Home Blog Page 29

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क;लसीकरण मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ : जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत जपानी मेंदूज्वरावरील लसीकरण मोहीम सुरू झाली होती. याच दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले. मात्र, महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली नव्हती. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यावेळी केंद्र सरकाराला विशेष विनंती केली आणि जपानी मेंदूज्वर आजारांवरील लसीकरण मोहीमेला राज्यात सुरुवात केली. या प्रयत्नांमुळे आज रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे.

जपानी मेंदूज्वराची वैशिष्ट्ये आणि धोका
महाराष्ट्रात जपानी मेंदूज्वर या आजाराबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून लसीकरण व नियंत्रण उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. हा आजार प्रामुख्याने डासांद्वारे पसरतो आणि मेंदूवर परिणाम करून गंभीर गुंतागुंत, झटके तसेच मृत्यू होण्याची शक्यता निर्माण करतो. या आजाराचा मृत्यूदर जास्त असून वाचलेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.

राज्यातील सद्यस्थिती
राज्यात २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत रुग्णसंख्या तुलनेने कमी असली तरी काही जिल्ह्यांमध्ये काही प्रकरणे आढळली आहेत. २०२२ मध्ये २ रुग्ण, २०२३ मध्ये ५ रुग्ण, २०२४ मध्ये ५ रुग्ण व २ मृत्यू, २०२५ मध्ये ७ रुग्ण व १ मृत्यू नोंदविण्यात आले, तर २०२६ च्या मार्चपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने रुग्ण आढळले आहेत.

लसीकरण मोहिमेची प्रगती
एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान लसीकरण मोहिमेत राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. पहिल्या डोसचे एकूण कव्हरेज ८९.२६ टक्के तर दुसऱ्या डोसचे ७८.६८ टक्के आहे. धाराशिव (९९.५९ टक्के), लातूर (९७.८४ टक्के) आणि सोलापूर (९५ टक्के पेक्षा जास्त) जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र रायगड ५५ टक्के पहिला डोस व ४८ टक्के दुसरा डोस, पुणे आणि पीसीएमसी भागात दुसऱ्या डोसचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे.


निदान व उपचार सुविधा
राज्यात जपानी मेंदूज्वराच्या निदानासाठी नागपूर, गडचिरोली, सेवाग्राम (वर्धा), भंडारा आणि गोंदिया येथे पाच सेंटीनेल केंद्रे कार्यरत आहेत. तसेच १६ जिल्ह्यांमध्ये बाल अतिदक्षता विभाग (PICU) सुरू असून रुग्णांना आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

विदर्भ भाग सर्वाधिक संवेदनशील
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार विदर्भ हा जपानी मेंदूज्वरासाठी सर्वाधिक संवेदनशील भाग आहे. ग्रामीण व कृषी क्षेत्रात डासांची वाढ, तसेच डुक्कर व पक्ष्यांच्या संपर्कामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. काही शहरी व उपनगरी भागातही साथीचा धोका संभवतो.

नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना
राज्यात नियमित लसीकरण, विशेष मोहिमा, रक्त नमुना तपासणी, डास नियंत्रणासाठी धूरफवारणी, क्यूलेक्स डासांचे सर्वेक्षण, जनजागृती, डासांच्या उत्पत्तीस्थळांवर गप्पी मासे सोडणे तसेच स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत.

जनतेला आवाहन
जपानी मेंदूज्वर हा आजार विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, डासांपासून संरक्षण करावे आणि ताप किंवा मेंदूशी संबंधित लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पुणे जिल्ह्यात ३८६१ रुग्णांना सुमारे ३४.५३ कोटींची मदतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

पुणे दि.१५ : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. पुणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३,८६१ रुग्णांना सुमारे ३४ कोटी ५३ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.
२० गंभीर आजारासाठी मदत-
कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थसहाय्य दिले जाते.
सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.
आर्थिक वर्षातील मदत
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत पुणे जिल्ह्यातील ३,८६१ रुग्णांना सुमारे ३४ कोटी ५३ लाख ९९ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून साकरण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदींमुळे रूग्णांना वेळेत अर्थसाहाय्य होत आहे. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांना केले आहे.

00000

पुण्यातील जलपर्णी हटविण्यासाठी साठी आमदार सिद्धार्थ शिरोळे मैदानात

मुळा रोड व होळकर पूल परिसराची मनपा अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

पुणे
बुधवार, १५ एप्रिल २०२६

पुणे शहरातील नद्यांमधील जलपर्णीच्या समस्येने रौद्र रूप धारण केले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज, १५ एप्रिल रोजी मुळा रोड आणि होळकर पूल परिसरातील नदीपात्राची पुणे महानगरपालिका आणि खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अधिकार्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.
नदीच्या प्रदूषणाकडे आणि जलपर्णीकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना आमदार शिरोळे म्हणाले की,
“जलपर्णीमुळे होणारी दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. केवळ तात्पुरती मलमपट्टी नको, तर पर्यावरणाचा समतोल राखून शास्त्रीय पद्धतीने जलपर्णी कायमस्वरूपी कशी नष्ट करता येईल, यावर आमचा भर आहे. हा मुद्दा मी यापूर्वीही अनेकदा विधानसभेत उपस्थित केला असून प्रशासनाने आता युद्धपातळीवर काम करणे गरजेचे आहे.”

