Home Blog Page 15

ठाकरे गटाने काँग्रेसशी चर्चा न करता दानवेंना उमेदवारी दिली:विजय वडेट्टीवार यांचा आरोप,सपकाळ म्हणाले आम्हीही लढणार

मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला या प्रकरणी विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे. तर भाई जगताप यांनी काँग्रेस या निवडणुकीत आपला उमेदवार देईल असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.दरम्यान विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असे कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजपने यापैकी आपल्या वाट्याला येणाऱ्या 6 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली. सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी आपले पत्ते अजून उघड केले नाहीत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कुणाला उमेदवारी देणार? याविषयी उत्सुकता लागली आहे. पण विरोधी बाकावरील ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रंगणांगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. पण आता काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.

काँग्रेस नेते भाई जगताप या प्रकरणी बोलताना म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सध्या दिल्लीत आहेत. ते आमच्या नेत्यांशी चर्चा करून विधान परिषदेच्या निवडणुकीसंबंधी योग्य तो निर्णय घेतील. उद्या अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे या प्रकरणी जे काही आहे तोपर्यंत स्पष्ट होईल. या प्रकरणी एवढे अस्वस्थ होण्याची काहीच गरज नाही. आम्ही अस्वस्थ नाही. आम्ही स्वस्थ आहोत. काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी हा विषय खूप मोठा आहे. हा विषय एवढा तकलादू नाही.
आमचे प्रांताध्यक्ष दिल्लीतच आहेत. या सगळ्या घडामोडी होत असताना आम्ही सर्व जबाबदार आहोत. या जबाबदारीनेच सगळ्या गोष्टी होतील. आतापर्यंत याबाबतीतची अधिकृत माहिती किंवा घोषणा हे प्रांताध्यक्षच करू शकतील. मी किंवा इतर कुणीही करू शकणार नाही. पण माझ्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष कदाचित या निवडणुकीत आपला उमेदवार देईल.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी ठाकरे गटावर अंबादास दानवेंचे नाव विचारात घेताना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, आज शिवसेना ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर करताना त्यांनी काँग्रेसशी कोणतीही चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक लढवली असती तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता. आमचे तसे ठरलेही होते. पण आता दुसरेच नाव समोर आले. मी यासंबंधी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली. मी त्यांना तुमच्याशी या नावासंदर्भात चर्चा झाली काय? असे विचारले. त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले.

आता दिल्लीहून मुंबईत परतलेत. मी त्यांच्याशी पुन्हा चर्चा करेन. त्यानंतर पक्षाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. तूर्त ठाकरे गटाने आमच्याशी या प्रकरणी कोणतीही चर्चा केली नाही. उद्या राज्यसभेची निवडणूक आहे. त्या संदर्भातही स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे की, ही जागा शिवसेना लढवणार असेल, तर पुढची राज्यसभेची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे. आम्ही ही जागा सोडणार नाही ही आमची भूमिका आहे. या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही हे प्रदेशाध्यक्षांनी ठरवले असेल, तर काँग्रेस उमेदवार देईल.

पत्रकारांनी महाविकास आघाडीतील या वादामुळे भाजप आपला अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता आहे असा प्रश्न वडेट्टीवारांना केला. त्यावर ते म्हणाले, ते काय करतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. महाविकास आघाडी म्हणून समन्वय ठेवण्यासाठी चर्चा होऊन उमेदवारी घोषित व्हावी असे ठरले आहे. शरद पवारांच्या बाबतीत एकमत झाले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत महाविकास आघाडीचे एकमत होते. पण एखादे नवे नाव समोर आले असेल आणि त्यावर चर्चा झाली नसेल, तर ते योग्य वाटत नाही. चर्चेतून मार्ग काढावा अशीच आमची इच्छा होती. या प्रकरणी आमच्याशी किमान चर्चा व्हावी अशी आमची रास्त अपेक्षा होती. पण दुर्दैवाने आमच्याशी चर्चा न करता ते नाव घोषित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले होते उमेदवार देण्याचे संकेत

उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार नसतील तर काँग्रेस आपला उमेदवार देईल अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते तिथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यात ते या मुद्यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पक्षाचा निर्णय जाहीर करतील असा अंदाज आहे.

उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

पुणे, दि. 29 : सध्या राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट (Heat Wave) निर्माण होण्याची शक्यता असून पशुधनाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पशुधनामध्ये उष्माघात, दूध उत्पादनात घट, भूक मंदावणे, निर्जलीकरण तसेच मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याअनुषंगाने पशुधन संरक्षणासाठी पशुपालकांनी करावयाच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे.

जनावरांना दिवसभर मुबलक प्रमाणात स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्याच्या टाक्या व पाणवठे स्वच्छ ठेवावेत. शक्य असल्यास पाण्यात इलेक्ट्रोलाइट / खनिज मिश्रणाचा वापर करावा. सावलीची व्यवस्था जनावरांना थेट उन्हात बांधू नये. गोठ्यांवर शेडनेट, गवताचे आच्छादन किंवा ताडपत्रीचा वापर करावा. गोठ्यामध्ये पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. आहार व्यवस्थापन सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा हिरवा व पौष्टिक चारा द्यावा. दुपारच्या कडक उन्हात खाद्य देणे टाळावे. खनिज मिश्रण व मीठाचा संतुलित वापर करावा.

जनावरांना थंडावा देणे- दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे. शक्य असल्यास पंखे किंवा फॉगर्सचा वापर करावा. म्हैस व इतर जनावरांना पाण्यात बसण्याची व्यवस्था असल्यास अधिक चांगले. दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जनावरांची वाहतूक टाळावी. बाजार, स्पर्धा किंवा लांब अंतराच्या हालचाली शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी कराव्यात.

धाप लागणे, जास्त लाळ येणे, शरीराचे तापमान वाढणे, सुस्ती व अशक्तपणा, खाद्य व पाणी कमी घेणे आदि लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा

कुक्कुटपालनासाठी विशेष काळजी- शेडमध्ये पुरेसे वायुवीजन ठेवावे. स्वच्छ व थंड पाणी सतत उपलब्ध ठेवावे. गर्दी टाळावी व इलेक्ट्रोलाइटचा वापर करावा.

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेचा विचार करता सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घ्यावी व वरील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त, डॉ. विष्णू गर्जे यांनी केले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण:आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन; सुटका होण्याची शक्यता

मुंबई-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवून सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, तर सबळ पुराव्याअभावी इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दोषी शरद कळसकरचा जामीन मंजूर केल्यामुळे त्याची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती, तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना 2024 मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला शरद कळसकरने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, आपल्या अपिलावर निकाल लागेपर्यंत जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने कळसकरचा युक्तिवाद ग्राह्य धरत त्याला 50 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

20 ऑगस्ट 2013 रोजी झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि एका प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारे सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना दोषी ठरवले असून, त्यांना 5 लाख रुपये दंड किंवा तो न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याउलट, हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेले वीरेंद्र तावडे यांच्यासह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

दरम्यान, सीबीआय विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. सबळ पुरव्यांअभावी तिघेही निर्दोष सुटणे हे सीबीआयचे मोठे अपयश मानले जात आहे.

संजय राऊत यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या तब्बेतीची केली विचारपूस

पुणे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीत पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी त्यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांनी मोहोळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजकीय विरोधक असतानाही दोघांमधील ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अनेक वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेली दुखापत पुन्हा बळावल्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता. 14 एप्रिल रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यानंतर त्यांना किमान महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.ऑपरेशननंतर मोहोळ यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती देत लवकरच पुन्हा कामावर रुजू होणार असल्याचे संकेत दिले होते. सध्या ते पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. अशा परिस्थितीत संजय राऊत यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्यामुळे राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक नात्यांना प्राधान्य दिल्याचे या प्रसंगातून दिसून आले.या दौऱ्यात शिवसेना गटनेता पक्ष कार्यालयाचे उद्घाटनही पार पडले. त्यानंतर सारसबागसमोरील बाळासाहेब ठाकरे कलादालनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पुणे शहरातील पक्षबांधणी, संघटन विस्तार आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील योजना यांचा आढावा घेण्यात येत आहे.

राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण २०२६ जाहीर. राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती. राज्यभरात एआयच्या संधीचे संतुलन साधण्यासाठी सहा एआय-उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. याशिवाय पाच एआय इनोव्हेशन सिटीज ची स्थापना होणार. महाराष्ट्राचे एआय पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणारे दमदार धोरण.
(इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग)

सामजिक समता व समरसता वर्षा निमित्त साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय. कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार. (सामाजिक न्याय विभाग)

हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना. राज्यात तीनशे कोटी वृक्ष लागवडीकरिता महत्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम. पायाभूत सुविधा उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी व सनियंत्रण यासाठी आयोग काम करणार. ( वन विभाग)

राज्यातील हरित ऊर्जेचा वापर आणि पारेषण क्षमतेचे अधिक बळकटीकरण. त्यासाठी मॅजेस्टिक – महाराष्ट्र अॅक्सलरेटिंग ग्रीन एनर्जी अँण्ड स्टोरेज टेक्नॉलॉजीज इंटिग्रेशन इन कनेक्टेड ग्रीड (Maharashtra: Accelerating Green Energy and Storage Technologies Integration in Connected Grid – MAGESTIC) योजना राबविण्यात येणार. योजनेसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळणार. त्याबाबतचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.
(ऊर्जा विभाग)

दिव्यांगाच्या शिक्षण भरारीला आणखी बळ. उच्च माध्यमिक परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळणार. गत बारा वर्षांनंतर पहिल्यांदाच भरीव वाढ. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ, परीक्षा बोर्ड, संस्थेला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क , नोंदणी शुल्क, ग्रंथालय, नियतकालिकांसाठी, वैद्यकीय तपासणीचे शुल्क मिळणार.
(दिव्यांग सक्षमीकरण विभाग)

रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथे केंद्रीय विद्यालयाला जमीन. कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी आणखी एक महत्वाची सुविधा. केंद्र सरकारचे केंद्रीय विद्यालय संघटन, नवीन केंद्रीय विद्यालय उभारणार. मौजे नाचणे येथील अडीच हेक्टर जमीन उपलब्ध करून देणार.
(महसूल विभाग)

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना. आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थाद्वारा चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षांच्या नियमित सेवेनंतरची दोन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता. (आदिवासी विकास विभाग)

मविआकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार:आदित्य ठाकरेंची घोषणा; शरद पवार गटाचा पाठिंबा

मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावरून सुरू असलेल्या सस्पेन्सचा अखेर पडदा फासला आहे. स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवार व्हावे, अशी भूमिका वारंवार मांडली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाऐवजी पक्षातील आक्रमक चेहरा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

