- रेल्वेफाटकमुक्तीच्या दिशेने ‘पीएमआरडीए’चे महत्त्वाचे पाऊल!
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या आणि रस्ते रेल्वेफाटकमुक्त करण्याच्या दृष्टीने आज (शुक्रवार) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. ‘पीएमआरडीए’ हद्दीतील रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग (आरयूबी) यांच्या जलद व दर्जेदार बांधकामासाठी ‘पीएमआरडीए’ने ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.’ (महारेल) या कंपनीसोबत अधिकृत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाहतुकीच्या प्रश्नांच्या निराकरणास मोठी मदत होणार आहे.
मुख्यमंत्री तथा ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेशातील वाहतूककोंडीची समस्या गांभीर्याने घेत, रेल्वेफाटकमुक्तीसाठी विशेष पुढाकार घेतला होता. यासंदर्भात पूर्वी झालेल्या बैठकींमध्ये रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पादचारी पूल (एफओबी) आणि भुयारी मार्ग यांची कामे वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत करण्याऐवजी, या कामांमध्ये तांत्रिक अनुभव असलेल्या ‘महारेल’मार्फतच करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या प्रक्रियेला गती मिळाली.
या निर्देशांनंतर ‘पीएमआरडीए’अंतर्गत हे प्रकल्प ‘महारेल’कडे सोपविण्याच्या दृष्टीने दोन्ही संस्थांमध्ये बैठकांचे सत्र पार पडले. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सामंजस्य कराराचा मसुदा तातडीने अंतिम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज या मसुद्यावर दोन्ही बाजूंकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल आणि ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी यांच्यासह दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या सामंजस्य करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील अनेक रस्ते रेल्वेफाटकमुक्त होणार असून, रेल्वे फाटकांमुळे रस्त्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आता इतिहासजमा होण्यास मदत होणार आहे. तसेच, ‘पीएमआरडीए’ क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

