सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराज: द्रष्टे व्यवस्थापक’ या कार्यशाळेचे उद्घाटन
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश माझ्याप्रमाणेच आपल्या सर्वांमध्ये आहे. महाराष्ट्रातील आपण सर्वच छत्रपतींचे वंशज आहोत. ही संपूर्ण आपल्या महाराष्ट्र आणि देशाची लिगसी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती असलेला इतिहास आपल्यासमोर सातत्याने येतो. शिवाजी महाराजांच्या काळातील ठराविक घटनाची माहिती आपल्याला सांगितली जाते. या पलीकडे असणारा इतिहास हा फार मोठा आणि प्रेरणादायक असून, तो आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याचे थोर कार्य जाणून घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शुक्रवारी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘छ्त्रपती शिवाजी महाराज: द्रष्टे व्यवस्थापक’ या कार्यशाळेत शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, विश्वस्त राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गणेश भामे , विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक डॉ. सविता कुलकर्णी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. संगीता जगताप, सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, इराण आणि अमेरिका या दोन राष्ट्रांच्या युद्धात इराणने महासत्ता असलेल्या अमेरिकेला चांगली टक्कर दिली आहे. त्यामुळे अमेरिकेला युद्ध जिंकता आलेले नाही. रशियालाही एकतर्फी युद्ध जिंकता आलेले नसून, मोठे नुकसान सोसावे लागत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, छत्रपतींनी एकाचवेळी तीन लढाया लढणे ही अत्यंत जोखमीची कामगिरी उत्तम पद्धतीने केली. या लढाईसाठी लागणाऱ्या सर्व बाबींचे नियोजन उत्तम पद्धतीने करण्यात आले. या लढाया लढण्यासाठी छत्रपतींनी जनतेवर अधिकचा कर किंवा कोणतीही अतिरिक्त वसुली केली नाही. हे आजच्या काळात शिकण्यासारखे आहे. आपण याचा विचार करायला हवा. या घटनांचा आपण सर्वांनी कार्यशाळेच्या निमित्ताने अभ्यास करायला हवा. महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करून, त्यामध्ये कर्तुत्वावर जबाबदाऱ्या दिल्या. गडावरील बाजारपेठेची निर्मिती, पाण्याचे तळे उभारणे ही कौशल्ये अभ्यासण्यासारखी आहेत. महाराजांच्या गडकिल्ल्यांची दाखल युनेस्कोने घेतली असून, त्याद्वारे महाराजांचा इतिहास सातासमुद्रापार पोहोचण्यासाठी मदत झाली आहे. महाराजांचे आरमार आणि त्याचे व्यवस्थापन कौशल्य हे कमालीचे होते. त्याचाही सखोल अभ्यास व्हायला हवा. महाराजांचे गुण आपण रोजच्या जीवनात आणून, वैभवशाली इतिहास जगायला हवा, असेही भोसले यांनी सांगितले.
डॉ. गोसावी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन कौशल्य आताच्या लोकांपर्यत पोहोचविणे फार महत्त्वाचे आहे. महाराजांनी गड किल्ले बांधताना भरपूर अभ्यास केला. त्यामुळे हे वैभव आजही टिकून आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला महाराजांचा खरा इतिहास पोहोचवायचा आहे. या विषयावर दोन क्रेडीटचा अभ्यासक्रम सुरू करता येईल, याची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ. गोसावी यांनी सांगितले.
पांडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लेखन विपुल आहे. पण, त्यांची विविध कौशल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी तरुणांनीच महाराजांच्या कौशल्यांवर आधारित, विविध प्रसंगांवर आधारित छोट्या पुस्तिका तयार करून विविध भाषांत देशभरात एनबीटीमार्फत पोहोचवल्या जाणार आहेत, असे पांडे यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि सदस्य सुनील महाजन यांचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविक केले. मंठाळकर यांनी आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर आयोजित कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना लेखक होता येईल. त्यांनी लिहिलेल्या लेखांचे पुस्तक करता येईल.विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला विकसित वाचक तयार करावे लागतील. वाचन संस्कृतीचा सक्षम करणारे विविध उपक्रम आणि कार्यशाळा एनबीटीच्या माध्यमातून देशभरात करण्यात येतात. या कार्यशाळेतून महाराजांचे लष्करी नेतृत्व, पर्यावरण, व्यवस्थापन कौशल्य, मानसिकदृष्ट्या सक्षम होणे अशा अनेक पैलूंचा अभ्यास करता येणार आहे. शिवरायांचे प्रत्येक पाऊल सार्वभौमत्वाकडे नेणारे होते. शिवरायांचे अधिष्ठान, भाषाशुद्धी, अष्टप्रधान मंडळ, मंदिर पुनर्निर्माण, नाणी, कालगणनेसाठी शिव शक अशा प्रत्येक बाबीचा अभ्यास करणे शक्य आहे. महाराजांनी स्वदेश, स्वराज्य, स्वधर्म ही त्रिसूत्रीवर आपल्यावर रुजवली असून, त्यावर अधिक काम करायला हवे, असे एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे यांनी सांगितले.

