Home Blog Page 574

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या झाल्या 64 सभा

मुंबई, 18 नोव्हेंबर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या, म्हणजे सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. आज वर्धा जिल्ह्यात आर्वीत शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली.

हा प्रवास त्यांनी 25 पेक्षा अधिक जिल्ह्यात केला असून, उर्वरित जिल्ह्यांत व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिनिधीत्त्व केले. या सभांमध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांसाठीच्या योजनांवर त्यांनी भर दिला. शेतकर्‍यांना मोफत वीज, दिवसा वीज, सौरकृषीपंप, एक रुपयांत पीकविमा, यासह सरकार येताच शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यात येईल, किसान सन्मान निधी 12 हजाराचा 15 हजार करणार, एमएसपीवर भावांतर योजना लागू करुन सोयाबीनला 6000 भाव देणार, खतांवरील राज्य जीएसटीचा परतावा असे अनेक मुद्दे मांडले.

लाडकी बहिण, लेक लाडकी, अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, 3 मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लखपती दिदी या महिलांसाठीच्या योजना त्यांनी भाषणातून मांडल्या. लाडक्या बहिणींना आता 1500 वरुन 2100 रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच स्थानिक सिंचनाचे प्रकल्प, उद्योग, रोजगार इत्यादींबाबत त्या त्या मतदारसंघात सरकारने काय काम केले, अशा बहुतेक स्थानिक मुद्यांवर त्यांनी भर दिला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतल्या एकूण ७२ जाहीर सभा आणि रोड शो

मुंबई, 18 नोव्हेंबर

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अवघ्या १३ दिवसांत महाराष्ट्रभर महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ एकूण ७२ जाहीर सभा आणि रोड शो केले, ज्यात १८ नोव्हेंबर २०२४ च्या शेवटच्या दिवशी चार जाहीर सभांचा समावेश आहे. निवडणूक प्रचार.

गेल्या दोन आठवड्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र श्री गडकरीजींच्या जाहीर सभांना आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचा पूर अनुभवत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून त्यांनी 4 ते 18 नोव्हेंबर 2024 या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दिवसभरात प्रचार केला आणि भाजप-महायुतीच्या उमेदवारांना बळकटी दिली बैठका.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यभर प्रचाराचा झंझावात मतदारसंघासह राज्यात ८६ सभा

पुणे:

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण ९९ ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. अवघ्या १३ दिवसांच्या प्रचारात कामठी मतदारसंघासह राज्यात त्यांनी धुव्वाधार प्रचार केला. प्रचाराच्या रणधुमाळीत एका दिवशी सरासरी ते ८ सभांना संबोधित केले. कामठी येथे नितीन गडकरी यांच्यासह त्यांनी अखेरची जाहीर सभा घेत प्रचाराची सांगता केली.

श्री बावनकुळे यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान नाशिक येथे मोदीजींच्या सभेत उपस्थिती लावली. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव तसेच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह जाहीर सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी महायुती सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचविली. लाडकी बहिण योजनेचा लाभ वाढवून २१००, अन्नपूर्णा योजनेतून ३ सिलिंडर मोफत, लेक लाडकी, मुलींना मोफत शिक्षण, अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, वीज बिलमाफी, किसान सन्मान निधी 12 हजाराचा 15 हजार करणार, एमएसपीवर भावांतर योजना लागू करुन सोयाबीनला 6000 भाव देणार यासह अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. उद्योग, रोजगार इत्यादींबाबत त्या त्या मतदारसंघात सरकारने काय काम केले, अशा बहुतेक स्थानिक मुद्यांवर त्यांनी भर दिला.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा झंझावती प्रचार दौरा

  1. जाहीर सभा – २७
  2. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्यासोबत सभा – १
  3. गाव भेटी – ११०
  4. कामठी – मौदा मतदारसंघात – ५८ सभा
  5. बाईक रॅली – १३

महाविकास आघाडीने अडीच वर्षात नऊ लाख कोटींचे प्रकल्प रोखले-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना ४५ हजार कोटी दिले, सोयाबीन-कापूस उत्पादकांचा प्रश्न सोडवला

