Home Blog Page 80

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

लोणी-काळभोर (पुणे) : पुणे शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रात कुठलीही प्रक्रिया न करता अवैधरित्या टाकण्यात येणारा कचरा त्वरित बंद करावा, या मागणीसाठी एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांचे ‘कचरा बंद’ आंदोलन सात दिवसांसाठी स्थगित करण्यात आले. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व लोणी-काळभोरच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांनी गोष्टीचे गांभीर्य ओळखून तातडीने आंदोलनस्थळी भेट देत केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली.

पोलिस उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत कचरा प्रकल्प उभारणीसाठी लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत दिली असून कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण केलेले ट्रॅक्टर नदीपात्रात सोडण्यास मुभा दिली आहे. परंतु सात दिवसांत पर्यावरण व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेल्या या विषयात तोडगा काढून मुळा-मुठा नदीपात्रात थेट कचरा टाकणे बंद न केल्यास दोन्ही ग्रामपंचायतींच्या कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठातून प्रवेश नाकारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड व लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती गावचे माजी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

या आंदोलनात शैक्षणिक संकुलातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल, एमआयटी ज्युनिअर महाविद्यालय व एमआयटी एडीटी विद्यापीठातील हजारो विद्यार्थी व निवासी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सर्वांनी या विषयाची गंभीरता, भविष्यातील संभाव्य धोके, मुळा-मुठा नदीचे अस्तित्व, परिसरातील पर्यावरणाबाबत स्थानिक ग्रामपंचायतींची उदासीनता तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडून या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर गुरुवारी सकाळीच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या गाड्या दुपारी ३ वाजेपर्यंत तशाच ताटकळत उभ्या होत्या. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठातून नदीपात्राकडे जाण्यासाठी तात्पुरती परवानगी देण्यात आली.

नदीपात्रातील कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी भीषण आग लागली होती, जी पुढील तब्बल चार दिवस धुमसत राहिली. त्यामुळे परिसरात प्रचंड विषारी धुराचे लोट पाहायला मिळाले. यामुळे एमआयटी एडीटी शैक्षणिक संकुलातील ६–७ विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊन गुदमरल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागले होते.

या आगीमुळे व धुरामुळे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, स्थायी कर्मचारी व परिसरातील नागरिकांना श्वसनाचा गंभीर त्रास झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हा कचरा नदीपात्रात टाकणे बंद करण्यासाठी ‘कचरा बंद’ आंदोलन छेडले होते.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कुठलेही वर्गीकरण न करता थेट मुळा-मुठा नदीपात्रात कचरा टाकला जातो. साचलेल्या या कचऱ्याला सातत्याने आग लागण्याच्या घटना घडतात. त्यातून वायू प्रदूषण होऊन आम्हा विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे आम्ही पुढाकार घेत या सर्व गोष्टींचे मूळ असणारा कचरा टाकणे बंद करण्यासाठी ‘कचरा बंद’ आंदोलन करत दोन्ही स्थानिक ग्रामपंचायतींच्या गाड्या आडविल्या. परंतु पोलिस उपायुक्तांना विनंती केल्यानंतर आम्ही हे आंदोलन स्थगित करत ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतरही नदीपात्रात कचरा टाकणे सुरू राहिल्यास पुन्हा गाड्या आडविण्यात येतील.

— दादासाहेब भोसूरे, विद्यार्थी प्रतिनिधी.

शरद पवार, पार्थ पवार, रामदास आठवले,विनोद तावडे, ज्योती वाघमारे,माया ईवनाते आणि रामराव वडकुते राज्यसभेवर

मुंबई- महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी जाणाऱ्या नेत्यांची नावे आता समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत सात महत्त्वाचे नेते दिल्लीच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत. या यादीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आरपीआय यांसारख्या पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे.या यादीत भाजपचे विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते, तर आरपीआयचे रामदास आठवले यांची नावे जाहीर झाली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पार्थ पवार, शिवसेना (शिंदे गट) कडून ज्योती वाघमारे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून शरद पवार यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले आहे ,

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे . पार्थ पवार हे अजित पवार यांचे सुपुत्र असून युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या संभाव्य राज्यसभा प्रवेशामुळे नव्या पिढीच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या संभाव्य राज्यसभा प्रवेशामुळे राष्ट्रीय राजकारणातही लक्ष वेधले गेले आहे.

भाजपने राज्यसभेसाठी विविध भागांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. भाजपचे नेते विनोद तावडे हे दीर्घकाळ संघटनात्मक काम करणारे नेते मानले जातात. पक्ष संघटनेत त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा ही त्यांच्या कार्याची दखल मानली जात आहे.भाजपच्या दुसऱ्या उमेदवार माया ईवनाते या राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या सदस्य राहिल्या आहेत. त्या विदर्भातील असल्यामुळे या भागाला प्रतिनिधित्व मिळणार आहे. तसेच रामराव वडकुते हे शेळी-मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. ते मराठवाडा भागातील असून धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नावही राज्यसभेसाठी निक्षित झाले आहे . आठवले हे दलित राजकारणातील प्रमुख नेते मानले जातात. केंद्रातील मंत्रिमंडळातही त्यांनी भूमिका बजावली आहे.

