प्रशासनावर टीकास्त्रआसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हेंची नाराजी!
‘स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान सर्वोच्चच; मात्र आमदार-खासदारांसाठीही स्पष्ट आणि पूर्वनियोजित आसनव्यवस्था असावी’
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींसाठी करण्यात आलेल्या आसनव्यवस्थेबाबत शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान सर्वोच्चच आहे; मात्र आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनाही शासकीय प्रोटोकॉलनुसार सन्मानजनक आणि स्पष्ट आसनव्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यपालांच्या हस्ते आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला डॉ. गोऱ्हे उपस्थित होत्या. कार्यक्रमस्थळी विविध मान्यवरांसाठी स्वतंत्र ब्लॉक तयार करण्यात आले होते. राज्यपालांचे अधिकारी, सचिव आणि अन्य निमंत्रितांसाठीही पहिल्या रांगेत जागा राखीव होत्या. मात्र आमदार आणि खासदारांसाठी शेवटच्या कक्षातील दुसऱ्या रांगेत काही आसने ठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “हा माझ्या वैयक्तिक सन्मानाचा प्रश्न नाही. मी अनेक वर्षांपासून अशा शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहत आले आहे. मात्र लोकप्रतिनिधींसाठी नेमकी आसनव्यवस्था कुठे आहे, हे स्पष्ट दिसत नव्हते.”
कार्यक्रमस्थळी एका अधिकाऱ्याने एका ठिकाणी बसण्यास सांगितले, तर अन्य अधिकाऱ्याने दुसऱ्या रांगेकडे निर्देश केला. त्यानंतर एका अधिकाऱ्याच्या विनंतीनुसार आपण पहिल्या रांगेत बसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मुद्दा आपल्या वैयक्तिक आसनाचा नसून आमदार आणि खासदारांना दुसऱ्या रांगेत ठेवण्याची पद्धत राजशिष्टाचाराच्या दृष्टीने योग्य वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘स्वातंत्र्यसैनिकांसाठी स्वतंत्र ब्लॉक असणे योग्य’
स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना सर्वोच्च प्राधान्य दिलेच पाहिजे, असे अधोरेखित करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्यांच्यासाठी स्वतंत्र ब्लॉक ठेवणे योग्य आहे. त्याच धर्तीवर राज्यपाल, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीही त्यांच्या घटनात्मक व शासकीय प्रोटोकॉलनुसार स्वतंत्र ब्लॉक निश्चित करून त्याचे स्पष्ट नामांकन केले जाऊ शकते.
“अधिकाऱ्यांचाही योग्य सन्मान राखला पाहिजे. मात्र आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला येणार असतील, तर त्यांची संख्या लक्षात घेऊन पूर्वनियोजित आसनव्यवस्था असणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
भविष्यात राष्ट्रीय किंवा शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीबाबत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजनात सुधारणा करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार
या बाबीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार रावल तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
“देश आणि स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय सोहळा हा सर्वांत मोठा आहे. आजचा कार्यक्रम आम्ही आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला. मात्र नियोजनात जाणवलेली ही त्रुटी भविष्यात दुरुस्त व्हावी आणि लोकप्रतिनिधींसाठी प्रोटोकॉलनुसार सुस्पष्ट आसनव्यवस्था निश्चित व्हावी, एवढीच अपेक्षा आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

