पनवेल,दि.13-: गेली अनेक वर्षे जगभरातील देश भारताकडे एक बाजारपेठ म्हणून बघत होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 12 वर्षात विश्वास, विकास, आणि जनकल्याणाची जी काम केली त्यातून आपल्या देशाकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आपल्या देशाने जगाला दाखवून दिले आम्ही केवळ बाजारपेठ नाही आम्ही एक महासत्ता आहोत,असे प्रतिपादन मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्ती पर्वानिमित्ताने आज पनवेल येथे रायगडचे संपर्क मंत्री आणि राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या यशस्वी कालखंडातील केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. अर्थात हे आमचे सेलिब्रेशन नसून ज्या जनतेने आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला त्या जनतेल्या केलेल्या कामाचा हिशेब देण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जातो आहोत, असेही त्यांनी सांगितले.
ही बारा वर्ष विश्वासाची विकासाची आणि जनकल्याणाची आहेत. या देशाचे प्रधान सेवक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काम केले, सेवा दिली, कर्तव्य केले, असा जनाधिकार, असा लोकांचा, मतदारांचा आशिर्वाद यापुढे कुणाला मिळेल की माहिती नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 22 राज्यांमध्ये आम्ही जनतेची सेवा करीत आहोत. ही भारतीय राजकारणातली दुर्मिळ घटना आहे. विशेष म्हणजे आजच्या वैश्विक परिस्थितीमध्ये तर आणि त्यातही विशेषत: एशियन देशामध्ये असलेली अस्थिरता पाहिली तर अशा प्रकारे एक नेतृत्व, एक पक्ष, एक सरकार, आणि त्याची वाढती लोकप्रियता याचे उदाहरण अन्य कुठेही सापडणार नाही, असेही ते म्हणाले.
सर्वांना बरोबर घेऊन चालले पाहिजे, म्हणून सबका साथ.. सबका विकास आणि सबका विश्वास या धोरणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार जनकल्याणाचे काम करीत आहे. म्हणून 25 कोटी भारतीय नागरिक दारिद्ररेषेखालचे होते त्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठीचा निर्णय घेऊन त्या ध्येय धोरणाचे काम आमच्या सरकारने केले.
सर्व आर्थिक व्यवहार हे डिजिटल, ऑनलाइन पद्धतीने करण्यात आपल्याला यश मिळाले. त्यामुळे सुमारे 4 लाख 31 हजार कोटी बचत झाली. या व्यवहारातल्या पारदर्शकतेमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या निधीचा अपहार होणार होता तो निधी वाचला. हे करताना “देश नहीं झुकने दूँगा” अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.
मग एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइक, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव या सगळ्यातून भारत महासत्ता आहे, हे आपण जगाला दाखवून दिले.
“नक्षलवादमुक्त भारत” घोषणा आमच्या सरकारने केली आणि त्याला मोठे यश आले. आज देशभरातून नक्षलवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. आज हा रेड कॉरिडॉर ग्रीन कॉरिडोर मध्ये बदलला.
2014 पूर्वी बँकेचे अकाऊंट हे निवडक लोकांसाठीच आहे, अशा विचारांनी देश काम करीत होता. मात्र 2014 ते आतापर्यंत 58 कोटी बँक खाती उघडली गेली, त्यातही 32 कोटींची महिलांची खाती आहेत.
आमच्या सामान्यतः सामान्य माणसाचं आरोग्य आणि आरोग्यासाठीचे उपचार, त्यासाठी लागणारा खर्च, यासाठी योजना आखली आणि आयुष्यमान भारतमध्ये 60 कोटी अधिक आरोग्य कार्ड देण्यात सरकारला यश आले. आमचं सरकार गरिबांना समर्पित आहे, अशी केवळ घोषणा नाही तर पंतप्रधान आवास योजनेत 4 कोटीहून अधिक कुटुंबांना घर, 12 कोटीच्या वर महिलांना ज्यांच्याकडे गॅस नव्हता त्यांना गॅस, 16 कोटी लोकांना घरापर्यंत पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन पोहचवणे या पद्धतीचे भरीव योगदान आणि काम सेवेचे कार्य सरकारने केले.
12 कोटी शौचालयाची निर्मिती, पी.एम स्वनिधी योजनेंतर्गत 74 लाखाहून अधिक लोकांना कुठल्याही त्रासाविना कर्ज मिळाले. मुद्रा योजनेंतर्गत लहान व्यवसायांसाठी 57 कोटी अधिक तारणमुक्त कर्ज वितरित करण्यात आली, तर आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी 15 हजार कोटी रुपये आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानासाठी 79 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती मंत्री शेलार यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4.3 लाख कोटी रुपये जमा झाले किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे सात कोटीहून अधिक शेतकऱ्यांना अंदाजे दहा लाख कोटी रुपयांची परवडणारे कर्ज उपलब्ध करून देण्यात आली. शेतकऱ्यांसोबतच महिलांच्या उत्कर्षासाठी या सरकारने विशेष लक्ष दिले होत
लखपती दीदी योजनेंतर्गत तीन कोटीहून अधिक महिलांना लाभ झाला आहे. याशिवाय सुकन्या समृद्धी योजना, सुरक्षा दलामध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे, पंतप्रधान सूर्य घर मोफत योजना अशा विविध योजनांनाही मोठे यश आले, ही माहिती देतानाच गेल्या बारा वर्षात ग्रामीण रस्ते निर्मिती राष्ट्रीय महामार्ग निर्मिती यामध्ये झालेले वारसा संवर्धनाची झालेले कार्य या संपूर्ण सरकारने केलेल्या कामाचा मंत्री शेलार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सविस्तर आढावा सादर केला.
या पत्रकार परिषदेला आमदार महेश बालदी, भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अरुण भगत, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासह रंजनाताई वास्कर, जिल्ह्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रिया मुकादम, पनवेल महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम, रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धनचे सभापती वैकुंठ पाटील, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, माथेरानचे उपनगराध्यक्ष संतोष शेलार, खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, उरणचे उपनगराध्यक्ष रवी भोईर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
जगाचा आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला-मंत्री ॲड.आशिष शेलार
Date:

