Home Blog Page 13

‘मर्सिडीज-बेंझ’कडून भारतात नव्या ‘एस-क्लास’ मधील पहिली ‘प्लग-इन हायब्रिड कार’ सादर

‘एस ४५० ई पीएचईव्ही’ ही भारतातील प्रीमियम लक्झरी विभागात नवे मापदंड प्रस्थापित करणारी सर्वांत प्रगत एस-क्लास कार

‘एस-क्लास’मधील २,७०० हून अधिक घटकांपैकी ५० टक्क्यांहून अधिक घटक नव्याने विकसित, अद्ययावत किंवा सुधारित करण्यात आले आहेत. ‘एस-क्लास’च्या एका पिढीत करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वांत व्यापक बदल आहे.

‘एस ४५० ई पीएचईव्ही’मध्ये ३२० किलोवॅटची (४३५ एचपी) एकत्रित शक्ती आणि ६८० एनएमचा टॉर्क मिळतो. तसेच ही कार सुमारे ११५ किलोमीटरची इलेक्ट्रिक रेंज देते.

“एस-क्लास ही मर्सिडीज-बेंझच्या कालातीत लक्झरी परंपरेचे प्रतीक आहे आणि वाहन क्षेत्रात उत्कृष्टतेचा जागतिक मापदंड मानली जाते. भारतातही ती प्रीमियम लक्झरी विभागात आघाडीवर असून ग्राहकांच्या अपेक्षांना नवे स्वरूप देत आहे. प्रत्येक सीटवर आरामदायी अनुभव, ड्रायव्हिंगचा उत्कृष्ट अनुभव, शांतपणे जाणवणारी ताकद, सुरक्षितता, वैयक्तिक आवडीनुसार बदल करण्याच्या सुविधा आणि ‘एमबी.ओएस’ या प्रणालीवर आधारित डिजिटल अनुभव यांमुळे ‘एस-क्लास’ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. २,७०० हून अधिक नवे आणि सुधारित घटक असलेली ही नवी एस-क्लास कार आराम, सुरक्षितता, डिजिटल अनुभव आणि दर्जाच्या बाबतीत आणखी प्रगत झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वांत आधुनिक एस-क्लास असून ती ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक चांगला अनुभव देईल आणि भारतात ‘एस-क्लास’चा वारसा पुढे नेईल, असा आम्हाला विश्वास आहे. ‘मर्सिडीज-बेंझ’मध्ये विविध प्रकारच्या पॉवरट्रेन तंत्रज्ञानावर आधारित बहुपर्यायी धोरण अवलंबले जाते. भारतात प्रथमच ‘एस-क्लास’मध्ये प्लग-इन हायब्रिड सादर करणे हा याच धोरणाचा भाग आहे. आमच्या प्रीमियम ग्राहकांकडून प्लग-इन हायब्रिड वाहनांची मागणी वाढत आहे आणि ‘एस ४५० ई पीएचईव्ही’ ही त्याला दिलेली थेट प्रतिक्रिया आहे. आमच्या उत्पादन श्रेणीत आता आयसीई, बीईव्ही आणि पीएचईव्ही हे तिन्ही प्रकार उपलब्ध असल्याने ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते.”

‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व
मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर

‘एस ४५० ई’ ही भारतातील फ्लॅगशिप एस-क्लास मालिकेतील ‘मर्सिडीज-बेंझ’ची पहिली प्लग-इन हायब्रिड (पीएचईव्ही) कार आहे.

नव्या ‘एस-क्लास’मध्ये २,७०० हून अधिक घटक नव्याने किंवा सुधारित स्वरुपात समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये ‘एमबी.ओएस ऑपरेटिंग सिस्टिम’, मायक्रो-एलईडी तंत्रज्ञानासह नवीन ‘ट्विन-स्टार डिजिटल लाइट’ हेडलॅम्प्स, सुमारे ४० टक्के अधिक हाय-बीम प्रकाशक्षमता (६०० मीटरपर्यंत) आणि २० टक्के मोठी प्रकाशयुक्त ग्रिल यांचा समावेश आहे.

‘एस ४५० ई’मध्ये ३२० किलोवॅटची (४३५ एचपी) एकत्रित शक्ती आणि ६८० एनएम इतका टॉर्क मिळतो. तसेच ही कार सुमारे ११५ किलोमीटरची इलेक्ट्रिक रेंज (डब्ल्यूएलटीपी) देते.

ही कार ० ते १०० किमी प्रतितास इतका वेग ५.७ सेकंदांत गाठू शकते. तिचा कमाल वेग २५० किमी प्रतितास इतका असून तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मर्यादित ठेवण्यात आला आहे.

‘एस ४५० ई’मध्ये एअरमॅटिक एअर सस्पेन्शन आणि रिअर-अॅक्सल स्टीअरिंग स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आले आहे. रिअर-अॅक्सल स्टीअरिंगची क्षमता ४.५ अंश असून ती १० अंशांपर्यंत वाढवता येते.

भारतात प्रथमच ‘एस ४५० ई’मध्ये १५ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

नव्या ‘एस ४५० ई’साठी बुकिंग आजपासून सुरू झाले असून, वाहनाची डिलिव्हरी २०२६च्या चौथ्या तिमाहीपासून सुरू होणार आहे.

नव्या ‘एस ४५० ई’च्या ‘लॉन्च एडिशन’ची किंमत २.२० कोटी रुपये असून ‘एस ४५० ई मॅन्युफाक्टूर एडिशन’ची सुरुवातीची किंमत २.३८ कोटी रुपये आहे. (दोन्ही किंमती एक्स-शोरूम, संपूर्ण भारतासाठी लागू.)

मुंबई : मर्सिडीज-बेंझ इंडिया या भारतातील आघाडीच्या लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज आपल्या फ्लॅगशिप एस-क्लास मालिकेतील पहिली प्लग-इन हायब्रिड कार, ‘एस ४५० ई’ ‘लॉन्च एडिशन’ सादर केली. या मॉडेलच्या माध्यमातून ‘मर्सिडीज-बेंझ’ने आपल्या विविध पॉवरट्रेन तंत्रज्ञानांवर आधारित धोरणात नवा टप्पा गाठला आहे. या जागतिक दर्जाच्या ‘प्लग-इन हायब्रिड’ इलेक्ट्रिक वाहनामुळे भारतातील प्रीमियम लक्झरी लिमोझिन विभागात इलेक्ट्रिक ड्राइव्हचा शांत आणि आरामदायी अनुभव उपलब्ध होणार आहे. ‘एस ४५० ई’च्या प्रत्येक बाबीत बारकाईने सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या ‘एस-क्लास’मध्ये २,७०० हून अधिक घटक नव्याने विकसित किंवा सुधारित करण्यात आले आहेत. एका पिढीतील एस-क्लास मॉडेलमध्ये यापूर्वी इतके व्यापक बदल कधीही करण्यात आले नव्हते.

इलेक्ट्रिफाइड लक्झरीचा नवा मापदंड

‘एस ४५० ई’च्या केंद्रस्थानी अद्ययावत ३.० लिटर ‘एम२५६ इव्हो इनलाइन-सिक्स टर्बो-पेट्रोल’ इंजिन आहे. हे इंजिन आता युरो ७ उत्सर्जन मानकांनुसार तयार करण्यात आले असून ते स्वतंत्रपणे ३२६ एचपीची शक्ती आणि ५४० एनएमचा टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबतच या कारमध्ये, इंजिन आणि ‘९-स्पीड ९जी-ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन’ यांच्या दरम्यान १२० किलोवॅट (१६३ एचपी) क्षमतेची सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. या दोन्हींच्या एकत्रित कार्यामुळे हे वाहन ३२० किलोवॅटची (४३५ एचपी) शक्ती आणि ६८० एनएमचा टॉर्क निर्माण करते. त्यामुळे ‘एस ४५० ई’ ही पेट्रोलवर चालणाऱ्या एस ४५० फोर-मॅटिकपेक्षा अधिक शक्तिशाली ठरते. ‘एस ४५० फोर-मॅटिक’मध्ये २८० किलोवॅटची (३८१ एचपी) शक्ती आणि ५०० एनएमची टॉर्क मिळतो.

११५ किलोमीटरपर्यंतची इलेक्ट्रिक रेंज

‘एस ४५० ई’मध्ये २२ किलोवॅट-तास क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी डब्ल्यूएलटीपी मानकांनुसार सुमारे ११५ किलोमीटरपर्यंतची फक्त इलेक्ट्रिक मोटरवर मिळणारी रेंज देते. त्यामुळे भारतातील प्रमुख शहरांमध्ये दैनंदिन प्रवासासाठी अनेकदा पेट्रोल इंजिनची गरज भासत नाही. दैनंदिन वापरादरम्यान वाहनाची प्रणाली इलेक्ट्रिक आणि पेट्रोल शक्तीदरम्यान आपोआप बदल करत राहते. हा बदल वाहनातील प्रवाशांना जवळपास जाणवतही नाही. लांब प्रवासासाठी गरज पडल्यास पेट्रोल इंजिन उपलब्ध असल्याने रेंजची चिंता राहत नाही.

‘एस ४५० ई’ ही कार ० ते १०० किलोमीटर प्रतितास इतका वेग फक्त ५.७ सेकंदांत गाठू शकते. तिचा कमाल वेग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २५० किलोमीटर प्रतितास इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. एस-क्लास मालिकेतील बहुतांश मॉडेल्सपेक्षा हिचे वेगळेपण म्हणजे ‘एस ४५० ई’ ही केवळ रिअर-व्हील ड्राइव्ह प्रणालीसह उपलब्ध आहे. यामुळे मागील आसनांवरील प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होतो आणि या मॉडेलला एस-क्लास परिवारात वेगळी ओळख मिळते.

‘एस-क्लास’च्या इतिहासातील सर्वांत व्यापक बदल

२०२६मधील या ‘एस-क्लास’मध्ये केवळ पॉवरट्रेनमध्येच नव्हे, तर वाहनाच्या डिझाइनमध्ये आणि तंत्रज्ञानातही अनेक बदल करण्यात आले आहेत. समोरील भागात नवीन ट्विन-स्टार डिजिटल लाइट हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. मायक्रो-एलईडी तंत्रज्ञानावर आधारित या हेडलॅम्प्समुळे हाय-बीम प्रकाशाचा आवाका मागील पिढीच्या तुलनेत सुमारे ४० टक्क्यांनी जास्त झाला आहे. तसेच अल्ट्रा रेंज हाय-बीम प्रणालीमुळे प्रकाश ६०० मीटरपर्यंत पोहोचू शकतो. वाहनाची रेडिएटर ग्रिल सुमारे २० टक्क्यांनी मोठी करण्यात आली असून ती आता प्रकाशयुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. यावर नव्याने डिझाइन केलेले त्रिमितीय क्रोम स्टार्स देण्यात आले आहेत. मागील बाजूस नव्या डिझाइनचे टेल-लॅम्प्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये क्रोम फ्रेममध्ये बसवलेले तीन खास स्टार्स असून ते एस-क्लासची वेगळी ओळख अधिक ठळक करतात.

नव्या ‘एस-क्लास’मध्ये ‘एमबी.ओएस’

‘मर्सिडीज-बेंझ ऑपरेटिंग सिस्टिम’ (एमबी.ओएस) ही नव्या एस-क्लासमधील अत्याधुनिक आणि वापरण्यास सुलभ प्रणाली आहे. ही प्रणाली वाहनातील विविध तांत्रिक सुविधा नियंत्रित करणाऱ्या सुपरकॉम्प्युटरसारखी काम करते. वाहनातील सर्व प्रणाली एकमेकांशी जोडून त्यांना एका बुद्धिमान आणि एकात्मिक प्रणालीच्या स्वरूपात कार्य करण्यास मदत करते.

एमबीयूएक्स सुपरस्क्रीन आणि नवीन एमबीयूएक्स प्रणाली

स्टँडर्ड एमबीयूएक्स सुपरस्क्रीन आणि नव्या पिढीतील एमबीयूएक्स प्रणालीमुळे एस-क्लासमध्ये अनेक प्रगत डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘हे मर्सिडीज’ हा एमबीयूएक्स व्हर्च्युअल असिस्टंट देण्यात आला आहे. ही प्रणाली नैसर्गिक संवाद समजून प्रतिसाद देऊ शकते. तसेच सुधारित झिरो लेयर इंटरफेस आणि गूगल मॅप्सवर आधारित ‘एमबीयूएक्स सराउंड नेव्हिगेशन’ सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनाशी संवाद अधिक सहज, नैसर्गिक आणि वापरण्यास सुलभ बनतो.

चॅसिस आणि प्रवासाचा अनुभव

‘एस ४५० ई’मध्ये एअरमॅटिक एअर सस्पेन्शन ही सुविधा स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आली आहे. तसेच ४.५ अंशांपर्यंत रिअर-अॅक्सल स्टीअरिंगही उपलब्ध आहे. ही स्टीअरिंग क्षमता १० अंशांपर्यंत वाढवण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनाचा टर्निंग सर्कल जवळपास दोन मीटरने कमी होतो. यामुळे पार्किंगची अरुंद जागा, हॉटेलचे अरुंद प्रवेशमार्ग आणि शहरांमधील गर्दी येथे हे वाहन नेणे अधिक सोपे होते. इतर मर्सिडीज-बेंझ वाहनांकडून मर्सिडीज-बेंझ इंटेलिजंट क्लाउडमार्फत मिळणाऱ्या कार-टू-एक्स माहितीच्या आधारे ही कार पुढील रस्त्यावरील स्पीड ब्रेकर किंवा खडबडीत भागांची आगाऊ माहिती घेते. त्यानुसार तिची सस्पेन्शन प्रणाली आधीच स्वतःला बदलून घेते. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होतो.

सुरक्षिततेवर विशेष भर

नव्या ‘एस-क्लास’मध्ये सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. वाहनातील प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रगत सुविधा देण्यात आल्या आहेत. सुधारित अॅडॅप्टिव्ह रेस्ट्रेंट सिस्टिममुळे अपघाताच्या वेळी अधिक चांगले संरक्षण मिळते. यामध्ये ‘प्री-सेफ® इम्पल्स बेल्ट प्रीटेन्शनर्स’सारखी तंत्रज्ञाने देण्यात आली आहेत. याशिवाय या कारमध्ये १५ पर्यंत एअरबॅग्स उपलब्ध असून, सुरक्षिततेच्या बाबतीत ‘मर्सिडीज-बेंझ’ची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

एस ४५० ची तांत्रिक वैशिष्ट्ये :

वैशिष्ट्यएस ४५० 
इंजिन३.०-लिटर एम२५६ इव्हो इनलाइन-६ टर्बो-पेट्रोल
पेट्रोल इंजिनची क्षमता३२६ एचपी / ५४० एनएम
इलेक्ट्रिक मोटरची क्षमता१२० किलोवॅट (१६३ एचपी) / ४४० एनएम
एकूण क्षमता (संयुक्त)३२० किलोवॅट (४३५ एचपी) / ६८० एनएम
ट्रान्समिशन९-स्पीड ९जी-ट्रॉनिक ऑटोमॅटिक
बॅटरीची क्षमता२२ किलोवॅट-तास (केडब्ल्यूएच)
केवळ इलेक्ट्रिकची रेंज (डब्ल्यूएलटीपी)सुमारे ११५ किलोमीटर
ड्राइव्ह प्रणालीरिअर-व्हील ड्राइव्ह
० ते १०० किमी/तास वेग५.७ सेकंद
कमाल वेग२५० किमी/तास (इलेक्ट्रॉनिक मर्यादेसह)
सस्पेन्शनएअरमॅटिक एअर सस्पेन्शन (स्टँडर्ड)
रिअर-अॅक्सल स्टीअरिंग४.५° स्टँडर्ड / १०° पर्यायी

इलेक्ट्रिक रेंज ही डब्ल्यूएलटीपी (डब्ल्यूएलटीपीमानकांवर आधारित आहेप्रत्यक्षातील रेंज वाहन चालवण्याची पद्धततपमान आणि वापराच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी एआयएससीएच्या मोबाईल अॅपचे लोकार्पण

पुणे :  ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबनासाठी कार्यरत असलेल्या ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन (एआयएससीए) या संस्थेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या एआयएससीए मोबाईल अॅपचे लोकार्पण शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी होणार आहे.

ॲपचा लोकार्पण सोहळा सायंकाळी ४.३० वाजता घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे, मूर्तीशास्त्राचे अभ्यास गो. बं. देगलूरकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, उद्योजक अरविंद बुधाणी, आपलं घरचे विजय पळणीकर, डीसीपी कृष्णकांत रावले, जैन सोशल ग्रुपचे युवराज शहा, दिलीप पवार, उद्योजक एम. ए. तेजाणी, दिलीप बोरावके, लोकमान्य हास्ययोगचे डॉ. प्रसाद आंबीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या संस्थापक व संचालिका शकीला शेख यांनी आज (दि. १५) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. किशोर सरपोतदार, सुनीला कविटकर, सुहास घोडके, रवींद्र शाळू, अजित कुमठेकर, दिलीप पवार या वेळी उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षापासून ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन ही संस्था ज्येष्ठ नागरिकांमधील वाढता एकाकीपणा, सामाजिक अलिप्तता, मानसिक आरोग्याच्या समस्या, डिजिटल अज्ञान आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. आज ही चळवळ दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कार्यरत असून देशभरातील ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय घेऊन पुढे जात आहे.

शकीला शेख यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेले हे मोबाईल अॅप ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासार्ह साथीदार ठरणार आहे. या अॅपमध्ये आपत्कालीन मदत, सुरक्षितता सूचना, सामाजिक सहभाग, डिजिटल सहाय्य, आरोग्यविषयक माहिती, संपर्क व्यवस्था आणि एका क्लिकवर मदत मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेषतः एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे अॅप त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक आत्मविश्वास, सुरक्षितता आणि मानसिक आधार निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शकीला शेख यांनी केले आहे.

‘सदरा कफल्लकाचा’ गझलसंग्रहाचे प्रकाशन; ‘गझलरंग’ मुशायरा उत्साहात संपन्न

पुणे : माई पब्लिकेशन्स आयोजित आणि सुरेश भट गझलमंच, पुणे प्रस्तुत ‘गझलरंग’ या दर्जेदार मराठी गझल मुशायऱ्याच्या निमित्ताने गझलकार सुधीर मुळीक यांच्या पहिल्या गझलसंग्रह ‘सदरा कफल्लकाचा’ चे प्रकाशन एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ,पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साहित्यप्रेमी, गझलकार, कवी आणि रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने मराठी गझलविश्वात विशेष उत्सुकता निर्माण केली.

पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी किशोर कदम (सौमित्र) यांच्या हस्ते झाले. यावेळी उर्दू गझलकार, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि सह आयुक्त मोनिका सिंग ,दगडूदादा लोमटे (अंबेजोगाई) तसेच सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोनिका सिंह यांनी मनोगत व्यक्त करताना सुधीर मुळीक यांच्या गझललेखनातील सातत्य, आशयघनता आणि संवेदनशील अभिव्यक्तीचे कौतुक केले. त्यांच्या गझलांमध्ये मानवी अनुभव, सामाजिक वास्तव आणि भावनिक जाणिवांचे प्रभावी चित्रण आढळते, असे त्या म्हणाल्या. किशोर कदम यांनी कविता आणि गझल या केवळ साहित्यप्रकार नसून माणसाच्या जगण्याचा आणि भावविश्वाचा दस्तऐवज असल्याचे सांगत सुधीर मुळीक यांच्या लेखनातील प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

प्रास्ताविक करताना संपादक पूजा भडांगे म्हणाल्या, “जेव्हा भावना शब्दांना स्पर्श करतात तेव्हा कविता जन्म घेते आणि जेव्हा त्या भावना वृत्त, रदीफ आणि काफियाच्या शिस्तीतून व्यक्त होतात तेव्हा गझल आकार घेते.” सुधीर मुळीक यांच्या गझलांमध्ये मानवी भावविश्वाचे विविध पैलू प्रभावीपणे प्रतिबिंबित झाल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माई पब्लिकेशन्स नवोदित आणि गुणवंत लेखक, कवी तसेच साहित्यिकांना प्रकाशनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्था कार्यरत असून विविध साहित्यप्रकारांतील पुस्तकांचे प्रकाशन सातत्याने केले जात असल्याचे सांगण्यात आले. ममता सपकाळ यांनी साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक प्रकाशनाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या गझल मुशायऱ्यात सदानंद बेन्द्रे, सुशांत खुरसाळे, ममता सपकाळ, इंद्रजीत उगले, अज्ञातवासी आणि सुधीर मुळीक यांनी आपल्या निवडक गझला सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठी गझल साहित्याची समृद्ध परंपरा आणि समकालीन भावविश्वाचा सुरेख संगम या मुशायऱ्यात अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी केले, तर पूजा भडांगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सुधीर मुळीक यांचे अभिनंदन करत त्यांच्या गझलसंग्रहाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा स्वतःची वाढवा…:शर्मिला ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांच्या ‘पक्षफोडी’वर जोरदार हल्ला

“तुम्ही मरा इकडे सगळे…”; पर्यावरण आणि पाण्याच्या प्रश्नावर संताप……….राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या वृक्षवाटपाच्या उपक्रमाबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नावरही सरकारला धारेवर धरले. “ही नवीन झाडं वाढायला १०० वर्षे लागतात. आम्ही झाडे लावू, पण तुम्ही जी झाडे तोडत आहात, ती १००-२०० वर्षे जुनी आहेत. आपल्याला लागणारा ऑक्सिजन याच झाडांकडून मिळतो. आज पावसाला उशीर झालाय, जमिनीतील पाण्याची पातळी पार तळाला पोहोचली आहे, पण कोणाला काहीही पडलेली नाही. ‘आम्हाला आमचे पैसे कमवायचे आहेत, आमची मुले परदेशात जाऊन सेटल झाली आहेत, तुम्ही मरा इकडे सगळे’ अशीच या लोकांची वृत्ती झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

मुंबई-भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्कला करताना रताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “त्यांना आता तेवढंच करायचं राहिलं आहे—दुसरे पक्ष फोडायचे! दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेत काम करणारी खूप चांगली मुलं होती, कुठे गेली ती आता? त्यांनी आता फक्त दुसऱ्यांच्या सतरंज्याच उचलायच्या का?” असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना घरगुती पिठाच्या चक्की (गिरणी) वाटप केल्या. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), त्यांची ‘पक्षफोडीची’ राजनीती आणि सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ च्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले.

“तिथे बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इथे उद्धव ठाकरेंचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्यापेक्षा आम्ही जसं आमचा पक्ष फुटल्यानंतर आमची नवीन मुलं उभी करतो, तसं तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा ना. तुमच्या पक्षात जी चांगली मुलं काम करतायत, त्यांना मोठं करा,” असा खोचक सल्ला शर्मिला ठाकरे यांनी भाजपला दिला.
केवळ राजकीय टीका न करता, शर्मिला ठाकरे यांनी कोकणातील ‘चिपी विमानतळाच्या’ सद्यस्थितीकडे आणि महागाईकडेही लक्ष वेधले. “पेट्रोल शंभर रुपयांच्या पुढे गेलं आहे. ज्या समस्यांसाठी भाजप १२ वर्षांपूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलने करत होता, त्याबद्दल आज कुणी चकार शब्दही बोलायला तयार नाही,” असे त्यांनी म्हटले.

चिपी विमानतळाबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की, “माझ्याकडे काल कोकणातील एक मराठी ज्वेलर्स आले होते, त्यांनी सांगितले की सिंधुदुर्गचे चिपी एअरपोर्ट बंद झाले आहे. चीपीची सगळी विमाने फुल जात होती, तरीही ते बंद का केले? गोव्याचे टुरिझम कमी झाले म्हणून? मग हे एअरपोर्ट बांधता कशाला? नवी मुंबई, पुणे, पुरंदर… एका एअरपोर्टसाठी ५० हजार कोटी खर्च येतो. हे पैसे आपल्या टॅक्सचे आहेत. मोदी साहेब आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट झाले आणि त्यातील किती बंद पडले, याची माहिती पत्रकारांनी काढून आवाज उठवला पाहिजे.”

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार,तीन आठवडे चालणार

0

मुंबई-महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, आगामी पावसाळी अधिवेशनाचे कामकाज एकूण तीन आठवडे चालणार आहे. या तीन आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्त्वाची विधेयके, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडी पाहता हे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली असून, सत्ताधारी पक्ष देखील विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे २२ जूनपासून मुंबईत हायव्होल्टेज राजकीय रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु;दर्शनाकरिता पास अनिवार्य-जिल्हा प्रशासनाची माहिती

पुणे, दि. १५: भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु झाले असून मंदिरात प्रतिदिन एक हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर होणार असून दर्शनाकरिता पास अनिवार्य करण्यात आल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

भाविकांना ३० जून २०२६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ वा. दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे.

सन 2027 मधील नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ 2025 च्या अनुभवाच्या आधारे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. संभाव्य वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नवीन सभामंडप व पायरी मागचि काम सुरु असल्याने, देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सदर बंद कालावधीस ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी सामान्य परिस्थितीत सुमारे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. तथापि, भिमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक यांच्या सहकार्यामुळे तसेच रात्रंदिवस अखंड काम सुरु ठेवण्यात आल्याने हे काम केवळ पाच महिन्यांत पूर्णत्वास येत आहे.

मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले असून दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा व गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत कामे पूर्ण झाली आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित किरकोळ कामे जलदगतीने पूर्ण करुन बांधकाम साहित्य, दगड व यंत्रसामग्री हटवून परिसर भाविकांसाठी मोकळा करण्याच्यादृष्टीने श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांनी आजपासून दर्शनाकरिता खुले करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

सॅटेलाइट फोटोत मान्सूनचे ढग देशावरून गायब:महाराष्ट्रासह 17 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

भारतातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सूनची) गती सध्या मंदावली आहे. १५ जून, सोमवारच्या उपग्रह फोटोंवरून असे दिसून आले की, देशाच्या मोठ्या भागावर मान्सूनचे ढग अनुपस्थित होते.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, ४ जून ते १५ जून या कालावधीत देशात ५३.७ मिमी पाऊस पडायला हवा होता, परंतु प्रत्यक्षात केवळ १९.२ मिमी पावसाची नोंद झाली; म्हणजेच पावसाच्या प्रमाणात ६४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे.मान्सूनची सक्रियता मंदावल्यामुळे राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १६ राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा लांबली आहे.

दक्षिण भारतातून पुढे सरकल्यानंतर मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आसपासच्या भागात स्थिरावला आहे. त्याचप्रमाणे, ईशान्येकडील राज्यांचा टप्पा ओलांडल्यानंतर तो बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या जवळ थांबला आहे; या तीन राज्यांमध्येही मान्सूनचे पूर्णपणे आगमन झालेले नाही.
पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज

१६ जून:

बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे. बिहारच्या काही भागांत ताशी ५०-७० किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी व कर्नाटकच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत ताशी ४०-६० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
१७ जून:

सिक्कीम, उत्तर बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह (ताशी ४०-६० किमी) पाऊस पडू शकतो.
झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस सुरू राहू शकतो.
महाराष्ट्राच्या काही भागांत १७ जूनपर्यंत उष्णतेची लाट

महाराष्ट्राच्या काही भागांत १७ जूनपर्यंत उष्णतेची लाट (हीटवेव्ह) कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यात १७ जूनपर्यंत आणि विदर्भात १६ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोकण आणि गोव्यामध्ये १७ जूनपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. तसेच, कोकण आणि गोव्याच्या काही भागांत १६ जूनपर्यंत रात्रीच्या वेळीही उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

19 जूनपर्यंत या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 19 जूनपर्यंत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू राहील.

जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये 14 ते 19 जूनपर्यंत पावसाची शक्यता.

हिमाचल प्रदेशात 14 ते 19 जून दरम्यान पावसाचा जोर.

हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 19 जूनपर्यंत थांबून थांबून पाऊस.

पूर्व उत्तर प्रदेशात 14 जून आणि 18-19 जून रोजी पावसाची शक्यता.

पश्चिम राजस्थानमध्ये 14 ते 17 जून आणि 19 जून रोजी पावसाची शक्यता.

हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये 14 जून रोजी वादळी वारे वाहू शकतात.

उत्तराखंडमध्ये 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कायम राहील.

हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 14 जून रोजी वादळ आणि विजा चमकण्याची शक्यता आहे.

घाऊक महागाई 43 महिन्यांत सर्वाधिक:मे महिन्यात 9.68% वर पोहोचली; इंधन महागले, अन्नधान्य आणि तेलाच्या किमतीही वाढल्या

पुणे-मे महिन्यात घाऊक महागाई (WPI) वाढून 9.68% वर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ती 8.26% होती. मे महिन्यात महागाई 43 महिन्यांत सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ती 10.70% वर पोहोचली होती. वाणिज्य मंत्रालयाने आज म्हणजेच 15 जून रोजी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

महागाई वाढण्याचे कारण म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि इंधनाच्या किमती वाढणे हे आहे. याशिवाय, धान्य आणि तेलही महाग झाले आहे. खरं तर, अमेरिका आणि इराण यांच्यात साडेतीन महिन्यांपासून तणाव आहे. परिस्थिती सामान्य न झाल्यास महागाई आणखी वाढू शकते.

दैनंदिन गरजेच्या वस्तू, इंधन आणि विजेचे दर वाढले

दैनंदिन गरजेच्या वस्तूंची (प्रायमरी आर्टिकल्स) महागाई 3.78% वरून वाढून 4.99% झाली.
खाद्यपदार्थांची (फूड इंडेक्स) महागाई 3.11% वरून वाढून 4.49% वर पोहोचली आहे.
इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील घाऊक महागाई दर 24.89% वरून वाढून 30.33% झाला आहे.
उत्पादित वस्तूंचा घाऊक महागाई दर 6.68% वरून वाढून 7.48% राहिला.
प्रायमरी आर्टिकल्स, ज्याचे वेटेज २२.६२% आहे. फ्यूल अँड पॉवरचे वेटेज १३.१५% आणि मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट्सचे वेटेज सर्वाधिक ६४.२३% आहे. प्रायमरी आर्टिकल्सचे देखील चार भाग आहेत.

फूड आर्टिकल्स जसे की धान्य, गहू, भाज्या
नॉन-फूड आर्टिकल्समध्ये तेलबिया येतात
खनिजे
क्रूड पेट्रोलियम
मे महिन्यात किरकोळ महागाई ३.९३% राहिली

मे महिन्यात किरकोळ महागाई वाढून ३.९३% वर पोहोचली, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती. गेल्या ५ महिन्यांत, किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ४% च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.

घाऊक किंमत निर्देशांक (WPI) चा सामान्य माणसावर परिणाम

घाऊक महागाई दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास त्याचा बहुतेक उत्पादन क्षेत्रांवर वाईट परिणाम होतो. जर घाऊक किंमत खूप जास्त काळ उच्च पातळीवर राहिली, तर उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात. सरकार केवळ करांद्वारे WPI नियंत्रित करू शकते.

उदाहरणार्थ, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तथापि, सरकार कर कपात एका मर्यादेतच कमी करू शकते. WPI मध्ये धातू, रसायने, प्लास्टिक, रबर यांसारख्या कारखान्यांशी संबंधित वस्तूंना जास्त महत्त्व दिले जाते.

महागाई कशी मोजली जाते?

भारतात दोन प्रकारची महागाई असते. एक किरकोळ आणि दुसरी घाऊक महागाई असते. किरकोळ महागाई दर सामान्य ग्राहकांकडून दिल्या जाणाऱ्या किमतींवर आधारित असतो. याला ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) असेही म्हणतात. तर, घाऊक किंमत निर्देशांक (WPI) म्हणजे घाऊक बाजारात एक व्यावसायिक दुसऱ्या व्यावसायिकाकडून वसूल करतो त्या किमती.

महागाई मोजण्यासाठी विविध वस्तूंचा समावेश केला जातो. उदा. घाऊक महागाईमध्ये उत्पादित वस्तूंचा वाटा 63.75%, अन्नधान्यासारख्या प्राथमिक वस्तूंचा 22.62% आणि इंधन व ऊर्जा यांचा 13.15% असतो. तर, किरकोळ महागाईमध्ये अन्न आणि उत्पादनांचा सहभाग 45.86%, घरांचा 10.07% आणि इंधनासह इतर वस्तूंचाही सहभाग असतो.

तीन वर्षांच्या ब्रेन डेड बालकाचे अवयवदान

पुणे: मेंदूमृत झालेल्या तीन वर्षांच्या बालकाचे अवयवदान करण्यात आले. या निर्णयामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन बालरुग्णांना अवयव मिळाले, तर दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे. पुणे विभागात इतक्या लहान मुलाचे हे पहिलेच अवयवदान ठरले आहे.

ताडीवाला रस्ता येथील तीन वर्षीय मु लगा दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाला. दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत (ब्रेन डेड) घोषित केले. मात्र, मुलाच्या निधनाच्या दुःखातही त्याच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या मुलाला दोन जून रोजी गंभीर अवस्थेत रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. डॉ. संजय व्होरा यांच्या मार्गदर्शनाखाली बाल अतिदक्षता विभागातील (पीआयसीयू) डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने सक्षम प्राधिकारी डॉ. देवीदास भालेराव यांनी १२ जून रोजी त्याला मेंदूमृत घोषित केले. यानंतर प्रत्यारोपण समन्वयक लोचना जाधव यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले.प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) नियमानुसार अवयवांचे वाटप करण्यात आले. दोन्ही मूत्रपिंडे आणि यकृत रुबी हॉल क्लिनिक आणि बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमधील दोन बालरुग्णांना देण्यात आले. दोन्ही नेत्रपटलांचेही दान करण्यात आले असून, त्यामुळे दोन अंधांना दृष्टी मिळेल.

दरम्यान, “इतक्या कमी वयातील अवयवदाता मिळणे अत्यंत दुर्मीळ असते. पालकांनी दुःखाच्या प्रसंगात घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवजीवन मिळाले, तर दोन जणांना दृष्टी मिळणार आहे,” असं रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. विवेक लाल यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे:गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी

पंढरपूर दिनांक 14 – राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांची भेट घेतली. यावेळी रोहित पवारांनी जीआरमध्ये ज्या काही अटी आहेत त्या शिथिल तसेच काढून टाकण्याची मागणी केली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांची 50 हजारांची अट काढून टाका अशी मागणी देखील पवारांनी केली आहे. तसेच या अटी काढा नाहीतर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाचा अपमान होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

यावेळी गिरीश महाजन यांनी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकरी कर्जमाफीमधील अटींच्या बाबतीत काय करता येईल यावर चर्चा केली जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, आमदार रोहित पवार हे गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मला त्यांचा कॉल आला आणि तेव्हा मी विचारले तेव्हा विचारले की हा सल्ला कोणी दिला? कारण मी देखील उपोषण केले होते. उपोषणाच्या भानगडीत पडायचे नाही, असे माझे मत आहे.
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आता मागणी नसताना देखील आम्ही शेतकरी कर्ज माफी केली. निवडणुकाही नव्हत्या, तरी आम्ही हा निर्णय घेतला. नेमलेल्या समितीने अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण रोहित दादांना असे वाटत आहे की यात सुधारणा झाली पाहिजे. त्यांच्या मागण्या आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर या निकषावर पोहोचलो की चर्चा करावी लागेल. असे होणार नाही की इथे बसल्या बसल्या झाले आणि दिले. शासन सर्वांना मदत करत आहे.

उपोषण सोडावे, गिरीश महाजन यांची विनंती

आता शेतकरी अडचणीत आहे हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. तरी यात सुधारणा पाहिजे असे रोहित पवारांना वाटत आहे. मी म्हणेल तुम्ही मुंबईला या आपण सविस्तर चर्चा करू. 22 तारखेपासून अधिवेशन आहे. 22 च्या आधी आपण एकदा बसून चर्चा करू. शेवटी मुख्यमंत्री साहेब योग्य तो निर्णय घेतील आणि मार्ग निघेल. उपोषण करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे आपण जास्त वेळ न बसता उपोषण सोडावे.

रोहित पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी तयार

यावर रोहित पवार म्हणाले की, मला फक्त सगळ्या शेतकरी बांधवांना एकच विचारायचे आहे की, हे आंदोलन राजकीय नव्हते. आपण शेतकऱ्यांसाठी बसलो आहोत. कृषिमंत्री साहेबांनी देखील आपल्याला ग्वाही दिली आहे, गिरीश महाजन देखील आत्ता आपल्याला बोलले आहेत. पण मला असे वाटते की यात अजून ओढाताण केली तर शेतकऱ्यांचे नुकसान आहे. अधिवेशनाच्या आधी आपण चर्चा करूया. मला असे वाटत आहे की यातून दोन्ही अटी काढल्या जातील. मी सरकारला आग्रह करेल की आमच्या मागण्या मान्य कराच. जर सरकार याबाबतीत बैठक घ्यायला तयार असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्र्यांकडे जायचे का? असा सवाल पवारांनी आंदोलकांना व शेतकरी बांधवांना विचारला, त्यावर शेतकऱ्यांनी होकार उत्तर दिले. त्यानंतर रोहित पवारांनी सरकारचे आभार व्यक्त केले.

छोटा हत्ती विहिरीत कोसळून 8 भाविकांचा मृत्यू:एकाच कुटुंबातील सासू, 2 सुना, 3 नातवंडे असे 6 जण मृत्युमुखी

माळशिरसमधील घटना
म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन करून पंढरपूरकडे पीक अप गाडी अर्थात छोटा हत्ती वाहनातून परतणाऱ्या भाविकांवर रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास काळाने घाला घातला. पंढरपूर-सातारा महामार्गावरील तांदुळवाडीजवळ चालकाचा ताबा सुटून त्यांचे वाहन रस्त्यालगत पाच फूट अंतरावर असलेल्या विहिरीत कोसळले. यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जणांना ग्रामस्थांनी वाचवले. यापैकी दोघे स्वत: पोहून बाहेर आले, तर पाच जणांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. मृतांत ४ बालकांसह ४ महिलांचा समावेश आहे. संदीप बावचेंच्या कुटुंबातील पत्नी, २ मुले, आई, भाऊ व पुतण्या असे ६ जण मृत्युमुखी पडले.

पंढरपूरनजीकच्या इसबावी येथील सिद्धेश्वर पोपट जाधव हे मावशी व बहिणीच्या कुटुंबातील १५ जणांसह रविवारी छोटा हत्ती वाहनाने (एमएच १३ डीक्यू ६३३५) म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतत असताना रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अपघात घडला. ग्रामस्थांनी धाव घेत ट्रॅक्टरला दोर बांधून वाहन बाहेर काढले. दरम्यान, ७ जणांना वाचवले. चालक सागर चौगुले (रा. रांझणी) जखमी झाला. मृतदेह पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले, तर ५ जखमींना तांदुळवाडी येथीलच खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृतांच्या वारसांना पंतप्रधान कार्यालयाने प्रत्येकी २ लाख, तर राज्य सरकारने ५ लाखांची मदत जाहीर केली.
छोटा हत्तीच्या पाठीमागून मी आणि रणदिवे दुचाकीवर येत होतो. वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने ते विहिरीत कोसळले. वडिलांना फोनवर माहिती दिली. लोकांना घेऊन या असे सांगितले. त्या वेळी दुचाकी रस्त्याकडेला लावून विहिरीत उडी मारली. चार वर्षांच्या मुलाला बाहेर काढले. त्याच्या छातीवर दाबून पोटातील पाणी काढले. तो वाचला. त्याच वेळी विलास पाटील, हणमंत रणदिवे त्यांनीही मदत करत इतर ५ जणांना बाहेर काढले. तोपर्यंत ग्रामस्थ आले. त्यांनीही मोठी मदत केली. दोन जेसीबी, एक क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन व मृतदेह बाहेर काढले.

कठडा नसल्याने वाहन थेट विहिरीतच

ही विहीर तांदुळवाडी येथील रामकृष्ण कदम यांची आहे. रस्त्यापासून फक्त पाच फुटांवर ही विहीर आहे. बाजूला झुडपे आहेत. त्यामुळे विहिरीचा अंदाज येत नाही. त्यातच हे वाहन कोसळले. अनेकदा निवेदने देऊनही संरक्षक कठडा अथवा भिंत बांधली नसल्याचे विहिरीचे मालक रामकृष्ण कदम यांनी सांगितले.

पंढरपूर-सातारा मार्गाने हे वाहन पंढरपूरच्या दिशेने येत होते. तांदुळवाडीजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास या ठिकाणी असलेल्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. येथेच रस्त्यापासून अवघ्या ५ फुटांवर ही विहीर आहे. या विहिरीत हे वाहन कोसळून अपघात घडला.

दिंडोरीत ३ एप्रिलला कार विहिरीत कोसळून ९ जणांचा जीव गेल्यानंतर बुजवली विहीर

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे ३ एप्रिलला असाच अपघात झाला होता. मध्यरात्री चालकाचा ताबा सुटून कार ७० फूट खोल व सुमारे ३० फूट पाणी असलेल्या विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांत सहा चिमुरड्यांचा समावेश होता. ९ जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. १२ तासांतच ही जीवघेणी विहीर बुजवली गेली.

इराण अण्वस्त्रे बनवणार नाही, होर्मुजही उघडेल:अमेरिकेसोबत कराराच्या मसुद्यावर सहमत, अमेरिका इराणच्या तेलावरील निर्बंध हटवेल

तेहरान-अमेरिका आणि इराणमधील शांतता करारासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्यात आण्विक कार्यक्रम, तेल बंदी, मालमत्ता गोठवणे आणि होर्मुझ या मुद्द्यांवर एकमत झाले आहे. इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने रॉयटर्स न्यूज एजन्सीने हा दावा केला आहे.अहवालानुसार, इराणने या मसुद्यात म्हटले आहे की, तो अण्वस्त्रे बनवणार नाही आणि इतर कोणत्याही देशाकडून ती घेणार नाही. अंतिम करार होईपर्यंत इराण आपल्या विद्यमान आण्विक कार्यक्रमात कोणतेही मोठे बदल करणार नाही. ते युरेनियम समृद्ध करणार नाही आणि नवीन आण्विक केंद्रांचा विस्तार करणार नाही.

इराण ताबडतोब सर्व व्यापारी जहाजांसाठी होर्मुझ उघडेल. त्या बदल्यात अमेरिका इराणच्या बंदरांवरची नौदलाची नाकेबंदी उठवणार आहे. अमेरिका इराणच्या तेल निर्यातीवर काही काळासाठी निर्बंध शिथिल करणार आहे.या मसुद्यानुसार, अमेरिका इराणची २५ अब्ज डॉलर्सची जप्त केलेली मालमत्ता सोडणार आहे. यासोबतच अमेरिका इराणच्या पुनर्विकासासाठी आपल्या मित्र राष्ट्रांच्या सहकार्याने योजना तयार करणार आहे.

ट्रम्प यांचा दावा- रविवारी शांतता करार होईल: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये रविवारी करार होईल आणि त्यानंतर होर्मुजची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी खुली केली जाईल.
इराणने ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले: इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, रविवारी करारावर स्वाक्षऱ्या होणार नाहीत. चर्चा सुरू आहे, परंतु अद्याप कोणतीही अंतिम तारीख निश्चित झालेली नाही.
करारानंतर 60 दिवसांच्या नवीन चर्चेची योजना: अहवालानुसार, प्रथम एक अंतरिम सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरित केला जाईल. त्यानंतर 60 दिवसांपर्यंत अणु कार्यक्रम, निर्बंधांमध्ये सवलत आणि होर्मुज सामुद्रधुनीच्या कामकाजासारख्या मुद्द्यांवर तांत्रिक चर्चा होईल.
भारत-अमेरिकेदरम्यान जहाजांवरील हल्ल्यांमुळे तणाव: भारताने भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवरील हल्ल्यांबाबत दुसऱ्यांदा अमेरिकन राजदूताला बोलावले. तर ट्रम्प यांनी आरोप केला की, इराणने भारतीय जहाजांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.
इराणने युरेनियम लपवण्यासाठी बोगदे बंद केले: सीएनएनच्या अहवालानुसार, इराणने इस्फहान अणु केंद्रात ठेवलेल्या उच्च-समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचणाऱ्या अनेक बोगद्यांना बंद केले आहे आणि मार्गांवर स्फोटक सुरुंग (माइन्स) पेरले आहेत.
ओमानच्या किनाऱ्याजवळ तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या जहाजावरील ११ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका
ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यावर अडकलेल्या ११ भारतीय कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. मस्कत येथील भारतीय दूतावासाने रविवारी ही माहिती दिली.

दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, इंजिनमधील बिघाडामुळे हे जहाज समुद्रात अडकले होते. त्यानंतर बचाव मोहीम राबवण्यात आली आणि त्याद्वारे या ११ भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

भारतीय दूतावासाने सांगितले की, इतर तिघांची सुटका करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. दूतावास ओमानमधील संबंधित अधिकारी आणि बचाव संस्थांच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

पुणे, पिंपरीतील सुमारे ८५ लाख नागरीकांना ३१ ऑगस्‍टपर्यंत पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध राहील असे नियोजन करा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ; ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करा- उपलब्‍ध पाण्‍याचा वापर सर्वप्रथम पिण्‍यासाठी करण्‍यात यावा, बेकायदेशिर पाणी उपसा रोखण्‍यासाठी विशेष माहीम राबवण्‍यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभाग यांच्‍या संयुक्‍त पथकांमार्फत कठोर करावाई करण्‍याबाबतही स्‍पष्‍ट आदेश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.

पुणे दि.१३ : राज्‍यातील अपु-या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍ट २०२६ पर्यंत नागरीकांना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुनिश्चित करण्‍यास सर्वौच्‍च प्राधान्‍य देण्‍याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिले आहे. बेकायदेशिर पाणी उपश्‍यावरही तातडीने कडक कारवाई करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी विभागाच्‍या आधिका-यांना दिल्‍या. सिंचन भवनामध्‍ये जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत कृष्‍णा व गोदावरी लाभक्षेत्राच्‍या अंतर्गत येणा-या धरणांमधील पाणीसाठा, अगामी मान्‍सुनची परिस्थिती या संदर्भात महत्‍वपूर्ण बैठक संपन्‍न झाली. या बैठकीला कृष्‍णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनमंत धुमाळ, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयवंत गवळी यांच्‍यासह मुख्‍य अभियंता, अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

सद्य परिस्थितीत राज्‍यातील धरणांमधील एकुण उपयुक्त जलसाठा ३५७.५ टिएमसी (२५ टक्के) असून, तो गतवर्षीच्‍या तुलनेत कमी असल्‍याचे निदर्शनास आले. यावर्षीचे पर्जन्‍यमान आता पर्यंत अत्‍यल्‍प झाल्‍यामुळे धरणात पाणी आले नाही हे त्‍यामागील प्रमुख कारण आहे. विशेषत: पुणे विभागातील उपयुक्‍त जलसाठा गतवर्षीच्‍या तुलनेने कमी असल्‍याने परिस्थिती गांभिर्याने हाताळावी असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील सुमारे ८५ लाख नागरीकांना ३१ ऑगस्‍टपर्यंत पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध राहण्‍यासाठी आवश्‍यक असलेले पाणी राखीव ठेवण्‍याच्‍या सुचना या बैठकीत मंत्र्यांनी प्राधान्‍याने दिल्‍या आहेत. मराठावाडा आणि कृष्‍णा महामंडळाच्‍या अंतर्गत येणारे सर्व धरणं, जलाशय व प्रमुख जलस्‍त्रोतांमधील उपलब्‍ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्‍यावा, त्‍यावर अवलंबून असलेल्‍या लोकसंख्‍येचा विचार करुन पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी आवश्‍यक राखीव कोटा निश्चित करण्‍याबाबतही बैठकीत जलसंपदा मंत्र्यानी सुचित केले. जलसंपदा विभाग, जिल्‍हाधिकारी, महानगरपालिका, जिल्‍हा परिषद आणि पाणीपुरवठा यंत्रणा यांच्‍यात प्रभावी समन्‍वय ठेवून पाणी व्‍यवस्‍थापनाचा कृती आराखडा तातडीने तयार करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले.

