Home Blog Page 5

व्हिडीओ कॉलद्वारे बनावट अपहरणाचा बनाव; १७ वर्षीय मुलगी झारखंडमधून सुखरूप ताब्यात

कोंढवा पोलिसांची तातडीची कारवाई; खंडणी मागणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. २१ जून : कोंढवा परिसरातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत मुलीला झारखंडमधून सुखरूप ताब्यात घेतले. याचवेळी मुलीच्या कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल करून खंडणीची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी कोंढवा बुद्रुक परिसरातील रहिवासी असलेल्या तक्रारदाराची १७ वर्षीय मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

तपास सुरू असतानाच तक्रारदाराला एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून “तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे” असा दावा करत पैशांची मागणी केली. त्यासाठी यूपीआय स्कॅनरही पाठविण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास अधिक वेगाने सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि रेल्वे प्रवासाची माहिती तपासताना संबंधित मुलगी आजाद हिंद एक्सप्रेसने हावडा दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तत्काळ रेल्वे प्रशासन व झारखंडमधील टाटानगर (जमशेदपूर) रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्या समन्वयातून मुलीचा शोध घेण्यात यश आले आणि तिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले.

यानंतर कोंढवा पोलिसांचे पथक आणि मुलीचे नातेवाईक झारखंडला रवाना झाले. मुलीला सुरक्षितपणे पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असून तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, बनावट अपहरणाचा बनाव करून व्हिडीओ कॉलद्वारे खंडणी मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

धुरंधरच्या ३१०० कोटीतून रणवीरची कमाई 325 कोटींची ; शाहरुख-रजनीकांतसारख्या अभिनेत्यांना मागे टाकले

अभिनेता रणवीर सिंह त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपट मालिकेच्या यशानंतर भारतातील सर्वात महागडे स्टार बनला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, रणवीरने या चित्रपटाच्या दोन्ही भागांतून एकूण ३२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.त्याने चित्रपटासाठी कोणतीही निश्चित फी घेतली नव्हती, तर प्रॉफिट शेअरिंग (नफ्यात वाटा) चा पर्याय निवडला होता. ‘धुरंधर’ने जगभरात ३१०० कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे.

या कमाईसह रणवीर सिंहने शाहरुख खान, रजनीकांत आणि अल्लू अर्जुन यांसारख्या मोठ्या स्टार्सच्या कमाईचा विक्रम मोडला आहे.
व्यापार विश्लेषकांच्या अंदाजानुसार, रणवीर सिंहने ‘धुरंधर’ चित्रपटासाठी आपली नियमित फी सोडली होती. त्याने निर्मात्यांसोबत नफ्यात वाटा निश्चित केला होता. जेव्हा चित्रपटाचे बजेट वाढले, तेव्हा रणवीरने स्वतःही या प्रकल्पात पैसे गुंतवले होते. चित्रपटाच्या कमाईनंतर आता त्याला थिएटर कलेक्शन, डिजिटल, सॅटेलाइट आणि म्युझिक राइट्सच्या वाट्यापोटी 325 कोटी रुपये मिळाले आहेत.

‘धुरंधर’च्या दोन्ही भागांनी जगभरात ३१०० कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. फक्त भारतातच चित्रपटाचे नेट कलेक्शन १९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिले आहे. चित्रपटाच्या नफ्याचा सर्वात मोठा हिस्सा जिओ स्टुडिओजला मिळाला आहे, त्यानंतर आदित्य धरच्या बी६२ स्टुडिओजचा नंबर आहे. मात्र, कलाकारांमध्ये रणवीरचा हिस्सा सर्वाधिक आहे. अभिनेता किंवा मेकर्सकडून अद्याप या आकडेवारीची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

रणवीर सिंहपूर्वी भारतात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावावर होता. त्याने 2024 मध्ये आलेल्या ‘जेलर’ चित्रपटासाठी 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. तर, बॉलिवूडमध्ये हा विक्रम शाहरुख खानच्या नावावर होता, ज्याने 2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटांमधून सुमारे 200-200 कोटी रुपये कमावले होते.

यांच्याशिवाय अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’ आणि प्रभासने ‘कल्की 2898 एडी’ साठी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेतले होते. आता रणवीर 325 कोटी रुपयांसह सर्वात पुढे निघाला आहे.
भारतीय सिनेमातील स्टार्सच्या मानधनाचा आलेख गेल्या काही दशकांत खूप वेगाने बदलला आहे. 90 च्या दशकात चिरंजीवी, कमल हासन आणि श्रीदेवी हे पहिले असे स्टार्स होते, ज्यांनी एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये मानधन घेणे सुरू केले होते. त्यानंतरच्या दशकात तिन्ही खान (शाहरुख, सलमान आणि आमिर) यांनी हा आकडा खूप वर नेला.

गेल्या काही वर्षांत साऊथ सिनेमातील यश आणि अल्लू अर्जुनसारखे स्टार्स 200 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेऊ लागले. 2026 साली रणवीर सिंहने या बाबतीत बॉलिवूडला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणले आहे.

पुण्या- मुंबईत पाऊस, पुन्हा सक्रिय झाला मान्सून…

मुंबई-पुणे : अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांत मान्सूनने दमदार हजेरी लावली. हंगामातील पहिल्या जोरदार पावसामुळे उष्णता आणि दमट वातावरणाने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ८ जूनपासून सोलापूर परिसरात स्थिरावलेला नैऋत्य मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला असून २३ जूनच्या आसपास महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुण्यात दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी हडपसर, सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढवा आणि कोथरूड परिसरात मुसळधार पाऊस झाला. पहिल्याच जोरदार सरींमुळे स्वारगेटमधील मित्र मंडळ चौक परिसरात पाणी साचून पादचारी मार्ग जलमय झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ हलक्या सरी कोसळल्या.

कोकणातही मान्सूनने जोर पकडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये दहा ते पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. त्यामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना गारव्याचा अनुभव मिळाला.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पाऊस लांबल्याने सकल हिंदू समाज आणि शिवभक्त समितीच्या वतीने विशेष पर्जन्यप्रार्थना करण्यात आली. जांभळेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करून चांगल्या पावसासाठी साकडे घालण्यात आले.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम घाट परिसरात तयार होणारे ढग आणि अरबी समुद्रातून येणारे दमट वारे यामुळे मान्सूनला चालना मिळत आहे. उपग्रह चित्रांमध्येही ढगांची घनता वाढल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुढील दिवसांच्या हवामानाचा अंदाज

22 जून

आसाम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भ भागात उष्णतेची लाट लोकांना त्रास देईल.
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडेल.
23 जून

गुजरात, बिहार, बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीरमध्ये हवामान सामान्य राहील.
पूर्व उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेश उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात राहील.
इतर राज्यांमध्ये मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस होईल. कोणत्याही राज्यासाठी रेड-ऑरेंज अलर्ट नाही.

मानसी उपक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम आणि निरोगी पिढी घडवण्याचा संकल्प : ना. चंद्रकांतदादा पाटील

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वस्ती भागातील ३५०० मुलींकडून योग प्रात्यक्षिके

योगाच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी ‘योग निकेतन’ची स्थापना

पुणे-आपला समाज निरोगी आणि सुदृढ असावा, असा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह असून, मानसी उपक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम आणि निरोगी पिढी घडवण्याचा संकल्प असल्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मानसी प्रेरणा फाऊंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वस्ती भागातील सुमारे ३,५०० मुलींनी उत्स्फूर्तपणे योग प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमात ना. चंद्रकांतदादा पाटील यांनीही सहभागी होत मुलींसोबत योगाभ्यास केला.

यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व जगभर पोहोचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना पुढे नेली. त्यानंतर योगाचा प्रचार आणि प्रसार जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला आहे. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे.

ते पुढे म्हणाले की, स्त्री हा समाजाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे संस्कारक्षम, सशक्त आणि निरोगी समाज घडवण्यासाठी मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर देणे आवश्यक आहे. मानसी उपक्रमाच्या माध्यमातून याच उद्देशाने सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आज मानसी उपक्रमाचे स्वरूप हे एका प्रगत आणि सातत्याने विकसित होत जाणाऱ्या सामाजिक चळवळीचे झाले असून, नवजात बालकाच्या वाढीप्रमाणे हा उपक्रम दिवसेंदिवस विस्तारत आणि अधिक प्रभावी होत आहे.

याशिवाय, आगामी काळात भारताला मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मानसी उपक्रमाच्या माध्यमातून किमान ५० महिला खेळाडू घडवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, योगाचे शास्त्रोक्त आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मानसी प्रेरणा फाऊंडेशन आणि नाशिकच्या योग विद्या गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग निकेतन’ या नव्या केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्राच्या लोगोचे अनावरण ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास मानसी प्रेरणा फाऊंडेशनच्या संचालिका मुग्धा भागवत, प्रभाग अध्यक्षा ॲड. वासंती जाधव, मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर, रेश्मा बराटे, माजी नगरसेविका व संचालक मंडळ सदस्या छाया मारणे, स्वाती मोहोळ, अद्वैत जोशी, माजी नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आत्मविश्वास मिळाल्यास ग्रामीण मुले यशाची उंच भरारी घेतील’ – ‘लायब्ररी मॅन’ प्रदीप लोखंडे

पुणे : “ग्रामीण भागातील मुले ही निसर्गतःच विविध कलागुणांनी संपन्न असतात. मात्र, योग्य संधी न मिळाल्यामुळे किंवा त्यांच्यात काहीसा न्यूनगंड असल्यामुळे ती मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहतात. या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आज नितांत गरज आहे. एकदा का त्यांच्यात हा विश्वास जागवला, की ही मुले यशाची उत्तुंग भरारी घेतील. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहायला शिका, सकारात्मकतेने काम करत राहा आणि कायम संवाद ठेवा, आपल्याला यश नक्कीच मिळेल,” असे प्रतिपादन ”लायब्ररी अँड पोस्टकार्ड मॅन’ म्हणून ओळखले जाणारे व रूरल रिलेशनशिपचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी केले.
‘मानव्य’ संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. हा सोहळा रविवारी भूगाव येथील ‘मानव्य गोकुळ’ (माताळवाडी फाटा) संस्थेच्या आवारात अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे उपस्थित होते, तर व्यासपीठावर, सार्थ वेल्थ’चे संस्थापक अरविंद परांजपे, माजी सरपंच शांताराम इंगवले, शशांक वाघ आणि उज्वला लवाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ ‘मानव्य’ संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय विजयाताई लवाटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आदरांजली वाहून करण्यात आला.
याच वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘मानव्य’ संस्थेत उभारण्यात आलेल्या नवीन सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन ‘सार्थ वेल्थ’चे संस्थापक अरविंद परांजपे यांच्या हस्ते व
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदीप लोखंडे यांनी ग्रामीण शिक्षण, वाचन संस्कृती आणि डिजिटल सक्षमीकरण या विषयांवर विशेष प्रकाश टाकला. देशभरात ‘पोस्ट कार्ड आणि लायब्ररी मॅन’ म्हणून काम करताना आलेले आपले समृद्ध अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. ते म्हणाले की, आपण सर्वांनी कायम लिहिते राहिले पाहिजे आणि लिहिते राहण्यासाठी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत समृद्ध वाचनालय सुरू करण्याची गरज आहे, कारण आपण वाचू तरच लिहू शकू. जीवनात सकारात्मकतेला आपलेसे केल्यास नकारात्मकता दूर पळते आणि यशाचा मार्ग सुकर होतो, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
परांजपे म्हणाले की, या नवीन प्रकल्पामुळे संस्था ऊर्जेच्या बाबतीत अधिक स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होईल. ‘मानव्य’ संस्थेमध्ये एक विलक्षण ऊर्जा असून ती मुलांच्या पंखात बळ देऊन त्यांना यशस्वी उड्डाणासाठी मोठे सहकार्य करत आहे, अशा सामाजिक कार्यात सहभागी होता आले याचा आपल्याला मोठा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी ‘मानव्य’ संस्थेच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेतला. संस्थेच्या उभारणीत विजयाताई लवाटे यांचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगत, देवदासींच्या मुलांचे प्रश्न सरकारी दरबारी मांडून त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिल्याचे त्यांनी सांगितले. आज त्यांच्याच प्रेरणेने संस्थेतील मुले केवळ शैक्षणिक प्रगतीच करत नसून स्वतःच्या पायावर उभे राहून आपले संसारही यशस्वीपणे थाटत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यात संस्थेच्या मुलांनी विविध सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमादरम्यान शामकांत सुतार यांनी माऊथ ऑर्गनचे सुंदर वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि भविष्यात संस्थेतील विद्यार्थ्यांना ते विनामूल्य माऊथ ऑर्गन शिकवणार असल्याचे घोषित केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त समीर ढवळे यांनी केले.

‘पीएमआरडीए’च्या अग्निशमन केंद्रांत योग दिन उत्साहात!

  • नांदेड सिटी, मारुंजी, वाघोलीत आयोजन; अधिकाऱ्यांसह जवानांचा सहभाग

पुणे : “आणीबाणीच्या आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ ठेवणे अत्यंत गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विविध अग्निशमन केंद्रांमध्ये जवानांनी उत्साहात योगाभ्यास केला,” अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.

‘पीएमआरडीए’च्या नांदेड सिटी, मारुंजी आणि वाघोली येथील अग्निशमन केंद्रांमध्ये विशेष योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. ‘योग करा – निरोगी राहा, सक्षम बना आणि सशक्त समाज घडवा’ हा संदेश देत जवानांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनात, आणि विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, तसेच अग्निशमन केंद्र अधिकारी विजय महाजन यांच्या थेट नियोजनाखाली या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित केंद्रांवरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सामूहिक योगाभ्यास केला. केवळ व्यायाम म्हणून नव्हे, तर निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

अग्निशमन दलातील कर्तव्य हे अत्यंत आव्हानात्मक आणि तणावाचे असते. कोणत्याही क्षणी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जवानांची मानसिक एकाग्रता आणि शारीरिक क्षमता उच्च पातळीवर असणे आवश्यक असते. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून ती निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रभावी जीवनशैली आहे. जवानांच्या कार्यक्षमतेचा तो एक महत्त्वपूर्ण आधार असल्याचे मत यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

आपत्कालीन मदतीसाठी संपर्क
नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या ‘पीएमआरडीए’ अंतर्गत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी ‘पीडीआरएफ’ (PDRF) दलाच्या ९५४५२८२९३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वॉशिंग सेंटर्स, स्विमिंग पूल, उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर निर्बंध; नियमभंगास १० हजारांचा दंड

कमी पावसाचा अंदाज; पुणे महापालिकेकडून पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना

पुणे, दि. २० जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या मान्सूनबाबत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरात पाणी बचतीसाठी विविध कठोर उपाययोजना लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांच्या स्वाक्षरीने हा कार्यालीन आदेश काढण्यात आला आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशातील हंगामी पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) सुमारे ९० ते ९५ टक्के राहण्याची शक्यता आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने पाणी बचतीचे उपाय तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत

प्रमुख निर्णय
  • शहरातील सार्वजनिक व खासगी वाहन धुण्याची (वॉशिंग सेंटर्स) केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश.
  • खासगी व सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर बंद.
  • महापालिकेच्या उद्यानांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई.
  • बांधकामे व रस्त्यांच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर प्रतिबंधित.
  • सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) वापरणे बंधनकारक.
  • पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश.
  • अनधिकृत नळजोड व पाणीगळतीवर तातडीने कारवाई.
दंडात्मक कारवाईचा इशारा

महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिक आस्थापनांवर १० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दोन वेळा कारवाई झाल्यानंतरही नियमभंग सुरू राहिल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेने सर्व विभागांना स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले असून पाणी बचतीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास २० जून पासून 

मराठी वारसा’ यूट्यूब वाहिनीवर पहिला भाग प्रसारित

अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळविणारी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका २० जूनपासून मराठी वारसा या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

‘मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात प्रथमच एखादी मालिका अशा स्वरूपात पुनरागमन करत आहे. फुले दांपत्यांनी समाजपरिवर्तनासाठी दिलेला लढा, शिक्षणाची क्रांती आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा, हाच या पुनर्प्रवासामागील आमचा उद्देश आहे. ही मालिका केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीव जागवणारी आणि प्रेरणा देणारी चळवळ आहे’, असे या मालिकेच्या डिजीटल प्रवासाबद्दल माहिती   देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा हा डिजीटल प्रवास अनेक निर्मात्यांसाठी पथदर्शी ठरू शकतो. या प्रवासाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून अनेक मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमाबद्दल सकारात्मक भावना आणि उत्सुकता निश्चितच आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर अभिव्यक्तीची आणि मांडणीची अधिक व्यापक संधी उपलब्ध असते. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत कथा ज्या स्वरूपात पोहोचवायची आहे, ती अधिक प्रभावीपणे मांडता येते. तसेच, या विषयाला व्यापक स्वरूप देण्यासाठी आपण भविष्यात संसदेतही हा मुद्दा मांडणार असल्याचे संकेत डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले.  

‘सध्या ही मालिका सर्वप्रथम ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर डिजीटल माध्यमांवर विस्तार करण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असून योग्य वेळेनुसार पुढील निर्णय घेतले जातील. येत्या काळात हिंदी, तामिळ, तेलगू, इंग्रजी, बंगाली या पाच विविध भारतीय भाषांमध्ये डब करून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.

डिजीटल माध्यमामुळे कलाकार आणि निर्मात्यांमधील अंतर कमी होत असल्याचे सांगत डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, ‘आमच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर ऑडिशन टॅब सुरू केला असून, महाराष्ट्रातील नवोदित आणि गुणवंत कलाकारांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कलाकारांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट आमच्याशी जोडता येईल.’ सर्जनशीलतेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत मालिकेच्या डिजीटल प्रवासाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी शब्दांत सांगितले कि आता ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका केवळ आमची राहिलेली नाही, तर ती आता संपूर्ण महाराष्ट्राची मालिका झाली आहे .

“मराठी मनोरंजन क्षेत्रात आशयप्रधान आणि लोकाभिमुख कंटेंटसाठी नवे मार्ग खुले करण्याच्या उद्देशाने आम्ही  सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात अनेक सर्जनशील प्रयोगांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून: 25 जूनला निकाल..राज्याचे लक्ष

पुणे-नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या २५ जून २०२६ रोजी जाहीर होणार आहे. हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता आहे, कारण अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल समोर येत आहे.

या संवेदनशील प्रकरणात गुन्हा घडल्यापासून तपास यंत्रणा आणि न्यायालयाने अत्यंत कौतुकास्पद व वेगाने काम केले आहे. केवळ १६ दिवसांत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. त्यानंतर पुढील १६ दिवसांत सर्व महत्त्वाच्या साक्षी व पुरावे नोंदवून घेण्यात आले. यानंतर २० दिवसांमध्ये अंतिम युक्तिवादही पूर्ण करण्यात आला. संपूर्ण खटल्याची प्रक्रिया अतिशय वेगाने पार पडल्यामुळे महिन्याभराच्या आतच पीडितेला अंतिम न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या खटल्याचा अंतिम युक्तिवाद देखील पूर्ण झाला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी न्यायालयात सरकारची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडली. त्यांनी न्यायालयात गुन्ह्याचा सविस्तर घटनाक्रम दर्शवणारा टाईमलाईन चार्ट, वैद्यकीय पुराव्यांचे विश्लेषण, फॉरेन्सिक डेटा चार्ट, डीएनए प्रोफाईलिंग मॅट्रिक्स आणि आरोपीचा गुन्ह्याशी थेट संबंध सिद्ध करणारा कनेक्टिव्हिटी चार्ट सादर केला. या भक्कम वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांसोबतच ऐतिहासिक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देत सविस्तर लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर ठेवण्यात आला.

बचाव पक्षानेही आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सविस्तरपणे ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, अंतिम निकालासाठी २५ जून २०२६ ही तारीख निश्चित केली आहे. नसरापूरमधील या अत्यंत संतापजनक प्रकरणामध्ये पीडित चिमुकलीला लवकरात लवकर आणि कठोर न्याय मिळावा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची भावना होती.

पुणे महानगर प्रदेशातील वाहतूककोंडी फुटणार; ‘पीएमआरडीए’ आणि ‘महारेल’मध्ये सामंजस्य करार!

  • रेल्वेफाटकमुक्तीच्या दिशेने ‘पीएमआरडीए’चे महत्त्वाचे पाऊल!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या आणि रस्ते रेल्वेफाटकमुक्त करण्याच्या दृष्टीने आज (शुक्रवार) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. ‘पीएमआरडीए’ हद्दीतील रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग (आरयूबी) यांच्या जलद व दर्जेदार बांधकामासाठी ‘पीएमआरडीए’ने ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.’ (महारेल) या कंपनीसोबत अधिकृत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाहतुकीच्या प्रश्नांच्या निराकरणास मोठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री तथा ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेशातील वाहतूककोंडीची समस्या गांभीर्याने घेत, रेल्वेफाटकमुक्तीसाठी विशेष पुढाकार घेतला होता. यासंदर्भात पूर्वी झालेल्या बैठकींमध्ये रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पादचारी पूल (एफओबी) आणि भुयारी मार्ग यांची कामे वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत करण्याऐवजी, या कामांमध्ये तांत्रिक अनुभव असलेल्या ‘महारेल’मार्फतच करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या प्रक्रियेला गती मिळाली.

या निर्देशांनंतर ‘पीएमआरडीए’अंतर्गत हे प्रकल्प ‘महारेल’कडे सोपविण्याच्या दृष्टीने दोन्ही संस्थांमध्ये बैठकांचे सत्र पार पडले. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सामंजस्य कराराचा मसुदा तातडीने अंतिम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज या मसुद्यावर दोन्ही बाजूंकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल आणि ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी यांच्यासह दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील अनेक रस्ते रेल्वेफाटकमुक्त होणार असून, रेल्वे फाटकांमुळे रस्त्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आता इतिहासजमा होण्यास मदत होणार आहे. तसेच, ‘पीएमआरडीए’ क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरण आणि व्यावसायिक समाजकार्यातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांनंतरच्या करिअरच्या संधी

प्रश्न : BSW (Bachelor of Social Work) आणि MSW (Master of Social Work) ही व्यावसायिक पदवी धारण करणे कशासाठी आवश्यक आहे ?
प्रा चेतन दिवाण : विद्यार्थ्याना व्यावसायिक समाजकार्य शिक्षणामध्ये स्वयंसेवी समाजकार्य, गांधीवादी समाजकार्य आणि व्यावसायिक समाजकार्य यामधील फरक शिकविला जातो. समाजसेवा किंवा समाजकार्य पद्धतशीरपणे शिक्षण घेऊन, पारंगत होऊन, कौशल्याधारीत अशी द्यावयाची समाजसेवा म्हणजेच व्यावसायिक समाजसेवा किंवा व्यावसायिक समाजकार्य या दोन्ही गोष्टी कशापद्धतीने वेगवेगळ्या आहेत याचे शिक्षण BSW (Bachelor of Social Work) आणि MSW (Master of Social Work) या अभ्यासक्रमांमध्ये दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना या निरनिराळ्या सेवाकार्यांना किंवा समाजसेवेला इतर सर्व व्यावसायिक सेवां कार्याप्रमाणेच त्यांनी व्यक्ती, गट आणि समूह किंवा समुदायाला दिलेल्या व्यावसायिक सेवेचा मोबदला म्हणजेच व्यावसायिक सेवा किंवा व्यावसायिक समाजकार्याचा मोबदला त्यांच्या नोकरी, उद्योग, व्यवसाय या माध्यमातून किंवा स्वतःची संस्था काढून मिळविता येतो व त्यासाठी विद्यार्थ्याना योग्य शिक्षित, सक्षम, पारंगत व कुशल बनविण्याचे काम हे BSW आणि MSW सारखे अभ्यासक्रम करीत असतात.
आजच्या काळात शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. शिक्षणाने रोजगार, व्यवसाय, कौशल्य आणि समाजसेवा यांचा मार्ग खुला करणे आवश्यक आहे. पारंपरिक BA, BCom, BSc अभ्यासक्रमांपेक्षा BSW (Bachelor of Social Work) आणि MSW (Master of Social Work) हे अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख, कौशल्याधारित आणि व्यावसायिक आहेत.
हे अभ्यासक्रम ग्रामीण, आदिवासी, शहरी आणि निमशहरी सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी उपलब्ध करून देतात.
प्रश्न : BSW (Bachelor of Social Work) आणि MSW (Master of Social Work) या अभ्यासक्रमामध्ये काही विषेशिकरणे/ स्पेशलायझेशन आहेत का ?
प्रा चेतन दिवाण :
शहरी, ग्रामीण व आदिवासी समुदाय विकास, वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्य, मानव संसाधन व्यवस्थापन, कुटुंब व बालकल्याण, गुन्हेगारी व सुधारणा प्रशासन अशी विविध विषेशिकरणे/ स्पेशलायझेशन ही BSW / MSW या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असतात. यापैकी शहरी, ग्रामीण व आदिवासी समुदाय विकास, वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्य ही दोन विषेशिकरणे / स्पेशलायझेशन ही रावेर, यावल , सातपुडा, धुळे, नंदुरबार, आणि नाशिक या ग्रामीण व आदिवासी पट्ट्यातील किंवा परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकास, हित व सोयीच्या दृष्टिकोनातून मुळजी जैठा महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
विद्यार्थ्याना मुळजी जैठा महाविद्यालय जळगाव याठिकाणी पुणे मुंबईच्या धरतीवर उच्चशिक्षित, प्रशिक्षित, अनुभवी अशा शिक्षक वर्गांकडून उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा मानस हा संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकूमार बेंडाळे (दादा) यांचा आहे. BSW आणि MSW ही अभ्यासक्रम के नवीन सुसज्ज व प्रशस्त अशा इमारतीमध्ये यावर्षीपासून स्थलांतरित करण्यात आलेले असून विद्यार्थ्याना स्मार्ट बोर्ड, आधुनिक शिक्षण सामुग्री, पॉवर पॉइंट (पीपीटी) सादरीकरणे, वाय -फाय, प्रशस्त ग्रंथालय, कॉम्प्युटर लायब्ररी, प्रशस्त क्लासरुम, दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण, संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी संशोधनाला चालना, प्रात्यक्षिक कार्यासाठी विविध संस्थाबरोबर एम ओ यु करून तज्ञांकडून प्रात्यक्षिक कार्य अनुभव आदी नवीन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्याना सक्षम, कार्यक्षम, कुशल, व सर्वांगीण विकसित बनविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकूमार बेंडाळे (दादा) यांनी स्वतः लक्ष घालून आवश्यक अशा सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आर्टिफिशियल इंटलीजन्स (ए आय) आधारित शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन हे देखील या अभ्यासक्रमाचे एक प्रमुख आकर्षण असणार आहे.
प्रश्न : BSW आणि MSW हे अभ्यासक्रम पारंपारिक किंवा परंपरा अभ्यासक्रमापासून कसे वेगळे आहेत?
प्रा चेतन दिवाण: मुळजी जैठा महाविद्यालय, जळगाव येथून बीएसडब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू हे दोन्ही अभ्यासक्रम व्यवसायाधारित शिक्षण इतर परंपरागत किंवा पारंपारिक असे बीए बीकॉम बीएससी किंवा इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत कौशल्याधारित, स्वतःचा उदरनिर्वाह करून, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी
व्यावसायिक शिक्षण दिले गेल्यामुळे विद्यार्थी हे पारंगत होऊन नोकरी उद्योग व्यवसाय उद्योग धंदा उभे करू शकतात.

प्रश्न: BSW आणि MSW अभ्यासक्रम किती वर्षांचा आहे आणि प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे?
प्रा चेतन दिवाण: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एम एस डब्ल्यू हा अभ्यासक्रम तीन वर्षे किंवा चार वर्षांच्या पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षांचा किंवा एक वर्षाचा असा अभ्यासक्रम असणार आहे.
बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण (एचएससी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व तीन वर्षे किंवा चार वर्षाच्या डिग्री किंवा पदवीसाठी या अभ्यासक्रमास मुळजी जैठा महाविद्यालयामध्ये थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसेच काही ठिकाणी या अभ्यासक्रमास प्रवेश प्रक्रियेद्वारे देखील प्रवेश दिला जातो आणि दोन किंवा एक वर्ष अशी कालमर्यादा MSW या पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमासाठी असणार आहे..

प्रश्न: BSW आणि MSW अभ्यासक्रमामध्ये कोण कोणते विषय किंवा कौशल्याधारित घटकांचा समावेश असतो??
प्रा चेतन दिवाण: बीएसडब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू या दोन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रामुख्याने व्यावसायिक समाजकार्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना शिकविल्या जातात त्यामध्ये व्यक्ती कार्य, गटकार्य, समुदाय संघटन किंवा समूह कार्य, सामाजिक आणि समाजकार्य संशोधन, समाज कल्याण व्यवस्थापन आदी पद्धतींचा प्रामुख्याने समावेश असतो व याच पद्धतींच्या आधारे विविध संकटांचा सामना करण्यासाठी व्यक्ती, गट किंवा समूहाच्या समस्या समजून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्याच्या विविध पद्धतींचे शिक्षण व प्रत्यक्ष कार्य अनुभव हा व्यावसायिक समाज कार्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने दिला जातो.

प्रश्न:BSW किंवा MSW शिक्षणानंतर कोणकोणत्या नोकरी, उद्योग व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत?
प्रा चेतन दिवाण: समाजकार्य शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे त्यांच्या त्यांच्या विषेशीकरण किंवा स्पेशलायझेशन नुसार विविध क्षेत्रांमध्ये आपले भविष्य आजमावू शक्ततात. मुळजी जैठा तसेच इतर महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्य विषेशीकरण किंवा स्पेशलायझेशन समाजकार्य शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी हे राज्य किंवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये प्रामुख्याने मेडिकल सोशल वर्कर किंवा समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय), समाजसेवा अधीक्षक (मनोसामाजिक), समुपदेशक, समोपदेष्टा, समाज विकास अधिकारी, अववयदान समाज कार्यकर्ता/ समुपदेशक, बाल मार्गदर्शन केंद्रे, दत्तक केंद्रे येथे सामाजिक कार्यकर्ता, निरीक्षण ग्रह समाजसेवक, विशेष शाळांमधील समुपदेशक, शालेय समुपदेशक, मूल्य शिक्षण कार्यक्रम आधारित समन्वयक, जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम आधारित समुपदेशक, शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमधील विविध पदे या पदांवर तसेच शहरी, ग्रामीण व आदिवासी समुदाय विकास विषेशीकरण किंवा स्पेशलायझेशनचे विद्यार्थी हे शासनाच्या ग्रामीण विकास विभागातील जल स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत मिशन, कृषी विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग इत्यादि ठिकाणी नोकरी मिळवू शकतात. त्याचबरोबर शासनाच्या समाज कल्याण विभागामध्ये समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त, महानगरपालिका समाजसेवा अधीक्षक, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक, महिला व बालकल्याण अधिकारी, विविध कौटुंबिक समुपदेशन केंद्रांमधील समुपदेशक, विविध तुरुंग निरीक्षण ग्रह किंवा महिला केंद्रांमधील प्रोबेशन अधिकारी, आदी विविध पदांवर नोकरी मिळवून सरकारी नोकरीद्वारे सेवा देऊन शकतात.
शहरी, ग्रामीण व आदिवासी समुदाय विकास स्पेशलायझेशनमधून समाजकार्य शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी हे ग्रामीण विकास विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान, ग्रामविकास कार्यक्रम, संसद आदर्श ग्राम योजना, स्वयंसेवी संस्था व राष्ट्रीय आयोग, चाइल्ड राइट्स, मुख्यमंत्री फेलोशिप, पाणी साठवण प्रकल्प, आदिवासी व समुदाय विकास कार्य, आदिवासी आश्रम शाळा या ठिकाणी विविध पदांवर नोकरी किंवा उद्योग करू शकतात.
निधी संकलक, निधी किंवा संसाधन संकलन अधिकारी, प्रकल्प सहाय्यक, क्षेत्र अधिकारी, प्रकल्प समन्वयक, कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक, आश्रम शाळा अधीक्षक, संशोधन अधिकारी, संशोधन क्षेत्र अन्वेषक, संशोधन व दस्तऐवजीकरण अधिकारी आदी पदांवर देखील ही विद्यार्थी आपापल्या क्षमता, कुवत व कौशल्यानुसार कार्य करू शकतात तसेच विविध संस्था किंवा सीएसआर प्रकल्पांमध्ये देखील ते विविध भूमिका बजावू शकतात.
बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू. ची पदवी प्राप्त केल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी मानव संसाधन स्पेशलायझेशनमधून समाजकार्य शिक्षण प्राप्त केलेले असेल तर त्यांना विविध कंपन्या, वर्कशॉप, सीएसआर कंपन्या किंवा सीएसआर विभाग, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, कंपन्या आरोग्य उद्योग संस्था, आपत्ती व्यवस्थापन विभाग, ग्रामीण विकास विभाग किंवा सरकारच्या प्रमुख सार्वजनिक उपक्रम असलेल्या विविध पीएसयु किंवा पी एस ई मध्ये प्रशिक्षणार्थी एच आर, कामगार कल्याण अधिकारी, सहाय्यक एच आर, व्यवस्थापक, एच आर व्यवस्थापक, वरिष्ठ एचआर व्यवस्थापक, एच आर प्रमुख, कार्यकारी सहाय्यक, एच आर कार्यकारी, सी एस आर सहाय्यक, सीएसआर प्रशिक्षणार्थी, सीएसआर व्यवस्थापक, सीएसआर प्रमुख, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ, व्यक्तिगत संबंध व्यवस्थापक, कामगार कल्याण अधिकारी, कल्याण अधिकारी, किंवा सार्वजनिक संबंध अधिकारी अशा विविध पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध असतात
महिला व बालकल्याण विभागाच्या स्पेशलायझेशनमधून समाजकार्य शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी महिला आणि बालकल्याण विभागाशी संबंधित संस्थांमध्ये कार्य करू शकतात.
कौटुंबिक समुपदेशन केंद्रे, कौटुंबिक नियोजन व लसीकरण सेवा, कौटुंबिक न्यायालय, जिल्हा महिला व वसतीग्रह, महिला कारागृह, वृद्धाश्रम, महिला सक्षमीकरण प्रकल्प, महिला भ्रूण हत्या प्रश्न आधारित प्रकल्प, लिंग संवेदनशीलता प्रश्न आधारित प्रकल्प, घरगुती हिंसा आधारित प्रकल्प, पॉश कायदा आधारित प्रकल्प, महिला आयोग, महिला हेल्पलाइन सेवा, बाल मार्गदर्शन केंद्रे, दत्तक केंद्रे येथे सामाजिक कार्यकर्ता, निरीक्षण ग्रह समाजसेवक, विशेष शाळांमधील समुपदेशक, शालेय समुपदेशक, मूल्य शिक्षण कार्यक्रम आधारित समन्वयक, जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम आधारित समुपदेशक, शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी आदी ठिकाणी देखील विविध पदांवर व्यावसायिक समाज कार्य शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी नोकरी करून सेवा देऊ शकतात
प्रश्न : BSW आणि MSW समाजकार्य शिक्षणानंतर विद्यार्थ्याना उच्च शिक्षण, संशोधन किंवा इतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत ?
प्रा चेतन दिवाण: BSW किंवा MSW समाजकार्य शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण व संशोधन कार्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध असून नारी, एन आय आर आर एच, बार्टी , आर्टी, महाज्योती, यशदा, विविध शिक्षण संस्था, विविध संशोधन प्रकल्प, सी एस आर प्रकल्प, सर्वेक्षण व विश्लेषण विभाग आदी विभागांमध्ये मूलभूत सर्वेक्षण, सामाजिक परिणाम अभ्यास, महामारी शास्त्रीय अभ्यास, मार्केट संशोधन, परिस्थिती विश्लेषण, संशोधन प्रकल्प आदी संशोधन कार्यांमध्ये फिल्ड ऑफिसर, फिल्ड इन्वेस्टीगेटर, संशोधन सहाय्यक, संशोधन सहयोगी, संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन प्रकल्प प्रमुख, डेटा विश्लेषक, संशोधन व दस्तऐवजीकरण अधिकारी किंवा स्वतंत्र संशोधक म्हणून देखील विविध रोजगाराच्या संधि उपलब्ध असल्याचे दिसून येते.

प्रश्न: विद्यार्थ्यांना समाजकार्य शिक्षण घेण्यासाठी फी किती आहे ? राहण्यासाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे का ? आणि शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत का?
प्रा चेतन दिवाण: विद्यार्थ्यांना मूळजी जैठा महाविद्यालयामध्ये बी एस डब्ल्यू या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी अगदी माफक अशी फी आकारण्यात येत असून ती फक्त 6515 रुपये आहे तसेच एम एस डब्ल्यू या अभ्यासक्रमासाठी देखील 16310 रुपये अशी अगदी माफक फी आकरण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना सुसज्ज असे आधुनिक सोयी सुविधांनी युक्त नवीन होस्टेलची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अगदी माफक दरामध्ये निवासाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच बीएसडब्ल्यू व एम एस डब्ल्यू या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध असून शासनाच्या सर्व पद्धतीच्या शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, विद्यार्थिनी शिष्यवृत्ती, स्वर्गीय अण्णासाहेब बेंडाळे शिष्यवृत्ती तसेच विविध खासगी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

प्रा चेतन दिवाण,
समन्वयक,
समाजकार्य विभाग व सामाजिक शास्त्रे,
खांदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जैठा महाविद्यालय, जळगाव.

मोबाईल- 09168941000/ 08605620556

RTI मधील बदलांवर अण्णा हजारे संतप्त; फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर-देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात माहिती अधिकार (RTI) कायदा लागू व्हावा यासाठी ऐतिहासिक संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या नव्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने नुकतेच एक राजपत्र प्रसिद्ध करून माहिती अधिकार कायद्याच्या नियमांमध्ये अत्यंत जाचक आणि महागडे बदल केले आहेत. या बदलांमुळे माहिती अधिकार कायदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त करत, अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारला थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.

राज्य शासनाने १२ जून रोजी एक विशेष अधिसूचना जारी करत माहिती अधिकार कायदा २००५ च्या अंमलबजावणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या नव्या नियमांनुसार, आतापर्यंत केवळ १० रुपयांत मिळणारा माहिती अधिकाराचा अर्ज आता तब्बल ३० रुपयांना मिळणार आहे. इतकेच नाही, तर माहितीच्या प्रतिसाठी (झेरॉक्स) पूर्वी आकारले जाणारे २ रुपये प्रतिपान शुल्क वाढवून आता ५ रुपये करण्यात आले आहे.

सर्वात मोठा फटका अपिलाच्या प्रक्रियेला बसणार असून, पहिल्या अपिलासाठी आता ५० रुपये आणि दुसऱ्या अपिलासाठी १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.
या नव्या नियमांवर आक्षेप घेत अण्णा हजारे यांनी सरकारला ठणकावले आहे. ते म्हणाले, “माहिती अधिकार हा देशातील सामान्य नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, ते सरकारसाठी पैसे कमावण्याचे साधन नाही. काही लोक या कायद्याचा गैरवापर करतात हे मान्य आहे आणि त्यासाठी नाममात्र शुल्क आकारणे ठीक आहे, मात्र यातून महसूल गोळा करणे हा सरकारचा उद्देश नसावा. या नव्या १२ नियमांमुळे गरिबांना आणि सामान्य नागरिकांना कोणतीही माहिती मिळवणे अशक्य होणार आहे.”

फडणवीस सरकारने हे जाचक बदल तातडीने मागे घेऊन नियम पूर्ववत केले नाहीत, तर आपण या वयातही पुन्हा एकदा जनआंदोलन आणि उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने माहिती अधिकार कायद्यात केलेले १२ मोठे बदल

माहिती अधिकार अधिक कडक आणि महागडा करण्यासाठी सरकारने खालील सुधारित नियम लागू केले आहेत:

अर्जाचे शुल्क: आता ₹१० ऐवजी ₹३० मोजावे लागणार.
प्रतीचा खर्च: माहितीचे प्रति पृष्ठ (झेरॉक्स) शुल्क ₹२ वरून ₹५ झाले.
मर्यादित विषय: एका अर्जाद्वारे केवळ एकच विषय विचारता येईल.
शब्दांची मर्यादा: मुख्य अर्ज आता १५० शब्दांच्या आतच लिहावा लागेल.
ओळखपत्र सक्ती: अर्जासोबत अर्जदाराचे फोटो ओळखपत्र जोडणे अनिवार्य.
प्रथम अपील शुल्क: पहिल्या अपिलासाठी आता ₹५० फी आकारली जाईल.
द्वितीय अपील शुल्क: दुसऱ्या अपिलासाठी ₹१०० भरावे लागतील.
वेबसाईटचा हवाला: मागितलेली माहिती आधीच सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध असल्यास, विभाग ती तिथून घेण्यास सांगून अर्ज निकाली काढू शकतो.
पुनरावृत्ती अर्ज: एकाच विषयावर वारंवार केलेले अर्ज थेट बाद ठरवले जातील.
वैयक्तिक माहिती: कोणाचीही वैयक्तिक माहिती हवी असल्यास, त्यामागे मोठे ‘सार्वजनिक हित’ आहे हे अर्जदाराला सिद्ध करावे लागेल.
डिजिटल पेमेंट: ऑनलाईन अर्ज, ई-मेल आणि UPI द्वारे केलेले व्यवहार वैध ठरतील.
अपिलाची सुनावणी: सुनावणीच्या वेळी तक्रारदार वारंवार गैरहजर राहिल्यास त्याचे अपील फेटाळण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना असेल.
या नव्या नियमांमुळे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. आता अण्णा हजारे यांनीच थेट उपोषणाचा इशारा दिल्यामुळे राज्य सरकार या नियमांमध्ये काही सवलत देणार की आपल्या निर्णयावर ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यात 16 जणांच्या मृत्यूनंतर होर्मुझची सामुद्रधुनी बंद

इराणने घेतला निर्णय
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने सरकारी टीव्हीवर जाहीर केले की, लेबनॉनमधील इस्रायली हल्ले हे यामागील कारण आहे.१७ जूनच्या रात्री अमेरिका आणि इराण यांच्यात एक शांतता करार झाला होता. या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे आणि लेबनॉनमधील हल्ले थांबवणे असे ठरले होते. शांतता करार झाल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनमधील हल्ले सुरूच ठेवले.यानंतर, ट्रम्प यांच्या पुढाकाराने १९ जूनच्या रात्री इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला. मात्र, युद्धविराम जाहीर झाल्यानंतर अवघ्या आठ तासांतच इस्रायल आणि लेबनॉनमध्ये लढाई सुरू झाली. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने ड्रोन आणि तोफखान्याच्या साहाय्याने नबाहिता भागावर हल्ला केला, ज्यात किमान १६ जण ठार झाले.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, म्हटले- अमेरिकेने कराराची पहिली अट पूर्ण केली नाही.
इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, देशाच्या सर्वोच्च संयुक्त लष्करी कमांडने सरकारी टीव्हीवर ही घोषणा केली. खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाने म्हटले आहे की, अमेरिकेने शांतता कराराची पहिली अट लागू केलेली नाही. इस्रायल दक्षिण लेबनॉनमध्ये सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे.याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने घोषणा केली आहे की, ते आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक थांबवेल. होर्मुझ हा जगातील तेल आणि वायू व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. अनेक आखाती देशांमधून होणारी मोठी ऊर्जा निर्यात याच मार्गातून होते. त्यामुळे, इराणच्या या निर्णयाचा जागतिक तेल बाजार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, इस्रायल आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यांनी सांगितले की, इस्रायल गाझा आणि लेबनॉनमध्ये आपली लष्करी कारवाई सुरूच ठेवेल.

  1. इराण-अमेरिका चर्चा लांबणीवर: अमेरिका आणि इराण यांच्यात शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये होणारी पहिली औपचारिक चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे. वृत्तानुसार, लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांमुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम आहेत. मात्र, सीएनएनने एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, ट्रम्पचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ स्वित्झर्लंडसाठी रवाना झाले आहेत.
  2. लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात 47 जण ठार: लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दक्षिण लेबनॉन आणि बेका खोऱ्यात शुक्रवार रात्रीपासून झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये 47 जण ठार झाले आणि 97 जखमी झाले. 2 मार्चपासून आतापर्यंत मृतांची संख्या 3,980 वर पोहोचली आहे.
  3. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जहाजांची वाहतूक वाढली: अमेरिका-इराण करारानंतर 18 जून रोजी 25 व्यापारी जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून गेली. एप्रिलनंतर एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. मात्र, 500 हून अधिक जहाजे आणि 11 हजार खलाशी अजूनही आखातात अडकले आहेत.
  4. ट्रम्प म्हणाले – इराणला एक पैसाही मिळणार नाही: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिका मजबुरीने चर्चेच्या टेबलावर आलेला नाही, तर इराण स्वतः आला आहे. ते म्हणाले की, पुढील 60 दिवसांपर्यंत इराणला अमेरिकेकडून एक पैसाही मिळणार नाही.
  5. पाकिस्तानी पंतप्रधानांनी सौदी क्राउन प्रिन्सशी चर्चा केली: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक शांतता आणि पुढील टप्प्यातील चर्चा राजनैतिक आणि संवादाच्या माध्यमातून पुढे नेण्यावर भर दिला.

परभणीतील यशवाडीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू

परभणी-परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरासमोरील सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. शनिवार असल्याने मंदिरात कीर्तन आणि महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, त्याच वेळी हा सभामंडप कोसळला. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले.

यशवाडी देवस्थान येथे दर शनिवारी जिल्हाभरातून आणि शेजारच्या भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. आज शनिवारी देखील सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य मंदिरासमोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच अचानक दुपारी सभागृहाचे छत कोसळले. छत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि भाविकांमध्ये पळापळ सुरू झाली.
दरम्यान, यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचावकार्य अडीच तासानंतर पूर्ण झाले असून, सर्व ३२ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. ३२ पैकी ७ जणांचा मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन विभाग पाथरी, मानवत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय पथक महापालिका परभणी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे बचावकार्य पूर्ण करण्यात आले.

परभणी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र यशवाडी संस्थान येथे बांधकाम सुरू असलेल्या सभामंडपाचे पिलर कोसळून झालेल्या दुर्घटनेवर खासदार संजय जाधव यांनी दुःख व्यक्त केले आहे. शनिवारी दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांमध्ये या घटनेत सुमारे ३० ते ४० जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले. जखमी भाविकांना तातडीने उपचार मिळावेत आणि ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना व्यक्त करत प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबवून सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहनही संजय जाधव यांनी केले आहे.

मानवत तालुक्यातील यशवाडी संस्थान येथे मारोती मंदिराच्या सभामंडपाचे पिलर कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी असल्याचे म्हटले. दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून काही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. तसेच जखमींना तातडीने सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाला युद्धपातळीवर मदतकार्य राबविण्याच्या सूचना दिल्याचे सांगत या कठीण प्रसंगी बाधित भाविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास डॉ. राहुल पाटील यांनी दिला.

अचानक छत अंगावर कोसळल्यामुळे 30 पेक्षा जास्त भाविकांना बाहेर पडता आले नाही आणि ते या ढिगाऱ्याखाली अडकले गेले. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे आपल्या संपूर्ण पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

यशवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमी भाविकांना तत्काळ उपचार मिळावेत आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती, असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले आहे.

नागरिकांचा माहितीचा अधिकारच काढून टाकण्याचे प्रयत्न, राजपत्रातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करा – हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, दि. २० जून २०२६.

सरकारी कारभारात पारदर्शकता असावी आणि त्याचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी काँग्रेसप्रणित युपीए सरकारने जनतेला ऐतिहासिक असा माहिती अधिकार कायद्याचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिला आहे, पण सध्याच्या सरकारने मात्र नागरिकांना माहितीपासून दूर ठेवण्यासाठी अडथळ्यांची भिंत उभी केली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात गंभीर कायदेशीर त्रुटी व मूळ कायद्याशी विसंगत तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांचा माहितीचा अधिकारच काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला असून यामुळे शासनाच्या पारदर्शकतेच्या तत्त्वालाही धक्का पोहोचत आहे. सरकारने तातडीने या बेकायदेशीर तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव यांना यासंदर्भात पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात की, सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मध्ये बेकायदेशीर तरतुदी रद्द केल्या आहेत. माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील, द्वितीय अपील तसेच माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार वापरणे आर्थिकदृष्ट्या कठीण होईल आणि माहितीचा अधिकार अधिनियमाचा मूलभूत उद्देशच बाधित होईल.केंद्र सरकार आजही माहिती अधिकारासाठी केवळ १० रूपये आकारते आणि अपिलसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. असे असताना राज्य सरकार जनतेकडून पैसे वसुलीची भूमिका का घेत आहे? माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम ४(१)(क) व ४(१)(ड) नुसार जनतेवर परिणाम करणारा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना त्यामागील कारणे, वस्तुस्थिती, विचारप्रक्रिया व संबंधित माहिती स्वतःहून प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. तथापि, शुल्कवाढीचा निर्णय घेताना त्यामागील कोणतीही कारणमीमांसा, अभ्यास, आर्थिक विश्लेषण अथवा वस्तुनिष्ठ माहिती यात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे, त्याच राजपत्रातील कलम ११(ग) मध्ये अनिवार्य माहिती स्वतःहून प्रसिद्ध करण्यात कसूर झाल्यास ती कर्तव्यच्युती मानून संबंधित कार्यालय प्रमुखावर सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे.त्यामुळे, स्वतःच घालून दिलेल्या तरतुदींचे पालन करण्यात झालेल्या कसुरीबद्दल सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्यावर कलम ११(ग) नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती अधिकार अर्जाच्या नमुन्यामध्ये अर्जदारास माहिती मागण्याचे “प्रयोजन” नमूद करण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही अट माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ६(२) शी स्पष्टपणे विसंगत आहे. माहिती अधिकार कायद्यातील सदर कलमानुसार माहिती मागणाऱ्या व्यक्तीस माहिती का हवी आहे, याचे कारण देणे आवश्यक नाही. त्यामुळे राजपत्राद्वारे संसदेने मंजूर केलेल्या मूळ कायद्याच्या तरतुदींचा अवमान करण्यात आला आहे.

या पत्रात सपकाळ पुढे म्हणतात की, दिनांक १२ जून २०२६ च्या राजपत्रातील बेकायदेशीर व कायद्याशी विसंगत तरतुदी तात्काळ रद्द करा. माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम ४ चे उल्लंघन केल्याबद्दल तसेच राजपत्रातील कलम ११(ग) नुसार सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी.माहिती अधिकार अर्जाच्या नमुन्यातील “प्रयोजन” नमूद करण्याची अट तात्काळ रद्द करून त्याबाबत शुद्धीपत्रक (Corrigendum) प्रसिद्ध करण्यात यावे. शुल्कवाढीमागील कारणे, अभ्यास अहवाल, आर्थिक विश्लेषण व इतर सर्व संबंधित माहिती माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम ४ नुसार स्वतःहून सार्वजनिक करण्यात यावी. यापूर्वी राज्य सरकारने विविध विभागांना स्वतःहून माहिती अधिकारांतर्गत माहिती जाहीर करण्याचे आदेश अनेकदा दिले आहेत. तरीही अशी माहिती जाहीर न करणा-या किती विभाग प्रमुखांवर आपल्यातर्फे आजवर कारवाई करण्यात आली, याची माहितीही देण्यात यावी.