Home Blog Page 4

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती व खो-खो मध्ये महावितरण संघाला विजेतेपद

पुणेदि मे २०२६: येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या १० वजन गटामध्ये ५ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद मिळवले. तर महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदकाची अपेक्षित कमाई केली. तसेच बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने विजेतेपद मिळवले.

एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीच्या १० वजनगटामध्ये शुक्रवारी (दि. ८) अंतिम सामने झाले. यात विविध वजनगटानुसार अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे. ५७ किलो १) सुदर्शन पाटील (महावितरण) व जर्नेलसिंग (हिमाचल प्रदेश), ६१ किलो अश्विन मोरे (महावितरण) व सुरेश कुमार (हरियाणा), ६५ किलो राजकुमार काळे (महावितरण) व अजय कुमार (हिमाचल प्रदेश), ७० किलो रणवीरसिंग (पंजाब) व आनंद नागरगोजे (महावितरण), ७४ किलो सुखबीरसिंग (हिमाचल प्रदेश) व नरेंदरसिंग (पंजाब), ७९ किलो अखिल मुजावर (महावितरण) व शेरोसिंग (पंजाब), ८६ किलो अजय कुमार (हिमाचल प्रदेश) व दीपक कुमार (राजस्थान), ९२ किलो बलवीरसिंग (हिमाचल प्रदेश) व अरूण गौड (हरियाणा), ९७ किलो अमोल गवळी (महावितरण) व मदन (हरियाणा), १२५ किलो विजेंदरसिंग (हिमाचल प्रदेश) व प्रमोद ढेरे (महावितरण).

यानंतर महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो-खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी महावितरणच्या आक्रमण व संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली आणि हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण आणि एक डाव राखून एकतर्फी विजय मिळवला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ व मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा ३६  विरुद्ध १० असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा ४८ विरुद्ध २८ असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे.

बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने (४५) हरियाणा संघाला (३०) १५ गुणांनी विजय मिळवत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. पंजाबकडून हरप्रित सिंग यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर तृतीय स्थानासाठी अत्यंत चुरशीच्या व शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण झालेल्या बास्केटबॉलच्या लढतीत महावितरण संघाने (२३) राजस्थान संघाचा (२१) केवळ २ गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठे यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.  

अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

0

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयीन सुनावणी आणि पीडित कुटुंबांना तातडीच्या मदतीची मागणी

मुंबई, ७ मे २०२६ : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यात अल्पवयीन मुली आणि मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांना पत्र पाठवून कठोर आणि तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनांचा उल्लेख करत त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितांना जलद न्याय देण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळचे नातेवाईक आणि शेजारीच आरोपी असल्याने समाजात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. थेऊर येथे ६ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचाराचा प्रयत्न, लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, अकोल्यात १० वर्षीय चिमुकलीवर वृद्ध शेजाऱ्याकडून अत्याचार, कोल्हापुरात जन्मदाते वडील व नातेवाईकांकडून १५ वर्षीय मुलीवर पाच वर्षे सुरू असलेले अत्याचार तसेच सोलापुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या सर्व प्रकरणांचा तपास जलदगतीने पूर्ण करून तातडीने चार्जशीट दाखल करावी, आरोपींना जामीन मिळू नये यासाठी कठोर भूमिका घ्यावी आणि सर्व खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना POCSO कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

तसेच प्रत्येक पीडित बालकाच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत ५ ते १० लाखांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी, बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा आणि पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. पीडित कुटुंबांना सुरक्षित निवास, आर्थिक उपजीविकेच्या संधी, साक्षीदार संरक्षण आणि आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या अत्यंत संवेदनशील प्रकरणांकडे वैयक्तिक लक्ष देऊन पीडित कुटुंबियांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन: आरोपीला तात्काळ बेड्या: २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

0

पुणे- खाण्याचे आमीष दाखवुन चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणा-या आरोपीला तात्काळ बेड्या ठोकुन त्याचे विरुध्द २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र येथील लोणीकाळभोर पोलिसांनी दाखल केले आहे.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु र नं. १८६ / २०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ७४ सह बालकाचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८, १२ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी महिला यांचे ६ वर्षाच्या चिमुकलीला (निर्भयास) त्यांचेच परिसरात मौजे थेऊर ता. हवेली जि. पुणे गावचे हद्दीत भिमनगर येथे राहणा-या श्रीधर लिंबाजी कांबळे वय ४६ वर्षे रा. भिमनगर थेऊर ता. हवेली जि. पुणे याने निर्भया हिचे अल्पवयाचा गैर फायदा घेवुन, ती खेळत असताना तिला खाण्याचे आमीष दाखवुन, जवळ बोलावुन घेऊन तिचेसोबत लैंगिक गैरकृत्य केल्याबाबत निर्भयाचे आईने तक्रार दाखल केल्याने लोणी काळभोर पोलीसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ अटक केली.
तसेच सदर गुन्हयाचा जलदगतीने २४ तासांच्या आत संपुर्ण तपास पूर्ण करुन आरोपीस जलदगतीने शिक्षा होईल या उद्देशाने त्याचे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार , पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, ,अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-6 सागर कवडे, सहा. पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग अनुराधा उदमले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्नेहल राजे, यांचे मार्गदशनाखाली तपास अधिकारी स.पो.निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप. निरीक्षक पुजा माळी, पोलीस उप निरीक्षक रुपाली जाधव, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, चेतन कुंभार यांचे पथकाने हि कारवाई केली.

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार,निकाल कुठे पाहता येणार?

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. निकालापूर्वी सकाळी 11 वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा केली जाईल, ज्यानंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून आपला निकाल पाहता येईल.

दहावीचा निकाल कुठे पाहता येणार?

https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.targetpublications.org/
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://results.navneet.com

वर दिलेल्या संकेतस्थळांवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची आपली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. पूर्वी जून महिन्यापर्यंत लांबणीवर पडणारे हे निकाल आता मे महिन्यातच हाती येत असून, बारावीचा निकाल 2 मे रोजी लागल्यानंतर आता दहावीचा निकालही उद्या, 8 मे रोजी जाहीर होत आहे. या तत्परतेमुळे पुढील प्रवेश प्रक्रिया आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात वेळेत होण्यास मोठी मदत होणार असून, दहावीच्या निकालापाठोपाठ आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्गही मोकळा होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टर अपघात टळला; जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती समोर आली असून, महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाडमधील एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात अचानक आलेल्या वादळात अडकले. सुदैवाने, पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. या थरारक घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला आहे.

कल्याण-मुरबाड येथे एका विवाह सोहळ्यासाठी जात असताना एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर अचानक आलेल्या जोरदार वादळात अडकल्याची धक्कादायक घटना घडली, मात्र वैमानिकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मुरबाडमधील खराब हवामान आणि पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढील प्रवास टाळून हेलिकॉप्टर पुन्हा जुहू येथील हेलिपॅडवर उतरवण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने, या आपत्कालीन स्थितीत शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व अधिकारी पूर्णपणे सुखरूप आहेत.
कल्याणमधील एका विवाह सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर बापगाव येथील हेलिपॅडवर उतरणार होते, मात्र अचानक आलेल्या वावटळीमुळे दृश्यमानता कमी होऊन हवेत मोठा अडथळा निर्माण झाला. सुरक्षेचा उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे मुंबईतील जुहू येथे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, या अनपेक्षित बदलानंतर बापगाव हेलिपॅडवर तैनात असलेला पोलिसांचा बंदोबस्त आता पूर्णपणे हटवण्यात आला आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीमध्ये अचानक वादळी वारा सुटल्याने सर्वत्र धुळीचे लोट पसरल्याची माहिती आहे. या वादळी वाऱ्यात अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच काही ठिकाणी झाडेही कोसळल्याची माहिती आहे. तर राज्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

नियमावली तरतुदींचे उल्लंघन: ४५ वर्षे पूर्ण केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंत्याच्या पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याची तक्रार

पुणे- नियमावली तरतुदींचे उल्लंघन करून ४५ वर्षे पूर्ण केलेल्या काही कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंत्याच्या पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याची तक्रार आता महापालिकेतील सेवक वर्गातून होते आहे .महापालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित ठेवणे या धोरणाचा फटका इतके दिवस लेखनिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांना बसत होता. आता याचा फटका अभियांत्रिकी संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील बसत आहे. सेवा प्रवेश नियमावली २०१४ मधील तरतुदींचे उल्लंघन करून ४५ वर्षे पूर्ण केलेल्या काही कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता या पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे वारंवार तक्रारी करून आणि नियम दाखवून देखील त्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त यांचा दरवाजा ठोठावला आहे.

पुणे महानगरपालिका यांच्या सेवा प्रवेश नियमावली २०१४ मधील तरतुदीनुसार पात्र असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती प्रक्रियेमध्ये न्याय मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ४५ वर्षे पूर्ण केलेल्या अनेक कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.३१ मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक व नियमसंगत पद्धतीने राबविणे आवश्यक असताना, संबंधित विभागाने चुकीच्या निकषांचा अवलंब करून पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे संबंधित कनिष्ठ अभियंत्यांचे सेवा हक्क, आर्थिक लाभ व वरिष्ठता यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

वय वर्षे ४५ पूर्ण झाल्यानंतर विभागीय परीक्षेबाबत आर आर म्हणजे सेवा प्रवेश नियमावली नुसार सूट ची तरतूद असून देखील प्रशासन मनमानी करून काढलेले परिपत्रके नाचवत अभियंत्याचे नुकसान करत आहे. पुणे मनपा सेवक वर्ग विभाग प्रशासन गेली काही वर्षांपासून आपल्या सोयी नुसार कामे करत आहे. असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पुणे मनपा प्रशासन शासनाकडील आधारित परिपत्रकाच्या आधारे वेळोवेळी कार्यवाही करत असते. २०१८ मध्ये विभागीय परीक्षेबाबत वय वर्षे ४५ ते ५० बाबत काढण्यात आलेले परिपत्रकानुसार सदरचे दिनांक नंतर लागू असले बाबत स्पष्ट आदेश असताना देखील पुणे मनपा प्रशासन मनमानी करून अभियंत्याचे नुकसान करीत आहेत. याबाबत महापालिका आयुक्त यांनी यात दखल घेऊन शासन स्तरावर मार्गदर्शन घेणे बाबत प्रशासनास आदेश द्यावेत. अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त यांचे देखील आदेश डावलले

महापालिका सेवा प्रवेश नियम मध्ये कोणतीही पन्नास वर्षाची अट नाही. शाखा अभियंता पदोन्नतीसाठी निवेदन सादर केल्यावर महापालिका आयुक्त यांनी आर आर प्रमाणे कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असताना देखील सेवक वर्ग अर्थात सामान्य प्रशासन विभाग जुनी परिपत्रके नाचवत आहे, असा आरोप देखील या कर्मचाऱ्यांनी केला आहे.दरम्यान याबाबत सामान्य प्रशासन विभागाला विचारले असता सांगण्यात आले कि, याबाबत कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची पडताळणी करून पुढील कार्यवाही करू. तसेच पुढील पदोन्नती मध्ये काही जागा रिकाम्या ठेवल्या आहेत, त्यावेळी त्यांना संधी दिली जाईल. दरम्यान प्रशासनाने असे पोकळ आश्वासन दिले असले तरीही पुढील पदोन्नती मध्ये सेवाज्येष्ठतेचा प्रश्न उपस्थित होणार आहे. याबाबत प्रशासन काही काळजी घेणार आहे का, असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ७ : केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (पीएमआयएस) २०२६‘ अंतर्गत देशामध्ये ३१ हजार ४८० हून जागेवर विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत, जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत इंटर्नशिपचा कालावधी साधारणपणे ६ किंवा ९ महिन्यांचा असणार आहे. इंटर्नशिपदरम्यान उमेदवारांना दरमहा रुपये ९ हजार इतके विद्यावेतन देण्यात येणार असून इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

योजनेसाठी पात्रतेचे निकष: उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असावे. उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा बीए.बीएस्सी, बीकॉम, बीसीए, बीबीए, बीफार्मा शाखेत आदी पदवीधर उमेदवारांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. पूर्णवेळ नोकरी करणारे किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. मात्र ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेणारे उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीही अर्जासाठी पात्र असतील.

या योजनेत MAHINDRA AND MAHINDRA LIMITED, BAJAJ AUTO LIMITED, RELIANCE INDUSTRIES LIMITED, BAJAJ ALLIANZ LIFE INSURANCE COMPANY, BERGER PAINTS INDIA LIMITED, EMCURE PHARMACEUTICALS LIMITED, HONDA MOTORCYCLE AND SCOOTER INDIA PVT. LTD., BVG INDIA LIMITED, COGNIZANT, IBM INDIA PRIVATE LIMITED अशा नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध आहे.

इच्छुक उमेदवारांनी मर्यादित कालावधीत https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून रिक्त पदांसाठी अर्ज करावा.अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ०२०-२६१३३६०६ दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

अग्निशमन दलातील २२ अधिकाऱ्यांना नागपुरात विशेष प्रशिक्षण

पुणे : शहरातील वाढत्या आपत्तीजन्य घटनांचा प्रभावीपणे सामना करता यावा यासाठी पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील २२ स्टेशन ड्युटी ऑफिसर कर्मचाऱ्यांना नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना ‘ऑन ड्युटी’ प्रशिक्षणासाठी पाठविण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

शहरात आग, नैसर्गिक आपत्ती, वायुगळती, इमारती कोसळणे, रासायनिक दुर्घटना तसेच महापूर, भूकंप यांसारख्या आपत्कालीन घटनांमध्ये अग्निशमन दलाला तातडीने मदतकार्य करावे लागते. पुणे आणि परिसरात रासायनिक कारखान्यांची वाढ होत असल्याने धोकादायक दुर्घटनांचे प्रमाण आणि स्वरूप अधिक गुंतागुंतीचे बनत आहे. नव्याने समाविष्ट गावांमध्ये भविष्यात अग्निशमन केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याने प्रशिक्षित अधिकाऱ्यांची गरज वाढणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज हे देशातील अग्निशमन आणि बचाव कार्यासाठीचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र मानले जाते. येथे ‘स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर्स’ तसेच ‘डिव्हिजनल ऑफिसर्स’ या अभ्यासक्रमांतर्गत आधुनिक आपत्ती व्यवस्थापन, रासायनिक दुर्घटनांवरील नियंत्रण, बचाव कार्यातील समन्वय आणि अत्याधुनिक उपकरणांच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे शहरातील आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

डेक्कनमधील संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ३.२४ कोटी मंजूर

पुणे : डेक्कन परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसराच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने ३ कोटी २४ लाख रुपयांच्या कामास कामास महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. कामास महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत दगडी मेघडंबरी उभारणे, भुयारी मार्गाचे सुशोभीकरण तसेच परिसर विकासाची विविध कामे करण्यात येणार आहेत. संबंधित प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेच्या भवन विभागामार्फत हे काम राबविण्यात येणार असून, मे. महिम्ना कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीने २ कोटी ७४ लाख २५ हजार रुपयांची निविदा सादर केली असून, ती अंदाजपत्रकापेक्षा ३.९ टक्के अधिक आहे. जीएसटी, मटेरिअल टेस्टिंग शुल्क आणि अन्य खर्च धरून या प्रकल्पाचा एकूण खर्च ३ कोटी २४ लाख ३७ हजार ७०३ रुपये इतका होणार आहे. भविष्यातील भाववाढ आणि मूल्यवाढीचा फरक स्वतंत्रपणे अदा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या कामासाठी महापालिकेने ३ कोटी १२ लाख २३ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. तांत्रिक छाननी समितीने २० नोव्हेंबर २०२५ रोजी या अंदाजपत्रकास मान्यता दिली होती. त्यानंतर २ कोटी ६३ लाख ९४ हजार रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

फेरनिविदेची जाहिरात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. २५ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत निविदा प्रक्रिया पार पडली. प्राप्त निविदांमधून संबंधित कंपनीची निवड करण्यात आली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत स्मारक परिसरात दगडी बांधकाम स्वरूपातील मेघडंबरी उभारली जाणार असून, भुयारी मार्ग अधिक आकर्षक करण्याबरोबरच परिसराचा विकास करण्यात येणार आहे. डेक्कन परिसराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन स्मारकाचे जतन आणि सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

देवाची उरुळीत गार्डन वेस्ट प्रकल्पासाठी ५३ लाखांच्या खर्चास मंजुरी

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : देवाची उरुळी येथे गार्डन वेस्ट प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक स्थापत्य दुरुस्तीच्या कामास महापालिकेने मंजुरी दिली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या कामासाठी ५३ लाख ५२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, संबंधित प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

या कामासाठी मे. पूजा कन्स्ट्रक्शन, हडपसर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीने ४५ लाख २४ हजार रुपयांची निविदा सादर केली असून, ती अंदाजपत्रकाच्या तुलनेत ३३.१५ टक्के कमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जीएसटी, मटेरिअल टेस्टिंग शुल्क आणि अन्य आकारांसह एकूण खर्च ५३ लाख ५२ हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाने या कामासाठी ७९ लाख ९९ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी खातेप्रमुखांनी त्यास मान्यता दिल्यानंतर ६७ लाख ६८ हजार रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. २५ नोव्हेंबरपर्यंत निविदा स्वीकारण्यात आल्या असून, एकूण सात पात्र निविदा प्राप्त झाल्या होत्या.

महापालिकेच्या माहितीनुसार, उरुळी देवाची येथील कात्रज बायपास-सासवड रस्त्यालगतची जागा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या ठिकाणी गार्डन वेस्टचे संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील हिरव्या कचऱ्याची प्रभावी हाताळणी होण्यास मदत होणार आहे.

रस्ते आणि पदपथांवर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा आणि इतर हिरव्या कचऱ्याची स्वच्छता अधिक परिणामकारकपणे करता येणार असून, शहर स्वच्छतेत सुधारणा होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील गुणांकन वाढविण्यासाठीही या प्रकल्पाचा उपयोग होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केल्याचे भिमाले यांनी सांगितले.

१००० चौ.फुटांपर्यंतच्या अनधिकृत घरांना एकपट कर

पुणे : महापालिका हद्दीतील १००० चौ.फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या अनधिकृत निवासी मिळकतींना एकपट मिळकत कर आकारण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. लहान निवासी मिळकतींनाही सरसकट तीनपट कर आकारला जात असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने हा निर्णय पुन्हा स्पष्ट केला आहे. त्यामुळे शहरातील हजारो लहान घरमालकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिका आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात अभिप्राय सादर करण्यात आला असून, ३० मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६७ (अ) मधील तरतुदींनुसार ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

नगरसेविका रुपाली धावडे आणि नगरसेवक विशाल धनवडे यांनी स्थायी समितीत या विषयावर माहिती मागविली होती. त्यानुसार प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायात १००० चौ.फुटांपर्यंतच्या अनधिकृत निवासी मिळकतींना एकपट कर आकारणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांच्या ३० मे २०१९ तसेच ९ फेब्रुवारी २०२६ च्या कार्यालयीन आदेशानुसार संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ९ फेब्रुवारी २०२६ पासून हा निर्णय लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

शहरातील अनेक नागरिकांनी १००० चौ.फुटांखालील घरांनाही अनधिकृत बांधकामांच्या श्रेणीत टाकून तीनपट कर आकारला जात असल्याची तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्पष्टीकरण देत अशा निवासी मिळकतींना एकपट करच लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस ‘पुण्याचे शिल्पकार’, झाल्यापासून पुण्यात दररोज बलात्कार, कोयता गँगचे हल्ले, ड्रग्जचा व्यापार, गुंडगिरी वाढली: हर्षवर्धन सपकाळ

एपस्टिन फाईल्समध्ये नाव आल्यापासून नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली; युद्धबंदी, व्यापार करार, कच्चे तेल खरेदी करण्याचे निर्णय अमेरिकेकडून एकतर्फी जाहीर.

ज्या तिरंग्यासाठी हजारो लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या तो तिरंगा RSS च्या कार्यालयावर अनेक वर्ष फडकला नाही.

पुणे दि. ७ मे २०२६..

‘नवं पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस’, असे पोस्टर्स व बॅनर्स पुणे शहरात जागोजागी झळकवण्यात आले त्याच पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात लैंगिक शोषणाची ७०० प्रकरणे घडली आहेत, दररोज एक बलात्कार होत आहे. ड्रग्जचा खुलेआम धंदा सुरु आहे. कोयता गँगचा हैदास सुरु आहे, गुलटेकडी मार्केट यार्डात गुंडांचा हस्तक्षेप वाढला आहे, याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत का? असा संतप्त प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या संकल्पनेतून संविधान चौक, वानवडी येथे उभारलेल्या ४५ मीटर ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा तसेच काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित राहून कॉंग्रेस पक्ष व तिरंगा राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी कॉंग्रेस पक्षाने दिलेले योगदान तसेच इतर विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पुणे कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, खजिनदार अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरूवात नसरापूर, पुणे येथील ४ वर्षीय पीडित बालिका आणि महिला व बाल अत्याचारातील अन्य पीडितांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जगात आज एपस्टिन फाईलने धुमाकुळ घातला आहे. लहान व कोवळ्या वयातील मुला मुलींचे लैंगिक शोषण करुन, त्यांच्या हत्या करण्यात आल्याचे यातून उघड झाले आहे. विकृतीचा अत्यंत घाणेरडा व किळसवाणा हा प्रकार असून यामुळे जगात भूकंप आला आहे. जगभरातील अनेक मोठ्या पदावरील व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत. याच एपस्टिन फाईलमध्ये भारतातील दोघांची नावे आहेत, एक आहेत केंद्रीय मंत्री हरदिप पुरी तर दुसरे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. नरेंद्र मोदी इस्त्रायलमध्ये जाऊन नाचले अशी माहिती समोर आली आहे. ही एपस्टिन फाईल उघड झाल्यापासून नरेंद्र मोदी अत्यंत दबावात काम करत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी अचानक युद्धबंदीची घोषणा अमेरिकेने केली. अमेरिकेबरोर दबावाखाली व्यापार करार करावा लागला. कच्चे तेल रशियाकडून घ्यायचे नाही, हे अमेरिका भाराताला सांगत आहे आणि नरेंद्र मोदी मात्र काहीही न बोलता गप्प आहेत, कारण नरेंद्र सरेंडर झाले आहेत. एपस्टिन फाईल्ससारखे बाल लैंगिक शोषणाचे प्रकार महाराष्ट्रातही वाढत आहेत, हा काय योगायोग आहे? अशी विचारणा सपकाळ यांनी केली आहे.

आपला राष्ट्रीय ध्वज तिरंग्यासाठी हजारो लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या पण तिरंग्याचा अपमान होऊ दिला नाही. या तिरंग्यातील भगवा रंग हा त्यागाचे प्रतिक आहे. पांढरा रंग प्रकाश व सत्याचे प्रतिक आहे, तर हिरवा रंग हा सुजलाम सुफलाम म्हणून घेतला आहे तर अशोक चक्र हे गतीमानतेचा प्रतिक आहे. या तिन्ही रंगाचा कार्यकारणभाव भाजपा व रा. स्व. संघ मोडू पहात आहे. संघाने तिरंग्याला विरोध करत स्वातंत्र्यानंतर जवफवास ५०-५५ वर्षे रा. स्व. संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही, अशा प्रवृत्तीविरोधात उभे ठाकले पाहिजे. आपली लढाई तिरंगा विरोधात काळ्या टोपीची आणि संविधान विरोधात मनुवादाची लढाई आहे असे सपकाळ म्हणाले.

पुण्यात ३४ हजार कोटी रुपयांचे ५४ किलोमिटरचे भूमिगत रस्ते प्रकल्प आखण्यात आला आहे. यात मोठा भ्रष्टाचार आहे. हा प्रकल्प जाहीर करताना कोणतीही जनसुनावणी घेण्यात आलेली नाही, नगरसेवकांना विचारात घेतले नाही. हा प्रकल्प पुण्यात भ्रष्टाचाराची पाळंमुळं रोवणारा आहे, त्याच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले..

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे; खो-खोमध्ये (महिला) विजेतेपद

पुणेदि मे २०२४: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने सलग दुसऱ्या दिवशीही दबदबा ठेवत अजिंक्यपदाकडे वाटचाल सुरु केली आहे. यामध्ये महावितरणच्या खो-खोच्या महिला संघाने विजेतेपद मिळवले आहे. तर कबड्डीमध्ये उपांत्य फेरीत तर खो-खो व बास्केटबॉलमध्ये पूर्वउपांत्य फेरीत महावितरणच्या संघाने प्रवेश केला आहे.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत गुरुवारी (दि. ७) खो-खोच्या महिला गटात महावितरण विरुद्ध राजस्थान असा अंतिम फेरीचा सामना झाला. यात महावितरणच्या कर्णधार भाग्यश्री फडतरे, सारिका जाधव, श्रेया जाधव, मोनिका भोसले यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये दमदार कामगिरी करीत सामन्यावरील वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या डावात १२ विरुद्ध ५ गुणांची आघाडी घेत दुसऱ्या डावात महावितरण संघाने सहा मिनिटे राखून खो-खोचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तर राजस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

खो-खोच्या पुरुष गटामध्ये महावितरण संघाने (१५) हरियाणा संघाचा (४) ११ गुणांनी सहज पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र राजस्थान (६) विरुद्ध महापारेषण (५) संघात तुल्यबळ लढत झाली व राजस्थानने एक गुणाने निसटता विजय मिळवला. आता महावितरण विरुद्ध महापारेषण आणि हरियाणा विरुद्ध राजस्थान अशी अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये सातत्य कायम ठेवले असून सर्व साखळी सामन्यांत वर्चस्व मिळवले आहे. महापारेषणचा उत्कृष्ट खेळाडू विशाल सावंत व इतर सहकाऱ्यांवर आता बलाढ्य महावितरण संघाचा पराभव करण्याचे आव्हान आहे.

कबड्डीच्या पुरुष गटामध्ये पूर्वउपांत्य फेरीत बीएसईएस राजधानी दिल्ली संघ (४९) विरुद्ध महापारेषण (३९) यांच्या अतिशय अटीतटीची लढत झाली. केवळ तीन गुणांनी महापारेषणला पराभव पत्कारावा लागला. दिल्लीच्या संजीव छिकारा, हरदेव शर्मा, रवी प्रकाश व अनिल यांनी आक्रमक पवित्रा घेत महापारेषणचे शेवट्या मिनिटापर्यंत सुरु असलेले आक्रमण थोपवून धरले. यानंतर हिमाचल प्रदेश संघाने (३२) मध्यप्रदेश पॉवर मॅनेजमेंट संघाचा (७) सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर महावितरण संघातील (३०) दीपक माने, अमित जाधव, नीलेश ठाकूर, अभिषेक नर, अजय शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्याने तेलंगणा ट्रान्समिशन संघाचा (११) १९ गुणांनी आणि हरियाणा संघाने (४८) टाटा पॉवर मुंबई संघाचा (१७) पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

बास्केटबॉलच्या साखळी सामन्यांनी या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रंगत वाढली. यात महावितरण (३४) विरुद्ध तेलंगणा (२४) लढतीत महावितरणच्या पंकज गेडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता शत्रुघ्न गोखले, आशिष खानापुरे यांनी सामन्यावर नियंत्रण ठेवत विजय मिळवला. यासोबतच सुरजितसिंग, हरप्रितसिंग, सतेंदरसिंग यांच्या आक्रमणामुळे पंजाब संघाने (२१) उत्तराखंड संघाचा (८) पराभव केला. तर हरियाणा संघ (५४) विरुद्ध महापारेषण (६) लढतीत हरियाणाने एकतर्फी विजय मिळवला.

‘प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या प्रसारासाठी महावितरणचा पुढाकार,शुक्रवारी पुणे परिमंडलात एकाच दिवशी मेळावे

पुणे,दि. ७ मे, २०२६:- केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ घराघरांत पोहोचवण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाने कंबर कसली आहे. शुक्रवारी रास्ता पेठ शहर मंडल, गणेशखिंड शहर मंडल आणि पुणे ग्रामीण मंडलातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांतर्गत महावितरणचे वीज कर्मचारी थेट गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन या योजनेचा प्रसार करणार आहेत.

पुणे परिमंडलात आतापर्यंत ३४३१२ ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. त्याची क्षमता १७० मेगावॉट इतकी असून सूर्यघर योजनेमुळे या ग्राहकांचे वीजबिल शून्यवत झाले आहे. केंद्र सरकार सूर्यघर योजनेसाठी १ किलोवॅट प्रकल्पाला ३०,००० रुपये, २ किलोवॅट प्रकल्पासाठी ६०,००० रुपये तर ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८,००० रुपये इतके अनुदान देत आहे. एका किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सरासरी १२० युनिट वीज तयार होते. सूर्यघर प्रकल्पासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून ९० टक्क्यांपर्यंत कर्ज सुद्धा मिळते.


प्रधानमंत्री-सूर्यघर योजनेला वीजग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी वीज कर्मचारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन माहिती पत्रके वाटतील आणि ग्राहकांना मिळणाऱ्या भरघोस अनुदानाची माहिती देऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करतील-

सुनिल काकडे,मुख्य अभियंता, महावितरण, पुणे

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

मुंबई, : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.