सध्या तातडीचा उपाय म्हणून मैन्युअल पद्धतीने नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
जलपर्णीमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. ही मोहीम राबवल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि डासांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
भविष्यात जलपर्णी पुन्हा वाढू नये यासाठी इको-फ्रेंडली आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, ड्रेनेज विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मुळा आणि मुठा नद्यांना जलपर्णीमुक्त करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास आमदार शिरोळे यांनी यावेळी व्यक्त केला.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे …

पुणे- युध्द स्थिती आणि वाढता उष्मा यांनी हैराण झालेल्या मनाला निसर्ग आणि शांतता याचे महत्व आता जाणवणार असून याच पार्श्वभूमीवर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। ही सुस्वरे आळवित शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीतील १०० फुटी डीपी रस्त्याच्या बाजूला नगरसेवक स्वप्नील दुधाने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी सकाळी अवघे २ तास काढून म्हणजे सकाळी ८ ते १० या वेळेत २५ रोपांचे रोपण केले आणि हि वृक्ष जोपासण्याचा निर्धार हि केला .

दुधाने यांनी सांगितले कि,’ क्रांतिज्योती महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण आज प्रभागातील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल आणि शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीतील १०० फुटी डीपी रस्ता या ठिकाणी वृक्षारोपण सोहळा आयोजित केला होता.भारतीय समाजातील दूषित गोष्टी दूर करून स्वच्छ वातावरण निर्माण करणारे महापुरुष आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण युवा सहकारी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांसह २५ रोपांचे रोपण करण्यात आले. सकाळी ८ ते १० या वेळेत संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमामध्ये कांचन, बकुळ, पिंपळ, कडुलिंब अशा सर्व भारतीय वृक्षांना मोठे करण्याचा संकल्प. केला. या महापुरुषांच्या कार्याची सावली आपले जीवन सुसह्य बनवत असताना त्यांच्या शिकवणीची मुळे समाजात खोलवर रुजावी आणि समतेची गोमटी फळे सर्वांना चाखता यावी, अशी सदिच्छा याप्रसंगी व्यक्त केली.

नारी शक्ती वंदन अधिनियम विकसित भारताला समर्पित-खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे : ”विकसित भारताच्या निर्मितीत महिला शक्तीचा सक्रिय सहभाग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून लोकसभेसह सर्व विधानसभांमध्ये महिला प्रतिनिधित्वाचा आवाज बुलंद होईल,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मंगळवारी केले.

”विकसित भारताला समर्पित असलेले नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत पूर्ण बहुमताने पारित होऊन लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदविले जाईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अंमलबजावणी संदर्भात १६ एप्रिलपासून संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुणे शहरतर्फे पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मनीषा लडकत, शहर सरचिटणीस प्रियंका शेंडगे, नगरसेविका निवेदिता एकबोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ”भारत हे जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. केंद्र सरकारमध्ये बारा महिला मंत्री आपल्या खात्यांचा कारभार समर्थपणे सांभाळत आहे. देशाच्या तिजोरीची किल्ली असणारे अर्थमंत्रीपद निर्मला सीतारमण यांच्या रुपाने एक महिला भूषवित आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व महिलांच्या सक्षम हातात आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ६५ टक्के महिलांनी मतदान करून लोकशाही उत्सवात सक्रिय सहभाग घेतला आहे. लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन महिला सक्षम होत आहेत. महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वातून सामाजिक प्रगती साधण्याच्या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम बहुमताने पारित केले. या अधिनियमामुळे नारी शक्तीचा सन्मान होऊन लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३टक्के आरक्षण मिळणार आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा.”

”’मिस कॉल’द्वारे द्या पाठिंबा”

‘लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांची ताकद वाढविण्यासाठी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ अत्यंत महत्त्वपूर्ण असून, हा एकविसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक लोकशाही निर्णय ठरणार आहे. या अधिनियमाला पाठिंबा देण्यासाठी ९६६७१७३३३३ या क्रमांकावर ‘मिस कॉल’ देऊन महिला सक्षमीकरणाच्या या निर्णयाला पाठबळ द्यावे,’ असे आवाहन प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

महापौरसाहेबा .. तुम्हीही पुण्यात पथारी,स्टॉल क्यूआर कोड आधारित लायसन्स देताना हा धाडसी निर्णय घ्याल ?

