Home Blog Page 6

पर्वती पायथा अत्याचाराचा प्रयत्न: संतप्त महिलांचे आंदोलन

पुणे- पर्वती पायथा परिसरात एका अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच नातलगाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ आज तीव्र आंदोलन करण्यात आले. या अमानुष आणि संतापजनक घटने विरोधात स्थानिक महिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीच्या प्रतीकात्मक तिरडी आंदोलन करत निषेध नोंदवला.

या आंदोलनादरम्यान आरोपीच्या प्रतीकात्मक तिरडीला चपला मारत परिसरात फिरवण्यात आले. “अशा नराधमांना समाजात जागा नाही”, “लहान मुलींवरील अत्याचार थांबवा”, “महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाई करा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.यावेळी घटनेच्या परिसरातील अनेक स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलनात माननीय रूपाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, प्रिया सूर्यवंशी यांनी सहभाग घेत पीडितेला न्याय मिळवून देण्याची ठाम भूमिका मांडली.या संपूर्ण आंदोलनाचे नियोजन व आयोजन भारती लोंढे यांनी केले होते. उपस्थित महिलांनी प्रशासनाकडे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त केला.“आज जर अशा विकृत प्रवृत्तीविरोधात समाज रस्त्यावर उतरला नाही, तर उद्या प्रत्येक घरातील मुलगी असुरक्षित होईल. अशा नराधमांना तात्काळ कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कबड्डी,खो-खोमध्ये महावितरण, राजस्थानची आगेकूच

पुणेदि मे २०२४: एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बुधवारी (दि.६) झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यांमध्ये महावितरणच्या पुरुष व महिला संघाने प्रतिस्पर्धी संघावर सहज विजय मिळवला. तर खो-खोमध्ये महावितरणच्या पुरुष संघासह राजस्थानच्या महिला व पुरूष संघाने आगेकूच केली आहे.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज पहिल्या सत्रात कबड्डी, खो-खोचे साखळी सामने झाले. कबड्डीच्या सामन्यांमध्ये महापारेषण संघाने मध्यप्रदेशच्या एमपी पॉवर संघाचा ३ गुणांनी पराभव केला. तर महावितरणने एकतर्फी वर्चस्व गाजवत महानिर्मिती संघाचा २६ गुणांनी पराभव केला. पंजाब पॉवरने उत्तराखंडच्या पॉवर ट्रान्समिशन कंपनीचा १७ गुणांनी आणि हरियाणा संघाने गुजरात संघाचा ३० गुणांनी पराभव केला. कबड्डीच्या महिला गटात हिमाचल प्रदेशने महापारेषण संघाचा ३२ गुणांनी तर महावितरणने हरियाणा पॉवर संघाचा ४८ गुणांनी एकतर्फी पराभव केला.

खो खोच्या महिला गटात राजस्थान संघाने गुजरात ऊर्जा विकास निगम संघाचा पराभव केला. तर पुरुष गटात हरियाणा पॉवर संघाने मध्यप्रदेश पॉवर संघाचा, राजस्थान विद्युत निगम संघाने गुजरात ऊर्जा विकास निगमचा तर राष्ट्रीय खो खो संघाचा कर्णधार व महावितरणचा खेळाडू प्रतिक वाईकर याच्या नेतृत्वात महावितरणने हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळ संघाचा सहज पराभव केला.

प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची:महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुण्यात थाटात उद्घाटन

पुणेदि६ मे २०२६: सर्व खेळाडूंना एकत्रितपणे, एकजुटीने व सहकार्याने खेळूनच विजयाला गवसणी घालावी लागते. त्यामुळे कोणत्याही संघात सर्वप्रथम संघभावना निर्माण झाली की प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रामुख्याने विद्युत कंपन्यांमधील खेळाडूंचा सहभाग व नावलौकीक वाढत आहे, ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. ६) केले.

बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या तीन दिवसीय क्रीडास्पर्धेला प्रारंभ झाला. महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. सुनील काकडे, आयोजन समितीचे उपाध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप (महापारेषण)व श्री. अशोक घाडगे, मुख्य अभियंता श्री. धनराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. भूषण कुलकर्णी , मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती), विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. जिग्नेश राय, सरचिटणीस श्री. नरेश कुमार, उपाध्यक्ष श्री. भरत पाटील, खजीनदार श्री. ललित गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

विद्युत नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने देशातील सर्व विद्युत कंपन्यांच्या खेळाडूंचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. सर्व विद्युत कंपन्या आणि त्यांच्या उत्कृष्ट खेळाडूंना देशपातळीवर एकत्र आणण्यासाठी या मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे गौरवोद्गार संचालक श्री. पवार यांनी काढले. प्रादेशिक संचालक श्री. सुनील काकडे यांनी सांगितले, की विद्युत क्षेत्र धकाधकीचे आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धेतून कर्मचारी मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर बनतात. यासह त्यांच्या मैदानातील शिस्तीने कार्यालयातील कार्यक्षमतेत देखील वाढ होते.  

अत्यंत नेत्रदीपक व उत्साहात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे खजिनदार श्री. ललित  गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी,  रामगोपाल अहीर, भक्ती जोशी, सोनाली बाविस्कर, स्वागती सोळंकुरे यांनी केले तर श्री. अशोक घाडगे यांनी आभार मानले.

या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गुजरातहरियाणातेलंगाणाराजस्थानउत्तराखंडपंजाबहिमाचल प्रदेशमध्यप्रदेशदिल्ली आदी राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे ४१ संघ आणि सुमारे ५३८ महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत.

रितू तावडेंना डोक्याचा भाग आहे का?:पदमुक्त झाल्यावर माझ्याच बाजूला बसतील, तेव्हा बघून घेईन; किशोरी पेडणेकरांचा इशारा

मुंबई-महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त करावा तितका कमी. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे कुठे? लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांवर सरकारच्या संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो, अशी टीका मुंबईच्या माजी महापौर व मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी महापौर रितू तावडे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर टीका करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आनंदोत्सव साजरे करण्यात महापौर व्यस्त आहेत. त्यांना डोक्याचा भाग आहे का? स्वतःच्या महापौर कार्यकाळात 138 पुरस्कार मला मिळाले. रितू तावडे अडीच वर्षानंतर जेव्हा पदमुक्त होतील तेव्हा माझ्याच बाजूला बसतील तेव्हा त्यांना मी बघेनच, असा थेट इशाराच पेडणेकर यांनी दिला आहे.

मीनाताई बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात डिलिव्हरीचे प्रमाण गेल्या काही वर्षात घटले आहे, यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, यामागे संशयास्पद घडामोडी असल्याचा संशय आहे. कोविडनंतरही सेवा सुधारली नाही. आवश्यक डॉक्टरांची कमतरता असल्याचा मुद्दा गंभीर आहे. रात्री डिलिव्हरीसाठी रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याची शंका आहे. मीनाताई ठाकरे या नावामुळे राजकीय हेतूने दुर्लक्ष होत आहे का? असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

कोळी समाजावर दबाव टाकल्यास आंदोलन करणार

तसेच पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, विरोधकांनी सभागृहाची कार्यपद्धती आणि शिस्त शिकावी. कोरम पूर्ण करावा. तसेच कोळी समाजावर दबाव टाकल्यास आंदोलन करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मुंबईतील मूळ रहिवासी म्हणून कोळी समाजाचा सन्मान राखावाच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ऑपरेशन टायगरवर बोलताना त्या म्हणाल्या, ऑपरेशन टायगर संदर्भात लोकप्रतिनिधींवर आर्थिक दबाव टाकला जात आहे. कोण कुठे जाईल, त्याला थांबवता येणार नाही. तसेच सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना काम करू दिले जात नसल्याची टीका पेडणेकर यांनी केली आहे.

पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा; आरोपीला जामीन नको, कठोर कारवाई – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांना फोन करून दिला धीर; शासन पूर्णपणे पाठीशी

‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत, शिक्षण व संरक्षण; भोंदूगिरीविरोधात कडक भूमिका

पालघर, दि.६ मे २०२६ : पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेत, त्यांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची मनःस्थिती जाणून घेतली आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “या अत्यंत गरीब आणि दुर्बल कुटुंबाची एकच मागणी आहे – न्याय. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये. न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी पोलिसांशी समन्वय साधून प्रत्येक पाऊल उचलले जाईल.”

डॉ. गोऱ्हे यांनी पीडित मुलीच्या भविष्याचा मुद्दा विशेष महत्त्वाचा मानला. “मुलीला पुढे शिकायचे आहे आणि तिने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न व्यक्त केले आहे. तिच्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा राजकीय प्रभाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. “आरोपीला मदत करणारे, साक्षीदारांवर दबाव टाकणारे किंवा अन्य कोणताही अडथळा निर्माण करणारे व्यक्ती असतील, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे डॉ. गोऱ्हे यांनी बजावले.

डीएनए चाचणी, मजबूत पुरावा आणि साक्षीदार संरक्षणावर भर

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, डीएनए चाचणींसह सर्व वैज्ञानिक पुरावे गोळा करून खटला भक्कम बनवला जाईल. साक्षीदार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी निदर्शनास आणली. शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक ग्रामस्थ सतत पीडित कुटुंबासोबत राहतील, असेही त्यांनी आश्वासन दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर

भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी पीडित मुलगी, आई आणि बहिणीशी संवाद साधत त्यांना धीर दिला. “सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी तातडीने निर्देश दिले आहेत,” असा विश्वास कुटुंबीयांना दिला. तसेच शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितेच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

पीडितेला सर्वांगीण मदत

प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार, पीडित मुलीला तातडीने ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत, पोलीस संरक्षण, वैद्यकीय उपचार आणि मानसिक समुपदेशन देण्यात येणार आहे. बालसंगोपन योजना, आदिवासी विकास विभागाची न्यूक्लिअस योजना आणि एकल महिलांसाठी उपलब्ध योजनांचा लाभही देण्यात येईल.

अंधश्रद्धेविरोधात जनजागृती

डॉ. गोऱ्हे यांनी अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात कडक भूमिका घेतली. “तंत्र-मंत्राच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह पॉक्सो कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्यात यावीत,” अशी विनंती त्यांनी केली.

राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष वेधत त्यांनी फास्टट्रॅक न्यायालयांची संख्या वाढवण्याची मागणी केली. अपेक्षित १३८ पैकी फक्त ४० न्यायालये कार्यरत असल्याने उर्वरित तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय बैठक

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, पोलिस उपअधीक्षक समीर महेर, पोलिस निरीक्षक अमर पाटील, उपविभागीय अधिकारी विशाल खत्री, जिल्हा महिला अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. तसेच, त्यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्याशीही दूरध्वनीवर सविस्तर चर्चा करून तपासाची गती, पुरावे संकलन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. आदिवासी भागात योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती शिबिरे आणि आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी शिवसेना माजी आमदार मनीषा निमकर, पालघर संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, अ‍ॅड. संगीता चव्हाण व महिला आघाडी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी, “पीडितेला न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत आरोपी सुटणार नाही,” असे ठाम आश्वासन यावेळी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात सेवानिवृत्तांचे पेन्शनसाठी धरणे आंदोलन

पुणे :  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (म.जी.प्रा.) मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून निवृत्ती वेतन मिळाले नसल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून आज पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. भीषण उन्हाळ्यात वयोवृद्ध कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत असल्याने तात्काळ पेन्शन तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

म.जी.प्रा. कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाकडे निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच म.जी.प्रा. च्या मुकह्या अभियंता वैशाली आवटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष  एस. डी. देशपांडे, उपाध्यक्ष स. सी. आलेकर , कार्याध्यक्ष ए. जी. देशमुख, अरुण निर्भवणे,  गजानन गटलेवार,  ए. जी. देशमुख, सरचिटणीस संजय केळकर, डी . के. इनामदार,  प्रिया माळी, श्रीकांत राऊत  यांच्यासह शेकडो निवृत्त कर्मचारी , अभियंते उपस्थित होते. 

संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महालेखाकार कार्यालयाने लेखाशीर्ष गोठविल्यामुळे मार्च २०२६ पासून सेवानिवृत्ती वेतन देणे थांबवले आहे. तसेच वेतनासाठी वापरण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कोडची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी संपल्याने पुढील वेतन वितरण अशक्य झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक संकटात सापडले असून त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. औषधोपचारांसाठीही पैसे उपलब्ध नसल्याने अनेकांची प्रकृती खालावत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेने नमूद केले की, २३ मार्च २०१७ रोजी शासनाने म.जी.प्रा. कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देऊन त्यांच्या वेतन व निवृत्ती वेतनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप पूर्णपणे झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर, शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित बाबी मार्गी लावाव्यात आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेन्शन अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

म.जी.प्रा. कर्मचारी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरुण निर्भवणे व सरचिटणीस गजानन गटलेवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

विरोधी पक्ष ही भाजपची “बी” टीम – चेतन पवार

पिंपरी, पुणे (दि. ६ मे २०२७) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष सक्षम भूमिका घेत नाही. या महापालिकेतील विरोधी पक्ष महाराष्ट्रात भाजप बरोबर सत्तेत सहभागी आहे. म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष ही भाजपची “बी” टीम असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष चेतन पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
बुधवारी (दि.६) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी उप जिल्हा प्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, उपशहर प्रमुख अमोल निकम, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, उपशहर प्रमुख राजाराम कुदळे, पार्थ गुरव, बाळासाहेब जम, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, उपजिल्हा संघटिका वैभवी घोडके, कल्पना शेटे, विभाग संघटिका बेबी सय्यद उपस्थित होते.
तत्पूर्वी शहर शिवसेनेच्या वतीने चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे नसरापूर आणि सहकारनगर पुणे येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच या घटनांची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. या घटनेबाबत भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील शिवसेनेने निषेध केला.
पत्रकार परिषदेत चेतन पवार यांनी सांगितले की, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन आणि संघर्ष करीत शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी नुकतीच माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड जिल्हा शहर अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेल. आगामी काळात लवकरच पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघातील जुन्या, नव्या शिवसैनिकांना एकत्र घेऊन सर्वांशी योग्य समन्वय साधून नवीन शहर कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. यामध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्जबाजारी करणाऱ्या तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कारभाराची आणि नुकत्याच ५२ कोटी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराविषयी माहिती घेऊन न्यायालयात दाद मागण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनेला प्रतिनिधित्व नसले तरी दखील महापालिकेच्या कारभारावर व भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्यासाठी शिवसेनेचे प्रतिनिधी मंडळ नेमण्यात येईल. तसेच महिला सुरक्षा, पाणी, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, अतिक्रमण, कायदा, सुव्यवस्था याविषयी सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येतील आणि भाजपचा तसेच विरोधी पक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते वेळोवेळी करतील असेही चेतन पवार यांनी सांगितले.

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग
(एपीटीएल) प्रणालींची स्थापना

मुंबई, दि.५ : देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार व संशोधन केंद्र असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे निदान व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग प्रणाली (एपीटीएल) या तीन प्रगत यंत्रणांची यशस्वी स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या नव्या प्रणालींमुळे नमुन्यांचे अचूक लेबलिंग आणि बारकोडिंग स्वयंचलित पद्धतीने होणार असून, मानवी त्रुटी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी, निदान प्रक्रियेत अचूकता वाढणार असून रुग्णांच्या सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होईल. तसेच, रुग्णालयातील क्लिनिकल वर्कफ्लो अधिक सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे.

विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये निदानातील अचूकता आणि वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. एपीटीएल प्रणालीमुळे नमुने हाताळण्यातील गोंधळ, विलंब आणि चुकीची ओळख यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील. त्यामुळे डॉक्टरांना अधिक विश्वासार्ह अहवाल मिळून उपचार प्रक्रियेत गती येईल.

जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवांकडे आणखी एक पाऊल

या उपक्रमामुळे रुग्णालयातील प्रयोगशाळा व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होऊन, जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांकडे आणखी एक पाऊल टाकले गेले आहे. सीएसआर च्या माध्यमातून अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांची उभारणी केल्याने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत होत आहे. या उपक्रमासाठी इंडियन ऑइल कंपनीने सहकार्य केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले.

निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “टाटा मेमोरियल रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक एपीटीएल प्रणालीमुळे निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि गती वाढणार आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची ही दिशा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. सीएसआर च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात होणारी ही गुंतवणूक भविष्यात अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी मोलाची ठरेल.”

दुचाकीवरून आईस्क्रीम विकणाऱ्याने केला १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग

पुणे : पुण्यातील नसरापूर आणि पर्वतीमधील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असताना आता मुळशी तालुक्यातून एक नवी धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील एका गावात दुचाकीवरून आईस्क्रीम विकणाऱ्या इसमाने १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारी २ च्या सुमारास पीडित मुलगी आपल्या लहान चुलत बहिणीसोबत आईस्क्रीम घेण्यासाठी आरोपी पिंटू शिवकुमार याच्याकडे गेली होती. आरोपीने (रा. सूस, ता. मुळशी, मूळ उत्तर प्रदेश) मुलीला जवळ घेऊन तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी दुचाकी घेऊन पळून गेला.

पीडित मुलीने घरी आल्यावर पालकांना सर्व प्रकार सांगितला. पालक आणि ग्रामस्थांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत त्याला पकडले आणि पौड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. ही घटना समोर आल्याने परप्रांतीय फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील बालिका सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपाच्या नगरसेविकेसह तिच्या पतीवरही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

भाजपच्याच सहकारी नगरसेविकेच्या पित्याने दाखल केली तक्रार

पुणे : भाजपाच्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील(वय ३८ रा. भवानी पेठ कासेवाडी ) आणि त्यांचे पती तुषार तानाजी पाटील(वय ४८ रा. भवानी पेठ कासेवाडी ) यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग उर्फ बापू दिगंबर कांबळे(वय ५७ रा. १६१ घोरपडे पेठ ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.विशेष म्हणजे, तक्रारदार हे भाजपच्याच नगरसेविका मृणाल कांबळे यांचे वडील आहेत. त्यामुळे एकाच पक्षातील दोन नगरसेविकांमधील वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२०२६ भारतीय न्याय सहिता सन २०२३ चे कलम ३५९.३५२.३(५) व अनुसूचित जाती प्रतिबंधीत कायदा १९८९, सुधारीत २०१६ चे कलम ३(१)(s)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात २०१२ पासून २०२६ पर्यंत गुन्हा घडल्याचे म्हटले आहे.


भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार ,सुनिल कांबळे व हेमंत रासने या स्थानिक आमदार यांचे मध्यस्थीने वाद मिटविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तसेच मी मातंग समाजाचा असल्यानेच पाटील दांपत्य जाणून बुजून वेळोवेळी अशी त्रास देत आहेत. जाणूनबुजून आमच्या समाजाला टार्गेट करून कटकारस्थान करुन त्यांची हाणी करण्यासाठी त्रास देत आहे. तसेच अनुसुचित जातीतील महिलेच्या विरोधात प्रचार करणे, तिला निवडुन येवु नये म्हणून प्रयत्न करणे, प्रचारादरम्यान चार एकत्र उमेदवार यांचे लावलेल्या रिक्षा वरील व सोसायटीतील मुख्य कचेरीवरील बॅनरमधील जातीय द्वेषातून माझी मुलगी मृणाल हिचे फोटो झाकणे ,अनुसूचित जातीतील कार्यकर्त्यांना दमदाटी करून , जातीयवाचक शिवीगाळ करणे,दोन जातीत तेढ निर्माण केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.या सर्व आरोपांच्या आधारे नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा वाद केवळ एका बाजूने नाही. काही दिवसांपूर्वीच नगरसेविका अर्चना पाटील यांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या विरोधात कट केला रचला जात असून आपले मॉर्फ केलेले व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर, या वादाची रीतसर तक्रार त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केल्याचे सांगितले जात आहे.पुण्यातील भाजपचे बडे नेते या दोन्ही नगरसेविकांमधील वाद मिटवण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी पडद्यामागून प्रयत्न करत होते. मात्र, आता थेट ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने हा वाद मिटण्याऐवजी अधिकच चिघळल्याचे दिसून आले आहे.

सहायक पोलीस आयुक्त ऋषिकेश रावले , अनुजा देशमाने ,पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण,शर्मिला सुतार , सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे,फौजदार महेंद्र कांबळे यांनी याप्रकरणी काल संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत तासभर भेट देऊन माहिती घेतळ्यावर सह्यक निरीक्षक अनिता तोंडे यांनी हि फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने या स्वतः याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता

मुंबई दि. ६ : महाराष्ट्राच्या विकास प्रवासात विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या (जायका) या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता वैद्यकीय क्षेत्रातही सहकार्याची नवी दिशा निर्माण होणार आहे. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यास उत्सुक असून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यापूर्वी आसाम आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये यशस्वी प्रकल्प राबविल्यानंतर, जायका आता महाराष्ट्रातही ¬‘मेडिकल केअर सिस्टम’ मजबूत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. विशेषतः राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत समन्वय साधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रस्तावित भागीदारीत खालील महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, सध्याच्या शासकीय वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक निदान (डायग्नोस्टिक) यंत्रणा अधिक सक्षम करणे विशिष्ट आजारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणे. नवीन नर्सिंग आणि पॅरामेडिकल महाविद्यालयांची स्थापना करून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे. आरोग्य व्यवस्थापन प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सहाय्य, राज्य सरकारच्या वतीने या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी दर्शविली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय जळगांव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदूरबार व गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये १०० प्रवेश क्षमतेचे शासकीय बीएस्सी नर्सिंग विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व संलग्नित रूग्णालयांच्या पायाभूत सुविधांकरिता तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी, याकरिता ‘स्ट्रेन्थनिंग टर्शरी हेल्थ केअर डिलीव्हरी, मेडिकल एज्युकेशन सिस्टीम ॲण्ड नर्सिंग सिस्टीम इन महाराष्ट्र’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीकडून ३ हजार ७०८ कोटींचे वित्तीय सहाय्य उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पात वर्धा, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर या नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी तसेच मुंबईतील जीटी, सेंट जॉर्ज, धुळे, सोलापूर, अंबेजोगाई, अकोला, आयजीएमसी नागपूर, रत्नागिरी, पालघर, धाराशिव येथील नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. तर बारामती, सांगली (मिरज), कोल्हापूर येथील नर्सिंग महाविद्यालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय अहिल्यानगर, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, मुंबई, नाशिक, परभणी, सातारा, पालघर, रत्नागिरी, वर्धा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तसेच भारत-जपान शैक्षणिक आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत रूग्णालय व्यवस्थापन व प्रशासन मानवसंसाधन विकास यांच्या क्षमता वृध्दीसाठी तरतूद करण्यात येणार आहे.

या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक होईल .त्यामुळे राज्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.एकूणच, जायका आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील ही प्रस्तावित भागीदारी आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुण्याच्या महापौरांचे पोलिस आयुक्तांना पत्र:सीसीटीव्ही दुरुस्ती, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पडताळणीची मागणी

पुणे दिनांक ६ :
पुणे शहरात अलीकडेच नसरापूर व पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कार्यक्षम असणे अत्यावश्यक आहे. सध्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळून येत असून, त्यांची तात्काळ दुरुस्ती व पुनर्स्थापना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

तसेच, शहरातील सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची योग्य ती पोलीस पडताळणी (Verification) व पार्श्वभूमी तपासणी (Background Check) सक्तीने करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती योग्य पडताळणीशिवाय सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत राहू नये, यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

याचबरोबर, नागरिकांनीही आपल्या परिसरात सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापौरांनी नमूद केले आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींची माहिती, नवीन भाडेकरूंची नोंद, संशयास्पद हालचाली याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क ठेवण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

महापौरांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :

  • शहरातील सर्व सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घेऊन त्या तातडीने कार्यान्वित कराव्यात.
  • सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांची सक्तीने पडताळणी व नोंदणी प्रक्रिया राबवावी.
  • पार्श्वभूमी तपासणीशिवाय कोणालाही सुरक्षा कर्मचारी म्हणून नेमणूक देऊ नये.
  • नागरिकांमध्ये सुरक्षा विषयक जनजागृती मोहीम राबवावी.

पुणेकर नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, या विषयाकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रभावी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली आहे.

प्राचार्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागणारे तीन पोलीस बडतर्फ

पुणे: एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देऊन सात लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पीएसआय अजित बडे, रिल्स स्टार पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे या तिघांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. संबंधित तिन्ही पोलिस कर्मचारी हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाले आहे.

अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी या बडतर्फीचे आदेश दिले आहेत. या तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हे तिघेही अद्याप फरार आहेत. यापूर्वी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.प्राचार्यांकडून खंडणी उकळण्यासाठी या तिघांनी एका अल्पवयीन मुलीचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यांचे हे वर्तन अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले जात आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत सोनाली हिंगे, अजित बडे आणि सुदाम तायडे हे खंडणी उकळणे व धमकी देणे या प्रकारात दोषी आढळले आहेत.

या तिघांनी केलेल्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे. तिघे फरार असल्याने ते विभागीय चौकशीला हजर राहू शकले नाहीत. फरार कालावधीत ते साक्षीदारांना धमकावू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.पोलिसांवर जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी त्यांना पोलिस दलातून बडतर्फ करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे विभागीय चौकशी बाजूला ठेवून, मिळालेल्या अधिकारानुसार संविधानातील कलम 311(2) नुसार या तिघांना बडतर्फ करण्यात आले आहे.

सिंहगडावर सूर्यास्त पाहताना तो १५० फुट दरीत कोसळला अन रात्री …..

पोलीस व आपत्ती व्यवस्थापनाने
रात्री वाचविले युवकाचे प्राण

पुणे-काल सिंहगड फिरण्यासाठी आलेले पर्यटक योगेश मोहन शितोळे वय 35 राहणार शिरूर हे सकाळी सिंहगड फिरण्यासाठी आले होते दुपारी साधारण साडेचार पाच वाजता ते सूर्यास्त पाहण्यासाठी पश्चिम दिशेला हवा पॉईंट या ठिकाणी दरिपाशी सूर्यास्ताचे फोटो घेण्यासाठी गेले होते पण काही वेळानंतर गवतावरतून त्यांचा पाय घसरून ते जवळपास खोल दीडशे फूट दरीमध्ये घसरत जाऊन पडले पडल्यानंतर काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली व संध्याकाळी सात साडेसातला ज्यावेळेस त्यांना शुद्ध आली त्यावेळेस त्यांनी तात्काळ 112 ला कॉल करून दरीमध्ये पडल्याची माहिती दिली.
त्यानंतर हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी अनिकेत काळे यांनी संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती हवी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला दिले तात्काळ त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू टीम व हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी सिंहगडावरती दाखल होऊन साधारण 150 ते 170 फूट खोलदरीमध्ये जाऊन त्यांना सुरक्षितरीत्या दरीमधून वर आणले व खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले व याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.
सहभागी झालेली रेस्क्यू टीम
तानाजी भोसले
संतोष भगत
गणेश सपकाळ
संजय चोरघे
नाना जरंडे
कृष्णा मरगळे
उत्तम पिसाळ
वैभव भोसले
पोलीस
अनिकेत काळे
प्रवीन तेलवाडे
#sinhgad #pune #पुणे

पुरंदर विमानतळासाठी प्रति एकर 1 कोटी 61 लाख 1 हजार 915 रुपये इतका मोबदला..6500 कुटुंबांना नोकरीचीही संधी!

पुणे: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ , बाधितांना जमिनीचा मोबदला देण्यास 7 मे पासून सुरुवात होणार असल्याची घोषणा पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डुडी म्हणाले, पुरंदरमधील सात गावांतील सुमारे 1216 हेक्टर आणि अतिरिक्त 242 एकर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऐतिहासिक दर जाहीर करण्यात आला असून, व्याजासहित प्रति एकर 1 कोटी 61 लाख 1 हजार 915 रुपये इतका मोबदला दिला जाईल.
विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या(Farmer)जमिनींत फळबागा आहेत, त्यांना दुप्पट दर मिळणार आहे. तसेच विहीर आणि बोरवेलसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. सरासरी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जवळपास 2 कोटी रुपये जमा होतील आणि या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही.जमीन संपादनाची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि सासवड उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत सात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. 10 जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून, ज्या शेतकऱ्यांचा संमती करार पूर्ण होईल, त्यांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे तात्काळ पैसे जमा केले जातील. जे शेतकरी सहमती देणार नाहीत, त्यांच्या बाबतीत कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले
जमिनीच्या दराबाबत कोणताही संभ्रम मनात न बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.केवळ आर्थिक मोबदलाच नव्हे, तर बाधितांच्या भविष्याचा विचार करून प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या जाणाऱ्या जमिनीतील 6500 कुटुंबांतील प्रत्येकी एका सदस्याला नोकरी दिली जाणार आहे.तसेच, मोठ्या प्रमाणात हाती येणाऱ्या पैशांचा विनियोग कसा करावा, यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. अशी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला आहे.