Home Blog Page 3

दहावीत उत्कृष्ट यश मिळवून कचरावेचकांच्या मुलामुलींनी शिक्षणात उमटवला आपला ठसा

दहावीत उत्कृष्ट यश मिळवून कचरावेचकांच्या मुलामुलींनी शिक्षणात उमटवला आपला ठसा आईवडिलांच्या कष्टातून प्रेरणा घेत परीक्षा दिलेल्या पैकी ८४ % विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली.

पुणे- कचरावेचकांच्या मुलामुलींनी १० वी च्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवून सामाजिक पूर्वग्रह, आर्थिक अडचणी, अभ्यास करायला जागेची कमतरता आणि आसपासचे पोषक नसलेले वातावरण सारख्या आव्हानांना चपखल उत्तर दिले आहे.

परीक्षा दिलेल्या एकूण १९९ विद्यार्थ्यांपैकी १०९ मुलांनी आणि ९० मुलींनी यंदा १० वी ची परीक्षा दिली. यामध्ये शिक्षण अपूर्ण राहिलेल्या ११ जणांनी १७ नंबर फॉर्म भरून जिद्दीने बाह्य स्वरूपात परीक्षा दिली. त्याचबरोबर, ३ कचरावेचकांनी देखील यावर्षी आपले दहावी पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण केले. सकाळी घरोघरी कचरा संकलनाची सेवा देणाऱ्या, कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेणाऱ्या स्वच्छ च्या महिला कचरावेचकांनी देखील संस्थेच्या आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या मदतीने मुलांसोबत दहावी देऊन यश मिळवले.

कचरावेचकांच्या कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेतर्फे कचरावेचकांच्या पाल्यांना या महत्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर आर्थिक सहाय्यासाठी शिष्यवृत्ती, योग्य मार्गदर्शनासाठी शिकवणी, अभ्यास करण्यासाठी व परीक्षेसाठी वह्या व स्टेशनरी सारखी मदत वर्षभरात करण्यात आली. त्याचबरोबर, आता थांबायचं नाय या चित्रपटाचा विशेष शो देखील कचरावेचक व त्यांच्या पाल्यांसाठी संघटनेने आयोजित केला होता. सफाई कामगारांनी दहावी पास केल्याची कहाणी दाखवणाऱ्या या चित्रपटातून अनेकांनी प्रेरणा घेत यंदा दहावीची परीक्षा दिली.

चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा या ओळी मुलामुलींनी आपल्या आईवडिलांप्रमाणेच प्रत्यक्षात आणल्या आहेत. शिक्षण घेऊन आत्मविश्वासाने आपला पुढचा मार्ग स्वतः घडवण्याच्या प्रवासाची दमदार सुरुवात कचरावेचकांच्या पाल्यांनी या निकालातून केली आहे.

मुलांना शिक्षणात मदत करताना स्वतः १० वी पास केली; स्वच्छ च्या कचरावेचक महिलांची प्रेरणादायी कहाणी
सकाळी घरोघरी जाऊन कचरा घेतला, रात्री जागून अभ्यास केला, स्वच्छ च्या ३ कचरावेचक महिलांनी १० वी पास केली.

नाव: वर्षा ओव्हाळ
गुण: ४६%
मागच्या वर्षी मे महिन्यात संघटनेने आता थांबायचं नाय हा सफाई कामगारांनी सर्व अडचणींवर मात करत १० वी पास केल्याची कहाणी दाखवणाऱ्या चित्रपटाचा विशेष शो कचरावेचकांसाठी आयोजित केला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर वर्षा ओव्हाळांनी निश्चय केला कि यंदा दहावी द्यायची आणि पास व्हायचंच. आपल्या दोन मुलांची पूर्ण जबाबदारी घेणाऱ्या एकल माता असलेल्या वर्षा ताईंनी रात्रशाळेत जाऊन दहावीचा अभ्यास केला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, कागदपत्रांच्या अभावी परीक्षेस बसता येईल कि नाही अशी शंका असताना, वर्षा ताईंनी जिद्दीने अभ्यास केला आणि ४६% गुण मिळवून आपले स्वप्न पूर्ण केले.

नाव: ज्योती पंडित
गुण: ४१%
स्वच्छ संस्थेतील कचरावेचक ज्योती अशोक पंडीत SRPF भागातील गावठाण भागात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम करतात. याआधी ज्योती पंडित यांचे ७ वी पर्यंतच शिक्षण झालेले होते. २७ वर्षापूर्वी कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. स्वतःच शिक्षण अर्धवट राहिले तरी, आपल्या पुढच्या पिढीला चांगलं शिकवून उच्च पदावर व प्रशासकीय सेवेत जावे पाठवायचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी अथक परिश्रम घेऊन ज्योतीताईंनी आपली मुलगी श्वेता हिचे भारतीय नौसेनेत काम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. तसेच आपल्या दोन्ही मुलांना त्या पोलीस व आर्मी मध्ये भरती होण्यासाठी मदत करत आहेत.

ज्योती ताई सांगतात, “मुलगी श्वेताचे (भारतीय नौसेना दल ) स्वप्न पूर्ण झाले. माझ्या मुलीने माझ्यासाठी स्वप्न पाहिले कि, मी यावर्षी दहावीची परीक्षा द्यावी. आणि तिला माझ्यावर पूर्ण विश्वास असल्याने सर्व कागदपत्रे आणि ऑनलाईन फॉर्म तिनेच भरला. मला आमच्या स्वच्छ संस्था आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत मार्फत मासूम संस्थेच्या रात्रशाळेत प्रवेश मिळाला. यासाठी संघटनेतील अनेकांनी मला अडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त केले. आम्हाला दाखवण्यात आलेली शिक्षणावरील फिल्म “आता थांबायचं नाही” हि माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती.

सकाळी कचऱ्याचे काम आणि संध्याकाळी शाळा असे माझे नियोजन होते. यासाठी माझ्या दोघ मुलांची व पतीची पण तेवढीच साथ मिळाली, असे ज्योतीताईंनी सांगितले. रात्रशाळेतून येण्यापूर्वी घरातील सर्व गोष्टी त्या आवरून ठेवत असत जेणेकरून अभ्यासाला वेळ मिळेल. या सर्वांच्या सहकार्याने मी आज ४१% मिळवू शकले. पुढे मी पण प्रशासकीय सेवेत जाऊन काम करावे असे स्वप्न असेल. त्या साठी पुढे जिद्दीने शिकणार आहे. आणि सोबत काम पण चालू ठेवणार आहे, अशा भावना ज्योतीताईंनी व्यक्त केल्या.

कचरावेचक आई आणि मुलाची दहावीच्या परीक्षेत यशस्वी भरारी

आईचे नाव: अर्चना घोडके
गुण: ६०%
मुलाचे नाव: यश घोडके
गुण: ५४%

शिक्षणाची आवड आणि मनात जिद्द ठेवून या आई-मुलाच्या जोडीने एकत्र दहावीची तयारी केली आणि दोघेही उत्तीर्ण झाले.

पुण्यातील स्वच्छ संस्थेतील कचरावेचक अर्चना विकास घोडके या SRPF, वानवडी भागात दारोदारी कचरा संकलनाचे काम करतात. २५ वर्षापूर्वी अर्चना यांचे आधी ९ वी पर्यंत शिक्षण झाले होते .परंतु कुटुंबाची पूर्ण जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु यंदा स्वतःचा मुलगा यश विकास घोडके १० वी ची परीक्षा देणार होता. यशला दहावीच्या तयारीसाठी मदत करणाऱ्या अर्चना ताईंना स्वतःला शिक्षणाची गोडी नव्याने लागली आणि त्यांनी देखील १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा देण्याचे ठरवले. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत व स्वच्छ संस्थेमधील सहकाऱ्यांनी शिक्षणासाठी प्रवृत्त केले असे अर्चना ताईंनी सांगितले. मासूम संस्थेच्या रात्र शाळेत प्रवेश घेवून ,सकाळी काम आणि रात्री अभ्यास करत अर्चना यांनी ६० % मिळवून यश संपादन केले आहे. आणि मुलगा यश याने ५४ % मिळवून स्वतःच्या नावाचा अर्थ प्रत्यक्षात उतरवला आहे.

मुलगा यश सांगतो कि ,मी स्वतः अभ्यास करायचो, तेव्हा आईला काही विषयांची अडचण आल्यास समजून सांगायचो आणि आम्ही दोघांनीही कुठला क्लास न लावता घरीच राहून अभ्यास केला. आई कामावरून आल्यावर संध्याकाळी रात्र शाळेत जायची तिथून आल्यावर जे शिकवले आहे ते मला सांगायची. यातून आमची अभ्यासाची गोडी वाढायची. कधी कधी मी झोपून जायचो पण आई अभ्यास करायची त्यामुळे कदाचित आईला माझ्यापेक्षा जास्त टक्के मिळाले असे यशने सांगितले.

कोणताही क्लास न लावता खुशी ने मिळवले ८९%

विद्यार्थ्याचे नाव : खुशी गणेश खुपटे
आईचे नाव: कावेरी खुपटे
गुण : 89%
Mobile: 8459695110
वस्ती – पाटील इस्टेट, शिवाजीनगर

मी कोणताही क्लास लावला नाही कारण माझा स्वतःचा स्वतः अभ्यास करण्यावर ठाम विश्वास आहे. माझी आई मला शक्य त्या सर्वप्रकारे माझ्या अभ्यासात मदत करते. आईच्या कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने मला आर्थिक मदत केलीच, पण त्याबरोबर अडचणींवर लक्ष केंद्रित न करता माझे मनोबल वाढावे यासाठी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले.

मी इतरही सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते कि मोटिव्हेशन व्हिडीओ पाहून मिळत नाही, प्रेरणा आपल्या आत असते जिचा आपण फक्त शोध घ्यायचा असतो.

पाटील इस्टेट, शिवाजीनगर इथे राहणाऱ्या कावेरी खुपटे कागद,काच,पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या सभासद आहेत. एकल माता असलेल्या कावेरी आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी फिरून कचरा गोळा करण्याचे काम करून सांभाळतात

विद्यार्थ्याचे नाव : सार्थक मेश्राम चंदनशिवे
आईचे नाव: साधना मेश्राम चंदनशिवे
गुण : 86.60%
Mobile: 9881895802
वस्ती – दांडेकर पूल, सिंहगड रोड.

साधना मेश्राम चंदनशिवे या मागील २ वर्षांपासून स्वच्छ संस्थेच्या सभासद आहेत. त्यांचे पती रोजगार पद्धतीने कष्टाची कामे करतात. आपल्या आईवडिलांच्या कष्टांचे चीज करत सार्थकने १० वी मध्ये तो ८६.६०% मिळवले. साधना ताईंचे कुटुंब अगोदर बार्शी या गावी राहत होते आणि दुसऱ्यांच्या शेतात अल्प रोजगारावर मजुरी करत होते. पण भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी चांगले उत्पन्न मिळावे याचा विचार करून त्यांनी गाव सोडले आणि पुण्यामध्ये राहायला आले.

विद्यार्थ्याचे नाव : तनू भारत तरकसे
सभासद नाव : भारत मुकुंद तरकसे
गुण : ८१.८%
Mobile: 7030713870
वस्ती: निगडी ओटा स्कीम, निगडी

तनू अत्यंत हुशार आणि जिद्दी मुलगी आहे. लहानपणापासूनच तिला शिक्षणाची आवड आहे ती तिच्याबरोबर तिच्या लहान भावाचा देखील अभ्यास घेत असते. तिचे वडील भारत तरकसे हे गेल्या ८ वर्षापासून कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेचे सभासद आहेत, ते पिंपरी चिंचवड भागात घंटा गाडीवर काम करतात.

वडिलांच्या कष्टाची मला जाणीव आहे आणि मी त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे, त्याकरिता मी खूप अभ्यास करीन आणि स्वप्न साकार करून दाखविन”, अशा भावना तनुने व्यक्त केल्या.

तनू चे वडील सांगतात, “संस्थेने केलेली मदत मौल्यवान आहे, वेळोवेळी केले गेलेले मार्गदर्शन, शैक्षणिक मदत यामुळे तनुच्या यशात खूप मोठा वाटा हा संस्थेचा आहे.”

विद्यार्थ्याचे नाव: सानिका उमेश अडसूळ
सभासद नाव: राणी उमेश अडसूळ
गुण: ७८%
Mobile: 7721809405
वस्ती :- गांधीनगर, पिंपरी

सानिका ने ८ वी पर्यंतचे शिक्षण पिंपरीतील इंटरनॅशन शाळेतून RTE मार्फत पूर्ण केले. परंतु आई ची परिस्थिती नसल्यामुळे तिला तिथून दाखला काढून प्रथमेश इंग्लिश स्कूल नेहरूनगर पिंपरी या ठिकाणी प्रवेश घेतला.

राणी उमेश अडसूळ या गेल्या १० वर्षापासून कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या सभासद आहेत.
राणी अडसूळ या एकल माता असून त्यांच्या पतीचे २०१६ साली निधन झाले. त्यानंतर मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी हार न मानता सानिका चे माध्यमिक पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले.सानिका ने अथक प्रयत्न करून १० वी ची परीक्षा दिली त्यात भरघोस यश देखील संपादन केले.

सानिका ११ वी मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असून ती मेडिकल मध्ये करिअर करायचे आहे असे तिचे स्वप्न आहे. सानिका ला संस्थेमार्फत शैक्षणिक मदत वारंवार करण्यात आली तसेच तिला अतिरिक्त क्लास करिता देखील संस्थेमार्फत मदत करण्यात आली.

विद्यार्थ्याचे नाव – दिव्या विकास शिरसाठ
सभासद नावं – विकास शिरसाठ
गुण – ७५%
मोबाईल नंबर – 9049804881
वस्ती – पाटील इस्टेट, शिवाजीनगर

दिव्याने दहावीच्या परीक्षेची तयारी अत्यंत मेहनतीने आणि सातत्याने केली. ती नियमितपणे घरी अभ्यास करत असे तसेच वर्गात जाऊन अभ्यासातील शंका शिक्षकांना विचारून त्यांचे मार्गदर्शन घेत असे. मोबाईलपासून दूर राहून तिने पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. तिची आजी व वडील दोघेही कचरावेचक म्हणून काम करतात.कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या मदतीने तिला दहावीचा क्लास लावण्यात आला, ज्याचा तिच्या अभ्यासाला मोठा फायदा झाला.

आजच्या विद्यार्थ्यांना ती एकच संदेश देते, “मोबाईलचा मर्यादित वापर करा, अभ्यासात सातत्य ठेवा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. मेहनत आणि चिकाटीमुळे यश निश्चित मिळते.”

खेड शिवापूर टोलजवळ भीषण अपघात-टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड

नसरापूर –

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी (पुणे) येथील राजेंद्र बबन मोरे (वय ५५) व सविता राजेंद्र मोरे (वय ४२) हे दुचाकी क्रमांक एमएच १२ एफएच ४६९६ वरून साताऱ्याकडे जात होते. खेड शिवापूर टोल नाक्याच्या पाठीमागील सातारा लेनवर आले असता गॅस टँकर क्रमांक एपी ०३ टीई ५७५९ याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही टँकरखाली ओढले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टँकर आणि दुचाकी दोन्ही वाहने वेगात होती. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडकेनंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला दूरपर्यंत फेकली गेली होती.

घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. मात्र, गंभीर दुखापतींमुळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. संतप्त नागरिकांनी गॅस टँकरची तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. टँकर चालक राज किशन बी. (रा. तिरुपुरम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

केळेवाडी येथील कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखान्यात डायलेसीस केंद्र व प्रसूतिगृह सुरू करण्याची नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची मागणी

पुणे : कोथरूडमधील केळेवाडी परिसरात असलेल्या पुणे महानगरपालिका संचालित कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखान्याची नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी पाहणी केली. यावेळी आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्या समवेत दवाखान्यातील विविध आरोग्य सुविधा, उपलब्ध सेवा तसेच आवश्यक विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
गेल्या पाच वर्षांपासून प्रशासनाच्या काळात या दवाखान्यात डायलेसीस केंद्र तसेच गरोदर माता-भगिनींसाठी प्रसूतिगृह सुरू करण्यात यावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत.
यासंदर्भात नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून दवाखान्यात तातडीने डायलेसीस केंद्र आणि प्रसूतिगृह सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली. परिसरातील नागरिकांची वाढती गरज लक्षात घेता या सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
सध्या या दवाखान्यात सामान्य आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते. विशेषतः ३० ते ६० वयोगटातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या शिबिरांमध्ये रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) आणि हिमोग्लोबिन तपासणी केली जाते. त्यामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत आहे.
नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले की, “प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डायलेसीस केंद्र आणि प्रसूतिगृह सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.”
डायलेसीस केंद्र सुरू झाल्यानंतर किडनीविकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून प्रसूतिगृह सुरू झाल्यास गरोदर माता-भगिनींना परिसरातच सुरक्षित व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
सदर पाहणीदरम्यान डॉ. सुनील आंधळे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. आत्माराम काकडे, डॉ. सविता वावरे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

२००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र, पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात: हर्षवर्धन सपकाळ

डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित, डिलिमिटेशनंतरचा नकाशाही आत्ताच तयार.

मुंबई, दि. ८ मे २०२६..

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर सुरु झालेल्या दंगली या त्याचे पहिले पाऊल आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यातील निवडणुकीत हिंदू मुस्लीम द्वेष वाढवणारा अजेंडा चालवला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण जनगणनेनंतर जानेवारी २०२८ मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरु होणार आहे. डिलिमिटेशनसाठी सुप्रीम कोर्टातील कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला डिलिमिटेशन कमिटीत घ्यायचे हे सुनिश्चित झालेले आहे. डिलिमिटेशन नंतरचा मतदार संघाचा नकाशाही तयार झालेला आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.

तामिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, तामिळनाडूत निवडणुकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा स्थानिक नेते, प्रभारी यांनी सर्वांशी विचारविनिमय करुनच पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे. टीव्हीके पक्षाबरोबर निवडणुकीपूर्वीच आघाडी करावी अशी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मागणी होती, त्यावेळीच तसा निर्णय घेतला असता तर काँग्रेस पक्षाचे जास्त आमदारही निवडून आले असते पण लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही सपकाळ म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेने संडास बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, भ्रष्टाचारासाठी भाजपाला संडासची जागाही कमी पडत आहे. याआधी सुलभ शौचालयात भाजपाने भ्रष्टाचार केला होता. मोहित कंभोज यांना मलिदा आणि कार्यकर्त्यांना मात्र संडासची जागा, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील मंदिरे १० मे ते ९ जूनपर्यंत भाविकांसाठी बंद

पुणे, दि. ८ : अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत तसेच पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन व दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे दिनांक १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली आहे.

अष्टविनायकातील मंदिरांचे जतन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला असून, या कामांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे शासनाचे आभार मानण्यात आले आहेत. सध्या मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथे मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत.

पुरातत्त्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते तसेच कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यानंतर पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेत सह धर्मादाय आयुक्तांनी दि. ७ मे २०२६ रोजी मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सह धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानेही मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच दि. ८ मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन मंदिर बंद ठेवण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

या कालावधीत मंदिरांमध्ये नित्य पूजाअर्चा व धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील. मात्र भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. मंदिरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही विकासकामे मंदिरांची दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक असून ती नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी नागरिकांनी आणि भाविकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी : राज्यात 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

  • मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिक
  • कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62 टक्के

पुणे दि. 8 : दहावीच्या निकालाचा क्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी या विद्यार्थांना दिला.

मंत्री दादाजी भुसे यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक आणि माता-पिता यांचेही विशेष अभिनंदन केले. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्याबरोबरच राज्य आणि देश निश्चितच प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देताना एका परीक्षेचा निकाल तुमचे संपूर्ण आयुष्य किंवा तुमची बुद्धिमत्ता ठरवू शकत नाही. ही पहिली पायरी आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा. शासन तुमच्या पाठीशी आहे. फेरपरीक्षेची संधी उपलब्ध असल्याने तिचा लाभ घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उतीर्णतेची टक्केवारी 92.09 इतकी आहे.

मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक

दहावीची परीक्षा दिलेल्या एकूण 8,20,427 मुलांपैकी 7,34,814 मुले (89.56 टक्के) तर एकूण 7,22,045 मुलींपैकी 6,85,672 मुली (94.96 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिक आहे.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.62 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41 टक्के) आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47 टक्के, मुंबई- 94.97, पुणे- 94.24, नाशिक- 90.53, अमरावती- 90.50, नागपूर- 89.07 तर लातूर विभागाचा निकाल 88.42 टक्के लागला आहे.

श्रेणीनिहाय निकाल

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 27.41 टक्के, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण 31.26 टक्के, द्वितीय श्रेणीमध्ये 24.66 टक्के तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 8.75 टक्के इतके आहे.

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुनःश्च प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027, जून-जुलै 2027 च्या दहावीच्या परीक्षेस ‘श्रेणीसुधार/ गुणसुधार’ साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

सुवेंदू अधिकारी होतील बंगालचे CM, उद्या शपथ:शहा म्हणाले- ममतांच्या राजवटीत गुन्हेगार नेते बनले; काही महिन्यांत हे संपुष्टात येईल

कोलकाता -सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री असतील. कोलकाता येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीनंतर अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, १९५० मध्ये ज्या विचारसरणीसह आम्ही आपला प्रवास सुरू केला होता—ती म्हणजे श्यामा प्रसाद मुखर्जी यांची विचारसरणी—त्याच विचारसरणीचा परिपाक आज खुद्द त्यांच्याच पक्षाच्या हाती सरकार स्थापन होण्यात झाला आहे.

ममताजींच्या राजवटीत गुन्हेगारच राजकारणी बनले आहेत, ज्यामुळे विकासाला यत्किंचितही वाव उरलेला नाही. अवघ्या काही महिन्यांतच या सर्व गोष्टींचा अंत होईल.

मुख्यमंत्री उद्या सकाळी १० वाजता कोलकाता येथील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर पदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासह एनडीएचे अनेक प्रमुख नेते या शपथविधी समारंभास उपस्थित राहतील.
सुवेंदू यांनी भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. तसेच, त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातूनही सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली; याच मतदारसंघातून त्यांनी २०२१ मध्ये ममता यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने २०७ जागांवर विजय मिळवला आहे.

शहांनी सुवेंदूंना हार घातला, गळाभेट घेतली.
शाह यांच्या भाषणातील ५ प्रमुख ठळक मुद्दे; म्हणाले- “बंगालमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न आज साकार झाले आहे”

गंगोत्रीपासून गंगासागरापर्यंत, आज भाजपने सरकार स्थापन केले: गंगोत्रीपासून गंगासागरापर्यंत विस्तारलेल्या १०० वर्षांच्या वैचारिक प्रवासाअंती, भाजपने आज सरकार स्थापन केले आहे. १९५० पासून, आम्ही एका विशिष्ट विचारधारेने प्रेरित होऊन—ती म्हणजे श्यामा प्रसाद मुखर्जी यांची दूरदृष्टी—या मार्गावर वाटचाल सुरू केली होती. आज, जे सरकार स्थापन झाले आहे, ते खुद्द त्यांच्याच पक्षाचे आहे.
बंगालमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न साकार झाले: जेव्हा कलम ३७० रद्द करण्यात आले, तेव्हा संपूर्ण देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, अनेक कार्यकर्त्यांनी असे मत व्यक्त केले की, त्यांची एक प्रलंबित आकांक्षा अजूनही अपूर्ण राहिली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, बंगालमध्ये भाजपचा झेंडा फडकणे हे अत्यावश्यक आहे. आज, ती आकांक्षा देखील पूर्ण झाली आहे.
भाजपची विधिमंडळातील ताकद ३ वरून २०७ पर्यंत वाढली: आमच्या निवडून आलेल्या आमदारांच्या विजयाचे सरासरी मताधिक्य २८,००० इतके आहे. ३ जागांवरून ७७ जागांपर्यंत, आणि त्यानंतर ७७ वरून २०७ जागांपर्यंत झालेला हा प्रवास खरोखरच अभूतपूर्व आहे. नऊ जिल्ह्यांमध्ये तर टीएमसीला (TMC) आपले खातेही उघडता आले नाही; “दीदी” यांचा पूर्णपणे धुव्वा उडाला आहे.
आम्ही घुसखोरांना एक-एक करून मुळासकट उखडून टाकू: भाजप बंगालच्या जनतेला वचन देते की, आम्ही प्रत्येक घुसखोराला पद्धतशीरपणे शोधून बाहेर काढू—केवळ बंगालमधूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून. हा काही राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा नाही; तर हा मुळात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.
बंगालच्या जनतेप्रती कृतज्ञता: भाजपनेवर विश्वास दर्शवल्याबद्दल आणि निवडणुकीत इतका दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल आम्ही बंगालच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. आम्ही बंगालच्या जनतेला खात्री देतो की, तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, तो पूर्णपणे अढळ राहावा आणि त्यात कधीही, किंचितही उणेपणा येऊ नये, यासाठी आम्ही कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.

जिल्हाधीकारीसाहेब.. पुण्याचं वाट्टोळं करणार तरी कुठवर ?

पुणे-पुण्याला निसर्गाचं ,पाण्याचं,ऐतिहासिक  सौख्य तर लाभलं होतच. पण आता त्यावर हल्ले करण्याचं काम वर्षानुवर्षे काही लबाड अधिकाऱ्यांच्या मदतीने अजूनही सुरूच आहे. बिबवेवाडी वानवडी रस्त्यावरील गंगाधाम चौकाच्या अलीकडील झाला कॉम्प्लेक्स ला खेटून असलेले हे उत्खनन पहा … अंदाजे हि १० एकर जागा असू शकेल या ठिकाणी असलेल्या डोंगर भुइसपाट करण्याचे काम रात्रंदिवस येथे सुरु आहे कित्येक झाडे तोडली गेलीत , जी महापालिकेच्या दप्तरी क्रमांक टाकून नोंदविली गेली होती . जिथे डोंगरच्या डोंगर बिल्डर लॉबी लबाड अधिकाऱ्यांच्या मदतीने इकडून तिकडे फेकून देते तिथे , या झाडांच्या नोंदीची पाने महापालिकेच्या दप्तरातून फाडली जाणे काही अवघड अजिबात नाही . प्रश्न एवढाच आहे … जिल्हाधिकारी डोंगरे , टेकड्या  ,नदी नाले सुरक्षित ठेवायला असताना ते नेमके या विरोधात कधीपर्यंत काम करणार आहे आणि त्यांना साथ महापालिकेचे अधिकारी कधीपर्यंत देणार आहेत? आता पुण्याचं वाटोळं तुम्ही करणार तरी कुठवर हे एकदाच,. सांगून टाका असा सवाल त्यांना करावा लागणार आहे . 

डोंगर , टेकड्या फोडून  झाडी तोडून  नाले, नद्या बुजवून पुण्याचं वाट्टोळं केलं गेलं हे शेंबडे पोरं हि सांगतील . आणि यामुळे पुण्यातील उष्मा वाढला ,पावसावर परिणाम झाला, वाहतुकीच्या कोंडीचे ग्रीनीज बुकात नोंद व्हावी असे शहर हे बनलेय. एकेकाळी शांत , सायकलींचे , पेन्शनरांचे पुणे कॉंक्रीटच्या जंगलाने, वाढलेल्या घरांच्या किंमतीने नशेच्या आहारी गेले,शिक्षणाचे माहेरघर , गुन्हेगारीचे माहेरघर बनले आणि याला जबाबदार कोण असेल हे आता जानेतेनच ठरवावे . केवळ समाज जबाबदार नाही ,  उघड्या डोळ्याने बेकायदा प्रकार पाहून मूक बनून राहिलेला समाज आणि त्याहून याची अधिक जबाबदारी ज्या आय ए एस लॉबी वर होती ती ..म्हणजे पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर होती आणि आहे. समाजाला दहशतीच्या जोरावर , भीतीच्या आश्रयाखाली मूक बनवले गेले ते हे जिल्हाधिकारी अशा बेकायदा गोष्टीना बल देतात म्हणूनच . महापालिकेचे आयुक्त आणि बांधकाम विभागातील अधिकारी देखील हे सारे उघड्या डोळ्याने पाहतात आणि चिडीचूप बसतात हे त्याहून अधिक नवल …

या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अजून पुण्याचं वाट्टोळं तरी किरी करायचं ठरवलंय हे खुद्द परमेश्वरालाही माहिती नसावं , कारण हजारो कोटींच्या कमाईची यांची तहान काही भागलेली अजूनही दिसत नाहीये . 

कात्रज , धनकवडी , औंध , पाषाण , हडपसर खडकवासला ,कोथरूड अशा शहराच्या चारही बाजूने प्रचंड टेकड्यांची वाताहत  लावली  गेली असताना , लक्षावधीक, कोट्यावधी  वृक्षांची कत्तल केलेली असताना अजूनही या शहरात टेकड्या , डोंगरांची खुले आम तोडफोड जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने होते आहे. नाले बुजवून , टेकड्या फोडून फोडून जमिनीचे सपाटीकरण करून प्लॉट करायचे आणि त्यावर गगनचुंबी इमारती उभ्या करून हजारो कोटींची कमाई करायची हा धंदा .अर्थात गैर धंदा प्रतिष्ठेने पुण्यात अव्याहतपणे सुरु आहे. त्याचे हे उदाहरण आहे. जिल्हाधिकारी , महापालिका  यांना हे कसे दिसत नाही .. तक्रारी करूनही त्या दाबण्यात त्यांना यश कसे येते /या साठी कदाचित कोणतेही सरकार चौकशी लावणार नाही , अन पुणेकरही उघड्या डोळ्याने हे पर्यावरणाचा घात पाहून .. कुठवर गप्प बसणार आहेत देव जाणो …. 

—- माय मराठी डॉट नेट साठी वरिष्ठ पत्रकार शरद लोणकर आणि कॅमेरामन अभिषेक लोणकर 

गे डेटींग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे भुरळ आणि नंतर मारहाण करत लुटमार -दोन भामटे पकडले

पुणे- गे डेटींग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे लोकांना भुरळ घालून बोलवायचे नंतर मारहाण करत लुटमार करून पळून जायचे अशा पद्धतीची गुन्हेगारी करणारे दोन भामटे गुन्हा दाखल होताच अवघा अर्धा तासात पोलिसांनी पकडले आणि गजाआड केले.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक फिराय्द दाखल झाली . यातील फिर्यादीला गे डेटींग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे चॅटिंग करून बोलावून घेवून त्याला मारहाण करून मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर केले आणि त्याची चांदीची चैन हिसकावून घेतल्यामुळे फिर्यादी यांच्या तक्रारीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३५२, ३५१ (२), ३(५) हा जबरी चोरीचा गुन्हा चार अनोळखी इसमांविरुध्द दि. ०८/०५/२०२६ रोजी दाखल केला होता. दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तात्काळ तपास पथकाचे प्रभारी संजय नरळे पोलीस उपनिरीक्षक यांना त्यांचे स्टाफ करवी आरोपीचा शोध घेण्याबाबत तोंडी आदेश दिले. लागलीच तपास पथकाचे प्रभारी संजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी यांच्याशी बोलून आरोपींच्याबाबत माहिती घेवून आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच पोलीस अंमलदार बालाजी काटे व महादेव शिंदे यांना त्यांच्या गोपनिय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सदरची जबरी चोरी करणाऱ्यापैकी एक इसम हा अतुलनगर चौकामध्ये थांबला आहे. ही माहिती प्राप्त होताच संजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सोबत पोलीस अंमलदार बालाजी काटे, महादेव शिंदे व निखील तांगडे असे माहितीच्या ठिकाणी रवाना होवून तेथून एका आरोपीला ताब्यात घेतले व त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याच्या आणखी एका अल्पवयीन साथीदारालासुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे शहर हे करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी आव्हान केले आहे की, गे डेटींग अॅण्ड चॅट व इतर अॅपद्वारे लोकांनी अशाप्रकारे फसवणूकीला बळी पडू नये. तसेच कोणाची अशाप्रकारची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ वारजे माळवाडी पोलीस ठाणे किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जावून तक्रार द्यावी.
कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग सुजाता तानवडे यांचे सुचनेनुसार व महेश बोळकोटगी,निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, शरद पोळ, निखील खील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, सागर कुंभार, अमोल सुतकर यांनी केलेली आहे.

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे-सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सामजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे, दि.८: सामाजिक न्याय विभागाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे, आगामी काळातही कामात सातत्य ठेवून समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी आणखीन चांगले काम करावे; ‘सामाजिक न्याय’ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यवतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लोणावळा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, सामाजिक न्याय खात्यातील सहसचिव सो.ना. बागुल, उपसचिव वर्षा देशमुख, अवर सचिव सतीश खैरमोडे, राज्यातील प्रादेशिक उपायुक्त, सहायक उपायुक्त उपस्थित होते.

श्री. शिरसाट म्हणाले, विभागाच्यावतीने विद्यार्थी घडविण्याचे फार मोठे काम करण्यात येते. विद्यार्थीच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी वसतिगृहाचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे राज्यात वसतिगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करुन त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करण्यात यावा.

विभागामध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. त्यांनीही विभागात आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी छाप निर्माण करावी, राज्याला दिशादर्शक होईल यादृष्टीने नवनवीन उपक्रम राबवावेत, या उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करण्याची गरज आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता कार्यालयाच्याजवळ निवासस्थान उपलब्ध करण्यासोबतच सोसायटी स्थापन करण्याबाबत नियोजन करावे.

कार्यशाळा ही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण तसेच त्यांच्या अडीअडचणी मांडण्याची व्यासपीठ आहे, त्यामुळे या कार्यशाळेचा आनंद घेत विचाराची देवाण-घेवाण करावी. याठिकाणी झालेले निर्णय, चर्चेच्या अनुषंगाने विभागात प्रभावीपणे अंमलबजावणी करून आगामी सकारात्मक परिणाम दिसले पाहिजे.
राज्याच्या अर्थसंकल्पात विभागासाठी मंजूर झालेला निधी वेळेत खर्च होईल, यादृष्टीने काम करावे, असेही शिरसाट म्हणाले.

प्रधान सचिव डॉ. कांबळे म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. विभागाच्यवतीने समाजातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, नागरिक आदी घटकांसाठी लोक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी काम करावे. येत्या काळात शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योजकता, सामजिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर या पाच पैलूंवर काम करुन विभागाची धोरण ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे विभागाने विकसित महाराष्ट्र २०२७ चा दृष्टिकोन समोर ठेवून प्रभावीपणे काम करावे, असेही डॉ. कांबळे म्हणाले.

श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागावतीने येत्या काळात नवनवीन धोरणे, योजना राबविण्याचा मानस आहे. केंद्र सरकारच्या ‘आय-गॉट’ संकेतस्थळाच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या वर्षी प्रथमच आयोजित करण्यात आल्या, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऊसतोड कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीयांच्या कल्याकरिता काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेचा विभागाला निश्चित उपयोग होईल, असेही श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या.

यावेळी दिवसभर विविध योजनांच्या संदर्भात प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी सादरीकरण केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केले.

बजाज लाइफकडून सहभागी पॉलिसी धारकांसाठी ₹1939 कोटींचा आतापर्यंतचा सर्वोच्च बोनस जाहीर

·         आर्थिक वर्ष 2026 साठी घोषित बोनसचा लाभ 11.89 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना

पुणेमे 08, 2026: भारतातील खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी आघाडीची कंपनी बजाज लाइफ इन्शुरन्सने 2025-26 (FY26) आर्थिक वर्षासाठी ₹1939 कोटी रुपयांचा विक्रमी बोनस जाहीर केला आहेजो आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. हे आर्थिक वर्ष 25मध्ये घोषित केलेल्या ₹1,833 कोटी बोनसच्या तुलनेत ही वाढ 5.8% एवढी असूनती लक्षणीय आहे. कंपनीच्या सहभागी उत्पादनांमध्ये गुंतवणूक केलेल्या 11.89 लाख पॉलिसीधारकांना या बोनसचा फायदा होईल. सलग २५ वर्षे सातत्याने वार्षिक बोनस जाहीर करून बजाज लाइफने ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा आपला मजबूत वारसा सुरू ठेवला आहे.

31 मार्च 2026 रोजी सध्या ज्या पॉलिसी सुरू आहेत अशा ट्रॅडिशनल पार्टिसिपेटींग पॉलिसी असलेले विमाधारक हा बोनस मिळण्यासाठी पात्र आहेत; हा बोनस सहभागी निधीमधून निर्माण झालेल्या अतिरिक्त नफ्यातून जाहीर केला जातो. ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या एसीई, फ्लेक्सी इन्कम गोल, कॅश गेन, इनव्हेस्ट गेन, स्वर्ण विश्रांती, लाइफटाइम केअर, सुपर सेव्हर आणि इतर अशा अनेक प्रकारच्या सहभागी उत्पादनांची विस्तृत श्रेणी बजाज लाईफ इन्शुरन्स उपलब्ध करून देते. या योजनांचे विमाधारक, इतर लाभांसह, जाहीर करण्यात आलेल्या या बोनसचाही लाभ मिळवण्यास पात्र ठरतात.

याव्यतिरिक्त, फ्लेक्सी इनकम गोल, ACE – इन्कम, लाइफलाँग ॲश्युर आणि कॅश रिच यासारखी निवडक उत्पादने रोख बोनस लाभ देतात. पॉलिसीधारकांना हा बोनस जमा करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. पात्र उत्पादनांसाठी कंपनीने FY2025-26 साठी 6.49% संचय निधी व्याजदर घोषित केला आहे.

या घोषणेवर बजाज लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तरुण चुग म्हणाले,

आमच्या सहभागी पॉलिसीधारकांसाठी यावर्षी हा बोनस जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या दृष्टिकोनाचे हे सामर्थ्य आहे. तसेच आमच्या ग्राहकांना सातत्यपूर्ण मूल्य वितरीत करण्यावर आमचे सातत्यपूर्ण लक्ष दर्शवते. आमच्या ग्राहकांना त्यांच्या जीवनातील ध्येये आत्मविश्वासाने साध्य करण्यास सक्षम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

प्रत्येक आर्थिक वर्षात घोषित केलेले बोनस पॉलिसीच्या अटींनुसार पॉलिसीच्या मुदतीनुसार किंवा बाहेर पडण्याच्या वेळी वितरित केले जातात. याव्यतिरिक्त, पॉलिसीच्या वर्धापनदिनी रोख बोनस वितरित केला जाऊ शकतो किंवा संबंधित उत्पादन वैशिष्ट्यांमध्ये दर्शविल्याप्रमाणे जमा केला जाऊ शकतो.

क्रेडाईच्या शिफारसीनंतर महापालिका आयुक्तांचा ऐतिहासिक निर्णय, बांधकाम परवान्यांच्या कामाचे विकेंद्रीकरण

बांधकाम परवानग्या आता सुपरफास्ट, प्रकल्पानुसार बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या मंजुरी अधिकारांची पुनर्रचना

महापालिका आयुक्तांचा ऐतिहासिक निर्णय

महापालिकेतील स्थानिक स्तरावर बांधकाम परवानग्या देण्याची जुनी पद्धत आता बंद करण्यात येत आहे. ३० वर्षांपासून चालत आलेल्या काही पद्धतींमुळे शहराची अनियंत्रित वाढ झाली. नवीन पद्धतीचा मुख्य उद्देश शहराचा विकास नियोजित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा हा आहे.
– नवलकिशोर राम, आयुक्त पुणे महापालिका

मंजुरी अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय हा पुणे महापालिकेचा एक सकारात्मक प्रशासकीय बदल आहे. प्रकल्पाच्या आकारानुसार अधिकारांचे वाटप केल्याने कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढेल. जर याची डिजिटल ट्रॅकिंगद्वारे प्रभावी अंमलबजावणी झाली, तर याचा फायदा घर खरेदीदार, सोसायट्यांचा पुनर्विकास आणि पुण्याच्या सर्वांगीण नागरी विकासाला होईल.
– कपिल गांधी, व्यवस्थापकीय संचालक सिग्मा वन युनिव्हर्सल आणि जनसंपर्क संयोजक क्रेडाई पुणे

पुणे- बांधकाम परवानग्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि वर्षानुवर्षे सुरू असलेल्या स्थानिक स्तरावरील अनियंत्रित मंजुरींना चाप लावण्यासाठी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी धोरणात्मक बदल केला आहे. आयुक्तांनी प्रकल्पाच्या आकारानुसार बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या मंजुरी अधिकारांची पुनर्रचना केली आहे. या निर्णयामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या प्रस्तावांना गती मिळण्याची अपेक्षा असली, तरी गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या स्थानिक स्तरावरील मंजुरीच्या पद्धतीला आता पूर्णविराम मिळाला आहे.

गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार, महानगरपालिकेने बांधकाम विभागाकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या मंजुरी प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. यापुढे मंजुरीचे अधिकार प्रकल्पाच्या एकूण बांधकामाच्या क्षेत्रावर आधारित असतील. उपअभियंता, कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यापैकी कोणत्या स्तरावर कोणता प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात आली आहेत.
स्थानिक स्तरावर बांधकाम परवानग्या देण्याच्या जुन्या पद्धतीवर अनेक वर्षांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अनियंत्रित बांधकामे, अतिक्रमणे, नियमबाह्य मंजुरी आणि फायली जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याच्या तक्रारी सामान्य होत्या. या पार्श्वभूमीवर, आयुक्तांनी जुनी स्थानिक मंजुरी पद्धत थेट मोडीत काढली आहे. आदेशात म्हटले आहे की, “गेल्या ३० वर्षांत विकसित झालेल्या काही पद्धतींमुळे शहरात अनियोजित वाढ आणि अनियमितता वाढली. त्यामुळे मंजुरी प्रक्रियेत अधिकारांचे स्पष्ट वाटप, उत्तरदायित्व आणि वरिष्ठ स्तरावरील नियंत्रण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

कोणाकडे किती अधिकार असतील?

-२००० चौरस मीटरपर्यंतचे प्रकल्प : उपअभियंता मंजुरी देतील.

-२००० ते १०,००० चौरस मीटरपर्यंतचे प्रकल्प : ले-आउट आणि बांधकाम परवानगी कार्यकारी अभियंत्यांच्या मंजुरीने दिली जाईल.
-१०,००० चौरस मीटरवरील प्रकल्प : मोठे प्रकल्प किंवा ज्यांना भविष्यात पर्यावरण मंजुरी आवश्यक आहे, अशा प्रस्तावांना अधीक्षक अभियंता स्तरावर मंजुरी दिली जाईल.

-दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील प्रस्तावांच्या मंजुरीनंतर, संबंधित कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंत्यांच्या स्वाक्षरीने संमती पत्र जारी केले जाईल.

सिंगल विंडोमुळे मंजुरीची प्रक्रिया होणार वेगवान

बांधकाम परवानगी विभाग प्रस्तावांना महिनोनमहीने प्रलंबित ठेवण्यासाठी टीकेचा धनी ठरला होता. अनेक स्तरांवरून फाईल फिरत असल्याने नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांना मोठा विलंब सहन करावा लागत असे. प्रशासनाचा दावा आहे की, अधिकारांच्या विकेंद्रीकरणामुळे लहान आणि मध्यम प्रस्तावांवर खालच्या स्तरावर निर्णय घेता येईल, ज्यामुळे मंजुरीची प्रक्रिया वेगवान होईल.

मोठ्या प्रकल्पांवर वरिष्ठांचे नियंत्रण कायम

मोठे प्रकल्प आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असलेल्या प्रकल्पांसाठी वरिष्ठ स्तरावरील नियंत्रण कायम ठेवण्यात आले आहे. १०,००० चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या प्रकल्पांसाठी अधीक्षक अभियंत्यांची मंजुरी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रकल्पांची तांत्रिक तपासणी आणि पर्यावरणीय पैलूंकडे अधिक लक्ष दिले जाईल याची खात्री केली जाणार आहे.

महाराष्ट्र आता एरोस्पेस उत्पादन आणि पुरवठा साखळीचे एक महत्त्वाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी सज्ज आहे.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपची मोठी झेपअचूक अभियांत्रिकीच्या जोरावर भारताची एरो इंजिन क्षमता वाढवली

मुंबई,– गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एरोस्पेस विभागाने भारतातील विमान इंजिन निर्मिती क्षमता भक्कम करण्यास पुढाकार घेतला आहे. अत्याधुनिक इंजिनिअरिंग आणि आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या कामाच्या जोरावर कंपनीने हे यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपन्यांचा विश्वास प्राप्त झाल्याने गोदरेज या क्षेत्रात आता भरीव कामगिरी करत आहे. गोदरेज एरोस्पेस ही भारतातील विमान इंजिनचे सर्व भाग तयार करणारी एकमेव खासगी कंपनी आहे. यामुळे देशाच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेत कंपनीने मोलाचा वाटा उचलला आहे. ही कामगिरी देशाच्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा देत आहे.

१९८० च्या दशकात गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने एरोस्पेस व्यवसायाची स्थापना केली. अगदी स्थापनाकाळापासूनच कंपनीचा हा विभाग देशातील अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून सहभागी झाला आहे. आज हा व्यवसाय जागतिक एरोस्पेस क्षेत्रातील एक प्रमुख नाव म्हणून नावारुपास आला आहे. कंपनी बोईंग, सॅफरन एअरक्राफ्ट इंजिन्स, जीई एरोस्पेस, रोल्स-रॉइस आणि RTX यांसारख्या दिग्गज जागतिक कंपन्यांसोबत काम करत आहे. उच्च दर्ज्याच्या गुणवत्तापूर्वक सेवा प्रदान करताना कामात कोणतीही उणीव दिसून येत नसल्याने गोदरेज एंटरप्रायझेस कंपनीने जागतिक व्यापारातील महत्त्वाच्या कंपन्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आव्हानात्मक यंत्रणांचा पुरवठा करणे ही कंपनीचे खास वैशिष्ट्य मानले जाते. वार्षिक पातळीवर या व्यवसायाने सुमारे २५ टक्के मोठी प्रगती केली आहे. कंपनीच्या निर्यातीत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीत या व्यवसामुळे कंपनीने आपला भक्कम पाया रोवला आहे. उत्कृष्ट दर्जा आणि वेळेवर वितरण यामुळे कंपनीचा दबदबाही वाढला आहे.

कंपनीची वाटचाल पाहता भविष्यातील नियोजनांसाठी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. पुढील तीन वर्षांत १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे कंपनीच्यावतीने जाहीर करण्यात आले. कंपनी आता प्रगत डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानावर भर देणार आहे, याकरिता कंपनीने स्वतःचे संशोधन व विकास केंद्र उभारले आहे. या केंद्रात विमानांच्या यांत्रिक प्रणालींसाठी खास डिझाइन कार्यालयाची सोय करण्यात आली आहे. कंपनीच्या प्रगतीसाठी या केंद्राची स्थापना महत्त्वाची मानली जात आहे. आता कंपनी केवळ दिलेल्या आराखड्यावर काम न करता स्वतःचे खास तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहे. या बदलांमुळे कंपनीचा अभियांत्रिकी क्षमताही मजबूत होईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. नवोन्मेषावर आधारित विकासासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, परिणामी जागतिक बाजारपेठेत कंपनीचे स्थान उंचावेल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एरोस्पेस व्यवसायाचे बिझनेस प्रमुख माणेक बेहरामकामदिन यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “एरो इंजिन क्षेत्राचा विकास हा सखोल अभियांत्रिकी क्षमता आणि उच्च दर्जाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. यासाठी लवचिक पुरवठा साखली आणि विश्वासार्ह कामगिरी अत्यंत आवश्यक असते. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तोच आमच्या प्रवासाचा आधार आहे. महत्त्वाच्या एरोस्पेस प्रणालींचे भारतातच उत्पादन करण्यासाठी आम्ही वचनबद्द आहोत. आम्ही नवनवीन शोध, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ विकासावर सातत्याने गुंतवणूक करत आहोत. भारताचे एरो इंजिन क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोदरेज सज्ज आहे. जागतिक एरोस्पेस मूल्य साखळीमध्ये आमचे योगदान महत्त्वाचे ठरेल. भविष्यातील प्रगतीसाठी आम्ही पूर्ण ताकदीने करत आहोत.”

गोदरेज एरोस्पेस क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केल्या आहेत. यामध्ये अक्युएटर्स सारख्या क्लिष्ट यंत्रणांचा समावेश आहे. कंपनीसाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. अशा प्रगत प्रणाली तयार कऱण्याची क्षमता असलेल्या मोजक्या भारतीय कंपन्यांमध्ये गोदरेचा समावेश झाला आहे. या यशामुळे कंपनीची ओळख आता बदलली आहे. कंपनी आता केवळ सुटे भाग बनवणारी राहिलेली नाही. त्याऐवजी, ती आता एरोस्पेस क्षेत्रातील एक संपूर्ण डिझाइन आणि इंजिनिअरिंग भागीदार बनली आहे. आता ही कंपनी एकात्मिक एरोस्पेस प्रणाली देण्यास सक्षम आहे. हे परिवर्तन भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. यामुळे आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला मोठे बळ मिळणार आहे. ही प्रगती गोदरेजच्या तांत्रिक कौशल्याचा पुरावा आहे.

चौख अभियांत्रिकी, गुणवत्तेची कडक शिस्त आणि दीर्घकालीन क्षमता बांधणमी यांवर गोदरेजने आपला भार दिला आहे. यामुळे एरोस्पेस उत्पादनाच्या क्षेत्रात भारताचे स्थान जागतिक स्तरावर मजबूत होत आहे. गोदरेज आता जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे येत आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. भारताची औद्योगिक ताकद वाढवण्यासाठी हे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. या उपक्रमांमुळे देशाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळत आहे. दर्जेदान उत्पादनांमुळे गोदरेजने आपली विश्वासार्हता जपली आहे. भारताला एरोस्पेस क्षेत्रातील प्रमुख केंद्र बनवण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे.

“KFIL’वर्षाचा निव्वळ नफा 376 कोटी रुपये 

पुणेभारत –मे 2026: कास्टिंग्ज आणि पिग आयर्नच्या भारतातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एकतसेच पोलाद आणि सीमलेस ट्यूब्स क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडने (BSE: 500245, NSE: KIRLFER) आज चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष 202526 चे आपले आर्थिक निकाल जाहीर केले.

चौथ्या तिमाहीचे (Q4) आणि आर्थिक वर्ष 2026 चे निकाल जाहीर करतानाकेएफआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आर.व्ही. गुमास्ते म्हणाले, KFIL ने या वर्षाचा समारोप चौथ्या तिमाहीतील अत्यंत दमदार कामगिरीसह केला आहेहे सांगताना मला अत्यंत आनंद  होतो आहे. आमच्या प्रमुख विभागांमधील विक्रीच्या प्रमाणात झालेली भक्कम वाढ आणि सुधारित कार्यक्षमता यामुळे ही कामगिरी आमच्यासाठी खास आहे. वर्षभर प्रतिकूल आर्थिक वातावरणाचा सामना करावा लागला असूनहीआमचा एकत्रित वार्षिक महसूल 5 टक्क्यांनी वाढून 6,889 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेचअपवादात्मक बाबी वगळून करपूर्व नफा (PBT) 25 टक्क्यांनी वाढून 512कोटी रुपयांवर गेला आहेतर वर्षाच्या सुरुवातीपासूनचा निव्वळ नफा (YTD PAT) लक्षणीयरित्या 22 टक्क्यांनी वाढून 358कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मार्च महिन्याच्या मध्यात सोलापूर एलपीजी पुरवठा खंडित झाल्यावर आम्ही वेगाने दिलेल्या प्रतिसादात आमची लवचिकता दिसून आली. पर्यायी इंधन उपायांचा वेगाने विचार करूनआम्ही केवळ चार दिवसात परिस्थिती पूर्ववत केली आणि आमच्या उत्पादन वेळापत्रकावर तसेच ग्राहकांना दिलेल्या आश्वासन पूर्ततेवर कमीत कमी परिणाम होईलअसा प्रयत्न केला.

भविष्याचा विचार करताआमचे सर्व प्रमुख भांडवली प्रकल्प आणि धोरणात्मक विलीनीकरणे नियोजनानुसार सुरू आहेत. मूल्यनिर्मितीच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनासाठी आम्ही दृढपणे वचनबद्ध आहोत. यात अधिक समृद्ध उत्पादन मिश्रणावर लक्ष केंद्रित करणेनवीकरणीय ऊर्जेद्वारे खर्चात बचत करणे आणि जागतिक बाजारपेठेत आमचे स्पर्धात्मक स्थान मजबूत करणे यांचा समावेश आहे. ”

चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026 च्या आर्थिक कामगिरीचा स्वतंत्र आढावा:
रुपये (कोटी)Q4 FY 26Q4 FY25वार्षिकYTD FY 26YTD FY25वार्षिक
महसूल1,781.01,736.23%6,783.96,566.33%
ईबीआयटीडीए*225.9198.514%836.0757.910%
ईबीआयटीडीएमार्जिन12.7%11.4% 12.3%11.5% 
पीबीटी#176.7127.738%514.4432.119%
पीएटी130.095.636%375.6317.318%
चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026 च्या आर्थिक कामगिरीचा एकत्रित आढावा:
रुपये (कोटी)Q4 FY 26Q4 FY25वार्षिकYTD FY 26YTD FY25वार्षिक
महसूल1,817.21,737.05%6,888.66,564.25%
ईबीआयटीडीए*224.6201.312%841.7756.211%
ईबीआयटीडीएमार्जिन12.4%11.6% 12.2%11.5% 
पीबीटी#169.8123.737%496.6408.522%
पीएटी123.192.333%357.8294.022%

* इतर उत्पन्न आणि अपवादात्मक बाबी वगळून

सुवेंदू अधिकारी होतील पश्चिम बंगालचे CM:गृह मंत्रालयही त्यांच्याकडेच; रुपा गांगुली DCM, दुसरे DCM पुरूष जे दार्जिलिंगमधून असतील

5 वा. घोषणा
कोलकाता -सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री असतील. राज्यात दोन उपमुख्यमंत्रीही असतील. उपमुख्यमंत्रिपदासाठी रूपा गांगुली यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. दुसरे उपमुख्यमंत्री दार्जिलिंगमधील एक पुरुष आमदार असतील.

सुवेंदू यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कार्यभार असेल. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर, आज सायंकाळी ५ वाजता या तिघांच्याही नावांची घोषणा केली जाईल.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ९ मे रोजी कोलकाता येथील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर आपल्या पदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक प्रमुख नेते या शपथविधी समारंभाला उपस्थित राहतील.

सुवेंदू यांनी भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातूनही सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे; याच मतदारसंघातून त्यांनी २०२१ मध्ये ममता यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने २०७ जागांवर विजय मिळवला आहे.

4 मे: बंगालमध्ये पहिल्यांदा भाजप जिंकली

4 मे रोजी 293 जागांचे निकाल आले. भाजपला 207 जागा मिळाल्या. टीएमसी फक्त 80 जागांवर मर्यादित राहिली. राज्यात एकूण 294 विधानसभा जागा आहेत, फालता येथील एका जागेवर 21 मे रोजी पुन्हा मतदान होईल. निकाल 24 मे रोजी येईल.

5 मे: ममता म्हणाल्या- राजीनामा देणार नाही

ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले- मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही. आम्ही जनादेशामुळे नाही, तर कटामुळे हरलो आहोत. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी राजभवनात जाणार नाही. ममता पुढे म्हणाल्या- निवडणूक आयोगाने भाजपसोबत मिळून 100 जागा लुटल्या.

6 मे: सुवेंदुंच्या PA ची गोळ्या झाडून हत्या

कोलकाताजवळ मध्यमग्राम येथे सुवेंदु अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते स्कॉर्पिओमध्ये होते. एक कार त्यांच्या गाडीसमोर उभी राहिली. याच दरम्यान बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी 6 ते 10 गोळ्या झाडल्या.

7 मे: बंगालच्या राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केली

बंगालचे राज्यपाल आरएन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली. गुरुवारी संध्याकाळी लोकभवनातून याची अधिसूचना जारी झाली. याचा अर्थ असा की ममता मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याकडे आता कोणतीही सत्ता राहणार नाही.