मुंबई : जुन्या नोंदणीकृत व अनोंदणीकृत कुलमुखत्यारपत्रांच्या आधारे राज्यात झालेले व्यवहार आणि त्याबाबत वारसांकडून निर्माण होणारे वाद यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या व्यवहारांचा सविस्तर आढावा घेऊन सहानुभूतीपूर्वक नियमित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यासंदर्भात नागपूर येथील काही वृत्तपत्रांनी लक्ष वेधले होते, त्याची दखल घेत डॉ. गोऱ्हे यांनी महसूलमंत्र्यांकडे मागणी केली. नागपूरसह राज्यातील विविध भागांत जुन्या कुलमुखत्यारपत्रांद्वारे झालेले व्यवहार वारसांकडून अमान्य केले जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या प्रश्नावर शासनाने सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती डॉ. गोऱ्हे यांनी केली.

