पुणे-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील प्रश्नांची जाणीव आहे. त्यांनी देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास केला असल्याने त्यांना जनतेच्या प्रश्नांची बारकाईने माहिती आहे. जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यांच्या योजना आणि विकासकामांमागील भूमिका होती. त्यामुळे जनहिताचे निर्णय घेताना ते कधी कचरले नाहीत, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
प्रा. विनायक आंबेकर यांनी लिहिलेल्या आणि ‘अग्निपंख प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या ‘नोटसम्राट 2’ या पुस्तकाचे प्रकाशन उपाध्ये यांच्या हस्ते झाले. प्रकाशनानंतर ते बोलत होते. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
उपाध्ये म्हणाले, “दूरदृष्टीने घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वसामान्यांचा विकास झाला. विरोधकांनी मात्र मोदीजींना राजकीय विरोधासाठी विरोध केला. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काळाच्या कसोटीवर सिद्ध होत असून, त्यांनी गेल्या बारा वर्षात घेतलेल्या निर्णयांचे चांगले परिणाम समाज अनुभवत आहे.”
कुलकर्णी म्हणाले, ” विषय तज्ज्ञांनी त्यांच्या विषयातील तांत्रिक माहिती सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिणे आवश्यक आहे. सध्या माहितीचे युद्ध आहे. जे कुठल्याही देशाच्या थेट आक्रमणापेक्षा गंभीर आहे. सध्या डिजिटल माध्यमांमध्ये अधिकाधिक आशयाची निर्मिती पाश्चिमात्य देशांकडून केली जाते. आपल्याकडून मर्यादित प्रमाणात आशय निर्मिती होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात डिजिटल माध्यमांमध्ये अधिकाधिक आशय वेगाने निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
आंबेकर म्हणाले, “भारतात 1996 पर्यंत बनावट नोटांची समस्या नव्हती. त्यानंतरच्या वर्षात प्रथमच भारताच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या आणी त्यावेळ पासुन भारतात बनावट नोटांचा प्रश्न सुरु झाला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापुन भारतात पाठवायला सुरुवात केली. 2004 ते 2014 या काळात देशांतर्गत झालेल्या 500 अतिरेकी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे हे पैसे वापरले गेले. त्यामुळे पंतप्रधान मोदींना स्वेच्छेने नव्हे, तर अनिवार्यता म्हणून नोटबंदी करावी लागली. या पुस्तकात ही सर्व माहिती रंजक पद्धतीने कथानकाच्या स्वरूपात मांडण्यात आली आहे.”
प्रकाशक अविनाश नाईक यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

