Home Blog Page 17

शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून तळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवा; संघटन अधिक बळकट करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिला नगरसेविका व पदाधिकारी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न; जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी कार्यक्रमाच्या मालिकेचे डॅा.नीलम गोऱ्हे तर्फे नियोजन

मुंबई, दि. २७ : शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महिला आघाडीच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ आणि ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती तळागाळातील गरजू महिलांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनांमुळे अनेक गरजू नागरिकांना थेट मदत मिळू शकते, त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रिय राहून या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच, कार्य करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यशाळेत ‘आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ अंतर्गत नागरिकांच्या तक्रारी व अर्जांचे निवारण करण्याची पद्धत सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आली. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’अंतर्गत वैद्यकीय मदतीसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, महिला संघटन अधिक बळकट करून विभागातील सामाजिक कार्यांना गती देण्यासाठी आवश्यक दिशा देण्यात आली.

कार्यशाळेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाबत श्री. रामहरी राऊत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मोफत आरोग्य सेवा, कॅशलेस योजना तसेच महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या उपचार सुविधांबाबतही त्यांनी माहिती दिली. यासोबतच, या योजनांमध्ये कुठलीही अडचण आल्यास ओम पालकर (८६५७०६१५१५), रवी ननावरे (८९०७७७६५५०) आणि रामहरी राऊत (८९०७७७६००४) या क्रमांकांवर संपर्क साधून शिवसेनेतर्फे मदत व माहिती मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील विविध हॉस्पिटलमध्ये वेळ न मिळाल्यास रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी विशेष समन्वय व्यवस्था उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

यानंतर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष आणि एस.आय.आर. (Special Intensive Revision) प्रक्रियेबाबत श्री. शेखर परदेशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एस.आय.आर. म्हणजे मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन असून, BLO मार्फत केलेल्या पडताळणीद्वारे मतदार यादी अचूक व त्रुटीमुक्त ठेवण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ECI NET ॲपविषयीही माहिती दिली.

या कार्यशाळेला शिवसेना उपनेत्या कला शिंदे, सुशीबेन शहा, कांदिवलीच्या नगरसेविका दीक्षा कारकर, ॲडव्होकेट संगीता चव्हाण (महिला संपर्कप्रमुख, बीड-धाराशिव), बोरिवलीच्या नगरसेविका संध्या दोषी, चाकणच्या नगराध्यक्ष please put names of Manchar Chakan put Mumbai together अंधेरी पश्चिमच्या माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच मागाठाणे विभाग प्रमुख मीना पानमंद उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. याशिवाय बीड, सांगली जिल्ह्यांसह विविध ठिकाणांतील उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख तसेच मुंबईतील विधानसभा प्रमुख, विभाग प्रमुख आणि महिला संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनिता मोरे (संपर्कप्रमुख, सांगली) यांनी केले. ही कार्यशाळा महिला आघाडीच्या कार्याला नवी दिशा देणारी ठरली असून, जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केला.

पाणी मूलभूत हक्क आहे. कर भरूनही पाणी मिळत नसेल, तर हा अन्याय…: ॲड. तोसिफ शेख

टॅंकरवर जगायचं आणि करही भरायचा? — हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, अन्यथा कर न भरण्याचा इशारा

पुणे, दि. २७.०४.२०२६ — पुणे शहरातील उंद्री, पिसोळी, कोंढवा, मोहम्मदवाडी, सय्यद नगर तसेच इतर परिसरांमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाण्याच्या टँकरमुळे झालेल्या अपघातांत अनेक निष्पाप नागरिकांचे मृत्यू झाले असून, ही बाब प्रशासनाच्या व्यवस्थेतील गंभीर अपयश दर्शवते. या घटनांच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी कँडल लाईट मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला. मात्र, इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही संबंधित भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा अद्याप सुरू करण्यात आलेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

त्यामुळे, जोपर्यंत नागरिकांना हक्काचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत कोणताही कर भरला जाणार नाही, असा इशारा ॲड. तोसिफ शेख यांनी दिला. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम तसेच पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी मांडली.

नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या वर्षानुवर्षे निष्क्रिय अवस्थेत आहेत. एकीकडे पुणे महानगरपालिके कडून मालमत्ता कराच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केला जातो, तसेच राज्य शासनाकडून स्टॅम्प ड्युटीमधूनही कोट्यवधींचे उत्पन्न मिळते; तरीही नागरिकांना मूलभूत हक्काचे पाणी उपलब्ध होत नाही.

याशिवाय, नागरिकांना टँकरसाठी दरमहा मोठा खर्च करावा लागत असून, मेंटेनन्सच्या नावाखाली हजारो ते लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांवर दुहेरी आर्थिक ओझे पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने ॲड. तोसिफ शेख यांनी पुण्याच्या महापौर Manjusha Nagpure तसेच पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन संबंधित भागात तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा व निष्क्रिय असलेल्या पाण्याच्या टाक्या तसेच यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात याव्यात, अशी मागणी केली. तसेच, ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात नाही, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कर आकारणी तातडीने थांबवावी व आधी वसूल केलेले कर नागरिकांना परत करण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. याशिवाय, नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल.

“पाणी हा आमचा मूलभूत हक्क आहे. कर भरूनही पाणी मिळत नसेल, तर हा अन्याय सहन केला जाणार नाही,” असे नागरिकांनी सांगितले.

महापालिकेत करोडो कमावणाऱ्या सल्लागारांचा सुळसुळाट

पुणे- महापालिकेचे अधिकारी आणि प्रशासन सुस्त झालेले आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होईल अशा पद्धतीने महापालिकेत करोडो रुपये लुटणाऱ्या सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे . या पार्श्वभूमीवर महापालिकेतील तत्कालीन भाजपचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्तांना यावर विचार करा आणि आपापल्या अधिकाऱ्यांकडून कामे करवून घ्या असा मोलाचा सल्ला दिला आहे. महापालिकेत अनेक तज्ञ इंजिनियर , अधिकारी असताना आपण बाहेरून सल्लागार का नेमतो यामागील नेमके गूढ शोधून काढा असेही आवाहन केले आहे.
केसकर ,कुलकर्णी, आणि बधे यांनी म्हटले आहे कि,’महानगरपालिकेमध्ये सध्या सल्लागार यांचा सुळसुळाट झालेला आहे.प्रत्येक कामासाठी सल्लागार नियमावा लागतो ही शोकांतिका आहे.सल्लागार संस्थेकडे तज्ञ नसतात. ते त्यांचे फक्त प्रोफाईल दाखल करतात.त्यांच्या कडे पे रोल वरील व्यक्तींची मागणी करावी ही विनंती आहे
पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ञ इंजिनियर असताना आपण सल्लागार का म्हणतो हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी सक्षम असताना सल्लागार नेमून आपण जबाबदारी ढकलतो आहे.आमची विनंती आहे या पुढच्या काळामध्ये सल्लागारांचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करावे आणि त्यांच्यावर विश्वास टाकावा त्यामुळे खो-खोचा खेळ संपेल.

राजकारण कमी करा अन विकास कामांवर जास्त लक्ष द्या:मंत्री माधुरी मिसाळांनी महापलिकेच्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे दिले आदेश

0

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा सखोल आढावा बैठक संपन्न.

पुणे- महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. २७.०४.२०२६ रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विकास प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

सदर आढावा बैठकीमध्ये मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (RFD), अमृत योजना, समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा (DP), मलनिःसारण प्रकल्प, पाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना व श्रम साफल्य योजना, पाणीपुरवठा योजना, पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे व नाला सफाई, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आराखडा, घनकचरा व्यवस्थापन तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील नागरी सुविधा (रस्ते, पाणी, सांडपाणी) आणि शाळा व रुग्णालयांचे आधुनिकीकरण व दर्जा सुधारणा या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवणे, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी पूर्ण करणे यावर विशेष भर देण्यात आला. पुणेकरांना अधिक सक्षम पायाभूत सुविधा, सुयोग्य नियोजन, स्वच्छ व सुंदर शहर तसेच आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या आणि आगामी विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विकासकामांना अधिक वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता देण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीला महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांचे स्वागत केले. सदर बैठकीसाठी उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते निलेश निकम, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या पक्षनेत्या सौ. हिमाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षनेते सोपान चव्हाण, शिवसेना उ.बा.ठा.चे मा.पक्षनेते नितीन गावडे, महापालिका आयुक्त . नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, मा.उपायुक्त, खातेप्रमुख, तसेच संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मंत्री नीतेश राणेंना 1 महिना कारावासाची शिक्षा अन् 1 लाखाचा दंड

कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या आक्रमक आंदोलनाची शिक्षा

मुंबई-सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याच्या प्रकरणात भाजप नेते तथा पालकमंत्री नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका केली आहे. यामुळे राणे यांना मोठा दिलासा दिला आहे. पण याच प्रकरणाशी संबंधित एका खटल्यात कोर्टाने त्यांना 1 महिन्याचा कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे त्यांची अडचण झाली आहे.

नीतेश राणे यांनी काँग्रेसमध्ये असताना मुंबई – गोवा महामार्गावरील चिखल व खड्ड्यांविरोधात आंदोलन केले होते. तेव्हा त्यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. शेडेकर यांच्या फिर्यादीनुसार यासंबंधी नीतेश राणे यांच्यासह जवळपास 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी त्यांच्यासह कणकवलीचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर आदींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर नीतेश राणे यांच्यासह सर्वांची निर्दोष सुटका झाली.

प्रस्तुत प्रकरणात नीतेश राणे यांच्यावर भादंवि कलम 353, 332, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यातील कलम 353, 332 व 506 कलमांतर्गत नीतेश व त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका झाली, पण यातील 504 कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी नीतेश यांना 1 महिन्याचा कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी या शिक्षेला स्थगिती देण्याचा अर्ज दाखल केला आहे. याविषयी कोर्टात लवकरच रिव्हिजन दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना मुंबई – गोवा महामार्गावरील चिखळ व खड्ड्यांचा जाब विचारला होता. त्यावेळी त्यांनी गडनदी पुलावर शेडेकर यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. सर्वसामान्य जनता या मार्गावर दररोज चिखलाचा मारा सहन करते. आज तुम्ही तो अनुभवा, असे नीतेश राणे त्यावेळी म्हणाले होते.

दरम्यान, नीतेश राणे यांचे वडील तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केला होती. तसेच नीतेश यांचे कानही टोचले होते. मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांविषयी सर्वसामान्य नागरिकांत मोठा रोष आहे. या प्रकरणी संताप येऊन आंदोलन करणे योग्य आहे. ते आपण समजू शकतो, पण अशा पद्धतीची हिंसा अयोग्य आहे. त्याला मी अजिबात पाठिंबा देत नाही. मी नीतेश यांना त्यांच्या समर्थकांनी केलेल्या कृत्याविषयी माफी मागावी असे सांगणार नाही. कारण तो माझा मुलगा आहे. पण चूक नसताना मी माफी मागू शकतो, तर मग मुलालाही माफी मागावीच लागेल, असे नारायण राणे म्हणाले होते.

मंत्री प्रताप सरनाईक ठाम,म्हणाले, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवं

मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणालेत. सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांच्या संघटनांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर सकारात्मक उहापोह करण्यात आला. या बैठकीनंतर बोलताना सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी युनियनच्या नेत्यांसोबत आज बैठक झाली. नेत्या नेत्यांना बैटकीचे आमंत्रण देतानाच राज्य सरकारच्या मराठी सक्ती करण्याच्या भूमिकेची माहिती दिली होती. आज त्यांना पुन्हा तुम्ही सरकारच्या भूमिकेशी सहमत आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सहमती दर्शवली.

पण त्यांच्या संघटनांच्या काही मागण्या होत्या. काही नेत्यांनी जुजबी मराठी म्हणजे काय? सरकारला कशा प्रकारची मराठी अपेक्षित आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर मी सांगितले की, रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. म्हणजे प्रवाशी मागे बसल्यानंतर त्याला कुठे जायचे आहे, त्याला काय सेवा हवी आहे, पैसे किती झाले या जुजबी गोष्टी त्यांना आल्या पाहिजेत. भविष्यात ओला, उबेर, रॅपिडो यांचाही यात समावेश केला जाईल.

प्रताप सरनाईक म्हणाले, या प्रकरणी काहींनी 3 महिने, 6 महिने व एका वर्षाची मुदत मागितली. महाराष्ट्रात तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, रिक्षा-टॅक्सी चालवायची असेल, तर तुम्हाला मराठी येणे अनिवार्य आहे. बंधनकारक आहे. रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. सरकारच्या या भूमिकेशी सर्वांनी सहमती दर्शवली. त्यांनी या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आपल्या संघटनांच्या कार्यालयात मराठीची शिकवणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. पण सोबतच त्यांचे म्हणणे असे होते की, आपल्या रोजीरोटीवर कुठेही गदा येता कामा नये. सरकारची त्या पद्धतीची भूमिका असेल तर आम्हाला मान्य आहे.

त्यावर मी म्हणालो, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे. रोजगार निर्मिती हे आमचे पहिले उद्दीष्ट आहे. यासंबंधी महाराष्ट्र देशातील पहिले राज्य व्हावे असा आमचा मानस आहे. त्यामुळे या कारणांमुळे कुणाचाही रोजगार बुडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. परंतु कुणी मराठी ऐवजी हिंदीचा आग्रह धरला तर ते चालणार नाही.

सरनाईक म्हणाले, सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. संघटनांनी यासंबंधी काही मुदत मागितली आहे. त्यांनी मराठी शिकण्याची जबाबदारीही घेतली आहे. सर्वांनीच सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानुसार, उद्या आरटीओंच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत यासंबंधी योग्य तो निर्णय घेतला जाईल. या प्रकरणी रिक्षा, टॅक्सी चालकांच्या समाधान करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. मी त्यांना यासंबंधी कोणताही शब्द दिला नाही. मी उद्या राज्यातील आरटीओंची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत याबाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सरनाईक म्हणाले.

भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना मुख्यमंत्री, गडकरी व मोहन भागवत गप्प का ?- अरविंद शिंदेंचा सवाल

पुणे-

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक कारवाईच्या मागणीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत त्यांच्याबद्दल भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री अपमानकारक बोलत असताना फडणवीस, गडकरी व मोहन भागवत यांना लाज वाटायला हवी होती, त्यांनी त्याला थांबवले पाहिजे होते. भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा अशास्त्री बरळला तरीही त्यावर या तिघा नेत्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण असून महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण, महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत,  त्यांच्या विचारांनी देशाला व महाराष्ट्राला दिशा दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे विचारच संविधानातही आहेत. हाच विचार व छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व भाजपा व रा. स्व. संघाला मान्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्याने बदनामी करणे, त्यांचा अपमान करणे व महाराजांच्या इतिहासाची विकृत मांडणी करणे हे भाजपा व रा. स्व. संघाचे राष्ट्रीय धोरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या लोकांवर सरकारने त्वरीत कारवाई करावी.’’

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, अजित दरेकर, मेहबुब नदाफ, यशराज पारखी, नगरसेविका दिपाली डोख, अश्विनी लांडगे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, संगीता पवार, प्राची दुधाणे, सीमा सावंत, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, ऋग्वेदिता सपकाळ, मोहसीन शेख, ॲन्थोनी जेकब, मिलिंद पोकळे, रविंद्र माझिरे, संदिप मोकाटे, मारुती माने, रवि आरडे, चेतन आगरवाल, फिरोज शेख, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्‍हिड, संतोष सुपेकर, चेतन पडवळ, अनिल धिमधिमे, वैभव डांगमाळी, ऋषीकेश बालगुडे, वीरेंद्र मोहिते आदी उपस्थित होते. 

पुणे बाल पुस्तक जत्रा ठरणार ज्ञान, मनोरंजन आणि सर्जनशीलतेचा उत्सव; पालक-शिक्षकांसाठीही खास पर्वणी

३० ते ४ मे दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य आयोजन

पुणे : लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारी, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लावणारी, कला संस्कृतीची माहिती करून देतानाच ज्ञानासोबतच मनोरंजनाची मेजवानी देणारी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६’ येत्या ३० एप्रिलपासून सुरू होत आहे. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे ४ मेपर्यंत भरणाऱ्या जत्रेत मुलांसाठी विविध रंगतदार कार्यक्रम, कथा-कवितांचे सत्र, विज्ञान गप्पा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयक मार्गदर्शन आणि खेळकर उपक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे ही जत्रा लहान मुले, पालक आणि शिक्षकांसाठी एकाच वेळी ज्ञान, मनोरंजन आणि प्रेरणेचे केंद्र ठरणार आहे.

पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने पुणे बाल पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ३० एप्रिल रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन उपस्थित होते.

जत्रेचे उद्घाटन झाल्यानंतर १ मेपासून मुलांसाठी खास हास्य-मनोरंजन आणि संवादात्मक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. सकाळी ‘हसण्याची बायारकी’ या कार्यक्रमातून मुलांना खळखळून हसवणारा अनुभव मिळणार आहे, तर दुपारी ‘हा खेळ बाहुल्यांचा’ या उपक्रमातून कथानक आणि अभिनयाचा सुंदर संगम पाहायला मिळेल. सायंकाळी ‘चिंटू तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमातून मुलांचा लाडका पात्र प्रत्यक्ष भेटणार असल्याने बालप्रेक्षकांसाठी हा दिवस विशेष आकर्षण ठरणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे मुलांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे.

त्यानंतर २ मे रोजी जत्रेत शिक्षण आणि विज्ञानाचा संगम अनुभवायला मिळणार आहे. सकाळी ‘स-संविधानाचा!’ या बालनाट्यातून मुलांना संविधानाची ओळख मनोरंजक पद्धतीने करून दिली जाणार आहे. दुपारी ‘विज्ञान गप्पागप्पी’ या सत्रात प्रयोग, प्रश्नोत्तरे आणि संवादातून विज्ञानाची गोडी वाढवली जाईल. तर सायंकाळी ‘एआय तुमचा नवा स्टडी बडी’ या सत्रातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासात कसा उपयोग करायचा, याचे मार्गदर्शन मिळणार आहे.

त्याचप्रमाणे ३ मे रोजी कथा आणि देशभक्तीचा संगम पाहायला मिळणार आहे. सकाळी ‘कथा कवितांच्या राज्यात’ या सत्रातून मुलांना साहित्यविश्वाची रंगतदार सफर घडवली जाईल. दुपारी ‘सलाम भारतीय वायुसेनेला!’ या कार्यक्रमातून विमानांचे प्रात्यक्षिक, एरो मॉडेलिंग आणि देशसेवेची प्रेरणा देणारे सादरीकरण होणार असून, मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली जाणार आहे.शेवटच्या दिवशी ४ मे रोजी जत्रेचा समारोपही तितकाच आकर्षक ठरणार आहे. सकाळी ‘मुलांचा स्क्रीन टाइम कमी कसा कराल?’ या चर्चासत्रातून पालकांना उपयुक्त मार्गदर्शन मिळणार आहे. तर दुपारी समारोपाच्या कार्यक्रमात संबळ वादन, गोंधळ गाणे आणि इतर सांस्कृतिक सादरीकरणांमुळे वातावरण रंगणार आहे. पुस्तकांच्या विश्वात रमवणारी, नवीन गोष्टी शिकवणारी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ही जत्रा पुणेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे, असे नागपुरे आणि पांडे यांनी सांगितले.
…..
पुणे बाल पुस्तक जत्रा ही केवळ पुस्तकांचे प्रदर्शन नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा उत्सव आहे. वाचनाची आवड, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. या जत्रेत कथा, विज्ञान, नाट्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम घडत असून, मुलांना आनंदातून शिकण्याची संधी मिळणार आहे. पालक आणि शिक्षकांसाठीही मार्गदर्शक सत्रे उपयुक्त ठरणार आहेत. डिजिटल युगात मुलांना योग्य दिशा देण्याचे काम ही जत्रा करेल. पुणेकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

  • मंजुषा नागपुरे, महापौर
    …….
    यंदाच्या जत्रेत पुस्तकांच्या दालनांची संख्या साधारण १०० राहणार असून, त्यामध्ये बालसाहित्यावर भर देण्यात आला आहे. साहित्य आणि कलासंस्कृतीच्या विविध कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल असणार आहे. जत्रेत सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत ग्रामीण व साहसी खेळ रंगणार आहेत. खाद्यजत्रेतून खाद्यसंस्कृतीचाही आस्वाद घेता येणार आहे. मुलांचे गीतरामायण, किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बाल साहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ असे भरगच्च उपक्रम अनुभवता येईल. त्याचप्रमाणे मुलांना कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, लेखक यांना भेटता येईल. त्यामुळे सहकुटुंब पुणे बाल पुस्तक जत्रेचा आनंद घ्यावा.
  • राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

📦 कार्यक्रमांचे वेळापत्रक (१ ते ४ मे)

शुक्रवार, १ मे

🕚 सकाळी ११.३० वा. – हसण्याची बायारकी
सादरकर्ते : मकरंद टिल्लू
🕓 दुपारी ४.०० वा. – हा खेळ बाहुल्यांचा
सादरकर्ते : चैताली माजगावकर-भंडारी
🕔 सायं. ५.०० वा. – चिंटू तुमच्या भेटीला
सादरकर्ते : चारुहास पंडित


शनिवार, २ मे

🕚 सकाळी ११.३० वा. – शिक्षण विवेक निर्मित बालनाट्य – स-संविधानाचा!
सूत्रधार : डॉ. अर्चना कुंटेकर
🕓 दुपारी ४.०० वा. – विज्ञान गप्पागप्पी
सादरकर्ते : राजीव तांबे
🕔 सायं. ५.०० वा. – एआय तुमचा नवा स्टडी बडी
सादरकर्ते : डॉ. अमेय पांगारकर


रविवार, ३ मे

🕚 सकाळी ११.३० वा. – कथा कवितांच्या राज्यात
बालसाहित्यिक : एकनाथ आव्हाड
🕓 दुपारी ४ ते सायं. ६ – सलाम भारतीय वायुसेनेला!
सादरकर्ते : सदानंद काले


सोमवार, ४ मे

🕚 सकाळी ११.३० वा. – मुलांचा स्क्रीन टाइम कमी कसा कराल?
सादरकर्ते : श्रुती पानसे, स्मिता वळसंगकर
🕓 दुपारी ४.०० वा. – समारोप – संबळ वादन, गोंधळ गाणे आणि अन्य कार्यक्रम*
सादरकर्ते : मोहिनी भुसे व एसएसडीटी संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी

“मोफत पाणी” टँकर चा महाघोटाळा… खर्डेकर यांचे आयुक्तांना साकडे

पुणे:पटवर्धन बागेतील टँकर पॉईंट येथील बंद मीटर चा घोळ आणि मोफत टँकर चा झोल क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी चव्हाट्यावर मांडत महापालिका आयुक्तांना या घोटाळ्याचा छडा लावून त्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, आज एरंडवण्यातील पटवर्धन बागेतील टँकर पॉईंट येथे पाहणी केली असता तेथील मीटर 16 डिसेंबर 2025 पासून बंद असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणाहून पुणे मनपा नागरिकांना “मोफत पाणी” टँकर च्या माध्यमातून पुरविते व यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे ( ज्या सोसायटीत किंवा वस्तीत पाणी पुरवठा कमी झाला असेल तेथे मागणीनुसार टँकर ने पाणी पुरवठा केला जातो ) अशी माहिती संदीप खर्डेकर यांनी दिली.पटवर्धन बागेतील टँकर पॉईंट वरून प्रभाग क्रं. 10,11,29,30,31,32,33 एवढ्या मोठ्या परिसरात पाणी पुरवठा केला जातो,मात्र येथील मीटर बंद असल्यामुळे नेमके किती टँकर भरले गेले किंवा किती पाणी वितरित केले गेले याचा नेमका हिशोब कसा लागणार असा प्रश्न क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी उपस्थित केला आहे.
अश्या मोफत टँकर चा मोठा झोल असल्याचे काही वर्षांपूर्वी सजग नागरिकांनी लक्षात आणून दिले, कारण एक दिवस याठिकाणी गुप्तपणे रेकॉर्डिंग केली असता रजिस्टर मध्ये 18 टँकर ची नोंद आणि प्रत्यक्षात 50 टँकर भरले गेल्याचे निदर्शनास आले होते.तेव्हा सर्व टँकर पॉईंट वर मीटर बसविण्यात आले.
मात्र आता जर मीटर बंद असेल तर मनपा पाण्याचा हिशोब कसा ठेवते याचा खुलासा करावा अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.
तसेच आणखी एक त्रुटी लक्षात आली ती म्हणजे रजिस्टर वर अथवा चलनावर कोठेही संबंधित सोसायटी अथवा वस्तीतील पदाधिकारी किंवा नागरिकांची पोच पावती वर सही नाही, यामुळे देखील ह्या मोफत यंत्रणे बद्दल शंका उपस्थित होतात.
तरी शहरातील सर्व टँकर पॉईंट ची त्वरित पाहणी करून मीटर सुरू असल्याची खात्री करावी आणि डिलिव्हरी नंतर मोफत पाणी मिळाल्याच्या चलनावर संबंधितांची सही घ्यावी अशी मागणी देखील संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
याच बरोबर गैरप्रकार टाळण्यासाठी कोणत्या कारणाने व कोणा माननीयांच्या निर्देशावरून अथवा थेट नागरिकांच्या मागणीवरून मोफत टँकर पाठविण्यात आला याची नोंद असणे देखील गरजेचे वाटते.
तसेच जर मनपा स्वतःच्या टँकर पॉईंट वरील मीटर महिनोंमहिने नादुरुस्त अवस्थेत ठेवत असेल तर भावी काळात पुण्यनगरीला 24×7 पाणीपुरवठा सुरू झाल्यावर लक्षावधी पाणी मीटर ची निगा कशी राखली जाणार व त्यायोगे अचूक किती पाणी वापर झालाय हे कसं कळणार अशीही शंका संदीप खर्डेकर यांनी उपस्थित केली आहे.त्यामुळे आत्तापासूनच 24×7 पाणीपुरवठा चे मीटर तपासणी व दुरुस्ती बाबत ची यंत्रणा कार्यान्वित करावी अशी ही मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता बागेश्वरबाबा धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांचा माफीनामा समोर आला आहे.चक्क घुमजाव करत या बाबाने म्हटले आहे,’ आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, ज्यांच्यापासून हिंदू राष्ट्राची प्रेरणा घेतली त्यांचा अवमान करण्याचा विचार मनामध्येही येणार नाही आपल्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मनापासून माफी मागतो असंही ते म्हणाले.

नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांसंबंधी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उडाल्याचं दिसलं. त्यांनी आता त्यांच्या वक्तव्यावरुन घुमजाव स्पष्टीकरण देत माफीनामा सादर केला.
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा म्हणाले की, काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. ज्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कुणी निंदा केली तर ती सहन करणार नाही. या देशातील प्रत्येक सनातनी आज जिवंत आहे, हिंदुत्वासाठी सजग आहे, तर त्याचं सर्वात मोठं श्रेय हे शिवाजी महाराजांना जातं. जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आपलेच लोक आहेत. त्यामुळे आपापल्यात वाद घातला तर त्याचा फायदा दुसऱ्यांना होईल.ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना मनात दुसरा काहीही विचार नव्हता. गुरुंप्रती शिवाजी महाराजांचा भाव काय होता, संतांच्या प्रती त्यांचा भाव काय होता ते मी माझ्या भाषेत सांगितलं. पण काही लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी जगतो. आम्ही हिंदुत्वाची जी विचारधारा स्वीकारली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच. त्यामुळे त्यांचा अवमान होईल असं काही वक्तव्य करणे याचा स्वप्नातही विचार करू शकणार नाही, असं ही म्हणाले.

चार मुलांच्या वक्तव्यावरुनही घुमजाव स्पष्टीकरण
प्रत्येकाना चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाल्यानतंर धीरेंद्र शास्त्री यांनी आता त्यात सारवासारव केली आहे . ते म्हणाले की, “मी एका मुलाला संघाला द्या असं म्हटलं होतं. त्याचा अर्थ एक मुलगा हा कट्टर राष्ट्रवादी बनवा. त्याला कलेक्टर बनवा किंवा आणखी काय बनवा. परंतु त्याला कट्टर सनातनी विचारांचा बनवा. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका.”

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी

घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक; वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

नवीन टोलवाढ नाही, चारचाकी आणि बसेस मधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला परवानगी

मुंबई/पुणे दि. 26 :
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. “मी स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून काम समाधानकारक झाले आहे. उर्वरित किरकोळ कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत,” असे त्यांनी सांगितले.

सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. “या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील,” असा ठाम दावा शिंदे यांनी केला. यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

टोलवाढीबाबत स्पष्ट करताना शिंदे म्हणाले की, “मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही.”

सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला २०१९ साली मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याने हा एक विशेष योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला ऍक्सेस कंट्रोल मार्ग ठरला होता. या मार्गामुळे आयटी, सेवा क्षेत्र, उद्योग आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली. आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या मार्गाची कार्यक्षमता आणखी वाढणार आहे.

तसेच या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल. यासाठीच या प्रकल्पातील बोगद्यांना देखील गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतीकृतीप्रमाणे सजवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. कामाचा दर्जा उत्तम ठेवून ही शिल्प खराब होऊ नयेत याची पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.

“अशा प्रकारचे प्रकल्प हे केवळ रस्ते नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे असतात. कनेक्टिव्हिटी मजबूत असेल तर उद्योग, आयटी, सेवा क्षेत्र आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतात,” असे शिंदे यांनी सांगितले.

पुढील काळात समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड, वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना जोडून राज्यात ऍक्सेस कंट्रोल रस्त्यांचे जाळे उभारण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ७ ते ८ तासांत पोहोचता येईल, अशी सक्षम दळणवळण व्यवस्था उभारत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून हा प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणारा ठरणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी उपमहापौर नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्याच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ढोंगी बागेश्वर बाबाला महाराष्ट्राच्या संत परंपरेशी जोडताना देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नागपुरात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधानाप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भर पडली आहे. सपकाळ यांनी भोंदू बागेश्वरचा उल्लेख साधू संत असा केल्याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले आहे.

हर्षवर्धन सपकाळ रविवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, विकृत धीरेंद्र शास्त्रीने (बागेश्वर बाबा) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच विकृताचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केला. हा महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा अपमानच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांपासून ते आधुनिक काळातील गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या वाणी आणि लेखणीने समृद्ध केलेल्या संत परंपरेशी या ढोंगी बागेश्वर बाबाला जोडताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे.

भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना मुख्यमंत्री, गडकरी व मोहन भागवत गप्प का? असा सवाल उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपतींबद्दल गरळ ओकायला सांगणारा मालक एकच, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या प्रकरणी त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात धीरेंद्र शास्त्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा RSS चे राष्ट्रीय धोरण आहे. महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. त्यामुळे शिवरायांच्या अवमानाबद्दल धीरेंद्र शास्त्रींसह मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी व सरसंघचालकांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही सपकाळ यांनी या प्रकरणी केली आहे.

काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री?

धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवरही वादग्रस्त विधान केले. ते शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या कथित भेटीवर भाष्य करताना म्हणाले होते, सततच्या युद्धामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा खूप थकले, तेव्हा ते एकेदिवशी रामदास स्वामी यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी आपला मुकूट काढला आणि म्हणाले, आम्ही खूप युद्ध लढले. आता आम्हाला आणखी लढायचे नाही. आता आमच्यावर एक मोठी दया करा, हा माझा मुकूट तुम्ही सांभाळा. हा राजपाठही तुम्हीच सांभाळा. तुमच्या आज्ञेनेच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली. आता आम्हाला चालणे अवघड झाले आहे.

आता आम्हाला युद्ध लढणेही होत नाही. आता आम्ही खूप थकलो. आता आम्हाला विश्रांतही हवी आहे. आता आम्हाला आराम करायचा आहे. आता आम्हाला काही दिवस काहीच करायचे नाही, असे शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. त्यावर रामदास स्वामींनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना उपदेश केला, असे बागेश्वर बाबा म्हणाले. त्यांच्या या विधानावर आता प्रचंड राजकीय वाद होत आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार,अस्थिरोग आणि कर्करोगसारख्या गंभीर आजारांवर जनसामान्यांसाठी उपचार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज केली.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ३१ व्या स्थापना दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राज्याचे अपारंपरिक ऊर्जा व दुग्धविकास, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, यावेळी उपस्थित होते.

भारती हॉस्पिटल येथील नूतनीकरण केलेल्या एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्यालय, अत्याधुनिक नेत्ररोग विभाग व नेत्रपेढी तसेच आय. व्ही. एफ. केंद्राचे उद्घाटन आणि विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री.आबिटकर म्हणाले, दर्जेदार शिक्षणातून गुणवत्ता जपत समाज घडविण्याचे कार्य भारती विद्यापीठामार्फत घडत आहे.

श्री.सावे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरचा विकास झपाट्याने होत असून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग व्यवसायात होणार आहे. अशा वेळी कुशल, अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असणार आहे. तसेच आरोग्य व्यवस्थेचीही मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. भारती विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगरमध्ये शैक्षणिक तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही श्री. सावे म्हणाले.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, भारती विद्यापीठाचे लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे भव्य शैक्षणिक संकुल उभे राहणार असून पुण्यात भव्य क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे, असेही श्री. कदम म्हणाले.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, शिक्षणात तंत्रज्ञान हे सहाय्यक साधन आहे, पर्याय नाही. शिक्षणामध्ये मानवीमूल्य, नैतिकता आणि संवेदनशीलता टिकवून ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

कुलगुरू डॉ. विवेक सावजी म्हणाले, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने २०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या संस्थांशी आणि विद्यापीठांशी शैक्षणिक सहयोग करार केले आहेत. यावर्षी विश्वविद्यालयाला महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांसाठी २८ कोटी हून अधिक अनुदान नामवंत संस्थांकडून मिळाले आहे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र उत्तुरकर, प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.

आ.संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची प्रकाशक संघाची मागणी

पुणे – ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीचा तीव्र शब्दात निषेध करून, त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठी प्रकाशक संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी पाठविलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, आमदार संजय गायकवाड यांच्याकडून नुकतेच दूरध्वनीवर प्रकाशक प्रशांत आंबी यांनाअतिशय गैर शब्दामध्ये धमकावले गेले आहे. या संवादामध्ये गायकवाड यांनी केलेली शिवीगाळ, त्यांच्याकडून दिल्या गेलेल्या धमक्या या अतिशय निंदनीय आणि आक्षेपार्ह आहेत. दिवंगत ज्येष्ठ लेखक श्री. गोविंद पानसरे आणि प्रकाशक यांना या सर्व दूरध्वनीवरील संभाषणामध्ये अतिशय अर्वाच्य भाषेत जी शिवीगाळ केली आहे ती कुणीही कुणास करू नये अशीच असताना आमदार पदावरील व्यक्तीने करणे हे अतिशय वेदनादायी व चीड आणणारे आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जीवाला अपाय करण्याची धमकीही यामध्ये दिली गेल्याचे ऐकिवात आहे.कोणत्याही कारणासाठी निषेध नोंदवण्यासाठी अनेक योग्य मार्ग असतात.पण ते न वापरता अशा प्रकारे भाषा करणे, धमकावणे आणि शिवीगाळ करणे अजिबात योग्य नाही. त्यामुळे या प्रकाराचा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकाशक व लेखकांच्यातर्फे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ जोरदार निषेध नोंदवत आहे.याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण जास्तीत जास्त कठोर व योग्य ती पावले उचलाल अशी आम्ही अपेक्षा करतो. अशी कारवाई झाली तरच अशा प्रकारांना भविष्यात आळा बसेल असे नमूद करून प्रकाशक संघ अपेक्षित कठोर कृतीच्या प्रतिक्षेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दिल्ली-टेकऑफ दरम्यान स्विस विमानाला आग :6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 प्रवासी होते

नवी दिल्ली-दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी झाले. स्विस एअरलाइन्सचे LX147 विमान शनिवारी रात्री 1:08 वाजता टेकऑफ करणार होते. तेव्हा त्याचे एक इंजिन निकामी झाले आणि त्याला आग लागली. त्यानंतर वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले.अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व प्रवाशांना रनवेवर आपत्कालीन स्लाइडचा वापर करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. 6 प्रवासी जखमी झाले आहेत. हे विमान स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाणार होते.