तसेच शिवसेना (शिंदे गट) कडून ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . त्या पक्षाच्या महिला नेत्यांपैकी एक असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत.

दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील २४६ पैकी १२८ नागरिक सुखरूप परत

९० नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही

पुणे, दि. ५ – दुबई येथे गेलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांपैकी आतापर्यंत १२८ नागरिक सुखरूप पुण्यात परतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील एकूण २४६ नागरिक दुबई येथे गेले होते. त्यापैकी काल १११ नागरिक पुण्यात परतले होते. आज आणखी १७ नागरिक पुण्यात पोहोचले असून आतापर्यंत एकूण १२८ नागरिक सुखरूप परतले आहेत.

दरम्यान, २८ नागरिकांच्या विमान प्रवासाचे वेळापत्रक (फ्लाइट) पुनर्नियोजित करण्यात आले असून त्यांना लवकरच भारतात परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. उर्वरित ९० नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही. त्याबाबत संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक समन्वय सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

दुबई येथे अडकलेल्या सर्व नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पार्थ पवार यांनी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भरला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज

मुंबई- आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ अजितदादा पवार यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पार्थ पवार यांना शुभेच्छा देत त्यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दर्शविला. राज्याच्या विकासासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांना संसदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी पार्थदादा अजितदादा पवार निश्चितच सक्षम नेतृत्व करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना दुपारी उमेदवारी जाहीर झाली त्उयानंतर मेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पार्थ पवार विधानभवनात दाखल झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राष्ट्रवादीचे आमदार देखील उपस्थित होते. पार्थ पवार येताच विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘अजित दादा अमर रहे’ घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पार्थ पवार म्हणाले कि,’ राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.
हा क्षण माझ्यासाठी केवळ राजकीय टप्पा नसून मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. माझे वडील, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर जनतेच्या सेवेला प्राधान्य देत विकासाचे राजकारण कसे करावे, याचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा आणि त्यांनी दिलेले संस्कार हेच माझ्यासाठी पुढील वाटचालीचे मार्गदर्शन ठरतील.
दादांनी जपलेली जनतेशी असलेली नाळ, प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती आणि महाराष्ट्राच्या प्रगती तसेच विकासासाठीची तळमळ या मूल्यांना पुढे नेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. जनतेच्या अपेक्षा, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि पक्षाची विचारधारा यांना न्याय देत देश आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.

ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी,राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांचा अर्ज दाखल:एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र


मुंबई-राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठे ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या राज्यसभेची एकच जागा येत असताना, उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवले आहे. ज्योदी वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीकडून उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहेत. भाजपकडून चार उमेदवार देण्यात आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही उमेदवारांची नावे पुढे येऊ लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापक ज्योती वाघमारे यांचे नाव जाहीर झाले आहे. सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती समोर येत असून आता ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यापासून पक्षाची वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारीही ज्योती वाघमारे यांनी सातत्याने पार पाडली आहे. आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे त्या शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.
काँग्रेसमधून शिवसेना शिंदे सेनेत दाखल

ज्योती वाघमारे या फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीतून पुढे आलेल्या असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी सक्रिय काम केले आहे. यापूर्वी त्या काँग्रेस पक्षातही कार्यरत होत्या. त्यांच्याकडे काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षाची जबाबदारी होती. प्रणिती शिंदे यांच्या प्रचार सभांचे सुत्रसंचलन, संयोजन देखील त्या करीत होत्या‌.

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मजबूत वैचारिक आणि राजकीय आव्हान उभे करण्याच्या दृष्टीनेही ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच या चर्चाना अंतिम स्वरूप मिळणार असले तरी शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

डॉ. ज्योती वाघमारे यांचा परिचय आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा चेहरा म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख आहे.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटरचे तसेच बांधकाम मजूर म्हणून काम केले.
चळवळीतील कामाचा पोचपावती म्हणून सोलापूरमधील नागरिकांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत नागनाथ वाघमारे यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी काहीकाळ वृत्त निवेदिका म्हणून काम केलं.
पुढे उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली.
वालचंद महाविद्यालयात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्राध्यापिका म्हणून काही काळ काम केले.
शैक्षणिक पार्श्वभूमी

ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केलेली आहे. दहावीच्या परिक्षेत त्या ८४% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. बारावीच्या परिक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आलेल्या आहेत. अर्धमागधी विषयात राज्यात प्रथम. महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. ज्योती वाघमारे यांना १० वर्षांहून अधिककाळ प्राध्यापिका म्हणून कामाचा अनुभव आहे.

पाच भाषांवर प्रभुत्व

ज्योती वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे.

मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील धडाकेबाज महिला कार्यकर्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख आहे.
मागील १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सक्रियपण काम करत आहेत.
शिवसेना पक्षात उठाव झाल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत एप्रिल २०२३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.
मागील अडीच वर्षात विविध मंचांवर आणि चर्चासत्रात शिवसेना आणि माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या ऐतिहासिक उठावाबाबत सडेतोड आणि मुद्देसूद बाजू मांडत शिवसेना प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपयुक्तता सिद्ध केलेली आहे.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यांमध्ये केलेली भाषणं त्यांच्या वक्तृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची साक्ष देतात.
शिवसेना नेतृत्वावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांच्याच भाषेत किंवा त्याहून विखारी भाषेत सडेतोड उत्तरं देणाऱ्या प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान आणि राज्याच्या राजकारणावरील सखोल अभ्यासपूर्ण भाषण ही प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची वैशिष्ट्ये आहेत.
सलग तीन दसरा मेळाव्यात घणाघाती भाषणातून ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.
जनतेतला धडाकेबाज चेहरा खासदार झाल्यास सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना विस्तारासाठी फायदा होईल.

शरद पवारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता भरला उमेदवारी अर्ज:निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन केली प्रक्रिया पूर्ण

मुंबई-राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळच्या उमेदवारी अर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहता आपला अर्ज दाखल केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 1968 मधील ‘पशुपतीनाथ विरुद्ध हरिहर प्रसाद सिंग’ या खटल्यातील निवाड्यानुसार, प्रकृती किंवा इतर वैध कारणास्तव उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल, तर राज्यघटनेच्या कलम 84(अ) अन्वये विहित नमुन्यात शपथ घेणे बंधनकारक असते. याच कायदेशीर तरतुदीचा आधार घेत, जेजे रुग्णालयाचे अधीक्षक संजय सुरवसे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची रीतसर शपथ घेतली. त्यानंतर, त्यांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी विधिमंडळात निवडणूक अधिकाऱ्यांकडे हा उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.

शरद पवार यांनी यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत, ज्यामध्ये एक पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तर दुसरा अपक्ष म्हणून आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शरद पवार यांनी अशा प्रकारे प्रत्यक्ष उपस्थित न राहता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करून, तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून दोन अर्ज भरण्यात आले आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनपेक्षित घडामोडी घडल्या असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने केवळ ज्योती वाघमारे यांचाच अर्ज भरल्याने आणि रोहित टिळक यांची उमेदवारी मागे घेतल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. राज्यातील सात जागांसाठी एकूण सातच उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा समावेश आहे. सात जागांसाठी सातच उमेदवार रिंगणात उरल्याने आता मतदानाची औपचारिकता उरली नसून ही निवडणूक बिनविरोध पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताने प्रथमच खामेनींच्या निधनावर शोक व्यक्त केला: श्रद्धांजली वाहिली

इराणमधील मृतांची संख्या १,२३० वर पोहोचली-इराणचा इशारा- युरोपीय देशांनी हल्ल्यांवर मौन बाळगले तर त्यांना किंमत चुकवावी लागेल

आज अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा सहाव्या दिवशी पहिल्यांदाच भारताने खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट देऊन अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी करून श्रद्धांजली वाहिली.

खामेनी यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये शोक संदेश पाठवले जात आहेत. खामेनी यांचा २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल हल्ल्यात मृत्यू झाला होता. इराणने एका दिवसानंतर अधिकृतपणे याची घोषणा केली.
अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये मृतांची संख्या १,२३० वर पोहोचल्याचे इराणने म्हटले आहे. इराणच्या तस्निम न्यूज एजन्सीने फाउंडेशन फॉर मार्टर्स अँड वेटरन्स अफेयर्सचा हवाला देत हे म्हटले आहे.

अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर संयुक्त लष्करी हल्ला केला. तेव्हापासून इराणी अधिकारी दररोज मृतांची संख्या जाहीर करत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, मृतांमध्ये नागरिकांसह सुरक्षा दलातील सदस्यांचाही समावेश आहे.

जर युरोपीय देशांनी अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांवर मौन बाळगले तर त्यांना “लवकर किंवा नंतर त्याची किंमत चुकवावी लागेल” असे इराणने म्हटले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी स्पॅनिश प्रसारक टीव्हीईला दिलेल्या मुलाखतीत हा इशारा दिला.त्यांनी म्हटले आहे की युरोपीय देशांनी या हल्ल्यांवर स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा त्यांनाही परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने देशाच्या नैऋत्य सीमेजवळ एक अमेरिकन F-15E स्ट्राइक लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे.

इराणच्या तस्निम न्यूज एजन्सीने IRGC चा हवाला देत म्हटले आहे की दोन आसनी लढाऊ विमानाला “लक्ष्यित करून गोळीबार करण्यात आला.” अहवालात घटनेची वेळ स्पष्ट केलेली नाही.यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने हे वृत्त फेटाळून लावले आहे की इराणमध्ये अमेरिकेचे F-15E जेट कोसळल्याच्या अफवा निराधार आणि खोट्या आहेत. या घटनेबाबत दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले आहेत.

‘तलास’ चित्रपटातील हळदी गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न…

मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तलास’ हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा आहे. या चित्रपटाच्या कथानकात नेमके काय दडलेय याची कल्पना शीर्षकावरून अजिबात येत नाही. याउलट चित्रपटाचे शीर्षक उत्सुकता वाढविण्याचे काम करणारे आहे. नुकतेच या चित्रपटातील धम्माल गाण्याचे प्रकाशन करण्यात आले आहे.

निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘तलास’ या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘तलास’मध्ये प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री आहे. रहस्यमय घडामोडींची गुंतागुंत आणि अखेरीस होणारी रहस्याची उकल प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारी आहे. उदय गणपत जाधव यांनी या चित्रपटाचे अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केले असून, कथा आणि पटकथालेखनही त्यांनीच केले आहे. संवादलेखनाची जबाबदारी रुपाली कुटे यांनी सांभाळली आहे. गीतकार विजय गाडेकर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, संगीत दिग्दर्शनही त्यांची केले आहे. दादर क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘तलास’ चित्रपटामधील धम्माल गाण्याचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हळदीच्या सोनसळी रंगात न्हालेलं हे ग्लॅमरस, जल्लोषमय आणि रॉयल थाटात साकारलेलं गीत प्रकाशित करण्यात आले. ‘या गो बायांनो हळद घेऊनशी…’ या गीतकार-संगीतकार विजय गाडेकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर गौतमी पाटीलने नृत्य केले असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले आहे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी हे गाणे गायले आहे.

या चित्रपटात चिन्मयी सुमित, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत.

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयआणि पुणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष ‘जनसंवाद सत्र

पुणे, 5 मार्च 2026

“नागरिक देवो भवः” या भावनेतून प्रेरित होऊन, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे आणि पुणे पोलीस यांच्या समन्वयाने बुधवारी (4 मार्च 2026) प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, बाणेर, पुणे येथे विशेष संयुक्त ‘जनसंवाद सत्र’ आयोजित करण्यात आले. वेळेत पासपोर्ट जारी होण्यासाठी पोलीस विभाग आणि पासपोर्ट कार्यालय यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

पारपत्र अर्जांशी संबंधित तक्रारी, विशेषतः पोलीस पडताळणी अहवाल (PVR) संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे येथील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे पोलिसांचे अधिकारी यांनी अर्जदारांशी थेट संवाद साधला, त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि अनेक प्रलंबित प्रकरणांचे तत्काळ निराकरण करण्यास मदत केली.

सत्रादरम्यान अर्जदारांना पासपोर्ट अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, न्यायालयामध्ये चालू असलेले खटले  आणि पत्यांमधील बदल इत्यादी प्रकरणांबाबत तपशीलवार मार्गदर्शन देण्यात आले.

या संयुक्त ‘जनसंवाद सत्र’ मुळे नागरिकांना पासपोर्ट कार्यालय आणि पोलीस अधिकारी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रकरणांतील विलंब कमी होण्यास आणि पोलीस पडताळणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत झाली.

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय,पुणे यांनी नागरिक-केंद्रित सेवा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया अधिक जलद व कार्यक्षम करण्यासाठी पोलीस विभागाशी समन्वय आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

जनगणना-2027 जगातील सर्वात मोठी जनगणना : दोन टप्प्यात पार पडणार

नवी दिल्ली, 5 मार्च 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह  यांनी नवी दिल्ली येथे जनगणना-2027 साठी चार डिजिटल साधनांचे सॉफ्ट लाँच केले आणि “प्रगती” (महिला) आणि “विकास” (पुरुष) या शुभंकरचे औपचारिक अनावरण केले. देशभरात जनगणनेचे काम सुलभ करण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) ने प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय गृह सचिव आणि भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारने 16 जून 2025 रोजी राजपत्र अधिसूचनेद्वारे 2027 ची जनगणना आयोजित करण्याचा आपला हेतू अधिसूचित केला, आणि जनगणना प्रक्रियेची औपचारिक सुरुवात केली. जनगणना-2027, 2 टप्प्यात आयोजित केली जाणार असून, हा  जगातील सर्वात मोठा जनगणना कार्यक्रम असेल. यंदा प्रथमच जनगणना डिजिटल पद्धतीने केली जाईल, आणि प्रथमच स्वयं-गणनेचा पर्याय उपलब्ध असेल.

शुभंकर “प्रगती” आणि “विकास”

जनगणना- 2027 चे मैत्रीपूर्ण, आणि ओळखीचे चेहरे म्हणून काम करण्यासाठी “प्रगती” (महिला प्रगणक) आणि “विकास” (पुरुष प्रगणक) या शुभंकरांचे अनावरण करण्यात आले. हे शुभंकर 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाची पूर्तता करण्यात महिला आणि पुरुषांच्या समान सहभागाचे प्रतीक आहेत. या शुभंकरांच्या माध्यमातून 2027 च्या जनगणनेशी संबंधित माहिती, उद्दिष्टे आणि महत्त्वाचे संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यन्त प्रभावी आणि नागरिक-स्नेही पद्धतीने पोहोचवले जातील.

