Home Blog Page 16

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचा मध्यरात्री छापा:15 बांगलादेशींसह अल्पवयीन मुलीची सुटका

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील ‘डिस्को’ आणि ‘माचीस’ या इमारतींवर मध्यरात्री छापा टाकत एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 15 बांगलादेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. एकूण 18 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात 11 महिला, 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. ही मोहीम सोमवारी रात्री 11.30 वाजता सुरू होऊन मंगळवारी पहाटे 5 वाजेपर्यंत चालली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवार पेठेतील या दोन इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्याव्यवसाय सुरू होता. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी 15 जण मूळचे बांगलादेशातील रहिवासी आहेत. यामध्ये बोर्ना खानुम (प्रियंका), सोमैय्या अख्तर, रय्या प्रवीण, पारुल खातून, लवली खातून, रुना शेख, तस्लिमा शेख यांसारख्या महिलांचा समावेश आहे, ज्या देहविक्रीच्या व्यवसायात गुंतल्या होत्या.

या कारवाईत 15 वर्षे 4 महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली, जिला बळजबरीने या व्यवसायात ढकलण्यात आले होते. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, या बांगलादेशी नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे नाहीत.

या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुमित मिलिंद चव्हाण (रा. मंगळवार पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, या व्यवसायावर देखरेख ठेवणारी ‘अक्का’ उर्फ ज्योती (सबिना अस्लम शेख) आणि समीर मुस्तफा हवालदार व राहुल वीरेंद्र शर्मा या दोन मॅनेजर्सनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या सर्वांचे मोबाइल फोन आणि हिशोबाच्या डायऱ्या जप्त केल्या आहेत. या डायऱ्यांमधून या व्यवसायाचे जाळे कोठपर्यंत पसरले आहे, याचा तपास केला जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये महिलांव्यतिरिक्त मोहीदुल शेख आणि सोझोल आलम फकीर या पुरुषांचाही समावेश आहे. पुणे पोलिस आता मानवी तस्करी आणि पासपोर्ट कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

मंत्री लोढांच्या लेटरहेडवर सदनिकांचा काळाबाजार:100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप-संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गोवंडीतील ‘समर्पण सोसायटी’चे दिले उदाहरण ‘सकल हिंदू समाज’ ही संस्था दलाल

मुंबई-मुंबई आणि उपनगरातील प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सदनिकांच्या वाटपात १०० कोटी रुपयांहून अधिकचा मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून या प्रकरणातील ‘रॅकेट’वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या घोटाळ्यासाठी मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या शासकीय लेटरहेडचा गैरवापर केला जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, मुंबईत प्रकल्पग्रस्तांना घरे मिळवून देण्याच्या नावाखाली एक मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामध्ये ‘सकल हिंदू समाज’ ही संस्था दलालाची भूमिका बजावत असून, वीरेंद्र प्रताप उर्फ बबलू सिंह नावाचा व्यक्ती या उद्योगाचा सूत्रधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही संस्था बोगस सदनिकाधारकांची नावे आपल्या लेटरहेडवर देऊन, त्याला मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे शिफारसपत्र जोडते आणि त्याद्वारे म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.

या घोटाळ्याची कार्यपद्धती स्पष्ट करताना संजय राऊत यांनी गोवंडी पूर्व येथील हनुमान मंदिर जवळील ‘समर्पण सोसायटी’चे उदाहरण दिले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, बबलू सिंह याने अस्तित्वात नसलेल्या ‘अजित धनाजी कदम’ या नावाने तक्रार अर्ज केला आणि या सोसायटीतील सदनिका क्र. १०२, १०३ आणि १०४ चे वाटप सुरेश नारायण गुप्ता, अनिल गुप्ता आणि शिला लालमन गुप्ता यांना करून दिले. या बदल्यात प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये उकळले असून, हा संपूर्ण व्यवहार बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुंबई आणि उपनगरात अशा पद्धतीने शेकडो सदनिकांचा गैरव्यवहार झाला असून, या घोटाळ्याची व्याप्ती १०० कोटी रुपयांच्या वर असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. बनावट ओळखपत्रे, बनावट सही-शिक्के आणि बनावट कागदपत्रे तयार करून मूळ प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

“मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या लेटरहेडचा वापर करून सुरू असलेला हा सदनिका घोटाळा अत्यंत गंभीर असून, गरीब मराठी माणसांची फसवणूक केली जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन या ‘रॅकेट’चा पर्दाफाश करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी विनंती संजय राऊत यांनी पत्राच्या शेवटी केली आहे.

रस्तोरस्ती,गल्लोगल्ली वसुली भाईंचे साम्राज्य ,पुण्यात कर्जदारांना होतेय मारहाण

हडपसर मध्ये क्रेडिट कार्डच्या थकीत बिलावरून एजंटची व्यक्तीला मारहाण:पुण्यात भररस्त्यात घडली घटना; कारवाईची मागणी-खासदार अमोल कोल्हेंनीही व्यक्त केला संताप,विजय कुंभार म्हणाले हे रिकव्हरी एजंट नव्हे हे तर गुंड
पुणे -क्रेडिट कार्डची थकीत रक्कम भरण्यावरून एका खासगी बँकेच्या एजंटकडून एका व्यक्तीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेवर सर्वसामान्य लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, रिकव्हरी एजंटवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे बँकेचे रिकव्हरी एजंट आहेत की गुंड? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

देशात गत काही वर्षांत क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे. ऑनलाइन खरेदी, वैद्यकीय खर्च, प्रवास तसेच दैनंदिन व्यवहारांसाठी अनेकजण क्रेडिट कार्डचा आधार घेत आहेत. मात्र, वेळेवर बिल न भरल्यास वाढणारे व्याज, दंड आणि त्यानंतर सुरू होणारी वसुलीची प्रक्रिया अनेकांसाठी मानसिक त्रासाचे कारण ठरत आहे. बँका आणि वित्तीय संस्थांनी थकबाकी वसुलीसाठी नियमबद्ध व कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे अपेक्षित असताना, काही ठिकाणी रिकव्हरी एजंटांकडून दमदाटी, धमक्या आणि मारहाणीच्या घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पुण्याच्या हडपसर परिसरातील अत्यंत वर्दळीच्या 15 नंबर चौकात सोमवारी रिकव्हरी एजंटकडून एका व्यक्तीला मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका खासगी बँकेचे 2 एजंट एका व्यक्तीला त्याच्या पत्नीसमोर लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहेत. यावेळी पीडित तरुणाची पत्नी व अन्य एक पुरुष या एजंटांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यानंतरही सदर एजंट त्या व्यक्तीला मारहाण करताना दिसून येत आहेत. मारहाणीमुळे सदर व्यक्ती ओक्साबोक्सी रडतानाही दिसून येत आहे. या घटनेनंतर संबंधित खासगी बँकेविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, एका खासगी बँकेचा रिकव्हरी एजंट थकीत क्रेडिट कार्ड बिलाच्या वसुलीसाठी संबंधित ग्राहकाला भेटण्यासाठी आला होता. दोघांची भेट 15 नंबर चौकात झाली असता सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वसुलीची पद्धत व एजंटच्या बोलण्यावरून हा वाद आणखी चिघळत गेला. त्यानंतर काही क्षणांतच हा वाद विकोपाला जात एजंट व ग्राहक यांच्यात एकच हाणामारी सुरू झाली. त्यानंतर भररस्त्यात रिकव्हरी एजंटने ग्राहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार पाहून परिसरातील वाहनचालक व पादचारी काही काळ स्तब्ध झाले.

गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे वाहतुकीलाही काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर विशेषतः एजंटवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर ‘वसुली’च्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर दादागिरीवर लगाम कधी बसणार? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या घटनेचा व्हिडिओ शेअर करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की, वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच फोन करू शकतात किंवा भेटू शकतात. एजंटांनी कोणत्याही परिस्थितीत शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमान किंवा मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. कर्जदाराच्या थकबाकीची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना देऊन त्याची बदनामी करता येत नाही.

वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे बँकेने दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे की, बँका केवळ गुंडांच्या जोरावर कर्जाची वसुली करू शकत नाहीत. जर बँकेच्या एजंटने कायद्याचे उल्लंघन केले, तर त्यासाठी संबंधित बँकेला जबाबदार धरले जाईल. या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली. राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शंका यावी अशी ही घटना आहे. राज्याच्या गृहखात्याने या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर वसुली एजंटांवर कारवाई झाली पाहिजेच पण संबंधित बँकेचीही जबाबदारी टाळता येणार नाही. या बँकेवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वसुली एजंट्स? ते विसराच. हे तर केवळ ‘फॉर्मल’ कपड्यांमधील गुंड आहेत. पुण्यात, एका ग्राहकाला क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरून चक्क रस्त्याच्या मधोमध -आणि तेही त्याच्या पत्नीच्या डोळ्यांदेखत – अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. जर वित्त कंपन्या वसुलीसाठी गुंडांचा वापर करत असतील, तर त्या व्यावसायिक परवान्यांच्या नव्हे, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याच्याच पात्र आहेत, असे ते म्हणालेत.
काय आहे रिझर्व्ह बँकेचा वसुली संदर्भातील नियम?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, कोणत्याही ग्राहकावर वसुलीसाठी दबाव टाकणे, धमकावणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे बेकायदेशीर आहे. त्यानंतरही अनेक प्रकरणांत एजंटकडून दबाव टाकण्याचा व आक्रमक व्यवहार केल्याच्या तक्रारी समोर येतात. पुण्यातील ही घटना याच पठडीत बसणारी आहे.

६० कोटी जास्त दर दिलेल्या अशोक लेलॅंडला PMPML च्या 1 हजार बसची ऑर्डर ?

पुणे- सध्या PMPML विविध मार्गाने प्रसिद्धी झोतात आहे. बेकायदा भरती, प्रमोशन असो , अपघात, आणि बस भुरट्याना सहज पळवून नेता येईल अशी बेपर्वाई असो PMPML मेट्रोच्या पेक्षा जास्त वेगाने प्रसिद्धी घेत आहे आणि तितक्याच विरोधी स्लो पद्धतीने रस्त्यावर धावते आहे.आता १ हजार बसेसच्या खरेदीत महापालिकांना ६० कोटींना झोपविण्याचे काम PMPML करणार असल्याच्या वार्ता आहेत यामुळे भाजपचे जुने जाणते ज्येष्ठ नेते विकास मठकरी यांनी आता आवाज उठविला आहे आणि भाजपाचे लोक हो आता जागे व्हा , वस्तुस्थिती समजावून घ्या , आणि सामान्य जनतेचे पैसे कोण खातो हे समजावून घ्या , आणि पुणेकरांचे पैसे वाचवा हो अशी आर्त विनंती.. विकास मठकरी यांनी केली आहे.

त्यांनी असे म्हटले आहे कि,’ PMPML ला एक हजार बसेसची खरेदी करायची आहे , CNG, NON AC , BRT , बसेस खरेदी केल्या जाणार आहेत ते बसेसची खरेदी आवश्यकच आहे पण ..पण पुन्हा टाटा कि अशोक लेलॅंड हा जुना वाद , जुनी स्पर्धा आजच्या मितीला सुरु असून ती पुणेकरांचे ६० कोटी खाणार असल्याचे समजले आहे. या खरेदी मध्ये TATA आणि अशोक लेलॅंड अंतीम स्पर्धेत आल्या. एका बसमागे मागे TATA ने कोट केल्या 52 लाख 60 हजार , तर अशोक लेलॅंड 58 लाख 21 हजार ..! आता नियमानुसार कमी दर देणाऱ्या TATA ला बसेसची ॲार्डर मिळायल हवी होती . पण , छे ..! ॲार्डर अशोक लेलॅंडला ..! सरळ सरळ 6 लाख रुपयानी प्रत्येक १ बस महाग ..! म्हणजे 60 कोटी रुपये जास्त देणार ? पैसा जनतेचा ,मग हे का ? सरळ सरळ भ्रष्टाचार..!
अहो , सामान्य प्रवासी तासनं तास वाट बघत असतो बिचारा PMPML ची ..! पण ? जावू दे खड्ड्यात ..! माझा खिसा भरला हेच मतलब .! दुर्दैव..!पण हेच चालू आहे ..!अक्षरशः पारंपरिक पणे ..!भाजपाचे लोक आता जागे व्हा , वस्तुस्थिती समजावून घ्या , आणि सामान्य जनतेचे पैसे कोण खातो हे समजावून घ्या , आणि पुणेकरांचे पैसे वाचवा ही विनंती..!
असे खुद्द पुण्याचे अभ्यासू नगरसेवक अशी प्रतिमा असलेले माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते मठकरी यांनी म्हटले आहे. आता हे सध्याचे विद्यमान पदाधिकारी आणि मंत्री किती गंभीरपणे घेणार ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच .

‘पीएमपी’ ने स्वमालकीच्या एक हजार ‘सीएनजी’, ‘नॉन-एसी’, ‘बीआरटी’ बस खरेदीसाठी काढलेल्या निविदेत ‘टाटा मोटर्स’ आणि ‘अशोक लेलँड’ या दोन कंपन्या पात्र ठरल्या होत्या. मूळ निविदेनुसार ‘टाटा’ ने प्रति बस सुमारे ३९ लाख नऊ हजार रुपयांचा दर दिला होता, तर ‘अशोक लेलँड’चा दर ४४ लाख ३० हजार रुपये होता. ‘जीएसटी’ व ‘आयटीएमएस’ सह टाटाची बस ५२लाख ६० हजार, तर अशोक लेलँडची बस ५८ लाख २१ हजार रुपयांना पडत होती. मूळ निविदेत ‘टाटा’ सर्वांत कमी दराने निविदा भरणारी कंपनी होती.तरीही टाटा ला टाटा करण्याची जादू करण्यात आल्याचे वृत्त आहे. पॅसेंजर डिस्प्ले बोर्ड, सीसीटीव्ही, ड्रायव्हर मॉनिटरिंग, पॅनिक बटण, व्हेइकल ट्रॅकिंग, बस हेल्थ मॉनिटरिंग यांसारखी सर्व यंत्रणा मूळ निविदेच्या कक्षेत आधीच समाविष्ट होती.

आता यापुढे प्रत्येक श्वास जनसेवेचा अन ध्यास सर्वांगीण विकासाचा! भाजप नगरसेविका मनिषा बुटाला यांचा संकल्प

पुणे-लोकांशी थेट संवाद असेल तर मतदार भरभरून आशीर्वाद देतात. लोकांसाठी कार्यालयाची दारे नेहमी उघडी असावीत असा संदेश येथे कोथरूडचे आमदार राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपच्या नगरसेविका मनिषा बुटाला यां जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते तर यावेळी आता यापुढे प्रत्येक श्वास जनसेवेचा अन ध्यास सर्वांगीण विकासाचा! असा संकल्प नगरसेविका मनिषा बुटाला यांनी प्रतिज्ञा घेत केला.

या उद्घाटन सोहळ्याला भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा नेते डॉ. संदीप बुटाला, नगरसेवक पुनीत जोशी, प्रभाग अध्यक्षा ॲड. वासंतीताई जाधव, मंजुषाताई खर्डेकर, साहित्य परिषद कार्यवाह सुनील महाजन, हास्य कलाकार मकरंद टिल्लू, सिताराम खाडे, नगरसेवक दिनेश माथवड, सुनील पांडे, नगरसेविका ॲड. मितालीताई सावळेकर, ज्योत्स्नाताई कुलकर्णी, रुपालीताई पवार, तेजश्रीताई पवळे, स्विकृत नगरसेवक निलेश कोंढाळकर, माजी नगरसेवक दिलीप उंबरकर, शाम देशपांडे, जयंत भावे, दीपक पोटे, अश्विनीताई जाधव, मीनाताई खताते, गिरीष खत्री, सचिन पाषाणकर, जगन्नाथ कुलकर्णी, प्रशांत हरसुले, बाळासाहेब टेमकर, नवनाथ जाधव, अजित जगताप, स्वातीताई मोहोळ, श्रीधर मोहोळ, दीपक पवार, प्रा. अनुराधा एडके, विद्याताई टेमकर, कल्पनाताई पुरंदरे, प्राजक्ता जोशी, प्रभाग क्रमांक ११चे अध्यक्ष अतुल शिंदे, ॲड. प्राची बगाटे, राजू मोरे, अंबादास अष्टेकर, आशुतोष वैश्यपायन, संतोष रायरीकर, तुकाराम जाधव, नितिन शिंदे, दिनेश माझिरे, कमलाकर भोंडे, संतोष अमराळे, संदीप मोरे, निर्मलाताई रायरीकर, सारिका सणस, नंदकुमार गोसावी, स्वप्निल राजवाडे, संतोष अनिवासे, कुणाल तोंडे, सुयश ढवळे, अमर गायकवाड, सचिन जोरी, कस्तुरीताई पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक, सोसायटी पदाधिकारी व सार्वजिक मंडळ पदाधिकारी, हास्य क्लब पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुयश बुटाला मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा यावेळी म्हणाले,’लोकांशी थेट संवाद असेल तर मतदार भरभरून आशीर्वाद देतात. लोकांसाठी कार्यालयाची दारे नेहमी उघडी असावीत आणि हे कार्यालय लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यास सदैव जिवंत राहिले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यास भाजपा कार्यकर्ते कटिबद्ध राहिले पाहिजेत अशी अपेक्षाही ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाचे ‘सेवा संपर्क संवाद आणि समर्पण’ या उच्च हेतूवर कार्य सुरू असल्याने कोथरूडमधील एकही समस्या शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
“गेल्या ३२ वर्षांपासून आम्ही या वस्तीबहुल भागात भारतीय जनता पक्षाच्या विचारार्थ अहोरात्र सामाजिक काम करत आहे. कार्यकर्त्यांची तळमळ आणि जनसंपर्क सुरू होताच पण नामदार चंद्रकांतदादांचे आशीर्वाद आणि सूक्ष्म नियोजन यामुळेच मनिषा बुटाला यांचा हा विजय साकार झाला आहे. आगामी काळात या प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आणि अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीने सर्वांना एकत्र घेऊन काम करू.”असा निश्चय भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते डॉक्टर संदीप बुटाला यांनी व्यक्त केला.

आपल्या भावना व्यक्त करताना नगरसेविका मनिषा बुटाला म्हणाल्या, “कोथरूड विधानसभेतील प्रभाग 11 मधील नागरिकांना २४ तास मुक्तपणे भेटता यावे, यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. प्रभागात माझे पती डॉ. संदीप बुटाला ३२ वर्षांपासून तुमच्या सेवेसाठी खंबीरपणे काम करत होते, आता इथून पुढे मी (भाजपाची कार्यकर्ती) त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि सेवेसाठी तत्पर राहीन. कोथरूड विधानसभा निवडणुकीप्रमाणे भक्कम जनआशीर्वाद घेऊन आगामी निवडणुकीत प्रभाग ११ मधून भाजपचे चारही नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास नगरसेविका मनिषा बुटाला यांनी व्यक्त केला.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी महापालिका प्रशासन आग्रही

0

भूखंडाचा वाणिज्य झोन PSP करण्यासाठी राज्य सरकार कडे करणार पाठपुरावा
पुणे:मंगळवार पेठ भू.क्र. ४०५ हि मिळकत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या लगत आहे त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी महापालिका प्रशासनाने शिफारस केली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या आदेशानुसार या मिळकतीचा झोन वाणिज्य करण्यात आला आहे. PSP अर्थात सार्वजनिक किंवा निम सार्वजनिक झोन करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ नुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच या भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीब विद्यार्थी वसतिगृह व इतर लोकोपयोगी उपक्रम व भव्य स्मारकाचा विस्तार करण्यासाठी व २५ कोटी निधी उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात मिळण्यासाठी शासन स्तरावर निर्णय होणे आवश्यक आहे. असा अभिप्राय महापालिका प्रशासना कडून शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे.

नगरसेविका हिमाली कांबळे, उज्ज्वला यादव नंदा धेंडे, आणि नीलेश आल्हाट यांनी याबाबत शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीमधील पुणे स्टेशन परिसरातील मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असून त्या शेजारील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मालकीचे मंगळवार पेठ न.भु.क्र.४०५ मधील ८९०० चौ.मी क्षेत्र पुणे मनपा यांच्या मान्य आराखड्या नुसार सांस्कृतिक केंद्र म्हणून पुणे मनपा यांनी आरक्षित केले होते. त्यानुसार बाहेरील खेडेगावातून शहरात येणाऱ्या गरीब विद्यार्थी वसतिगृह व इतर सांस्कृतिक कार्यासाठी याच भूखंडावर विस्तार व विकास करण्याचे पुणे मनपा यांचे नियोजन होते.

तथापि शासनाने पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना सदर आरक्षण रद्द करून तो भूखंड MSRDC यांच्या मालकीचा असल्याने PSP झोन मध्ये समाविष्ट केला होता. त्याउप्पर ०५/०८/२०२४ रोजी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने या जागेवरील सार्वजनिक/निमसार्वजनिक (PSP ZONE) झोन वगळून शासन मान्य UDCPR मधील तरतुदीनुसार वाणिज्यिक वापर करता येईल असे पुणे मनपा यांना लेखी कळविले होते. त्यानुसार MSRDC यांनी नेमलेल्या संबंधित आर्किटेक्ट व विकसक यांनी पुणे मनपा यांच्याकडे वाणिज्य वापर म्हणून बहुमजली इमारतीचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला होता. तथापि त्यास पुणे मनपा यांनी विचारात ना घेता तांत्रिक कारणे देऊन एम आर टी पी कायदा 1966 चे कलम 47 नुसार फेटाळून लावला होता. पुणे महानगरपालिकेने मे.एन.जी. व्हेंचर्स तर्फे रणजीत अशोक दरक (विकसक) यांचा दाखल व्यापारी/वाणिज्य इमारतीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

त्याच वेळी संपूर्ण महाराष्ट्र आंबेडकर प्रेमी व विविध राजकीय सामाजिक संघटनेने आंदोलन करुन तसेच निवेदन देवुन राज्य शासनाकडे संबंधीत जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या विस्तारीकरण व अन्य समाज व लोकोपयोगी कारणासाठी देण्यात यावी ही मागणी वारंवार करण्यात आली आहे. त्यानुसार म.रा.र.वि.म. यांच्या भूखंडावरील सार्वजनिक/निमसार्वजनिक झोन (PSP ZONE) यात UDCPR नियमावली अगर अन्य कोणत्याही कायद्याने या
भूखंडाचा वापर बदल ना करता हा सार्वजनिक / निमसार्वजनिक (PSP ZONE) झोन कायम करण्यात यावा. अशी मागणी करत भवनाचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली होती.

याच पद्धतीने नगरसेविका हिमाली कांबळे,नंदा धेंडे उज्ज्वला यादव आणि आल्हाट यांनी शहर सुधारणा समिती कडे प्रस्ताव देत झोन PSP करून जागा महापालिकेच्या ताब्यात घेऊन भवनाचा विस्तार करण्याची मागणी केली आहे. त्यावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय देत विस्तारीकरणाची शिफारस केली आहे. तसेच यासाठी राज्य सरकार कडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे

महापालिका ठरवेल हार्डिंगचे सुधारित भाडेदर:13 वर्षाचा न्यायालयीन वादावर सर्वोच्च न्यायालयाने होर्डिंग्ज व्यावसायिकांना दिला दणका

पुणे: गेली 13 वर्ष होर्डिंग्जच्या दराच्या बाबत तक्रारी करत,न्यायालयात जाऊन भिजत घोंगडे ठेवत,शेकडो कोटींना पालिकेला चुना लावण्याचा प्रकाराला आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने वेसण घातली आहे.आणि होर्डिंग्ज बाबत दर, जागा महापालिका ठरवेल असे निर्देश देत महापालिकेने निश्चित केलेल्या होर्डिंग दरांना स्थगिती द्यावी,अशी मागणी करणारी याचिका होर्डिंग व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका फेटाळून लावली आहे तसेच सुधारित भाडेदराला स्थगिती देण्यास नकार देखील दिला आहे. त्यामुळे 13 वर्षात होर्डिंग्जची शेकडो कोटीची अडवून ठेवलेली महापालिकेच्या हक्काची रक्कम अर्थात थकबाकी व्याजासह, आणि 13 वर्षात विधी सल्लागार कार्यालयावर या प्रकरणात किती खर्च पालिकेच्या तिजोरीतून केला त्याचा आढावा घेऊन ती वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरातील होर्डिंग्ज पालिकेची परवानगी घेऊनच उभारावी लागतात.यासाठी निश्चित परवाना शुल्कही भरावे लागते. महापालिकेने २०१३ मध्ये शहरातील जाहिरात फलकांसाठी २२२ रुपये प्रति चौरस वफूट दर निश्चित केला होता.याला न सर्वसाधारण सभेने मान्यताही दिली होती. दरम्यान २०१८ मध्ये महापालिकेच्या या दरा विरोधातहोर्डिंग्ज व्यावसायिक उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने महापालिकेच्या भाडेदरास स्थगिती दिली होती.

तेव्हापासून होर्डिंग व्यवसाय सुरू असला, तरी महापालिकेचे भाडे मात्र, भरले जात नव्हते. २०२३ मध्ये न्यायालयाने अंतरिम निर्णय देत महापालिकेने निश्चित केलेल्या भाडेदराच्या निम्म्या दराने अर्थात १११ रुपये प्रति चौरस फूट दराने शुल्क भरण्यास सांगितले. त्यानुसार व्यावसायिक १११ रुपये प्रमाणे शुल्क भरत होते.दरम्यान, महापालिकेने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना सर्वसाधारण सभेने २०१३ मध्ये निश्चित केलेल्या भाडेदरानुसार २२२ रुपये व प्रतिवर्ष दहा टक्के वाढीच्या सूत्रानुसार २०२३ मध्ये ५८० रुपये भाडेदर निश्चित केला.या दराबाबत होर्डिंग व्यावसायिकांनी सरकारकडे सरकारनेही दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसारच भाडेदर आकारणी करावी, असे आदेश महापालिकेला दिले. दरम्यान, मागील वर्षी डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. त्याविरोधात व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना मिळाला नाही. दिलासा महापालिकेतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.

राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी रस्सीखेच,पुण्यातील विक्रम संजय काकडेंसह चौघांमध्ये रस्सीखेच

विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे विश्वासू सहकारी मानले जातात. याबरोबरच पक्षाचे नेतृत्व दिवंगत अजित पवार यांच्याबरोबरही विक्रम काकडे यांनी काम केले आहे आणि त्यांना राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचे वडील संजय काकडे माजी खासदार आहेत.चर्चेत असलेल्या चार प्रमुख नावांवर विचार करता परिवार आणि पक्ष संघटना याच्याशी एकनिष्ठता असलेल्या व्यक्तीला संधी मिळू शकते.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता पक्षात जोरदार रस्सीखेच होत असल्याचं चित्र आहे. एका जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्याने कुणाला संधी द्यायची यावर पक्षात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज रात्री कोअर कमिटीची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहतील असे वृत्त आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होऊन निर्णय होईल असे सांगितले जातेय विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत तर सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. झिशान सिद्दीकी हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता. तर राजेंद्र जैन पक्षाचे माजी विधान परिषद आमदार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत.

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाटेला येणाऱ्या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच आहे.

विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार-
उद्धव ठाकरे (शिवसेना – ठाकरे)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम-
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला

पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला. मुंबईवरुन सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेचा कोच नं सी 15 रुळावरून घसरला.पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ट्रेन येत असताना हा अपघात झाला, त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.दरम्यान, वंदे भारत ट्रेनचा कोच रुळावरुन घसरल्याची ही पहिलीच घटना आहे,ट्रेन नंबर 22225 मुंबई ते सोलापूर Vande Bharat Express ही गाडी पुणे स्थानकात सायंकाळी सुमारे 7.30 वाजता प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करत असताना डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरली.पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत या क्रॉसिंगच्या उन्नतीकरणाचे काम नियोजित आहे, तेव्हा ट्रेनला किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.वंदे भारत ट्रेनमधील सी 15 या कोचमधील सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी व्यापारासाठी वापरले जाणारे चार कुंटणखाने एक वर्षासाठी सील केले आहेत. या कारवाईत भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांनाही अटक करण्यात आली आहे. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‘न्यू वेलकम’, ‘बेगम बिल्डिंग’ आणि ‘दाणे आळी’ येथील जुन्या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंटणखाने चालवले जातात . या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी या इमारतींमधील फ्लॅट सील करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. मिळालेल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून, पोलिस आयुक्तांनी संबंधित ठिकाणे सील करण्याचे आदेश दिले. यामध्ये बेगम बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक ३०१, न्यू वेलकम बिल्डिंगमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅट आणि दाणे आळीतील अग्रवाल मावावाला वाड्यातील उत्तर बाजूचा एक रूम, असे एकूण चार फ्लॅट पुढील एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहेत.

याच कारवाईदरम्यान, पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी रेड लाईट एरियामध्ये अवैधपणे राहणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केलेल्या कारवाईत जोशना शकुर अली, कुलसुम खातून आणि अंजुरा बेगम या तीन बांगलादेशी महिलांना संशयास्पदरीत्या फिरताना पकडण्यात आले. या महिला मागील एका महिन्यापासून विनापरवाना भारतात राहत असून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांचा शोध घेत होत्या. त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे मिळाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

ही धडक कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे आणि पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले,सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे, चंद्रकांत जवळगी, महिला पोलीस उप-निरिक्षक पुजा जाधव, पोलीस अमंलदार शिवाजी शिंदे, विशाल शिंदे, गजानन सोनुने, महेश पवार, वसिम शेख, महिला पोलीस अंमलदार वनिता कांबळे व वैशाली चौगुले, यांनी केली आहे.

मोठ्या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा विलगीकरणाचे ऑडिट अन दोषींवर कारवाई-महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

मुळा मुठा नदीचे तांत्रिक सर्वेक्षण

पुणे-दिनांक 27 एप्रिल 2026

राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा व गृहनिर्माण संकुलातील कचरा विलगीकरण याचे ऑडिट केले जात असून दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी घोषणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम हे आज पुणे येथे केली.प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया आणि भारत रिसायकलिंग शो यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रिसायकलिंग व्हिजन
सिरीज 2026 या परिषदेसाठी श्री सिद्धेश कदम प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रदूषण नियंत्रणाबाबत भूमिका स्पष्ट केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या गृह निर्माण संकुलातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे नियमित चालवली जातात की नाही त्याचबरोबर या गृह संकुलातील कचरा विलगीकरण केले जात आहे अथवा नाही याची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यस्तरीय ऑडिट केले जात आहे. राज्यातील मोठ्या शहरांपासून ते छोट्या शहरांपर्यंत सांडपाणी प्रदूषणाचा प्रश्न हा जल प्रदूषण करण्यास कारणीभूत ठरत आहे तर कचरा विलगीकरण न केल्याने मातीचे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. म्हणून केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन सुधारित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ज्या गृहनिर्माण संकुलात अशी यंत्रणा कार्यान्वित आहे तिचे पालन केले जात नसेल तर त्यावर दंडात्मक कारवाई करून प्रदूषण नियंत्रणाकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आग्रही पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.
पुणे शहरातील आरएमसी प्लांटची देखील अशाच पद्धतीने तपासणी करण्यात येणार असून आर एम सी प्लांट च्या माध्यमातून हवा प्रदूषण होणार नाही याकरता आरएमसी प्लांट उद्योगांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि ती मंडळांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी आरएमसी प्लांट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण नियंत्रणासाठी फक्त दंडात्मक कारवाई करण्यावरच भर देत नसून याबाबत राज्यातील औद्योगिक आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीच तत्परता दाखवत असते याचा देखील पुनरुच्चार आज सिद्धेश कदम यांनी केला.
प्लास्टिक रिसायकलिंग व्हिजन 2026 या निमित्ताने राज्यभरात मुंबई, पुणे , नाशिक, नागपूर , आणि रत्नागिरी अशा शहरात प्लास्टिक रिसायकलिंग व्हिजन परिषदा भरवण्यात येणार असून वेस्ट रिसायकलिंग च्या माध्यमातून सर्क्युलर इकॉनॉमी ला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि यात नवउद्योजक तरुणांचा लक्षणीय वाढता सहभाग असेल असा विश्वास देखील त्यांनी या परिषदेच्या निमित्ताने व्यक्त केला.

पुणे शहरातील मुळा मुठा नदीच्या एका टप्प्याचे तांत्रिक सर्वेक्षण हे न्यायालयीन आदेशाप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महानगरपालिका आणि जलसंधारण विभाग संयुक्तपणे करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण नियंत्रणासाठी धोरणात्मक कामकाज करीत असून त्या साठी लोक सहभाग देखील महत्त्वाचा असल्याचं सिद्धेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं.

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात शाळेला सुट्टी म्हणून मुले खुश असतात. फळांच्या राजाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वचजण आतुरतेने उन्हाळ्याची वाट पाहतात. पण उन्हाचा पारा चढायला लागल्यानंतर सर्वांच्याच जीवाची काहिली होते. ऋतू बदलामुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यात प्रामुख्याने उष्माघाताने होणाऱ्या आजारांचा समावेश होतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याबरोबरच खाण्यापिण्यावरही बंधने ठेवावी लागतात. उष्णतेच्या त्रासापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करावे अथवा काय करु नये याबाबत आरोग्य विभागाकडून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

काय करावे ?
१. पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर एक तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
२. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
३. दुपारी १२ ते ४ या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
४. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.
५. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
६. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
७. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
८. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
९. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
१०. अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
११. गुरांना गोठ्यात ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
१२. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
१३. पंखे. ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
१४. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
१५. सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
१६. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
१७. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

काय करु नये ?
१. उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत.
२. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नयेत.
३. दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
४. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
५. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
६. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
७. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
८. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

  • संकलन: विभागीय माहिती कार्यालय, पुणे

पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका:मंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. 27 एप्रिल
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण आणि या जमिनींवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची आढावा बैठक झाली. सर्व पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाल्यावर १ लाख ७५ हजार पात्र झोपडपट्टीधारकांना घर मिळणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनातील अडथळे दूर करत यापुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

२०१६ च्या सर्वेक्षणानुसार, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे ४१९४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे. या जमिनी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, म्हाडा आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या आहेत.
शासकीय जमिनीवर असलेल्या या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सद्यस्थितीत ८७.७९ लाख चौरस मीटरवर ९२६ पुनर्वसन प्रकल्प आहेत. यापैकी १६० प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. ३२२ प्रकल्प सुरू असून ११४ स्थगित आहेत. तर ३३० प्रकल्पांची मंजुरी प्राप्त झाली आहे. या सर्व प्रकल्पांमधून सुमारे पात्र १ लाख ७५ हजार ५११ झोपडपट्टी धारकांना घर मिळणार आहे. याकरिता सुमारे १,०४,८९२ Provisional PAP घरे सुमारे २३,००९ घरे उपलब्ध होणार आहे त्याकरिता २,४१६ कायमस्वरूपी ट्रांझिट कॅम्पचा समावेश आहे.
बैठकीत या सर्व प्रकल्पांची सद्यस्थिती, अडचणी यांचा आढावा घेण्यात आला. सुरू असलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करावे. स्थगित प्रकल्पांबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून द्यावी. यापुढे अतिक्रमण रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना ॲड. शेलार यांनी दिल्या.
बेकायदेशीर अतिक्रमणांबाबत माहिती मिळावी यासाठी प्रधानमंत्री गतीशक्ति अभियांनाअंतर्गत ‘नेत्रम’ ही संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. याद्वारे सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून अतिक्रमणांवर लक्ष ठेवण्यात येते. तसेच अतिक्रमण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना त्याची माहिती दिली जाते. अतिक्रमण रोखण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची आहे. ‘नेत्रम’ द्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अतिक्रमण दूर करण्याची कार्यवाही करावी यासाठी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी निर्देश दिले.

ज्ञानोबा – तुकोबां’ना छळणाऱ्या, शिवराज्याभिषेक ’ नाकारणाऱ्या प्रवृत्ती, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा डोके वर काढत आहेत..!

शिव छत्रपतींचे कर्तृत्व डागाळण्याचा निंदनीय प्रकार..!
महायुतीतील घटकपक्षांकडून ही सत्तेच्या हव्यासा पोटी महाराष्ट्राच्या अस्मिताांचा अपमान सहन केला जात आहे..!

काँग्रेस ची प्रखर टिका


पुणे दि – २६
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने नागपूर येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांचे बाबतीत कल्पोकल्पित विधान करून, शिव छत्रपतींचे कर्तृत्व डागाळण्याचा निंदनीय प्रकार, भाजप नेतृत्वाच्या उपस्थितीत करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा निंदनीय प्रयत्न केला असल्याची प्रखर टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, उद्योग व रोजगार समस्या, वाढती महागाई व राज्यावरील वाढते कर्ज, गॅस टंचाई या प्रश्नांवर सरकार पुर्णपणे अपयशी ठरत असून.. ‘लोकश्रध्देला तडे जाणारे वाद जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा’ कुटील प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेत होत आहेत ही बाब घृणास्पद आहे.

देशास दिशा देणाऱ्या, समाज क्रांतिकारकांच्या, राष्ट्र पुरुषांच्या व संतांच्या महाराष्ट्रात ज्या प्रवृत्तींनी,
संत निवृत्तीनाथ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई या भावंडांचा तसेच जगास परमार्थाचा कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या जगदगुरु तुकाराम महाराजांना आतोनात त्रास दिला, त्या ‘ज्ञानोबा – तुकोबां’ना छळणाऱ्या, शिवराज्य भिषेक’ नाकारणाऱ्या प्रवृत्ती, पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा डोके वर काढत आहेत व या प्रवृत्तींना भाजप राजाश्रय’ देत असल्याने, ‘महाराष्ट्र द्रोही भाजप’ हा काँग्रेस चा आरोप सिद्ध होत असून ‘शिव छत्रपतींच्या शौर्याच्या इतीहासास’ जाणीव पुर्वक काळवंडण्याचे दूष्ट प्रयत्न होत आहेत..
महायुतीतील घटकपक्षांकडून, सत्तेलाठी महाराष्ट्राच्या अस्मितेवर जाणीवपूर्वक हल्ले होत असतांना महायुती सत्तेतील सहभागी घटक पक्ष देखील सत्तेच्या लाचारी पोटी महाराष्ट्राच्या दैवताचा अवमान सहन करत मुग गिळून गप्प बसला आहे.. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे..!

विद्यार्थ्यांचे शुल्क 6 टक्के व्याजासह परत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश

पुणे आय.एल.एस. विधी महाविद्यालय, शुल्क वसुली प्रकरणी सखोल चौकशी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि. २७ :- विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुलीप्रकरणी राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मा. मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अनुषंगाने शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांची बाजू न्याय्य ठरवत संबंधित महाविद्यालयास विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क ६ टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुणे येथील अशासकीय अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून अपारदर्शक पद्धतीने व बेकायदेशीर शुल्क आकारणी करण्यात आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने, मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च शिक्षण विभागाने सह संचालक (उच्च शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना करून सखोल चौकशी केली. या चौकशीअंती सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, संबंधित महाविद्यालयाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 101 (7) च्या तरतुदींचे उल्लंघन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची पूर्वमान्यता न घेता शैक्षणिक वर्ष 2020-21, 2021-22 व 2024-25 दरम्यान विद्यार्थ्यांकडून अनधिकृत शुल्क वसूल केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.याचिकाकर्त्याकडून १७ विविध शीर्षकांखाली एकूण १,०४,८६३/- रुपये इतकी रक्कम बेकायदेशीररीत्या वसूल करण्यात आल्याचे आढळून आले आहे.
उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांच्या कार्यालयाद्वारे संबंधित महाविद्यालयास सदर रक्कम फी भरल्याच्या दिनांकापासून ६ टक्के व्याजदराने संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

राज्यातील इतर महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्यास त्याची शहानिशा करून अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण आणि महाविद्यालयांमधील शुल्क निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
000