उद्धव ठाकरे यांनी 2020 साली विधान परिषदेवर प्रवेश केला होता आणि त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू असताना, ठाकरेंनी अंबादास दानवेंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरेंनी त्यांची जागा शिवसैनिकाला दिली – अंबादास दानवे
विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “उद्धव ठाकरे साहेबांचे मी आभार मानतो. पक्षाने शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला जबाबदारी दिलेली आहे. उद्धव ठाकरेंनी सभागृहात यावे, अशी आमची सगळ्यांची भूमिका होती. परंतु, उद्धवजींनी एका सामान्य सैनिकाला त्यांची जागा सभागृहात दिली. उद्धव ठाकरेंनी सगळ्या नेत्यांशी चर्चा करून, मला उमदेवारी देण्याचा निर्णय घेतला असे वाटते. मी याआधीही सभागृहात होतो. आता एका गॅपनंतर पुन्हा सभागृहात येतोय,” असे अंबादास दानवे म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी नाकारल्यामुळे आता महाविकास आघाडीची रणनीती काय असेल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीतवेळी ठाकरे गटाचे शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे विधान परिषदेला उद्धव ठाकरे जो कोणी उमेदवार देतील त्याला आमचा पाठिंबा राहील, असे आमच्याकडून सांगण्यात आले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे आता काँग्रेसला उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य आहे का? काँग्रेसकडून कोणती भूमिका घेतली जाते? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

दरम्यान, अंबादास दानवे यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेनेतील फूटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. अंबादास दानवेंना आता दुसऱ्यांदा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, अंबादास दानवे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली.
महायुतीचे किमान 8 उमेदवार निवडून येण्याची शक्यता

विधान परिषद निवडणुकीच्या गणिताकडे पाहिले, तर एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड दिसत आहे. भाजपकडे 131 आमदार, शिवसेना शिंदे गटाकडे 57, तर अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. या बळावर महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांचा फक्त एकच उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो.

अंबादास दानवे यांचा सविस्तर परिचय

नाव – अंबादास एकनाथराव दानवे
जन्म – दिनांक 08 डिसेंबर 1970, छत्रपती संभाजीनगर
पत्ता – ‘भवानीकृपा’ अजबनगर-संभाजीनगर 431001
ई मेल – ambadasdanve79@gmail.com
शिक्षण

एम.ए. जनसंवाद व वृत्तपत्रविद्या
एम.ए. योगशास्त्र
एम.ए. समाजशास्त्र
विधी शाखा व्दितीय वर्ष पूर्ण
राजकीय जबाबदारी

1998 ते 2001 – उपजिल्हाप्रमुख, शिवसेना, छत्रपती संभाजीनगर.
2000 – सदस्य महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर (नगरसेवक).
2000 ते 2001 – सभागृहनेता, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर.
2004 पासून – जिल्हाप्रमुख, शिवसेना, छत्रपती संभाजीनगर.
2014 – गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली (पराभूत).
2019-2025 – संभाजीनगर – जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड.
2024 पासून – शिवसेना नेता – नियुक्ती.
2021 पासून – संचालक संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
2022 ते 2025 – विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद.
इतर जबाबदारी

मातृभूमी प्रतिष्ठान (सामाजिक संस्था), छत्रपती संभाजीनगर – अध्यक्ष.
संपर्कप्रमुख – अखिल भारतीय वारकरी महामंडळ, छत्रपती संभाजीनगर.
जिल्हा हँडबॉल संघटना, छत्रपती संभाजीनगर – अध्यक्ष.
कबड्डी संघटना, छत्रपती संभाजीनगर – अध्यक्ष.
जिल्हा योग संघटना, छत्रपती संभाजीनगर – अध्यक्ष.
संचालक – स्वामी समर्थ प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर (वाळूज).
कर्णपुरा देवी मंदिर संस्थान- छत्रपती संभाजीनगर, इ. स. १९९७ पासून – अध्यक्ष.
दत्तधाम सूर्यकुंड सुलीभंजन पर्वत संस्थान – रत्नपूर – अध्यक्ष.
विशेष

इ. 12 वी परीक्षा मार्च 1988 मराठवाडा विभागात सहाव्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत उत्तीर्ण.
खासदार संजय राऊत ‘रोखठोक’ अभिव्यक्तीः एक संवादशास्त्रीय अभ्यास या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात लघुप्रबंध सादर.
बर्कले विद्यापीठ – कॅलिफोर्निया ‘अमेरीका’ मान्यताप्राप्त हैद्राबाद पर्लओनजीक विद्यापीठ सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट देऊन सन्मान.
विविध आंदोलने

आंतकवाद विरोधी सप्ताहाचे आयोजन – 1 जून 2006.
छत्रपती संभाजीनगरात वंदेमातरम सभागृहासाठी 31 वेळा आंदोलन.
संभाजीनगर नामांतरासाठी सातत्याने आंदोलने व तुरुंगवास.
जायकवाडीत हक्काचे पाणी मिळावे यासाठी आंदोलन.
शेतकऱ्यांसाठी सातत्याने आंदोलने.
छत्रपती संभाजीनगरात ‘लबाडांनो पाणी द्या’ लागोपाठ 34 दिवस आंदोलन व भव्यमोर्चा 13 एप्रिल ते 16 मे 2025.
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ” क्या हुवा तेरा वादा” आंदोलन 5 ते 12 मे 2025.
सातत्याने ‘ पीक विमा मदत केंद्र’ सुरू करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
उपक्रम

शिवसैनिकांसाठी ‘शिवकवच’ विमा योजना राबवली.
दुष्काळी स्थितीत ‘ गंभीर दुष्काळ – खंबीर शिवसेना’ उपक्रमात शेतकऱ्यांना चारा वाटप, पाणी टाकी व ठिकठिकाणी टँकरने पाणीपुरवठा, शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटप, शेती अवजारे मिळवून देणे, चारा छावण्या, मोफत बियाणे, सामुदायिक विवाह उपक्रम राबविले.
शिवजलक्रांती माध्यमातून पाझर तलावंतुन गाळ काढून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचविले.
पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविली – 2013-2014 / 2015-2016.
जिजाऊ कवच योजना – माता व बालमृत्यु रोखण्यासाठी उपक्रम.
बेवारस प्रेतांना विधीवत अंत्यसंस्कारासाठी ‘शवदाह योजना’ राबविली (सन 2012 पासून)
कोवीड काळात 35000 कुटुंबांना अन्नधान्य वाटप / 2500 रुग्णांना अन्नपुरवठा.
छत्रपती संभाजीनगरात 2017 पासुन सतत स्वयंपुर्ण ” शिवभोजन केंद्र ” अंतर्गत गोरगरिबांना मोफत भोजन.
गरजूंच्या मदतीसाठी संभाजीनगरात कार्डीयाक रुग्णवाहिका.
सांस्कृतिक – सामाजिक कार्य

मागील 27 वर्षांपासून (1998) श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन.
प्रतिवर्षी ‘हर हर महादेव कावड’ यात्रेचे आयोजन.
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परिक्षेच्या धर्तीवर ‘सामान्य ज्ञान स्पर्धा’, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, तुरुंगातील कैद्याचे पाल्य, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी सन 2012 ते 2025 या काळात ” सूर्योदय शिष्यवृत्ती ” (18000 विद्यार्थी).
पाश्चिमात्य ‘व्हॅलेंटाईन डे’ ऎवजी सातत्याने ‘मातृपितृ पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन.
विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवात ‘ गणपती अथर्वशीर्ष’ पठणाचे आयोजन.
2011 पासून नवरात्रीत नवरंग महोत्सवाचे आयोजन.
महिलांना शेकडो शिलाई मशिन, अपंगांना सायकल वाटप, प्रतिवर्षी 9 कर्तुत्ववान महिलांना पुरस्कार.
26 जुलै 2018 रोजी चित्र रंगवा स्पर्धेचे आयोजनातून विश्वविक्रम – एकाचवेळी 52500 विद्यार्थ्यांचा सहभाग.
कबड्डी – क्रिकेट, हॉलीबॉल स्पर्धेचे सातत्याने आयोजन.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बँकेच्या परिक्षेमध्ये सहभाग वाढावा यासाठी सतत बँक भरती प्रशिक्षणांचे आयोजन.
विरोधी पक्षनेता (कार्य)

जनाधिकार – तुमच्या हक्काचा जनता दरबार उपक्रम.
महाराष्ट्रातील 12 जिल्हयात ऑन द स्पाट प्रश्नांची सोडवणूक.
अकोला व शेवगाव दंगलग्रस्त भागात भेट.
मेळघाटात मुक्काम करून अनेक आदिवासी पाड्यांना भेटी – आदिवासी बांधवांशी संवाद – हंगतपुरी, शिरुर येथे संवाद.
दरडग्रस्त हशीळवाडी, तळीये गांवांना प्रत्यक्ष भेट.
नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, पिंपरी चिंचवड, धाराशिव, नाशिक, येथील रुग्णाच्या सुखसोयीशी वैद्यकीय महाविद्यालयांना भेटी.
शासनाच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन.
गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागांना भेटी.
दुष्काळ, अतिवृष्टी झाल्यावर सातत्याने शेतकऱ्यांच्या बांधावर.

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर झालं आहे.

अनेक दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरु आहे. विधान परिषदेच्या एकूण 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. तर काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे त्यांची जागा विधान परिषदेत रिक्त झाली आहे.
भाजपकडून प्रज्ञा सातव यांना त्याच रिक्त झालेल्या जागेवर जी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, त्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 9 जागांपैकी 5 जागांवर विजय मिळवण्याचं संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे 5 जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

विधान परिषदेत संधी मिळावी यासाठी भाजपमध्ये अनेक जण इच्छुक होते. अनेकांकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते. अनेकांकडून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग केले जात होते. या विषयावर महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत काही नावे निश्चित करण्यात आली होती. ही सर्व नावे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात आली होती. त्यापैकी सहा नावे भाजपच्या हायकमांडने मान्य केली आहेत. या सर्व उमेदवारांची नावे भाजपकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश.

मुंबई दि. 28 : लोहगाव (जि. पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून येत्या महिन्याभरात रुग्णालय लोकार्पणासाठी सज्ज करावे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत हें निर्देश देण्यात आले. या बैठकीत लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तसेच येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पाठारे उपस्थित होते.

लोहगाव परिसरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, भविष्यातील विमानतळ विकास आणि प्रस्तावित रिंग रोड यांचा विचार करता लोहगाव रुग्णालयाची ची क्षमता 200 खाटांपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभाग सकारात्मक असून या विस्ताराचा समावेश बृहत आराखड्यात करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी आमदार बापूसाहेब पाठारे यांनी लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाआरोग्यमंत्र्यांनी दिल्या.दरम्यान, लोहगाव उपजिल्हा रुग्णालय आणि येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय येथे आरोग्य उपसंचालक, पुणे व संबंधित अधिकाऱ्यांनी आमदारांच्या सोयीने प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करावा, असेही निर्देश देण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कामांचा आढावा घेऊन संरक्षक भिंतीचे बांधकाम, अतिक्रमण हटविणे, वृक्षारोपण आणि इतर प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, नागरी आरोग्य अभियानाचे आयुक्त सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव श्री. दिपक केंद्रे, उपसंचालक डॉ. भगवान पवार (पुणे) तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोहगाव आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यावर शासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) महाग झाल्यामुळे देशातील प्रमुख विमान कंपन्यांचा ऑपरेशन खर्च (चालवण्याचा खर्च) 20% पर्यंत वाढला आहे.एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या मोठ्या विमान कंपन्यांच्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स’ (FIA) या संघटनेने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पाठवलेल्या एका अहवालात मदतीची मागणी केली आहे.

FIA ने सांगितले की, जेट इंधन महाग झाल्यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांसमोर कामकाज सुरू ठेवणे कठीण झाले आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, कंपन्या ऑपरेशन्स थांबवण्याच्या किंवा आपली विमाने उभी करण्याच्या मार्गावर पोहोचल्या आहेत.एफआयएनुसार, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्षेत्रातील इंधनाच्या किमतींमधील मोठ्या फरकामुळे एअरलाइन्सचे नेटवर्क आर्थिकदृष्ट्या अस्थिर झाले आहे. पूर्वी एअरलाइन्सच्या एकूण परिचालन खर्चात इंधनाचा वाटा 40% होता, जो आता वाढून 60% पर्यंत पोहोचला आहे.

एअरलाइन्सने 11% उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) रद्द करण्याची मागणी केली

फेडरेशनने सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत:

एटीएफवर लागू असलेली 11% उत्पादन शुल्क सध्या स्थगित करण्यात यावे.
प्रमुख राज्यांमध्ये एव्हिएशन इंधनावर लागणारा व्हॅट (VAT) कमी करण्यात यावा.
कोविड-19 नंतर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेली ‘क्रूड ब्रेंट प्राइसिंग मेकॅनिझम’ पुन्हा लागू करण्यात यावी.
असोसिएशनने इशारा दिला आहे की, जर या समस्यांचे निराकरण झाले नाही, तर एअरलाइन्सना त्यांची क्षमता कमी करावी लागेल आणि विमानांची संख्या घटवावी लागेल, ज्यामुळे प्रवासी आणि कनेक्टिव्हिटीवर थेट परिणाम होईल.

इराण युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर 45.5% नी वाढले

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 45.5% वाढल्या आहेत. मात्र, सरकारने देशांतर्गत उड्डाणांसाठी ATF च्या किमतीतील वाढ 25% पर्यंत मर्यादित ठेवली होती. त्यामुळे एप्रिलमध्ये तेल कंपन्यांनी (OMCs) देशांतर्गत ATF च्या किमती केवळ 9.2% नी वाढवल्या, परंतु आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्ससाठी ही वाढ खूप जास्त होती.

आंतरराष्ट्रीय विमानांसाठी इंधन ₹73 नी महागले

आकडेवारीनुसार, देशांतर्गत ATF च्या किमतीतील वाढ ₹15 प्रति लिटरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती, तर आंतरराष्ट्रीय ATF चे दर ₹73 प्रति लिटरपर्यंत वाढले.

जागतिक बाजारात ATF च्या किमती 87.24 डॉलर प्रति बॅरलवरून वाढून आता 235 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. रेटिंग एजन्सी इक्रा (ICRA) ने देखील अंदाज व्यक्त केला आहे की, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती भविष्यात ATF चे दर आणखी वाढवू शकतात.

मंत्रालय 5,000 कोटी रुपयांचे मदत पॅकेज देऊ शकते

परिस्थिती लक्षात घेता, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने काही पावले उचलली आहेत. एप्रिल 2026 पासून 3 महिन्यांसाठी देशांतर्गत विमान कंपन्यांच्या लँडिंग आणि पार्किंग शुल्कात 25% कपात केली आहे. याव्यतिरिक्त, केंद्र सरकार एअरलाइन क्षेत्रासाठी 5,000 कोटी रुपयांची ‘आपत्कालीन एअरलाइन क्रेडिट योजना’ आणण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे कंपन्यांना रोख प्रवाहाच्या समस्येतून दिलासा मिळू शकेल.

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत 52,946 कोटी रुपयांची एकूण कमाई केली. ही गेल्या वर्षाच्या तुलनेत 25% वाढली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 42,431 कोटी रुपयांची कमाई केली होती. याच तिमाहीत कंपनीने 6.76 लाख गाड्या विकल्या.

एकूण कमाईतून पगार, कर, कच्च्या मालाची किंमत यांसारखे खर्च वजा केल्यास कंपनीकडे 3,659 कोटी रुपये निव्वळ नफा (नेट प्रॉफिट) म्हणून शिल्लक राहिले. हे 2025 च्या जानेवारी-मार्च तिमाहीपेक्षा 6.44% कमी राहिले आहे. गेल्या वर्षी कंपनीला 3,911 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

गुंतवणूकदारांना ₹140 लाभांश देणार कंपनी

याव्यतिरिक्त, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 140 रुपये लाभांश देण्याची घोषणाही केली आहे. कंपन्या आपल्या नफ्याचा काही भाग आपल्या भागधारकांना देतात, याला लाभांश (डिव्हिडंड) म्हणतात.
महसूल 28.20% वाढून ₹52,462 कोटींवर पोहोचला

चौथ्या तिमाहीत कंपनीला उत्पादने आणि सेवा विकून ५२,४६२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. वार्षिक आधारावर यात २८.२०% वाढ झाली आहे. जानेवारी-मार्च २०२५ मध्ये कंपनीने ४०,९२० कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.

चौथ्या तिमाहीत वाहनांची विक्री ११.८% वाढली

चौथ्या तिमाहीत मारुती सुझुकीने एकूण ६,७६,२०९ वाहने विकली. या काळात देशांतर्गत बाजारात कंपनीची विक्री वार्षिक आधारावर ३.७% वाढली, तर निर्यात ६१.३% जास्त राहिली.

यामुळे कंपनीची वार्षिक आधारावर एकूण विक्री वाढ ११.८% राहिली. देशांतर्गत बाजारात कंपनीने ५,३८,९९४ वाहने विकली, तर १,३७,२१५ वाहनांची निर्यात केली. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात आहे.

मारुतीचा शेअर एका वर्षात 9% वाढला

चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर मारुती सुझुकीचा शेअर आज 2.51% घसरून 12,890 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचा शेअर 21% घसरला आहे.

या वर्षी, म्हणजेच 1 जानेवारीपासून आतापर्यंत कंपनीचा शेअर 23% घसरला आहे. तर, गेल्या एका वर्षात कंपनीचा शेअर 9% वाढला आहे. मारुती सुझुकीचे मार्केट कॅप 4.05 लाख कोटी रुपये आहे.

1982 मध्ये मारुती सुझुकी इंडियाची स्थापना झाली होती

मारुती सुझुकीची स्थापना 24 फेब्रुवारी 1981 रोजी भारत सरकारच्या मालकीखाली मारुती इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून झाली होती. 1982 मध्ये कंपनीने जपानच्या सुझुकी कॉर्पोरेशनसोबत मिळून ‘मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड’ हा संयुक्त उपक्रम (जॉइंट व्हेंचर) तयार केला.

भारतीयांसाठी पहिली बजेट कार 1983 मध्ये मारुती 800 लॉन्च झाली. 47,500 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीवर कंपनीने देशातील एका मोठ्या वर्गाला कार खरेदी करण्यास सक्षम केले होते. मारुती सुझुकीने गेल्या 40 वर्षांत देशात 3 कोटींहून अधिक गाड्या विकल्या आहेत.

अनिल अंबानी समूहाचीआतापर्यंत 19,344 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई-

ED ने अनिल अंबानी ग्रुप (RAAG) च्या 3,034 कोटी रुपयांच्या नवीन मालमत्ता जप्त केल्या आहेत. एजन्सीने मंगळवारी मनी लॉन्ड्रिंग चौकशी अंतर्गत ही कारवाई केली आहे. ही कारवाई रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित मालमत्तांवर करण्यात आली आहे.जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील एक फ्लॅट आणि महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या खंडाळ्यातील एक फार्महाऊस समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे 7.71 कोटी शेअर्स आणि अहमदाबादच्या साणंद येथील काही जमीन देखील जप्त करण्यात आली आहे. ED ने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत हा तात्पुरता जप्ती आदेश जारी केला आहे.अनिल अंबानी समूहाविरुद्ध सुरू असलेल्या या प्रकरणात ही पहिलीच कारवाई नाही. ताज्या जप्तीनंतर, समूहाविरुद्धच्या प्रकरणांमध्ये एकूण जप्ती आता 19,344 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ईडी (ED) दीर्घकाळापासून समूहाच्या कंपन्यांनी केलेल्या कथित बँक फसवणूक आणि निधीच्या गैरवापराच्या (पैशांची अफरातफर) आरोपांची चौकशी करत आहे.

ईडीच्या तपासाचे मुख्य लक्ष यावर आहे की, ग्रुपच्या कंपन्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा कसा गैरवापर केला. तपास यंत्रणेचा आरोप आहे की, ज्या कामांसाठी कर्ज घेतले होते, त्याऐवजी निधी इतरत्र वळवण्यात आला. याच मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कचा मागोवा घेत, एजन्सी सातत्याने ग्रुपच्या मालमत्ता जप्त करत आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) आधीच दिवाळखोरी प्रक्रियेतून (इनसॉल्व्हन्सी) जात आहे. आता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालमत्ता आणि शेअर्सवर झालेल्या या कारवाईमुळे अनिल अंबानी ग्रुपच्या आर्थिक अडचणी आणखी वाढू शकतात. ग्रुपच्या अनेक कंपन्या मोठ्या कर्जाच्या आणि कायदेशीर चौकशीच्या घेऱ्यात आहेत.

PMLA आणि तात्पुरती जप्ती (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) म्हणजे काय?

PMLA (प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट): हा 2002 मध्ये बनवलेला एक कायदा आहे, ज्याचा उद्देश काळ्या पैशाला पांढरे करण्यावर (मनी लॉन्ड्रिंग) प्रतिबंध घालणे आणि अशा गतिविधींमध्ये सामील मालमत्ता जप्त करणे हा आहे.