चार डिजिटल साधने

2027 ची जनगणना ही डिजिटल साधनांचा वापर करून आयोजित केलेली भारतातील पहिली जनगणना असेल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पुढील चार डिजिटल प्लॅटफॉर्मचे सॉफ्ट लाँच केले:

1.हाऊसलिस्टिंग ब्लॉक क्रिएटर (एचएलबीसी) वेब ऍप्लिकेशन: हे वेब-मॅप ऍप्लिकेशन, चार्ज ऑफिसर्सना सॅटेलाइट इमेजरीचा वापर करून हाऊसलिस्टिंग (गृहसूची) ब्लॉक्स डिजिटली तयार करायला सक्षम बनवेल, यामुळे देशभरात प्रमाणित भौगोलिक व्याप्ती सुनिश्चित होईल.

2. एचएलओ मोबाईल ऍप्लिकेशन: हाऊसलिस्टिंग डेटा संकलित आणि अपलोड करण्यासाठी प्रगणकांसाठी एक सुरक्षित ऑफलाइन मोबाइल ऍप्लिकेशन. केवळ सीएमएमएस पोर्टलवर नोंदणीकृत प्रगणक या ऍप्लिकेशन मध्ये प्रवेश करू शकतील. या ऍप च्या सहाय्याने थेट फील्ड-टू-सर्व्हर डेटा ट्रान्समिशन शक्य होईल, आणि कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. सर्व हाऊसलिस्टिंग डेटा या ऍप द्वारे गोळा केला जाईल, जो केवळ नोंदणीकृत मोबाइल नंबरचा वापर करून हाताळला जाऊ शकतो. हे ऍप्लिकेशन अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मशी सुसंगत आहे आणि ते 16 प्रादेशिक भाषांमध्ये चालवता येते.

3. स्व-गणना (एस ई) पोर्टल: पहिल्यांदाच, स्व-गणनेचा पर्याय सादर केला जात आहे. एस ई पोर्टल ही एक सुरक्षित वेब-आधारित सुविधा आहे जी घरातील पात्र उत्तरदात्यांसाठी क्षेत्र परिचालनापूर्वी स्वतःच्या घराची माहिती ऑनलाइन दाखल करण्याची परवानगी देते. माहिती यशस्वीरित्या दाखल झाल्यानंतर एक अद्वितीय स्व-गणना ओळख क्रमांक (एस ई आयडी) तयार केला जाईल. हा स्व-गणना ओळख क्रमांक (एस ई आयडी) प्रगणकासोबत सामायिक केला जाईल ज्याच्या आधारे प्रगणक माहितीची पडताळणी करू शकेल.

4.जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली (सी एम एम एस) पोर्टल: प्रशासकीय स्तरावर सर्व जनगणनेशी संबंधित क्रियाकलापांचे नियोजन, व्यवस्थापन, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी आरेखित केलेला एक केंद्रीकृत, वेब-आधारित डिजिटल मंच. उपजिल्हा, जिल्हा आणि राज्य पातळीवरील अधिकारी एकात्मिक डॅशबोर्डद्वारे रिअल-टाइममध्ये जनगणनेची प्रगती, क्षेत्रीय कामगिरी आणि कार्यान्वयन तयारीचा वेध घेऊ शकतात.

जनगणना-2027 अंतर्गत घरोघरी जाऊन सुरक्षित मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरून तपशील गोळा केला जाईल आणि संपूर्ण सुरक्षाछत्र सुनिश्चित केले जाईल. याकरिता जनगणना-2027 साठी देशभरात 30 लाखांहून अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि इतर जनगणना अधिकारी कामावर असतील.

तंत्रज्ञानाचा हा कॅलिब्रेटेड अवलंब नावीन्यपूर्णतेसह समावेशकतेला जोडतो, ज्यामुळे 2027 ची जनगणना अचूक, सुरक्षित आणि व्यापक असेल, याची सुनिश्चिती होते.

2027 ची जनगणना दोन टप्प्यात केली जाईल:

पहिला टप्पा: घरांची यादी आणि गृहसंख्या गणना (एच एल ओ)

पहिल्या टप्प्यात, घरांची परिस्थिती आणि घरगुती सुविधांवरील डेटा गोळा केला जाईल तर दुसऱ्या टप्प्यात देशातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक माहिती नोंदवली जाईल.

पहिल्या टप्प्याची अधिसूचना 7 जानेवारी 2026 रोजी जारी करण्यात आली. घरांची यादी आणि गृहगणना 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अधिसूचित केलेल्या 30 दिवसांच्या अखंड कालावधीत केली जाईल. घरोघरीच्या  सर्वेक्षणापूर्वी 15 दिवसांचा पर्यायी स्व-गणना कालावधी असेल.

दुसरा टप्पा: लोकसंख्या गणना (पी ई)

संपूर्ण भारतात फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना केली जाईल. लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी आणि जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या हिमाच्छादित विषमकालीन क्षेत्रांसाठी सप्टेंबर 2026 मध्ये गणना होईल. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीशी संबंधित प्रश्न देखील समाविष्ट केले जातील.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जनगणना 2027 साठी संदर्भ तारीख 1 मार्च 2027 रोजी 00:00 तास असेल, लडाख हा केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या हिमाच्छादित विषमकालीन क्षेत्रांचा अपवाद वगळता, जिथे संदर्भ तारीख 1 ऑक्टोबर 2026 रोजी 00:00 तास असेल.

राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा ६,००० कोटी रुपयांचा आयपीओ ११ मार्चला खुला होणार

·         राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट एकूण ६०,०००.०० दशलक्ष रूपये किमतीचे युनिट्स जारी करत आहे.

·         बोली/इश्‍यू बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी खुला होईल आणि शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख इश्‍यू उघडण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच मंगळवार, १० मार्च २०२६ असेल.

·         या इश्यूसाठी प्रति युनिट ९९ रूपये ते १०० रूपये असा प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे.

·         अँकर गुंतवणूकदार आणि धोरणात्‍मक गुंतवणूकदार वगळता इतर गुंतवणूकदारांना किमान १५० युनिट्ससाठी आणि त्यानंतर १५० युनिट्सच्या पटीत बोली लावता येईल.

पुणे५ मार्च २०२६: एनएचएआय (नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया)द्वारे प्रायोजित राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने आपल्या युनिट्सचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ किंवा इश्यू) उघडण्याची घोषणा केली आहे. स्पॉन्सर योगदानासह या इश्यूचे एकूण मूल्य ६०,०००.०० दशलक्ष रूपये (६,००० कोटी रुपये) आहे. हा इश्यू बुधवार११ मार्च २०२६ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहेत्याचा प्राईस बँड प्रति युनिट ९९ रूपये ते १०० रूपये असा निश्चित करण्यात आला आहे. हा इश्यू शुक्रवार१३ मार्च २०२६ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्‍याची तारीख मंगळवार१० मार्च २०२६ आहे. राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची स्थापना एनएचएआयद्वारे प्रोजेक्ट एसपीव्हीला दिलेल्या सवलत कराराच्या अटींनुसार इन्व्हिट मालमत्ता (InvIT Assets) अधिग्रहित करण्यासाठी, त्यांचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या ट्रस्टच्या पोर्टफोलिओमध्ये झारखंडआंध्र प्रदेशतमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधील पाच टोल रस्ते समाविष्ट असतील. हे सर्व प्रकल्प एनएचएआयने संकल्पित केलेल्या टोल ऑपरेट ट्रान्सफर (टीओटीमॉडेल अंतर्गत आहेत.

अँकर गुंतवणूकदार आणि धोरणात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले युनिट्स वगळता, इतर बोलीदारांना किमान १५० युनिट्सच्‍या लॉटसाठी आणि त्यानंतर १५० युनिट्सच्या पटीत बोली लावता येईल.

या युनिट्सची नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (‘एनएसई’) आणि बीएसई लिमिटेड (‘बीएसई’) या दोन्ही शेअर बाजारांवर (एकत्रितपणे ‘स्टॉक एक्स्चेंजेस’) नोंदणी प्रस्तावित आहे. या युनिट्सच्या नोंदणीसाठी बीएसई आणि एनएसईकडून १३ फेब्रुवारी २०२६ रोजी तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड या प्रक्रियेसाठी नियुक्त स्‍टॅक एक्‍सचेंज आहे.

या इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा उपयोग पुढील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव आहे: (i) प्रोजेक्ट एसपीव्हीमध्ये कर्ज आणि इक्विटीच्या स्वरूपात गुंतवणूक करणे. हा निधी प्रोजेक्ट एसपीव्हीद्वारे एनएचएआयला इन्व्हिट मालमत्तेचे (InvIT Assets) सवलत मूल्य देण्यासाठी वापरला जाईल आणि (ii) सर्वसाधारण कामकाजासाठी.

हा इश्यू बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे आणि इन्व्हिट (InvIT) नियमन व सेबीच्या (SEBI) इन्व्हिट मास्टर सर्क्युलरच्या अनुपालनानुसार राबवला जात आहे. यामध्ये निव्वळ इश्यूच्या (धोरणात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा वगळून) ७५.०० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसेल इतका भाग संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्रमाणबद्ध तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध असेल. पण इन्व्हेस्टमेंट मॅनेजर बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी चर्चा करून संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भागापैकी ६०.०० टक्‍क्‍यांपर्यंत भाग इन्व्हिट नियमन आणि सेबीच्या मास्टर सर्क्युलरनुसार स्वेच्छानिर्णयाने अँकर गुंतवणूकदारांना वाटप करू शकतात.

याशिवाय, इन्व्हिट नियमन आणि सेबी इन्व्हिट मास्टर सर्क्युलरनुसार निव्‍वळ इश्यूमधील (धोरणात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा वगळून) किमान २५.०० टक्‍के हिस्सा गैर-संस्‍थात्‍मक गुंतवणूकदारांना प्रमाणबद्ध तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध असेल, पण यासाठी इश्यू प्राइस किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.

