‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी’, विषयावर टिळक भवन मध्ये विशेष चर्चासत्र संपन्न.
मुंबई, दि. १३ जून २०२६.
देशात वाजपेयी सरकार असतानाही विरोधकांचा सन्मान केला जात होता, संसदेत कधीच विरोधकांना शत्रू मानले नाही पण सध्या विरोधकांना संपवण्याचे काम होत आहे. राजकीय प्रतिशोध सुरु आहे आणि यातून देशात भयानक संकट उभे ठाकले आहे. या संकटाचा मुकाबला काँग्रेस पक्षच करु शकतो, ती काँग्रेसवर मोठी जबाबदारी आहे आणि काँग्रेसने जमिनीवर उतरून मुकाबला करण्याची भूमिका घेतली ती योग्य आहे, कारण सध्याच्या संकटातून मोदी सरकार देशाला बाहेर काढू शकत नाही, ‘मोदी मस्ट गो’, असा स्पष्ट इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अर्थशास्त्र विभाग व ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस,यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. अरुणकुमार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खा. कुमार केतकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते.
या चर्चासत्रात पुढे बोलताना यशवंत सिन्हा म्हणाले की, मोदी सरकार विकास दराचे जे आकडे मांडून श्रेय घेत आहे ते आकडेच मुळात चुकीचे आहेत. भारताचा विकास दर ७.७ टक्के आहे हे ते सांगत आहेत पण सत्य वेगळे आहे. या आकड्यावर अनेक अर्थतज्ञ शंका उपस्थित करतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या आकड्यांवर शंका उपस्थित करून भारताला ‘सी’ ग्रेड मध्ये टाकले आहे आणि भारताचे आकडे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असे स्पष्ट सुनावले आहे. विशेष म्हणजे ब्राझील व दक्षिण आफ्रिका यांचाही नंबर ‘ए’ ग्रेड मध्ये आहे. गुंतवणूक वाढली तरच विकास दर वाढेल पण मागील १२ वर्षात गुंतवणूक ही जीडीपीच्या ३२ टक्क्यांच्या आसपास आहे, त्यात वाढ झालेली दिसत नाही, त्याच्या आधारे विकास दर ६ ते ६.५ टक्के होतो. सरकारने मांडलेले आकडे साफ चुकीच आहेत. २०४७ साल येता येता भारत विकसीत देश होईल असे मोदी सांगत आहेत पण त्यासाठी आपला विकासाचा दर हा ८ टक्क्यांच्या वर असला पाहिजे आणि सध्याचे आकडे पाहता ते उदिष्ट गाठता येणे फारच कठीण आहे. भारतासमोर हे संकट इराण युद्धामुळे आलेले नाही. सरकार डिझेलचे रेशनिंग करत आहे, रुपया कुठे चालला आहे? महागाई प्रचंड वाढली आहे. आणि स्टॉक मार्केटची अवस्थाही गंभीर आहे. मागील दोन वर्षात ३.२५ लाख कोटी रुपये देशातून बाहेर गेले आहेत. शेतकरी संकटात आहे. खतांची टंचाई आहे. ग्रामीण भागातील अवस्था अत्यंत बिकट बनत चालली होईल. शेतकरी संकटात येईल व त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात पडेल.
भारताने याआधी अनेक मोठ्या संकटाचा सामना केला आहे आणि त्यातून देश पुन्हा ताकदीने उभा राहिला आहे. पंडित जवाहलाल नेहरु ते अटलबिहारी वाजपेयी पर्यंत सर्वच सरकारांनी संकटाचा मुकाबला केला पण सध्याच्या मोदी सरकारमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची इच्छाशक्तीच नाही. खोटे बोलून काम चालवले जात आहे. आज भारत सरकार अमेरिकेसमोर झुकले आहे, ते सांगतील तसेच केले जात आहे. पंतप्रधान अमेरिकेसमोर नतमस्तक आहेत आणि त्याचाही मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. अमेरिका इराण वादात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे, मग आपले विश्वगुरु कुठे आहेत? असा प्रश्नही यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला.
अर्थतज्ञ प्रा. अरूणकुमार यावेळी म्हणाले की, मोदी सरकार जीडीपीचे आकडे लपवत आहे. देशातील असंघटीत क्षेत्र खूप मोठे आहे. छोटे, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नोटबंदीचा मोठा फटका MSME क्षेत्राला बसला. जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला, त्याचा फटकाही असंघटीत क्षेत्राला बसला. संघटीत क्षेत्राला मात्र त्याचा फायदा होत आहे. १० हजार रुपयांपेक्षा कमी कमाई असलेल्या कामगारांची संख्या असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. एवढ्या कमाईत व वाढलेल्या महागाईत तो कसा जगेल. महागाईचा दर सुद्धा संघटीत व असंघटीत क्षेत्रात वेगवेगळा आहे, गरिबांचे आकडे दाखविले जात नाहीत. गरिब माणूस पिचला जात आहे. आपले मार्केट घसरत आहे. आपली पिछेहाट होत आहे. तंत्रज्ञानात आपण मागे आहोत. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये आपली गुंतवणूक अमेरिका, चीनच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. आपली आयात वाढली आहे. अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकला आहे. आपली अर्थव्यवस्था तडजोडीची झाली आहे. शिक्षणवरचा आपला खर्च इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जागतिक पातळीवर आपण थट्टेचा विषय बनलो आहोत. संघटीत व असंघटीत क्षेत्रात मोठी तफावत आहे. कामगारांची संख्या कमी कमी होत आहे. यातून रोजगाराची समस्या वाढत आहे, काम मिळत नाही. शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरी मिळत नाही, यातून सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. सरकार खरे आकडे सांगत नाही. चुकीचे आकडे दाखवून दिशाभूल केली जात आहे. आरोग्य, शिक्षण क्षेत्रातही प्रगती नाही. २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले हा दावा चुकीचा आहे. लोकांच्या हातात पैसा असला तरच मागणी वाढेल असेही अरुणकुमार म्हणाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देश आज मुठभर लोकांच्या हातात गेला आहे, आपल्या गळ्याभोवती फास आवळला आहे. लढण्याची जिद्द कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशातील आजची परिस्थीती पाहता आपल्याला सत्य व अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे. चुकीचे काही घडत असेल तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. संपूर्ण मे महिना मी राज्यभर फिरून महत्वाच्या विषयावर आंदोलन केले. राज्यात फिरताना काही गोष्टी निदर्शनास आल्या, त्यात ५०० रुपयांच्या नोटा संपल्याचे चित्र आहे, बँकेत पैसे नाहीत. परिक्षा आहे पण पेपर लिक, डिग्री आहे पण नोकऱ्या नाहीत, अशी अवस्था आहे. शिक्षणाकडेही तरुण पाठ फिरवत आहेत. खरिपाचा हंगाम सुरु आहे पण शेतकरी नाराज आहे. शेतमालाला भाव नाही, खदखद वाढली आहे, परिस्थिती गंभीर आहे यातून मार्ग काढावा लागेल.जात व धर्म हे राजकीय विषय करण्यापेक्षा आर्थिक विषयावर राजकारण व्हावे अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी यांनी केले. पाहुण्यांची ओळख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून दिली. आभारप्रदर्शन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन देसाई यांनी केले.

