पुणे : पुणे महापालिकेत पुन्हा एकदा कसबा विधानसभा मतदारसंघाचे वर्चस्व दिसून आले असून भारतीय जनता पार्टीने स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची तर सभागृहनेते पदी धीरज घाटे यांची निवड केली आहे.
आरक्षण बदलल्यावर मुरलीधर मोहोळ यांची महापौर पदावर निवड करण्यात आली. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांनाही पक्षाने राजीनामे देण्यास सांगितले. त्यानुसार सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि नुकतेच आमदार झालेले स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी राजीनामे दिले. त्यानंतर घाटे आणि रासने यांची निवड करण्यात आली. या दोघांच्या रूपाने पुन्हा एकदा कसबा भागातला नेतृत्व करायची संधी मिळाली आहे.
रासने काहीसे मवाळ असले तरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या माध्यमातून त्यांच्यामागे मोठी युवाशक्ती आणि व्यापारी वर्ग आहे. भाजपचे ज्येष्ठ सभासद म्हणून त्यांनाच स्थायी समितीवर संधी मिळेल असे अपेक्षित होते. भाजपने महापौरपद एकच वर्षांचे असेल असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे कदाचित ही पदे’देखील एकाच वर्षापुरती असू शकतात.पण रासने यांना किमान २ अर्थसंकल्प करण्याची संधी मिळेल असे दिसते आहे .
पुणे महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाला मिळाला सभागृह नेते पदाचा सन्मान !
दरम्यान घाटे हे भाजपचे आक्रमक सभासद आणि संघाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सभागृहात अतिशय स्पष्ट मांडणी करणारे घाटे अत्यंत कमी वयापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. गिरीश बापट खासदार झाल्यावर त्यांनी आमदारकी लढवण्यासाठी तयारी केली होती. मात्र टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिली. अखेर घाटे यांना सभागृहनेते पदी बढती देऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.प्रत्यक्षात घाटे यांची कारकीर्द कशी असेल हे पाहणे अनेकांना औत्सुक्याचे वाटते आहे.
घाटे यांचे वडील महापालिकेच्या जन्म – नोंदणी खात्यातून निवृत्त झाले. तर, आई महापालिकेच्या शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. घाटे हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी 4 वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केले.
प्रारंभी परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि सेलू या दोन तालुक्यांत आणि नंतर बीड येथे जिल्हा प्रचारक म्हणून काम पाहिले. धीरज यांचा भाऊ धनंजय, बहीण धनश्री आणि आई – वडील पाचही वेगवेगळ्या संस्थांचे पूर्ण वेळ प्रचारक राहिले आहे. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर घाटे यांनी भारतीय जनता पक्षात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात भारतीय जनता युवा मोर्चाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनतर ‘भाजयुमो’ च्या पुणे शहर सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.सध्या भाजपच्या प्रदेश चिटणीसपदी ते कार्यरत आहेत.