..राज्यात आंधळं बहिरं व मुकं सरकार..खरिप हंगामासाठी महायुती सरकारची काहीही तयारी नाही, बि-बियाणांची टंचाई, खतांची लिकिंग सुरु
मुंबई, दि. १२ जून २०२६.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत आहेत. दारिद्रय रेषेखाली जाणे व वर येणे ही एक प्रक्रिया आहे असे बेजबाबदार वक्तव्य करत मोदी सरकारच्या काळात गरिबी निर्मलून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हे सांगताना देशातील ८० कोटी जनतेला मोदी सरकारच ५ किलो धान्य रेशनवर मोफत देते याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. गरिबी निर्मुलन झाले तर हे ८० कोटी लोक कोण आहेत? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली अशीही धादांत खोटी थाप मारून ते मोकळे झाले. अशा थापाड्या मुख्यमंत्र्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला, सपकाळ पुढे म्हणाले की, स्वामीनाथन समितीची स्थापना काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या (२००४-२०१४) वेळी करण्यात आली होती व त्याचा अहवालही त्यावेळी प्राप्त झाला होता पण त्याची अंमलबजावणी करण्याआधीच केंद्रात सत्ताबदल झाला व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आले. या मोदी सरकारने स्वामीनाथन आयोग गुंडाळून ठेवला पण मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी केली असे देवेंद्र फडणवीस धादांत खोटे सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या कांदा, सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा अशा कोणत्याही शेतमालाला हमीभाव मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामीनाथन समितीचा अहवाल तरी वाचलेला आहे की नाही आणि अण्णा हजारे तर यावरही गप्पच आहेत. भाजपा व देवेंद्र फडणवीस मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामाचा ढोल बडवत आहेत तर या १२ वर्षात मोदी सरकारने नेमके काय केले याची श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती मांडावी. किती बांग्लादेशी, रोहिंग्यांना परत पाठवले हेही पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेईन सांगितले पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.
खरिप हंगामासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्यात बि बियाणांची टंचाई आहे, खतांची लिंकिंग करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना नाही. पूर्वी राजे महाराजे राज्यात परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी वेशांतर करून जात व वस्तुस्थिती जाणून घेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेशांतर करून जातात पण दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी असा टोला सपकाळ यांनी लगावत फडणवीसांचे सरकार हे ‘आंधळे, बहिरे व मुके’ आहे असे म्हटले आहे.
काँग्रेस डुबतं जहाज आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या विधानाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष या देशाची आशा आहे,. काँग्रेस पक्ष या देशाचा डीएनए आहे आणि भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच आव्हान देऊ शकतो. आणि २०१४ मध्ये जे काँग्रेसमुक्त भारत करण्याचा वल्गना करत होते, त्यांचा पक्षच आज काँग्रेसयुक्त झाला आहे. फडणविसांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतील. भाजपा मात्र मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’ आहे, असेही सपकाळ म्हणाले.
या पत्रकार परिषदेला नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, हनुमंत पवार हे उपस्थित होते.