अँकर गुंतवणूकदार आणि धोरणात्मक गुंतवणूकदार वगळता, इतर सर्व बोलीदारांना त्यांच्या संबंधित एएसबीए खात्यांचा आणि यूपीआय आयडीचा तपशील देऊन ‘अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट’ (“एएसबीए”) प्रक्रियेचा वापर करणे अनिवार्य आहे (०.५० दशलक्ष रूपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेची बोली लावणाऱ्या वैयक्तिक गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी यूपीआय यंत्रणा लागू असेल). अशा परिस्थितीत संबंधित बोली रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (“एससीएसबी”) किंवा लागू असल्यास यूपीआय यंत्रणेअंतर्गत ब्लॉक केली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना या इश्यूमधील अँकर गुंतवणूकदारांच्या भागात एएसबीए प्रक्रियेच्या माध्यमातून सहभागी होता येणार नाही. अधिक माहितीसाठी पृष्ठ क्रमांक २७१ वरील “इश्यू इन्फॉर्मेशन” विभाग पाहावा.

या ट्रस्टचे प्रायोजक नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आहेत. राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड हे इन्व्हेस्टमेंट मॅनेजर (गुंतवणूक व्यवस्थापक) आहेत आणि आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेड हे ट्रस्टी (विश्वस्त) आहेत.

एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ५ : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ सर्वसमावेशक कायदा तयार करणे आवश्यक असल्याचे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. तसेच कामगारांना आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे तात्काळ मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विधानभवनात ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, साखर आयुक्त संजय कोलते, डॉ. आशिष भारती उपसंचालक कुटुंब कल्याण, पुणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे महाव्यवस्थापक भारत केंद्रे ऑनलाइन उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ऊसतोड कामगारांच्या विविध समस्यांचा सखोल विचार करून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सर्वसमावेशक कायदा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

कामगारांना गमबूट, इलेक्ट्रिक कोयता, ग्लोव्हज, तसेच महिला कामगारांसाठी सॅनिटरी नॅपकिन यांसारख्या आवश्यक साहित्याची उपलब्धता वेळेत व्हावी यासाठी डीबीटीद्वारे आर्थिक मदत देणे अधिक सुलभ ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय ऊसतोड कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कामाच्या ठिकाणी आठवड्यातून एकदा फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला कामगारांसाठी स्त्रीरोग तज्ञाची सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच महिला ऊसतोड कामगारांना प्रसूती रजा व मातृत्व योजनांचा लाभ देण्याबाबत सकारात्मक विचार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पाठपुरावा करावा असेही त्यांनी सांगितले.

विजेच्या कामातील एक चूक तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करते – राजेंद्र पवार

महावितरण मध्ये ‘लाईनमन दिवस’ उत्साहात साजरा

पुणे, दि. ५ मार्च, २०२६: विजेची कामे करताना झालेली एक चूक त्या लाईनमनच्या तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करते. त्याच्यासह अवलंबून असलेले वृद्ध आईवडील व मुलांचे भविष्य अंधकारमय बनते. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी विजेची कामे करताना सुरक्षा साधनांचा वापर करत चुका टाळल्या पाहिजेत असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले.

बुधवारी (दि. ४ मार्च) ४ थ्या राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त खेड शिवापूर येथील नक्षत्र पॅलेस मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, पुणे ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता देविदास बैकर, धनंजय आहेर, संदीप शेंडगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती. लाईनमन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर, तणावमुक्त जीवन व आरोग्य विषयक काळजी कशी घ्यावी याबाबत वीज कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.

पुढे बोलताना संचालक श्री. पवार म्हणाले, ‘पुढील काळ स्पर्धेचा आहे. त्यामुळे आपण आपल्या सेवेत सुधारणा करुन शंभर टक्के वीजबिल वसुलीचे ध्येय प्रत्येकाने गाठावे. वीज कर्मचाऱ्यांना लागणारी सर्व अत्याधुनिक सुरक्षा साधने लवकरच मिळणार आहेत. त्याचा कटाक्षाने वापर करावा आणि आपली कामे सुरक्षितपणे पार पाडावीत. कारण जीव पैशाने विकत घेता येत नाही.’

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे म्हणाले की, ‘ग्राहकांना वीज सेवा देणारा महावितरणचा प्रतिनिधी हा लाईनमनच असतो. तो ग्राहकांशी कसा वागतो त्यावरुन त्या भागात महावितरणची प्रतिमा बनत असते. त्यामुळे ग्राहकांशी चांगले वागा, त्यांच्या समस्या वेळेत सोडवा. यावेळी अधीक्षक अभियंता युवराज जरग व कार्यकारी अभियंता देविदास बैकर यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

उपस्थित लाईनमन यांच्यापैकी सूर्यकांत शिंदे, अमोल शेलार, रुपेश कांबळे, महिला विद्युत सहाय्यक निषाद शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुळशी विभागातील सर्व लाईनमन व लाईन वूमन यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन सहा. अभियंता रसिका कुलकर्णी, प्रास्ताविक अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्नेहलता हंचाटे यांनी केले तर आभार शाखा अभियंता विनायक शिंदे यांनी मानले.