तात्पुरती जप्ती: जेव्हा ईडीला असे वाटते की कोणतीही मालमत्ता गुन्हेगारीतून मिळवलेल्या पैशातून तयार केली गेली आहे, तेव्हा ती मालमत्ता तात्पुरती (180 दिवसांसाठी) जप्त करते. नंतर, न्यायनिर्णायक प्राधिकरणाची (Adjudicating Authority) मंजुरी मिळाल्यावर ती कायमस्वरूपी जप्त केली जाऊ शकते.

थोरले बाजीराव पेशवे यांचे तैलचित्र राज्याच्या विधानभवनात लावणार

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान ; श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची २८६ वी पुण्यतिथी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रज्वलित केलेली आग हृदयात असल्याने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी हिंदुस्थान तलवारीने गाजवला. त्यामुळे अटक ते कटक हे साम्राज्य जिवंत राहू शकले. त्यांचे स्मारक राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत उभे राहिले असून आता पालखेड येथे देखील भव्य स्मारक उभे रहात आहे. त्यासोबतच थोरले बाजीराव पेशवे यांचे तैलचित्र राज्याच्या विधानभवनात लावण्यास प्रयत्न करणार असल्याचे थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने सचिव कुंदनकुमार साठे यांनी सांगितले.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्याच्या प्रांगणात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला व प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी  समस्त पेशवे कुटुंबीय, पुष्करसिंह पेशवे, नगरसेविका स्वप्नाली पंडित,  मिलिंद एकबोटे, ईस्काॅनचे संजय भोसले, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, माधव गांगल, चिंतामणी क्षीरसागर, विश्वनाथ भालेराव, सचिन टापरे, सचिन बोधनी यांसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोहन शेटे म्हणाले, ऊन, वारा, थंडी, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता सैनिकांमध्ये रमणारे थोरले बाजीराव पेशवे हे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांना देव योद्धा असेही म्हणतात. अटक ते कटक असे साम्राज्य जिवंत ठेवण्याचा प्रयत्न हा पालखेडची लढाई आणि निजामाचा पराभव यातून अबाधित राहिला.

विश्वनाथ भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.

हायड्रॉलिक शिडीची देखभाल नाही
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता दोन वर्षांपूर्वी हायड्रॉलिक शिडी तयार करण्यात आली होती. मात्र देखभाल नसल्याने या शिडीचा वापर करता येत नाही. अनेकदा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. पुतळ्या पर्यंत ज्येष्ठांना जाणे या शिडीद्वारे शक्य होते. मात्र पुणे मनपा ने याची देखभाल करून ही शिडी त्वरित पूर्ववत करावी, अशी मागणी करीत पालखेड येथील स्मारकाचे काम ६० टक्के इतके पूर्ण झाले असून त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल, असे कुंदनकुमार साठे यांनी सांगितले.

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्वाचे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा

पुणे, दि. २८ – देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या माध्यमातून विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज( एआययू )च्या १०० व्या वार्षिक महासभेचे व “ज्ञान आणि नवोपक्रमातून स्वावलंबी भारत घडवणे” या विषयावर पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे आयोजित राष्ट्रीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला एआययूचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनय कुमार पाठक, महासचिव डॉ. पंकज मित्तल, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे , प्र-कुलगुरू डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. स्मिता जाधव आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, विद्यापीठांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर प्रगती करताना दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. उच्च शिक्षण संस्थांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे युवक घडवावेत. कौशल्य विकासाला प्राधान्य देत सर्वसमावेशक शिक्षण पद्धती उभारण्याचे आवाहनही राज्यपालांनी केले.

उच्च शिक्षणासाठी ५० टक्के प्रवेश प्रमाण गाठण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पर्यावरणपूरक विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता व प्रगत तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश यावरही श्री.वर्मा यांनी भर दिला.

एआययूची शताब्दी परंपरा अधोरेखित करताना राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, ही संघटना उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची मार्गदर्शक संस्था असून देशातील विद्यापीठांना धोरणात्मक दिशा देत आहे. डॉ. एस. राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांसारख्या दिग्गजांनी घडविलेला शैक्षणिक वारसा आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. विनय कुमार पाठक म्हणाले, आज भारत ‘ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून त्याची पायाभरणी विद्यापीठांमधूनच होत आहे. देशाची अर्थव्यवस्था सशक्त असून जागतिक आव्हानांवर मात करत विकासदर सातत्याने उंचावलेला आहे. नवउद्योग, संशोधन आणि पेटंट नोंदणीमध्ये वाढ होत असून मोठ्या शहरांसोबतच लहान शहरांतूनही प्रगतीची नवी केंद्रे निर्माण होत आहेत. विद्यापीठांनी संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता यांना चालना देऊन ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयात सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. श्री.पाठक यांनी भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील शताब्दी प्रवासाचा आढावा घेतला.

कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, शिक्षणाचा अंतिम उद्देश समाजसेवा हाच असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यावर भर दिला जात आहे. संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि समाजाभिमुख उपक्रमांमधून उत्कृष्टतेचा ध्यास घेत विद्यापीठ कार्यरत आहे. जागतिक सहकार्य आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

महासचिव डॉ. पंकज मित्तल यांनी संघटनेच्या कार्याचा विस्तार स्पष्ट करताना शिक्षण अधिक सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय सहकार्य, संशोधन भागीदारी आणि विद्यार्थी देवाण-घेवाण यामुळे भारतीय शिक्षणाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात “ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन”, एआययूच्या १०० वर्षांच्या स्मरणिकेचे तसेच “इंडियन युनिव्हर्सिटी जर्नल” चे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

‘… तर आपल्या पक्षाचा विस्तार वेगाने करणे हेच उद्दिष्ट’

केंद्रीय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे प्रतिपादन

पुणे : रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी आणि आंबेडकर चळवळीतील सर्व घटकांनी एकत्र यावे, यासाठी आंबेडकरी समाज आसुसलेला आहे. त्यासाठी आपण अनेकदा प्रयत्न केले आहेत. मात्र, एकत्रीकरण होणारच नसेल तर आपल्या पक्षाचा वेगाने विस्तार करणे हेच आपल्या समोरचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अण्णा वायदंडे, मोहन जगताप, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, शशिकला वाघमारे, प्रवीण ओव्हाळ, विशाल शेळके, राजेश गाडे, ऋषिकेश गवळी, संजय खडसे, सुनिल जाधव, सुधीर वाघमोडे आदी उपस्थित होते. 

रिपब्लिकन पक्ष हा सर्व समाज घटकांना एकत्र जोडणारा पक्ष आहे. पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा मुळे यांनी रिपब्लिकन पक्षात  प्रवेश केला असून; त्यांच्यावर पक्षाच्या मराठा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून मराठा आणि दलित समाजाला एकत्र जोडण्याचे पक्षाचे प्रयत्न असतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्योत्तर काळात समाजात उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे. संविधानामुळे समाज एकसंध राहिलेला आहे. त्यामुळेच भारतात नेपाळ किंवा बांगलादेशसारखी अराजकाची स्थिती केव्हाही निर्माण होऊ शकत नाही. मात्र, सामाजिक स्तरावर जातीभेद उठावदारपणे दिसत नसले तरी देखील अद्यापही काही ठिकाणी दलितांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिवर्तनासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.

आम्ही देशाभरात पक्षविस्तारासाठी प्रयत्नशील असलो तरीही महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला सत्तेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही, अशी खंत व्यक्त करताना आठवले यांनी विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळाचे अध्यक्षपद आणि विविध महामंडळामध्ये 50 सदस्य पक्षाला मिळावे, अशी आग्रही मागणी देखील आठवले यांनी केली.

पुणे येथील आंबेडकर भवन च्या पाठीमागची जागा स्मारकासाठी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करण्यात यावी, कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाजवळ विजय स्मारकासाठी सरकारकडून 200 एकर जागा उपलब्ध व्हावी, अशा मागण्याही आठवले यांनी केल्या. विजय स्तंभाच्या जागेची पाहणी राज्याचा समाज कल्याण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून झाली असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन स्मारकासाठी जागा अधिग्रहित करावी, असे आठवले यांनी सांगितले.

धम्मचक्र दिनी 14 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही काळ वास्तव्य असलेल्या सातारा येथून सामाजिक समरसता मार्च काढण्यात येणार असून तो महाराष्ट्रभर जाईल आणि त्याचा समारोप पुण्यात करण्यात येईल, असेही आठवले यांनी नमूद केले. सातारा येथे डॉ आंबेडकर यांच्या मातोश्रींचे स्मारक उभारले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. चवदार तळ्याच्या शताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने राज्यभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वक्तव्य करावीत 

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता,’ या पुस्तकाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याने संतापलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी संपादकांना शिवीगाळ करून धमकीही दिली. त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आठवले म्हणाले की, पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित करताना प्रकाशकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?’ असा बदल करण्यास हरकत नव्हती. मात्र, संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वच लोकप्रतिनिधींनी वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

धार्मिक गुरूंनी वादग्रस्त विधानाऐवजी प्रबोधन करावे

बाबा बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. धार्मिक गुरूंनी वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा समाजाचे प्रबोधन करावे. लोकांच्या जीवनामध्ये विधायक बदल कसे होतील, या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भोंदू अशोक खरात याचा भांडाफोड झाल्यानंतर अनेक भोंदू बाबांचे पितळ उघडे पडत आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या सर्वच बुवा बाबांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आठवले यांनी केली.

सेवा हक्क दिनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सन्मान

पुणे- महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पुणे महानगरपालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा पुरविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेल्या यशाबद्दल दि. २८.०४.२०२६ रोजी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते व राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे प्रमुख मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे “द्वितीय सेवा हक्क दिन” या निमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सोहळ्यामध्ये महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सन्मान करण्यात आला. सदर राज्यस्तरीय सोहळा सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

पुणे महानगरपालिके मार्फत अधिकाधिक गतिमान माहिती, सेवा, योजना प्रदान करण्यासाठी पीएमसी ३६० संकल्पना राबविण्यात येत आहे. या मध्ये संकेतस्थळ, सेवा पोर्टल, तक्रार निवारण, डीबीटी पोर्टल, ऑनलाईन पेमेंट, ई स्वाक्षरी (eSign), QR Code प्रमाणीकरण, Whats App BOT, आपले सरकार पोर्टल, PMC Care इंटरफेसद्वारे उपलब्ध आहेत. मागील वर्षात या सर्व प्रणाली अद्ययावत करण्यात आल्यामुळे लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करणे सुलभ व नागरिकाभिमुख झाले आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहेत. त्यासाठी राज्य सेवा हक्क आयुक्तांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.