पुणे- येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता, लिहिता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी लिहिता-वाचता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता. पण चालकाला समज देऊन सोडून दिले जात होते.महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २४ आणि २७ (४) नुसार, रिक्षा, टॅक्सी, बस चालवण्याच्या परवान्यासाठी मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. ‘मोटार वाहन कायदा १९८८’ च्या कलम ८६ नुसार आरटीओला परवाना निलंबन किंवा रद्दचा अधिकार आहे. त्याची अंमलबजावणी आता ३७ वर्षांनंतर होईल असे दिसते आहे .अगदी याच आधारावर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना आता तुम्हीही पुण्यात पथारी,स्टॉल क्यूआर कोड आधारित लायसन्स देताना हा धाडसी निर्णय घ्याल काय ? असा सवाल केला गेला तर नवल वाटू नये

त्याला कारणही आहे , कारण असे आहे कि,’शहरातील पथारी व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला शिस्तबद्ध व कायदेशीर स्वरूप देण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.शहरातील सर्व पथारी व्यवसायिकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्यात येणार असून, या माध्यमातून त्यांना अधिकृत परवाना (लायसन्स) प्रदान करण्यात येईल. या बारकोडमध्ये संबंधित व्यवसायिकाची संपूर्ण माहिती, व्यवसायाचा प्रकार व परवानगीची जागा यांचा समावेश असेल.या उपक्रमामुळे अनधिकृत पथारी व्यवसायावर नियंत्रण येऊन अधिकृत व्यवसायिकांना संरक्षण मिळणार आहे, तसेच शहरातील व्यवस्थापन अधिक सुसूत्र होण्यास मदत होणार आहे.तसेच, पथारी व्यवसायिकांच्या संघटनेने महानगरपालिकेस लेखी अनूमोदन देत पुढील बाबींची हमी दिली आहे की, ते रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत, स्वच्छता राखतील, महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करतील तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतील.महापौर यांनी संबंधित सर्व विभागांना या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, या माध्यमातून शहरातील पथारी व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ व नियमनबद्ध करण्याचा उद्देश आहे.

पण आतापर्यंत कुठेहि यात महापौर यांनी अथवा महापालिका प्रशासनाने किंवा पथारी स्टॉल धारकांच्या संघटनांनी असा परवाना देताना किंवा पथारी स्टॉल धारकांचे पुनर्वसन करताना प्रथम महाराष्ट्रीयन किंवा मराठी भाषा अवगत असलेला म्हणजे लिहिता वाचता ,बोलता येणारा यांना प्राधान्य असे कुठेही कधीही म्हटलेले नाही. देशात कुणालाही कुठे जाऊन कोणताही व्यवसाय जो बेकायदा नाही तो करण्याची मुभा आहे. मात्र हे राबविले जात असताना ज्या त्या राज्यातील नागरिकांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे.अशी अपेक्षा आता वाढत्या परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे पुढे आली आहे. गावे महाराष्ट्रातील , पण जिथे तिथे परप्रांतीयांची एवढी संख्या वाढते आहे कि, मूळ मराठी , महाराष्ट्रीयन दिसेनासा होतो आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होता असताना आता पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे असाच निर्णय पथारी स्टॉल धारकांना परवाना देताना किंवा पथारी स्टॉल धारकांचे पुनर्वसन करताना घेतील काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

कोथरूडमध्ये जपला महामानवाच्या समरसतेचा वारसा

पुणे: राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचारांची पेरणी होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुण्याच्या कोथरूडमध्ये असेच एक ‘समरसतेचे’ चित्र पाहायला मिळाले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केवळ औपचारिक अभिवादन न करता, आपल्या ‘देवाशिष’ निवासस्थानी समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र आणून एक नवा आदर्श निर्माण केला.

डॉ. बाबासाहेबांनी दिलेला ‘समानता आणि बंधुभाव’ हा मंत्र केवळ भाषणांतून न सांगता, चंद्रकांतदादांनी तो आपल्या कृतीतून दाखवून दिला. कोथरूडमधील सफाई कामगारांपासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत आणि कष्टकरी महिलांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजणांना एकाच छताखाली एकत्रित आणून महामानवाला अभिवादन केले.

याप्रसंगी भन्ते डॉ. हरिषबोधी महाथेरो, भिक्खू हर्षवर्धन थेरो, भिक्खू आनंद मेत्ता, भिक्खूणी धम्म दर्शनी आणि भिक्खूणी महाबोधी मेत्ता यांनी उपस्थित राहून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आशिर्वाद दिले. ना. पाटील यांनीही भिक्खू संघाला अत्यंत श्रद्धेने ‘चिवरदान’ करून आपला आदर व्यक्त केला. यानंतर उपस्थित सर्व भन्ते आणि भिक्खूंनी सर्व अनुयायांना तसेच नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या.”

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी कोणतीही मोठी व्यासपीठे की लांबलचक भाषणे नव्हती. तर फक्त आपुलकी आणि संवाद होता. आलेल्या प्रत्येक नागरिकाशी दादांनी वैयक्तिक विचारपूस केली. तसेच, बाबासाहेबांचे विचार आपल्या आचरणात येणे हेच त्यांना अभिवादन आहे, हा संदेश त्यांनी उपस्थितांवर बिंबवला.

या कार्यक्रमास उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आणि सामाजिक कार्यकर्ते एस. के. जैन, रिपाइं गटाचे सचिन खरात, रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, संजय सोनवणे, अशोक धिवरे, अविनाश साळवे, रत्नाकर गायकवाड, डॉ. विजय खरे, अतुल साळवे, डॉ. प्रशांत पगारे, ॲड. भाई विवेक चव्हाण, राहुल डंबाळे, यशवंत नडगम, सिताराम गंगावणे, ॲड. महेश सकट, हिमाली कांबळे, नगरसेविका पल्लवी जावळे, अश्विनी भंडारे, माजी नगरसेवक राहुल भंडारे, बाळासाहेब जानराव, असित गांगुर्डे, संजय सोनावणे, रावसाहेब राखपसरे, राजू जाधव, महेंद्र कांबळे, उमेश चव्हाण यांच्यासह पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारामुळे कोथरूडमध्ये ‘एकता आणि समतेचा’ एक नवा आदर्श प्रस्थापित झाला. दादांच्या या संवेदनशील पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “हेच आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण,” अशी भावना उपस्थितांनी याप्रसंगी व्यक्त केली.

असेल ‘मराठी’ बाणा तरच मिळणार रिक्षा-टॅक्सीचा परवाना:1 मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य

राज्यात रिक्षांचा आकडा १३ लाखांपार; परप्रांतीयांची मुजोरी रोखण्यासाठी मोहीम

पुणे-येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता, लिहिता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी लिहिता-वाचता-बोलता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता. पण चालकाला समज देऊन सोडून दिले जात होते.

भाषा सक्तीसाठी परवाना रद्दचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील कर्नाटक, तामिळनाडूनंतरचे तिसरे राज्य ठरेल. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक (आरटीओ) कार्यालये विशेष तपासणी मोहीम राबवतील. छत्रपती संभाजीनगर मुंबई महानगर क्षेत्र, नागपूर आदी शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

मराठी भाषा सक्तीचा हा निर्णय निव्वळ प्रशासकीय नाही, तर यात उद्धवसेनेचा ‘मराठी अस्मिता’ कार्ड हायजॅक करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मास्टरस्ट्रोक खेळी आहे. “खरी शिवसेना तीच, जी मराठी माणसासाठी प्रत्यक्ष कृती करते,’ हे शिंदेसेनेने या निर्णयातून ठणकावून सांगितल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ नुसार १ जानेवारी २०२५ रोजी राज्यात १२,२२,८४० रिक्षा होत्या. १ जानेवारी २०२६ पर्यंत हा आकडा १२,९६,४३० वर पोहोचला, तर टॅक्सी ७७ लाख आहेत. रिक्षा संख्येत सुमारे ६ टक्के वाढ महाराष्ट्रात रोजगारासाठी येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्याकडे अंगुलीनिर्देश करते. बहुतांश परप्रांतीय मराठी भाषिकांशी मुजोरी करतात, अशा तक्रारी आहेत. त्यांना चाप बसवण्यासाठीच परवाना रद्दची मोहीम आहे.

कायदा १९८८ चा, अंमलबजावणी ३७ वर्षांनी

परवाना रद्दचा कायदा आहे का?
-महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २४ आणि २७ (४) नुसार, रिक्षा, टॅक्सी, बस चालवण्याच्या परवान्यासाठी मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. ‘मोटार वाहन कायदा १९८८’ च्या कलम ८६ नुसार आरटीओला परवाना निलंबन किंवा रद्दचा अधिकार आहे. त्याची अंमलबजावणी आता ३७ वर्षांनंतर होईल असे दिसते.
परीक्षा लेखी की तोंडी?
-आरटीओ निरीक्षक चालकाला मराठी समजते की नाही याची तोंडी प्रश्न विचारूनच खातरजमा करतील. जुन्या चालकांची लेखी, तोंडी परीक्षा घेण्याचे निर्देश नाहीत, परंतु नव्या परवान्यासाठी ही प्रक्रिया कडक केली जाणार आहे.
आतापर्यंत परीक्षा कशी होती?
-परवान्यासाठी अर्ज करणाऱ्याला निरीक्षक मराठीत प्रश्न विचारत किंवा रस्ते चिन्हांचे फलक वाचायला सांगतात. दहावीत मराठी विषय पास असलेल्यांना बऱ्याच वेळा सवलत मिळते. कारण त्यांचे १० वीपास प्रमाणपत्र भाषेच्या ज्ञानाचा पुरावा मानले जाते.
जुन्यांना मराठी येत नसेल तर?
जुना परवाना असलेल्यांना मराठीत येत नसल्यास आधी ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली जाऊ शकते. ठरावीक मुदतीत तो मराठी शिकला नाही तर आता नव्या निर्णयानुसार परवाना रद्द होऊ शकतो.
केवळ १५ दिवसांत लाखो चालकांची परीक्षा घेणे शक्य आहे?
तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. १ मेपासूनची मोहीम प्रामुख्याने ‘जागरूकता’ आणि नवीन परवाना वितरणावर लक्ष केंद्रित करेल. आरटीओ कार्यालयांना केवळ कडक अंमलबजावणीचे आदेश आहेत.

