पंढरपूर दिनांक 14 – राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांची भेट घेतली. यावेळी रोहित पवारांनी जीआरमध्ये ज्या काही अटी आहेत त्या शिथिल तसेच काढून टाकण्याची मागणी केली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांची 50 हजारांची अट काढून टाका अशी मागणी देखील पवारांनी केली आहे. तसेच या अटी काढा नाहीतर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाचा अपमान होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी गिरीश महाजन यांनी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकरी कर्जमाफीमधील अटींच्या बाबतीत काय करता येईल यावर चर्चा केली जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली आहे.
गिरीश महाजन म्हणाले, आमदार रोहित पवार हे गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मला त्यांचा कॉल आला आणि तेव्हा मी विचारले तेव्हा विचारले की हा सल्ला कोणी दिला? कारण मी देखील उपोषण केले होते. उपोषणाच्या भानगडीत पडायचे नाही, असे माझे मत आहे.
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आता मागणी नसताना देखील आम्ही शेतकरी कर्ज माफी केली. निवडणुकाही नव्हत्या, तरी आम्ही हा निर्णय घेतला. नेमलेल्या समितीने अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण रोहित दादांना असे वाटत आहे की यात सुधारणा झाली पाहिजे. त्यांच्या मागण्या आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर या निकषावर पोहोचलो की चर्चा करावी लागेल. असे होणार नाही की इथे बसल्या बसल्या झाले आणि दिले. शासन सर्वांना मदत करत आहे.
उपोषण सोडावे, गिरीश महाजन यांची विनंती
आता शेतकरी अडचणीत आहे हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. तरी यात सुधारणा पाहिजे असे रोहित पवारांना वाटत आहे. मी म्हणेल तुम्ही मुंबईला या आपण सविस्तर चर्चा करू. 22 तारखेपासून अधिवेशन आहे. 22 च्या आधी आपण एकदा बसून चर्चा करू. शेवटी मुख्यमंत्री साहेब योग्य तो निर्णय घेतील आणि मार्ग निघेल. उपोषण करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे आपण जास्त वेळ न बसता उपोषण सोडावे.
रोहित पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी तयार
यावर रोहित पवार म्हणाले की, मला फक्त सगळ्या शेतकरी बांधवांना एकच विचारायचे आहे की, हे आंदोलन राजकीय नव्हते. आपण शेतकऱ्यांसाठी बसलो आहोत. कृषिमंत्री साहेबांनी देखील आपल्याला ग्वाही दिली आहे, गिरीश महाजन देखील आत्ता आपल्याला बोलले आहेत. पण मला असे वाटते की यात अजून ओढाताण केली तर शेतकऱ्यांचे नुकसान आहे. अधिवेशनाच्या आधी आपण चर्चा करूया. मला असे वाटत आहे की यातून दोन्ही अटी काढल्या जातील. मी सरकारला आग्रह करेल की आमच्या मागण्या मान्य कराच. जर सरकार याबाबतीत बैठक घ्यायला तयार असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्र्यांकडे जायचे का? असा सवाल पवारांनी आंदोलकांना व शेतकरी बांधवांना विचारला, त्यावर शेतकऱ्यांनी होकार उत्तर दिले. त्यानंतर रोहित पवारांनी सरकारचे आभार व्यक्त केले.