नाशिक, अहिल्‍यानगर व मराठवाडा विभागातील जलसाठ्याचा आढावा घेताना नाशिक विभागात सध्‍या २६ टक्‍के तर मराठवाडा विभागात २८ टक्‍के उपयुक्‍त जलसाठा उपलब्‍ध असून, दोन्‍हीही विभागातील प्रकल्‍पांमध्‍ये अपेक्षित प्रमाणात पावसाची नोंद झालेली नाही. विशेषत: मराठवाडा आणि अहिल्‍यानगर विभागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या गरजांना प्राधान्‍य देवून उपलब्‍ध जलसाठ्याचे काटेकारपणे नियोजन करण्‍याबातही गांभिर्याने कार्यवाही करण्‍यास आधिका-यांना सांगण्‍यात आले आहे.

नाशिक, अहिल्‍यानगर, पुणे, मराठवाडा विभागातील जलशयांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर पाण्‍याची नवीन आवक सुरु होईपर्यंत असलेल्‍या पाण्‍याचा वापर अत्‍यंत जपून करावा. अगामी मान्‍सुनच्‍या अनिश्चिततेच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रत्‍येक जिल्‍ह्यासाठी स्‍वतंत्र कृती आराखडा तयार करतानाच पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा, ग्रामीण व शहरी भागातील टंचाई निवारण आणि जलस्‍त्रोतांचे संरक्षण करण्‍यावर भर देण्‍याबातही बैठकीत ठरविण्‍यात आले.

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यासह गोदावरी खो-यातील विविध प्रकल्‍पांची स्थिती लक्षात घेता स्‍थानिक प्रशासन, जलसंपदा विभाग व पाणीपुरवठा यंत्रणांनी समन्‍वयाने काम करुन पाण्‍याचे नियोजन करावे, उपलब्‍ध जलसाठ्याचा वापर अत्‍यावश्‍यक गरजांसाठी करण्‍याबाबत जनजागृती करण्‍याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत आधिका-यांना केले आहे.

उपलब्‍ध पाण्‍याचा वापर सर्वप्रथम पिण्‍यासाठी करण्‍यात यावा, बेकायदेशिर पाणी उपसा रोखण्‍यासाठी विशेष माहीम राबवण्‍यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभाग यांच्‍या संयुक्‍त पथकांमार्फत कठोर करावाई करण्‍याबाबतही स्‍पष्‍ट आदेश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.

शाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल ठरले – लक्ष्मीकांत देशमुख

पुणे, ता. १४

छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य हे धर्मनिरपेक्ष व समाज परिवर्तन घडविणारे होते. त्यांनी स्री सक्षमीकरणाची क्रांती केली. महिलांना कायद्याचे पाठबळ दिले. वंचितांना आरक्षण दिले. संविधानातील समतेकडे जाणारे ते पाऊल होते, असे मत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेले ३२ वे गांधी दर्शन शिबिर रविवारी गांधी भवन, कोथरूड येथे झाले. यावेळी ‘राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधान’ या विषयावर लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते.

‘सामाजिक विषमतेच्या तळाशी’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार समीर गायकवाड यांचे व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या थॉटस् ऑफ पाकिस्तान या पुस्तकाविषयी पत्रकार मुक्ता कदम यांचे विवेचन आणि ‘मी सत्यशोधक ज्योतीराव फुले बोलतोय’ हा कुमार आहेर यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग या शिबीरात झाला.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, महात्मा फुलेंची प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी काम केले. महाराज हे आदर्श प्रशासक होते. शाहू महाराजांचा कालखंड महिला शिक्षणासाठी चांगला होता. सामाजिक न्याय देणारे संविधान शाहूंनी स्वराज्यात निर्माण केले. समतेचा, सुधारणेचा पथसिध्द मार्ग दिला. महाराजांनी आदेश काढून मागास व सवर्ण यांच्या साठी एकत्र शाळा सुरू केल्या. अस्पृश्यांना वकिली शिक्षण दिले. सर्व सार्वजनिक जागा सर्वांसाठी खुल्या केल्या. कृतीने मनुस्मृतीचे कायदे झिडकारले.

 रन फॉर एन्व्हायर्नमेंट’ ला चांगला प्रतिसाद !

पर्यावरणासाठी धावली तरुणाई

पुणे, दि. १४ जून २०२६ :

पर्यावरण संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या तेर पॉलिसी सेंटरतर्फे आणि टाटा स्टील कलर्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला ‘एन्व्हायरॉथॉन – रन फॉर एन्व्हायर्नमेंट’ हा उपक्रम रविवारी सकाळी पुणे ग्रामीण पोलीस हॉकी ग्राउंड, पाषाण येथे उत्साहात पार पडला. राज्यातील विविध भागांमधून आलेल्या ८०० पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. 

या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून पर्यावरण जागृती आणि आरोग्य संवर्धन यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम म्हणून त्याला विशेष ओळख मिळाली आहे. पुणे, दौंड, मुंबई, दिल्ली, हरियाणा, आसाम तसेच कर्नाटक येथील स्पर्धकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशा गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, उपअधीक्षक राजेंद्र  मायने आणि डॉ. रोहन खावटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेदरम्यान सहभागी धावपटूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ धावपटू आशीष कसोदेकर, टाटा स्टील कलर्स प्रा. लि. चे सरव्यवस्थापक महेंद्र पिंगळे, तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे, गुगलचे अधिकारी विजय कुमार, उमेश कुमार, डॉ. रोहन खावटे आणि अनिल उत्पात यांच्या हस्ते  झाला.

यावेळी बोलताना आशीष कसोदेकर म्हणाले, “धावणे ही शरीराला मजबुती देणारी कृती आहे. एन्व्हायरॉथॉनमधून मानवी प्रकृती आणि निसर्ग यांची जपणूक होते. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.”महेंद्र पिंगळे म्हणाले, “टाटा स्टीलकडून आम्ही पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असतो. रूफिंग शीट निर्मितीत पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही असे रंग वापरले जातात आणि या उत्पादनांचा  पुनर्वापरही शक्य आहे.”डॉ. विनिता आपटे म्हणाल्या, “टाटा स्टीलच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या तेर पॉलिसी सेंटरच्या विविध उपक्रमांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. जागतिक तापमानवाढीचे आव्हान अधिक तीव्र होत असताना पर्यावरण संवर्धनाचा विचार समाजात अधिक व्यापकपणे रुजविणे आवश्यक आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी आपटे आणि ऋतुजा इंगळे यांनी केले.

तेर (टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हायर्नमेंट) ही संस्था वृक्षलागवड, नागरी उद्यान निर्मिती, कांदळवन संरक्षण, विहिरींचे पुनरुज्जीवन, पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती या क्षेत्रांत कार्यरत आहे. संस्थेने महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आसाम, गोवा, राजस्थान आणि ओडिशा येथे तेरा लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे. एन्व्हायरॉथॉनसारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.