देशात स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ३३ % महिला आरक्षण राजीव गांधी यांनीच दिलेले: काँग्रेस’चा दावा !

सरकारच्या ‘निवडणुक’जीवी राजकारणामुळे देशाचे नुकसान !
‘सामाजिक मागासलेपणाच्या ऊध्दारा’च्या डॅा बाबासाहेबांच्या हेतुला, तिलांजली देण्याचा भाजप’चा विधेयकाद्वारे प्रयत्न…
– काँग्रेस’ची प्रखर टिका

पुणे

संविधानीक, लोकतांत्रिक, प्रजासत्ताक भारताचे दैवत, घटनाकार डॅा बाबासाहेब आंबेडकर यांची देशभर जयंती साजरी होत असतांना, डॉ बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक समतेला व उर्वरीत मागासवर्गीय महिला आरक्षणाला’ तिलांजलि देण्याचा घाट मोदी सरकारने ‘नारी शक्ति वंदन’ संशोधन – दुरुस्ती विधेयक आणून घातल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, “पश्चिम बंगाल व तामिळनाडू” या २ राज्यांमध्ये निवडणुका असल्याने व विशेष करून बंगाल मध्ये श्रीमती “ममता दिदींच्या विरोघात, महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी व महिलांसाठी काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी ‘एकाच महिला विधेयकात ३० महिन्यांनी पुन्हा बदल करण्याचा घाट’ मोदी सरकार घालते हे केवळ ‘निवडणूकजीवी व सत्ताभिलाशी राजकारणाचे द्योतक’ असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,
२०२४ ची लोकसभा निवडणूक जवळ आली असताना, २८ मे २०२३ रोजी (नव्या संसद भवनात) ‘लोकसभा व विधानसभां’त महिलांना ‘२०२९ पासून व जातिगत जनगणनेनुसार’ ३३ % आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक मांडण्यात आले, त्यास काँग्रेस’ची महिला विधेयकास समर्थनात्मक प्रथम पासुनच भुमिका असल्याने, काँग्रेस’ने पाठिंबा दिला.
देशात सर्व प्रथम “स्थानिक स्वराज्य संस्था’मध्ये ३३ % महिला आरक्षण” तत्कालीन दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिल्याचा दावा देखील त्यांनी केला.
मोदी सरकारने २०२३ मध्ये मान्य करून घेतलेले “नारी शक्ती वंदन विधेयक” हे अमलात मात्र येणार होते २०२९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत.. कारण २०२१ ची सतत लांबणीवर पडलेली जनगणना आणि त्या ‘जनगणनेच्या आधारावर’ होणारी लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचनेची delimitation प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर..!
मागासवर्गीय, इतर मागास वर्गीय, ओबीसी महीला आरक्षण व या सर्वांचा ‘संविधानिक आधार असलेली जातिनीहाय जनगणने’वर सावट दर्शवणाऱ्या वृत्त लेखातून ‘संसदीय कांग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
कांग्रेस नेत्या सोनियाजी गांधींनी म्हटले की, केंद्र सरकारने‌ महिला आरक्षण‌ विधेयकाच्या अनुषंगाने संसदेचे अधिवेशन हे केवळ राजकिय लाभासाठीची घाई असून, खरा मुद्दा ‘मतदारसंघाच्या फेररचनेचा’ आहे.
महिला आरक्षणात अनुसूचित जाती ,अनुसुचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण दिले जाणे आवश्यक असून, नव्या जनगणने सोबत ‘प्रस्तावित जातीनिहाय जनगणना’ टाळण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा कांग्रेस प्रवक्त्यांनी आरोप केला.
बिहार आणि तेलंगणाने सहा महिन्यात जातीनिहाय जनगणना पूर्ण केली, तर मग केंद्रसरकार का विलंब करत आहे (?) असा प्रश्नही उपस्थित होतो.
लोकसभा सदस्य संख्या वाढविण्यासाठी पुनर्रचना ही केवळ अंकगणिताची नसावी तर ‘राजकीय दृष्ट्या न्यायसंगत असावी’ असे काँग्रेसने म्हटले असून, “ज्या छोट्या दक्षिणेकडील राज्यांनी साक्षरता व लोकसंख्या नियंत्रणाचे” चांगले काम केले आहे, त्यांचे नुकसान होता कामा नये, अशी ही श्रीमती सोनियाजी गांधी यांची भूमिका असल्याचे काँग्रेस वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

काँग्रेस राज्य प्रवक्ते पुढे पुढे म्हणाले की,
केंद्रात एच. डी. देवेगौडांचे सरकार असताना १२ सप्टेंबर १९९६ रोजी महिलांना ‘लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले ८१ वी घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले, तेव्हा महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात गदारोळ माजला व ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले आणि कालांतराने लोकसभेची मुदत संपून ते रद्द झाले. त्यानंतर थेट डॅा मनमोहन सिंग सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या पुढाकारानेच, राज्यसभेत विरोधी गदारोळात, महत्प्रयासाने ९ मार्च २०१० रोजी काँग्रेससह १८६ मतांनी महीला विधेयक पारीत झाले होते याची आठवण ही काँग्रेस प्रवक्त्यांनी करून दिली.

वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट, 9 कामगारांचा अंत

रायपूर: छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील सिंघीतराय येथील वेदांता पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी एक भीषण दु्र्घटना घडली. कारखान्यातील बॉयलरचा मोठा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत ३० ते ४० मजूर गंभीर जखमी झाले. या स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षकांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जणांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगढच्या फोर्टिस रुग्णालयात पाच जणांची प्राणज्योत मालवली. त्यांची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली. गंभीररित्या जखमी झालेले १८ मजूर फोर्टिसमध्ये दाखल आहेत. काही जखमींना रायगढच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच घबराट पसरली. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.मंगळवारी दुपारीच्या दोनच्या सुमारास कारखान्यात स्फोट झाला. त्यावेळी सगळे मजूर कारखान्यात काम करत होते. अचानक झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. कामगारांची पळापळ सुरु झाली. आक्रोश आणि आरडाओरडा सुरु झाला. स्फोटानंतर लगेचच मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं.

‘आधी कोण झोपणार?’ यावरुन दोन सुरक्षा रक्षकांत जोरदार वाद, एकाने दुसऱ्याला कायमचंच झोपवलं

पुणे : पुण्यातल्या खराडी भागात एक मोठी घटना घडली आहे. रात्रपाळीत काम करत असताना ‘आधी कोण झोपणार?’ या साध्या कारणावरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये एवढा मोठा वाद झाला की त्यातून थेट हत्येची घटना घडली. पांडुरंग खारवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) आणि सुदर्शन काळे (वय २२, रा. खराडी) हे दोघे एका सोसायटीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. दि. १२ एप्रिल रोजी रविवारी रात्री दोघांची एकत्र रात्रपाळी होती. काम करताना थोडा आराम मिळावा म्हणून त्यांनी आधीच ठरवलं होतं की रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत आळीपाळीने तीन-तीन तास झोप घ्यायची.’आधी कोण झोपणार?’
पण रात्री उशिरा ‘आधी कोण झोपणार?’ यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला हा साधा वाद होता, पण हळूहळू तो चांगलाच पेटला. दोघेही एकमेकांवर ओरडायला लागले. राग अनावर झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. संतापाच्या भरात सुदर्शन काळे याने आपल्या गळ्यातील गमजा काढला आणि तोच गमजा खारवणे यांच्या गळ्याला घट्ट आवळला. काही क्षणातच खारवणे खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. हा प्रकार पाहून काळे घाबरला.घाबरलेल्या अवस्थेत त्याने तत्काळ पोलीस कंट्रोल रूमला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खारवणे यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छोट्याशा कारणावरून एका व्यक्तीचा जीव गेला, यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुदर्शन काळे याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान छोट्या गोष्टींच्या रागातून असे विकृत कृत्य होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रगच्या अतिसेवनामुळे एमबीएच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू….जैन,खंडेलवाल,पटेल,पांडे, कुरूप पोलीस कोठडीत

सनी जैन, बालकृष्ण कुरुप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतिक पांडे, आकाश समल यांना पोलीस कोठडी

मुंबई -गोरेगाव येथे एका कार्यक्रमात ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 2 लोकांचा मृत्यू झाला. ही घटना नेस्को सेंटरमधील आहे, जिथे 11 एप्रिलच्या रात्री एक संगीत मैफल होती. मृत युवक आणि युवती एमबीएचे विद्यार्थी आहेत. मृतांनी कोणते मादक पदार्थ घेतले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मुंबईतील वनराई पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 6 लोकांना अटक करण्यात आली आहे, ज्यापैकी एक व्यक्ती या कार्यक्रमाशी संबंधित आहे.पोलिसांनी दावा केला आहे की, मृतांना ड्रग्ज देणारा व्यक्ती देखील विद्यार्थी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून सहा ते सात गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत
ही घटना 11 एप्रिलची आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्ट होता. या कार्यक्रमासाठी सुमारे 4,000 लोक जमले होते, ज्यांनी 2000 रुपये प्रवेश शुल्क दिले होते.

यामध्ये काही लोकांनी अंमली पदार्थ घेतले होते. पोलिसांच्या सूत्रांनुसार, त्यांनी प्रतिबंधित एमडीएमए (MDMA) औषध घेतले होते.
त्यानंतर रात्री 12 वाजता 3 लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे 2 जणांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर आहे.

एका विद्यार्थ्याने कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वी टॅक्सीमध्ये एक गोळी घेतली होती, तर नंतर कार्यक्रमादरम्यान दुसरी गोळी घेतल्याने त्याला ओव्हरडोज झाला.
नेस्को सेंटरने सांगितले की, ते तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेतो. सत्य लवकर समोर यावे यासाठी अधिकाऱ्यांना शक्य ती सर्व माहिती आणि मदत देत आहोत.वनराई पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 105 (सदोष मनुष्यवध) सह इतर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत इव्हेंट ऑर्गनायझर विहान उर्फ आकाश सामल, नेस्को इव्हेंट ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंटशी संबंधित सनी विनोद जैन, अंतर्गत सुरक्षा पथकाचे सदस्य बालकृष्णन बलराम आणि इतर दोन विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

सनी जैन, बालकृष्ण कुरुप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतिक पांडे, आकाश समल यांना पोलीस कोठडी ….

मुंबईत एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अशाप्रकारे ड्रग्जचे सेवन करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुंबई सारख्या शहरात अशाप्रकारच्या घटना घडूच कशा शकतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित म्युझिक कॉन्सर्टमध्ये हायप्रोफाईल तरुण-तरुणी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला तब्बल 3 ते 4 हजार तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांची गर्दी होती. यापैकी काही जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याची माहिती आहे. ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्याने एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दोन्ही विद्यार्थी हे मुंबईतील नामांकीत कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, अशी माहिती समोर येत आहे. तसेच एका विद्यार्थिनीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
या घटनेची गंभीर दखल गोरेगावच्या वनराई पोलिसांनी घेतली आहे. वनराई पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सनी जैन, बालकृष्ण कुरुप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतिक पांडे, आकाश समल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये आयोजकाचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यापैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एक जणावर उपचार सुरु आहेत. संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरु आहे”, अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी दिली.

फुले-आंबेडकरांचा प्रगतशील विचार मनामनात रुजावा- सतीश राऊत

आंबेडकर जयंतीनिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन

पुणे: “चांगल्या शिक्षणातून व संस्कारातून माणूस घडतो. जाती, धर्म व लिंगभेदाच्या भिंती बाजूला सारून सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य उभारले. त्यांनी दिलेला प्रगतिशील विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्याची, त्यांच्या विचारांचा अंगीकारून त्या मार्गाने चालण्याची गरज आहे,” असे मत अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी व्यक्त केले. गावकुसाबाहेर साजरी होणारी आंबेडकर जयंती सर्वसमावेशक व मुख्य प्रवाहातही साजरी होतेय, याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘गौरव कार्याचा… उगवत्या ताऱ्यांचा’ या सन्मान सोहळ्यात सतीश राऊत बोलत होते. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. शिक्षण, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य या क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी डॉ. दत्ता कोहिनकर यांचे ‘मनाची मशागत’ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

सिंहगड रस्त्यावरील मॉंटेरोसा सोसायटीमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे कमांडर कवींद्र कुमार, निरीक्षक रामदास यशवंते, उद्योजक तुषार गोसावी, पुणे महानगरपालिकेतील नाव समितीच्या अध्यक्षा पल्लवी जावळे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका ज्योती गोसावी, पुष्पा कांबळे आदी उपस्थित होते. 

सतीश राऊत म्हणाले, “महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या, शिक्षणाच्या आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची आज अधिक गरज आहे. हा प्रगतशील विचार प्रत्येकाच्या मनामनात रुजवला पाहिजे. बालपणी जातीभेदाच्या विरोधात बंड करण्याची प्रेरणा मला याच विचारांनी दिली. आजही समाजात असलेली असमानता आणि अन्याय दूर करण्यासाठी हा विचार पुढे नेला पाहिजे. रंगावरून कोणत्याही माणसाची ओळख निर्माण होऊ नये.”

राजेश पांडे म्हणाले, ” डॉ. आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन अवघ्या विश्वाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा आपण नवीन पिढीला द्यायला हवा. अशा कार्यक्रमांतून समाजातील संवाद आणि विचारांची देवाणघेवाण वाढते. तरुणांनी वाचनाला प्राधान्य द्यावे. शिक्षण, चांगले वाचन यातूनच प्रगल्भ समाजाची निर्मिती होईल.”

संभाजी कदम यांनी यशाच्या शिखरावर पोहोचले, तरीही माणसाने मुळांना विसरू नये, असे सांगत संविधान हा देशाचा आत्मा असून, त्याच्या बळावरच भारत प्रगती करत आहे, असे त्यांनी नमूद केले. डॉ. भोई यांनी महामानवांच्या जयंती डीजेमुक्त होण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवेत, असे सांगितले. सचिन ईटकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर भाष्य करीत मनोगत व्यक्त केले. कवींद्र कुमार यांनी आम्ही संविधानाचे रक्षक असून, देशसेवेचे काम करत आहोत, याचा अभिमान वाटतो, असे नमूद केले.

फाउंडेशनचे माध्यम सल्लागार जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. पद्मा फाउंडेशनतर्फे शशिकांत कांबळे यांनी आभार मानले.

कोंढव्यात प्रथमच बाबासाहेबांचा भव्य २५ फूट पूर्णाकृती पुतळा :अत्यंत दिमाखात १३५वी जयंती साजरी – आयोजक अॅड. तोसिफ शेख

पुणे-कोंढवा खुर्द येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त प्रथमच २५ फूट उंचीचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारून जयंती उत्सव अत्यंत दिमाखात साजरा करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, कोंढवा खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक १३/०४/२०२६ रोजी रात्री ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समता सैनिक दल व भीम सैनिकांकडून मानवंदना, सामूहिक बुद्ध वंदना तसेच फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच मंगळवार दिनांक १४/०४/२०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन व मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून भव्य लाईट शो, भव्य पुतळा, फायर शो तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे ठिकाण नरवीर तानाजी मालुसरे चौक, ज्योती हॉटेल जवळ, कोंढवा खुर्द येथे असून परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमाचे आयोजन अॅड. तोसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, नगरसेवक पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.समस्त कोंढवा खुर्द ग्रामस्थ, मुस्लिम समाज तसेच बहुजन समाज यांच्या विशेष सहभागातून हा जयंती उत्सव सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे.

‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत मृत व्यक्तींच्या ८८९ वारसदारांना शासकीय नोकरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामाजिक प्रगतीसाठी अंमलात आणणे आवश्यक-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे : अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचारग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मृत झालेल्या व्यक्तींच्या ८८९ पात्र वारसदारांना शासन सेवेत संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागात आयोजित कार्यक्रमात मिसाळ बोलत होत्या. या वेळी पुणे जिल्ह्यातील १८ वारसदारांना मिसाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

आमदार बापू पठारे, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहआयुक्त प्रमोद जाधव, प्रादेशिक आयुक्त वंदना कोचूरे, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती.

मिसाळ म्हणाल्या, “केंद्र सरकारच्या १९८९ च्या ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्तांना आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची तरतूद करण्यात आली होती. राज्यात १९९५ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. गरजेनुसार त्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या.”

मिसाळ पुढे म्हणाल्या, “२०१६ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार खून किंवा मृत्यू झाल्यास पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला अर्थसहाय्य किंवा एका व्यक्तीला आवश्यक असल्यास नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार २०१२ ते २०२५ या कालावधीत एकूण ३२० प्रकरणात वारसदारांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी ४४ वारसांना नोकरी २६६ वारसांना निवृत्तीवेतन, एका वारसाला जमीन आणि १० वारसांना घरकुल देण्यात आले.”

कायद्यातील तरतुदी पुरेशा स्पष्ट नसल्याने पीडितांच्या वारसांना नोकरी देण्याचे प्रमाण खूपच कमी होते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार जुलै २०२५ अखेर राज्यात प्रलंबित असलेल्या ८८९ प्रकरणासंबंधी एक वेळची विशेष बाब म्हणून ‘ड’ संवर्गातील शासकीय पदांवर नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली. आज पुणे जिल्ह्यातील १८ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे मिसाळ यांनी सांगितले.”

“महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष, संत गाडगेबाबा यांचे १५० वे जयंती वर्ष आणि चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष राज्यात सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.–माधुरी मिसाळ

श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्‍या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक समता सप्‍ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या, महामानवांचे कार्य, त्‍यांचे विचार, आपल्‍याकडून अपेक्षित असलेले वर्तवणूक तसेच समाज कल्‍याण विभागामार्फत विविध योजनांची माहिती दिली.

सहआयुक्त प्रमोद जाधव यांनी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतक-यांसाठी केलेले कार्य” या विषयावर व्‍याख्‍यान दिले.

श्रीमती कोचुरे यांनी समाज कल्‍याण कार्यालयाच्‍या अंतर्गत असणाऱ्या वसतिगृह, निवासी शाळांमध्‍ये ८ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्‍ये सामाजिक समता सप्‍ताहानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

श्री. लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरीकांना शुभेच्‍छा संदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रेरणादायी विचार घेवून जीवनाची वाटचाल यशस्‍वी करावी, असे आवाहन केले.

यावेळी समाज कल्‍याण विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख व गृहपाल तसेच विद्यार्थी- विद्यार्थींनी, नागरिक उपस्थित होते.