Home Blog Page 30

पुणे विमानतळावर १५ नवीन फ्लाइट स्लॉट्सची भर; कनेक्टिव्हिटीला मोठा बूस्ट-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे, दि. १४ एप्रिल २०२६ : पुणे विमानतळाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, १५ अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्सची वाढ करण्यात आली आहे. यामुळे विमानतळावरील एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ झाली आहे. या वाढीमुळे प्रवासी हालचाली अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम होणार असून विमान कंपन्यांना अधिक उड्डाणे सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे.

नवीन स्लॉट्सच्या उपलब्धतेमुळे पुणे शहराला मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या नव्या हवाई मार्गांनी जोडले जाणार आहे. या नव्या मार्गांमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर पर्यटन, व्यापार, उद्योग आणि सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. विशेषतः सोलापूरसारख्या शहराला थेट हवाई जोडणी मिळाल्याने मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हा महत्त्वपूर्ण विकास केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे पुणे विमानतळाच्या क्षमतेत वाढ होत असून, शहराच्या वाढत्या हवाई प्रवासाच्या गरजांना समर्थपणे प्रतिसाद दिला जात आहे.

या संदर्भात मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे विमानतळावरील स्लॉट्सची वाढ ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची पायरी आहे. नवीन उड्डाणांमुळे उद्योग, आयटी, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. केंद्र सरकारच्या UDAN योजनेच्या माध्यमातून आम्ही दुर्गम आणि मध्यम शहरांनाही हवाई नकाशावर आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत.”

पुणे विमानतळ ‘रीजनल कनेक्टिव्हिटी स्कीम (RCS–UDAN)’ अंतर्गत सध्या नांदेड, किशनगढ, सिंधुदुर्ग आणि जळगाव या महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. या मार्गांमुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत होत असून, संतुलित प्रादेशिक विकासाला गती मिळत आहे. तसेच, वाढत्या प्रवासी संख्येला लक्षात घेता विमानतळावर सुविधा उन्नत करण्याचे कामही सुरू आहे, ज्यामध्ये प्रवासी सोयी, सुरक्षा व्यवस्था आणि ऑपरेशनल क्षमता यामध्ये सातत्याने सुधारणा केली जात आहे.

१ मे २०२६ पासून नव्याने सुरू होणाऱ्या उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, यामुळे पुणेकरांना अधिक पर्याय आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुणे विमानतळ प्रशासन भविष्यातही अधिक मार्ग, वाढीव उड्डाणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असून, पुण्याला देशातील एक महत्त्वाचे एव्हिएशन आणि कनेक्टिव्हिटी हब बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल; जिद्दीच्या बळावर उभारला स्वतःचा उद्योग..

यशकथा

महिला सक्षमीकरण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निर्णयप्रक्रियेत समान संधी उपलब्ध करून देणे हे सशक्त समाजनिर्मितीसाठी आवश्यक मानले जाते. भारताच्या राज्यघटनेने महिलांना समान हक्क दिले असून, त्यांच्या प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना आणि उपक्रम सातत्याने राबवत आहे. स्वयंसहाय्यता गट, कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता प्रोत्साहन तसेच आरोग्य व सुरक्षाविषयक योजनांमुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला झाला आहे. या योजनांचा योग्य लाभ घेत महिलांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या विकासातही सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज अधोरेखित होत आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात राहणाऱ्या श्रीमती गंगा दिलीप गाढवे यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर उद्योजकतेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. फ्लेक्स प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग, इको प्रिंटिंग आणि एलईडी बोर्ड निर्मिती या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा त्यांनी ध्यास घेतला.

व्यवसायासाठी आवश्यक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे एक्झीब्युशन सेंटरला भेट दिली. मात्र, भांडवलाच्या अभावामुळे व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार करणे आव्हानात्मक ठरत होते.


अशा परिस्थितीत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ या योजनेअंतर्गत कर्जासाठी प्रस्ताव सादर केला. त्यांच्या चिकाटीला यश मिळाले आणि युनियन बँक ऑफ इंडिया, हिंजवडी शाखेकडून त्यांना २१ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पावर २५ टक्के अनुदानही प्राप्त झाले.

या आर्थिक सहाय्याच्या बळावर श्रीमती गंगा गाढवे यांनी स्वतःचा उद्योग उभारला आणि आज त्या यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण करत आहेत. त्यांच्या उद्योगातून दरमहा सुमारे ३.५ ते ४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःपुरते यश मर्यादित न ठेवता इतरांसाठीही रोजगारनिर्मिती केली असून सध्या ४ ते ५ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

श्रीमती गाढवे यांचा हा प्रेरणादायी प्रवास स्पष्टपणे दाखवून देतो की योग्य मार्गदर्शन, शासकीय योजनांचा प्रभावी वापर आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती आत्मनिर्भर बनू शकते. त्यांच्या यशातून इतर महिलांनी आणि बेरोजगार तरुणांनी प्रेरणा घेऊन स्वतःचा उद्योग उभारण्याचा प्रयत्न करावा, हा सकारात्मक संदेश मिळतो.

याबाबत जिल्हा उद्योग केंद्र, पुणेच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी सांगितले की, ग्रामीण व वंचित भागातील महिलांपर्यंत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास महिलांचे सक्षमीकरण अधिक व्यापक होऊ शकते. महिलांसाठी दिली जाणारी शासकीय मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून त्यांच्या आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढविण्याचा एक महत्त्वाचा आधार ठरते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा राज्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असून त्याचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. १० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन प्रकल्प तसेच ५ लाख रुपयांपेक्षा जास्त सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही अनुदानित शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. उत्पादन उद्योगासाठी कमाल मर्यादा १ कोटी रुपये तर सेवा व कृषीपूरक उद्योगांसाठी ५० लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

ही योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत मार्गानेच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, कृषी महाविद्यालय आवार, पुणे येथे संपर्क साधता येईल.

संकलन :- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवानदन.

पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कलेक्टर कचेरी जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘डॉ. आंबेडकरांचा हा दिमाखदार जीवन प्रवास, त्यांच्या अभ्यासू आणि कृतिशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतो. सर्वात प्रथम, त्यांनी अर्थशास्त्र, राजकारण, कायदा, तत्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान संपादन केले. शिक्षण घेताना त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण त्यांनी आपले आयुष्य केवळ वाचन-अभ्यास आणि ग्रंथालयात व्यतीत केले नाही. त्यांनी आकर्षक पगाराची उच्च पदे नाकारली, कारण ते शोषित वर्गातील आपल्या बधुंना विसरले नाहीत. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केले. पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
त्यांचा जीवन इतिहास पाहिल्यावर, त्यांचे मुख्य योगदान आणि त्यांची प्रासंगिकता अभ्यासणे आणि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आणि योग्य आहे. एका मतप्रवाहानुसार तीन मुद्दे आजही अधिक महत्त्वाचे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय समाज आजही अनेक आर्थिक, सामाजिक समस्यांना तोंड देत आहे. या समस्या सोडवण्यामध्ये, डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कृती आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
यावेळी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, रफिक शेख, मेहबुब नदाफ, प्राची दुधाने, ॲन्थोनी जेकब, राज अंबिके, फिरोज शेख, अभिजीत महामुनी, सिमा सावंत, सुंदर ओव्‍हाळ, विशाल जाधव, अकबर शेख सुरेश नांगरे, फैय्याज शेख, मनोहर गाडेकर, नितीन वायदंडे, मुन्ना खंडेलवाल, विनोद चौरे आदी उपस्थित होते.

गोरेगावमधील नेस्को संकुलातील ड्रग्ज पार्टीची भनक पोलिसांनी कशी लागली नाही; टक्केवारी, हप्ते व ‘वसुली’ एवढ्याच कामासाठी यंत्रणा आहेत का?

देवेंद्र फडणवीसांना गृहखातेच काय, महाराष्ट्राचा कारभारही झेपेना; जमत नसेल तर खुर्ची खाली करा पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका…

मुंबई, दि. १४ एप्रिल २०२६..

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यात आला. ड्रग्जमुळे दोघांचे मृत्यू होईपर्यंत पोलीस व सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या, आता कारवाईचे नाटक सुरु आहे पण मुंबईतील एका भागात चार ते पाच हजार तरुण तरुणांची ड्रग्ज पार्टी होते, याची भनक पोलीसांना कशी लागली नाही. मुंबईतील ही घटना दोन मृत्यूमुळे उघड झाली पण मुंबईतच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात ड्रग्जचा काळा धंदा सरकारच्या आशिर्वादाने सुरु असून भाजपा महायुतीच्या निर्लज्ज व नालायक सरकारमुळेच महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकली, असल्याचा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मुंबई पोलीस व सरकारी यंत्रणाच्या नाकावर टिच्चून अशा ड्रग्ज व दारुच्या पार्ट्या खुलेआम होत आहेत, हे गृहविभाग व सर्व यंत्रणाचे मोठे अपयश आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकण्यास भाजपा महायुती सरकारचा आंधळा कारभार जबाबदार आहे. राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या शेतातच ड्रग्जचा कारखाना सुरु असतो, तो उघड होऊनही थातूर मातूर कारवाई करून प्रकरण दडपले जाते. मुख्यमंत्री फडणवीसही त्याला क्लीन चिट देऊन टाकतात हे अत्यंत गंभीर आहे. राज्यात ड्रग्जचा धंदा खुलेआम सुरु असल्याचे नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर येथील घटनांवरून याधीच उघड झाले पण सरकार काही झोपेतून जागे झाले नाही. ड्रग्ज माफिया ललित पाटील असो, नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण असो वा साताऱ्यातील ड्रग्जचा कारखाना…या सर्वांचे धागेदोरे सरकारमधील बड्या धेंड्यांशी असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. ड्रग्जने आणखी किती मृत्यू होईपर्यंत फडणवीस सरकार गप्प बसून फक्त क्लिन चिट वाटत बसणार ?

नेस्कोतील चार-पाच हजार विद्यार्थ्यांच्या अशा पार्टीला परवानग्या कोणी दिल्या, सरकार व पोलीस कोणाला पाठीशी घालत आहे, हे समजले पाहिजे. सरकारने पोलीस व सर्व यंत्रणांना फक्त टक्केवारी, हप्ते वसूली करणे व सर्वसामान्य जनतेकडून कायद्याचा गैरवापर करत ‘वसुली’ करणे याच कामाला जुंपल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसत आहे. देवेंद्र फडणवीस मोठमोठ्या गप्पा मारत असतात पण फडणवीस यांना गृहखातेच काय महाराष्ट्राचा राज्यकारभारही हाकता येत नाही. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

उत्तम साहित्य निर्मितीसाठी मनाची मशागत आवश्यक : स्वाती महाळंक

वल्लरी प्रकाशनच्या ‘गुलबक्षी’ प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पुणे : मनात दाटलेले कागदावर उमटते तेव्हा रिते वाटते, हे रितेपण समाधान घेऊन येते, ही अनुभूती कविता लिहिल्यावर येते. उत्तम काव्याची निर्मिती होण्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत, मनाची चांगली मशागत व्हायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.

वल्लरी प्रकाशनतर्फे ‘गुलबक्षी’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी महाळंक बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, कवयित्री कांचन सावंत, मानसी चिटणीस, यशदाचे अधिकारी व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते.

‘गुलबक्षी’मध्ये सुरेखा मिसाळ, रत्नाकर खरोटे, माधवराव देशमुख, प्रितम गाडगीळ, तुषार देशमुख, रेखा बारी, पूजा बोटे, अर्चना पाटील, डॉ. चैताली भिडे, पौर्णिमा चिकणे, निर्मला गिरासे अशा अकरा कवींचा समावेश आहे.  यावेळी सह्याद्री नॅशनल स्कूलचे विद्यार्थी आर्या जगदाळे, गणेश कळसे आणि माया कल्याणकर यांनीही कवितांचे सादरीकरण केले.  समारंभाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले. 

महाळंक पुढे म्हणाल्या, ‘‘कविता हे व्रत आहे. कवीच्या अंतरंगात, मनात उमटणारा भावनांचा उत्स्फूर्त, सशक्त अविष्कार म्हणजे कविता होय. गेल्या काही वर्षात कवींचे पीक आले आहे, असे सातत्याने म्हटले जाते, पण या कवींमध्ये किती कस आहे हे तपासून पाहायला हवे. येत्या काळात स्वत:ला कवी म्हणवणाऱ्या प्रत्येकाने अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. गझलकार म. भा. चव्हाण यांनी यावेळी विविध धाटणीच्या गझल, कविता सादर केल्या.

कांचन सावंत म्हणाल्या, स्वत:चे भावविश्व रसिकांसमोर उलगडणे म्हणजे कविता सादर करण्याची प्रक्रिया होय. कविता लिहिणाऱ्यांनी शब्दांच्या पलिकडचे वाचायला शिकले पाहिजे. यमकाचा अभ्यास, छंद, शब्द, लय यांचे भान कवीला असायला हवे. रियाजाने कविता चांगली होत जाते, त्यामुळे कवितेचा रियाज आवर्जून करायला हवा.

व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविकात वल्लरी प्रकाशनाची भूमिका सांगितली. ते म्हणाले, मागील ३ वर्षातील हा २२वा कविता संग्रह असून महाराष्ट्राच्या विविध भागांतील कवींना चांगले व्यासपीठ निर्माण करून देणे हे आमचे ध्येय आहे. हृदयातून उमटते आणि हृदयापर्यंत पोहोचते ती खरी कविता असते. साहित्याला जेव्हा ममतेचा स्पर्श होतो तेव्हा ती कलाकृती खऱ्या अर्थाने उत्तम होते. मराठी साहित्यिक बरेचदा स्वप्नरंजनात अडकतात. मात्र वास्तववादी आणि रसिकांना आवडेल अशा साहित्याची निर्मिती व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

मानसी चिटणीस यांनी कविता संग्रहाची प्रक्रिया सांगून कवितांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संपादिका प्रज्ञा कल्याणकर यांनी केले. 

साहित्याच्या क्षेत्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींचा मला सहवास लाभला. व. पु. काळे यांनी मला बोलते केले तर सुरेश भट यांच्यामुळे मी लिहिता झालो. या दोन व्यक्तींमुळे मी खऱ्या अर्थाने घडलो.

–      म. भा. चव्हाण

टाटा स्मॉल कॅप फंडमध्ये एक रकमी गुंतवणूक पुन्हा सुरू

मुंबई, 14एप्रिल 2026: टाटा म्युच्युअल फंडने ६ एप्रिल २०२६ पासून ‘टाटा स्मॉल कॅप फंड’मध्ये ‘लम्पसम’ आणि ‘स्विच-इन’ द्वारे सर्व नवीन गुंतवणूक पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. स्मॉल-कॅप श्रेणीतील निधीचे योग्य नियोजन आणि लिक्विडिटी (तरलता) राखण्यासाठी फंड हाऊसने एकरकमी गुंतवणुकीवर तात्पुरती बंदी घातली होती, जी आता उठवण्यात आली आहे. हा बदल भविष्यातील गुंतवणुकीसाठी लागू असेल आणि तो योजनेच्या माहिती पुस्तिकेचा (SID आणि KIM) अविभाज्य भाग राहील.
 
याविषयी बोलताना टाटा एसेट मॅनेजमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर आनंद वरदराजन म्हणाले, गुंतवणूक पुन्हा सुरू करण्याचा आमचा निर्णय हा सध्याच्या बाजारपेठेतील संधींवरील आमचा विश्वास आणि मजबूत आर्थिक स्थिती  शाश्वत वाढ असलेल्या कंपन्या निवडण्याच्या आमच्या क्षमतेवर आधारित आहेया श्रेणीत चढउतार होणे स्वाभाविक असलेतरी अलीकडच्या घसरणीमुळे दीर्घकालीन फायद्यासाठी योग्य स्तरावर गुंतवणूक करण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.”
 
बाजारातील अलीकडच्या चढ-उतारामुळे स्मॉल-कॅप शेअर्सच्या किमती आणि व्हॅल्युएशनमध्ये सुधारणा झाली आहे, ज्यामुळे या सेगमेंटमधील गुंतवणुकीचा दर आता अधिक वाजवी स्तरावर आला आहे. या बदलामुळे मूलभूतपणे भक्कम कंपन्या आता चांगल्या किमतीत उपलब्ध आहेत, जे आमच्या ‘बॉटम-अप’ गुंतवणूक पद्धतीसाठी योग्य आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना स्मॉल-कॅप क्षेत्रात गुंतवणुकीची संधी मिळावी यासाठी ही योजना एकरकमी गुंतवणुकीसाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे.
 
योजनेच्या इतर सर्व अटी आणि शर्ती, तसेच रिस्क-ओ-मीटरमध्ये कोणताही बदल होणार नाही. गुंतवणूकदारांना आम्ही सल्ला देतो की त्यांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांशी चर्चा करावी, कारण म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते आणि गुंतवणुकीपूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.

बिर्लास्टुडिओज आणि वी ची भागीदारी:भारतातील पहिले ‘मोबाईल-फर्स्ट’ टॅलेंटहंट’रील सेरिअल स्टार’ आयोजित करणार

मुंबई, १४ एप्रिल, २०२६: बिर्ला स्टुडिओजने वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या सहयोगाने ‘रील से रिअल स्टार’ (Reel Se Real Star) हा उपक्रम सुरु करत असल्याची घोषणा आज केली. ‘मोबाईल फर्स्ट’ अभिनय टॅलेंट शोधणारे हे अशा प्रकारचे पहिलेच व्यासपीठ आहे. भारतीय मनोरंजन सृष्टीतील संधींची दारे सर्वांसाठी खुली करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

‘ओळख आणि संधी’ हे मुख्य ध्येय उराशी बाळगून, ‘रील से रिअल स्टार’ हे व्यासपीठ भौगोलिक मर्यादा, चित्रपटसृष्टीत प्रवेशाच्या आड येणारे अडथळे दूर करत आहे – स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सिनेमाचे दरवाजे खुले होणार आहेत.  

हा उपक्रम एका साध्या पण अत्यंत प्रभावी विचारावर आधारलेला आहे: “कला ही कोणा एकाची मक्तेदारी नसते, ती कोणातही असू  शकते आणि प्रत्येक प्रतिभेला व्यासपीठ मिळायलाच हवे.”

या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना बिर्ला स्टुडिओजच्या संस्थापिका आणि अध्यक्षा अनन्या बिर्ला म्हणाल्या: अनेकदा योग्य प्रतिभेला हवी तशी संधी मिळत नाहीआणि याच कमतरतेमुळे अनेक होतकरू कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येण्यापासून वंचित राहतातआजच्या काळात उपलब्ध असलेल्या प्रगत डिजिटल पायाभूत सुविधाबिर्ला स्टुडिओजची सर्जनशील दृष्टी आणि वोडाफोन आयडियाचे (वीदेशव्यापी जाळे यांच्या मदतीनेआम्ही पारंपारिक मर्यादा ओलांडून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देण्यास सक्षम आहोतचित्रपटसृष्टीची दारे सर्वांसाठी कशी खुली करता येतीलयाचा नव्याने विचार करण्याची ही एक उत्तम संधी आहेरील से रिअल स्टार‘ हा आमचा एक असा प्रयत्न आहेजिथे देशाच्या कोणत्याही भागातील व्यक्तीमधील कलागुणांचा शोध घेतला जाऊ शकतो आणि संधी मिळवण्यासाठी परिस्थितीचा अडथळा येणार नाहीकारण आम्ही असे मानतो कीप्रत्येक प्रतिभेला स्वतःला सिद्ध करण्याची एक खरी संधी मिळायलाच हवी.”

वोडाफोन आयडियाची (वी) अफाट डिजिटल पोहोच आणि बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील तसेच सांस्कृतिक दृष्टी यांचा मेळ घालत, भारतातील सर्वात अस्सल आणि वैविध्यपूर्ण ‘ॲक्टिंग टॅलेंट पाईपलाईन’ निर्माण करण्याचे या व्यासपीठाचे ध्येय आहे. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान असूनही वंचित राहिलेले कलाकार मनोरंजन सृष्टीच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जातील.

वोडाफोन आयडियाचे (वीमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीअभिजित किशोर म्हणाले, कनेक्टिविटी तेव्हाच सर्वात अर्थपूर्ण ठरते जेव्हा ती संधी निर्माण करतेरील से रिअल स्टार‘ हे व्यासपीठ देशभरातील उदयोन्मुख कलाकारांना ऑडिशन रूम‘ थेट त्यांच्या हातात आणून देईलचित्रपटसृष्टीतील प्रवेशाच्या आड येणारे पारंपारिक अडथळे मोडीत काढणार आहेआमचे भक्कम नेटवर्क२० कोटींहून अधिक युजर्सपर्यंत असलेली आमची डिजिटल पोहोच आणि बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील दृष्टी यांच्या जोरावरआम्ही संपूर्ण भारतात प्रतिभा शोधण्याच्या प्रक्रियेचे लोकशाहीकरण‘ करत आहोतआमचे ध्येय साधे आहेप्रतिभेला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नसाव्यात आणि तिचा शोध कुठूनही घेतला जावा— मग ते गजबजलेले महानगर असो किंवा दुर्गम गावआम्ही केवळ एक व्यासपीठ तयार करत नाही आहोततर लाखो लोकांना त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालण्याची एक खरी संधी देत आहोत.”

ही मोहीम संपूर्ण देशभरात चालवली जाणार आहे. यामध्ये संपूर्ण भारतभरातील उदयोन्मुख कलाकारांना संपूर्णपणे डिजिटल, ॲप आणि वेब-आधारित प्रक्रियेद्वारे आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. यात सहभागी होणारे कलाकार आपल्या ऑडिशन्स थेट अपलोड करू शकतील, ज्यामुळे सिनेसृष्टीतील कोणाच्याही ओळखीची गरज आता उरलेली नाही.

‘रील से रिअल स्टार’ मध्ये जनसहभाग आणि तज्ञांचे मार्गदर्शन यांचा एक अनोखा संगम घडून येईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची पारख नामवंत दिग्दर्शक आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज करतील, तसेच त्यांना बहुमोल मार्गदर्शन देखील करतील. यामुळे या उपक्रमाची विश्वासार्हता आणि कलात्मक दर्जा जपला जाईल.

भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे एक सुवर्णसंधी — एका नामांकित दिग्दर्शकासोबत चित्रपटात काम करण्याची! हा उपक्रम येत्या काही महिन्यांत ‘वी’ (वोडाफोन आयडिया) ॲपवर सहभागासाठी उपलब्ध होईल. सध्या, इच्छुक कलाकार बिर्ला स्टुडिओज किंवा वी च्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करू शकतात.

गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये मार्च 2022 पासून 3.8 पट वाढ, बनले आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रिटेल क्रेडिट उत्पादन

· गोल्ड लोन शिल्लक आता भारताच्या रिटेल क्रेडिट पोर्टफोलिओपैकी 11.1%; मार्च 2022 मध्ये हे प्रमाण 5.9% होते

· ओरिजिनेशन मूल्य 2022 च्या पहिल्या तिमाही पासून 5.1 पट वाढले असून सरासरी तिकीट आकार 90,000 रु. वरून दुप्पटीने वाढून 1.96 लाख रु.

·         प्राइम आणि त्याहून उच्च प्राइम कर्जदार आता सुमारे 52% ओरिजिनेशनमध्ये आहेत आणि महिलांचा वाटा 39% आहे. त्यायोगे गोल्ड लोन बाजारात अधिक व्यापक आणि मजबूत कर्जदार आधार दिसून येत आहे

मुंबई, 14 एप्रिल 2026: गोल्ड लोन वेगाने वाढत शिल्लक वाट्याच्या आधारावर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रिटेल क्रेडिट उत्पादन बनले आहे1. ट्रान्सयुनियन सिबिलच्या गोल्ड लोन लँडस्केप अहवालानुसार मार्च 2022 पासून गोल्ड लोन शिल्लक 3.8 पट वाढली असून डिसेंबर 2025 पर्यंत भारताच्या रिटेल क्रेडिट पोर्टफोलिओमधील त्यांचा वाटा 5.9% वरून 11.1% पर्यंत वाढला आहे. या वाढीतून कर्जदारांकडून वाढता स्वीकार, मोठे तिकीट आकार, वित्तपुरवठादारांचा व्यापक सहभाग आणि अधिक विस्तृत क्रेडिट इतिहास असलेल्या ग्राहक व महिला कर्जदारांचा समावेश असलेला कर्जदार प्रोफाइल दिसून येतो.

अहवालात असे दर्शविले आहे की या विभागातील वाढ विशेषतः एनबीएफसीमध्ये मजबूत राहिली आहे. त्यांनी मार्च 2022 मधील 7% वरून डिसेंबर 2025 मध्ये 11% पर्यंत गोल्ड लोन शिल्लक वाटा वाढवला आहे, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी याच कालावधीत 57% वरून 62% पर्यंत वाढ केली आहे. प्रत्येक खात्यावरील सरासरी गोल्ड लोन शिल्लक मार्च 2022 मधील 1.1 लाख रु. वरून डिसेंबर 2025 मध्ये 1.9 लाख रु. झाली आहे. त्यातून या विभागातील कर्जाचे वाढते प्रमाण अधोरेखित होते.

चार्ट 1: गोल्ड लोन इंडस्ट्री सप्लाय (इंडेक्स्ड) *

टीप: मार्च ’22 ला संपलेल्या तिमाहीसाठी निर्देशांक 100 धरला आहे

पुरवठा प्रवाह बाजारातील घडामोडींमध्ये तीव्र विस्तार दर्शवतात. 2022 मधील पहिल्या तिमाहीपासून गोल्ड लोन ओरिजिनेशनचे प्रमाण 2.3 पट वाढले आहे, तर त्याच कालावधीत ओरिजिनेशन मूल्य 5.1 पट वाढले आहे. 2022 मधील पहिल्या तिमाहीत 90,000 रु. असलेला सरासरी तिकीट आकार 2025 च्या चौथ्या तिमाहीत 1.96 लाख रु. पर्यंत वाढला आहे. यावरून बाजाराचा विस्तार फक्त पोहोच वाढविण्यातच नाही तर उच्च मूल्याच्या कर्जाकडेही होत असल्याचे दिसते.

कर्जदारांचे प्रोफाइल देखील बदलत आहेत. गोल्ड लोन ओरिजिनेशनमध्ये प्राइम आणि त्याहून उच्च प्राइम2 कर्जदारांचा वाटा 2022 मधील 43% वरून 2025 मध्ये सुमारे 52% झाला आहे, तर न्यू-टू-क्रेडिट सहभाग 12% वरून 6% पर्यंत घटला आहे. यावरून कर्जदारांच्या प्रोफाइलमध्ये गोल्ड लोन अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण होत असल्याचे सूचित होते.

ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भावेश जैन म्हणाले, “भारतामध्ये सोने नेहमीच आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहे.  परंतु आता सोने-आधारित कर्जाचा वापर कसा केला जातो यात एक संरचनात्मक बदल होत असताना आपण पाहत आहोत. सुलभ सुरक्षित कर्ज म्हणून गोल्ड लोन हे वाढत्या प्रमाणात मुख्य प्रवाहातील, सुसूत्र आणि सहज उपलब्ध या स्वरूपाचे बनत आहे. त्यांची जलद वाढ कर्जदात्यांचा म्हणजेच वित्तपुरवठादारांचा विश्वास आणि ग्राहकांचा वाढता स्वीकार या दोन्हींचे प्रतिबिंब आहे.

“विशेष लक्षवेधी बाब म्हणजे या विभागात अधिक मजबूत क्रेडिट प्रोफाइल असलेले कर्जदार, मोठे तिकीट आकार आणि परत परत वापर होत आहे. यावरून असे दिसते की गोल्ड लोन आता केवळ अल्पकालीन तरलतेच्या गरजांसाठी वापरले जात नाहीत, तर ते घरगुती कर्ज घेण्याच्या व्यापक वर्तनाचा भाग बनत आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.

व्यापक कर्जदार आधार विस्ताराला देत आहे चालना

महिला कर्जदार गोल्ड लोन विस्तारामध्ये एक महत्त्वाचा वाढीचा घटक म्हणून उदयास आले आहेत. गोल्ड लोन ओरिजिनेशनमध्ये महिलांचे प्रमाण 2022 मधील 36% वरून वाढून 2025 मध्ये 39% झाले. दक्षिणेकडील बाजारपेठांबरोबरच पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यांमध्येही मजबूत वाढ दिसून येत आहे. अहवालात तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये महिला कर्जदारांमध्ये उल्लेखनीय गती दिसून येत असल्याचे ठळकपणे नमूद केले आहे. त्यातून वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात मागणीचा विस्तार स्पष्ट होतो.

अहवालात कर्जदारांच्या कर्ज घेण्याच्या पद्धतींमध्येही बदल होत असल्याचे नमूद केले आहे. प्रति कर्जदार सरासरी प्रलंबित रक्कम डिसेंबर 2022 मधील 1.9 लाख रु. वरून डिसेंबर 2025 मध्ये 3.1 लाख रु. झाली आहे, तर 2.5 लाख रु. पेक्षा जास्त गोल्ड लोन एक्स्पोजर असलेल्या कर्जदारांची संख्या 2025 अखेरीस एकूण कर्जदारांच्या 14% झाली आहे. 2022 मध्ये हेच प्रमाण 10% होते. जास्त प्रमाणात सध्या असलेली शिल्लक आणि अधिक असुरक्षित एक्स्पोजर असलेले कर्जदारही ओरिजिनेशनमध्ये अधिक ठळक झाले आहेत. यावरून गोल्ड लोन आता कर्जदारांच्या वॉलेटमध्ये इतर कर्ज स्वरूपांसोबत अधिक प्रमाणात दिसत आहेत.

वाढ ही मजबूत जोखीम शिस्तीसह संतुलितच असावी

अहवालात या विभागाच्या वाढीसोबत अधिक तीव्र कर्जदार-स्तरीय जोखीम मूल्यमापनाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. अभ्यासानुसार, जून 2025 ला संपलेल्या सहा महिन्यांत ओरिजिनेट केलेल्या गोल्ड लोनसाठी एकूण थकबाकी दर 1.1% होता (थकबाकी म्हणजे ओरिजिनेशनच्या सहा महिन्यांत 60 दिवसांपेक्षा जास्त विलंबाने नोंदवलेले कोणतेही खाते).  ज्यांची पोस्ट-ओरिजिनेशन गोल्ड लोन प्रलंबित रक्कम 2.5 लाख रु. पेक्षा जास्त होती अशा कर्जदारांमध्ये थकबाकी दर 1.5% होता. तो कमी एक्स्पोजर असलेल्या कर्जदारांच्या 0.7% च्या तुलनेत सुमारे 2.2 पट जास्त आहे. याशिवाय, गोल्ड लोनमधील वॉलेट केंद्रीकरण, अलीकडील थकबाकी आणि एकूण कर्ज पोर्टफोलिओमध्ये गोल्ड लोनवर अधिक अवलंबित्व हे महत्त्वाचे पुढील जोखीम निर्देशक आहेत.

अहवालात पुढे असेही नमूद केले आहे की गंभीर थकबाकीचा इतिहास असलेले आणि नंतर गोल्ड लोनवर अवलंबून राहणारे कर्जदार औपचारिक क्रेडिट प्रणालीपासून दूर जाण्याचा लक्षणीय उच्च धोका दर्शवतात. त्यांचा क्रेडिट उपलब्धता बंद होण्याचा दर नॉन-डिफॉल्टिंग कर्जदारांच्या तुलनेत सुमारे 1.6 पट जास्त होता. यावरून असे सूचित होते की ज्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड नियमित आणि वेळेवर करण्यात अडचणी येत आहेत अशा कर्जदारांसाठी गोल्ड लोन हे शेवटचा पर्याय म्हणून वापरले जात असावेत.

श्री. जैन पुढे म्हणाले, “गोल्ड लोन विभागाचा विस्तार होत असताना वित्तपुरवठादारांचे प्राधान्य  प्राथमिकता वाढ आणि सावधगिरी यामध्ये संतुलन राखणे हेच असले पाहिजे. तारण ठेवण्याची ताकद महत्त्वाची राहते परंतु कर्जदारांचे मूल्यमापन करण्यासाठी ती एकमेव निकष ठरू शकत नाही. वित्तपुरवठादारांनी कर्जदारांचा एकूण कर्जबाजारीपणा, परतफेड क्षमता, अलीकडील क्रेडिट वर्तन आणि विविध कर्जदात्यांमधील एक्स्पोजर यांचे अधिक सर्वसमावेशक मूल्यमापन करणे आवश्यक आहे. कर्जदार-स्तरीय लोन-टू-वॅल्यू तपासणी अधिक मजबूत करणे, जोखीम-आधारित किंमत निर्धारण आणि गोल्ड लोनच्या परत परत वापरावर अधिक बारकाईने लक्ष ठेवणे हे या महत्त्वाच्या विभागाची शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने वाढ सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ठरेल.”

1 डिसेंबर 2025 पर्यंत शिल्लक वाट्याच्या 27.8% सह गृहनिर्माण कर्ज हे सर्वात मोठे रिटेल क्रेडिट उत्पादन आहे

2 क्रेडिटव्हिजन® (CV) स्कोअर श्रेणी: सबप्राइम 300–680; नियर प्राइम 681–730; प्राइम 731–770; प्राइम प्लस 771–790; सुपर प्राइम 791-900

जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे यातून बाहेर आल्यास खरी आदरांजली

आज राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तर दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आंबेडकर जयंतीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करताना तरुण पिढीला काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करताना केवळ मिरवणुका काढण्यापेक्षा त्यापेक्षा पुढे जाऊन त्यांच्या वारशाचा आणि विचारांचा विचार केला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स’ सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते. छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू ! विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे !

बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. राज ठाकरे ।

महापौर मंजुषा नागपुरे भीमगीतांच्या तालावर रंगल्या; बोपोडीत जयंती महोत्सवात उत्साहाचा जल्लोष

पुणे : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने बोपोडी येथे भव्य जयंती महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या या सोहळ्यात आकर्षक विद्युत रोषणाई, दमदार स्पीकर शो आणि भीमगीतांनी परिसर भारावून गेला. या उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मंजुषा नागपुरे यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भीमगीतांच्या तालावर ठेका धरला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली आणि नागरिकांमध्ये आनंदाची लहर पसरली.

या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. विजय खरे, अविनाश कदम, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर तसेच आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी क्रेनच्या सहाय्याने तब्बल ३० फूट उंचीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांनी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या प्रसंगी बोलताना वाडेकर म्हणाले, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती तर्फे दरवर्षी संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या दिमाखात विविध सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जातो. यंदा  बाबसाहेबांनी केलेलल्या महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी तर महात्मा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने महापालिका विविध उपक्रम राबविणार आहे, महात्मा फुले पुणे महापालिकेचे सदस्य होते यामुळे याला विशेष महत्व आहे. या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन वाडेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना केले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक सजावट आणि उत्साहपूर्ण सहभाग यामुळे बोपोडीतील जयंती महोत्सवाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अल्पोपहार वितरण तसेच रोप वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे झालेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार बापूसाहेब पठारे, सभागृह नेते गणेश बिडकर, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश उपाध्यक्ष हुलगेश चलवादी, सरचिटणीस महिपाल वाघमारे, सरचिटणीस श्याम सदाफुले, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक नीलेश अल्हाट, जयदेव रधवे, निलेश रोकडे, चिंतामण जगताप, सनाबी शेख, हर्षदा गायकवाड, मंगल रासगे, शोभा झेंढे, हनुमंत गायकवाड, मिलिंद चलवादी, अजय थोरात, सुनिल जाधव, बुद्धिशा रंधवे, शशिकांत मोरे, शांतीनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात नागरिकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले तसेच पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून रोपांचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समाजाने अवलंब करावा, असे आवाहन यावेळी केले.

