह तृतीय स्थान मिळवले.

एमआयटी एसओसीचा वेदांत संजय हिरुळकर याला ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू’ तर एमआयटी एसबीएसआरची सई सुधीर मोहिते हिला ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड, ब्रिगेडीअर मंगेश विटेकर यांच्या उपस्थित पार पडले. 

“श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१ जूनपासून एसटीच्या सर्व उपहारगृहांत ४० रुपयांत चहा-नाश्ता

वल्लभनगर बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी

पुणे, दि. ३० एप्रिल :
दमून-भागून आलेल्या चालक व वाहकांना योग्य विश्रांती मिळावी यासाठी त्यांच्या विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छतागृहे टापटीप व स्वच्छ ठेवावीत, कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करावी—अशा घरगुती सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिले.
ते पुणे विभागातील वल्लभनगर बसस्थानकाला भेट दिली असता बोलत होते. “चालक-वाहक हा एसटीचा कणा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून तो दररोज राज्यातील सुमारे ५० ते ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. या कर्मचाऱ्यांना कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर घरच्यासारख्या सुविधा मिळाल्यास ते अधिक उत्साहाने सेवा बजावतील,” असा मोलाचा सल्ला मंत्री सरनाईक यांनी दिला.
बसस्थानकाची पाहणी करताना त्यांनी अनेक वर्षे बंद असलेले व्यापारी गाळे महिला बचत गटांना व होतकरू उद्योजक तरुणांना अत्यल्प भाड्यात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामुळे एसटी महामंडळाचा महसूल वाढेल तसेच प्रवासी व कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असे त्यांनी नमूद केले.
१ जूनपासून एसटीच्या सर्व उपहारगृहांत ४० रुपयांत चहा-नाश्ता
महामार्गांवरील हॉटेल-मोटेलप्रमाणेच एसटी बसस्थानकांवरील उपहारगृहांमध्येही सर्व प्रवाशांना ४० रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना १ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली.

या पाहणीदरम्यान खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच एसटीचे अधिकारी उपस्थित होते.

‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी

पुणे, दि. ३० एप्रिल २०२६ :
उन्हाळ्यात बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास भेट देऊन तेथील प्रवासी सेवा-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला असता, बसस्थानकावर विक्री होत असलेली ‘नाथजल’ची एक लिटरची थंड पाण्याची बाटली २० रुपयांच्या वाढीव दराने विकली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित विक्रेत्यास स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना देत, पुढे १५ रुपयांची बाटली अधिक दराने विक्री केल्यास विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा दिला.


तसेच, लोणावळा बसस्थानकावर येणाऱ्या काही बसफेऱ्या बसस्थानकात न येता पुढे जात असल्याची तसेच काही बसेस जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबत असल्याची तक्रार प्रवाशांनी यावेळी मांडली. या हॉटेलांवरील महागडे खाद्यपदार्थ प्रवाशांना परवडत नसल्यामुळे, वेळापत्रकातील सर्व बसफेऱ्या नाश्त्यासाठी लोणावळा बसस्थानकावरच थांबाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्यानुसार, कोणतीही बस खाजगी हॉटेलांवर न थांबता नियोजित वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावरच थांबावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी एसटी प्रशासनाला दिले.
या पाहणीदरम्यान त्यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, तिकीट व्यवस्था तसेच इतर मूलभूत सोयींचा सविस्तर आढावा घेतला. प्रवाशांना अधिक दर्जेदार व सुलभ सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांनी बसस्थानकातील कर्मचाऱ्यांशी तसेच प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रवासी सेवेत अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.