पुणे: सध्या भारतीय नागरिकांमध्ये फास्टफूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर भारतीय स्त्री-पुरुषांमध्ये व्यायामाचा अभाव, कॅलरीसारख्या गोष्टींची माहिती नसणे आणि मांसाहाराचे मोठ्या प्रमाणात सेवन या कारणांमुळे भारतात हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, असे मत निसर्गोपचारतज्ज्ञ श्रीकांत मुंदडा यांनी व्यक्त केले.
दैनिक ‘प्रभात’च्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त महिला मंचाच्या सभासदांसाठी ‘मैत्री हृदयाशी’ या विषयावर निसर्गोपचारतज्ज्ञ श्रीकांत मुंदडा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
हृदयरोग होण्याची कारणे सांगताना मुंदडा म्हणाले की, आज भारतात 90% नागरिक व्यायाम करत नाहीत. सध्या नागरिक तेलकट पदार्थ रोजचा आहार समजून खात आहेत. तसेच रोजच्या आहारात मैद्याचे पदार्थ आणि मांसाहाराचे अतिरिक्त सेवन यामुळे अंगावरील चरबी वाढणे, पोटाचे विकार, मूळव्याध, किडनी स्टोन तसेच महिलांमध्ये थायरॉइडचे प्रमाण वाढणे असे विविध रोग जडू शकतात.
यावर उपाय म्हणून त्यांनी सांगितले:
- प्रत्येकाने दररोज कमीत कमी 30 ते 35 मिनिटे चालणे आवश्यक आहे
- दररोज दुधी भोपाळा रस पिणे, संतुलित आहार घेणे
- रात्रीचे जेवण लवकर घेणे, रात्रीच्या जेवण आणि झोप यामध्ये 3 तासांचे अंतर ठेवणे
- टीव्ही समोर बसून बघता बघता जेवणे
हि पथ्ये पाळल्यास हृदयरोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
यानंतर मानसिक ताणतणाव कमी करण्याचे उपाय सांगताना मुंदडा म्हणाले की, माणसाचा स्वभाव तापट असेल आणि त्याला मोठ्या प्रमाणात ताण असेल अशांना मधुमेह व बी.पी. लवकर होऊ शकतो. पैसा कमावताना शरीर गमावले नाही पाहिजे. गुटखा, तंबाखू,अति दारूचे सेवन आणि सिगारेटचे सेवन करणाऱ्यांना मधुमेह व हृदयरोग होण्याचा धोका आहे.
यावर नैसर्गिक उपाय म्हणून दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्रीकांत मुंदडा यांनी हृदयरोगावरील उपाय म्हणून उपस्थित महिलांना हाताच्या आणि पायाच्या तळव्यांच्या व्यायामाचे प्रकार दाखविले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी महिलांच्या आरोग्यासाठी दिवसभरातील स्वतःसाठी 40 मिनिटे देणे, दुधाचे अतिरिक्त सेवन टाळणे आणि स्वतःच्या शरीराचे नियोजन करणे या गोष्टी सांगितल्या.
यावेळी दैनिक ‘प्रभात’चे सर्वव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक सुहास यादव, कार्यक्रम व्यवस्थापिका अर्चना नवघरे आणि प्रशासकीय अधिकारी प्रमोद गुजर उपस्थित होते.