लेखणी कागदावर अंकित होते तेव्हा त्याचा ग्रंथ बनतो; इतिहास रचला जातो : पद्मश्री शेखर सेन

0

पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : सृष्टीचे चलन आवर्तनातूनच होत असते. कलाकार हा संस्कृतीचा प्रतिनिधी असतो; निधीपती नव्हे. त्या निधीला सुंदर रूपात प्रस्तुत करण्याचे कार्य तो करतो. भूतकाळातून ज्ञानकलश, ज्ञानमोती शोधले जातात तेव्हा कलेची उन्नती साधली जाते. लेखणी कागदावर अंकित होत नाही तोपर्यंत ती कल्पना असते. जेव्हा ती कागदावर उतरते तेव्हा त्याचा ग्रंथ बनतो, इतिहास रचला जातो, असे प्रतिपादन संगीत नाटक अकादमीचे माजी संचालक, ज्येष्ठ कलावंत पद्मश्री शेखर सेन यांनी केले.

तालयोगी आश्रम, आवर्तन गुरुकुल आणि अभिजात अकादमीतर्फे तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. १२) शेखर सेन यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावर, डॉ. सदानंद बोरसे, पुस्तकाच्या अनुवादक विद्याहरि देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मयूर कॉलनीतील एमइएस ऑडिटोरियम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्ञान ग्रहण करण्यासाठी ग्रंथाची आवश्यकता असते हा मुद्दा अधोरेखित करून पद्मश्री शेखर सेन पुढे म्हणाले, संगीत क्षेत्रातील भ्रामक संकल्पनांना पंडित सुरेश तळवलकर यांच्या लेखणीतून दूर सारले जाईल. ते पुढे म्हणाले, कला प्रवाहित ठेवण्याचे कार्य कलाकार निरंतरपणे करत असतो. संगीत कलेच्या माध्यमातूनच निराशा, आत्म्यातील मलिनता दूर केली जाऊ शकते. निरंतर कला साधनेतून परंपरेत योग निर्माण करणाऱ्याला तालयोगी म्हटले जाते. मृत चर्मात प्राणप्रतिष्ठा करण्याचे कार्य तालयोगी पंडित सुरेश तळवलकर करीत आहेत, असे त्यांनी गौरवाने नमूद केले.

गुरूंचे विचार देशात प्रसृत होतील : पंडित सुरेश तळवलकर…

पुस्तक लेखानाविषयी बोलताना पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, ‘आवर्तन’ हे पुस्तक माझ्या हातून लिहिले गेले असले तरी यातील संकल्पना, विचार हे बुजुर्गांचेच आहेत. हे विचार, संकल्पना मला पहायला, ऐकायला, अनुभवायला मिळाल्या हे माझे भाग्य आहे. ‘आवर्तन’ म्हणजे पुनरावृत्ती नव्हे तर पूर्णत्व झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन सुरुवात होय. गुरू शिष्याला शिकवतात परंतु त्यावर अनेक वर्षांची साधना झाल्यानंतरच त्यातील अर्थ गवसतो. या पुस्तकाच्या माध्यमातून गुरूंचे विचार संपूर्ण भारतात प्रसृत होतील.

पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर म्हणाले, भारतीय अभिजात संगीताचा प्रसार संपूर्ण जगभरात झालेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून संगीत क्षेत्राकडे कसे पहावे, पुढे जाण्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन मिळेल.

डॉ. सदानंद बोरसे म्हणाले, ‘आवर्तन’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाच्या वाट्याला आलेला अनमोल जडावाचा दागिना आहे. पंडित सुरेश तळवलकर यांचे तबला-डग्ग्याइतकेच त्यांच्या वाणी व लेखणीवर प्रभुत्व आहे. या पुस्तकाची मांडणी सुबोध शैलीत केलेली असून यातील आठवणी-किस्स्यांमधून सांगीतिक विचारच पोहोचविले जात आहेत. मराठीतील विचारधन सीमित राहू नये, त्याचा परिघ मोठा व्हावा या हेतूने हिंदी आवृत्तीची निर्मिती झाली आहे.

अनुवादक विद्याहरि देशपांडे म्हणाल्या, अनुवाद करताना लेखकाचे विचार दुसऱ्या भाषेत आणावे लागतात. तेव्हा त्यांचे रूप बदलता येते परंतु विचार बदलले जात नाहीत. ‘आवर्तन’ पुस्तकाचा अनुवाद करताना पंडितजींचे शब्द गुरुवाणीप्रमाणे माझ्या कानात गुंजत होते. गुरू समिप असल्याची भावना सातत्याने जाणवत होती. ‘आवर्तन’ या पुस्तकातील विचारधन त्यांनी अभिवाचनाच्या माध्यमातून ऐकविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीनिवास राव यांनी केले. मान्यवरांचे स्वागत शिरीष कौलगुड, सुरेंद्र मोहिते, सुनील देशपांडे यांनी केले.

पुस्तक प्रकाशन समारंभानिमित्त तालवाद्य प्रस्तुतीचा अनोखा कार्यक्रम सावनी तळवलकर (तबला), ईशान परांजपे (काहोन), ऋतुराज हिंगे (कलाबाश), अमेय बिच्चू (संवादिनी) यांनी सादर केला.

खारघर, कळंबोली व पनवेल येथे अभिनय शिबिरांचे आयोजन

पनवेल महानगरपालिका व अ.भा. नाट्य परिषद शाखा- पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम सांस्कृतिक चळवळ

पनवेल, :- पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 मे ते 19 मे असे नऊ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात नाट्य संस्कृती चळवळीस अधिक चालना मिळावी या करिता नाट्यकलावंतांना अभिनयाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे त्याकरिता महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार याचे आयोजन करण्यात आले आहे.
पनवेल महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखेच्या विद्यमाने पनवेल, कळंबोली व खारघर येथे सर्व कलावंतांसाठी हे शिबिर मोफत आहे.

परेश ठाकूर
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नाट्य कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळावे व त्यांमधून पनवेलचे नाव राज्यात सर्वत्र पोहचावे याकरिता नाट्य परिषद विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. सध्या सुट्टीचे दिवस असल्याने युवा नाट्यकर्मींना अभिनय प्रशिक्षणास वेळ मिळु शकतो. या अभिनय प्रशिक्षण शिबिराचा मोठा फायदा पनवेल मधील कलावंतांना होईल.असे परिषदेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक परेश ठाकूर यांनी म्हटले आहे
.


दोन गटात शिबीर
अभिनय प्रशिक्षण शिबीरासाठी दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. यात पहिला गट विभाग म्हणजे वय वर्षे 8 ते 16 हा युवा गट व प्रौढ गट म्हणजे 17 ते 60 वयांपर्यंत यात सहभाग घेता येईल प्रत्येक गटासाठी हे शिबीर पूर्णपणे मोफत आहे . संख्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्या 30-30 नाट्यकर्मींना या शिबिरासाठी प्रवेश दिला जाईल.


*उच्चस्तरीय प्रशिक्षण *
युवा गटासाठी सकाळी 9 ते 12 व प्रौढ गटासाठी दुपारी 2 ते 5 अशी वेळा असतील. त्याचप्रमाणे पनवेल आणि खारघर येथे एक बॅच ही उच्चस्तरीय अभिनय प्रशिक्षणासाठी असेल. गतवर्षीच्या प्रशिक्षणापेक्षा अधिक वरिष्ठस्तरीय प्रशिक्षण मिळावे यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
नाट्य, सिने क्षेत्रातील मान्यवरांकडून शिबीरात मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शेवटी सर्वांचे सादरी करण होईल. सर्व शिबीरांर्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी आपली नाव नोंदणी दिनांक 5 मे 2026 पर्यंत करावी.असे आवाहन पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्यावतीने करण्यात येत आहे.

