‘आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल; हिंदूंना त्रास दिल्यास तांडव करू’ असा इशारा
नवी मुंबई : “समोरचा व्यक्ती हिंदू असेल तरच त्याच्याकडून सामान घेतले पाहिजे. तो हिंदू नसेल, कपाळावर टिळा लावत नसेल तर त्याला हनुमान चालीसा किंवा गणपती बाप्पांची आरती येते का, हे पाहूनच वस्तू विकत घ्याव्यात,” असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केले. हिंदूंनी अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी, असेही त्यांनी म्हटले.
नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरातील हनुमान नगर येथे वराह जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू समाज, राज्य सरकार आणि धर्माच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली.
राणे म्हणाले, “आमच्या सरकारमध्ये पहिले हिंदूंचे हित पाहिले जाईल आणि त्यानंतर इतरांचा विचार केला जाईल. हे आमच्या डोक्यात स्पष्ट आहे. त्यामुळे कोणीही वळवळ करू नये.”
‘हिंदू समाजाने पुढे आले पाहिजे’
हिंदू समाजाबाबत बोलताना राणे यांनी आक्रमक शब्दांत भूमिका मांडली. “हिंदू समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल, तर प्रत्येक हिंदूने त्याविरोधात पुढे आले पाहिजे,” असे ते म्हणाले.
काही लोकांना आपण हिंदुस्थानात राहत असल्याचे विसरल्याचा आरोप करत राणे म्हणाले, “इथे शरिया नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान चालते. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.”
हिंदू बांधवांना त्रास देणाऱ्यांना सरकार म्हणून सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘हिंदू समाजामुळेच मंत्रालयावर भगवा’
राणे म्हणाले, “या सरकारला हिंदू समाजाने निवडून दिले आहे. मी आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, कारण हिंदू समाजाने या मंत्रालयावर भगवा झेंडा फडकवला.”
राज्यातील सरकार हिंदुत्ववादी असल्याचे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारची भूमिका हिंदू समाजाच्या हिताशी जोडली.
‘हिंदूंना त्रास दिला तर तांडव करेन’
राणे यांनी आपल्या भाषणात कठोर इशाराही दिला. “कोणत्याही हिंदू बांधवाला त्रास दिला तर हनुमान नगरमध्ये न सांगता येईन आणि पाहिजे तसा तांडव करेन. कोणीही घाबरू नका,” असे ते म्हणाले.
त्यांनी तथाकथित ‘जिहाद’च्या मुद्द्याचाही उल्लेख करत सरकार अशा प्रकारांना परवानगी देणार नसल्याचे सांगितले.
‘आधी हिंदू, नंतर इतर’
सर्वधर्मसमभावाबाबतही राणे यांनी आक्रमक वक्तव्य केले. “सर्वधर्मसमभावाची टेप आमच्यासमोर लावायची नाही. इथे हिंदूंना पहिले मोजले जाईल आणि मग इतरांना, ही आमची स्पष्ट भूमिका आहे,” असे त्यांनी म्हटले.
राणे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः खरेदी-विक्री करताना व्यक्तीचा धर्म तपासण्यासंदर्भातील त्यांच्या वक्तव्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू शकतात.

