बिस साल बाद … गेली कित्येक वर्षे पुण्यातील कायमस्वरूपी पत्रकारितेला कंत्राटी पत्रकारिता बनवून पत्रकारांच्या नौकऱ्यांशी आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्याशी खेळ खेळला जात आहे. 2006 मध्ये पुण्यातील एका मोठ्या वृत्तपत्रातील फौंडर मेंबर ठरलेल्या काही पत्रकारांनी कामगार आयुक्त , औद्योगिक न्यायालय, सेशन कोर्ट, हायकोर्ट असा लढा कामगार नेते अजित अभ्यंकर यांच्या साथीने लढला आणि स्वतःवरील अन्याय सहन करून संस्थेतील शेकडो पत्रकार पत्रका रितेतर सह कर्मचारी यांना कायदेशीर हक्क मिळवून दिले. पण 20 वर्षात अशा संघर्ष करणाऱ्या पाठीशी कोणी उभे राहिले नाही ,या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच्या अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपविली जाते तोच पत्रकार स्वतःवरील अन्याय मुग गिळून सहन करत आला . आता 20 वर्षानंतर पुण्यात एक अशाच अन्याया विरोधातील घटना पुढे आली आहे ज्याची अदखलपात्र म्हणून पोलिसानी नोंद घेतली आहे.मात्र अद्याप याविषयी कोणी न्यायालय , कामगार आयुक्त , औद्योगिक न्यायालय, यांच्याकडे दाद मागीतल्याचे वृत्त नाही .
पुणे :पुण्यातील ‘लेक्सिकॉन मीडिया प्रा. लि.’ Lexicon Media Pvt. Ltd. (पुणे टाइम्स मिरर – Pune Times Mirror) या माध्यम संस्थेत काम करणार्या तीन महिला पत्रकारांचा छळ करुन त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या महिला पत्रकारांचा सेवा करार संपला असताना त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे काम करवुन घेणे, त्यानंतर त्यांना अचानक कामावरुन काढून टाकणे, गेले जवळपास वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे रेकॉर्ड संस्थेच्या वेबसाईटवरुन नष्ट केल्याचा आरोप या महिला पत्रकारांनी केला असताना चंदननगर पोलिसांनी संस्थेच्या मॅनेजमेंट हेड प्रियांका शर्मा, संचालक, चेअरमन पंकज शर्मा, एच. आर. निकिता जाधव आणि पुणे मिररचे सीईओ आकाश राजपुरोहित यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.सुरक्षेच्या आणि भविष्यातील रोजगाराच्या कारणास्तव तक्रारदार महिला पत्रकारांनी आपली नावे गोपनीय ठेवली आहेत. त्यांनी संगनमताने पूर्वनियोजित कट रचून व्यावसायिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

व्यवस्थापनाने कार्यस्थळावर अत्यंत असुरक्षित वातावरण तयार करुन गंभीर मानसिक अत्याचार व छळ करुन त्यांनी या महिला पत्रकारांना नोकरीवरुन काढून टाकण्याची वारंवार धमकी दिली. तसेच १८ मे रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक या पत्रकारांना कामावरुन काढून टाकले. एवढेच नव्हे तर, त्यांचे अधिकृत ईमेल आणि कामाचे डॅशबोर्ड तातडीने ब्लॉक करून त्यांची ‘डिजिटल नाकेबंदी’ करण्यात आली. यामुळे पत्रकारांनी केलेल्या कामाच्या नोंदी आणि महत्त्वाचे पुरावे त्यांच्यासाठी उपलब्ध राहिले नाहीत. हा प्रकार म्हणजे त्यांच्या कामाच्या अधिकारावर गदा आणणारा आणि पुरावे नष्ट करण्याचा सायबर गुन्हा असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण छळवणुकीमुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक दडपणामुळे थेट आत्महत्येस प्रवृत्त होईल अशी परिस्थिती निर्माण केली गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे.आमचे कायदेशीर करार संपलेले असतानाही, आमच्या आर्थिक गरजेचा गैरफायदा घेऊन मॅनेजमेंटने आमच्याकडून वर्षभर अहोरात्र काम करून घेतले. आमच्या श्रमाचा व्यावसायिक वापर केल्यानंतर, कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक आम्हाला वाऱ्यावर सोडण्यात आले.” तसेच, ज्या गोष्टीचा मूळ पत्रकारितेशी संबंध नाही, त्या ‘डॅशबोर्ड’चे पूर्णपणे खोटे आणि बनावट कारण पुढे करून आपली व्यावसायिक प्रतिमा डागाळण्याचा कट रचला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रियांका शर्मा यांनी त्यांची कायदेशीर कार्यमुक्ती पत्र आणि अनुभव प्रमाणपत्र दडपशाही करुन रोखून धरले आहे. जेणे करुन त्यांना इतर कोठेही नोकरी मिळू नये आणि त्यांची कारकीर्द कायमची उद्धवस्त व्हावी, असे कृत्य केले आहे. त्याला कंपनीच्या मुख्य संचालकांनी देखील पूर्ण पाठिंबा दिल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे. चंदननगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