प्रत्येक सोमवारी सुरक्षेची प्रतिज्ञा

वीज कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षेची सवय लागावी. दैनंदिन कामे करताना त्याचे स्मरण व्हावे यासाठी महावितरणने वीज कर्मचाऱ्यांना प्रत्येक आठवड्याची सुरुवात सामुहिक विद्युत सुरक्षेची प्रतिज्ञा घेऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक शाखा अभियंत्याने प्रतिज्ञा घेतल्याचे छायाचित्र महावितरणच्या पोर्टलवर अपलोड करायचे आहे. लाईनमन दिनाची सुरुवातही सुरक्षा प्रतिज्ञेनेच झाली. तर मुळशी विभागांतर्गत २६ शाखा कार्यालयांना महावितरणचे संचालक (मासं) श्री. राजेंद्र पवार यांच्या हस्ते आवश्यक सुरक्षा साधनांचे प्रातिनिधीक वाटप करुन समारोप करण्यात आला.

५ आयएसओ मानांकन

पुणे ग्रामीण मंडलांतर्गत अनुक्रमे पुणे ग्रामीण मंडल, मुळशी विभाग, हडपसर ग्रामीण उपविभाग, येणेरे ३३/११ केव्ही उपकेंद्र व २२/२२ केव्ही कोलते पाटील स्विचिंग स्टेशनला आयएसओ मानांकन मिळाले त्याचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पीएम सूर्यघर योजनेच्या जाचक अटीविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा


ग्राहकहित व पर्यावरणासाठी सौरऊर्जेच्या जाचक अटीच्या निषेधार्थ महावितरणवर भव्य मोर्चा
पुणे —- सातशेचे बिल सत्तर हजार ,सौर ऊर्जेचा महावितरणने केलाय घात | पीएम सूर्यघर योजना आता अंधारात,चालणार नाही ,चालणार नाही महावितरणची हुकुमशाही चालणार नाही अशा घोषणा देत पुण्यातील ग्राहक व सौर ऊर्जा च्या सामाजिक संस्थांनी वाढीव वीजबिल व पीएम सूर्यघर योजनेला महावितरणने लावलेल्या जाचक अटीच्या निषेधार्थ आज महावितरनच्या मुख्य कार्यालावर भव्य मोर्चा काढण्यात आला .
या मोर्चाची सुरुवात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आली तेथून पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,पुणे कॅम्प व परिसरातून मोर्चा रास्ता पेठ येथील महावितरणच्या मुख्यालयावर धडकला.या मोर्चाच्या प्रमुख मागण्या
१) महावितरण च्या नवीन जाचक नियमांचा निषेध
२)सौर ऊर्जा क्षमतेवर निर्बंध आणि PM सुर्यघर योजनेवर परिणाम
३)ग्राहक आणि उद्योगांचे हक्क अबाधित ठेवण्याची मागणी
४) वाढीव व चुकीची बिले अशा अनेक मागण्याचे निवेदन यावेळी महावितरणच्या मुख्य अभियंता यांना देण्यात आले .
आमच्या मागण्या या आठ दिवसात मान्य न झाल्यास मुंबई येथे विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मुकुंद कमलाकर व मनोज पाटील यांच्या वतीने देण्यात आला .

नागरिक, व्यापारी, उद्योग संघटना ,महिला,युवक व पर्यावरण संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .या मोर्चाचे आयोजन पुणे शहर ग्राहक परिषद व ऑल इंडिया रिन्युबल एनर्जी (AIREA)
अखिल भारतीय अक्षय ऊर्जा संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते .

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

‘तारीख पे तारीख’ नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध एल्गार

मुंबई– केंज येथील पंतप्रधान आवास योजनेतील शासकीय अनुदानाच्या सवाचार कोटीच्या घोटाळ्याच्या नमिता मुंदडा यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्या उत्तराने भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगुंटीवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
भारत माता माझी आई, पण इथे डोके ठेवायला जागा नाही
, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात भ्रष्ट अधिकारी आणि संथ न्यायप्रक्रियेवर जोरदार प्रहार केला. केवळ चौकशीच्या नावाखाली भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘गरीबों के सम्मान में, मोदीजी मैदान में’. मात्र, जर सरकारी अधिकारी जनतेच्या पैशांची लूट करत असतील, तर त्यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हायलाच हवी. चौकशी पूर्ण होईपर्यंत किंवा न्यायालयाचा निकाल येईपर्यंत संबंधित दोषी अधिकाऱ्याला पदावरून निलंबित का केले जात नाही? असा रोकडा सवाल त्यांनी विचारला. जोपर्यंत अशी कडक पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये धाक निर्माण होणार नाही. हायकोर्टात 56 लाखांहून अधिक केसेस प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या माध्यमातून निकाल लागायला 50 वर्षे लागतील, अशी जनभावना झाली आहे. त्यामुळे ‘कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण तोपर्यंत संबंधित व्यक्तीला घरी बसवा’, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
तुम्ही किमान एवढे तरी उत्तर द्या की, जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत संबंधित दोषी व्यक्तीला निलंबित केले जाईल का? निकालाला कितीही वेळ लागला तरी चालेल, पण भ्रष्टाचाऱ्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही.