पुणे-नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या २५ जून २०२६ रोजी जाहीर होणार आहे. हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता आहे, कारण अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल समोर येत आहे.
या संवेदनशील प्रकरणात गुन्हा घडल्यापासून तपास यंत्रणा आणि न्यायालयाने अत्यंत कौतुकास्पद व वेगाने काम केले आहे. केवळ १६ दिवसांत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. त्यानंतर पुढील १६ दिवसांत सर्व महत्त्वाच्या साक्षी व पुरावे नोंदवून घेण्यात आले. यानंतर २० दिवसांमध्ये अंतिम युक्तिवादही पूर्ण करण्यात आला. संपूर्ण खटल्याची प्रक्रिया अतिशय वेगाने पार पडल्यामुळे महिन्याभराच्या आतच पीडितेला अंतिम न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या खटल्याचा अंतिम युक्तिवाद देखील पूर्ण झाला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी न्यायालयात सरकारची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडली. त्यांनी न्यायालयात गुन्ह्याचा सविस्तर घटनाक्रम दर्शवणारा टाईमलाईन चार्ट, वैद्यकीय पुराव्यांचे विश्लेषण, फॉरेन्सिक डेटा चार्ट, डीएनए प्रोफाईलिंग मॅट्रिक्स आणि आरोपीचा गुन्ह्याशी थेट संबंध सिद्ध करणारा कनेक्टिव्हिटी चार्ट सादर केला. या भक्कम वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांसोबतच ऐतिहासिक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देत सविस्तर लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर ठेवण्यात आला.
बचाव पक्षानेही आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सविस्तरपणे ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, अंतिम निकालासाठी २५ जून २०२६ ही तारीख निश्चित केली आहे. नसरापूरमधील या अत्यंत संतापजनक प्रकरणामध्ये पीडित चिमुकलीला लवकरात लवकर आणि कठोर न्याय मिळावा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची भावना होती.