धारावीकरांना २ लाख घरे देणार

मुंबई-महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात राज्यातील ८ लाख ८९ हजार १०५ कोटींच्या कामांमध्ये स्पीडब्रेकर घातला होता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, बारसू रिफायनरी, वाढवण बंदर, धारावी पुनर्विकास, गारगाई धरण, मुंबई सेट्रल पब्लिक पार्क अशा प्रकल्पांना स्थगिती दिली, यामुळे जवळपास १४ लाख रोजगार बुडाले आणि दिरंगाईमुळे प्रकल्प खर्चात १५ हजार २०० कोटींची वाढ झाली असा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर साधला. विधानसभा निवडणूक प्रचार सांगतेपूर्वी बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यभरात निवडणुकीच्या निमित्ताने ७५ प्रचार सभा घेतल्या, या सभांना जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मागील २ वर्षात जे काम केलं त्याचं समाधान मिळाल्याची भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. जनता सरकारच्या कामावर खूश आहे. त्यामुळे महायुती बहुमताने निवडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की अडीच वर्षात महाविकास आघाडीने स्थगिती दिलेले मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो ३, मेट्रो कारशेड, जलयुक्त शिवार योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड, समृद्धी महामार्ग असे प्रकल्प आमच्या सरकारने सुरु केले आणि विक्रमीवेळेत पूर्ण केले. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण केले. त्यांनी यापूर्वी १५ वर्षात खड्डे बुजवण्यासाठी ३५०० कोटींचा भ्रष्टाचार केला. कोविड सेंटर, बॉडीबॅग, खिचडी यामधून पैसे खाल्ले अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, गांधी यांनी आज महाराष्ट्र लुटायला दिल्लीतून तिजोरी आणली होती. धारावीबाबत योग्य माहिती घेतली असती तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. ते म्हणाले की धारावीची जमीन अदानीला नाही तर डीआरपीला दिली आहे. उबाठा मुख्यमंत्री असताना केवळ पात्र ६० हजार लोकांना घरे देणार होते. आम्ही सर्वच्या सर्व २ लाख धारावीकरांना घर देणार आहोत. ‘मविआ’ने धारावीचे आधीचे टेंडर कोणासाठी आणि का रद्द केले. सत्तेत असताना अदानींशी बैठका झाल्या आणि सत्ता गेल्यावर विरोध का, कुठे तुमचं फिस्कटलं. धारावीतील नागरिक बिकट अवस्थेत जगतात, त्यांना हक्काचे घर मिळणार असेल तर तुमच्या पोटात का दुखते, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. सरकारने डीआरपीच्या बाजूने निर्णय घेतला. रेडीरेकनरनुसार टीडीआरवर मर्यादा घातली, असे ते म्हणाले. धारावी प्रकल्प हा जागतिक दर्जाचा असून त्याला विशेष दर्जा दिला आहे. २ लाख नागरिकांना २ लाख कोटींची घरे सरकार देणार आहे. ‘मिळाले नाही मनी म्हणून सोडले अदानी’ अशा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला.

ते पुढे म्हणाले की, मविआने केवळ ४ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली होती तर महायुतीने १२४ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली. नापीक जमीनींवर सौर उर्जा निर्मितीसाठी हेक्टरी १.२५ लाख रुपये अनुदान सरकार देत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार मिळून सोडवला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यात बंदी उठवली. केंद्र सरकारने आवश्यक तितकी सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात सोयाबीनची ४८९२ रुपये दराने खरेदी होणार आहे. यात १५ टक्के मॉईश्चर असले तरीही आणि अगदी किलोभर जरी असले तरी शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी केले जाईल, असे ते म्हणाले. सोयाबीन पेंडीच्या निर्यातीसाठी आवश्यक किंमतींमधील तफावत अनुदानातून भरुन काढणार आहोत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मध्यम धागा कापूस ७१२१ रुपये आणि लांब धागा कापूस ७५२१ रुपये दराने खरेदी करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीटमुळे १५००० कोटींची मदत केली. एनडीआरएफचे नियम बदलले. २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टरची मर्यादा केली. सततच्या पावासामुळे होणारी नुकसान भरपाई, गोगलगायमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मागेल त्याला सोलार, शेततळे देण्याचे धोरण राबवले. शेतकऱ्यांना जोडधंद्यांसाठी १२००० रुपयांऐवजी १५००० रुपयांचे अर्थसहाय्य केले. एक रुपयांत पिका विमा दिला. मागील सव्वा दोन वर्षांत महायुती सरकारने शेतकऱ्यांवर विविध योजनांमधून ४५००० कोटी रुपये खर्च केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सुषमा अंधारे यांची फडणवीस यांच्यावर जहरी टीका

पुणे: लाडकी बहीण नावाने सध्या टेलिव्हिजनवर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असून नागरिकांची गोंधळलेली अवस्था झाली आहे. भावाने केलेल्या मदतीची कधीही जाहिरात केली जात नाही. स्वतःच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकून पैसे दिल्यासारखी जाहिरात सुरु आहे.गोरगरिबांचे शोषण करून विविध माध्यमातून जमा केलेला कर हा आपलाच पैसा आहे. लाडकी बहिणी योजनेतून थोडासा तो परत येत आहे. राज्यात महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा अनेक समस्या आहेत. तीन वर्षाची मुलगी असो की 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही. बलात्कारांच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. भाजपशी संबंधित कुठल्याही घटनेत गुन्हा दाखल होत नाही. रात्री – अपरात्री घडणाऱ्या गुन्हेगारी घटना दिवसाढवळ्या समाज माध्यमांसमोर आणि पोलीस स्टेशन मध्ये घडत आहेत. कोयता गँग चा हैदोस, पोलिस सुरक्षित नाहीत. तर ते आपल काय रक्षण करणार ? असे आरोप करत विविध मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी जहरी टीका केली.

महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची विजय प्रारंभ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुषमा अंधारे,मोहन जोशी , अंकुश काकडे,बाळासाहेब ओसवाल,अशोक हरणावळ,स्वाती पोकळे,भगवानराव साळुंखे,किशोर कांबळे,राजाभाऊ कांबळे,राहुल तुपेरे,शैलेद्र नलावडे, शशिंकात तापकीर,सुरज लोखंडे,अमोल रासकर,सचिन देडे,संतोष पाटोले,रमेश सोनकांबळे,गणेश मोहिते,सचिन जोगदंड,तुषार नांदे,ऋषिकेश भुजबळ,निलेश पवार,लखन वाघमारे,समीर पवार,सौरभ माने,रोहित माळी ,अमोल ननावरे,संजय दामोदरे,अमोल परदेशी,सद्दाम शेख,निलेश खंडाळे,स्वप्निल खडके,पिरदिप शिवशरण,पुष्कर अबनवे,बाळासाहेब अटल,भरत सुराणा,विजय हिंगे,सचिन पासळकर,अनिल सातपुते,रवी ननावरे ,विद्या ताकवले, रुपाली बिबवे मृनाली वाणी आदी महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या,”भाजपाचे नेते महिला संदर्भात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ भाषा वापरतात. अडीच वर्षात 70 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा झाल्या, त्यामध्ये 65 परीक्षेत पेपर फुटी झाली. हे पेपर फोडणारे कोण ? सरकारी जागा भरण्याची भरती प्रक्रिया खाजगी ठेकेदारांना देण्यात आली हे सर्व ठेकेदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित आहेत. भाजप आदानी – अंबानी संबंध आहे, मग गरिबांसाठी कोण आहे ?
माधुरी मिसाळ या भाजपच्या प्यादा आहेत. मी त्यांच्यावर शब्दही बोलणार नाही कारण माझे टार्गेट वजीर आहे आणि त्याचे नाव देवेंद्र फडणवीस आहे. आया – बहिणींची अब्रू सुरक्षित ठेवण्यासाठी, बेरोजगार हातांना काम देण्यासाठी, महागाईचा दर कमी करण्यासाठी, गुंडशाही दडपशाही चा बंदोबस्त करण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी अश्विनी कदम यांना विजयी करण्याचे आवाहन अंधारे यांनी केले.यावेळीमहाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांनी मागील पंधरा वर्षातील आपल्या कामाचा आढावा मतदारांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल खडके यांनी केले.
दलित स्वयंसेवक संघ या संघटनेच्या पाठिंबामुळे रमेश बागवे यांना मंत्रीपद मिळाले होते. याच दलित स्वयंसेवक संघ ने आज महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला. यावेळी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या नातू सचिन साठे,प्रशांत शिरसागर, श्रीकांत मेमाणे,नरेश बागुल, पराग थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभाग सज्ज

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 शांततेत आणि पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहाय्यक अधिकारी किरण सुरवसे, सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील कार्य तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. या प्रक्रियेत नोडल अधिकारी रोहिदास जाधव, दीपक चव्हाण, सहाय्यक अधिकारी पल्लवी जोशी, शशिकांत कांबळे, शदरक करसुलकर, रवींद्र शिंदे, सागर शेवाळे,सचिन माने, अतुल भोसले, लीलाधर बावसकर, पद्मिनी मोरे, शिवाजी देशमुख अंकुश गुरव आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण कार्य:
निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभागाचे मुख्य काम म्हणजे निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतदान यंत्रे, मतपत्रिका, मतदार याद्या, शिक्के, शाई, सील, लेखन सामग्री आणि इतर आवश्यक वस्तूंची उपलब्धता वेळेत सुनिश्चित करणे होय. प्रत्येक मतदान केंद्रावर पाठवण्यासाठी या वस्तूंच्या वितरणाचे सुयोग्य नियोजन केले गेले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी विभागाने चोख तयारी केली आहे.
साहित्य वितरणाची प्रक्रिया:
मतदान साहित्याचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करण्यात आले असून, मतदान केंद्रावर साहित्य पोहोचवण्यापासून ते निवडणूक संपल्यानंतर परत आणण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी कामकाजावर सतत लक्ष ठेवले आहे.
तांत्रिक अडचणींसाठी उपाययोजना:
मतदान प्रक्रियेदरम्यान कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभागाने यंत्रणेची पूर्वतपासणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर उपाय काढण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी सतर्क आहेत.

महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे यांनी केली प्रचाराची सांगता

वडगाव शेरी :

महाविकास आघाडीचे वडगाव शेरी मतदार संघातील अधिकृत उमेदवार यांनी प्रचाराची सांगता करताना विजया बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या निवडणूक चिन्हावरच जास्तीत जास्त शिक्का पडणार असून माझा विजय पक्का आहे,आमचे दैवत शरद पवार महाविकास आघाडीचा प्रचार आणि मी राबवलेली नियोजनबद्ध प्रचार मोहीम याला यश मिळाले असल्याचे प्रतिपादन बापूसाहेब पठारे यांनी प्रचाराची सांगता करताना सांगितले.

निष्क्रिय आणि बदनाम उमेदवाराविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि आम्हाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला.सोबतीला स्थानिक प्रश्न देखील आम्ही जोरात उपस्थित केले. मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती, तळागाळात केलेल्या पदयात्रा आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे माझा विजय निश्चित झाला आहे,असेही त्यांनी सांगितले.

मतदार संघाबाहेरचे कोणतेही भावनिक प्रश्न आणि द्वेष निर्माण करणाऱ्या मोहिमा या विधानसभा मतदारसंघात चालल्या नाहीत,कारण हा विधानसभा मतदारसंघ मिनी इंडिया आहे आणि त्यांना सुरक्षित आणि प्रगतिशील कारभार देण्याचा निर्धार आम्ही केला आहे,असे त्यांनी आवर्जून सांगीतले. सर्वांचे आभार त्यांनी मानले आणि निकोप लोकशाही, संविधान प्रणित विकासाचा कारभार यासाठी सुजाण मतदार म्हणून मतदान करण्याचे आवाहन केले

वडगावशेरीचा चेहरा – मोहरा बदलण्याचा आमदार सुनील टिंगरें यांचा संकल्प

जाहीरनाम्यात टँकरमुक्ती, सिग्नलमुक्ती, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण विकासाची ग्वाही

पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे महायुतीचे वडगाव शेरी मतदारसंघातील उमेदवार सुनील टिंगरे यांनी आपल्या जाहीरनाम्यातून वडगावशेरीचा चेहरा – मोहरा बदलण्याचा संकल्प केला आहे. त्यामध्ये टँकरमुक्त मतदारसंघ, मेट्रोचे विस्तृत जाळे, सिग्नलमुक्त नगर रस्ता, महिला सक्षमीकरण, पब – बारवर बंदी, युवक कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा संकल्प करण्यात आला असून वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही जाहीरनाम्याद्वारे आमदार टिंगरे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप मतदार संघात कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागात प्रचारफेरीच्या माध्यमातून केला. या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आमदार टिंगरे यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यात मतदार संघातील अनेक महत्वाच्या प्रश्नांना हात घालण्यात आला असून सर्व घटकांसाठी विविध प्रकल्प आणि योजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवरायांचे विचार जनमाणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसृष्टी पार्क, नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी मार्ग पूर्णपणे हटवून, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल उभारणी व मेट्रोचे विस्तारित जाळे याद्वारे नगर रस्ता सिग्नल मुक्त करणे, खराडी आयटी पार्कमध्ये ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवर उद्यानाची निर्मिती, खराडी, लोहगावसारख्या भागांना टँकरमुक्त करणे, मतदार संघातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय योजना, वैद्यकीय मदत केंद्र, मैदानांची उभारणी, विश्रांतवाडी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे, माजी सैनिकांसाठी सांस्कृतिक भवन, कोकण भवन, धानोरी येथे भारताच्या विविधतेचे दर्शन घडविणारे मिनी इंडिया पार्क उभारणी, झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, डिजिटल शाळा, ग्रंथालय, युवकांसाठी जीम, नाट्यगृह, वन उद्यान, ॲडव्हेंचर पार्क, स्वच्छतागृह, हॉकर्स प्लाझा, अशा विविध योजना राबविण्याचा संकल्प टिंगरे यांनी आपल्या जाहीरनाम्यातून केला आहे.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना टिंगरे म्हणाले, आपल्या आमदारकीच्या पहिल्या कार्यकाळात कोरोनामध्ये दोन वर्ष वाया गेली होती. त्यानंतर काही काळ विरोधातही बसावे लागले होते. तरीही महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ अडीच वर्षांमध्ये १५१० कोटींचा निधी मतदार संघामध्ये आणण्यात यश आले. लोहगाव येथील शंभर खाटांचे रुग्णालय पूर्ण झाले असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. लोहगाव पाणीपुरवठा योजना, नगर रस्त्यावरील व विश्रांतवाडी येथील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल यासारखी आणखी बरीच कामे येत्या काळात पूर्ण होत आहेत, असे टिंगरे यांनी सांगितले. अनेक प्रकल्पाची कामे सुरू आहेत, काही कामे सुरु होत आहेत. हे सर्व प्रकल्प पुढील पाच वर्षात पूर्ण करून वडगाव शेरी मतदार संघातील नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे पुढील कार्यकाळात वडगावशेरी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प नक्कीच पूर्ण होणार आहे, असा विश्वास महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला.

शहरात महाविकास आघाडी आठही जागा जिंकणार महाविकास आघाडीतील नेत्यांचा विश्वास

पुणे : पुणे शहरातील नागरिक भाजप आणि महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळले आहेत. भाजपमुळे तीन वर्षे महापालिकेची निवडणूक झालेली नाही. भाजपने पक्ष फोडल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष असून
शहरात महाविकास आघाडी आठही जागा जिंकणार आहे, असा विश्वास महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

काँग्रेस भवन येथे सोमवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यावेळी उपस्थित होते. काँग्रेस भवन येथे दररोज पत्रकार परिषदांचे आयोजन तसेच प्रचाराचे नियोजन केल्याबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद यांचा अंकुश काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिंदे, काकडे आणि मोरे यांनी प्रचाराचा आढावा घेऊन महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, शहरात भाजपचे आमदार , मंत्री असतानाही भाजपच्या उमेदवारांना प्रचारासाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांवर अवलंबून राहावे लागले. महायुती सरकारची एकही योजना पूर्ण झालेली नाही. बटेंगे तो कटेंगे , असे मुद्दे पुण्यात चालले नाहीत. भाजपचा एकही नेता महागाई, बेरोजगारविषयी बोलला नाही. भाजपकडे विकासाचा मुद्दा नव्हता. भाजपने प्रचाराची पातळी सोडली. आम्ही प्रचाराची पातळी सोडली नाही.

काकडे म्हणाले, हडपसर आणि वडगाव शेरीमधील महायुतीच्या उमेदवाराला गद्दारीचे फळ मिळेल. महायुती सरकारने महाविकास आघाडीच्या प्रचारावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हेलिकॉफ्टर उड्डाणाला अनेकवेळा परवानगी नाकारली. यामुळे अनेक ठिकाणच्या सभा रद्द झाल्या. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने सरकारी यंत्रणेचा मोठा गैरवापर केला. भाजपने दोन पक्ष फोडले हे लोक विसरलेले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. फडणवीस यांना ही भाषा शोभत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्याबद्दल काय बोलतो याचे भान बाळगणे गरजेचे होते. भाजप आणि महायुतीच्या या घाणेरड्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. शहरातील आठ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील. राज्यात जास्तीत जास्त जागा मिळवून महाविकास आघाडीचे सरकार येईल.

मोरे म्हणाले, महायुतीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी सतत आचारसंहितेचा भंग केला. त्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तरी कारवाई झाली नाही. आमच्याकडून थोडी कुठे चूक झाली की
लगेच कारवाई करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हेलिकॉफ्टर उड्डाणाला अनेकवेळा परवानगी नाकारली. यामुळे अनेक ठिकाणच्या सभा रद्द झाल्या. पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही विरोधी बाकांवर होतो. काँग्रेसने शिवसेनेला कधीही अशी वागणूक दिली नाही, असे ते म्हणाले.


‘निष्ठा काय असते हे वडिलांकडून शिकायला हवे होते’ :चेतन तुपेंना टोला;

शरद पवारांकडून प्रशांत जगताप यांच्या निष्ठेचे कौतुक 

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हडपसर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांची ‘फुटीर’ अशी संभावना करत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या निष्ठेचे कौतुक केले आहे. मतदानाचा दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना पवार यांनी तुपे यांना स्व. विठ्ठलराव तुपे यांच्या निष्ठेची जाणीव करून दिली आहे.

पवार यांनी सोमवारी एक्स या समाजमाध्यमावर हडपसर मतदारसंघातील घडामोडींवर भाष्य करीत एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, “प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष सोडला नाही. चेतन तुपेंनी मात्र फुटिरांना साथ दिली. वडील विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते?’ हे त्यांनी शिकायला हवे होते.”

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष यांच्यात ‘निष्ठा विरूद्ध गद्दारी’ असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांच्या गटाची गद्दार म्हणून होत असलेली संभावना एकीकडे या गटाच्या उमेदवारांना घायाळ करत असल्याचे आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांबाबत सहानुभूती निर्माण करत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी सोमवारी प्रशांत जगताप यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक करीत पाठ थोपटणारे ट्विट केले आहे. तसेच, व्हिडिओच्या माध्यमातून प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही केले आहे. 

‘हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला मतदान करण्यासाठी तुम्हा सर्व सहकाऱ्यांची तयारी झाली असेल. या मतदारसंघात निष्ठेची प्रतिष्ठा ठेवायची असेल, तर महाविकास आघाडीच्या वतीने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर प्रशांत जगताप यांना आम्ही सर्वांनी उमेदवारी दिली आहे. पक्षामध्ये राहून जे काम करतात, त्या निष्ठावंतांचा सन्मान होईल. निष्ठा बाजारात विकतात, असा ज्यांचा समज असेल, तर त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीने धडा शिकवल्यासारखे होईल. त्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये प्रशांत जगताप यांना मोठ्या मतांनी विजयी करा,’ असे आवाहन पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीस ४५ जागा मिळतील – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे –
पश्चिम महाराष्ट्रात युतीचे ४२ आमदार असून आघाडीचे १६ आमदार आहे.पश्चिम महाराष्ट्रात ४५ जागा आम्ही यंदा निवडून आणू. लोकसभा निवडणुकीत आमच्या दहा जागा कमी झाल्या पण विरोधक यांचे फेक नरेटिव्ह संभ्रम दूर करू शकलो. पश्चिम महाराष्ट्रात भाजप २६ जागा, शिवसेना १२, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १९ जागा आणि जनसुराज्य पक्ष दोन जागा लढत आहे. आम्ही जे काम करणार आहे आणि केलेले काम जनते समोर ठेवले आहे. जनता सुज्ञ असून त्यांना काम करणारे कोण आहे हे बरोबर माहिती आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर , उमेश चौधरी, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, प्रशांत कोतवाल उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, राज्यातील प्रचारास आज विश्रांती मिळत असून २० नोव्हेंबर रोजी जनता कोणाला कौल देईल उत्सुकता सर्वांना आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण ५८ मतदारसंघ आहे. शहर आणि ग्रामीण भागात महायुती उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहे. अनेक नेत्यांच्या सभा झाल्या आहे. मागील निवडणुकीत युतीला स्पष्ट जनादेश जनतेने दिला पण उध्दव ठाकरे यांनी आघाडी सोबत जात त्यांनी जनतेचा निकालाचा अनादर करत सत्ता स्थापन केली. ठाकरे यांनी गद्दरी करत लोकशाहीचा अपमान केला. पण अडीच वर्षात जनतेच्या मनात नियतीने जे होते तेच झाले. आघाडीच्या काळात कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प स्थगिती दिली गेली. पण युतीच्या काळात विकासाला गती मिळाली आणि विविध पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. सर्वाधिक परकीय गुंतवणूक देखील आली. आघाडीचे सरकार आणि युतीचे सरकार यातील बदल लोकांसमोर आहे. जनता पुन्हा महायुतीवर विश्वास ठेवेल अशी अपेक्षा आहे. महायुती आगामी काळात देखील एकत्रित काम करेल. लोकसभा निवडणुकीत मनसे यांनी आम्हाला साथ दिली असून त्याची जाणीव आम्हाला नेहमी राहील. त्यांचा स्वतंत्र पक्ष असून ते देखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आहे.

छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात ऐतिहासिक विजयाचा शिरोळे यांना विश्वास

पुणे, दि. १८ नोव्हेंबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे, ठिकठीकाणी नागरिकांचा मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद, राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेची सकारात्मकता आणि महायुतीमधील तीनही प्रमुख नेत्यांनी राज्यातील जनतेचा संपादन केलेला विश्वास यांच्या जोरावर निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वास छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला. आज राज्यभरात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होत असताना आयोजित पत्रकार परिषदेत शिरोळे बोलत होते. मतदार संघाचे प्रचारप्रमुख दत्ता खाडे, भाजपा शहर अध्यक्ष गणेश बगाडे आणि शहर सरचिटणीस रवींद्र साळेगांवकर यावेळी उपस्थित होते.

प्रचारा दरम्यान जसे जसे दिवस संपत जात होते तसतसा मतदार संघातील नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या देहबोलीमधून त्यांची महायुतीला विजयी करून देण्याची धारण जाणवत होती. नागरिकांच्या या प्रतिसादाने मी भारावून गेलो असे सांगत सिद्धार्थ शिरोळे पुढे म्हणाले, “शिवाजीनगर मतदार संघात महायुतीसाठी पोषक वातावरण असून लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही ज्या उर्जेने काम करीत आहेत त्याचे प्रतिबिंब आम्ही स्थानिक पातळीवर पाहू शकतोय. या तिघांचाही संपर्क, दूरदृष्टी आणि प्रशासनावर असलेली पकड नागरिक पाहत आहेत. त्यांनी योग्य वेळी आणलेल्या योजना आणि त्या राबविण्याची केलेली व्यवस्था यामुळे महायुती सरकारचे वेगळेपण त्यांच्या कामातून जनतेला दिसत आहे. पुण्यातील आठही महायुतीच्या जागा निवडून येतीलच शिवाय राज्यातही आम्ही बहुमताचे सरकार स्थापन करू.”

मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात मी केलेली विकासकामे मतदार संघातील नागरिकांना माहिती आहेत. या काळात अनेक मोठे विकासात्मक प्रकल्प मार्गी लागले आहेत. मेट्रोची तीस पैकी दहा स्थानके ही शिवाजीनगर मतदारसंघात आहेत. याच जोडीला आता शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे कामदेखील विक्रमी वेळेत पूर्ण होताना दिसत आहे. या मेट्रो मार्गामुळे शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना मेट्रोची आणखी तीस स्थानके उपलब्ध होणार आहेत. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, येत्या जानेवारीत ते पूर्ण होईल. याबरोबरच जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. सोबतच खडकी व रेंज हिल्स येथील अंडर ब्रिजच्या विस्तारीकरणाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या एकत्रीकरणाचे काम सुरू असून त्यालाही लवकरच गती येईल, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.

माझ्या आमदार विकास निधीतील मोठा वाटा हा सेवा वस्त्यांसाठीच्या विकासकामांसाठी खर्च केला असून या भागात मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यावर मी यानंतरही भर देणार आहे. पुढील २ ते तीन वर्षांत शिवाजीनगर मतदार संघाचा कायापायाल करू असेही शिरोळे यांनी नमूद केले. मागील लोकसभा निवडणुकीत कमी टक्के मतदान झाल्याची आकडा आता नागरिक स्वत:च भरून काढतील. यावेळी मतदानाचा टक्का वाढून ५१ टक्के मते मला मिळतील असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे समाधान शिरोळे यांनी व्यक्त केले.

जागतिक दर्जाचे हॉर्टीकल्चरचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी

आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती प्रदर्शनाचे आयोजन

(२१ ते २४  नोव्हेंबर रोजी नवीन कृषी  महाविद्यालय मैदान (सिंचनगर) येथे पार पडणार)

  पुणे-  वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी  व  महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन यांच्यावतीने भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानवरती प्रदर्शनाचे आयोजन २१ ते २४ नोव्हेंबर रोजी नवीन कृषी महाविद्यालय मैदान (सिंचगर) येथे पार पडणार आहे. याचे उद्घाटन २१ नोव्हेबर रोजी सकाळी ११.०० वा. सीमा सुरक्षा दलाचे उपायुक्त राजा बाबू सिंग, यांच्या शुभहस्ते पार पडणार असून यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक विजय बोत्रे, पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी, निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप हे असणार आहेत.

सदरील हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी होणार असून या वेळी हॉर्टिकल्चर तज्ञ हे शेतकरी आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने,  महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, नेहा त्यागी असे मान्यवर उपस्थित होते. सदरील प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार असून सकाळी १० ते ७ पर्यंत पुणेकरांना पाहता येणार आहे. तरी जास्तीतजास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

रमेश बागवेंना विजयी करण्याचेतेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे आवाहन

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाच्या विकासासाठी काहीही केले नाही. महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश बागवे यांनी या मतदारसंघाचा मोठा विकास केला. तसेच आता निवडून आल्यानंतरही ते करतील. त्यामुळे त्यांना विजयी करा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज केले. रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण अशांनी पक्षाशी गद्दारी केली. अशा गद्दारांना धडा शिकवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वीरांच्या महाराष्ट्राला ते बदनाम करत आहेत. ते निवडून आले तर गुजरातचे गुलाम बनतील. मोदी आणि अदानी महाराष्ट्र आणि मुंबईला लुटण्याचे काम करत आहेत. म्हणूनच या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे असून, त्यासाठी निवडून देण्यासाठी रमेश बागवे यांना विजयी करा. त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, युवक, महिला तसेच मागासवर्गाला न्याय मिळेल. या निवडणुकीत महाविकास आघाडी निश्चित विजयी होणार असून, रमेोशळ बागवे यांच्या विजयानंतर जल्लोष व्यक्त करण्यासाठी मी पुन्हा येथे येईन, असे ते म्हणाले.

या रॅलीच्या प्रारंभी घोरपडी येथील श्री बालाजी मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तेथून रॅली निघाली. बी. टी. कवडे रोड, संविधान चौक, पूलगेट, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, काशेवाडी, जुना मोठा स्टँड, निशाद टॉकीज, भीमपुरा, शिवाजी मार्केट, डॉ. आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन, पंचशील चौक, जीपीओ, अपोलो टॉकीजमार्गे मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी चौक येथे रॅलीचा समारोप झाला.
या रॅलीत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे झेंडे घेऊन तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. मार्गावर दुतर्फा नागरिक नागरिकांना गर्दी केली होती. नागरिकांनी हात उंचावून रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. ‘रमेशदादा झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाऴासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी चौक येथे जाहीर सभा झाली. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारे व विकासाची दृष्टी असणारे रमेश बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे प्रारंभीच आवाहन करून सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या, आजपर्यंत ‘ईडी’ हा शब्द जनतेला माहीत नव्हता. देवेंद्र फडणवीस व मंडळींनी कट-कारस्थाने करून शिवसेना व राष्ट्वादी पक्ष फोडले. त्यांची चिन्हे पळवली. महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार सुरू असून, पोलीस दलात त्यांचा मोठा हस्तक्षेप आहे. त्यामुळे पोलिसांचा आता धाक उरला नाही, असे सांगून ‘देवेंद्रबाबा आणि चाळीस गद्दार’ असा सिने्मा मी कढणार असल्याचे त्या म्हाणाल्या.
मी सपंर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरले असून, जनतेत मोठा असंतोष आहे, असे सागंून त्या म्हणाल्या की, त्यांच्या राजवटीत तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार होतो, ६० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार होतो. मात्र महायुतीचे सरकार त्वरित गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतो, याची चीड आता जनतेत निर्माण झाली आहे. आता सरकारी नोकऱ्या ठेकेदारांकडून भरल्या जात असून, ही पद्धत तातडीने बंद करून महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर सरकार थेट नोकरभरती करेल, असे टाळ्यांच्या गजरात त्यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र हा अठरापगड जाती, बारा बलुतेदार आणि सर्व जाती-धर्मीयांचा आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस मात्र जाती-धर्मात भांडणे लावून विद्वेशाचे राजकरण करत आहेत. त्यांना अद्दल शिकवण्याची नामी संधी या निवडणुकीत आहे, असे सांगून सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारे आणि विकासाची दृष्टी आणि अनुभव असणारे रमेश बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सतार, सरोद आणि व्हायोलिन वादन ऐकण्याची संधी

पुणे : ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे शनिवारी ‌‘त्रिवेणी‌’ या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले असून यात सतार, सरोद आणि व्हायोलिन वादनातून रसिकांना भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट नं. 17, वेद भवन मागे, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. ‌‘त्रिवेणी‌’ या विशेष सांगीतिक मैफलीची सुरुवात नेहा महाजन यांच्या सतार वादनाने होणार असून त्यांना अनिरुद्ध शंकर तबला साथ करणार आहेत. त्यानंतर अनुपम जोशी यांचे सरोद होणार असून त्यांना महेशराज साळुंखे तबला साथ करणार आहेत. ‌‘त्रिवेणी‌’ मैफलीचा समरोप पंडित मिलिंद रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होणार असून त्यांना पंडित विश्वनाथ शिरोडकर यांची तबलासाथ असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या समन्वयक रश्मी वाठारे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

कलाकारांविषयी…
नेहा महाजन यांचे सतार वादनातील प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील आणि बीनकर घराण्याचे प्रवर्तक विदुर महाजन यांच्याकडे झाले. मैहर घराण्याची वादन परंपरा समजून घेत नेहा यांनी शास्वती साहा यांच्याकडून मार्गदर्शन घेतले असून सेनिया घराण्याच्या रवी गाडगीळ यांच्याकडूनही त्यांना वादनाचे धडे मिळाले आहेत. मैहर घराण्याचे सतार वादक उस्ताद जुनैद खान यांनी नेहा यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे.

अनुपम जोशी हे सरोद वादनाचे सखोल अभ्यासक असून युवा पिढीतील सरोद वादकांमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सुरुवातीस प्रसिद्ध सतार वादक पंडित सुधीर फडके यांच्याकडे त्यांनी सरोद वादनाचे धडे गिरवले तेथे त्यांना गुरूमा अन्नपूर्णादेवी यांच्या दुर्मिळ रचना समजून घेता आल्या. पंडित तेजेंद्र नारायण मजुमदार, पंडित राजीव तारानाथ तसेच उस्ताद अली अकबर खान यांचे ज्येष्ठ शिष्य झुकरमन यांचेही मार्गदर्शन अनुपम यांना लाभले. अनुपम जोशी यांनी अनुमोहिनी वीणा हे रुद्र वीणेच्या जवळ जाणारे वाद्य निर्मित केले असून याची मूळ संकल्पना राधिका मोहन मोईत्रा यांची आहे.

स्वरप्रज्ञा पंडित मिलिंद रायकर हे आजच्या पिढीतील प्रसिद्ध व्हायोलिन वादक आहेत. रायकर यांना पद्मश्री पंडित डी. के. दातार तसेच पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. यातूनच रायकर यांनी मधुर, सुरेल आणि भावपूर्ण अशी गायकी अंगाने व्हायोलिन वादनाची शैली विकसित केली. सुरुवातीस गोवा येथील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक प्रा. ए. पी. डिकोस्टा यांच्याकडून त्यांनी पाश्चात्य पद्धतीने व्हायोलिन वादनाचे धडे गिरविले. यानंतर वडिल अच्युत रायकर व पंडित बी. एस. मठ (धारवाड) आणि पंडित वसंतराव कडणेकर (गोवा) या तिघांच्याही सक्षम मार्गदर्शनाखाली रायकर यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या अंगाने व्हायोलिन वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे.