आसामच्या जोरहाट येथील रौरिया एअरबेसवर शनिवारी सकाळी हवाई दलाचे एक विमान कोसळले. या अपघातात वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांचा समावेश आहे. एक सह-वैमानिक जखमी झाला आहे.
विमान एअरबेसवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि त्याचे दोन तुकडे झाले. अपघातग्रस्त ‘एएन-३२’ (AN-32) हे एक मालवाहू विमान होते. त्याचा वापर सैन्य आणि मालसामान वाहून नेण्यासाठी केला जात होता. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही; हवाई दलाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
भारतीय हवाई दलाने सांगितले की, हे विमान नियमित उड्डाणावर होते आणि प्राथमिक निष्कर्ष समोर येईपर्यंत लोकांनी कोणताही तर्क-वितर्क करू नये. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे (चौकशी समितीचे) आदेश देण्यात आलेत.
भारतीय वायुसेनेकडे अंदाजे 100 अँटोनोव्ह AN-32 टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट विमानांचा ताफा आहे. IAF ने सुरुवातीला सोव्हिएत-निर्मित अशी 125 विमाने खरेदी केली होती. सध्या सेवेत सक्रिय असणाऱ्या या विमानांचा आकडा 100 च्या आसपास आहे.

AN-32 ने 1980 पासून IAF च्या मीडियम-लिफ्ट वाहतूक क्षमतेचा कणा म्हणून काम केले आहे. उष्ण हवामान आणि हिमालयासारख्या उंच प्रदेशात ऑपरेशन दरम्यान त्याच्या मजबूतपणामुळे ते खूप महत्त्वाचे मानले जाते.
जानेवारी ते जून या कालावधीतील हवाई दलाचे विमान अपघात
21 जानेवारी 2026- उत्तर प्रदेशात भारतीय हवाईदलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान नियमित उड्डाणावेळी कोसळले. दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर पडले. कोणतीही प्राण हानी झाली नाही. तथापि, चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी नेमण्यात आली.
7 फेब्रुवारी 2026- एक HAL तेजस लढाऊ विमान टेक-ऑफ करताना धावपट्टीवरून घसरले. नंतरच्या अहवालांमध्ये सॉफ्टवेअरमधील बिघाड हे या अपघातामागील खरे कारण असल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेत पायलट बचावला, मात्र त्याला गंभीर दुखापती झाल्या.
5 मार्च 2026- आसाममधील कार्बी आंगलोंग प्रदेशात प्रशिक्षणावेळी Su-30MKI क्रॅश झाले. दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला. यापैकी एक पायलट ऑपरेशन सिंदूरशी संबंधित होता.
17 एप्रिल 2026- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे हार्ड लँडिंग झाले. विमानाचा ‘अंडरकॅरेज’ म्हणजे विमानाचा खालचा भाग खराब झाला होता. यामुळे ते धावपट्टीवर आदळले. परिणामी धावपट्टी 11 तास बंद ठेवावी लागली.