संपर्क
शिबीरात सहभागी होण्यासाठी संबंधितांनी पुढील क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क करावा.
1.शामनाथ पुंडे- प्रमुख कार्यवाह- अ.भा.नाट्य परिषद, पनवेल शाखा.
मो.नं : 9821758147

  1. श्रीमती स्मिता गांधी,सह कार्यवाह- अ.भा.नाट्य परिषद, पनवेल शाखा.
    मो.नं. 9323489693
  2. सौ. वर्षा कुलकर्णी – जनसंपर्क अधिकारी
    मो.नं. 7715815127

PMC क्षेत्रीय कार्यालये व प्रभागरचना बदलण्याच्या राजकीय खेळी संदर्भात DCM सुनेत्रा पवारांची तक्रार, तातडीने खुलासा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश


आक्षेप घेण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालये-विश्रांतवाडी व धानोरी (प्रभाग क्रमांक १ व २): हा भाग नैसर्गिकरीत्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ असताना, त्यांना दूर अंतरावरील नगर रस्ता कार्यालयाला जोडण्यात आले आहे.
-खराडी-वाघोली (प्रभाग क्रमांक ४) येथील नागरिकांना नगर रस्ता कार्यालय जवळ असताना, त्यांना ते ओलांडून तीन किलोमीटर दूर असलेल्या येरवडा कार्यालयात जावे लागणार आहे.पुणे महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालये व प्रभागरचना बदलण्याचा निर्णय हा प्रशासनाच्या नावाखाली करण्यात आलेली राजकीय खेळी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. महापालिका प्रशासनाने घाईघाईत तयार केलेल्या या क्षेत्रीय रचनेमुळे अनेक प्रभागांतील नागरिकांना पूर्वी जवळ असलेली क्षेत्रीय कार्यालये दूर गेल्याची तक्रार करण्यात आली होती. याचा थेट परिणाम महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांवर होत असून, दैनंदिन कामांसाठी त्यांना अधिक अंतरावरील कार्यालयांमध्ये जावे लागणार आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले होते.


पुणे: पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ विभागांच्या केलेल्या पुनर्रचनेवर थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या आक्षेपांवर तातडीने खुलासा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला दिला आहे. या संदर्भातचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.

महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळांच्या रचनेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रक्रियेत भौगोलिक सलगता आणि नैसर्गिक अंतराचा विचार न केल्यामुळे पुणेकरांना दैनंदिन कामांसाठी घरापासून लांब असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर या रचनेला स्थगिती देऊन नवीन प्रभागरचना करावी, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.


विश्रांतवाडी व धानोरी या क्षेत्रीय कार्यालयाला पूर्वीप्रमाणे कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ आणि येरवडा हे प्रभाग जोडणे अपेक्षित होते. यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये याच प्रमाणे क्षेत्रीय कार्यालयाची रचना होती. या वेळी या क्षेत्रीय कार्यालयांत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसविण्यासाठी कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ आणि लोहगाव विमाननगर हे प्रभाग जोडण्याची खेळी खेळली गेली. या राजकारणामुळे वाघोली येथील नागरिकांना रामवाडी जवळ असतानाही येरवड्यात यावे लागणार आहे. तर, कळस येथील नागरिकांना नगर रस्ता येथे जावा लागणार असल्याचा ‘राष्ट्रवादी’चा आक्षेप आहे.


प्रशासकीय सुसंगततेसाठी प्रभाग क्रमांक १, २ व ६ हे येरवडा क्षेत्रीय कार्यालयास आणि प्रभाग ३, ४ व ५ हे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयास जोडणे अधिक सयुक्तिक ठरेल. अशा प्रकारच्या विसंगत रचनेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना नाहक प्रवास व मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ही रचना अत्यंत एकांगी असून, त्यामध्ये भौगोलिक सुसंगतता व लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेतलेले दिसत नाही. तरी, जनहिताच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाच्या सदर प्रभागरचनेस तत्काळ स्थगिती देऊन नवीन सुधारित प्रभागरचना करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

महामानवाच्या विचारांची कास धरू या!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून. भारतीय राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र , न्यायशास्त्र, मानववंशशास्त्र अभ्यासक, द्रष्टे विचारवंत , थोर समाज सुधारक,पुरोगामी कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक, शिक्षणतज्ञ , संपादक, कठोर तत्वप्रिय नेते असे बाबासाहेबांचे प्रखर बहु आयामी व्यक्तीमत्व होते.

बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे सैन्यात मेजर- सुबेदार म्हणून सेवा करीत. त्यामुळे त्यांच्या भारतात विविध ठिकाणी बदल्या होत.सेवेबरोबरच ते समाज कार्यही करीत.त्यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय. कोकण विभागाचा माहिती उपसंचालक असताना संपादक मित्र राजेंद्र घरत,मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे तथासामाजिक कार्यकर्ते मित्र ऍड योगेश मोरे यांच्या समवेत आंबावडे येथील स्मारक पाहण्याची संधी मिळाली होती.

मध्यप्रदेशातील महू येथे बाबासाहेबांच्या वडिलांची नेमणूक असताना १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला.आता महूचे नामकरण “डॉ. आंबेडकर नगर” असे करण्यात आले आहे. सातारा येथील शासकीय विद्यालयात त्यांनी १९०० साली नोव्हेंबरमध्ये प्रवेश घेतला.१९०८ सालच्या जानेवारी महिन्यात ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले. पर्शियन आणि इंग्रजी घेऊन १९१३ मध्ये ते बी.ए. झाले. सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन १९१३ च्या जुलै महिन्यात बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले. अर्थशास्त्र हा प्रधान विषय घेऊन ते १९१५ मध्ये एम.ए. झाले. डि लीट, डीएससी, बॅरिस्टर ऍट ला असे ते उच्च विद्याविभूषित होते.

बाळासाहेबांचा ”दि कास्ट इन इंडिया” हा पहिला शोधनिबंध १९१६ मध्ये प्रकाशित झाला. इंग्लंड मधील लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पोलिटिकल सायन्स या संस्थेत ते जून १९१६ मध्ये दाखल झाले. आता ही संस्था लंडन स्कुल ऑफ इकॉनामिक्स या नावाने जगभर प्रख्यात आहे.
बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात १९१७ साली पीएचडीपर संशोधन पूर्ण केले.” स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमिडिज ” हा त्यांचा ग्रंथ १९१७ मध्ये प्रकाशित झाला.

बाबासाहेब मुंबईच्या सिडेनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९१८च्या नोव्हेंबर महिन्यात रुजू झाले.
त्यांनी १९२० च्या जानेवारीत ”मूकनायक” वृत्तपत्र सुरु केले.पुढे लंडन विद्यापीठाची अर्थशास्त्रातील एमएससी पदवी मिळवली.”दि प्रॉब्लेम ऑफ रुपी” या त्यांच्या शोधप्रबंधाला १९२३च्या मार्चमध्ये अर्थशास्त्रातील डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी मिळाली.तत्कालीन मुंबई शासनात विधान परिषद सदस्य (एम.एल.सी ) म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

सामाजिक समतेच्या चळवळीतील अत्यन्त महत्वाचे पाऊल ठरलेला महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह १९२६च्या मार्च महिन्यात बाबासाहेबांनी घडवून आणला.१९२७ च्या एप्रिलमध्ये त्यांनी “बहिष्कृत भारत” वृत्तपत्र सुरु केले.
मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयात १९२८ मध्ये ते प्राध्यापक झाले. १९३० साली त्यांनी ” जनता” पत्र सुरु केले.मानव मुक्तीच्या शांततामय संघर्षात गाजलेला काळाराम मंदिर सत्याग्रह त्यांनी १९३० ते ३५ या कालावधीत केला.

ब्रिटिश सरकारने १९३० -३२ या दरम्यान आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.१९३२ च्या सप्टेंबर मध्ये त्यांनीं पुणे करार केला.प्राध्यापक असलेल्या सरकारी विधी महाविद्यालयाचे ते १९३५ मध्ये प्राचार्य झाले.

अथक प्रयत्न करूनही जात व्यवस्था जात नाही हे पाहून त्यांनी १९३५च्या ऑक्टोबर महिन्यात येवला येथे झालेल्या जाहीर सभेत
बाबासाहेबांनी हिंदु धर्मत्यागाची घोषणा केली.पुढे जवळपास २० वर्षांनी त्यांनी प्रत्यक्ष धर्म परिवर्तन केले.
१९३६ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. शिक्षण ही मूठभर माणसांची मक्तेदारी राहू नये म्हणून त्यांनी १९४५ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.या संस्थेतर्फे विविध ठिकाणी विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. या संस्थेने शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणूनच आम्ही घडलो,असे ऋण लाखो विद्यार्थी व्यक्त करतात.”हू वेअर शुद्राज” हा त्यांचा गाजलेला ग्रंथ १९४६ मध्ये प्रकाशित झाला.

१९४७च्या ऑगस्ट महिन्यात ते घटना समितीचे अध्यक्ष झाले.

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री झाले.बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सादर केले.हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारले. तेंव्हा पासून आपण दरवर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो.

बाबासाहेबांनी १९५० साली जून महिन्यात औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली.त्यांच्या जीवन कार्याचा सन्मान म्हणून
कोलंबिया विद्यापीठाने आपल्या या विद्यार्थ्यांस १९५२ मध्यें एलएलडी पदवीने गौरविले.

बाबासाहेबांनी १९५५ मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली.त्याच वर्षी “प्रबुद्ध भारत” वृत्तपत्र सुरु केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी लाखो अनुयायांसोबत नागपूर येथे बौद्धधर्म स्विकारला. नेपाळ मधील काठमांडू येथे नोव्हेंबर १९५६ मध्ये झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेला ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

या महा मानवाचे महापरिनिर्वाण ६ डिसेंम्बर १९५६ रोजी दिल्ली येथे या झाले. मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीत हा महामानव चिरनिद्रा घेत आहे.येथे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्मारक होत आहे
बाबासाहेबांना भारत सरकारच्या “भारतरत्न” या सर्वोच्च नागरी पुरस्काराने १९९० मध्ये गौरविण्यात आले. त्यांच्यावर आतापर्यंत १२ चित्रपट, अनेक माहिती पट, ६ दूरचित्रवाणी मालिका, नाटकं निर्माण झाली आहेत
.

भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्मिती सहायक म्हणून काम करत असताना निर्माते सुधीर पाटणकर यांच्या समवेत मला “ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” हा टीव्हीपट राष्ट्रीय प्रसारणासाठी हिंदीतून आणि मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित करण्यासाठी मराठीतून निर्माण करण्याची संधी मिळाली होती. त्याकाळी दूरदर्शन ही एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी असल्याने ६ डिसेंम्बर १९८९ रोजी राष्ट्रीय स्तरावर रात्री नऊ वाजता प्रसारित झालेल्या या माहिती पटास देश भरातून प्रचंड प्रतिसाद लाभला होता. राष्ट्रीय प्रसारणात “प्राईम टाईम” मिळणं ते त्याकाळी अत्यन्त दुर्मीळ होतं.तो एक मोठा बहुमान समजला जात असे. या अभिमानास्पद आठवणींवर आधारित लेखही मी लिहिला होता.

बाबासाहेब आपल्यातुन शरीर रूपाने गेले असले तरी काळ जसा पुढे जात आहे, तसतसे त्यांचे “स्वातंत्र्य , समता , बंधुत्व,” शिका, संघटित व्हा,संघर्ष करा ” असे एक ना अनेक तेजस्वी विचार ,तत्वे जगाला अधिकाधिक प्रकाशमान करत आहेत.

दरवर्षी मुंबईत १४ एप्रिल या जयंतिदिनी,६ डिसेंबर या महा परिनिर्वाणदिनी आणि नागपूर येथे धम्म परिवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने उसळणारा जनसागर या लोकोत्तर महापुरुषाची महती गात असतो. त्यांच्या विचारांचे अनुकरणच आपल्याला व या विश्वाला पुढे नेणारे आहे.
या महामानवास मनःपूर्वक मानवंदना .


लेखन:देवेंद्र भुजबळ
निवृत्त माहिती संचालक

पुण्यातील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल

कुटुंबाशी फोनवर संवाद साधत दिला धीर

पुणे.दि.१३: पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (बीएसआय) या केंद्र सरकारच्या संस्थेत पीएचडी संशोधन करणाऱ्या ३० वर्षीय विद्यार्थिनीने लैंगिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन (५०) यांना पिंपरी-चिंचवड (भोसरी एमआयडीसी) पोलिसांनी अटक केली असून, त्याने लैंगिक छळ केल्याची कबुलीही दिली आहे.

दरम्यान, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी विद्यार्थिनीच्या आई-वडिलांशी फोनवरून सविस्तर संवाद साधला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मी स्वतः अतिशय व्यथित झाले आहे. मुलीला संशोधक बनवण्यासाठी पालक आयुष्य समर्पित करतात आणि अशा वेळेला मुलींच्या वाट्याला या गोष्टी येत असतील तर खरोखर असे नराधम कुठल्याच प्रकारच्या नोकरीत राहण्याच्या लायकीचे नाहीत.”

या विद्यार्थिनीला, डॉ. बिन्नियमिनकडून अनैतिक वर्तन, लैंगिक छळ, अंगावर हात टाकणे आणि मानसिक त्रास दिल्याने तीला मानसिक धक्का बसला व त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. तसेच तिचा संशोधनाचा डेटा वारंवार डिलीट करण्यात येत होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी कुटुंबीयांना पूर्ण सहकार्य दिल्याचे त्यांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी यावरून शैक्षणिक संस्थांमधील लैंगिक शोषण रोखण्यासाठीच्या समित्या कितपत कार्यान्वित आहेत, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली. “केंद्र सरकारची जरी ही संस्था असली तरी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी, उच्च शिक्षण विभागाने, महिला-बालविकास विभागाने वारंवार जीआर काढून स्पष्ट केले आहे की प्रत्येक शैक्षणिक संस्थेत स्थानिक तक्रार समित्या (लोकल कंप्लेंट कमिटी) असल्या पाहिजेत. परंतु त्या समित्यांकडे माहिती पोहोचते की नाही, याची तपासणी होत नाही. विद्यार्थिनींपर्यंत जागृती आणि माहिती पोहोचवण्यातही कमतरता दिसते,” असे त्यांनी सांगितले. ही विद्यार्थिनी केंद्र सरकारच्या संस्था सुरक्षित आहेत म्हणूनच इथे पीएचडीसाठी आली होती. पण घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.

वनस्पती शास्त्र संशोधन संस्था , केंद्र सरकार यांनी आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्याला बडतर्फ करावे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पीडित कुटुंबाला सक्षम सरकारी वकील मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी आश्वासन दिले.